Thursday, November 13, 2014

हरीभौंची गाथा

जेव्हापासून बातमी फुटली की अध्यक्षपदाचे उमेदवार आमचे हरिभौ आहेत तेव्हापासून आम्ही हरीभौंच्या चेहऱ्याचे बारीक निरीक्षण करत होतो. धावीची परीक्षा दिल्यानंतर प्रत्यक्षात बारावीची मार्कशीट हातात पडावी तसे ते गोंधळले होते. म्हणूनच कदाचित ते धावीनंतर शाळाकॉलेजसारख्या फुक्कट फालतू गोष्टींत अडकून पडले नसावेत. ते अजिजीनं मुत्सद्दी नानांना सांगत होते, आहो आसं करू नका, तिकीट घेताना आसलं काय ठरलं नव्हतं. आपन गरीब मानूस है. उगा कुठं नऊधा कोटीवाला मी. ऱ्हाऊ द्या मला स्थानिक पातळीचा आमदार. आमदार निधीतला येक रुपायापण नाही पायला अजून आन मी विधानसभेचा अध्यक्ष? म्हंजे आमचा आमदार निधी गेला का आता? नका नाना, नका गरीबाच्या पोटावर पाय आणू! नानांनी त्यांची समजूत काढली होती. "हरिभौ, तुम्ही आमचे बाजीप्रभू आहात असे समजा! गडाभोवती वेढा पडला आहे. आज आम्ही या वेढ्यातून निसटणार. शत्रू कोळसुंद्यांच्या टोळीप्रमाणे आमच्या मागे लागणार. तुम्ही खिंड लढवा. तासाभराने उगीचच तोफांचे बार करा. आम्ही इथंच कुठं तरी लपून राहू. वेढा घातलेले चौथी पाचवीच्या इतिहासापलीकडे काही शिकलेले नाहीत. तोफांचे बार ऐकून "आयला म्हाराज निसटून पोचलं वाटतं विशाळगडावर, आता बोंबलायला कशाला लढायचं हो फुक्काट" आसं म्हणून वेढा उठवून पुढच्या किल्ल्याला वेढा घालायला निघून जातील. आणि हरिभौ, आज तुम्ही इतिहासाचं एक पान लिहिणार आहात. मुत्सद्दी नानांचा चेहरा खुलला होता. हां! ह्याला म्हणतात मुत्सद्देगिरी! हरीभौंचा उतरलेला चेहरा पाहून ते घाईघाईने म्हणाले,"अहो, म्हंजे खरोखरचं एक पान लिहायचं नाही हो. नुसती एक प्रतिमा दिली, प्रसंगाचं महत्व अधोरेखित करण्यासाठी. लिहायचं म्हटलं की अंगावर काटा येतो काहो? खिशाला छान दोन दोन पेनं लावून आलाय की हो!" इतिहासाचं पान लिहायचं वगैरे ऐकून हरीभौंचा उतरलेला चेहरा "अधोरेखित, प्रतिमा" असले मुत्सद्दी शब्द ऐकून आणखीच उतरला. हे असले जडजड शब्द कधी कानावर पडणार नाहीत या समजुतीनं या धंद्यात पडलो, आणि आता जोवर हा मसाले भात अन बटाट्याची भाजी खुर्चीवर आहे तोवर नुसत्या अलंकारिक उपमाच ऐकायच्या या कल्पनेने ते शहारले.

