Sunday, April 20, 2014

पुरात्ची थलैवि

मूळचे मरहट्ट देशीचे असलो तरी आम्ही अम्मांचे खूप जुने भक्त. परिस्थितीमुळे आमचे पणजोबा येथे आले असे म्हणतात. ती परिस्थिती मरहट्ट देशी अजूनही तशीच असल्याचे आम्हांस वेळोवेळी कळत असते. असो. तर त्या आमच्या पुरात्ची थलैवि, आम्ही त्यांचे थंबी. त्या इडली तर आम्ही सांबार. त्या डोसा तर आम्ही चटणी (टोम्याटोची, अम्माना खोबऱ्याची आवडत नाही). त्यांनी नुसते पो असे म्हटले तरी आम्ही सांगितल्या ठिकाणी पोचणार, भो म्हटले तर भुभु:कार करणार. आमच्या देवघरात अम्मांची सालंकृत मूर्ती आहे. अठरा-वीस वर्षांपूर्वी अम्मांचे अवतारकार्य संपुष्टात आले असे वाटणाऱ्या घटना घडल्या होत्या. पण आमची श्रद्धा अढळ होती. त्या काळात अम्मा स्वत: आमच्या स्वप्नात आल्या आणि म्हणाल्या "थंबी, जिथे १०००० साड्या आणि १५००० मौल्यवान अशी पादत्राणे जेथे असतील अशा ठिकाणी सध्या माझे वास्तव्य आहे. दुर्दैवाने माझी मूर्ती या साड्या आणि पादत्राणे यांच्याखाली गाडली गेली आहे. तर ती तू बाहेर काढ आणि तुझ्या घरच्या देव्हाऱ्यात त्याची प्रतिष्ठापना कर, तुला कुठलाही अण्णा किंवा द्रविड कधीच ग्रासणार नाही, तुझे मुन्नेत्र एकदम कळघम होऊन जाईल." अम्मांच्या आज्ञेनुसार ती मूर्ती आज आमच्या घरच्या देव्हाऱ्यात विराजमान आहे. मूर्ती बहुत गोमटी आणि गुटगुटीत आहे. आम्हाला शंकराची दगडी पिंड, मारुती आणि रांगणारा बाळकृष्ण यांना छोट्या देव्हाऱ्यात शिफ्ट करावे लागले, पण मूर्ती फिट्ट बसली. मूर्तीची मुद्रा प्रसन्न आणि नजरेत प्रेमभाव ओथंबतो आहे. मूर्ती जागृत आहे याचा अनुभव आम्हांस लगेच आला. हापिसात गेलो तर एरवी माझे स्वागत कधी "ए आफिस मे आने का टैम है क्या" याशिवाय न करणारा आमचा साहेब यम्म बालसुब्रमण्यम शिवरामकृष्णन अय्यर प्रसन्न भस्ममंडित चेहऱ्याने समोर आला आणि मला गुड मॉर्निंग घालून गेला. येवढेच नव्हे तर आपल्या टिफ्फनमधून ब्रेकफाष्टसाठी आणलेली इडली "खातो काय रे" असं म्हणून देऊ करत होता. मनोमन अम्माना नमस्कार केला. पथ्ये आणि आन्हिके कडक आहेत. मूर्तीची दररोज सकाळी पूजा, अभ्यंगस्नान, अभिषेक करावा लागतो. नित्य नवीन वस्त्र आणि पादुका नेसवाव्या लागतात. संध्याकाळी आरती. शिवाय शुचिर्भूत होऊन सोवळ्याने घरच्या पाट्यावर रगडून केलेली चटणी आणि डोसा यांचा नैवेद्य. त्यात खंड पडला तर कोप होणार यात आम्हास तरी शंका नाही. आणि हे सर्व अग्निहोत्र आमच्या कुटुंबास करावे लागते. अम्मांचा दंडकच आहे तसा. हे दैवत  स्त्रीशक्तीप्रधान आहे. पुरुष फक्त आरतीसाठी.

