Sunday, March 30, 2014

मनाचे(च) श्लोक

।।श्री ।।

मना सज्जना आधि ठरवून घ्यावे
साव बनावे की सावज व्हावे
साव बनल्यास नीती सोडोनी द्यावी
इतर सर्व येरूंनी काष्टी "आम"ची धरावी ।।१।।

ध्यान देऊनी ऐकावे सर्व जनांनी
बोल येथ बोलले खुद्द स्वामी अरविंद यांनी
मेळ येथ घातला सर्व आमजनांचा
करू समूळ नाश कमळ आणि हाताचा ।।२।।

स्वामी म्हणती प्रथम करावी योग्य वेषभूषा
घट्ट धोतराची कास आणि मस्तकी आमरेषा
स्वामींच्या मस्तकी मोरपीस,  भोवती वृद्ध गोपी
मेधा म्हणे मी पण, घालीन आम टोपी ।।३।।

पुढे म्हणती शिष्यहो, लक्ष्य आपुले दिल्ली
हसती दीक्षितकुलोत्पन्न शीला, उडविती खिल्ली
आम आदमी असे म्हणोन राहती खुशालचित्ती
प्रात:प्रात:काळी बातमी, गेली दिल्ली, राहिली आम्लपित्ती ।।४।।

उधाणला वारू स्वामी स्मितहास्य करिती
शिष्यजने आले बळ विकट हास्य दाविती
रामराज्य आलेच गा, उद्गारले स्वये अरविंद
नगरी नृत्य गायन, सकल जन धुंदधुंद ।।५।।

हर हर शिंकली माशि, जाहला दुग्धमक्षिकापात
अडविले लोकपाल दुष्ट कमळ आणि हात
भृकुटी ताठिल्या, स्वामींस जाहला अतिक्लेश
धरले धरणे, लोटले अंग धरणीवर, म्हणती सर्वनाश ।।६।।

उभा ठाकला समोरि नमोसुर होवोनीया दत्त
ग्रासिले कमलपुष्पही, संघराष्ट्रही बलहत
स्वामि म्हणे हडबडू नका गडबडू नका
करता आमस्मरण, होईल वाणी हा फुका ।।७।।

म्हणे अरविंद आता येकच डाव
जनेच करावा कमळहाताचा पाडाव
उडवा फेसबुकावर धुरळा, वा टीव्हीवर खुशाल बरळा
जनताच होईल वामनपाद, तुडवाया या हस्तकमळा ।।८।।

इतिश्री 'आम'दासकृतं संकटविरचनं श्रीअरविंद स्तोत्रं संपूर्णं ।।






 

No comments:

Post a Comment