Sunday, December 28, 2014

त्याच तिकिटावर तोच खेळ

अहाहा! या दिल्लीच्या २ डिग्रीमध्ये कसं अगदी उल्हसित वाटतं आहे. इतके दिवस जी मरगळ दाटली होती ती पार पळाली आहे. होय, याला कारणीभूत केवळ एक आणि एकच, आमचे सकलमुगुटमंडित निधर्मीप्रतिपालक कडकनियमेश्वर भ्रष्टाचारविध्वंसनिधान आपनृपति यांनी शेवटी युद्धघोषणा केली! सत्ता सोडून वर्ष व्हायला आलं. मुख्यमंत्रीपदाची पहिली पुण्यतिथी साजरी करण्याचा प्रस्ताव काही कार्यकर्त्यांनी मांडला होता. त्यानिमित्ताने निधी गोळा करता येईल असाही एक विचार त्यामागे होता. आणि तो योग्यही होता. नमोंच्या भाषणासाठी लोक पाच रुपये देऊ शकतात तर आपल्या बलिदानाच्या पुण्यतिथीला देऊ शकणार नाहीत? सहानुभूती म्हणून तरी? नक्कीच देतील. का नाही देणार? बुडत्याला हात देणे आपली संस्कृती आहे. अशी चर्चा झाली. मग किती लोक पैसे देऊन येतील याचा अंदाज घेतला गेला. आणि असं लक्षात आलं की हजेरी लावणारे बहुतेक आपलेच कार्यकर्ते असतील. मग आपल्याच लोकांना का नाडायचं असा विचार पुढं आला आणि पुण्यतिथीचा कार्यक्रमच बारगळला. नाहीतरी देशभरातून मोजून पंचवीस तीस कार्यकर्ते हजर राहतील असाच होरा होता. उगाच शेदोनशे रुपयांसाठी कशाला मरा? जागेचं भाडंच जास्त व्हायचं. तसं आम्ही आमचं श्रद्धांजलीवजा भाषण तयार ठेवलं होतंच. ते याप्रमाणे - "मित्रहो, आज आपण येथे जमलो आहोत ते दु:ख व्यक्त करण्यासाठी नाही तर एका अल्प पण तेजस्वी अशा जगण्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी. ज्याप्रमाणे कापूर भुरूभुरू जळतो, त्याचे ते जळणे अल्पजीवी असते, पण ज्योत प्रखर असते. जळून गेल्यावर त्याची नामोनिशाणीही राहत नाही. उगाच मागाहून दुसऱ्यांना केर काढावा लागत नाही. त्याचप्रमाणे ही कारकीर्द होती. उगाच बळंच एवढं एवढं तेल घालत ती टिकवून ठेवली नाही. जगावे तर स्वाभिमानाने नाही तर मरावे असा विचार करून सत्ता स्वीकारली गेली. पण आपल्याला कोंडीत पकडले गेले. इकडे पोलिस तर तिकडे लोकसभा निवडणुका अशा विचारद्वंद्वात स्वाभिमानाने मरावे आणि लोकसभेरूपी उरावे असा निर्णय घेतला गेला. पण मित्रहो, अशा देदीप्यमान मरण्याला जपानमध्ये हाराकिरी म्हणतात आणि ती अत्यंत मानाची मानली जाते. तेव्हा, त्याचा अभिमान बाळगा. पुन्हा जर अशी संधी मिळाली तर अशा पन्नास हाराकिऱ्या करायला आपण तयार आहोत ही खात्री बाळगा." अतिशय कौतुकाने मी माझे हे भाषण आमचे युद्धनीतीनिपुण सेनापती प्रशांत भूषण यांना दाखवले तर त्यांच्या पसंतीस आले नाही. "आम्ही बोंबलून सांगत होतो, राजीनामा देऊ नका. पण नाही. हाराकिरीची हौस त्यांचीच. उगाच त्यांना डोक्यावर चढवून ठेवू नका असल्या भाषणानं. सत्तेत येण्यापेक्षा राजीनामा देण्यात जास्त रस असतो त्यांना." असे ते म्हणाले. तरीही आम्ही हे भाषण आमच्या भ्रष्टाचारविरोधमार्तंडांना दाखवलेच. ते सद्गदित होऊन "तूच आम्हांला खरे ओळखलेस रे बाबा. टोपीत टोपी आपची आणि झिंगेत झिंग हौतात्म्याची. राजीनामा देऊन अकरा महिने उलटले पण उतरत नाही ती नशा. ते रस्त्यावर अंग लोटून देणे, त्रागा करणे, त्या टीव्हीवरच्या भारलेल्या मुलाखती, ते दीक्षितांच्या विरोधातील पुरावे, त्या रिक्षेवाल्याच्या थपडा, थपडेनंतर सुरू झालेला मदतीचा ओघ, स्वत: रात्र रात्र जागून निवडलेले उमेदवार, त्या गोल टोपी घालून केलेल्या इफ्तार पार्ट्या. सगळं कसं काल परवा घडल्यासारखं वाटते आहे. " त्या सर्व आठवणीत गढून ते उन्मनी अवस्थेत गेल्यासारखे दिसत होते. त्यांचे डोळे अर्धोन्मीलित होते. डोक्यावर गुंडाळलेला मफलर त्यांच्या मस्तकाभोवती एखाद्या प्रभावळीप्रमाणे शोभत होता. चेहऱ्यावर निद्रिस्त गौतम बुद्धाप्रमाणे एक शांत समाधानी मंद स्मित विलसत होते. जगीं सर्व सूखी असा कोण आहे या प्रश्नाचे उत्तर आमच्यासमोर खुरमांडी घालून अदृश्य सूत कातत बसले होते. सुताचा वापर कुणी कसा करावा त्यावर त्याचे यश अवलंबून असते असा एक विचार आमच्या मनात येऊन गेला. भाजपला सूत चांगले जमवता येते, कॉंग्रेसला ते काढता येते, तृणमूलला त्याची वात बनवता येते, माकपला त्याची वाट लावता येते, सेनेला सरळ असलेले वाकडे करता येते, मनसेला कुणी न विचारले तरी सरळ करता येते, आम्हाला नुसतेच कातता येते. लोकशाही लोकशाही ते यालाच म्हणतात काय? एक सूत सात जणांनी मिळून नष्ट करावे. गांधीजींनी उगाच चरख्याचा आटापिटा केला.

आम्ही पुण्यतिथी साजरा करण्याचा मानस आमच्या जगज्जेत्या (पक्षी: दिल्ली चतु:सीमा आणि हरियाणाचा काही दुर्लक्षित भाग) नेत्याच्या चरणी ठेवला आणि म्हणालो,"स्वामी! सैनिकांत मरगळ आली आहे. काही शिलेदारांनी आपली घोडी चौपाटीवर भाड्याने दिली आहेत, काहींनी तिथेच पाणीपुरी भेळेच्या गाड्या टाकल्या आहेत. काही जण सिक्युरिटी गार्ड झाले आहेत तर उरलेले होमगार्डमध्ये भरती झाले आहेत. आपले परदेशातील सांडणीस्वार हाकायला काही राहिले नाही म्हणून फावल्या वेळात खरोखरच्या शेळ्या हाकू लागले आहेत. आजही काही परमभक्त आपला स्काईपकॉल येईल म्हणून रोज लॉगिन करतात आणि दु:खी अंत:करणाने दिल्लीविजय पोथी वाचत बसतात. तो कॉल येतच नाही स्वामी! येतच नाही! हे सर्व आपणच बदलू शकाल. आपल्याला पुन: एकदा सोशलमीडिया प्रांती घोडदौड करताना पाहायचे आहे आम्हाला. पूर्वी आपण भाजपला लवलेटर पाठवावे काय इथपासून आता प्यांट बदलावी काय इथवरच्या सर्व प्रश्नी आमचे आणि जन्तेचे सल्ले घेत होतात. त्याने सैनिक भारावून जात असत. आपण नुसते एक ट्विट करायचा अवकाश आपले निष्ठावंत स्मार्टफोनधारी सैनिक टिवटीव (पक्षी:रीट्विट) करून एकच जल्लोष करत असत. रणांगणावर ऐन युद्धप्रसंगी आपल्याला प्यांट बदलता यावी म्हणून सर्व सैनिक कसे रोमन डिफेन्स फ़ॉर्ममध्ये आपल्याभोवती कोंडाळे करून आडोसा देत असत. मग त्यात आपण निर्धास्तपणे प्यांटच काय, काहीही बदलू शकत होतात. ते स्पिरीट पुन्हा आणा! तो युद्धाचा जोश परत आणा!" एवढे बोलून आम्ही थांबलो. दम लागला होता. भाषणाचीही सवय मोडली आहे. हे ऐकून माजी दिल्लीनृपतींच्या चेहऱ्यावर येशू ख्रिस्तासारखे करुणप्रेमळ भाव उमटले. "वत्सा! जा, सैनिकांत हे शुभ वर्तमान दे! दिल्लीवर पुन:श्च स्वारी करायची! होय. म्हणावे परजा तुमचे ते स्मार्ट फोन पुन्हा. समस्या त्याच आहेत, त्यामुळे आपली आश्वासने तीच आहेत, उपाय तेच आहेत. फक्त ते थप्पड वगैरेचं नाटक यावेळेला नको बुवा. नाहीतर बदल म्हणून यावेळी पृष्ठभागी लाथ वगैरे अॅरेंज करणार असाल तर यावेळी त्यासाठी पात्र वेगळे निवडा. त्यासाठी खूप गणंग आहेत पडलेले. आपल्या सुदैवाने भ्रष्टाचार काही संपत नाही. भाजप भ्रष्टाचारीच हे पुन: पुन: ओरडून सांगू. पुन: धुरळा उडवू. सत्तेत येऊ अथवा न येऊ. सत्तेत आल्यास पुन्हा आंदोलन करू आणि भव्यदिव्य पद्धतीने सत्ता सोडू. अर्थात, मागील निवडणुकीत आपण निवडून येऊ, मग खरंच काही करावं लागेल अशी चिंता आपल्याला सारखी कुरतडत होती. यावेळी तीही चिंता नाही. शिवाय गेल्या वेळी तिकीट दिलेल्या पस्तीस जणांना मी गाळले आहे. त्यात नऊ आमदार आहेत! आहे की नाही क्रांतिकारी हे सर्व?  पण चिंता करू नकोस. यावेळी प्रत्येकाला हुतात्मा होण्याची संधी मिळेल याची ग्वाही मी देतो. तो कुमार विश्वास आत्तापासूनच हौतात्म्यावर कविता करू लागला आहे. कविला सफल प्रेमापेक्षा प्रेमभंगच अधिक आवडतो हेच खरे. " हे वचन ऐकून उल्हसित व्हावे की नुसतेच हसित व्हावे असा विचार आम्ही करू लागलो. "मग, पुण्यतिथीचे काय? करायची ना साजरी?" आम्ही पुन: विचारले. एवढी मेहनत घेऊन लिहिलेले भाषण निदान पंधरावीस जणांसमोरतरी वाचायला मिळायला हवे एवढाच उद्देश. "म्हणजे काय? जरूर करायची! जुन्या आठवणींना उजाळा नक्कीच देता येईल. आमच्या फोटोला हारबिर घालू नका म्हणजे झालं. झाली एवढी हार पुरे."  नृपति हासत म्हणाले. ते म्हणजे फारच विनोदी बुवा. हार शब्दावरती पण कोटी करायची म्हणजे काय. पुण्यतिथीला फोटोला हार कसा घालू आम्ही? तो कार्यक्रम जयंतीला करू.

निवडणुकीचे चिंतन शिबीर ठरले.  धोरण काय असाच कार्यकर्त्यांचा प्रश्न होता. त्याचे सहजसुंदर निराकरण झाले. मुळात समस्या तीच, जन्ता तेच, शत्रू तेच तर मग धोरण बदलायचे कारण काय असा उलट प्रश्न नृपतींनी विचारला. ज्या धोरणावर आपण पूर्वी निवडून आलो तेच राबवायचे. मग कुणी तरी विचारले,"परदेशी धोरण, काश्मीर धोरण याबाबत काय करायचे?" त्यावर ते मिष्कीलपणे हसले आणि त्यांनी खिशातून गोल टोपी काढून दाखवली. ती फडकावत ते म्हणाले,"नेहमी खिशात ठेवा ही टोपी. कामाला येते. मुख्य म्हणजे कोणत्याही प्रश्नाला 'भ्रष्टाचार!' एवढेच उत्तर द्या." मागेही त्यांनी आम्हाला हेच सांगितले होते. हे आम्हाला घरी महागात पडले होते. घरी यायला उशीर होतो म्हणून बायकोने झापले आणि विचारले होते,"रोज कसा काय हो उशीर होतो तुम्हाला? काय करत काय असता ऑफिसमध्ये?" आम्ही गाफील होतो. आमच्याकडून घोकंपट्टी केलेले उत्तर गेले,"भ्रष्टाचार!" पुढे समजावताना नाकी नव आले होते. त्यामुळे सर्वांवर भ्रष्टाचार हे उत्तर असू शकत नाही. हे एकदा आम्ही पक्षाच्या बैठकीत सांगितले तर दुसऱ्याच दिवशी "भ्रष्टाचारावरील तुमचा विश्वास उडत चाललेला आहे असे आमच्या निदर्शनास आले आहे. तेव्हा तुम्हांस पक्षातून काढून का टाकू नये?" अशी कारणे दाखवा नोटीस मिळाली. शेवटी आमच्या आळीतील "टुकार मारुती देवस्थान ट्रस्ट" विरुद्ध आंदोलन करून त्यांना त्यांचा वर्षाचा आर्थिक अहवाल जाहीर करायला लावला तेव्हा कुठे पुन्हा पक्षात स्थान मिळाले. ट्रस्टची वार्षिक उलाढाल नकद तीनशे साठ रुपये असून रंगकामावर रुपये दोनशेपन्नास खर्च दाखवण्यात आला होता. ट्रस्टपाशी केवळ दोनशेचाळीस रुपयांची पावती होती. दहा रुपये रंगाऱ्याच्या चहावर खर्च झाले हा ट्रस्टचा युक्तिवाद आम्ही मान्य केला नाही. शिवाय दर शनिवारी येणाऱ्या तीन ते पाच नारळांचा कुठेही उल्लेख दिसला नाही हेही आम्ही निदर्शनास आणून दिले. ट्रस्टने जाहीर माफी मागितली असून, यापुढील कारभारावर देखरेख करण्यासाठी अतिरिक्त सचिव म्हणून सध्या आमची नेमणूक केली आहे. असो. शिबीर संपल्यावर नृपतिंनी आम्हाला थांबवून घेतले आणि बोलले,"तुझे भाषण उत्तम आहे रे. जपून ठेव. पुढील पुण्यतिथीस उपयोगी पडेल." आम्ही ते केव्हाच ओळखले आहे.

Wednesday, December 24, 2014

रणछोडदास वांगडू

फना चित्रपट आणि पीके यात काय फरक आहे? म्हटलं तर काहीच नाही म्हटलं तर खूप काही. एकात दहशतवादाचे उदात्तीकरण तर दुसऱ्यात जे उदात्त आहे त्याचे दहशतीकरण. मनोरंजन सुद्धा दहशत माजवते. उदाहरणार्थ झी टीव्ही च्या सासू सून मालिका. त्यांनी तर "कौटुंबिक भयपट" हे नवीन दालन उघडले आहे. खानाच्या दहशतीतून आपण बाहेर पडायला तयार नाही बुवा. काही दिवसांपूर्वीच अफझलखानाने फौज पाठवून म्हाराष्ट्र काबीज केला. वास्तविक फौजेचा पाडावच व्हायचा, पण आयत्या वेळी म्हाराजांना वाघनखं काय घावली न्हाईत. फुडल्या वेळेला पघू असं म्हाराज म्हणाले आहेत. तो धुरळा खाली बसतोय न बसतोय तंवर या दुसऱ्या खानानं स्वारी केली. काय हे सगळे खान भारताच्या राशीला लागले आहेत कळत नाही. एक ककक क्किरन वाला खान, दुसरा चचच चश्मिष किरन वाला खान, तिसरा हिटअँडरन वाला खान. पहिल्याचा माथेफिरू प्रेमी बघून घाबरलो होतो, दुसऱ्याचं विदयुतमूत्रपरस्परसंबंध विषयक धक्कादायक ज्ञान पाहून काही दिवस  बाथरूममधला दिवा लावणं टाळलं होतं, तर तिसऱ्याच्या अफाट मैत्रिणीसंग्रहाबद्दल ऐकून काहीसं थक्क आणि बरंचसं खिन्न होत होतो. कक्ककिरन खान सोडून द्या. म्हणजे देवाला बकरा सोडतात तसा आम्ही त्याला पापस्तानसाठी सोडला आहे. असे सोडलेले बकरे बहुतांशी जे करत गावभर फिरतात तेच हा पण करतो. याला ढुशी दे त्याला पाड. विशेषत: वानखेडे स्टेडीयम दिसले की याचे डोके फिरते. शेवटी कंटाळून स्टेडीयमच्या अधिकाऱ्यांनी म्हणे शिवसेनेच्या वाघाचे चित्र गेटवर लावले आहे असे ऐकतो. दृष्ट लागू नये म्हणून मिरचीलिंबू टांगावे तसे. एका दगडात दोन पक्षी. स्वत:च गेटवर पाहरा देत असल्याने पीच खणता येत नाही, आणि चित्र बघून हा बकरा तिकडे फिरकत नाही. सल्लूमियां तेवढे हुशार निघाले. दर गणपतीला लालबागच्या राजाचे दर्शन घेतात असे ऐकले. असं काही ऐकलं की आम्हां  सहिष्णू हिंदू भोट मंडळींचे डोळे कसे भरून येतात. "तुम्ही काही म्हणा, सर्व धर्म सारखे हो. नमाज पढा, मोतमावलीला चर्चात जा किंवा किंवा सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पाच तास रांगेत उभे राहा, चपला सगळीकडेच चोरीला जातात." असे आमचे मित्रवर्य श्री मोरेश्वर उर्फ मोरू याचे मत आहे. निधर्मीवादाचे याहून निष्पाप रूप आम्हांस माहीत नाही. त्यामुळे आम्ही यापैकी कुठेही गेलो तरी चपला पिशवीत घालून पिशवी पोटाशी धरून असतो. बाकी आमच्या निधर्मीवादाची आणखीही काही रूपे आहेत. त्यांचा उपयोग रोजांच्या दिवसांत शीरखुर्मा, बिर्याणी, तंदुरी, डिसेंबरमध्ये ख्रिसमसच्या पार्टीचे बोलावणे मिळवणे इत्यादी ऐहिक गोष्टी प्राप्त करण्यासाठी होतो. आमचा स्वभाव एवंगुणविशिष्ट असल्याने आम्ही या खान मंडळींत आणि इतर हिंदू नटबोल्टांच्या चित्रपटात कधी फरक केला नाही. चित्रपट कुणाचाही असो, मध्यंतरात चहा आणि बटाटेवडा गरमागरम मिळाला की आमची फारशी तक्रार नसते. मोरू तर तीन बाहेर खातो आणि एक थेटरात घेऊन येऊन खातो. त्याला किती वेळा सांगितलं, अरे बाबा, तिथे ती हिरवीण छान मोहक, मादक दिसत हिरोच्या नाकापासून केवळ अर्ध्या इंचावर लाडात येऊन बोलते आहे, अशा वेळी लसूण घातलेल्या बटाटेवड्याचा खमंग वास नाकात घुसला की रसभंग होतो. आम्ही तुझ्या बटाटेवड्याकडे कौतुकाने पहायचं की पडद्याकडे? क्षणभर त्या नटाचंही चित्त विचलित होऊन तो म्हणायचा,"जरा थांब गो, हंयसर वड्याचो वास सुटलो आसा, मी पयलो भायेर जांवन वडो खातंय, मगे तुज्या गजाली ऐकतंय." माझ्या मनातील हिरो वैतागला की मालवणीत घुसतो. भद्रकाली प्रॉडक्शनची कृपा. तात्यांनू मापी करा.

