Friday, May 16, 2014

तख्त दिल्लीचे!

दिल्लीपरेंत धडक मारोन अहमदशहा अब्दालीचे तख्त फोडण्यासाठी येवढी खास तैयारी करोन बैसलो होतो.  आमचा विजय निश्चित होता. अठरापगड जातीचे बाजारबुणगे, दहा हजाराचे पायदळ, बैल, खेचर, तोपखाना, त्यावरील गोलंदाज, खास आम्ही तयार करवून घेतलेली तीरकमठाधारी पथके, आमच्या सेनापतींसाठी पंचलक्षणी अश्व, आमच्यासाठी अंबारी धारण केलेला हत्ती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सुसज्ज आणि संपूर्ण असा मुदपाकखाना, आचारी, पाणके. आम्हांस दोनप्रहरीच्या भोजनानंतर गुजरदेशीचे पेय लागते. सध्याचे टारगट टवाळखोर त्यास गुज्जू बीयर म्हणतात. आम्हांस ते फारसे कळत नाही, पण आमच्या मते गुजरलस्सी हे समग्र पृथ्वीतलावरील पाचक, मेंदू थंड ठेवणारे आणि आम्लपित्त शमवणारे एक अप्रतिम पेय आहे. कोणत्याही मोहिमेवर गेलो तरी आम्ही या पेयाचे कुंभच्या कुंभ खेचरावर लादून नेतो. नुसत्या त्याच्या वाहनाने खेचरसुद्धा थंड होते तर आमची काय अवस्था वर्णावी. तर अशी जय्यत तयारी करोन शीघ्रगतीने मार्गक्रमण करून दिल्लीस निघालो होतो. गंगामैयाचे दर्शन घ्यावे या हेतु वाराणशीस मुक्काम पडला.

स्नान, दर्शन इत्यादी घेऊन झाल्यावर फारसे काही करण्यासारखे नव्हते. कंटाळोन गुजरी बियरचा गिलास हातात घेऊन झाडाखाली बसलो होतो. माहूत नवीन अंकुश आणायला गेला असावा. तेवढ्यात दुरून गाण्यासारखे 'बापू बोलता है' असे शब्द ऐकू आले. पाहतो तर दिगंबर जैनांची एक टोळी 'मुक्त'पणे भ्रमण करीत दिल्लीच्या दिशेने चालली होती. आमची नजर मोठ्या प्रयासाने उत्तमांगावर ठेवून आम्ही त्यांचे नाव पुसले. प्रमुख स्वामींचे नाम केजरीबापू असे कळले.दिल्लीत मोठे अराजक माजले असून त्यावर हल्ला बोलण्यासाठी आम्ही जात आहोत असे मी त्यांस सांगितले आणि जोवर परिस्थिती ठीक होत नाही तोवर स्वामींनी जाऊ नये अशी नम्र सूचना केली. त्यावर स्वामी हसले. मोरपिसाचा पंखा आमच्या मुखासमोर चवरी ढाळल्याप्रमाणे हलवून म्हणाले,'वत्सा, आम्ही दिगंबर! सर्वत्वाचा त्याग केलेले! अब्दाली आमचे काय आणखी फेडणार? नंगे से खुदा भी डरता है! उलट आम्हांस पाहून त्यालाच (म्हंजे अब्दालीला) दोन दिवस जेवणे कठीण होईल.'  आम्ही श्वास रोखून धरून आमच्या प्राणाचे रक्षण केले. सुदैवाने स्वामींनी चवरी ढाळणे थांबवले आणि पंखा पुन:श्च लज्जारक्षणार्थ समोर धरला. तेव्हा आमचीच लज्जा राखली गेली असे आम्हांस वाटले. स्वामी पूर्वी मोरपिसाच्या पंख्याऐवजी खराटा वापरीत असत. खराटा अवघड जागी टोचतो, त्यापेक्षा मोरपीस बरे पडते असे शिष्यांचे म्हणणे पडले आणि स्वामींनीही मग त्यास परवानगी दिली असे समजले. स्वामी सर्वसंगपरित्याग करून मुक्त, त्यांस कसलेही दडपण वा लज्जा असत नाही. आम्ही स्वामींस फलाहार करून जाण्याची गळ घातली. प्रन्तु स्वामींनी त्यास नकार दिला. आम्ही पुन: त्यांस वंदन केले आणि स्वामी जावयास निघाले. जाता जाता त्यांच्या शिष्यांनी मात्र तबकातील सर्व फळे स्वामींच्या नकळत हळूच झोळीत भरली. एकाने तर हसत आम्हांस डोळा मारला आणि आमची गुजरी बियरही कमंडलूत भरून घेतली. आम्हांस म्हणतो स्वामी सर्वांसमोर संकोचतात. पण नंतर हे सर्व घेतील, चिंता नसावी. आमच्या हत्तीकडे एक करुण-प्रेमळ कटाक्ष टाकून स्वामी झपाट्याने चालू लागले.

दिल्लीस पोहोचलो आणि पाहतो तो किल्याचा दरवाजा सताड उघडा दिसोन आला! किल्याच्या आत अजिबात वर्दळ नजरेस येईना. अब्दाली सैन्यासह परागंदा झाला असावा की काय अशी शंका उत्पन्न झाली. आमचे सैन्याचा थोडा विरसच जाहला. वीररस प्राप्त करोन उच्चरवात युद्धघोषणा करीत दिल्लीत प्रवेश केला खरे प्रन्तु विरुद्ध सैन्याने स्वागत करोन जेवण्याखाण्याची व्यवस्था झाल्याची वर्दी द्यावी असे झाले. प्रासादात प्रवेश केला तो समोरच दिल्लीचे तख्त! पूर्ण मोकळे. जवळ जाऊन पाहतो तो त्यावर पुष्पगुच्छ आणि येक खलिता ठेवलेला. खलिता उघडोन पाहिला. आत वंदन करोन सिंहासन आपलेच असल्याचा मजकूर आणि खाली अब्दालीची मोहोर! सिंहासनावर विराजमान झालो. समोरील द्वारातून सूर्यकिरणे थेट आमच्या पायाशी येत होती. सैन्याने जयजयकार सुरु केला होता. कोणी तरी कमलपुष्पांचा वर्षाव केला. आता फक्त सुराज्य आणि स्वराज्य!

No comments:

Post a Comment