Monday, April 21, 2014

ताप शरद चांदण्याचा

इतकी वर्षे समाजकारण केले, लोकांची सेवा केली तरी लोक कृतघ्नपणे त्याला माजासहित केलेले राजकारण असे म्हणतात त्याला आता काय म्हणायचे? तरीही आम्ही नेटाने कार्य करीत आहोत. कालपासून कंबर दुखते आहे, नवीन कवळी अजून नीट बसत नाहीये, लहानसहान गोष्टींचे विस्मरण होते आहे, डोळे परत तपासून घ्यायला हवेत. काल एका सभेत "आता आम्ही काही तरुण राहिलो नाही, आता आम्ही पिकले पान. तरुण पिढीने आमचा वारसा चालवायला हवा." असे गमतीने म्हणालो तर मागे कोपऱ्यातून "पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा" असे कुणीतरी ओरडले. काय म्हणावे या वाह्यातपणाला? आमचे कार्यकर्ते हे असे करणार नाहीत. एक तर पनवेलच्या बार मध्ये असली गाणी लावत नाहीत, शिवाय आमचे कार्यकर्ते ऐकण्यापेक्षा कृतीवर भर देतात. कुणीतरी बाहेरचाच असणार. शिवांबूदादा परस्पर ओरडलेच,"कोण हाय रे तो? उचला त्याला!".  बाकी गाणे चांगले होते म्हणा! क्षणभर जुन्या आठवणी (जुन्या म्हणजे लैच जुन्या) जाग्या झाल्या. आम्हीही एके काळी आमच्या गावात आणि पंचक्रोशीत मैदान गाजवले होते. आताच्या दिसण्यावर जाऊ नका. आजही गावात आयामाया आठवण काढतात (खरं तर "आठवण" हा शब्द इथे नकोच आहे. काही प्रसंगी लोकांनी आम्हाला उद्देशून वापरलेले काही शब्द अविस्मरणीय होते, विसरायचं म्हटलं तरी विसरले जात नाहीत).

आम्ही खूप प्रयत्न केला सत्तेपासून दूर राहायचा. पण सत्ताच आम्हाला सोडत नाही. सत्ता मधुमेहासारखी असते. न सोडणारी आणि मज्जातंतू खराब करणारी. लोक म्हणतात आम्हाला गेंड्याची कातडी मिळाली आहे. पण प्रत्यक्षात ती एक मेडिकल कंडिशन आहे. चव्हाणसाहेब म्हणायचे सत्ता ग्रहण केलीस तर समाजकारणाचा व्यायाम हवाच, नाहीतर सत्ता रक्तातच राहते, समाजापर्यंत पोचत नाही. पण नुसतं समाजकारण करताच आलं नाही. गोड खाणं कुणाला टाळता येणार? संवेदन नसल्यामुळे काही धोके संभवतात पण निबर त्वचेचा उपयोगही खूप होतो हेही खरे. मागे असाच एकदा आमच्या गालावर डास बसला होता. चांगला मोठ्ठा डेंग्यूचा असावा. संवेदन नसल्यामुळे आम्हाला कळलंच नाही. सुदैवाने आमच्यावर अतीव श्रद्धा आणि प्रेम असणाऱ्या एकाला तो दिसला आणि त्याने तो झटक्यात मारला. एवढा जोरात मारलेला फटका आम्हांस मुळीच जाणवला नाही. पण त्या डासास नक्की जाणवला असेल. आता या घटनेत विशेष काही आहे का? पण आम्हाला राजकीय शत्रू काही कमी नाहीत. लगेच हूल उठवली, कुणी तरी आमच्या श्रीमुखात भडकावली म्हणून. लोक काय टीव्हीवर जे सांगतात ते ऐकतात. उघडा कान ऐका नीट म्हणायला टीव्हीवाल्यांचं काय जातंय.  इथे आमचे दोन दात सैल झाले हे खरे, पण डेंग्यूपासून वाचलो. आता एक सुळे दात आणि एक पटाशीचा अशा दोन दातांवर भिस्त आहे. तसे आम्ही पातळ डाएटवरच असतो हल्ली. पातळ म्हणजे दाट नसलेले याअर्थी. नाहीतर पुन्हा इथे विपर्यास करून टीव्हीवर बातमी यायची - उघडा डोळे आणि बघा लवकर! साहेब आता पातळाच्या डाएटवर!. सवंग झाली आहे मीडिया. म्हणून तर आम्ही पुण्यात एक अख्खे वृत्तपत्रच विकत घेऊन त्याचा आदर्श असा "मीडिया बिझनेस" करून टाकला. एकदम आदर्श! ते निदान आमच्या तरी असल्या बातम्या देत नाहीत. आणि हो, हा "तसला" आदर्श नाही बरं का, आपला त्या आदर्शशी काही संबंध नाही. हा नुसता साधा आदर्श. काही बोलायची सोय राहिली नाही हल्ली. मुद्दे कमी आणि खुलासेच जास्त.