मला हे असलं निधर्मी करण्यात हिंदी चित्रपटांनी भरपूर हातभार लावला आहे. मनमोहन देसाई या इसमानं तर माझंच काय माझ्या पिढीतल्या सर्वांचं बालपण संस्कारित केलं आहे. जत्रेत हरवणारी ती अश्राप भावंडं, निरुपा रॉय सारखी डीलक्स प्रेम करणारी (डीलक्सच. आमच्या मातोश्रींचं प्रेमळ बोलणं म्हणजे, हं ढोसा एवढं आणि उधळा गावभर! इथवर थांबायचं)  त्यांची ती आई, घरात लक्ष न देता आपल्या काळे धंदे करणाऱ्या बॉसकडे जास्त लक्ष देणारा निष्ठावंत बाप.  मग पुढं ही पोरं रीतसर हरवल्यानंतर आणि नियमाप्रमाणे आई आंधळीलंगडी  झाल्यावर निधर्मीपणाला ऊत यायचा. एक श्रद्धाळू हिंदू घरात, दुसरं जाळीचा बनियन घालून कोंबड्या बकऱ्यांच्या गर्दीत मोहल्लेगिरी करणारं, तिसरं कुणीच नाही म्हणून चर्चच्या फादरकडे अशी सर्वधर्मसमभावी वाटणी व्हायची. या जत्रेत हरवायचा आम्ही एवढा धसका घेतला होता की कोकणातल्या आमच्या घरापासून अर्ध्या किलोमीटरवरती भरणाऱ्या  जत्रेत मी आणि माझा भाऊ कधी एकत्र गेलो नाही. गावातील यच्चयावत जनता एकमेकाला ओळखत असतानासुद्धा आम्ही ही खबरदारी वयाच्या दहाव्या वर्षी घेत होतो हे मनमोहन देसाई यांचं कथालेखक-दिग्दर्शक म्हणून यशच म्हणावं लागेल. आज वाटतं गेलो असतो तर कदाचित आज आमचे बंधुराज एखाद्या धनाढ्य हिंदू कारखानदाराचे चिरंजीव आणि मी फादर ब्रॅगांझा यांच्या अनेक असल्या पाळलेल्या मुलांपैकी एक झालो असतो. मी शिकलो नसतो पण एक उत्तम गावगुंड म्हणून नाव कमावलं असतं. शर्टाची वरची दोन बटणं उघडी टाकून सेठी टेक्स्टाईल्स, सेठी एक्स्पोर्टस, सेठी बिल्डर्स, सेठी टाईल्स, सबकुच्च सेठी असल्या सगळ्या पाट्या एकाच गेट वर लावलेल्या बिल्डींगमध्ये भावाला भेटायला गेलो असतो. तिथं "ये मायकल किसीके लिये काम नै करता और जीझस छोडके किसीके सामने नै झुकता साब" टाईप डायलॉग मारले असते. मग पुढं यथावकाश एखादी झीनत अमान… जाऊ द्या, नशीब म्हणायचं. वाटायचं, कसलं आपण दररोज "भीमरूपी महारुद्रा" म्हणणारे भोट. चर्चात जायला हवं, तिथं म्हणे मासनंतर वाईन देतात. आपल्याकडे प्रसादाची वाट बघत अर्धा अर्धा तास आरत्या सहन करायच्या आणि शेवटी मिळणार काय तर फुटाणे किंवा शेंगदाणे. त्यातून शेवटचा तो एक कुजका शेंगदाणा. नको, नको! ती आठवण नको. पुढं मग ती आंधळी झालेली आई कैदेत ठेवलेल्या नवऱ्याला वाचवायला नेमकी शहरापासून दहा पंधरा किलोमीटर वर असलेल्या पडक्या किल्ल्यात येणं हाही एक दैवी चमत्कार असायचा. इथे साधं स्वारगेटवरून सदाशिवपेठेत जायला आढावसेनेच्या मनधरण्या कराव्या लागतात आणि इथं ही आंधळी लंगडी बाई, बस जात नाही रिक्षा जात नाही अशा आडवळणी जागेवर वेळेला हजर! दैवी चमत्कारच. मग आल्यासरशी काही तरी काम दिलं पाहिजेच. मग छानपैकी छातीत गोळीच लागायची. बाप वाचायचा. एवढी महान आई, पत्नी वाचवायचं काम आता भगवान, अल्ला आणि जीझस यांच्यावर येऊन पडायचं. मग देवळाचे कळस, मशिदीचे मिनार, चर्चची घंटा किंवा पियानो असे आळीपाळीने दाखवून आणि वाजवून झाले की या धर्मात आपसात कामाची वाटणी व्हायची. हिंदू धर्माकडे म्हातारीला मरू न देण्याचे, अल्लाकडे तिची दृष्टी परत आणण्याचे आणि जीझस कडे तिला स्वत:च्या पायावर पुन्हा उभे करण्याचे काम यायचं. कूलीमध्ये तर बच्चननं दर्ग्यातील चादर अंगावर येऊन पडल्यानंतर कित्येक गोळ्या छातीवर झेलल्या होत्या. त्याआधी तो  ब्रीचकँडीमध्ये अॅडमिट झाला होता तो आणभवही कामाला आला म्हणा.  हे असं सगळं असल्यामुळे का बरं आम्ही निधर्मी होणार नाही?

ही सगळी मजा या खान मंडळींनी हल्ली घालवून टाकली आहे. एक पन्नाशी ओलांडली तरी स्वत:ला एकविशीचा समजतो, स्वत:चं नाव राहुल असलं आणि हात फैलावून "मितवाsssss" केलं की सगळया लग्न झालेल्या न झालेल्या हिरवीणी येऊन गळ्यात पडतात असं त्याला वाटतं. किरणराव खाननं तर अलीकडे लोकांना खूप अपराधी वाटवण्याचं ठरवलं आहे. तारे जमीन पे मध्ये तो आईबापांना झापतो, एकूण समाजाला झापतो. ते पटलंही होतं. तसंच थ्री इडीयटसमध्ये आपल्या पोरांना कायपण करूद्या असा महत्वाचा संदेश दिला होता. त्यातील जीवघेणी स्पर्धा आणि काही ज्ञान मिळवण्यापेक्षा स्पर्धेत जिंकण्याची घाई या मुद्द्यांवर दिलेला भर पटला होता. या दोन्ही शिणमांत साहेब आपन सोता मातर लई हुशार पार्टी झाले होते. असं जनतेला डोस देऊन वर लै पैका मिळतो असं लक्षात आल्यावर मग रीतसर तो धंदाच करायचं ठरवलं. स्टार नेटवर्कमध्ये गाळा घेऊन टाकला. दुकानाचं नाव कसं आकर्षक पाहिजे, धंद्याला साजेसं. वर्षानुवर्षे भारतात चाललेलं, प्रत्यक्षात काही किंमत नसलेलं पण जाहीर चर्चेत मात्र सोन्याहून किमती असं वाक्य आयतंच मिळालं. सत्यमेव जयते! सदुसष्ट वर्षांत बिनमालाचं पूर्ण नफ्यात चाललेलं हे एकमेव जयते. पण खरं तर कच्चा माल भरपूर आहे. कर्मकांडाचं अवडंबर आहे, लोकांच्या दु:खाचं भांडवल करणारे बुवा आहेत, कुडमुडे ज्योतिषी आहेत. हिंदू सहिष्णुता पैशाला पासरी आहे. ती उत्प्रेरक म्हणून काम करेलच. आत्मनिंदा करण्यात हिंदू लोकांचा हात धरणारे कुणी नाही. इतर धर्मांत धर्माची टिंगलटवाळी क्षोभ उत्पन्न करते. हिंदू धर्मात तीच टिंगलटवाळी हास्य उत्पन्न करते. लोक पैसे टाकून ती टवाळी पाहतात. टवाळी करणाऱ्यांचा धीटपणा वाढतो. त्याला विरोध करणारे सनातनी ठरतात. विरोध करणारे काही धर्ममार्तंड नसतात. तो विरोध असतो टिंगलटवाळीला. धर्म ही अत्यंत वैयक्तिक गोष्ट आहे. हिंदू धर्म सहिष्णु आहे म्हणजे काय तर ही वैयक्तिकता त्याने मान्य केली आहे एवढाच त्याचा अर्थ. सहिष्णुतेचा अर्थ म्हणजे तुम्ही तुम्हाला जी श्रद्धा असेल त्याची उपासना करा, मी माझ्या श्रद्धेची करतो. माझ्या श्रद्धेची टिंगलटवाळी करण्याची ती परवानगी नव्हे. बुवाबाजी, कर्मकांड हे टिंगलटवाळीचे विषय करून लोकप्रबोधन करायचे असेल तर ते ज्या ज्या धर्मात असेल त्याचे करा. हिंदू धर्माने सहिष्णुतेची धर्मशाळा उघडली आहे. त्यात कुणीही यावे, राहावे, पाहिजे तिथे शरीरधर्म करावा आणि निघून जावे अशी परिस्थिती झाली आहे. हाच प्रकार मशिदीत, मदरशांत करून पहा, तुमचा शीग कबाब होईल यांत शंका नाही. अंगाला नुसता स्पर्श केल्यानंतर पोलिओ झालेला चालू लागतो, मरणासन्न व्यक्ती बरी होते, असले ख्रिस्ती बुवाबाजीचे प्रकार सर्रास चालू आहेत त्याची टवाळी करा. हे सगळे थोतांड आहे ही "शुभ वार्ता" त्यांना द्या पाहू. टवाळीच करायची तर सर्व धर्मातील थोतांडावर करा. मग मानू आम्ही तुम्हाला निधर्मी. दु:खाची गोष्ट म्हणजे हिंदू लोकांतच ही स्वत:ची टवाळी करण्याचा प्रघात पडला आहे. घरचेच भेदी असले तर बाहेरचे तर फायदा घेणारच.

म्हणूनच आम्ही ठरवले आहे, स्वत:चे पैसे घालून आपलीच टिंगलटवाळी कशायला पहायची? त्यापेक्षा सनी देवलचे चित्रपट पाहू. लेकाचा बेंबीच्या देठापासून ओरडतो खच्चून, पण आपण थोर समाजसेवक असल्याचा आव तरी आणत नाही. व्हिसाबिसा नसला तरी पापस्तानात जाऊन तिथेही ओरडायची ताकद आहे त्यात. शिवाय हिंदू नाही, मुसलमान नाही, किरीस्तांव पण नाही. आपला शूरवीर शीख सरदार आहे. अमीरला म्हणावं कर टवाळी त्यांच्या पगडीची, रणछोडदास तर होईलच, वर दोन्ही तंगडूचं वांगडू नक्की होईल.

Friday, December 5, 2014

क्लासचा बिझनेस

आयला, भलतीच भानगड होऊन बसली. एकदा साधेपणाचा ब्रँड घेऊन बसलो की झालं, पुढे आयुष्यभर बळेबळेच खादी नेसायला लावतात, सूत कातायला लावतात हो! अहो, निवडणुकातला साधेपणा तो काय, तो आवश्यकच होता. म्हणून आम्ही काय आयुष्यभर नॅनोतून फिरायचं? गांधींचं आपलं बरं होतं, जागेचा प्रश्न नव्हता. आश्रमच्या आश्रम होता बागडायला. इथं आम्ही एक सरकारी फ्लॅट काय घेतला, आमच्या साधेपणाची आयमाय निघाली. शिवाय पूर्वी विमान अथवा जहाजप्रवास फारसे कुणी करत नसत. मग इकॉनॉमी क्लास काय आणि बिझनेस क्लास काय, त्यांना अख्खं विमान किंवा जहाज मिळालं असेल गोलमेज परिषदेला जाताना. आणि मी मुंबईहून पुण्याला जायचं होतं तेव्हा नुसतं म्हटलं, जरा फर्स्ट क्लास इंद्रायणीचं तिकीट मिळतं का बघा हो, या लोकलमधून प्रवास करून जीव शिणला नुसता. माझं पाकीट गेलं, घड्याळ तर माझ्या डोळ्यासमोर कुणीतरी काढून घेतलं. ते वाचवायला हात सोडला असता तर थेट ताशी ६० किमीच्या गतीने रुळावर पडलो असतो. निम्मा दाराबाहेर लोंबकळत होतो. च्यायला त्यातून मुंबईचे लोक एक नंबरचे बदमाश नुसते. फास्ट लोकल धरली होती. घाटकोपर स्टेशनातून जाताना कुणीतरी सणसणीत सटका ठेवून दिला मला. पार्श्वभाग अजून ठणकतो कधी कधी. मुंबईतला आम आदमी असाच प्रवास करतो असं वर ऐकायला मिळालं. म्हटलं पुण्याला जाताना तरी निदान पार्श्वभाग पूर्ण टेकायला मिळाला तर किती बरं असं वाटत होतं. पण तेही नाही. पक्षाकडे निधी नाही म्हणून रात्रीच्या पुणे पॅसेंजरने जा म्हणे. दिल्लीतून निघताना ही म्हणालीच होती, "मुंबईला जाताय, धड परत या म्हणजे मिळवली. आणि हो, तुमच्या त्या आम बिम भानगडीतून माझी आणि मुलांची आठवण झालीच तर लिंकिंग रोड का काय आहे म्हणे तिथून काही कपडे तरी आणा. तुमच्यासाठी मफलर बिफलर स्वस्तात मिळतो का पहा. दोन वर्षं झाली एकच वापरताय!". युद्धाला चाललेल्या योद्ध्याला ओवाळताना,"जरा युद्ध सांभाळूनच करा बरं का! मागच्या युद्धात सुरवार नको तिथे फाटली होती. आता ठिगळ लावलंय तसं, पण केव्हाही उसवेल हो!" असं म्हटल्यावर जे होत असेल तसंच माझं झालं. पण एक सांगतो, मुंबई पुणे पॅसेंजरमधील लाकडी बाकातील रेसिडंट ढेकूण हे एक भीषण सत्य आहे. पण एक बरं झालं, पार्श्वभाग जो ठणकत होता तो थांबून खाजायला लागला. ठणक्यापेक्षा खाज बरी! पण हा ठणका परवडला असा अनुभव दुसऱ्या दिवशी पुणेकरांनी दिला. पुण्यातील सभेत सर्व समाजातील, सर्व वयोगटातील लोक हजर होते. तिकीट नसेल तर पुण्यातील लोक शोकसभेलाही तितक्याच उत्साहाने जातात असे कळले. त्यातील इयत्ता तिसरीतील पुणेरी विद्वानाने (पुण्यात सर्व लोक विद्वान या नावाने संबोधले जातात असे मला आधीच बजावून सांगण्यात आले होते.) प्रथम "नीट ताठ उभे राहा" असे खडसावून सत्तर-ऐंशीच्या दशकातील बालसंस्कृती परत आणण्यासाठी तुम्ही काय कराल असे विचारले. त्यावर मी गमतीने गेलेले "बाल" परत येत नसतात अशी कोटी केली तर "तुमच्या या उथळ विधानाचा मी निषेध करतो. तुमचा पक्ष आमच्या समस्या काय सोडवणार? तुम्हाला अजिबात कशाचे गांभीर्य नाही." असे म्हणून त्याने सभात्याग केला. जाताना,"अंकल, पण तुम्ही आमच्या रिक्षावाल्या काकांसारखे दिसता हं." असे म्हणायला तो विसरला नाही. नंतर एका बॅकपॅक लावलेल्या तरुणाने,"आपण दिल्लीत आम्हाला सही पेरू दिलात. जबरी हं काका! यंदाच्या पुरुषोत्तम करंडकाला आमच्या नाटकाचं दिग्दर्शन कराल का तुम्ही? 'दिल्लीचं काय करायचं' अशी एक छोटी नाटिका आहे. दिग्दर्शक मध्येच सोडून गेल्यानंतर नाटक कसं पोकळीत चालू राहतं, त्याला भेदक वास्तवता कशी येते अशी काहीशी संकल्पना आहे. अलिप्ततेचं (alienation) तंत्र प्रभावीपणे तुम्हीच दाखवाल. या तंत्रात प्रेक्षक अलिप्त होऊन नाटक पाहतो, नंतर घरी जाऊन पश्चात्ताप करत बसतो. " त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्या तंत्राचं प्रात्यक्षिक तिथल्यातिथेच करून दाखवलं. पण एक वृद्ध गृहस्थ मात्र माझ्याकडे पाहून मान डोलवत होते. माझे सर्व भाषण त्यांना पटले असावे. मी स्वत:च त्यांच्याकडे गेलो आणि नमस्कार केला. "आपल्यासारखे ज्येष्ठ नागरिक आमच्या पक्षाच्या भूमिकेला पाठिंबा देताहेत हे पाहून आनंद झाला. " असे मी म्हणालो. तर त्यांनी चारचौघांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात "अॅं!!!" असे उद्गार काढले. मग नंतर त्यांच्या काहीतरी लक्षात येऊन त्यांनी शर्टाच्या खिशातून ऐकू येण्याचे यंत्र बाहेर काढले आणि कानात बसवले. म्हणाले,"हां! आता बोला! संपलं का तुमचं भाषण? शिंचे हे यंत्र लावण्याचे नेहमी विसरतो मी. सवय नाहीये ना अजून! शिवाय घरी काही उपयोग नाही म्हणून काढूनच ठेवलेले असते. ह्या: ह्या: ह्या:! तुमचेही कुटुंब असेच बोलत असेल ना घरी! असो, फिरत फिरत या बाजूस आलो होतो, तुमच्या सभेचा बोर्ड दिसला. म्हटलं बघावं काय आहे ते. काही काही वेळा काहीतरी मनोरंजक सापडते. मागच्या आठवड्यात कुणी तरी असेच लडाखला जाऊन आले त्या प्रवासाचे फोटोसहित कथन होते, मज्जा आली. मानसरोवर काय सुरेख दिसते हो!" कार्यक्रम संपला तेव्हा डोके अशक्य ठणकू लागले होते. म्हटलं परत मुंबईला जाताना आता सीटवर शीर्षासन करून डोके ढेकणांच्या ताब्यात द्यावे.

आमचे बाकीचे सगळे लेकाचे बिझनेस आणि फर्स्ट क्लासने प्रवास करणारे. प्रशांत भूषण स्वत:चा व्यवसाय आहे म्हणून करतो, कुमार विश्वासचं तर काही बघायलाच नको. परवाच बिझनेस क्लासचं तिकीट तीस शेरांना पडलं म्हणून सांगत आला होता. तिकीट शेरावर विकतात? मला तर काही लाख चंदकिशोर लागतील म्हणून सांगत होता माझा एजंट. म्हणालो, बरं तुम्हाला वजनावर विकतात हे लोक! तशी म्हणाला, अहो ते तसले शेर नव्हेत काही. हे शेर म्हणजे म्हणजे माझ्या कविता. तुम्ही माझ्या कविता ऐका कधी तरी. लोक तिकीट काढून ऐकायला येतात. असतील बापडे. मी कुठल्याही नाटकसिनेमाला थेटरमध्ये गेलो की मला फक्त मध्यंतराचे वेध लागतात. आणि मध्यंतरानंतर "धी एंड" चे. मुशायरे वगैरे असतील तर मी कॉफी फुकट मिळते म्हणून शेवटपर्यंत बसतो. बाकी काही म्हणा हिज्र, मरासिम असले घनघोर उर्दू शब्द ऐकले की दचकायला होतं. कसं काय हो कुणाला हिज्र वगैरे म्हणायचं? कधी कधी मला वाटतं या आमच्या सगळ्या लोकांमध्ये मीच खरा आम आदमी आहे. पण हा कुमार, माणूस बरा आहे मनाने तसा. आता वेळीअवेळी होतात कविता त्याला, तो तरी काय करील? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. पण त्यातूनच त्याने त्याचा बिझनेस उभा केला आहे हे लक्षणीय आहे. त्यामुळे बिझनेस क्लासमधून फक्त बिझनेसवाले लोकच जातात असे आजवर वाटायचे. मी तर नुसतं बिझनेस क्लासमधून गेलो. आपले वडाप्रधान तर अक्खा बिझनेस क्लास बरोबर घेऊन जातात. बघावं तेव्हा हे परदेशात. एनआरआय (नॉन रेसिडंट इंडियन) लोकांना आणि आरएनआय (रेसिडंट नॉन इंडियन) लोकांचा परदेशी पैसा परत आणण्यासाठी म्हणून गेले ते स्वतःच एनआरआय होऊन बसले. आता काळा पैसा राहूद्या, तुम्ही तरी आधी परत या अशी मागणी होऊ लागल्याचे ऐकतो. हे म्हणजे आमच्या लहानपणच्या गोष्टीसारखे झाले. माझ्या आत्तेभावाला काही कामासाठी पाठवलं की तो बराच काळ येतच नसे. मग त्याला शोधून परत पिटाळत आणण्याच्या कामगिरीवर माझी नेमणूक होई. निघताना आई सांगे,"उगाच तोंड वर करून वरावरा फिरत बसू नकोस!" मग पुढे आमचे बंधुराज कुणा डोंबाऱ्याचा खेळ पहात उभे असलेले आढळायचे. मग मीही सगळे विसरून त्याच्याबरोबर तो पाहत उभा राहायचो.  पूर्वी बडोदा संस्थानचे राजेसाहेब बाहेरचे पाणी वापरायचे नाही म्हणून हंडेच्या हंडे जहाजावर लादून घेऊन जात असत अशी एक दंतकथा आहे. मोदी ढोकळा अने ठेपला घेऊन जातात की नाही त्याची कल्पना नाही. बहुधा असावेत. मग तो साठा संपला की भारतात यावे लागते. जायला कशाला लागते कुणास ठाऊक. आम्ही नाही स्काईपवर बोलत? आम्ही येतो म्हटले की आमचे परदेशातील कार्यकर्ते ,"अहो कशाला? बीपीओ तत्वावर चालवायचं हे सगळं. खर्च कशाला?" असं म्हणतात. त्यांना काय रात्रीच्या ऑफशोअर कॉल्सची सवय आहे. इथे मला मफलर गुंडाळून रात्रीअपरात्री जागत बसावे लागते.

तेव्हा मंडळी, उगाच बिझनेस क्लासचा बिझनेस करू नका. चांगले मुद्दे असतील तर जरूर भांडा. पण हे अगदीच चीप होते आहे. आपण वर सरकारी विमानातून हिंडायचे आणि खाली कुणी स्वत:च्या पैशाने टॅक्सीतून हिंडले तरी बोंब ठोकायची असा हा प्रकार आहे. कधी नाही ते आम्हाला कुठे तरी कसला तरी मान मिळत होता. आता सन्मान करायला बोलावल्यावर प्रमुख पाहुण्याला काय यष्टीतून या असे सांगणार? यथोचित सन्मानानेच बोलावणार ना? पब्लिकचा (पक्षी:पक्षाचा)पैसा वापरून जायचे असेल तर आम्हाला लोकल अथवा पॅसेंजरनेच प्रवास करावा लागतो, किंबहुना आम्ही तो करतोच. पब्लिकच्या पैशाची एवढीच चिंता असती तर पर्वा महाराष्ट्रात शपथविधीच्या कार्यक्रमावर असले किती बिझनेस क्लास खर्च झाले असतील हो?

