Thursday, July 3, 2014

छग्गूदादा बाहुबली

छग्गूदादा प्येटला. निसता प्येटला न्हाई तर भुईनळ्यावाणी प्येटला. मंत्रीमंडळाच्या बैठकीत सुरसुर करून गरागरा फिरला. कुणाच्या धोतरात तर कुणाच्या इजारीत ठिणग्या उडाल्या. येरवी ढेरीवर हात फिरवत, काडीनं दात कोरत, नुकत्याच हाणलेल्या बिर्याणीची चव डोळे मिटून आठवत, अर्धवट झोपेत जनकल्याणाचे ठराव ऐकणारी ही मेंबरं टाण उडाली आन पळता भुई थोडी झाली. कुणी येकदम खुर्चीवरच चढून मांडी घालून बसलं, तर कुणी ,"आं? काय झालं? हायकमांडनं निरीक्षकं पाठवली व्हय? मायला ह्ये हाय कमांड म्हंजे कमांड हाय आन आमची हाय हाय!" असं कायबाय बोलत इकडंतिकडं भेदरून पाहत होती. हितं छग्गूदादा थैमान घालतेला. "हे काय सरकार हाय का गवरमेंट? लोकांची कामं करत न्हाई समजू शकतो मी. तुमचा हक्कच हाये तो. आपन सोता तो हक्क बजावलेला हाये. रोज कोन ना कोन तरी येऊन माझं पन डोकं खातो. परतेक वेळेला मी सांगतो आरे मी सार्वजनिक बांधकाम मंत्री हाये. सार्वजनिक हे बांधकामाचं इशेषण झालं, माझं नाही. तवा काम न करणं मी समजू शकतो. आरे पन तुमी माजंपन काम करायला न्हाई म्हनता? या छग्गूदादाला? काम तुमच्याच फायद्याचं हाये. आन निवडणुकांच्या टायमाला आसली कामं न्हाई करायची तर कवा करायची?" छग्गूदादा फुटाण्यावाणी फुटत होता. मराठा समाजाला आरक्षण डिक्लेर झालं आणि आरक्षणाच्या कुरणात चरणारं जित्राप येकदम भानावर आलं. आयला आता ह्ये पन इथं चरणार व्ह्य रं? मंग आमचं काय होयाचं हो? आमची मतं इचारायला कोन येतंय का न्हाय आता? आशी चर्चा सुरु झाली आन छग्गूदादाच्या डोक्यात येकदम टयूबलाईट पेटली. ह्योच टाईम हाये. आणि इतकी वर्षं हृदयात जपून ठेवलेला इषय उफाळून आला. विद्यापीठाचा आन छग्गूदादाचा संबंद फक्त नावापुरता. म्हंजे खरंच नावापुरता. दिसलं विद्यापीठ की बदल नाव हा सगळ्याच टोपीकुमारांचा छंद. छग्गूदादाच्या हाताला येकपण विद्यापीठ लागू देत नव्हते. शेवटी इद्यापीठ न्हाई तर न्हाई, निदान शाळांचं तरी नामांतर करावं का असा पन विचार त्याच्या मनात आला होता. नूमवि किंवा पार्ले टिळक या दोन नावांपर्यंत तो येऊन पोचला होता. तेवढ्यात येकदा आसंच पुण्यातून फिरताना पुणे विद्यापीठाचा बोर्ड दिसला. आन त्याला वाटलं आयला ह्ये विद्यापीठ राह्यलंच की. मग त्याला आशीपन शंका आली की मायला हे बदलूनच पुणे विद्यापीठ झालं नसंल ना? उगाच मागणी करायची आन लोकांनी म्हणायचं काय दर दोन वर्षांनी बदलता काय? झेपत नसेल तर इतकी पिऊ नये माणसानं. बरं, चौकशीसाठी आत जावं तर टेन्शन. ल्हानपणापासूनच शिक्षानाशी संबंधित काही आसलं की छग्गूदादाला टेन्शानच येयाचं. शिक्षान कमी आनि शिक्षा जास्त आसा प्रकार होता. त्यामुळंच शाळा कॉलेजांची नावं बदलण्यामागे एक आसुरी आनंदपन भेटत असावा. विद्यापीठाचं नाव बदलायचं आसेल तर आनंद डब्बलच. छग्गूदादाचा एक पाव्हणा विद्यापीठात शिपाई म्हणून लागला होता. छग्गूनंच लावला होता. मग पाव्हण्यानंच म्हाईती आणली, ऑल क्लिअर, आजून काही कुणी नाव बदलल्यालं न्हाई, तुमी खुशाल मागणी करा.