एरवी आम्ही हरीभौंना रस्त्यात पाहिलं असतं तर गडी पंढरपुरच्या वारीतून वाट चुकून मागंच राहिलाय असंच वाटलं असतं. ती छपरी मिशी, ती डोक्याच्या अक्षाशी पंधरा अंशाचा कोन करून ठेवलेली गांधी टोपी, तो घातलेला हातातला गंडा, गळ्यात न दिसणारी तुळशीची माळ, धावी पास पण इद्यापीठ रिटर्न छाप चष्मा. तोंड उघडलं तर फक्त "जै जै रामकृष्ण हारी"च भायेर पडणार असे यकदम ओरिजिणल अष्टसात्विक भाव चेहऱ्यावर. आजवर तसे भाव पैले तुकाराम,  त्यानंतर विष्णुपंत पागनीस आणि त्यानंतर थेट हरिभौ एवढ्यांच्याच चेहऱ्यावर पाहिले आहेत. विधानसभेचे शेत राखायला बसले आणि समाधी लागली. विरोधकांच्या आरोळ्यांनी समाधी भंग झाल्यावरच त्यांनी डोळे उघडले. मुत्सद्दी नानांचा डाव यशस्वी झाला हे त्यांच्या ध्यानात आले. पण विरोधक सोडत नव्हते. हरीभौंनी उत्तम मन:शांती दाखवली. विरोधक निघून गेल्यावर आम्हाला ते हळूच म्हणाले,"खरं म्हंजे त्यांनी पोल उशिरा मागितला. प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावं,  हे वाक्य उच्चारताच त्यांनी पोल मागायला पाहिजे होता. तो त्यांनी मागितला नाही. माझं हे दिल्यानंतर, म्हणजे रूलिंग दिल्यांनतर, मी पुढचा विषय पुकारल्यावर त्यांनी पोलची मागणी केली." हे शब्द ऐकताना मला साक्षात प्रतितुकाराम विष्णुपंतांचीच आठवण आली. शेत राखायला गेले आणि नुसतेच "आधी बीज एकले" गाणे म्हणत बसले. त्याचा फायदा घेऊन मंबाजीने शेतात बैल घुसवले. समोर बैल शेताची नासाडी करत आहेत त्याकडे विष्णुपंतांचे लक्षच नाही. गाणे संपता संपता ज्ञानबा शेतकरी आला तेव्हाही हे कसा सम गाठून आला अशा कौतुकाने त्याच्याकडेच पाहत होते. ज्ञानबा संतापाने फुटला आणि त्यांना बोल लावू लागला. तेव्हाही हे त्याच्याकडे अतीव प्रेमानेच पाहत होते. हताश होऊन ज्ञानबा थांबला आणि खुलाशाची वाट पाहू लागला. तर विष्णुपंतांनी अत्यंत थंडपणे कोवळ्या नरम आवाजात,"इतकं संतापायला काय झालं ज्ञानबा?" एवढंच विचारलं. ज्ञानोबाला संतापानं झीट यायचंच बाकी राहिलं. "अरे संतापायला काय झालं म्हणून विचारतोस? बघ, बघ, निम्मं अधिक शेत खाऊन टाकलंय आणि उलट मलाच विचारतोस संतापायला काय झालं?" यावर विष्णुपंत "आरे आरे आरे! पांडुरंगा!" एवढं म्हणून पुन्हा प्रेमाने त्याच्याकडे पाहू लागले. अगदी तस्सेच भाव आम्ही हरीभौंच्या प्रसन्न वदनी पाहिले. तेवढ्यात व्याघ्रवदन शुंभराजे तेथे आलेच आणि "बघा मी सांगितलं नव्हतं तुम्हाला? यांच्या नादी लागलात आणि शेताची नासाडी करून घेतलीत." असं म्हणून "हिंमत असल्यास पुन्हा बहुमत सिद्ध करा" अशा घोषणा देऊ लागले. पुन्हा एकदा हरीभौंनी उत्तम मानसिक समतोल दाखवला आणि "येकदा ठराव पारित झाल्यावर पुन्हा मागे जायची प्रथा नाही पांडुरंगा!" असे त्यांना सांगितले. पुढे शुंभराजे काही बोलणार तोच त्यांनी तावडेबुवांना "जरा काळी एक द्या" असे सांगून "खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी" हे पद सुरू केले. तावडेबुवांनी पट्टी तर लावून धरलीच वर "ना धरी, ना धरी" असे आळवून उत्तम साथ केली. हे कीर्तन चालू असताना मंबाजी छान बावनखणीत "माझ्याकडे बघून डोळा बारीक करून" ही लावणी ऐकत बसले होते.

या कथेचे खऱ्या तुकारामाशी साम्य इथेच संपते. पुढे या कथेतील तुकाराम मंबाजीच्या मांडीला मांडी लावून बसतो. त्याच्या काळ्या कर्तृत्वाला आध्यात्मिक संरक्षण देतो. मंबाजी स्वत:च त्याला मंदिरात नेऊन त्याची प्रतिष्ठापना करतो. वास्तविक तुकारामाने मंबाजीचे शंभर अपराध नोंदलेली गाथा लिहिली आहे. म्हणून जनांत त्याला आधार आहे. पण मंबाजीने दम दिला आहे,"तुक्या! बऱ्या बोलाने ती गाथा तूच बुडव नाही तर तुझ्या चिपळ्या आणि मुंडासं काही देवळात रहात नाही. आणि हे देऊळही रहात नाही." या तुकारामाला देवळातील छान गुळगुळीत फरशी बुडाला लागल्यावर गारेगार वाटले आहे. कित्येक वर्षांनी बूड असे स्थिर आणि गार झाले आहे. पुन्हा बाहेर उन्हांत बसायचे? नको नको! जनांस काय, उन्हातान्हाची सवे आहे. घेतील त्यांचे ते पाहून. अंमळ येथेच डेरा ठोकावा. फार तर काय होईल? तो गाभाऱ्यातील विठोबा कमरेवर हात ठेवून रागेजून पाहील. अगदीच चिडीस आला तर पायाखालील वीट हातात घेऊन आपल्यास फेकून मारील. रखुमाई जेवू घालणार नाही. मग आपण "तुझेच लेकरू गा मी" असे म्हणून पुन्हा त्यांच्या पायावर पडू. मग तो करुणानिधि आपल्याला पुन्हा आपलं म्हणेल. मग ती गाथा तुकाराम हळूच इंद्रायणीत बुडवतो. केवळ देऊळ शाबूत राहावे म्हणून हो! केवळ देऊळ शाबूत राहावे म्हणून! पांडुरंग, पांडुरंग!

No comments:

Post a Comment