Thursday, December 4, 2014

चड्डीचे रहस्य

अनेक वर्षं उपेक्षित राहिलेल्या संघीय चड्डीला आता चांगले दिवस आले आहेत. इतके दिवस केवळ उत्तम वायूवीजन हा एकमेव प्लस पॉइन्ट म्हणून हे वस्त्र परिधान केलेले पृष्ठभाग आज मंत्रालयात खुर्च्यावर विसावले आहेत हा त्या चड्डीच्या यशाचा देदीप्यमान आलेख पाहण्यासारखा आहे. हे दिवस पाहण्यासाठी या चड्डीने किती खस्ता खाल्ल्या आहेत ते कॉंग्रेसच्या पांढऱ्या टोपीला नाही कळणार. गोणपाटाशी स्पर्धा करणारे कापड, मळखाऊ रंग, पोटाच्या विषुववृत्ताला आवळून धरण्यासाठी तिपदरी दोऱ्याने ओवलेली बटणे, भरभक्कम शिलाई, किमान अर्धा अर्धा किलो शेंगदाणे मावतील असे खिसे, एवंगुणविशिष्ट चड्डी ती. शिबीर असो, रोजची शाखा असो, दसऱ्याचे संचलन असो, चड्डीशिवाय स्वयंसेवक दिसत नाही. तेही बरेच म्हणा. चड्डीशिवाय स्वयंसेवक म्हणजे तुऱ्याशिवाय मोर. फक्त हा मोर पिसारा फुलवून नृत्य करीत नाही. पिसारा फुलवण्याचे काम खळ करते. कॉंग्रेसवाल्यांनी इतकी वर्षे जनतेच्या कमरेचे वस्त्र लुटून नेण्याचे सत्कार्य केले पण संघाच्या चड्डीला हात घालण्याचे धैर्य झाले नाही. संघाच्या शिस्तीप्रमाणे चड्डीची खळही कडक. त्यामुळे सैल लंगोटाच्या कॉंग्रेसला ते शक्यही झाले नसते. पण संघाचा अदृश्य हात मात्र या कॉंग्रेसवाल्यांना सगळीकडे दिसायचा. मुघल सेनेच्या घोड्यांना जसे संताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसा. प. पू. इंदिराबाईंना तर मान्सून वेळेवर आला नाही तरी त्यात संघाचा कावा दिसायचा. जणू काही संघाने स्वयंसेवक अगदी पार श्रीलंकेच्या आखातात पाठवून आकाशात सेतू उभा करवून घेतला असावा असं त्यांना वाटायचं. मान्सून सोडा, बाथरूममध्ये अचानक पाणी बंद झालं तरी त्यात संघाचा हात असायचा. या हाताचा त्यांनी एवढा धसका घेतला की निवडणुकीचं चिन्हसुद्धा हातच ठरवलं. नशीब, ते "जेवण्या" हाताचं तरी ठेवलं. पुढे हा हात कुठेकुठे मारला गेला, कशाकशात गेला, कशानं बरबटला, कुठे साफ करून घेतला गेला, कुणाकुणाला दाखवला गेला हे सर्व आपल्या सर्वांना ठाऊक आहे. हे सगळं ठाऊक असूनही प.पू. माणकोजी महाराजांनी आपल्या प्रवचनात संघाच्या चड्डीचा उल्लेख केला. महाराजांच्या मते मुख्यमंत्रीपदाची अर्हता चड्डीवर अवलंबून होती. ज्याने जास्त वेळ ती टिकवून ठेवली तो खरा. महाराजांची मानसिकता जरा समजून घेतली पाहिजे. ते स्वत: हरू नावाच्या गावातून आले आहेत. जिंकू किंवा मरू असे ते कधीच म्हणत नाहीत. त्यातून कॉंग्रेसमध्ये आयुष्य गेले. कॉंग्रेसमध्ये स्वत:ची स्वत: चड्डी घालणाऱ्याना तिकिटे कधीच मिळत नाहीत. किंबहुना चड्डी घालणाऱ्याला कॉंग्रेसमध्ये काहीच मिळत नाही. चड्डी असो वा नसो, शुभ्र मुगुट मात्र हवा. मग तो गांधी घराण्याची धुणीभांडी करून मिळवलेला का असेना. लांगूलचालन करून मिळवलेल्या तिकीटापेक्षा संघाची चड्डी घालून, देशप्रेम, समाजप्रेम बाळगून खुर्ची मिळाली असेल तर ते बरंच आहे. 

चड्डीची असूया असलेले अनेक आहेत. आमचे ते जाणते राजे, "आपला देश चड्डीवाल्यांच्या हातात देणार आहात काय?" अशी घनगर्जना करून "आपलं तसं काय नाय म्हणा, काय बटणं बिटणं तुटली तर सांगा आपल्याला. भायेरून टीप मारून देऊ. काय म्हंता? शिलाई? न्हाय ओ, भायेरून टीप मारायला कसली शिलाई? फक्त चड्डी सोडून ठेवा. म्हंजे, आमाला टीप मारायला मिशनीवर घ्याला बरी ओ. का हो, आश्लील जालं का?" असं काही तरी म्हणत शेवटी चड्डी धरून राहिले. अर्थात त्यांनी चड्डी धरायचं कारण म्हणजे दुसऱ्या कुणाला ती धरता येऊ नये एवढंच होतं म्हणा. मग सेनावाले बसलेच होते "आमी नाय जा चड्डी घालणार!" असं म्हणत हटून. खरं तर पूर्वी युती अशीच टिकली होती. तुम्ही चड्डी घाला, आम्ही कफनी घालतो. बरी आरामदायक असते कफनी. पण या खेपेला प्रसंगी नागवे बसू, पण चड्डी घालणार नाही अशी व्याघ्रगर्जना करून झाली. मग शिशिर ऋतू आला. झाली पंचाईत? कफनीही नाही आणि चड्डी तर घालायची नाही अशी प्रतिज्ञा. मग चड्डीवाल्यांनाच दया आली ना? बाबारे, आता तरी घाल चड्डी, फ़्रॉस्ट बाईट वाईट असतो बरं, बोटं तुटून पडली तर कळणारसुद्धा नाही असं सांगून झालं तरी हा नाथपंथी वाघ अडून बसला होता. थंडीत व्हायचं तेच झालं. "कासव" झालं अगदी! विरोध "मावळला". मग "आम्हाला चड्डी चढवा" अशी (एकदाची) आज्ञा झाली आणि कासव वाचलं. एकावर एक बारा चड्ड्या चढवल्या तेव्हा कुठं ऊब आली. महाराजांना चड्ड्या चढवल्या जात होत्या तेव्हाही ते कठोर चेहरा करून "खामोश! बघतोस काय? इथं कुणी नागवं उभं आहे का?" असं म्हणत होतेच. तेव्हा, चड्डीमाहात्म्य सगळे ओळखून आहेत.

ज्या चड्डीने खुर्चीत नसताना प्रचंड समाजोपयोगी काम केलं आहे ती अधिकारावर आल्यावर तर नक्कीच काम करेल. नैसर्गिक आपत्ती असो, मानवनिर्मित असो, ही चड्डीच सगळीकडे मदतीसाठी जाते आहे. काश्मीरमध्ये पुराने धुमाकूळ घातला तेव्हा पांढरे टोपीकुमार, झाडूकुमार सगळे आ वासून पाहत असताना संघाचे कार्यकर्ते तिथे पोचून मदत करत होते. बारामतीचे जाणते राजे जेव्हा आपण सेक्युलर असं सांगत संभाजी ब्रिगेडसारखी पिलावळ निर्माण करत होते तेव्हा संघाच्या शाखेत "केवळ राष्ट्रधर्म हा हिंदुधर्म" हे शिकवले जात होते. संघाची चड्डी जो देशाला जननी मानतो अशा सर्व भारतीयांसाठी आहे. अशी चड्डी आदर्श इमारती उभारण्यापेक्षा आदर्श समाज उभा करेल. प्रगतीची कामे करणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळवणे हे तर सरकारचे कर्तव्यच आहे, ते तर होईलच. पण आजवर भारतीय माणसाला अभिमान बाळगण्यासारखे काही नव्हते, स्वाभिमानी जगणे माहीत नव्हते, आपल्या देशाचे काही भले होईल याचा विश्वास नव्हता, तो तरी या चड्डीने मिळवून दिला आहे. होय ना माणकूशेठ? तेव्हा असल्या आंबट ढेकरा देण्यापेक्षा कमी खा, कमी बोला, जास्त काम करा. तुमच्या आजूबाजूचे हवामान तर चांगले राहीलच, शिवाय तुम्हीही निरोगी राहाल.

Thursday, November 27, 2014

मोबाईल आणि वीजबिल

मोबाईलच काय कुठलेच बिल भरायला आम्हाला आवडत नाही. हॉटेलचे (आमचे नेहमीचे हॉटेल सन्मान, प्रोप्रा. नार्वेकर, जेवणाची नाष्ट्याची उत्तम सोय) बिलही तिथे भांडी घासायला लागू नयेत म्हणून नाईलाजाने द्यावे लागते. आमचा आख्खा जल्म रानडे रोड, मुंबई २८ परिसरात गेला, पण आमचा अभ्यास साऱ्या विश्वाचा. (महाराष्ट्र हेच आमचे विश्व. हो, त्यात विदर्भ सुद्धा आला. विश्वापासून वेगळ्या विदर्भाची मागणी आज होत आहे त्याला आमचा कडाडून विरोध राहील. ) आमचे वाचन थोर, लेखन घनघोर हे ध्यानात घ्या. लेखकाला कुणालाही सल्ला, इशारा देता येतो. अन्यायाला वाचा फोडणे हे आमचे कर्तव्य आहे असे आम्ही मानतो. कोणत्याही प्रक्रियेत पारदर्शकता हवी असा आग्रह आम्ही बालपणापासूनच धरत आलो आहोत. शाळेत असताना अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक हस्तलिखित आम्ही सुरू केले होते. त्याला "निवळशंख" असे नाव दिले होते. स्वच्छ पाण्याची प्रतिमा आणि ठणाणा करणारा शंख एकत्र आले तर क्रांती होईल असे आमचे त्याकाळी मत होते. आजही आहे. पण हल्ली आमच्याकडे पाणी सकाळी पाच वाजता येते आणि सात वाजता जाते. त्यामुळे ते सकाळचे दोन तास निवळ आणि उरलेले बावीस तास शंख अशी वाटणी झाली आहे. "निवळशंख"चा कारभार स्वीकारल्यानंतर पहिला प्रश्न हाती आला तो प्रश्नपत्रिकेचा. इयत्ता पाचवीपासून नववीपर्यंत आम्ही या प्रश्नाला बळी पडत आलो होतो. अनेक विद्यार्थ्यांशी बोलल्यावर मास्तरांच्या मर्जीतील चारपाच आगाऊ मंडळी सोडली तर बहुतांशी आपल्याप्रमाणेच या प्रश्नाचे बळी ठरताहेत हे ध्यानात आले. मग या प्रश्नाचा आम्ही सखोल अभ्यास केला. प्रश्नपत्रिका गुप्त ठेवण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे हे तर उघड झालेच पण उत्तरपत्रिकेच्या तपासणीतही अजिबात पारदर्शकता नाही हेही विदारक सत्य बाहेर आले. "निवळशंख" च्या पहिल्या अंकात आम्ही या व्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवला. "मुख्याध्यापकांचे डोके ठिकाणावर आहे काय?" या आमच्या अग्रलेखाने खळबळ माजवली. तो वाचून क्षणभर मुख्याध्यापकांनीही टोपी नीट करण्याच्या बहाण्याने आपले डोके चाचपून पाहिल्याचे आमच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नव्हते. वास्तविक त्यांनी कपाळाला हात लावला होता हे आमच्या समीक्षाकारांचे म्हणणे आम्हांस मान्य नाही. अग्रलेखात आम्ही परीक्षा ही एकूणच कशी मुस्कटदाबी करणारी व्यवस्था आहे याचे विवेचन करून त्यात आमूलाग्र बदल सुचवले होते. "माहितीचा अधिकार" ही संकल्पना त्याकाळी प्रथम आम्ही मांडली होती. आज त्याचे श्रेय काही सातवी पास मंडळी उकळताहेत, पण आम्ही श्रेयाच्या मागे कधीच नव्हतो. (या श्रेयाचा आमच्या वर्गातील श्रेया परांजपेशी काही संबंध नाही. आम्ही तिच्याही मागे नव्हतो. कधीच. तिने मागे वळून चप्पल दाखवली तेव्हाही.) आम्ही "निवळशंख" मध्ये सुचवलेल्या बदलात विद्यार्थ्यांना माहितीच्या अधिकाराखाली परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत हे जाणून घेता येणार होते. माहिती नाकारल्यास विद्यार्थ्यांस फी भरण्यास आणि परीक्षेस बसण्यास नकार देण्याचा हक्क होता. पाल्यास आपले पालक म्हणून स्वत:च सही करता यावी याचीही मागणी केली होती. वह्यापुस्तके आणणे सक्तीचे नसावे, शाळेच्या वेळा या विद्यार्थ्यांस सोयीच्या असाव्यात, अशा काही उपसुधारणाही त्यात होत्या. याचा परिणाम म्हणून मुख्याध्यापकांनी छडीची मागणी केली आणि आमच्या पृष्ठभागावर अनेक सुधारणा घडवून आणल्या. भगतसिंगांचे नाव घेऊन आम्ही त्या सुधारणा ब्रही न काढता सहन केल्या. पुढच्या पिढीचे जीवन सुसह्य व्हायचे असेल तर आधीच्या पिढीत हुतात्मा जन्मास यावेच लागतात. (या वाक्यात काहीतरी चुकले आहे असे वाटते, प्रूफ रीडिंगच्या वेळेस पुन्हा पाहू.) मुख्याध्यापकांनी आमच्या "निवळशंखा"चा बोळा करून केराच्या टोपलीत टाकला. अशी मुस्कटदाबी करून हे क्रांतिकारी विचार दबले जाणार नाहीत, एक अंक नष्ट केलात पण त्याच्या इतर कॉपींचे काय कराल? पण लक्षात आले आमच्या हस्तलिखिताची ती एकमेव कॉपी होती. सर तासावर गेले की तो बोळा हस्तगत करायचा असे ठरवले.

आजही आम्ही आमचा स्वाभिमान, सन्मान इत्यादी टिकवून आहोत. "निवळशंख"ची परंपरा आम्ही चालू ठेवली आहे. विश्वातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत हा एक ज्वलंत प्रश्न आहे. त्याचा आम्ही सखोल अभ्यास केला. सावकारी, ब्यान्कांची कर्जं, वेळेला न पडणारा पाऊस, गारपीट, कीड (रेग्युलर कीड, बारामती कीड नव्हे) इत्यादी नेहमीची कारणं तर आहेतच, पण आमच्या असेही लक्षात आले की विजेचा धक्का बसूनही शेतकरी मरण पावताहेत. पाण्यासाठी मोटर बसवायची. विजेचं कनेक्शन देणारा इलेक्ट्रिशियन गावातलाच. त्याचं क्वालिफिकेशन म्हणजे "गेली धा वर्षं हे करतोय, येक पन मोटर उडालेली न्हाई" हे. मग हे कनेक्शन कधीतरी "शॉर्ट" व्हायचं आणि मोटर सुरू करायला गेलेल्या म्हादबाचं आयुष्य शॉर्ट व्हायचं. मोटर तेवढी शाबूत. असे धक्कादायक मृत्यू वाढायला लागले. मग त्याची चौकशी करायला समिती आली. त्या समितीनं वीज हेच मृत्यूचं कारण असा अहवाल दिला आणि वीज तोडा, आपोआप मृत्यूचं प्रमाण कमी होईल अशी शिफारस केली. इथंच आमचा विरोध सुरू झाला. आम्ही स्वतंत्रपणे केलेल्या चौकशीत असं लक्षात आलं की जे विजेचा धक्का बसून मरत नव्हते ते विजेचं बिल पाहून प्राण सोडताहेत. वीज तोडल्यानं एका प्रकारचे मृत्यू कमी होतील पण बिलाचं काय? वीज तोडली तरी वीज मंडळ बिलं फाडतं आहेच. तेव्हा शेतकऱ्यांनो, अजिबात विजेचं बिल भरू नका असा इशारावजा सल्ला आम्ही आमच्या दैनिक "टोमणा"तून दिला. आमचा टोमणा खडसे मास्तरांना फार झोंबला. "मोबाईलचं बिल भरता, मग विजेचं भरायला काय धाड भरलीय?" असा उन्मत्त सवाल त्यांनी केला. ते ऐकून आम्ही क्षणभर ब्याटरी संपलेल्या मोबाईलप्रमाणे निपचीत पडलो. आमच्याशिवाय दुसऱ्या कुणी मस्तीची भाषा केलेली आम्हाला आवडत नाही. ते आमचे कुरण आहे. त्यात आम्ही चरणार. आमच्या "टोमण्या"ची सगळी सदरे त्यावर चालतात. आमच्या जाहिरातदारांनाही आम्ही "द्यायची असेल जाहिरात तर द्या नाहीतर फुटा इथून" असे जाम सडेतोड उत्तर देतो. पण खडसे मास्तरांनी सवालही असा केला होता की त्याचं खंडन करणं जरा कठीण होतं. खरंच, मोबाईलचं बिल आम्ही का भरतो? ते उत्तर मिळेपर्यंत आम्ही खडसे यांना खडसावलं,"ओ मास्तर, फार जोरात बोलू नका! तुमच्या आधीचे ते धरणवाले असंच काहीबाही बोलले होते. आता धरणातच काय, त्यांना रस्त्याच्या कडेला गाडी लावून गवतातसुद्धा निवांत धार मारता येत नाही. लांबचा प्रवास असेल तर हल्ली बिसलेरीच्या रिकाम्या बाटल्या गाडीत ठेवून फिरतात ते. तेव्हा, वीज बिल न भरणं आमचा हक्क आहे आणि आम्ही तो बजावणारच!" असे बजावून आम्ही खुशीत बसलो होतो. पण खडसे मास्तरांनी वडाची साल पिंपळाला लावलीच. म्हणे रानडे रोड, मुंबई २८ मध्ये बसून शेतकऱ्यांच्या समस्या तुम्हाला काय कळणार? भुईमूग कुठे उगवतो हे तरी ठाऊक आहे का तुम्हाला? कृषीमंत्री व्हायला शेतकरी असणे आवश्यक असेल तर, परिवहन मंत्री व्हायला किमान पाच वर्षांचा ट्रक (क्लास D) ड्रायवर असल्याचा किंवा सात वर्षांचा किन्नर (हा यक्ष किन्नर मधला किन्नर नव्हे)असल्याचा अनुभव आवश्यक असायला हवा. अवजड उद्योगमंत्रीपद स्वत: मुख्यमंत्र्यांनी किंवा गडकरींनी घ्यायला हवं. तेव्हा, हा प्रश्न कैच्या कैच. तसं आम्हाला भुईमूग कुठे उगवतं ते चांगलं माहीत आहे. लहानपणी डालड्याच्या डब्यात गाजर लावायचा प्रयोग आम्ही नेहमी करत असू. गाजर काय भुईमूग काय, डबा चांगला हवा, गळका नको. म्हणजे गळका असला तर गाजराला काही धोका नव्हता, पण पाणी गळलं की खालच्या मजल्यावरचे जोशी बोंब मारायचे. ग्यालरीत त्यांचा पायजमा वाळत टाकलेला असायचा.

मोबाईलचं बिल आम्ही का भरतो या प्रश्नानं आम्ही अस्वस्थ झालो होतो. त्या विचारातच आम्ही बाथरूममध्ये गेलो. आमच्या प्रतिभासाधन आणि विचारमंथनाची जागा ती. अनेक क्लिष्ट राजकीय सामाजिक प्रमेये आम्हाला इथेच सुटली आहेत. विचारात गर्क होतो. त्या विचारातच अंघोळीला सुरुवात केली. आपले शरीर ही विधानसभा आहे असे मानून खसाखसा साबण लावून नखशिखांत फेसात बुडलो होतो. तर अचानक शॉवरमधून पाणी यायचे बंद झाले. टाकीतले पाणी संपले वाटतं असे म्हणून चडफडत असताना बाथरूममधील लाईटही बंद झाला. "च्या मायला! विजेला काय झालं आता?" असं म्हणून आंधळी कोशिंबीर खेळत शॉवर मधून बाहेर आलो. टॉवेल, कपडे आणि माझ्यात वीजबिल वाट अडवून उभे आहे की काय? पर्यायाने खडसे मास्तरच माझ्यासमोर वीजबिल फडफडवत उभे राहिले आहेत असे वाटले. अरे खडश्या, माझ्या अब्रूवर असा घाला घालतोस काय? तेव्हा बेसिनच्या काऊंटरवर अचानक मोबाईल हाती लागला. युरेका! असे ओरडून मी त्यातली विजेरी लावली आणि सर्व सत्यावर झगझगीत प्रकाश पडला. मोबाईल नसता तर, वीज येईपर्यंत आत तपश्चर्या करत बसणे एवढेच हातात होते. दुसरे दिवशी मग "टोमण्या"त माझा प्रतिवाद छापायचं ठरवलं. शीर्षक दिलं,"मोबाईल विना…" खडसे साहेब, मोबाईल सर्वत्र चालतो. घरही नाही आणि दारही नाही अशा ठिकाणी, अत्यंत अवघड जागी, पार उघडे पडलेल्यालाही आधार मोबाईलचाच असतो. जिथे मदतीसाठी आरडाओरडा करता येत नाही आणि तरीही कुणी मदतीला आलेच तर मदत घेताही येत नाही अशा ठिकाणी आधार असतो तो मोबाईलचाच. एवढंच काय, भुईमूग कुठे उगवतात असं मी "सिरी"ला विचारलं तर तिनं भुईमुगाची माहिती तर दिलीच, वर त्यावर पडणाऱ्या रोगांचीही इत्तंभूत माहिती दिली. लगे हाथो "कमळाला होणारा भुंग्यांचा प्रादुर्भाव आणि त्याचे निवारण" यावरही माहिती घेतली. तेव्हा खडसे साहेब, भुईमूग कुठे उगवतात तर आम्हाला कळेलच, पण ते कुठे लपवतात याचीही माहिती हा मोबाईल देईल. भुईमुगात एक उपटसूळ नावाची जात असते, ती खाल्ली म्हणजे खूप पित्त होते. आपल्याला या जातीची माहिती आहे काय? असा सवाल करून आम्ही अग्रलेख संपवला. छापखान्यात पाठवून दिला.