मग आता नाव न बदलल्यालं विद्यापीठ तर घावलं, पन नाव तरी कुणाचं देयाचं हा प्रश्न हुताच. आयला बामणांचं राजकारण बरं, काई बी क्येलं तरी मत दुसऱ्यालाच देत्यात. आपल्याकडं ओबीसी म्हटलं तरी त्यात बी लई पोटजाती. येका पोटजातीतल्या कुणाचं नाव सुचवावं तर बाकीच्या पन्नास पोटजाती निवडणुका आल्या म्हंजे आपल्या पोटावर पाय ठेवणार. पुरुषाचं नाव द्यावं तर बायकांनी म्हणावं आमी काय शिकत न्हाय व्हय? बाईचं नाव दिलं तर कुणी उघड विरोध करीत न्हाई. हां ह्येच बरं. नामांतराला कुणी विरोध केलाच तर त्यालाच जातीयवादी म्हटलं की मग कुनी काय म्हनत न्हाई. तसे काही शाने आसतातच. छग्गूदादानं नाव पन आसं निवडलं की विरोध करायचं कामच न्हाई. म्हाराष्ट्रात येक बरं हाये, शिवाजी म्हाराज, फुले, आंबेडकर आशी नावं घेतली की काय पण करायला मोकळीक. मग पर्वा सभेत छग्गूदादाला कुणी तरी प्रश्न इचारला, आरे पन कशाला नाव बदलायचं नाव? आता तुझ्या आईबापसानं प्रेमानं नाव छगन ठेवलं. आता लोकांनी काय पण आर्थ काढला तरी तेंनी नाव बदाललं का? न्हाई न्हवं? तुमी त्यांचे छगन आनि आमचे छग्गूदादाच राह्यला. नाव बदाललं म्हणून तुमची ही छपरी मिशी जानार न्हाई किंवा हानवटी मानेतून भायेर येनार न्हाई. मग आसं आसतांना नाव का बदलायचं हो? छग्गूदादा आपल्या गटाण्या डोळ्यांनी वटारून तेच्याकडं पहात राह्यला. परस्परच उचलला कुणीतरी त्याला आन सभा फुडं सुरु राहिली. लोक कायपण म्हणूदयात, छग्गूदादानं कुणाच्या बापाचं आईकलं न्हाई तर या लोकांचं कसकाय आईकील? मंग रीतसर मागणीच केली. इद्यापिठात अर्जी गेली. तिथं तर काय सगळीच सरकारी. कुणी तरी आर्ज दाखल करून घेतला. नावबदल या खात्याच्या फायलीत टाकून दिला. महिने वर्षं गेली. त्यावर रीतसर धूळ चढली. आन आता छग्गूदादाला त्याची आठवण झाल्यावर ती फाईल काढली गेली. विद्यापीठातले साहेब म्हणले, काय काढलं हो? इद्यार्थ्याचं नाव बदलायचं तर आधी पयले मयत नसल्याचा दाखला जोडा, रेशन कार्डाची झेरॉक्स जोडा. मग त्यांना कुणीतरी सांगितलं, अहो विद्यार्थ्याचं नाव नाही, आपल्या इद्द्यापीठाचंच बदलतायत. आणि त्यांच्या कानात हळूच छग्गूदादा कोन हायेत ते सांगितलं. आपलाच मानूस हाये हे बगून सायबांनी ठराव चर्चेला घेऊन पास करून टाकतो अशी हमी दिली. आन तसा पास पण करून टाकला.

