Thursday, May 8, 2014

गंगेची तपश्चर्या अपुरीच

हे आम्ही काय ऐकले? कानावर विश्वास बसत नाही! अपरिमित त्यागाने प्राप्त झालेली ती प्रभावळ , सूर्याप्रमाणे दाहक असे ते तेज कुकरखालील ग्यास बंद केल्याप्रमाणे येकदम विझले? कुकरची शिट्टीपण झाली नव्हती. सकाळी पाच वाजता उठून नळाला पाणी येण्याची प्रतीक्षा करावी आणि प्रत्यक्षात शेवटी त्या नळातून दोन तीन थेंब थबकून त्याने राम म्हणावा? जो महापुरुष आपल्या नुसत्या दाढीयुक्त दर्शनाने समस्त जगाचे डोळे दिपवून टाकतो असे त्यांच्या भक्तगणाचे म्हणणे होते त्याने स्वत: उन्हाचा त्रास होतो म्हणून अंगभर सनब्लॉक चोपडून वर गॉगल लावून घरात बसण्यासारखे झाले हे.

स्वामीजींना प्रत्यक्ष गंगामैयाने पोष्टकार्ड धाडून तू लौकर ये रे बाबा म्हणून बलावून घेतले होते. त्यावर स्वामीजींनी बालके भगीरथ उर्फ गंगासुत याचा मातेचरणी शीर साष्टांग नमस्कार वि वि अशा मायन्याने उत्तर पण धाडले होते. त्यात त्यांनी नेसल्या धोतरासरशी येतो असे कळवले होते. यष्टीचे रिझर्वेशनपण केले होते. बंधू अपरिमितस्वामी यांना आम्ही एक दोन दिवस जाऊन येतो तोवर मठाचा कारभार सांभाळा असेही सांगून झाले होते. तेव्हा अपरिमितस्वामी आम्ही पूर्वीपासूनच कारभार करत आहोत, सॉरी सांगायचं राहून गेलं असे म्हणाले होते. पण मातेच्या ओढीने भगीरथ स्वामींनी त्याकडे फारसे लक्ष दिले नव्हते. ते टॉवेल, धोतर, टूथपेस्ट, कमंडलू. त्यांचे आवडते फूल कमळ इत्यादी गोष्टी होल्डऑल मध्ये कशा ठेवाव्यात या विचारात होते. कमळ होल्डऑल मध्ये ठेवले तर वाराणशी येईपर्यंत त्याचा गुलकंद होईल या चिंतेत ते होते. शिवाय मातेसाठी काय घेऊन जावे बरे? खूप विचार केल्यावर त्यांनी स्वत:ला समजावले होते, तसे आपल्यापाशी मातेला आवडेल असे काहीच नाही, उलट आपल्यालाच माता देईल. तेव्हा "अरेच्या, माते! अरेरे! खास तुमच्यासाठी करवून घेतलेला हिऱ्यांचा हार गडबडीत शेवटी तिकडेच राहिला!!" असे म्हणावे झाले. आणि आपण हे कमळ नेतोच आहोत, तेच मातेचरणी अर्पण करावे. हां, हेच बरे. फक्त जाईपर्यंत हे कमळ चुरगाळू नये. नाहीतर फुलाच्या ऐवजी निर्माल्य वाहिल्यासारखे होईल.

अशी सर्व तयारी झाली असताना स्वामींनी जाणेच क्यान्सल करावे? मातेचे आपणच येकटे लेकरू नव्हे, अन्य लेकरेपण आहेत आणि ती मातेपाशी आपल्या आधीच दाखल झाली याचे स्वामींना जरा वाईटच वाटले होते. पण आपणच तिचे लाडके असे त्यांनी आपले समाधान करून घेतले होते. माता सर्वांना भले कुरवाळील, पण डब्यातील लाडू हळूच काढून आपल्याला देईल अशी त्यांना खात्री होती. मग आपण डोळे मिटून लाडू खाता खाता, माता हळूच, काय रे बाबा, एवढ्या दूर मठात शिकायला धाडला तुला. इतके दिवस कधी चिठी नाही चपाटी नाही. मी बोलावल्यावर तुला आठवण झाली आईची. बरं, निदान काय प्रगती केलीस ते तरी सांग असे म्हणेल. तिला काय सांगायचे? अगे माते, शिक्षणाचे ते काय? त्याशिवायच मी मठाधिपती झालो आहे! शेवटी शिकूनतरी काय मोठे करतात माणसे? आधीचे अधिपती? त्यांना म्हणालो रिटायर व्हा, किती दिवस कष्ट करणार? ते नाही म्हणत होते पण प्रेमाने त्यांना व्हीआरएस दिली. तेव्हापासून प्रचंड प्रगती झाली आहे. आपल्या भगिनी नर्मदामाता याला साक्ष आहेत. यावर माता कदाचित विचारेल, बाळा, कोणाची प्रगती? ती पेप्रात छापून आलेली नव्हे, खरीखुरी सांग! मग खरे सांगावेच लागेल. मग माता वरून क्रुद्ध पण आतून अतिशय दु:खी होईल. जाऊदे, त्यापेक्षा न गेलेलेच बरे. माता समजून घेईल, आईचे प्रेम सगळ्यावर पुरून उरते. माते! इथूनच तुला वंदन! काहीतरी बहाणा करावा. हां! वाराणशीच्या दुष्ट जकातवाल्यांनी कमळ आणायला सध्या बंदी घातली आहे, जबर जकात भरावी लागेल आणि वर परत दंड असे आम्हाला सांगितले आहे. अस्सेच सांगावे. बरं झालं उलट बंदी घातली ते. तसे नुकसान काहीच नाही. फार फार तर काय, रिझर्वेशन वाया जाईल. जाऊदे, पन्नास पैशाचेच तर होते. आणि इथे कोण तिकीट काढते म्हणा!

No comments:

Post a Comment