सकाळी चहा घेताना, म्हटलं आमचा "टोमणा" प्रसिद्ध झालाय की नाही पाहावा. म्हणून दार उघडून पाहिलं तर अंक टाकला नव्हता. बाकीचे लेकाचे सगळे हजर होते. ठोकसत्ता, महाखाष्ट टाइम्स इत्यादि. आमचाच टोमणा लेकाचा गायब होता. छापखान्याला फोन लावला, तर आमचे दिव्य म्यानेजर सांगू लागले,"साहेब, काल रात्रीलाच वीज गेलीय. सगळी प्रुफं रेडी आहेत. कधीचा तुम्हाला फोन लावतोय तर "आऊट ऑफ नेटवर्क" असा संदेश ऐकू येतोय. वीज आली की छापतो साहेब. काही टाईम-सेन्सिटीव्ह बाईट छापायचा होता का?" खिन्न होऊन फोन ठेवला.

Monday, November 24, 2014

माडी

नाना गोखल्यांच्या घराण्यात आजवर कुणी कधी माडी चढले नव्हते. कचेरीतून घरी येण्याचा रस्ता त्या "तसल्या" मोहल्ल्यातूनच जायचा. बऱ्याच वेळा ऑफिसमधून निघायला उशीर झाला की दिवेलागण झालेली असायची. अशा वेळी मोहल्ला जागा झालेला असायचा. रगेल आणि रंगेल माणसांची वर्दळ सुरू झालेली असायची. कोपऱ्यावरच्या "देशी दारूचे सरकारमान्य दुकान" अशी स्वच्छ निसंदिग्ध पाटी लिहिलेल्या गुत्त्याबाहेर उकडलेली अंडी विकणारा, चना जोर गरम विकणारा असे बसलेले असायचे. गुत्त्याचा धंदा जोरात होता. दक्षिणेतून आलेला अण्णा, स्वत: कपाळभर भस्म लावून तिरुपतीच्या भल्यामोठ्या तसबिरीखाली गल्ल्यावर बसत असे. स्वत: दारूला स्पर्श न करणाऱ्या अण्णाने "अय्योयो, दारू आणि मी? स्पर्शेसूधा नाय हो केला कधी" असं म्हणत भरपूर माया गोळा केली होती. आपले दुकान सरकारमान्य असल्याचा त्याला रास्त अभिमानही होता. "आपल्यामूळे सरकारला पैसा मिळतं की हो. उगाच विरोध कशाला म्हणतो मी! कोण बापडं सोताच्या पैशानं पितंय तर तुमचा घसा का जळजळतं हो?" असं उत्तर त्याच्या गुत्त्याला नाकं मुरडणाऱ्या लोकांसाठी असायचं. येणारी गिऱ्हाईकं नेहमीची. अडखळणारे पाय घेऊन यायची आणि मिरचीबरोबर एक क्वार्टर पोटात उतरली की मग न लडखडता बाहेर पडायची. स्वत:बरोबर गुत्त्याचा दरवळ घेऊन बाहेर पडलेले असे लोक पाहून नानांच्या कपाळावर आठ्या पडत. कसली व्यसनं म्हणायची ही? रोजगार हातात पडला की इथे येऊन उडवायचा. पोराबाळांची फिकीर नाही, बायकोची पर्वा नाही. असं काहीसं पुटपुटत ते त्यांना चुकवून पुढे चालू लागायचे. माडीवरून सारंगीचे पिळवटून टाकणारे स्वर तरंगत यायचे. तबलेवाला ठाकठूक करत तबला लावत असायचा. रात्र जागवण्याची तयारी चालू असायची. नानांच्या मनात कुतूहलयुक्त भीती असायची. गाणे आवडायचे पण ते गाणारी… त्यांना अजिबात ते पसंत नव्हते. समाजाला लागलेली ही कीड आहे असे त्यांचे मत होते. इमारतीखाली जिन्यापाशी एक लुंगी गुंडाळलेला, तलवारकट मिशा राखलेला, दंडावर ताईत बांधलेला आडवातिडवा रांगडा इसम राखणीला उभा असायचा. तो नानांकडे पाहून हसत असे. नाना शरमून खाली पाहत आणि चालू लागत. तो इसम मग पचकन थुंकत असे आणि तिरस्काराने स्वत:शी म्हणे,"थू: तुमच्या! आवडत न्हाई व्हय? तुज्यावानी लै लोक हळूच येत्यात. म्हनं बाईंचं नाव लै ऐकलं. गानं ऐकायचं हाये. आर तिच्या! चंदाबाई गानं म्हनत नसली तरी तिच्या तोंडाकडं टुकटुक बघत बसत्यात." नाना तिरस्कार चेहऱ्यावर घेऊन पुढे जात. माझ्या हातात सत्ता दिलीत तर हा सगळा मोहल्ला साफ करून टाकीन असे ते खाजगीत बोलत. ते वीररसपूर्ण भाषण ऐकणाऱ्या श्रोत्यांमध्ये वर्षाचे सर्व उपवास, प्रदोष वगैरे पाळणारी त्यांची पत्नी, "नानू, पहिलं तू तुझं बघ हो. क्लार्कचा हेडक्लार्क झालेला पाहिलं म्हणजे मी जायला मोकळी झाले. त्याची वाट पाहून पाहून हे वर गेले, निदान माझ्या तरी हयातीत बेसिक पाचशे झालेलं पाहूदे रे बाबा…" हे असलं बोलणारी आई आणि "नाना, तुम्ही मदत करून सोडवलेली गृहपाठाची सगळी गणितं चुकली. बाई म्हणत होत्या कुठल्या गाढवाची मदत घेतलीस रे माठ्या?  मी खरं ते सांगितलं तर त्या एकदम चूप झाल्या. पण गाढवांनो माफ करा असं पुटपुटलेलं मी ऐकलं. मला बाई मुळीच आवडत नाहीत. शिवाय तुमचे कान गाढवासारखे मुळीच नाहीयेत. नाना, शाळा बदला माझी." असं म्हणणारा सुपुत्र, हे असे असल्यामुळे ते भाषण फुकट जात असे. रोज घरी येताना चंदाबाई आणि तिची कुकर्मे याबद्दल आवाज उठवायचा असा ते निश्चय करत. घरी आल्यावर भाकरीचा खरपूस वास आणि भरल्या वांग्याची भाजी यांच्या संयुक्त परिणामामुळे "आज आता लगेच काही नको. पण उद्या मात्र नक्की काहीतरी ठोस पावले उचलायला हवीत." असे ठरवून तडक पानावर बसत. मग ते जेवण अंगावर येई. तरी दिसामाजि काही चिंतन करावे म्हणून भोजनानंतर ते आरामखुर्चीत बसून आढ्याकडे पहात चिंतन करीत. "अरे असं  शुंभासारखा बसू नये रे बिनकामाचं. लहान का आहेस आता? एक पोर आहे हो तूस! लहान नव्हे काही, चांगले धा वर्षाचे आहे. कधी रे बाबा तू शहाणा होणार आहेस ते त्या गजाननालाच ठाऊक!" या आईच्या वाक्याने चिंतन मध्येच तुटत असे.काही तरी करून हे कारकुनी जगणे बदलले पाहिजे हा विचार त्यांना कुरतडत राहायचा.

पण आता त्यांनी अगदी मनावरच घेतले होते. या चंदाबाईचे सगळे धंदे बंद करायचे. पण आपण पडलो शाकाहारी कुंजविहारी. धक्काबुक्की, दमदाटी आपल्याच्याने काही व्हायचे नाही. आणि छान टोपी वगैरे घालून आपण "श्रीकृपेकरून आमचे या मार्गावरून नेहमी जाणे येणे होते, तेव्हा कृपया आपले हे धंदे बंद करा" असे निमंत्रण करायला गेलो तर माडीखालचा तो लुंगीधारी त्याच श्रीकृपेकरून आमचे स्वत:च्या पायाने जाणे येणे कायमचे बंद करील याची खात्री. नानांचे डोके सुपीक होते. तैलबुद्धीच्या घराण्यात जन्म झाल्यामुळे ते जन्मजात सुपीकच असणार होते. "काट्यानेच काटा काढावा!" हे वाक्य त्यांच्या डोक्यात "युरेका!" प्रमाणे अवतरले. अण्णाशी युती करावी! हां! कसाही असला तरी आपल्याप्रमाणे सच्छील सनातन हिंदू आहे, दारू गाळतो म्हणून काय झाले, स्वत: तर पीत नाही. त्याला ही असली बाईबाजी अजिबात चालत नसणार. आता त्याच्या दुर्दैवाने गुत्त्याला हीच जागा सरकारने उपलब्ध करून दिली असेल त्याला तो बिचारा काय करील. ठरले! अण्णाला भेटायचे! पण सरळसरळ गुत्त्यात कसे शिरायचे? शिवाय अण्णा स्वत: कुणाला भेटायला जात नाही असे कळले होते. ऑफिसमधला शिपाई, गुलाब, लेकाचा म्हणे नेहमी तिथे जात असतो त्याने सांगितले. एवढंच काय, तो  अण्णाचा विश्वासू माणूस आहे आणि तो स्वत:ला अण्णाचा निष्ठावंत सैनिक समजतो असे कळल्यावर तर नाना गारच झाले. काही म्हणा, माणसाच्या दिसण्यावरून त्याचा धंदा ओळखता येत नाही हेच खरं. मग गुलाबची गोडीगुलाबी करून नानांनी अण्णाची भेट पक्की केली. गुत्त्याची पायरी चढताना आपली पितरं स्वर्गातून डोळे फाडून आपल्याकडे पाहत आहेत असे त्यांना वाटले. त्यातल्या बरेच जणांनी जानवे कानाला लावले असेल. नाही म्हणायला नानांचा काका दर्दी होता. लिव्हर खराब होऊन गेला बिचारा, नाहीतर निदान त्याला तरी नानांचा अभिमान वाटला असता. अण्णाने तोंड भरून स्वागत केले. "ये रे! ये रे! हे आमचं गुलाब, सांगून ठेवलं तू येणार म्हणून. न्हेमी पाहतो रे तुला रस्त्यातून जाताना. योग्य ठिकाणी आलास की रे बाबा तू! आपण न्हेमी पैल्या धारेची ठेवतो." असं म्हणून वेटरला,"एक थोडं ते मोसंबी आण रे बाबा!" असं सांगितलं. नाना भेदरले. ते गडबडीनं म्हणाले, "अहो नाही नाही. मी त्यासाठी नाही आलो." मग नानांनी आपला मुत्सद्दी फडणविशी बाण्याने अण्णाला समजावून सांगितले. चंदाबाई, तिचे धंदे, तो लुंगीवाला मवाली गुंड, हे सर्व कसे आपल्या गावाला लांच्छन आहे. त्यामुळे तुमच्या या नामांकित गुत्त्याला प्रतिष्ठा कशी प्राप्त होत नाही. "हे पहा अण्णासाहेब, तुमच्याकडे येतो तो सामान्य ग्राहक. मजूर. तो चवलीपावलीची नवटाक छटाक हातभट्टीची पितो. इथून तो तडक चंदाबाईकडे जातो. त्याच्याकडील उरलेल्या पावल्या ती काढून घेते. ही असली गिऱ्हाइकं किती दिवस पोसणार? चंदाबाईला हलवा. इथे बार काढा. आलिशान मोटारी येतील. चवलीपावलीच्या जागी शंभराच्या नोटा बाळगणारे येतील."आणि मग इथे त्यांच्या सुपीक डोक्याबरोबरच एका सुप्त इच्छेने डोके वर काढले. "जर हे सर्व तडीस नेले, तर तुम्ही तुमचा बार बघा, आमची एकच अट, मात्र बारची मालकी आमच्याकडे राहील." अण्णा डोळे बारीक करून काही वेळ त्यांच्याकडे पाहत राहिला. मग म्हणाला,"तुम्ही चंदाबाईला हाकला, मग बघू." अशा वाटाघाटी होत राहिल्या. बोलता बोलता नानांनी टेबलावर आलेले खारे शेंगदाणे तोंडात टाकले आणि गुत्त्यात गेलो पण प्यालो नाही या सात्विक समाधानात ते बाहेर पडले.

हे सर्व होत असताना, नाना घरी पोचायच्या आत या वाटाघाटीची बित्तंबातमी माडीवर चंदाबाईकडे पोचली. बाईंनी असे अनेक अण्णा आणि नाना "बघितले" होते, आणि त्यांना नेसत्या कपड्यानिशी घरी परत पाठवले होते.  बाईंना स्वत:ला नेसत्या कपड्याचे सोयरसुतक नव्हते. आपण धंदा करतो, संत सत्संग नाही असे बाईंचे स्वच्छ आणि प्रामाणिक मत होते.मग एकदा धंदा म्हटलं की दुकान उघडायला का लाजावे?

नाना नेहमीप्रमाणे मोहल्ल्यातून घरी चालले होते. आता त्यांच्या सच्छील डोक्यात मोहल्ल्याबद्दल घृणा कमी होऊन त्याची जागा महत्वाकांक्षेने घेतली होती. फक्त अण्णाने आपल्या डावात साथ द्यायला हवी असा विचार करत असतानाच ते थबकले. समोर तो चंदाबाईचा उन्मत्त राखणदार वाट अडवून उभा होता. नानांची क्षणभर तंतरली. उलटपावली पलायन करावे असा नैसर्गिक विचार त्यांच्या मनात डोकावला. पण धोतराची कनवट घट्ट धरून ते उभे राहिले. "बाईंनी बलावलंय वर!" अशी गुरगुर वजा विनंती त्यांच्या कानावर पडली. नानांना ब्रम्हांड आठवले. त्यांच्या बेचाळीस शेंडीधाऱ्या पिढ्यात कुणी बाईची माडी चढले नव्हते. संध्येला बसलेले आजोबा, सोवळ्यात स्वयंपाक करणारी आई, लाल आलवणातील आत्या, वाती वळणारी आजी, ताम्हन, पूजेची फुले, हातपाय धुवून आत येऊन परवचा म्हणणारी मुले, जानवे, त्याची रामगाठ, श्रावणी, पंचगव्य, उपासतापास करणारी त्यांची बाळबोध बायको असे सगळे त्यांच्या डोळ्यांसमोरून क्षणात येऊन गेले. सर्व पितर श्वास रोखून स्वर्गातून आपल्याकडे रोखून पाहत आहेत असा त्यांना भास झाला. घामाचा एक ओघळ कपाळावरून त्यांच्या नाकावर आला. हाताचे पंजे ओलसर वाटू लागले. "चलताय न्हवं?" या राठ रासवट आवाजाने ते भानावर आले. इथे त्यांच्या सुप्त महत्वाकांक्षेने पुन्हा एकदा सर्वांवर मात केली आणि गोखले कुलवृत्तांतात नोंद करून ठेवण्यासारखी घटना घडली. नाना प्रथमच माडीची पायरी चढले. उंबऱ्याशी ते पुन्हा थबकले, पण कुलदैवताचे स्मरण करून त्यांनी आत प्रवेश केला. समोर बिलोरी आरसा. शेजारी झुंबरासारखा लखलखणारा लोलकांचा पडदा. आतील दिव्यांचा प्रकाश त्या लोलकांमधून फाकत रंगीबेरंगी इंद्रधनुष्य होऊन नानांवर पडला होता. धूप आणि अत्तरमिश्रित सुगंध दरवळत होता. अजून षौकीन मंडळींची येजा सुरू झालेली नव्हती. सारंगिये आणि तबलजी आपापली हत्यारं लावत होते, त्याचे सूर ऐकू येत होते. पडदा बाजूला करताना तो किणकिणला. आत स्वच्छ शुभ्र गाद्या गिरद्या लोड लावून ठेवले होते. समोर पान, लवंगांचे तबक, गजऱ्यांचे तबक सजवून ठेवले होते. "थांबा हितंच" या लुंगीवाल्याच्या शब्दांनी नाना भानावर आले. सारंगिये मान खाली घालून तारा जुळवत होते. त्यांनी वर पाहिलेही नव्हते. तबलजीने मात्र मान झुकवून त्यांची दखल घेतली. त्याला उलट दखल द्यावी की नाही या संभ्रमात नाना असतानाच समोरच्या चिकाच्या पडद्यात हालचाल झाली आणि एक स्थूल वृद्ध बाई बाहेर आली. तोंडाचे जवळपास बोळके, वर्षानुवर्षे तंबाखू, पान खाल्ल्याच्या खुणा, डोळ्यांत सुरमा, नाकात मुसलमान धर्तीची चमकी, विरळ होत चाललेले केस, तरीही त्याला मेंदी लावलेली. वृद्धत्वाच्या उघड खुणा दिसत असल्या तरी डोळे कमालीचे बेरकी. नाना पाहत राहिले. त्यांचा थोडासा अपेक्षाभंगही झाला असावा. तो अपेक्षाभंग चंदाबाईच्याही लक्षात आला असावा. ती हसली. "नानाच म्हणत्यात न्हवं तुमाला? बसा. तुमी म्हनं आमच्या पोटावर उठलाय. खरं हाय का?" नाना गडबडून म्हणाले,"म्हंजे तसं काही नाही, पण स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षं झाली, सुधारणा व्हायला हव्यात. राष्ट्र बलवान व्हायला नको?" हे ऐकून चंदाबाईनं अतीव करुणेनं नानांकडे पाहिलं.  "असं कधीपासून होतंय हो तुमाला?" असलं काही तरी म्हणणार असं त्यांना वाटलं. आपण कैच्या कैच बोलून गेलो हे त्यांच्या ध्यानात आलं. शाखेत दंड, वेतचर्म, खड्ग शिकलो, पण असल्या प्रसंगांना तोंड द्यायला शिकवलं नाही गेलं कधी असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला.
"नाना, आमच्या धंद्यावर उठलायसा, पण तुमच्याबद्दल आमाला अजिबात राग न्हाई. आमाला तुमची खरी विच्छा ठाऊक आहे."
नाना सटपटले. आपण चोरून चिकाच्या पडद्याआत डोकावून पाहत होतो ते या बाईनं पाहिलं की काय? ही जागाच अशी आहे. आयुष्यात कधी मान वर करून परस्त्रीकडे पाहिलं नाही, पण इथं आल्यावर मन चळलं की काय आपलं? समोर राजा रविवर्मा स्टाईलचं ओलेत्याने उभ्या असलेल्या एका यौवनेचं पेंटिग लावलं होतं. त्याने नाना कासावीस झाले होते. त्यांनी डोळे बंद करून आपल्या देवघरात लावलेल्या बाळकृष्णाच्या तसबिरीचे स्मरण केले. त्यांनी "अहो नाही हो, तसला विचारसुद्धा करत नाही मी" असा प्रतिवाद करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. त्यांना थांबवत चंदाबाई म्हणाली,"तुमी म्हत्वाकांक्षी आहात हे आमाला ठावं हाये. तुम्ही खरं तर त्या अण्णालाच हाकलून लावा. आणि थितं बार टाका. बारची सगळी मालकी तुमची करायची जबाबदारी आपली!" नाना सर्द झाले. बाउन्सर पडणार म्हणून ब्याटसमननं आधी खाली झुकावं तर बॉलरनं छान फुलटॉस द्यावा तसं त्यांचं झालं. मग सगळी मुत्सद्देगिरी एकवटून ते म्हणाले,"तसा करार करणार का?" चंदाबाई छानसं हसली. जवळपास बोळके झालेल्या तोंडात दोन दात चमकले. "नाना, करार? हितं काय आमी आमची शेती इकाया बसलोय व्हय? माळावर बोंबलाया पाटलाची परवानगी कशाला लागतीय? तुमी निर्धास्त ऱ्हावा. चंदाबाईचा शबूद हाय. तुमी गुत्त्यावर कबजा करा, अन्ना बोंबलाया लागला तर आपण त्याच्या मदतीला काई जात न्हाई याची ग्यारंटी. पन तुमी म्हनतच असाल तर कागद करायला चंदाबाईची ना न्हाई. करा कागूद." आणि मसाला घातलेला चहा नानांसमोर आला. तो पीत असताना, त्यांना घरचा आलं घातलेला चहा आठवला. पितळी भांड्यातून तो पिणारी त्यांची आई आठवली. अचानक त्यांना आपल्या मध्यमवर्गीय जगण्याचा आणि विचारसरणीचा कमालीचा तिरस्कार वाटला. चंदाबाईच्या पाठींब्यानं हे कळकट जीवन बदलून टाकण्याची संधी आली होती. नाना ती सोडणार नव्हते. ते म्हणाले,"अहो पण, असं कसं घालवणार त्या अण्णाला?" चंदाबाईनं नानांचे मुत्सद्दी प्रश्न आधीच ओळखले होते. "मला ठावंच होतं तूमी बामण असेच भोट असनार. एक गोष्ट सांगते ती ऐका. अन्नानं लावली आसंल पाटी सरकारमान्य म्हणून. पन अंदरकी बात सांगते. परमिट न्हाई अन्नाकडं! लावा दावा, आना बंदी. अन्ना सोताच्या भट्ट्याबी लावतोय. कुटं कुटं तेबी सांगते. नवसागर कुटून आनतो ह्ये पन आपल्याला ठावं हाये. दोन सालाखाली कंट्रीत कीटकनाशक घातल्यानं धावीस गिऱ्हाईकं खपली. अन्नानं पैका सोडला आन केस होऊ दिल्या न्हाईत. येवढं पुराण बास हाय का?" नाना उठले आणि दाराकडे वळले. एकदम काही लक्षात येऊन ते म्हणाले,"एक विनंती हाय, आपलं, आहे! मी इथं माडीवर आल्याचं कृपा करून कुणाला सांगू नका. आमच्या मातोश्रींस कळलं तर आजही हातात निखारा देऊन काशीयात्रेला पाठवतील मला. आणि आमचं कुटुंब वटसावित्रीचं व्रत बंद करील." चंदाबाई छद्मी हसली आणि म्हणाली,"निर्घोर जावा."