काही अम्मानास्तिक सध्या भलत्याच उपद्व्यापात पडले आहेत. नर्मदेतील एक गुळगुळीत गोटा आणून त्याला भगवा शेंदूर फासून त्याचा जप करण्याचा उद्योग करताहेत, त्याला देवत्व देताहेत. अशा भ्रष्टाचाराने राज्यावर संकट येणार, रोगराई येणार, दुष्काळ येणार, अत्याचार वाढणार यात शंकाच नाही. नर्मदेचा गोटा तो काय लोकांचे रक्षण करणार? देशात प्रसूतीदरम्यान होणाऱ्या मातामृत्यूंचे प्रमाणच पहा. त्या गोट्याची जेथे उपासना होते तिथे हे प्रमाण लाखात १२२ आहे. श्रीअम्माकृपेने येथे ते केवळ ९० आहे! तेथे स्त्रियांवरील अत्याचारांचे प्रमाण ६५ प्रतिशत तर येथे वजा २९ प्रतिशत! (आम्हांस येथे थोडी गडबड वाटते. वजा २९ म्हणजे श्रीअम्माकृपेने स्त्रियांनीच पुरुषांवर अत्याचार केले असे ध्वनित होते आहे. त्रासलेल्या पुरुषांस कदाचित ते खरेही वाटेल पण आम्हांस तरी तसे वाटत नाही). तेथे साक्षरतेचे प्रमाण ८१ प्रतिशत, तर इथे तब्बल ८३!! तेथे सरासरी आयुर्मान केवळ ७० वर्षे तर श्रीअम्मा आशीर्वादाने येथे ७२ वर्षांचे प्रदीर्घायुष्य! येथे काही नास्तिक पुरुष स्त्रीशक्ती न पाहवून ७०व्या वर्षी समाधी घेतात, पण असे दुर्मुखमती विरळाच. तेथे केवळ ३२०० किमी रस्ते, येथे ४८००! एवढ्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूला किती मॉल्स उभे करता येतील! प्रगतीच प्रगती! येथे नुसते पुरुष पोलिस नाहीत तर महिला पोलीसही! वरकमाई फक्त पुरुषांनी करावी आणि स्त्रियांनी फक्त "वर"कमाई करून पाटारगडा सांभाळावा हा घोर अन्याय श्रीअम्मांनी दूर केला. नर्मदेकाठी महिला पोलिस तर सोडाच, नुसते पोलिस तरी आहेत की नाही याचा शोध घ्यावा लागेल. कारण पूर्वी आम्ही त्या ३२०० किमी रस्त्यांवरून प्रवास करून आलो, कुठेही ओम भवति भिक्षांदेही करत कुणी पुढे आले नाही (वाटेत मरहट्ट देशी मात्र दर १० किमीवर चवलीपावलीचे दान करावे लागले होते. आमचे पणजोबा परिस्थिती परिस्थिती म्हणत ती हीच बहुधा). त्याच वेळी आम्हाला खात्री पटली होती, येथे पोलिस नाहीतच. मग होणारच हिंसाचार. एका ठिकाणी आम्ही "वानरेंद्र!" असे चुकून मोठ्याने म्हणालो तर अकस्मात काही लोक उपस्थित होऊन आमच्या लुंगीची अब्रू धोक्यात आणणार असे म्हणू लागले होते. त्यांना आम्ही "वाह! नरेंद्र!" असे म्हटले होते असे सांगून कसेबसे सुटलो. एवढा प्रसंग होऊनही पोलिस आले नाहीतच. आमच्या येथे हिंसाचार होत नाही. होतो तो कोप. तोही श्रीअम्मा आशीर्वादानेच. तोही कुणी उतला मातला तरच. दैवताच्या कोपाला हिंसाचार म्हणत नाहीत. शिवाय अम्मांची कृपादृष्टी असेल तर भलेही जग तुम्हाला दानव, दहशतवादी ठरवो, तुमचा बालही बाका होणार नाही याची ग्यारंटी ही आमची देवी देते. तुमचा तो गोटा अशी ग्यारंटी देईल काय? काही तुलना तरी आहे का? कुठे जळजळवणारा तो उंधियु आणि कुठे आमचे हे सौम्य सात्विक सांबार!. कुठे झग्यासारखा दिसणारी ती मेड इन अंबानी भरताड पैरण आणि कुठे आमची ही द्रविडदेशी एअरकंडीशण्ड रेशमी लुंगी! नर्मदामाईने असे अनेक गोटे आजवर निर्माण केले आहेत, यापुढेही करेल. पण आमच्या पुण्यश्लोक अम्मा युगायुगातून एकदाच अवतार घेत असतात. त्यांना शरण जा, अवघ्या आयुष्याचे कळघम कळघम होऊन जाईल. जय हो पुरात्ची थलैवि!
 

No comments:

Post a Comment