आता ही कालची मुले आम्हांस उद्धटपणे बोलू लागली आहेत. अरे मी अजून रिटायरपण नाही झालो तर आधीच पुष्पगुच्छ, हार आणि आभाराचे भाषण? म्हणे आम्ही श्रीमंत भोगी! आम्ही स्वत:च्या दोन हातांनी हे सर्व चव्हाणांकडून मिळवले आहे. ते दिल्लीत बसले, आम्ही म्हटले महाराष्ट्राच्या शिंकाळ्यावर आम्ही लक्ष ठेवतो. डोळ्यात तेल घालून आम्ही त्यावर नजर ठेवली. कृतघ्न लोक म्हणाले "बोक्याप्रमाणे!". आता बोला. आमची दिवसाची चर्या आणि मावळतीनंतरची रात्रचर्या सोडली तर आमच्यात आणि बोक्याच्यात काहीही साम्य नाही. आम्हाला लहानपणापासून गोटीब्याटचे आकर्षण. गोट्यांचेसुद्धा होते. आमच्या गल्लीतील सर्वांच्या गोट्या, ब्याटा, स्टंपा आमच्या म्यानेजमेंटमध्ये. तर मग भारताचे ब्याटबॉल सांभाळावे असे वाटले तर काय चुकले? तर लोक म्हणाले तुम्हाला नुसती फिल्डिंग लावायची आहे. वास्तविक आम्हाला आमचे बिनलेसचे बूटसुद्धा आरशात बघून घालावे लागतात. आम्ही फिल्डिंग कशी काय करणार होतो? लोकांच्या बोलण्यावर काही नियंत्रण ठेवता येत नाही. आता या पोरांचे बाप आमच्या बरोबरचे. एका ग्लासातले. आमचे मित्र आम्हाला काहीही म्हणोत हो, ते चालायचंच. आता परमेश्वर कृपेने आम्ही जरा खाऊनपिऊन सुखी, मग एक मित्र म्हणायचे आम्हाला "मैद्याचे पोते". ते जरा मिष्किलच होते. आम्ही काही मनावर घेत नव्हतो. पण वडिलांचे ऐकून त्यांच्या मुलांनीही येऊन पोत्याला खालून दाभणाने भोक पाडावे? काही वयाचा मान तरी ठेवा! अवघड ठिकाणी फाटलेले जीर्ण पोते शिवणे या वयात कठीण असते. वडिलांच्या कर्तृत्वावर मुलांनी, पुतण्यांनी जगू नये. थांबा! या वाक्यात काही तरी चुकतंय. काय चुकतंय ते लक्षात येत नाहीये. असो. आता वयोमानानुसार असं होणारच. शिवाय आम्ही काय बोलतो ते टीव्हीवालेच जास्त लक्षात ठेवतात. तेव्हा संध्याकाळपर्यंत कळेलच. तेव्हा त्याचा इन्कारसुद्धा आत्ताच करून ठेवतो. देव न करो, हे फाटलेले पोते शिवून घेण्यासाठी या पोरांकडेच जावे लागेल. पण लोकसेवेचे व्रत एकदा घेतले की मानअपमान बाजूला ठेवणे आले. आमच्या दीर्घायुष्याचे तेच रहस्य आहे.

 

No comments:

Post a Comment