नानांनी आपले सर्व मुत्सद्दीपण पणास लावून अण्णावर केस केली. दाव्याच्या तारखा पडू लागल्या. नाना तहानभूक विसरले. अण्णाच्या सगळ्या जुन्या केसेस त्यांनी उकरून काढल्या, कोर्टात पुरावे दाखल केले. पदरची सगळी कमाई पणास लावली. हे सर्व होत असताना चंदाबाईच्या माडीचा झगमगाट तसाच चालू राहिला. मैफिली झडत राहिल्या. लोक तसेच माडी चढत राहिले, पहाटे तीन चार वाजता एकमेकांच्या आधाराने माडी उतरत राहिले. अण्णा तसाच गल्ल्यावर बसून गळ्यातील रुद्राक्षमाळा कुरवाळत बसून राहिला, पहिल्या धारेची माया जमवत राहिला. नानांचे आणि चंदाबाईचे संबंध याबद्दल येणाऱ्याजाणाऱ्याला सांगत राहिला. या गोष्टीची कुणकुण नानांच्या घरापर्यंतही गेली. मग नानांनी "तो मी नव्हेच" चा प्रवेश उत्तम वठवला आणि म्हातारीचे समाधान केले. म्हातारीचं समाधान झालं तरी त्यांच्या बायकोचे अजिबात झाले नाही. मग त्या माऊलीने "आजकाल सासूबाईंना रात्री सोबत लागते, वय झालंय त्यांचं. त्यांना काही हवं नको बघायला हवं" असं कारण देऊन आपली वळकटी माजघरात सासूबाईंच्या बिछान्याशेजारी लावली. आज ना उद्या तिला सत्य समजेल या आशेने नानांनी तिच्या नाकदुऱ्या काढल्या नाहीत. केस शेवटच्या टप्प्यात होती. आपल्या बाजूने निकाल लागणार याची पूर्ण खात्री त्यांना होती. आणि शेवटी निकाल लागला! असा निकाल कधीच लागला नव्हता. केस नानांच्या बाजूने निकाली झाली होती, नानांनी जागा आपल्याला मिळावी असा अर्ज केला होता तो मान्य झाला होता. पण कोर्टाने पुढे एक मेख मारून ठेवली होती. अवैध गुत्ता चालवला म्हणून गुत्ता बंद करण्याचा आदेश कोर्टाने दिला खरा, पण अण्णाचा वहिवाटीचा हक्कही मान्य केला होता. जागेची मालकी नानांची, पण ताबा अण्णाकडे असा तो निकाल होता. नाना हतबुद्धच झाले. ते तडक चंदाबाईकडे गेले. यावेळेस चंदाबाईचा आविर्भाव बदलला होता. अण्णाला तिथून हाकलायची जबाबदारी आपली नाही असे तिने स्वच्छ सांगून टाकले. मग नाना खवळले. त्यांनी आपला हुकमी एक्का काढला. "चंदाबाई, तुम्ही करार केला आहात आमच्याशी. तुमची सही आहे त्यावर." चंदाबाई थंडपणे म्हणाली,"नाना, सही तुमचीपण आहे त्याच्यावर. तुमचा माझ्या धंद्यात भाग आहे असा कागद आहे तो. मी बोलूनचालून धंदेवाली. तुमच्या इज्जतीचं तुम्ही बघा. हे पाप पचवायला किती श्रावण्या कराव्या लागतील?" नाना मुकाट्याने उठले आणि घरी गेले.

चंदाबाईची माडी आहे तशीच आहे. अण्णा साईड बिझनेस म्हणून वॉर्डाचा नगरसेवक म्हणून निवडून आला आहे. भट्टी जोरात चालू आहे. आणि नाना! नाना सध्या ओव्हरटाईम करून अण्णाच्या जागेचा घरफाळा भरताहेत. घरफाळा थकल्याच्या नोटिसावर नोटिसा त्यांच्या घरच्या पत्त्यावर येत आहेत. 

Sunday, November 16, 2014

गुरू आणि त्याचे दोन शिष्य

कथा तशी पुरातन वाटली होती परंतु आता तसे वाटत नाही. रम्य असा आश्रम. एक ऋषिवर्य. होमहवन, यज्ञबिज्ञ चालायचे. वेदपठण व्हायचे. गुरू संथा द्यायचे, शिष्य घोकंपट्टी करायचे. आश्रमाला राक्षसांचा फार त्रास. त्याला कंटाळून ऋषिवर्यांनी दोन शिष्य हेरले. एक बुद्धिमान तर दुसरा शक्तिमान. दोन शिष्य अभ्यासात यथातथाच पण गुरुप्रति त्यांची अपार श्रद्धा. एवढी की त्यांची कामे करण्यात चढाओढ, मारामारी व्हावी. अखेरीस गुरुने हस्तक्षेप करावा, कामे वाटून द्यावीत असे नित्य घडावे. एकदा ऋषिवर्य आजारी पडले. सेवा करण्याची चढाओढ सुरू झाली. एक म्हणे पाय मीच चेपणार. दुसरा लगेच ओरडला, मुळीच नाही, पाय मीच चेपणार. शब्दाला शब्द वाढत गेला, वातावरण तापले, आरडाओरड्याचे रूपांतर तारस्वराने किंचाळण्यात झाले. गुरुदेवांनी मध्ये पडण्याचा प्रयत्न करताच "तुम्ही गप पडा हो तिकडे!" असे दोघेही ओरडले. एकाने दुसऱ्याला अफजल खान म्हणावे तर दुसऱ्याने पहिल्याला डोंगरातील उंदीर म्हणावे. गुरुने कशीबशी समजूत काढून मार्ग काढला. एक पाय याने चेपावा तर दुसरा त्याने. काही काळ शांततेचे परंतु तणावपूर्ण वातावरण राहिले. गुरुही थकून निपचित पडला. तेवढ्यात पहिल्याने हळूच दुसऱ्याच्या वाट्याचा पाय चेपण्याचा प्रयत्न केला. अर्थातच ते लपून राहिले नाही. दुसरा भडकून उठला. तुंबळ मारामारी सुरू झाली. गुरू असहाय्यपणे पहात राहिला. दुसरा मार खात होता. त्याची उलटवार करण्याची ताकद संपत आली. पहिल्याला ते जाणवून त्याला आणखी उन्माद चढला. दोन्ही पाय पहिल्याच्या ताब्यात जाणार हे पाहून दुसऱ्याच्या  रागाला पारावार उरला नाही. त्याने तिथेच पडलेला एक भलामोठा धोंडा उचलला आणि पहिल्याच्या वाट्याच्या पायावर घातला. गुरूच्या पायातून कळ सणाणली आणि त्याने गगनभेदी ठणाणा केला. आपल्या वाट्याच्या पायाचा चेंदामेंदा झालेला पाहून पहिल्याने तर डोके गमावलेच. जराही विचार न करता त्याने एक शिळा उचलली, आणि "हे उन्मत्त माणसा, तुझ्या वाट्याचा पाय जाग्यावर राहील असे तुला वाटले काय?" असे म्हणून ती शिळा उरलेल्या चांगल्या पायावर आदळली. गुरूवर्य वेदनेने बेशुद्ध पडले. शुद्ध आली तेव्हा त्यांचे पायातील संवेदन गेले होते. त्याही परिस्थितीत त्यांना ती इष्टापत्तीच वाटली. निदान वेदना तरी नाहीत. पण काही कालाने त्यांचे मस्तक जबर दुखू लागले. गुरुने काही क्षण विचार केला आणि त्याबद्दल शिष्यांना काही न सांगण्याचा निर्णय घेतला!

सध्या गुर्जी गुमान पडून आहेत. एका शिष्याने खूप मुत्सद्दी विचार करून त्यांना बरे करायचा पण केला आहे, तर लगेच दुसऱ्याने "कसा बरे करतोस तेच पाहतो" असा प्रतिपण केला आहे.

बोध - चूक ऋषिवर्यांची आहे. आश्रमात प्रवेश तर दिला, पण त्यांचे एकूण गुण पाहता त्या दोघांना घरी हाकलून द्यायला हवे होते. आश्रमावर राक्षसांचे आक्रमण अधूनमधून होत राहिले असते पण ऋषिवर्यांचे दोन्ही पाय तरी धोतरात राहिले असते. 

Thursday, November 13, 2014

हरीभौंची गाथा

जेव्हापासून बातमी फुटली की अध्यक्षपदाचे उमेदवार आमचे हरिभौ आहेत तेव्हापासून आम्ही हरीभौंच्या चेहऱ्याचे बारीक निरीक्षण करत होतो. धावीची परीक्षा दिल्यानंतर प्रत्यक्षात बारावीची मार्कशीट हातात पडावी तसे ते गोंधळले होते. म्हणूनच कदाचित ते धावीनंतर शाळाकॉलेजसारख्या फुक्कट फालतू गोष्टींत अडकून पडले नसावेत. ते अजिजीनं मुत्सद्दी नानांना सांगत होते, आहो आसं करू नका, तिकीट घेताना आसलं काय ठरलं नव्हतं. आपन गरीब मानूस है. उगा कुठं नऊधा कोटीवाला मी. ऱ्हाऊ द्या मला स्थानिक पातळीचा आमदार. आमदार निधीतला येक रुपायापण नाही पायला अजून आन मी विधानसभेचा अध्यक्ष? म्हंजे आमचा आमदार निधी गेला का आता? नका नाना, नका गरीबाच्या पोटावर पाय आणू! नानांनी त्यांची समजूत काढली होती. "हरिभौ, तुम्ही आमचे बाजीप्रभू आहात असे समजा! गडाभोवती वेढा पडला आहे. आज आम्ही या वेढ्यातून निसटणार. शत्रू कोळसुंद्यांच्या टोळीप्रमाणे आमच्या मागे लागणार. तुम्ही खिंड लढवा. तासाभराने उगीचच तोफांचे बार करा. आम्ही इथंच कुठं तरी लपून राहू. वेढा घातलेले चौथी पाचवीच्या इतिहासापलीकडे काही शिकलेले नाहीत. तोफांचे बार ऐकून "आयला म्हाराज निसटून पोचलं वाटतं विशाळगडावर, आता बोंबलायला कशाला लढायचं हो फुक्काट" आसं म्हणून वेढा उठवून पुढच्या किल्ल्याला वेढा घालायला निघून जातील. आणि हरिभौ, आज तुम्ही इतिहासाचं एक पान लिहिणार आहात. मुत्सद्दी नानांचा चेहरा खुलला होता. हां! ह्याला म्हणतात मुत्सद्देगिरी! हरीभौंचा उतरलेला चेहरा पाहून ते घाईघाईने म्हणाले,"अहो, म्हंजे खरोखरचं एक पान लिहायचं नाही हो. नुसती एक प्रतिमा दिली, प्रसंगाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी. लिहायचं म्हटलं की अंगावर काटा येतो काहो? खिशाला छान दोन दोन पेनं लावून आलाय की हो!" इतिहासाचं पान लिहायचं वगैरे ऐकून हरीभौंचा उतरलेला चेहरा "अधोरेखित, प्रतिमा" असले मुत्सद्दी शब्द ऐकून आणखीच उतरला. हे असले जडजड शब्द कधी कानावर पडणार नाहीत या समजुतीनं या धंद्यात पडलो, आणि आता जोवर हा मसाले भात अन बटाट्याची भाजी खुर्चीवर आहे तोवर नुसत्या अलंकारिक उपमाच ऐकायच्या या कल्पनेने ते शहारले.

एरवी आम्ही हरीभौंना रस्त्यात पाहिलं असतं तर गडी पंढरपुरच्या वारीतून वाट चुकून मागंच राहिलाय असंच वाटलं असतं. ती छपरी मिशी, ती डोक्याच्या अक्षाशी पंधरा अंशाचा कोन करून ठेवलेली गांधी टोपी, तो घातलेला हातातला गंडा, गळ्यात न दिसणारी तुळशीची माळ, धावी पास पण इद्यापीठ रिटर्न छाप चष्मा. तोंड उघडलं तर फक्त "जै जै रामकृष्ण हारी"च भायेर पडणार असे यकदम ओरिजिणल अष्टसात्विक भाव चेहऱ्यावर. आजवर तसे भाव पैले तुकाराम,  त्यानंतर विष्णुपंत पागनीस आणि त्यानंतर थेट हरिभौ एवढ्यांच्याच चेहऱ्यावर पाहिले आहेत. विधानसभेचे शेत राखायला बसले आणि समाधी लागली. विरोधकांच्या आरोळ्यांनी समाधी भंग झाल्यावरच त्यांनी डोळे उघडले. मुत्सद्दी नानांचा डाव यशस्वी झाला हे त्यांच्या ध्यानात आले. पण विरोधक सोडत नव्हते. हरीभौंनी उत्तम मन:शांती दाखवली. विरोधक निघून गेल्यावर आम्हाला ते हळूच म्हणाले,"खरं म्हंजे त्यांनी पोल उशिरा मागितला. प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावं,  हे वाक्य उच्चारताच त्यांनी पोल मागायला पाहिजे होता. तो त्यांनी मागितला नाही. माझं हे दिल्यानंतर, म्हणजे रूलिंग दिल्यांनतर, मी पुढचा विषय पुकारल्यावर त्यांनी पोलची मागणी केली." हे शब्द ऐकताना मला साक्षात प्रतितुकाराम विष्णुपंतांचीच आठवण आली. शेत राखायला गेले आणि नुसतेच "आधी बीज एकले" गाणे म्हणत बसले. त्याचा फायदा घेऊन मंबाजीने शेतात बैल घुसवले. समोर बैल शेताची नासाडी करत आहेत त्याकडे विष्णुपंतांचे लक्षच नाही. गाणे संपता संपता ज्ञानबा शेतकरी आला तेव्हाही हे कसा सम गाठून आला अशा कौतुकाने त्याच्याकडेच पाहत होते. ज्ञानबा संतापाने फुटला आणि त्यांना बोल लावू लागला. तेव्हाही हे त्याच्याकडे अतीव प्रेमानेच पाहत होते. हताश होऊन ज्ञानबा थांबला आणि खुलाशाची वाट पाहू लागला. तर विष्णुपंतांनी अत्यंत थंडपणे कोवळ्या नरम आवाजात,"इतकं संतापायला काय झालं ज्ञानबा?" एवढंच विचारलं. ज्ञानोबाला संतापानं झीट यायचंच बाकी राहिलं. "अरे संतापायला काय झालं म्हणून विचारतोस? बघ, बघ, निम्मं अधिक शेत खाऊन टाकलंय आणि उलट मलाच विचारतोस संतापायला काय झालं?" यावर विष्णुपंत "आरे आरे आरे! पांडुरंगा!" एवढं म्हणून पुन्हा प्रेमाने त्याच्याकडे पाहू लागले. अगदी तस्सेच भाव आम्ही हरीभौंच्या प्रसन्न वदनी पाहिले. तेवढ्यात व्याघ्रवदन शुंभराजे तेथे आलेच आणि "बघा मी सांगितलं नव्हतं तुम्हाला? यांच्या नादी लागलात आणि शेताची नासाडी करून घेतलीत." असं म्हणून "हिंमत असल्यास पुन्हा बहुमत सिद्ध करा" अशा घोषणा देऊ लागले. पुन्हा एकदा हरीभौंनी उत्तम मानसिक समतोल दाखवला आणि "येकदा ठराव पारित झाल्यावर पुन्हा मागे जायची प्रथा नाही पांडुरंगा!" असे त्यांना सांगितले. पुढे शुंभराजे काही बोलणार तोच त्यांनी तावडेबुवांना "जरा काळी एक द्या" असे सांगून "खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी" हे पद सुरू केले. तावडेबुवांनी पट्टी तर लावून धरलीच वर "ना धरी, ना धरी" असे आळवून उत्तम साथ केली. हे कीर्तन चालू असताना मंबाजी छान बावनखणीत "माझ्याकडे बघून डोळा बारीक करून" ही लावणी ऐकत बसले होते.

या कथेचे खऱ्या तुकारामाशी साम्य इथेच संपते. पुढे या कथेतील तुकाराम मंबाजीच्या मांडीला मांडी लावून बसतो. त्याच्या काळ्या कर्तृत्वाला आध्यात्मिक संरक्षण देतो. मंबाजी स्वत:च त्याला मंदिरात नेऊन त्याची प्रतिष्ठापना करतो. वास्तविक तुकारामाने मंबाजीचे शंभर अपराध नोंदलेली गाथा लिहिली आहे. म्हणून जनांत त्याला आधार आहे. पण मंबाजीने दम दिला आहे,"तुक्या! बऱ्या बोलाने ती गाथा तूच बुडव नाही तर तुझ्या चिपळ्या आणि मुंडासं काही देवळात रहात नाही. आणि हे देऊळही रहात नाही." या तुकारामाला देवळातील छान गुळगुळीत फरशी बुडाला लागल्यावर गारेगार वाटले आहे. कित्येक वर्षांनी बूड असे स्थिर आणि गार झाले आहे. पुन्हा बाहेर उन्हांत बसायचे? नको नको! जनांस काय, उन्हातान्हाची सवे आहे. घेतील त्यांचे ते पाहून. अंमळ येथेच डेरा ठोकावा. फार तर काय होईल? तो गाभाऱ्यातील विठोबा कमरेवर हात ठेवून रागेजून पाहील. अगदीच चिडीस आला तर पायाखालील वीट हातात घेऊन आपल्यास फेकून मारील. रखुमाई जेवू घालणार नाही. मग आपण "तुझेच लेकरू गा मी" असे म्हणून पुन्हा त्यांच्या पायावर पडू. मग तो करुणानिधि आपल्याला पुन्हा आपलं म्हणेल. मग ती गाथा तुकाराम हळूच इंद्रायणीत बुडवतो. केवळ देऊळ शाबूत राहावे म्हणून हो! केवळ देऊळ शाबूत राहावे म्हणून! पांडुरंग, पांडुरंग!

Monday, November 10, 2014

कमल की आरजू

कोणतीही भाषा संपवायची असेल तर ती शासनाच्या अथवा बाल भारतीच्या ताब्यात द्यावी. "अर्हता", "निविदा सूचना", "यादृच्छक गति" वगैरे शासकीय मराठी वाचून कोणास अर्थबोध होत असेल तर त्यांस खुशाल सरकारी मान्यताप्राप्त विद्वान म्हणावे. बाल भारतीने नुसते मराठी शिकवायचा वसा घेतलेला नाही तर लहानपणापासून मुलांना सत्य माहीत असावे असा आग्रहसुद्धा धरला आहे. इयत्ता पहिलीच्या पुस्तकात समान अक्षर ओळखा सदरामध्ये छान रंगीत फुगे दाखवून त्यात शब्द लिहिले आहेत. त्यात गाय शब्दासमोर बाबा, गाढव शब्दासमोर आजोबा आणि आई शब्दासमोर तेवढा अभय असा शब्द दाखवला आहे. (गरजूंनी इयत्ता पहिलीचे पुस्तक पाहावे) मुलांना लहानपणीच सत्याची जाणीव करून दिली म्हणजे पुढे मोठेपणी सोपे जाते. आता तर मराठी शाळांतून उर्दू वर्ग सुरू होणार असल्याची वार्ता आहे. हे बरे झाले. इतके दिवस मराठी वाचवा, मराठी वाचवा असा धोशा लावला होता, आता काही वर्षांनी  "काय पण करो पण उर्दू बचाओ" अशा आर्त किंकाळ्या ऐकू येतील. पण काही झाले तरी उर्दू वर्ग सुरू होणार असे आमचे जळगावचे नवनिर्वाचित मंत्री एकनाथ यांनी खडसावून सांगितले आहे. म्हणजे आता अहमदला कमळ धरावे लागणार. इतके दिवस "शरद कमळ धर" असे शिकवून तरी कुठे उजेड पडला म्हणा? शरदने कमळ धरले पण मानगूट पकडावी तसे धरले. आता अहमदने कमळ धरले की शरदाची आपोआप सुंता होणार असा आडाखा दिसतो आहे.

