Tuesday, March 18, 2014

कचकड्याचे खेळणे

मफलरधारी बांकेबिहारी राजमान्य राजश्री केजरूमल यांचा अश्वमेधाचा वारू चौखूर उधळतो आहे. परंतु रामराज्याच्या या पाईकाला हे समजत नाही की आपण ज्यावर वारू म्हणून ऐटीत स्वार झालो आहोत ते एक गर्दभराज असून, कॉंग्रेसने सत्तारूपी टमरेल त्याच्या पार्श्वभागी अडकवल्यामुले ते वाट फुटेल तसे उधळले आहे. कदाचित समजतही असेल, पण आपले गाढव भाजप आणि कॉंग्रेसच्या गाढवांपरीस सरस आहे, ते मुळीच भ्रष्टाचारी नाही, वेळप्रसंगी मालकासही सणसणीत लत्ताप्रहार करण्यास मागे पुढे पाहणार नाही याचा अभिमानही वाटत असेल. परंतु हेही खरे की या गाढवाच्या (केवळ  उपमा, केजरूमल यांना उद्देशून नाही याची वाचकांनी नोंद घ्यावी) मागे उभे राहायला भलेभले लोक टाळू लागले आहेत. न जाणो केव्हा आणि कुठे लाथ बसेल!  असो. मुद्दा आहे तो हा की रा रा केजरूपंतांना दालढोकली खाल्ली की अपचन का होते? आपण भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन राजकारणात आलात, मग ज्याच्यावर भ्रष्टाचाराचा कसलाही कलंक नाही अशा मोदींना मध्यवर्ती मुद्दा करून लोकसभेत येण्याची स्वप्ने का पाहता? आणि आलात निवडून खरेच तर मग फारच पंचाईत. दिल्लीत निदान पळून जायचा मार्ग तरी होता. खरं तर तिथेही रडीचाच डाव खेळलात. फास्ट बॉलिंग नको, दोन टप्पी बॉल हवा, बॅट माझी आहे, मला दोन जीवदानं हवीत, असल्या अटी घालून तरीही आऊट झाल्यानं अंपायर चिकीखाऊ म्हणत बॅटसहित पसार झालात. ते जाऊद्या, दिलवाली दिल्ली म्हणून कदाचित माफही करेल. पण राष्ट्रीय मुद्द्यांचं काय? तिथं आपल्या आयआयटीनं काही शिक्षण दिलेलं दिसत नाही. असेल तर केजरूमुखातून काही बाहेर आलेलं नाही. भ्रष्टाचार हा मुद्दा होता तर महाराष्ट्राच्या 'झंझावाती' दौऱ्यात कॉंग्रेस सरकारला 'आदर्श' प्रश्न का नाही विचारलेत? केजरूमल यांचा दिवस भ्रष्टाचाररोधक च्यवनप्राशाने सुरू होतो आणि भाजपनिरोधक त्रिफलाचूर्णाच्या सेवनाने मावळतो. दिवसभर मफ़लर गुंडाळून खोकण्यात जातो, पण या सर्व व्याधींचे मूळ जे की खांग्रेस ती तेवढी दिसत नाही. या मोदीज्वरावर उपाय काय?

भारतीय जनता त्रस्त आहे. तशी ती अनेक वर्षे आहे. आपले सामाजिक अथवा राजकीय मन स्वत: काही करण्यास फारसे प्रबळ नाही. ते का नाही याची कारण मीमांसा करण्याचे हे स्थळ नाही. तो प्रपंच पुन्हा कधीतरी. सांगायचा मुद्दा हा की आपल्याला नेहेमी कुणी तरी 'वाली' हवा असतो, हिरो हवा असतो. त्याची जरा जरी चाहूल किंवा झलक दिसली की पुरे. वारस नसलेल्या राजाच्या निधनाने जसे राज्य अधांतरी होते, आणि हत्ती ज्याला हार घालील तो राजा अशी काहीशी अवस्था आपली आहे. इथे तर रा रा केजरुमल स्वयंघोषित भ्रष्टाचार-मुक्त राजे झाले आहेत.  मीच काय तो स्वच्छ, निरिच्छ बाकी सगळे खाओ खिलाओ गलिच्छ असा ते आव आणत असतात. ठीक आहे, ते स्वत: असतील स्वच्छ, परंतु लोकसभेत जे दोनशे अडुसष्ट उमेदवार जे उभे केले आहेत ते धुतल्या तांदळासारखे आहेत याची खात्री करून घेऊन उभे केले आहेत काय? शिवाय सत्तेत आल्यावर भले भले चळतात, हे चळणार नाहीत याची खात्री केजरुपंत देतील काय?

तेव्हा, आपण खरोखर स्वच्छ आहोत आणि राहणार आहोत असे मनापासून वाटत असेल तर रा रा केजरूमल यांनी मोदीविरोधाची कुबडी वापरून प्रकाशात राहणे सोडून, आपण कोणत्या राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडणूक लढवणार आहोत त्यावर बोलावे. किंवा आपण विरोधच उत्तम प्रकारे करू शकतो असे वाटत असल्यास विरोधकाची भूमिका करावी. आपले प्रशासकीय कौशल्य (आणि त्यातून बाहेर पडण्याचे चातुर्य) दिल्लीमध्ये दिसून आले आहेच, त्यावर न बोलणे उत्तम. अन्यथा भारतीय जनता कचकड्याचे खेळणे फार दिवस हातात ठेवणार नाही. एक दिवशी त्याला केराची टोपली दिसेलच. 

2 comments:

  1. satyavachan.

    ya sahebancha problem ha aahe ki yana bhayanak vismaranacha rog ahe. 1 tasapurvi kay bolalo he lakshat rahat nahi. just stupid,idiotic,extremely arrogant cheap publicist. self proclaimed activist cum police cum judge cum execution.

    ReplyDelete
  2. जज ड्रेड नावाचा एक सिनेमा पाहिला होता. पोलिस, जज एकच, जागेवरच खटला आणि तिथेच शिक्षेचा निर्णय. कोणीही त्याला आव्हान देऊ शकणार नाही, जज म्हणतील तर दोषी नाही तर निर्दोषी. अशीच काहीशी अवस्था केजरीवाल यांची आहे.

    ReplyDelete