छग्गूदादा आता तडतडत होते. "आणि येवढा सगळा जुगाड करून झाल्यावर खुद्द मंत्रीमंडळात "हां, बघू, तुमच्या साहेबांशी बोलून निर्णय घेऊ" आसं म्हणणं म्हंजे… आमच्या सायबांनी आरक्षण डिक्लेर केलं तेव्हा आमाला विचारलं होतं का? लोकसभेत पक्षाचं धोतर फिटलं आन सायबांना काय करू आन काय नको आसं झालं. मंत्रीपदं काय दिली, उलटापालट काय केली. ते कमी पडल आसं वाटून आरक्षण काय दिलं. मालक सगळ्या जिमिनींचा मताविना भिकारी आशी अवस्था झाली त्यांची. तुमी तुमचं मतांचं आरक्षण बगणार आणि आमि बगायला गेलं की, चर्चा करतो, बगतो, सायबांचा मूड आसला तर विचारतो व्हय? आरं या सायबांचा मूड यायचे दिवस चाळीस वर्षांपूर्वीच संपले. आता ते फक्त सत्ता पाह्यली की मुडात येतात. मग कुणासंगंबी चालतो मूड. मग थितं दाढी काय आन साडी काय. आपन काय साधू संत न्हाई आसं सांगून झाल्यालंच हाये, आता साधूची लावलेली लंगोटीबी कदी सोडत्यात तेच बगतो. आता काय त्यांचं लाजायचं वय ऱ्हायलं न्हाई, लाजवायचं मात्र नक्की आलंय. पन मीबी काय कमी न्हाई. 'राडा' संस्कृतीत वाढलो आपन. आपल्याला नागव्याचं भ्या वाटत न्हाई. तुमी लंगोटी सोडलीत तर आपनपन सोडू. बगु कोन पैला बेशुद्ध पडतो ते. सगळं सोडून देऊ पन विद्यापीठाचं नाव बदलूनच दाखवतो. थांबा! जाता कुठे!" छग्गूदादाला वाटलं आपन सगळं सोडून द्यायची धमकी दिल्यावर तरी मेंबरं ताळ्यावर येतील. पन कुठलं काय. मंत्रीमंडळातली खोंडं ती. लाजत्यात काय ती. शिन्मा चालल्यागत बसून या बाबाचा तमाशा बगत होती. मग छग्गूदादा भडाकला आन म्हनला,"मायला, आत्ताच्या आत्ता नाव बदला, न्हाय तर मी भायेरच जातो. येकदा गेलो तर परत येनार न्हाई बरका. इचारा त्या शिवाजीवाल्यांना. येकदा तेंची धरलेली सुरवार सोडली ती आजवर. आजवर फक्त सायबांच्या प्यांटचा पट्टा धरून ऱ्हायलो. पन आता तेंनीच प्यांट सोडून दिली आन मी नुसता पट्ट्याचं बक्कल घिऊन हुबा हाये. तेवा ते कवाबी सोडून देईन. इचार करा!" कुणी कायच बोललं न्हाई तवा मात्र छग्गूदादा बैठकीतून तडक भायेरच पडला. दोन मिण्ट सगळी शांत बसली आन लगेच फुडच्या ठरावावर बोलू लागली.

नंतर आसं कळलं की छग्गूदादा तरातरा जे भायेर पडले ते रस्त्यावर आल्यावर तेंच्या ध्यानात आलं की आपन सायबांच्या गाडीतून आलो होतो. सायेब तर केवाच निघून गेले. सायेब बरोबर म्हणून पाकीट पन आनलं न्हाई. तेवढ्यात आमचे रामदासजी सायकल घिऊन आले. ते म्हनले, लिफ्ट देऊन नंतर मदेच सोडून देयाचा आणभव कसा आसतो आपल्याला चांगलं म्हाईती हाये. म्हनून आता शेकंडहँड सायकल घेतली आहे. कदीमदी पंमचर होते पन दुसऱ्यावर अवलंबून तरी ऱ्हावं न्हाई लागत. बसा मागं. डब्बलशिट जाऊ. 

No comments:

Post a Comment