वास्तविक आमचे कितीतरी मुसलमान मित्र उत्तम मराठी बोलतात. आजवर एकानेही आम्हाला उर्दू भाषा शिकायला हवी असा आग्रह धरला नाही. उलट कृपा करून आमच्याशी हिंदी बोलू नका असाच त्यांचा आग्रह असतो. तसा आमच्या घराण्याचा हिंदी उर्दूशी बराच घरोबा आहे. आमच्या आत्याने टिळक विद्यापीठाची "हिंदी प्रथमा" ची परीक्षा देऊन त्यात द्वितीय श्रेणी प्राप्त केली होती. त्या मिळवलेल्या प्राविण्यावर ती मुंबईतील दारावर भाजी विकायला येणारे, डोक्यावरून पत्र्याचा पेटारा घेऊन येणारे बिस्किटवाले भय्ये यांच्याशी अस्खलित हिंदीत घासाघीस करीत असे. एकदा मी तिला "देता हय तो देओ, नही तो जाओ तिकडे खड्ड्यात" अशा बाणेदारपणे भाजीवाल्याला ठणकावून त्यास नामोहरम केलेले पाहिले होते. त्या भाजीवाल्याने तिने मागितलेल्या भावाने बटाटे तर दिलेच, वर कोथिंबीरीची जुडीपण फुकट दिली. भाषा हे शस्त्र आहे हे मी त्यावेळीच ओळखले होते. हिंदी बोलायची असेल तर शब्दांपेक्षा आत्मविश्वास हवा अशी टिपही आत्याने आम्हाला दिली होती. आत्मविश्वास असल्यास शब्द आपले गुलाम असतात हे मात्र अगदी खरे, पण आत्मविश्वास कुठल्या संकटात टाकेल हे सांगता येणार नाही. अभियांत्रिकी शिकत असताना आमच्या एका मित्राचा आत्मविश्वास असाच दुर्दम्य होता. त्यास इंग्रजी बोलण्याची मोठी हौस. गणित झेपत नसल्याने आम्ही काही मित्र मास्तरांकडे शिकवणी घेता का असे विचारण्यास गेलो. मास्तर खडूस म्हणून प्रसिद्ध होते. ताडदिशी काय बोलतील कुणी सांगावे या भीतीने आम्ही चाचरत विचारणा केली. ते बहुधा चांगल्या मन:स्थितीत असावेत. त्यांनी तात्काळ होकार दिला. आम्ही आनंदाने माघारी वळणार एवढ्यात आमच्या या मित्राने निरागसपणे विचारले,"बट, सर, व्हॉट इज युवर रेट?" मास्तर लाह्या फुटाव्यात तसे तडतडत असताना आम्ही वेगाने बाहेर पडलो.

बाल भारतीने पहिलीच्या उर्दू पुस्तकाचे काम तातडीने हाती घेतले आहे असे ऐकतो. आमचे एक मित्र भाषा समितीत आहेत. आम्ही नेहमी हॉटेल अशोका -धी बार अँड रेस्टॉरंट या आमच्या अड्ड्यावर भेटतो. वर दिलेली समान अक्षर ओळखा सदराची संपूर्ण जुळणी आमच्यासमोर त्यांच्या स्कॉच आणि आमचा ओल्ड मंकचा ग्लास यामध्ये पडलेल्या टिश्यू पेपरवर झाली आहे. स्कॉच हा शब्द केवळ जोडाक्षर असल्यामुळे पहिलीच्या पुस्तकात त्यांना घालता आलेला नाही. परंतु आज आपला समाज ज्या पद्धतीने पुढे जातो आहे, गतिमान होतो आहे, त्याकडे पाहिले असता येत्या काही वर्षात स्कॉच, माल्ट, व्होडका, ऑन द रॉक्स, चिल्ड, आयटम इत्यादि शब्द पहिलीच्या पुस्तकात नक्की घालता येतील असा त्यांचा दृढ विश्वास आहे. कालच आम्ही भेटलो. पहिलीच्या उर्दू पुस्तकाचे काम त्यांच्याकडे आले आहे. जरा टेन्शनमध्येच होते. त्यांचे आयुष्य पुणे ३० परिसरात गेले असून, लकडी पूल ओलांडला की गावाबाहेर हवा गार असते असे सांगून ते गळ्याभोवती मफलर गुंडाळतात. उर्दू संस्कृतीशी त्यांचा जवळचा संबंध म्हणजे लकीमध्ये चोरून बिर्याणी खाण्यापुरता. फक्त रोजांच्या दिवसांत मोमीनपुरा या घनघोर उर्दू जंगलात जाणे होते. उर्दू सोडा, हिंदी भाषेत जरी बोलू लागले तरी समोरचा तंदूर मुर्गी विकणारा मुसलमान मराठीत बोलू लागतो असे हिंदी. मुसलमान असून मराठी किती उत्तम बोलतो या आनंदात आम्ही तंगडी झोडत असू. असो. आमचे मित्र चिंतेत होते हे आम्ही जाणले. कारण त्यांनी आज ग्लासात प्रथम सोडा ओतला मग व्हिस्की. हा फाऊल होता हे कोणीही जाणकार सांगेल. चित्तवृत्ती स्थिर नसल्यानेच असे होऊ शकते. त्यांनी खिशातून चुरगाळलेले काही कागद काढून टेबलावर ठेवले. मी ते पाहिले. त्यावर खाडाखोड करून वाक्ये लिहिली होती. ओमर आज जुम्मा हय, नहाने का हय. नारायण मुरगीके पीछे मत भाग. शरद नमाज पढ. अरविंद तकिया पहन. अजित सब खाना हजम मत कर. आम्ही त्यांस म्हटले, पारंपारिक हसन कुठे दिसत नाही यांत तो? तेव्हा ते म्हणाले, अहो काय सांगू, तसेच करणार होतो. काम सोपे झाले असते. पण ही नावे वरून आली आहेत, समजले ना? अगदी वरून. म्हणे हीच नावे हवीत. एकनाथांस हा उर्दूचा वृश्चिकदंश अचानक कुठून आणि कसा झाला ते कळत नाही. पण त्यांचे हे भारूड गाजणार हे नक्की. पण आम्हांस हे कळत नाही की महसूल खात्याचा बैल असा शिक्षणाच्या कुरणात कसा घुसला? तावडेंनी अजून कुंपण घालून  घेतलेले दिसत नाही.

Sunday, November 9, 2014

तहनामा

शुंभ महाराज घोड्यावरून पायउतार झाले. मागेपुढे फर्जंद होते. म्हादबा मोतद्दाराने घोड्याला मुजरा करून बरोबर आणलेला तोबरा राजांच्या मुखासमोर धरला. "कुठं पाहतो आहेस म्हादबा? ही हिंमत? घोडं आणि धनी यांतला फरक दिसेनासा झाला तुला?" म्हादबा सटपटला. "आर्रर्रर्र, घोटाळा झाला म्हाराज! माफी! माफी!". अदबीने झुकून कुर्निसात करत म्हादबा मागे झाला आणि घोड्याच्या दिशेने वळला. त्याला थांबवून शुंभराजे घाईघाईने म्हणाले,"अरे अरे थांब! आण तो तोबरा इकडे. बरेच दिवसात हरभरा चाखला नाही. बघू बरं जरा." असं म्हणून त्यांनी बचकभर हरभरा उचलला आणि बकाणा भरला. "ऑम, नॉम, च्युम च्युम नॉम नॉम!" असे सुखाचे हुंकार काढत डोळे मिटून त्यांनी रवंथ करायला सुरुवात केली. "वाहवा! हा च्युम च्युम तोबरा च्युम काय चविष्ट च्युम च्युम लागतो आहे." म्हादबा म्हणाला,"म्हाराज, वाईच हतं थांबा. घोड्याचं खोगिर काढून तेला चारापाणी करून येतो आन मग तुमास्नी म्हालात बांदतो." शुंभराजांचे तिकडे लक्ष नव्हते,"आं? हं हं, नॉम च्युम च्युम!" असे आवाज करून त्यांनी अश्वखाद्य महोत्सव चालू ठेवला. म्हादबा परत आला तेव्हा तोबरा संपला होता. शुंभराजांनी तिथलीच एक गवताची काडी पैदा केली होती आणि डोळे मिटून ते दात कोरत होते. मधूनच समाधानाने प्चक प्चक असे आवाज काढत होते. शुंभराजांचे काडीप्रेम म्हादबाला माहीत होते. कानात काडी घालणे, दातात काडी घालणे, या दोहोंपैकी काहीच उपलब्ध नसल्यास दिसेल तिथे काड्या घालणे हा त्यांचा छंद होता. तेही नसेल तर ते मोहिमेवर जात आणि यथेच्छ काड्या घालत. या त्यांच्या छंदाबाबत "यांतून तुम्हाला काय मिळते" असा प्रश्न त्यांचे स्नेही आणि हितचिंतक करीत. त्यांस ते "माफीचा साक्षीदार" मधल्या नाना पाटेकरसारखा चेहरा करीत, मागे छान रेलून पाय ताणत, दोन्ही हाताचे पंजे डोक्याखाली ठेवत ते समाधानाने "आनंद!" असे उत्तर देत. त्यांच्या बरोबरचे हशम एकमेकाकडे पाहून हसत, एक डोळा मिचकावून एकमेकांना हळूच टाळी देत. "म्हादबा, तोबरा अंमळ जून निबर होता बरे. पण चालेल.  मोहिमेवर असताना आम्हांस खाण्यापिण्याची शुद्ध राहिली नव्हती. खान आमच्या मागावर असेल असे वाटले होते पण कसले काय. शेवटी आमचा गनिमी कावा वापरावा लागला. आमच्या नुसत्या बोलांनी खान वठणीवर आला. त्याने आमच्याशी लढण्यास साफ नकार दिला. तरीही आम्ही आमचे तोपची गोळे डागणे चालू ठेवले. असा काही मारा केला आहे की यंव रे यंव! शेवटी खान दिल्लीस पळून गेला अशी खबर आमच्या या विश्वासू फर्जन्दांनी आणली आणि आम्ही मोहीम आवरली. शिवाय, आमचा शिधा संपला होता. रसद पुरवणारे सरदार बारामतीकर यांनी आयत्या वेळी आम्हांस दगा केला. शेवटचे चारपाच दिवस आम्ही चिंचेचा पाला आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा खाऊन काढले. आम्ही पाळलेला पोपट नेहमी का बोंबलत असतो याचा उलगडा होतो आहे. कुठल्याही आर्त बोंबलण्याला स्फोटक पण गंभीर पार्श्वभूमी असते याचे ज्ञान होते आहे. यापुढे त्याला हिरव्या मिरच्या खायला घालणे बंद करा अशी आज्ञा आम्ही दिली आहे.

इतके दिवस आम्ही समजून होतो की खान दिल्लीस पळून गेला. दोन दिवसांपूर्वी खबर आली की आम्हांस जुझांत गुंतवून ठेवून खानाने महाराष्ट्र गिळंकृत केला! आमचे हेर अत्यंत कुचकामी आहेत. खानाचे हेर आधी येऊन बातमी सांगून गेल्यावर आमचे हेर उगवले. या रयतेलाही आम्ही पाहून घेऊ. रयतेने आमची सोडून (पक्षी: साथ सोडून) खानास साथ दिली. आमचे शिलेदार शिधा मागावयास गावात जात तेव्हा लोक "अजून भांडी पडली नाहीत, पुढच्या दारी जा" असे सांगत. आमच्या हेरांनी अनेक घरांत चोरून डोकावून पाहिले असता खानाचे सैनिक छान पंगतीत जेवायला बसलेले दिसले. त्या वृत्ताने आमच्या मनास अत्यंत कष्ट जाहले. खानाच्या सैन्याला रयतेने आदराने पंगतीत बसवले याने आधीच मन:स्ताप झालेला, त्यात आमचे हेरही असे, त्यांस अजिबात पोच म्हणून नाही. आमच्या हेरखात्यात येण्याआधी बहुधा दैनिक सकाळचे वार्ताहर असावेत. प्रत्येक घरात कोणते पक्वान्न होते याचीही बित्तंबातमी द्यायचे. चिंचेचा पाला पानी आणि मिरच्यांचा ठेचा अपानी गुरगुरत असताना ते ऐकणे यासारखे दु:ख नाही. आता तर आमचे सैनिक खानाच्या सैन्याचा वेष धारण करून हळूच त्यांच्यात जेवायला बसू लागले आहेत. साधे सैनिक ते, आमच्यासारखा राजधर्म, क्षत्रियधर्म त्यांस कोठून कळणार? दयेच्या बिर्याणीपेक्षा स्वाभिमानाची पेज बरी. दोष आमच्या सैनिकांचा नाही, रयतेचा आहे. रयतेने आता आमचा इशारा ऐकावा. तुमच्या हितासाठी तुम्हालाच वेठीला धरावे लागले तरी बेहत्तर, आम्ही ते करणार. तुमच्या हितासाठी तुम्हाला खंडणी द्यावी लागणार. महाराष्ट्र एकसंध राहण्यासाठी त्याचे तुकडे पडले तरी बेहत्तर….नाही, थांबा, मला म्हणायचे होते, महाराष्ट्र एकसंध राहण्यासाठी रयतेचे तुकडे पडले तरी बेहत्तर, चुकले, खानाच्या आधिपत्याखाली एकसंध राहणे म्हणजे आमचे तुकडे पडणे, ते होणे नाही. पुन्हा चुकले, थांबा, आम्ही हे विधान उद्या दुरुस्त करू. या मोहिमेने आम्हांस पुरते थकवले आहे. दारूगोळा संपला आहे, आता नुसत्या सुर-वाती राहिल्या आहेत. अनेक दिवसांनी हा हरभरा पोटात गेल्यावर जरा पोट डब्ब वाटते आहे, पण रिकामे असण्यापेक्षा बरे. इतके दिवस आपल्यापेक्षा आपली घोडी चांगली खात होती याची जाणीव होऊन मन खिन्न झाले आहे. खावयास मिळाले नाही तर आपले हे सैन्य उद्या राहणार नाही हे आम्ही जाणतो. त्यात खानाने महाराष्ट्र एकसंध ठेवण्याची घोषणा करून आमचे धंदापाणी बंद केल्याची खबर आली आहे. आता गनिमी कावाच हवा. खानास तह करावा असा निरोप धाडला आहे. तहनाम्याचे पहिलेच कलम आहे - "बऱ्याबोलाने शरण येऊन आम्हांस शिधा पुरवावा". आम्हांस खात्री आहे, खान पुरता कात्रीत सापडला आहे. आम्ही लढणार नाही, त्याला नुसत्या तहाच्या बोलणीत गुंतवणार, जेरीला आणणार, आणि शेवटी तहात लोळवणार! हां! याला म्हणतात गनिमी कावा! खानाचे फडणवीस स्वत:स मुत्सद्दी समजत असतील, आता करा म्हणावे या गनिमी काव्याचा प्रतिकार.

आमच्या हेरांनी (आता त्यांना हेरसुद्धा म्हणवत नाही, नुसतेच दूत म्हणतो) पुन्हा वाईट बातमी आणली आहे. हे दूत आमचा पगार खातात आणि खानासाठी काम करतात असा संशय येतो आहे.  या दूतांवर नजर ठेवायला दुसरे दूत ठेवले पाहिजेत. खानाकडून तहात पाच लक्षांचा मुलुख मागून घेतल्यावर पहिले ते काम करायचे. तर दूतांनी बातमी आणली, त्यांनासुद्धा तह करायचा आहे. त्यांच्या तहाचे पहिले कलम आहे आमच्या तहाचे पहिले कलम नाकारणे. आम्ही पाठवलेले पहिले कलम खोडून तिथे लिहिले होते, "शिधा मिळणार नाही, तरी धीर सोडू नये, रांगेत उभे राहावे. बारामतीकरसुद्धा उभे आहेत. त्यांनी काही मागितलेले नाही. आत्तापर्यंत जमवलेले शरीरमांद्य वापरून जगण्याचा त्यांचा निर्धार आहे. तुमची एकूण शरीरयष्टी पाहता तुम्हाला ते जरा कठीण जाईल, परंतु जिभेला कमी व्यायाम देऊन ऊर्जा टिकवल्यास तग धरू शकाल." अस्सं काय! ठीक आहे मग आमचा उलट तहनामा ऐकाच आता. कलम एकच - "आम्ही रांगेत उभे राहू, परंतु मग मुकाट्याने आम्हाला शिधादान करावे. त्यात तडजोड होणार नाही. आमच्या स्वाभिमानाची परीक्षा घेऊ नये." दूतांना हा तहनामा देऊन उलटपावली परत पाठवले. त्यांस आज्ञा केली, काही झाले तरी रांगेतून हलू नका. अगदी बहिर्दिशेसही जाऊ नका. भावना अगदीच अनावर झाल्यास रांगेत आमच्या नावाचा दगड ठेवूनच जा. दोन तीन प्रहरातच दूत परत आला. खानाने आमचा अपमान करायचे ठरवलेच आहे असे दिसते. उलट तहनाम्यातील एकमेव कलम असे - "आम्हांस रांगेतील दगड चालेल. त्यांस उलट अपमान न करता वाट पाहता येते. असेच दगड पाठवून देणे. आपण येण्याची तसदी न घेणे. युवराजांस तर मुळीच न धाडणे. त्यांनी मागील तहात बोलणी करावयास येऊन मेजावरील आमची लेखणी लंपास केली आहे. ते आम्हांस पुत्रासमान. त्यांचा राग काय म्हणोन करावा? त्यांस लिहावाचावयास येते काय? येत असल्यास लेखणीचा सदुपयोग करावा." ठीक आहे. आम्ही उलट तहनामा पाठवला आहे. शेवटचा म्हणजे शेवटचा.
कलम १ - आम्हाला नगराच्या बाहेर वेढा टाकण्याची परवानगी द्यावी. आमचे आपल्या हरएक हरकतीवर बारीक लक्ष असेल याचे भान ठेवावे.
कलम २ - शिधावाटप होणार असेल तर आम्ही रांगेत आहोत याचे भान आणि मान अनुक्रमे ठेवावा.
कलम ३ - आम्ही स्वाभिमानी आहोत हे मान्य केल्याचा दाखला स्वत: खानाने द्यावा.
कलम ३अ - खानास जमत नसेल तर निदान आपल्या फडणीसांच्या स्वाक्षरीने खलिता तरी पाठवावा
कलम ४ - ही भीक नव्हे, पण कलम २ खरोखरच आम्हांस आणि महाराष्ट्रास महत्वाचे आहे. ध्यानी असो द्यावे.

तहनाम्यावर स्वाक्षरी करून तो दूताकरवी रवाना केल्यावर शुंभमहाराज थकून गेल्यासारखे वाटले. त्यांनी म्हादबास हाक मारून सांगितले,"आण रे तो तोबरा परत. वेढा बराच काळ पडणार आहे." म्हादबाने हरभऱ्याचा वाडगा आणि शेंदेलोणाची बरणी आणून शुंभमहाराजांसमोर ठेवली आणि म्हणाला "म्हाराज, ही बरणी जास्त उपयोगी पडणार आहे." शुंभराजे प्रसन्न होत्साते विचारते झाले,"म्हादबा, तुझे कौतुक वाटते. आमच्या प्रकृतीची किती काळजी रे तुजला?" म्हादबा चाचरत उत्तरला,"म्हाराज, माफी असावी. ही माजी आक्कल नव्हं. खानाच्या दूतांसंगं तहनामा आन ही बरणीबी आलीया."

Tuesday, November 4, 2014

विलेक्षणीची मज्जा

नुकतंच अमेरिकेच्या फाॅरेनमधलं मतदान करून आलो. काहीच मजा नाही. मुळात इलेक्शन होती की नाही असं वाटावं असं वातावरण, म्हणजे मुळीच वातावरण नाही. टीव्हीवर फुटकळ जाहिराती आणि रस्त्यालगतच्या गवतात खोवलेल्या झेंडावजा जाहिराती. जाहिराती म्हणजे फक्त उमेदवाराचं नाव, बाकी काही नाही. आमचं नेतृत्व म्हणून वर अण्णा, दादा आणि तात्यांचे सत्तेने सुजलेले फोटो, खाली खच्चून सोन्याने मढलेला गेंडासदृश उमेदवार हे असलं काही नाही. सभा नाहीत, मोर्चे नाहीत, घोषणा नाहीत, उपोषणं नाहीत, मागण्या नाहीत, धमक्या नाहीत, पेपरमध्ये व्यंगचित्रं नाहीत, पक्षापक्षांमधलं जुगाड नाही, अण्णा तात्यांना भेटले, भाऊ तात्यांना भेटले, अण्णा भाऊंना भेटले, तात्या रुसले, दादा भडाकले असलं काही म्हणजे काही नाही. सामान्य माणसानं मत द्यावं तरी कुणाला आणि कशाच्या आधारावर? बरं चिन्ह शोधू लागलो तर ते कुठं दिसत नव्हतं. आयुष्यभर पाहिलेला अवलक्षणी "हात" आणि त्याची "ताई माई अक्का, विचार करा पक्का, हातावर मारा शिक्का" ही घोषणा अजून कानात घुमते आहे. जनसंघाची पणती आली आणि गेली, तिच्या मागोमाग आमच्या घराण्याचं वळण कसं सरळ ते ठसवत कमळाबाई आली, दहा वाजल्याचं दाखवून गुपचूप सगळ्यांचे बारा वाजवणारे घड्याळ आले, इलेक्शनआधीच स्वैर बाण मारून सुटलेले बाण मागे घेता येत नाहीत हे लक्षात आल्यावर प्रतिस्पर्ध्यालाच दोष देणारे धनुष्यबाण आले, गाजावाजा करून उद्घाटन झालेले परंतु त्यानंतर यार्डातच गंजत पडलेले रेल्वे इंजिन आले, तसाच गाजावाजा करून उद्घाटन झालेला आणि तेवढाच गाजावाजा करून तातडीने कचऱ्याच्या डब्यात गेलेला खराटा आला. काही असलं तरी चिन्ह हे त्या त्या पक्षाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. चिन्ह पाहून मतदाराला पक्षाची एकूण मानसिकता कळते. तसा कुठलाच आधार इथे मिळत नाही. नाही म्हणायला डेमोक्रॅटिक म्हणजे गाढव आणि रिपब्लिकन म्हणजे हत्ती अशी चिन्हे आहेत पण ती मतदानपत्रिकेवर दिसत नाही, त्यामुळे डेमोक्रॅट असूनही गाढवपणावर शिक्का मारता येत नाही. 

आपल्याकडं कसा इलेक्शनचा शीजन असतो. शिशिर ऋतूत जशी झाडे रंग बदलतात तसे हे एरवी स्कोडाफिडातून फिरणारे आपला रंग बदलतात. कधीही न दिसलेले वॉर्डातले "कार्यकर्ते" रस्त्यावर दिसू लागले आणि आपल्याकडे पाहून आकंठ हस्तिदंती करू लागले की ओळखावं शीजन सुरू झाला. त्यांच्या ओठावर नाईलाजाचे हसू असले तरी आतून "मायला, सालं एका मतासाठी आता भाव खाणार" हे विचार असतात. हे भाव दिसू नयेत म्हणून ही सगळी कार्यावळ रेबॅनचे गॉगल परिधान करून असते. "शुभ्र कपडे + रेबॅन = अशक्य उन्मत्तपणा" हे समीकरण पूर्वीपासून आहे. मला पूर्वीपासून एक प्रश्न पडायचा की ही कार्यकर्ते मंडळी नक्की काय कार्य करतात? म्हणजे दिवसा नोकरी रात्री कार्य की दिवसा कार्य रात्री कर्ते? कुठलीही नोकरी न करणारे पण पक्षाचे कार्यकर्ते म्हणवणारे अनेकजण मी पाहिले आहेत. हे प्राणी सहजासहजी रस्त्यावर दिसत नाहीत. प्रतिष्ठित नेत्याच्या घरी अथवा कार्यालयात जावे, तेथे हे मोठ्या संख्येने आढळून येतात. या नेते मंडळींनाही लोकांना सहजासहजी भेटता येऊ नये म्हणून स्वत:भोवती असल्या प्राण्यांचा चक्रव्यूह लागत असावा. तिथली कार्यकर्त्यांची गर्दी पाहिली की मला नेहमी गुळाच्या खड्याला लागलेल्या मुंगळ्यांची आठवण येते. एरवी रस्त्यावर पान खाऊन पचापचा थुंकणारी ही जनता, तिथे मात्र शिस्तीचा रुबाब पाहून घ्यावा. एखाद्या देवळात गेल्याप्रमाणे चपला बाहेर काढा म्हणून सांगतील, कुणी खेड्यातून काही कैफियत घेऊन आलेला आलेला बापडा त्याला "अपाइण्टमेण्ट न्हाई व्हय? आन्ना आत्ता काय भ्येटनार न्हाईत, माघारून या सांजच्याला." असं परस्परच सांगतील. तोही बिचारा "आसं कसं दादा, लै लांबून आलोया, पघा काय तरी तोड निघतीया का" असं म्हणून त्याचा भाव वाढवणार. मग पुढं निवडणुकांचा धुरळा उडाला की मग काय विचारावं. रिक्षेतून कंठशोष करत जाणारे लाऊडस्पीकर्स काय,  उमेदवारांची लाईफसाईझ होर्डिंग्ज काय. होर्डिंग्ज आणि त्यावर त्यांचे अशक्य निर्बुद्ध स्मितहास्य असलेले फोटो तर काहींचे अगम्य अवकाशात पाहून हात उंचावणारे फोटो पाहणे हा माझा विरंगुळा होता, आजही आहे. जेवढा उमेदवार छोटा तेवढे त्याच्या होर्डिंगवर बाकीच्या नेत्यांचे फोटो अधिक. त्यावर आमचे राष्ट्रीय नेते, आमचे आधारस्थान, आमचे शक्ती/प्रेरणास्थान, आमचे युवा नेतृत्व अशी पहिल्या फळीतील मोठे फोटो झाले की त्या खाली स्थानिक बाजारसमिती अध्यक्ष, झेडपी अध्यक्ष, सहकारी पत संस्था अध्यक्ष यांचे थोड्या कमी साईझचे फोटो. अशा स्थानिक देवचारांना मान देऊन झाला की मग या उमेदवाराचा प्रसन्नोन्मत्त फोटो. आमच्या गावातील एका स्थानिक नेतृत्वाने सगळ्या ठिकाणी एकच फोटो वापरायचे ठरवले आहे. त्यामुळे होर्डिंगवर त्यांचा जो फोटो आहे तोच गावातील वळू संवर्धन केंद्रातही लावला आहे. दोन्हीकडे तेवढाच समाधानी दिसतो. वळू संवर्धन क्षेत्रात त्यांनी भरीव कार्य केलं आहे त्यामुळे समस्त गाई त्यांना खास मान देतात असं ऐकून आहे. वळू काय मतदार काय, नीट हाकले म्हणजे वठणीवर येतात असं मत ते खाजगीत व्यक्त करतात.

होर्डिंग्जच्या पाठोपाठ मग सुरू होतो प्रचाराचा धुरळा. सभा लागतात. जिपा, टाटा ४०७, ट्रॅक्समधून कार्यकर्ते गावागावाकडे सुटतात. ऊसतोडणी कामगार, गावातील हातावर पोट असणारे कामकरी, पोटच्या पोराला अक्षरश: पोटावर बांधून हजेरी मिळवणाऱ्या बायका आणि क्वार्टर हाफवर कुठंही जाणारी गावातील रिकामटेकडी पोरं यांना ट्र्कात घालून शहरात सभेला घेऊन यायचं. त्यांनी सभेच्या ठिकाणी उन्हांतान्हात बसून राहायचं. हजेरी सभेनंतर मिळणार असते. पत्रकारांनी गर्दीचे फोटो काढल्यावर. क्वार्टरवाल्यांनी केव्हाच स्वत:चं जुगाड करून ब्रह्मानंदी टाळी लावून घेतेलेली असते. भाषण करणाऱ्या नेत्याने "आम्ही सगळे टोल नाके उध्वस्त करू" म्हटलं काय किंवा "परदेशातील काळा पैसा परत या देशात आणूच आणू" म्हटलं काय दोन्हीला टाळ्या वाजवायच्या असतात. "दांडगे पाटील साहेबांचा !" अशी घोषणा आल्यावर काही जण "विजय असो" म्हणतात काही जण नुसतंच "जय!" म्हणतात. पाटील दांडगे होत जातात. रोजावरचे कामकरी पुन्हा गावाकडे जाऊन उद्याच्या चिंतेला लागतात. प्रत्यक्ष निवडणुकांच्या दिवशी रणधुमाळी असते. आपलं नाव मतदार यादीत असेल की नाही याची धाकधूक घेऊन रांगेत उभं राहायचं. नाव असेल तर लॉटरी लागल्याचा आनंद घेऊन लोकशाही जिवंत ठेवल्याचा आनंद घेऊन परत यायचं. नाव नसेल तर पेपर चांगला जाऊनही नापास झाल्याचं दु:ख घेऊन रिपीटरसारखं परत यायचं. आपल्या नावावर कुणी "कार्यकर्त्यानं" मतदान केल्याची खात्री बाळगायची.  माझं स्वत:चं नाव रेल्वेच्या डब्यावर लावलेली रिझर्वेशनची लिस्ट आणि मतदारयादी या दोन ठिकाणी कधीही आलेलं नाही. पुण्याहून पंढरपूरला वारीत चालत जाऊन विठोबाचं दर्शन न करताच परत आल्यासारखं माझं होत आलं आहे.

या असल्या अस्सल भारतीय "विलेक्षणी"वर पोसलेला हा पिंड आज इथे अमेरिकेत मतदान करून बाहेर पडला तेव्हा अस्वस्थ झाला. कैच्या कैच. मतदान केंद्रावर गर्दी नव्हती, बाहेर कार्यकर्त्यांचं मोहोळ उठलेलं नव्हतं. माझं नाव चक्क मतदार यादीत होतं. ते पाहून मला गहिवरून आलं. माझं नाव तपासणाऱ्या त्या बाईपुढे शोभा नको म्हणून मी माझ्या भावना आवरल्या. केंद्रावर गेल्यापासून मोजून पाचव्या मिनिटाला मतदान करून मी बाहेर आलो. काय लोकशाही म्हणायची का काय ही? या लोकांना इलेक्शन कशाशी खातात ते माहीत नसावं. मोदींनी आल्यासरशी त्यांच्या मेडिसनच्या भाषणात थोड्या टिप्स द्यायला हव्या होत्या. शेवटी आपल्या गावाकल्डीच इलेक्षण लै टेक्सास, असं वाटू लागलंय.

Friday, October 31, 2014

मागे वळून पाहताना

जवळपास तीस वर्षांनी थोडासा इतिहास घडतो आहे. मित्रवर्य श्रीहरी दाते याचा माझा ऋणानुबंध शाळेपासूनचा. मनसोक्त हसणे, टिंगलटवाळी, भटकंती, सायकलवर रेलून घरामोरच तासंतास गप्पा मारणे या सर्वांतून त्याने मला अभाविपमध्ये कधी आणले कळले नाही. तीस वर्षांपूर्वी राष्ट्रभक्तीने भारलेली काही तरुण मंडळी सांगलीच्या टिळक स्मारक मंदिरात जमायची. त्यावेळी टिळक स्मारक मंदिर ही नुसती इमारत नव्हती, बापूराव गोऱ्यांच्या कडक शिस्तीत चालणारी, वागणारी ती एक चळवळ होती. अभाविपचे कार्यकर्ते असोत वा शाखेचे, बापूरावांच्या शिस्तीतून सुटका नसे. दररोज संध्याकाळी वॉर्डातून डॉक्टरांची फेरी असावी तशी ठीक पाच वाजता बापूरावांची फेरी व्हायची. जिन्यावर त्यांची पावले वाजली की आम्ही कार्यकर्ते गुणी बाळे असल्यासारखे सावरून मांडी घालून बसत असू. मग बापूरावांची नजर कार्यालयाचा इंचनइंच तपासे. "अरे? हा खिळा काल इथं भिंतीवर नव्हता, आज कसा आला?" इथवर तपासणी चाले. बहुतेक सर्व विद्यार्थी दशेतील, काही जण "पूर्ण वेळ", तर काही जण "प्रवासावर" असलेले "पूर्ण वेळ" असायचे. कधी सदाशिवराव देवधर प्रवासावर असायचे ते कार्यालयात यायचे.  मृदूभाषी. अत्यंत नम्रपणे आमचे बोलणे ऐकायचे, नेमके शब्द वापरून बोलायचे. कधी कधी चंद्रकांतदादा यायचे. तेही अगदी शांतपणे आमचे बोलणे ऐकायचे. कधीकधी त्या चष्म्यामागे मिष्किलपणा डोकावतो आहे असे वाटायचे, पण तसे काही नसायचे. सगळे सतरा-अठरा वयोगटातील माझ्यासारखे तरुण त्यांच्याभोवती जमलेले असायचे. सदस्यता अभियान, संपर्क, महाविद्यालय निवडणुका, बौद्धिक, अभ्यासवर्ग, परिवार, राष्ट्रीय पुनर्निर्माण असे अनेक शब्द कानावर पडत राहायचे. उमेदीची वर्षे अर्पण केलेले वासंती लोंढे, धडाडीचा प्रसाद जोग, स्वच्छ सरळ विचारांचा प्रमोद कुलकर्णी, सौम्य पण ठामपणे आपले विचार मांडणारी संगीता गोडबोले असे पूर्णवेळ कार्यकर्ते आम्हाला लाभले होते. पूर्णवेळ नसून पूर्णवेळ असलेले बाळासाहेब गायकवाड सर हे तर माझे दैवत होते. त्यांच्यासारखा निर्मल आणि ममत्व असलेला कार्यकर्ता मी पाहिला नाही. समस्त कार्यकर्त्यांची चिंता डोक्यावर घेऊन ते वावरत. पूर्णवेळ कार्यकर्त्यांचे तर ते अदृश्य पालकच होते. पदरचा पैसा खर्च करून त्यांची समाजसेवा चालू असे. कार्यक्रमांची आखणी करणं, त्यांच्या प्रचाराचे निरनिराळे मार्ग शोधणं,  युवाशक्तीशी संपर्क वाढवण्याच्या कल्पना सुचवणं, हे तर चालायचंच, पण हे आपण कशासाठी करतो आहोत याचं भान ठेवायचं आणि आमच्यासारख्यांना ते भान आणून द्यायचं काम ही "पूर्णवेळ" मंडळी करायची. माझ्यासारख्याला राहून राहून आश्चर्यजन्य कुतूहल वाटायचं, ज्या मध्यमवर्गीय घरात "आपण श्रीमंत नाही, शिक्षण हेच ध्येय ठेवा, करिअरचं भान ठेवा" असे शब्द कानावर सतत पडत असतात, अशा घरांतून ही मंडळी पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून कशी बाहेर पडली? ज्या कामाचा मोबदला नाही, कुठल्या गावात पाठवले जाईल त्याची कल्पना नाही, जेवणाची खात्री नाही, झोपण्यासाठी सोय होईल याची शाश्वती नाही या कशाचाच जराही न विचार करता बाहेर पडणं हे केवळ राष्ट्रप्रेमाचा ध्यास असल्याशिवाय होत नाही. राष्ट्रप्रेम, देशप्रेम, देशबांधव यासारखे शब्द गुळगुळीत वाटतात, पण हे असे कार्यकर्ते पाहिले की वाटतं असे शब्द नुसते शक्य नाहीत तर ते प्रत्यक्षात आले आहेत. संघानं ही वृत्ती निर्माण केली, परिवारात पसरवली. आज कोणी संघाला काही म्हणो, निरलस वृत्तीने काम करणारी माणसे निदान भारतात तरी कुठल्याही संस्थेत नाहीत.

याच काळात विनोद तावडेला पाहिलं. मला वाटतं तो मुंबईत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करत असावा. सांगलीला त्याचं येणंजाणं असायचं. रांगडा, थोडासा पैलवान बांधणीचाच होता तो. त्यावेळी त्याच्या विचाराने, बोलण्याने लक्षात आलं होतं, की हे काम वेगळं आहे. वैचारिकता होतीच पण त्यापेक्षा दंडशक्ती त्यात जास्त जाणवायची. दे धडक, मुसंडी मारून किल्ला सर करू अशा प्रकारचा जोश त्याच्या बोलण्यातून जाणवायचा. मी त्या वेळी काही काळापुरता मी थोडासा नैराश्यवादी विचारसरणीचा झालो होतो. अर्धवट वाचन, अर्धवट चिंतन, आणि त्याहूनही विनामार्गदर्शनाचे चिंतन यातून मी स्वत:च एक स्वत:चा "वाद" बनवला होता. मला वाटतं मी कोकणात घरी प्रवास करणार होतो, त्याचवेळी विनोदही कणकवलीला निघाला होता. चार तास आमची यष्टी खाचखळग्यातून मंथन करत चालली होती आणि मी विनोदशी कर्मयोग या विषयावर वाद घालत होतो. वरून खडबडीत, रांगड्या दिसणाऱ्या या इसमात एवढे तत्वज्ञान भरले असेल, एवढे वाचन असेल याची मला कल्पना नव्हती. माझ्या "वितंड" वादाचे त्याने शांतपणे खंडन चालवले होते. तो कणकवलीला उतरून गेला तेव्हा माझ्यातील नैराश्यवाद संपून एक उत्साह निर्माण झाला होता. विनोद आज मंत्री झाला असेल, पण त्याची प्रगल्भता, सामान्य कार्यकर्त्याचं ऐकून घेणं, एवढंच नव्हे तर त्याला उत्साहित करणं हे तेव्हासुद्धा त्याच्याकडे होतं.  त्यानंतर रात्ररात्र जागून काहीना काही काम चाललेलं असायचं, पण कधी त्याचं ओझं वाटलं नाही. अगदी खळ लावून पोस्टर भिंतीला चिकटवण्याचं काम असो वा कोपरा सभे मध्ये विद्यार्थ्यांच्या समोर बोलणं असो तेवढयाच आत्मीयतेनं केलं. अर्थात एकट्या विनोदने माझ्यातला कार्यकर्ता घडवला असं नव्हे तर त्यावेळचे सर्व कार्यकर्ते कमीअधिक फरकाने तसेच होते. एका माणसाने संघकार्य होत नाही, सर्वांनी मिळून होते.

आज मागं वळून बघताना वाटतं त्या काळापासून आजवर केवळ पायाभरणी चालली होती. एक एक मजबूत दगड बसवला गेलाय. काळाच्या उदरात गेलेली आमची दैवतं, ज्यांनी आम्हाला त्यांच्या साधेपणानं, सच्चेपणानं अदृश्य अशा मनगट्या दिल्या त्यांचं महत्व आता लक्षात येतंय. ती दैवतं आमच्या पायाचे दगड झाली आहेत. त्यांच्या मुशीतून तावून सुलाखून निघालेली विनोद आणि चंद्रकांतदादा यांच्यासारखी माणसं जे शिकलो त्याचा वापर करण्यासाठी सिद्ध झाली आहेत. पुनर्निर्माण, एकात्मता हे शब्द नुसते अभ्यासवर्गात ऐकले, पण आता ते प्रत्यक्षात येण्याचे दिवस सुरू झाले आहेत. राजकारण हे दलदल, त्यात दगड टाकणे म्हणजे स्वत:वर चिखल उडवून घेणे हा समज दूर होण्याची ही सुरुवात आहे. मोदींच्या रूपाने देशात सोनेरी किरणांचे झुंजूमुंजू झाले होतेच आता महाराष्ट्राची काळरात्र संपून उत्कर्षाचा उष:काल सुरू होतो आहे. जयतु! जयतु!

Wednesday, October 29, 2014

स्वाभिमान आणि सन्मान

त्यांना भले केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र मिळो, आम्हाला मात्र केंद्रात सुपारी आणि राज्यात नारळ मिळाल्याची भावना बळावत चालली आहे. पण आजून धीर सोडलेला नाही. सतत काहीतरी धरून ठेवणे हे आमच्या रक्तात आहे. तलवार उचलताना धोतराची कनवटी किंवा सोगा धरून ठेवायचा आणि धोतर सावरताना तलवारीचं म्यान धरून ठेवायचं हे आमच्या उण्यापुऱ्या बाविशीत आणि नऊदहा महिन्यांच्या भरघोस राजकीय अनुभवावरून शिकलो आहे. जेव्हा आमच्या डाडूने (म्हंजे डॅड हो माझे! मराठीत बापाला डॅड म्हणतात असं सेंट झेवियरमध्ये शिकवलं होतं) मला "जा, कमळाबाईला नडून ये!" असं सांगितलं तेव्हा कृष्णानं पांडवांच्या वतीनं शिष्टाई केली अगदी तस्सं  फीलिंग आलं होतं. बरोबर पेंद्या होताच. मीही कमालीचा बाणेदारपणा दाखवत "जागाच काय, सुईच्या अग्रावर राहील एवढीसुद्धा जमीन देणार नाही. अगदी जिथे आम्ही पारंपारिकरीत्या पडत आलो तीसुद्धा जागा मिळणार नाही. आम्हाला आमच्या परंपरांचा अभिमान आहे. स्वाभिमानाला धक्का लागेल असं आम्ही काही मान्य करणार नाही!" असं सांगून आलो होतो. फुगलेली छाती थोडी खाली आल्यावर विचित्र वाटलं. तेवढ्यात "रें, हो डायलॉक दुर्योधनाचो नाय?" असा सानुनासिक प्रश्न आमच्या कोकणातील एका कार्यकर्त्याने विचारलाच. त्याला "तुझा नारू करू काय रे?" असं विचारून झापलं. "शंका गाळा, नारू टाळा" ही नवीन घोषणा करायला हवी. डाडूला विचारतो आजच. वास्तविक मी डाडूला म्हणालो होतो, "फादर, तुम्ही मी जसा अभ्यास करतो तसं करा. जे आपल्याला जन्मात कळणार नाहीत ते टॉपिक मी सरळ ऑप्शनलाच टाकतो. उरलेल्यापैकी साठ टक्के हिट, चाळीस टक्के मिस असं धरतो. मला बरोबर पन्नास मार्क पडतात. आपण साधारण शंभर जागा लढवू." पण ऐकलं तर डाडू कसले. आत्मविश्वास गेला खड्डयात, स्वाभिमान महत्वाचा असं त्यांचं म्हणणं होतं. पण नारूचा झकास मोरू झाला बाकी. स्वाभिमान काय? ही:ही:ही:! वर्ल्ड कप मध्ये भारत हरला तरी चालतो, पण पापस्तान हरलं की सर्वात जास्त आनंद होतो तसं झालं आहे.

या सगळ्यात माझं इतिहासाचं ज्ञान मात्र उलटंपालटं होऊन बसलं आहे. शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची साडीचोळी देऊन रवानगी केली की शाहिस्तेखानाची? अफजलखानाचा कोथळा काढला की जिऊ महाल्याचा? दिल्लीहून भेटायला आले होते ते जयसिंग मिर्झा की दिया मिर्झा? आग्र्याहून सुटका कुणाची झाली होती? औरंगझेबाची की संभाजीराजांची? आग्र्याहून सुटका करून घेताना महाराज स्वत: कुठे होते? आमच्या स्वत:च्या डाडूंची दिल्लीहून सुटका कधी होणार? नजरकैदेत आम्ही आहोत की औरंगझेब? मुळात आम्ही राजे तरी आहोत की नाही? दिल्लीहून सुटका करून घेतली तर आम्ही पुन्हा दिल्लीकडे का धावतो आहोत? असे अनेक प्रश्न पडले आहेत. दस हजारी सरदारावरून पंच हजारी सरदार झालो. शिलेदारी गेली, बुडाखालचा घोडा गेला. बाजारबुणगे म्हणून पायदळात आलो. पूर्वी तलवार बाळगून होतो तिथे आता मुदपकातील भांडी वाहणे आले. पण म्हणून आम्ही आमचा सन्मान सोडणार नाही. जरूर मुदपाकातील खरकटी भांडी वाहायला सांगा, पण ज्यात मोतीचुराचे लाडू केले होते तीच कढई घासू, अळवाच्या फतफत्याचे भांडे मुळीच घासणार नाही. असा सांगावा घेऊन आमचे दोन विश्वासू सरदार दिल्लीस गेले होते. त्यांना तीन तास ताटकळत उभे राहायला लागले, पण "बघू" असा श्वास रोखणारे पण विश्वास वाढवणारे खात्रीलायक उत्तर घेऊनच ते परत आले. खरं तर आमच्या डाडूंना अळवाचे फतफते आवडते. त्यात असलेला पाचक मुळा, पित्तवर्धक शेंगदाणे आणि पोट साफ करणारा अळू हे सर्व त्यांच्या प्रकृतीला साजेसेच. पण अळूने घसा खवखवतो म्हणून खात नाहीत. घसा खवखवला की मग खूप ओरडत बसतात.

अजूनही दिल्लीहून उत्तर आलेले नाही. आमच्या सहनशीलतेच अंत पाहू नका म्हणावे. आमचा सन्मान राखला गेलाच पाहिजे. घासण्यासाठी का होईना, मोतीचुराची कढई नसेल तर निदान साखरभाताची परात तरी हवी. गेलाबाजार मसालेभाताची तरी हवीच हवी. हो. मला वाटते ते सन्मानाचे होईल. या सैनिकाला आव्हान देऊ नका. आमचा अख्खा जन्म नाक्यावरच्या हॉटेल सन्मानमध्ये एक चाय पानी कम, एक गिलास पानी आणि माचिस या ऑर्डरवर गेला. ते सन्मान पण आपण अजून सोडलं नाही. आजही आपण तिथे गेलो की न सांगता पाणी आणि माचिस टेबलावर येते. आपण बिल न देता बाहेर पडलो तरी कुणी थांबवत नाही. "लिहून ठेव" असं आधीच फर्मावलेलं आहे. तर याला म्हणतात इज्जत. आत्ता काही नाही दिलंत तरी हरकत नाही पण सन्मानाने "लिहून" तरी ठेवा वहीत. जै महाराष्ट्र!

Tuesday, October 21, 2014

डरकाळी!

आमच्या जिंदगीची कहाणी येका शब्दात सांगायची झाली तर तो शब्द म्हंजे "स्वाभिमान!".  कद्दी कद्दी कुणासमोर झुकू नये असे बाळकडू आम्हांस ल्हानपणापासूनच मिळालेले. तोंडावर मुका मिळाला नाही तरी चालेल पण ढुंगणावर टोला पडता कामा नये अशी आम्हाला घरातून ताकीद होती. शाळेत बऱ्याच वेळा ओणवे उभे राहायची शिक्षा मिळायची पण आम्ही न्हेमी भिंतीकडे पृष्ठभाग ठेवूनच झुकायचो.  बऱ्याच वेळेला भिंतीचा चुना चड्डीला लागून ती पांढरी व्हायची, पण ती पिवळी झाली नाही याचा रास्त अभिमान वाटायचा. डरकाळी फोडणारा वाघ झाला नाहीस तरी हरकत नाही पण कुणाच्या ताटाखालचे मांजर होऊ नकोस असं आमचे पिताश्री म्हणायचे. स्वाभिमानाच्या बरोबर असावी लागते ती डरकाळी. मी एकदा त्यांना वाघासारखी डरकाळी फोडून दाखवली होती. ते क्षणभर स्तब्ध झाले होते आणि त्यानंतर त्यांनी ते विधान केले होते. वाघासारखी डरकाळी फोडायला डायरेक्ट पोटातून ताकद लावावी लागते याचा अनुभव मी घेतला होता. त्याचकाळी वर्गात न्यूटनचा तिसरा नियम शिकवत होते तोही या दुर्दैवी प्रात्यक्षिकातून अचानक समजला. मग मी स्वत: गपचूप चड्डी धुवून गच्चीवर वाळत घातली होती आणि तिथेच वाळत टाकलेला पंचा कमरेला गुंडाळून तापलेल्या सिमेंटवर शेक घेत बसून राहिलो होतो. पुढे मग काही वर्षे वाघाच्या पिंजऱ्यासमोर बसवून त्याची डरकाळी कशी, दिसणे कसे, चालणे कसे हे पाहण्याची तपश्चर्या करण्याची आज्ञा मिळाली. आमच्या घरात वाघाचा मोठा फोटो होता. तो मी न्हेमी पाहत असे, त्यामुळे वाघाची भीती वाटायचे कारण नाही असं मी स्वत:ला समजावत होतो. आता मुंबईत खरा वाघ कुठून आणणार? आम्ही मग भायखळ्याला राणीच्या बागेत गेलो. तिथे वाघ होता. पण तो आमच्यापेक्षा स्वाभिमानी निघाला. आम्ही दोन तास त्याला डरकाळी फोडायला लावण्यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न केले. सुरुवातीची काही मिनिटे त्याने कुतूहलाने आमच्याकडे पाहिले. आम्ही लांबून वेडीवाकडी तोंडे करणे, आवाज करणे, त्याला अपशब्द बोलणे इत्यादी चेष्टा केल्या. पण तो अमराठी वाघ असावा. आमच्या अस्सल मराठी शिव्या त्याला कळल्या नसाव्यात. त्याने एक भली मोठी जांभई दिली आणि आपले पुढचे पंजे चाटण्याचे महत्वाचे काम चालू ठेवले. मोठे झालो की उत्तरेतील पट्टेरी वाघ नकोत, आमच्या सह्याद्रितीलच हवेत अशी मागणी करायची याची मानसिक नोंद करून ठेवली. चूप बसणारा कसला आलाय वाघ? वाघाला कसं सारख्या डरकाळ्या फोडता आल्या पायजेत. दिवसा, रात्री कधीही तोंड तयार पायजे. शिमग्यातल्या वाघासारखं नको.

हळूहळू आमच्यातील वाघ जागा होतोय याची जाणीव आम्हाला वयाच्या पंधराव्या वर्षीच आली. इयत्ता तिसरीपासून आमच्याबरोबर एकत्र कॉपी, आपलं, अभ्यास करणारा आमचा परम मित्र व्यंकू, गुपचूप परस्पर २१ अपेक्षित आणून वाचतो आहे याची खबर आम्हांस लागली. आमच्यातील वाघ गप्प कसा बसणार? स्वाभिमान फुरफुरू लागला, चष्मा रागाने वाफाळला. चष्मा वाफाळला की आम्हाला पुढचे काही दिसत नाही. आणि चष्मा काढला की पाच फुटाच्या पलीकडले दिसत नाही. "व्यंक्या, समजतोस काय तू स्वत:ला?" अशी आम्ही डरकाळी फोडली. आवाज थोडासा चिरकला, पण हरकत नाही, भावना नक्कीच पोचल्या. सकाळी पाच वाजता उठून डरकाळीचा रियाज करायला हवा असे मनाशी ठरवले. आमचे चुलतबंधू पलीकडच्या खोलीत रियाज करत असायचे. पण त्यांच्या डरकाळ्या नसायच्या. ते खर्जात गुरगुरण्याचा अभ्यास करायचे. अधूनमधून लाकडावर काहीतरी खरवडल्याचाही आवाज यायचा. बहुधा आवाजाबरोबर नख्यांना धार लावायचा सराव करत असावेत. करूदे. आमची डरकाळी उद्या ऐकू आली की पाचावर धारण बसेल त्याची. मग दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे पाच वाजता उठून आम्ही डरकाळीचा तीव्र स्वर लावला तर आमचा कुत्रा बाहेर दिवाणखान्यात भुंकू लागला. आमच्याकडे पाच मांजरे आहेत. ती मानेवरील केस पिंजारून पाठीची कमान करून आमच्या अंगावर चाल करून येऊ लागली. पाळीव प्राणी ते. त्यांनी आयुष्यात कधी खरा वाघ बघितलेला नसल्याने त्याची भीती वाटत नाही. त्यामुळे त्यांना आम्ही माफ केले. पण मातोश्री, पिताश्री दोघेही खोलीत आले आणि आमची हजेरी घेऊ लागले. मांसाहेबांना आमच्या प्रकृतीची फार चिंता. त्यामुळे आम्ही जेवल्यानंतर एक ढेकर जरी जास्त दिली तर दोन हवाबाण हरडे हातावर ठेवत असत. आमच्या अवेळी रियाजाच्या आवाजामुळे ते दोघे घाबरून गेले होते. त्यांना मी रियाजाचे कारण सांगितले. त्यांच्या नजरेत कौतुक होते की कीव ते समजले नाही. "ठीक आहे, करा रियाज. आवाज फुटायचे वयच आहे तुमचे. सध्या रेकण्यासारखे वाटत असले तरी हळूहळू होईल तयार. आपला बाणा आणि स्वाभिमान त्यातून व्यक्त झाला पाहिजे एवढे पहा." असे पिताश्री म्हणाले. मी त्यांच्याकडे पलीकडून गुरगुरण्याचा आवाज येतो त्याची तक्रार केली. त्याने माझे चित्त विचलित होते. तेव्हा ते म्हणाले,"इतरांच्या डरकाळ्यात, गुरगुरण्यात आपली डरकाळी उठून ऐकू आली पाहिजे. तेव्हा तक्रार न करता रियाज कर." मग मी हेडफोन लावून रियाज करू लागलो. इतरांनी कितीही बोंबलले तरी मला ऐकू येत नसे.

पिताश्रींचे एक मित्र आहेत. त्यांना शिकारीची आवड आहे. मलाही शिकारीला जायचं होतं. मी म्हणालो, आता मला डरकाळी छान फोडता येते. पूर्वी आमचा कुत्रा पण भीत नसे, आता तोही घाबरू लागला आहे. मी डरकाळी फोडली की दिवाणखान्यातून उठून चक्क बाहेर जाऊन बसतो. भित्रा लेकाचा. मला तुमच्याबरोबर शिकारीला यायचं आहे. त्यांनी मला सांगितले वाघ होऊन स्वत: शिकार करायची, डरकाळ्या फोडायच्या, जखमी झालं की स्वत:च्या जखमा चाटत बसायचं हे काही खरं नाही. त्यापेक्षा तरस व्हावं. वाघाला, सिंहाला शिकार करू द्यावी. मग आपण हळूच कडेकडेने तिरकं तिरकं चालत यायचं. आपलं एकूण खोकड ध्यान, दिसणारे सुळे असं  सगळं अमंगळ अभद्र दर्शन झालं की वाघ सिंहांसारखे प्राणीसुद्धा किळसयुक्त भीतीने बाजूला होतात. मग आपण हॅः हॅः हॅः असं निर्लज्ज हास्य करायचं आणि ती शिकार लांबवायची. इंटरेस्टिंग. पिताश्रींना हे कधीच पटलं नसतं. म्हणून त्यांना विचारायला गेलोच नाही. पण, इंटरेस्टिंग आहे, व्हेरी इंटरेस्टिंग. पण मला ओरडायला, म्हंजे, मला म्हणायचं होतं डरकाळ्या फोडायला पण आवडतं. काकांना विचारलं तरस डरकाळ्या फोडतं का? तर म्हणाले, तरसाला आयती शिकार महत्वाची असते. आधीच डरकाळ्या फोडल्या तर गपचूप डल्ला कसा मारता येईल? ह्या:! पुचाट तरस! ते काही नाही, मला ओरडायला आवडतं आणि आयती शिकारपण आवडते. काकांना मी खूप आवडतो. ते म्हणाले काही हरकत नाही. तुला डरकाळ्या फोडायला आवडतं ना? खुशाल घसा साफ करून घे. सावज सापडलं की मी तरसासारखा बरोबर येतो तिथे. आपण दोघं शिकार वाटून घेऊ. इंटरेस्टिंग. व्हेरी इंटरेस्टिंग. काका भारीच आहेत. मला खूप आवडतात ते. कित्ती ज्ञान आहे त्यांच्या डोक्यात. आमच्या पिताश्रींनी त्यांना इतके दिवस घरात का येऊ दिलं नाही बरं? 

Thursday, October 16, 2014

सही रे सही

हे मुख्यमंत्रीपद म्हंजे निस्ता वैताग झाला हाहे. तीन चार वर्षांपूर्वी सहीसाठी पेन उचललं की हात थरथरायला लागायला सुरुवात झाली. हातपाय थरथरणे तसे नवीन नव्हते. दिल्लीच्या हवेनं तसं होतं आम्हाला. मुंबईत आलो की गाडी येकदम पैल्या किकला ष्टार्ट. पन हे नवीन होतं. मुंबईतल्या मुंबईत हात थरथरला आन आमी चपापलो. च्या बायली, ह्ये काय आणि नवीन दुखणं? कधी कधी न्हेमीप्रमाणे निमूटपणे खुर्चीत चीप बसलो आसताना येकदम मानेवरचे केस हुबे ऱ्हातात. घाम फुटतो. आपल्याकडे कुणीतरी रोखून बघतं आहे आसं वाटू लागतं. आयला वास्तूत काय दोषबिष हाय का काय आसं वाटू लागलं. आमचे शेक्रेटरी साहेब म्हणू लागले, वास्तूतच बिघाड हाहे. त्यांनीच मग कोणी फेंगशुई एक्सपर्ट शोधून आणला. त्याने नीट पाहणी केली. आमच्या टेबलाखाली जाऊन पाहिले, खिडकीतून बाहेर काय काय दिसते ते पाहिले. खोलीतील फ्यानची आणि आमची उंची मोजली, टेबलावरील पाण्याच्या तांब्याभांड्याचे आमच्यापासूनचे अंतर, खुर्चीची आणि आमच्या तदनुषंगिक भूभागाची रुंदी इत्यादि असे सर्व मोजले. सगळे "वारा-पाणी" शास्त्रात फिट्ट बसत होते. तरीही तुमची "ची" खिडकीतून बाहेर वाहून जात आहे, टेबलावरचा तांब्याऐवजी त्यावर मोठा माठ ठेवा. पाणी "ची"ला धरून ठेवते. असं काहीबाही सांगून फुक्कट माझ्या खिशातून धाहजार रुपये काढून घेऊन गेला. त्याचीच काय, त्याच्या ह्याची आणि त्याची "ची" भायेर  काढावीशी वाटत होती. पुन्हा खुर्चीवर बसलो आणि विचार करू लागलो. फुड्यात फायली पडलेल्या. आपल्याला ओसीडी हाहे, त्यामुळे येकपण इकडची तिकडे झालेली चालत नाही आपल्याला. रामू शिपायालापण सांगून ठेवलं हाहे, येकदम हलक्या हातानं फडकं मारत जा म्हणून. रामू निर्विकारपणे काम करतो. खोलीत जे जे अचल म्हणून हाहे त्या सर्वांवर त्याचं फडकं सारख्याच प्रेमानं फिरतं. येकदा दोनदा तर मी टेबलावर डोकं ठेवून चिंतन करत बसलो होतो तर माझ्यावरनंपण फिरलं. मी डचकून उठलो तर मला म्हन्तो,"सायेब, माफ करा, काखेत कोळीष्टकं दिसली म्हणून फडकं मारलं. मधनं मधनं हालत चला, मंत्रालयातले कोळी मंत्र्यांपेक्षा जास्त काम करत्यात. जणू काही बिल्डरच. जरा जागा खाली पडलेली दिसली की घ्येतलाच ताबा. आपण सोच्चतेचे भोक्ते का काय आहात म्हनून म्हनतो." आगाऊ लेकाचा. असाच खिन्न बसलो होतो. धीर करून समोरच्या फायलींच्या ढिगावर नजर टाकली. हातातून बारीक कळ गेली. त्याकडे दुर्लक्ष करून वरची फाईल उचलली मात्र, मानेवरचे केस हुबे ऱ्हायले. घाम फुटला. तरी जोर करून फाईल उघडली. पांडुरंग हरी! वासुदेव हरी! पयल्याच पानावर हुंच बिल्डींगचं चित्र. आता आमी काय बिल्डिंगा पाह्यला न्हाईत का? याच बिल्डींगचं एवढं भ्या का वाटावं? उठून खुर्चीच्या मागल्या भिंतीवर आमच्या दैवताचे फोटो लावले होते त्यासमोर उदबत्ती लावली, नमस्कार केला. दैवत लई कडक. एक दिवस उदबत्ती लावली न्हाई तर दुसऱ्या दिवसाला त्याचा वाईट अनुभव येतो. दिवसभर कंबर धरल्यासारखं होतं, वाकून चालावं लागतं. त्यामुळं ठरवून टाकलं हाहे, प्रत्येक फायलीला एक उदबत्ती लावायची. उदबत्त्यासाठी सीलबंद निविदा सूचनाच मागवल्या मग. एकदम दोन टन घेऊन ठेवल्या आहेत. त्या टेंडरची फाईलपण इथंच पडली आहे. एखाद दिवस त्यावरही सही करावी म्हणतो.

तेवढ्यात रामू आत आला. मी चटशिरी उठलो. एक नजर त्याच्या हातातील फडक्यावर ठेवून हात पाय ताणून अंग मोकळं करू लागलो. रामू म्हणाला,"सायेब, येक सांगतो, आपल्या अदुगर ते चव्हाणसायेब होते. त्यांना आसला तुमच्यासारका त्रास होत न्हवता. ते सकाळी केबिनमध्ये गेल्या गेल्या सह्या करत सुटायचे. मदी एकदा मी टेबलावर फडका मारत हुतो तर फडक्यावरबी सही मारून टाकली. त्यांचा आदर्श आपन सर्व्यांनी ठेवला पायजे. साहेब, ते फडकं मी जपून ठेवलं आहे." मी म्हणालो,"राम्या लेका, चोरून ऐकतोस वाटतं आतली बोलणी! आणि तुझे सल्ले तुझ्याजवळ ठेव, आगाऊ कुठला!". तडकलोच होतो. पुन्ना नजर त्या फायलीवर पडली. कसली उच बिल्डींग बांधली हो या लोकांनी! जरा नियमबियम पाळले आस्ते तर काय बिघडत हुतं का? म्हटलं न्हेमीप्रमाणे येक कमिटी बसवावी. जरा धुरळा खाली बसला की कमिटी कुणाच्या लक्षात राहतीय. कमिटीतली मेंबरं पन जरा सरकारी भत्ते खाऊन निवांत बसतील. झालं उलटंच. मायला भलतीच काम करणारी कमिटी निघाली. अशोकाला शोक करायला लावणारा रिपोर्ट देऊन बसली. तरी मी तो रिपोर्ट नाकारला. भिंतीच्या भेगा बुजवायला गवंडी बोलवावा आन त्यानं भेगा तर बुजवणं लांबच, पण पायाच कसा बिघाडलेला हाये ते सांगायचं त्यातली गत झाली. आता भेगा बुजवायच्या का पाया खणायचा? दिल्लीहून मालकांचा फोन, म्हणले पायाच दुरुस्त करून घ्या. आता पाया दुरुस्त करायचा म्हणजे आक्खं घर उतरवावं लागणार. हे आसं चालू आसताना दुसरी फाईल उरावर पडली. त्यात आमच्या धरणवाल्यांचा फोटो. पयले वाटलं चुकून येरवड्याची फाईल चुकून आमच्याकडं आली का काय? काळा गॉगल, काळापांढरा आडव्या पट्ट्यांचा टीशर्ट घातलेला फोटो, जणू काय दरोड्याच्या तयारीत असलेला एखादा "बाळ्या पारधी"च. क्षणभर वळाखलंच नाही. मग रिपोर्टमध्ये घपल्याची रकम पाह्यली आन म्हटलं हे गरिबीनं गांजलेल्या साध्या दरोडेखोराचं काम न्हाई. आन वळाखच पटली. आमच्या अवतीभवतीचीच मंडळी ही! आला का तिडा? कारवाई करावी तर पार्श्वभाग चिकटलेले जुळे भाऊ आमी. त्यांना हितं थितं येकी करायची लई घान सवय. पन आमी पडलो सोच्चतेवाले. त्यांनी तंगडी वर केली की पानी वतायला आमी तांब्या घिऊन न्हेमी तयार. न्हाई तर हे फुडं जानार आणि आमी आमचा पाय त्यांच्या "संचितात" भरून घेणार. वर यांचे साहेब आमाला सांगणार, तुमाला कुणी सांगितलं पाणी वता म्हणून, तुमी पन मारा धार. तुमाला नसंल इच्छा तर आमी आमच्या "स्वबळा"वर कुटं पण धार मारू. म्हाराष्ट्रातल्या सगळ्या भिंती पडल्या आहेत त्यासाठी. फक्त ती पर्वाची गारपीट तेवढी नैसर्गिक होती, त्यात आमचा काही "हातभार" नव्हता. शिवाय किंगफिशर कृपेने आमी रेग्युलर किडनी ओवरहॉल करतो, आमाला "खड्याचा" त्रास न्हाई. सही करायला हात उचललेला खाली ठेवला. पुन्ना तो भास झाला. कुणीतरी मागून पाहतं आहे. मान वळवून पाह्यलं तर, भिंतीवर न्हेमीचे तीन गांधी लटकलेले होते. महात्मा गांधींच्या फोटोकडं पाह्यलं की सही करावीशी वाटायची. पन हात उचलला की म्याडम फोटोतून भायेर येताहेत आसा भास व्हायचा. मग खुर्चीवर चढून म्याडमच्या फोटोवरचे हार काढून महात्मा गांधींच्या फोटोवर चढवले. इतके की सगळा फोटोच झाकला गेला. येकदम जिवाला बरं वाटलं. उगाच सदसदविवेकबुद्धीचे अवेळी झटके आता बंद होतील असं वाटलं. तडक दोनी फायली उचलल्या आणि "विचाराधीन" असा शेरा मारून ढिगाऱ्याच्या तळाशी टाकून दिल्या. आजून दोन-तीनच दिवस ऱ्हायले आहेत आमचे हितं. साताऱ्याला फोन करून आमी एकोणीसलाच रात्री धाच्या यष्टीनं येतो आहोत, आमची खोली सोच्च करून ठेवा, असा निरोप दिला आहे. हो, आपल्याला सोच्चतेचं लैच वेड आहे.