Friday, January 16, 2015

चार्ली हेब्दोच्या निमित्तानं

मुद्दे संपतात तिथे गुद्दे चालू होतात. पण गुद्द्यांनी तरी कुठे विषय संपतो? संपतो तो सारासार विचार. पॅरिसच्या चार्ली हेब्दो वरील भ्याड हल्ला हे अलीकडील उदाहरण. जे आमच्या विचारांशी, श्रद्धांशी सहमत नाहीत ते आमच्या विरोधात आहेत असलं हेकेखोर तर्कट केवळ मूर्ख लोकच करू शकतात. अर्थात हे असलंच तर्कट  "लोकशाही" पसरवण्याची एजन्सी घेतलेल्यांनीही केलं आहेच म्हणा. भूमिका कोणतीही असो टोकाची असेल तर ती दहशतवादातच मोडते. अनेक ठिकाणी बोर्ड "Zero tolerance policy" बोर्ड असतात. त्याचा अर्थ "आम्ही या बाबतीत कोणताही संवाद करणार नाही" असाच होतो. हाही एक सौम्य दहशतवादच म्हणावा लागेल. याचा अर्थ ते धोरण ज्या समस्येबद्दल आहे तिचे मी समर्थन करतो आहे असा मुळीच नाही. जी समस्या आहे त्याचे मूळ शोधून त्यावर उपाय करणे ही पॉलिसी असायला हवी. हे थोडंसं अॅलोपथी आणि आयुर्वेद यासारखं आहे. आयुर्वेदात रोगाचं मूळ शोधून काढणं, अचूक निदान करणं यावर भर दिला जातो. म्हणजे मग औषधयोजना करता येते. अर्थात, इतके दिवस मी यावर श्रद्धा ठेवून होतो. पण का कुणास ठाऊक, ती श्रद्धा हळूहळू कमी होते आहे असं वाटू लागलंय. पॅरिसच्या दहशतवादी हल्ल्यामागे तोच तो मूर्ख तर्कटवाद आहे, वेगळं काही नाही. पण हे विष उतरणारं नाही, रोग बरा होणारा नाही असं वाटू लागलं आहे. मॅटर आणि अँटिमॅटर इतका फरक झाला आहे. दोन्ही एकत्र आले तर नष्टच होणार.  ज्या धर्माला दुसऱ्या जीवाचं अस्तित्वच मान्य नाही तो धर्म तरी कसा म्हणायचा? ईश्वर एकच आहे. ठीक आहे. इथवर सगळं छान आहे. मामला इथवर थांबत नाही. ईश्वर एकच हे तर झालंच, पण आमचाच ईश्वर खरा, बाकीचे तुम्ही सगळे मरा हे तर्कशास्त्र अनाकलनीय आहे. हे तर्कट विचारसरणी म्हणावं याही लायकीचं नाही.

इतरांच्या धर्माची कल्पना काय आहे किंवा त्यांचे धर्माशी निगडित असण्याचे मुळात प्रयोजन काय आहे यावर मी भाष्य करणार नाही अथवा करूही नये. त्याचबरोबर मग मीही अशी अपेक्षा करेन की तुमचा धर्म तुम्ही तुमच्यापाशीच ठेवा. त्याचा उपसर्ग दुसऱ्याला होऊ देऊ नका. तुमचा धर्म पसरवूही नका. परंतु इतिहास काय सांगतो? इस्लामचा इतिहास केवळ रक्तरंजित असाच म्हणता येईल. धर्मप्रसार करण्यासाठी देश उध्वस्त केले. बाकीच्या देशांबद्दल कशाला, भारतीय इतिहास काय आहे? मुघल आले, देश तुडवला, स्त्रियांवर बलात्कार केले, मुलांच्या हत्या केल्या, कर लावले, स्थानिक संस्कृती संपवली. जर हे सर्व धर्मप्रसारासाठी असेल तर त्या धर्मावर चर्चा का नको? धर्मप्रसार करायचा असेल तर त्यावर विचारलेले प्रश्न सहन करता आले पाहिजेत, त्याचं खंडन करता आलं पाहिजे, परस्परविरोधी संकल्पना असतील तर त्याचं निराकरण करता आलं पाहिजे. परस्परविरोध, विसंगती हा मनुष्यस्वभाव आहे. विसंगती हेरणे, त्यावर चर्चा करून ती दूर करणे किंवा निदान तिचे निराकरण करणे हे प्रगतीशील समाजाचे लक्षण आहे. जो समाज प्रयोगशील आहे, क्षमाशील आहे, तोच प्रगती करू शकतो. ज्याच्यात ही कुवत नाही तो समाज दगडांनी ठेचणे, जाहीर शिरच्छेद करणे, कोणत्याही चर्चेला बंदी करणे, फतवे काढणे या गोष्टीमध्ये खितपत पडतो. अशा समाजाचे काम हे फक्त आपल्या धर्माभोवती गस्त घालणे एवढेच उरते. धर्म हा मुक्त करणारा असावा, चिरंतन सत्य शोधण्याच्या कार्यात मदत करणारा असावा. मुळात हे सत्य शोधणे या कार्यासाठीच धर्म ही संकल्पना अस्तित्वात आली. सत्यशोधन तर लांबच, उलट धर्माचे जड लोखंडी साखळदंड पायात पाडून घेतले गेले. जो धर्म सत्यशोधनात मदत करतो, तो मानवाला हिंसेपासून लांब नेईल की हिंसेला उत्तेजन देईल? सत्यशोधनासाठी हिंसा आवश्यक आहे का? सजीव सृष्टी हे परमेश्वराची परमोच्च, किमान ज्ञात सर्वश्रेष्ठ अशी निर्मिती आहे असे मानले जाते. परमेश्वराचे सत्य स्वरूप जाणून घेण्यासाठी त्याची परमोच्च अशी निर्मिती प्रथम नष्ट करावी लागत असेल असे वाटत नाही. जर ते आवश्यक असेल तर सत्य शोधण्याची गरज उरत नाही, कारण मग मुळात सजीव सृष्टी असण्याचीही गरज उरत नाही.

प्रश्न न पडणे एकवेळ समजू शकतो. पण ज्याला प्रश्न पडत नाही तो एक तर पशू असतो अथवा निर्जीव पदार्थ. प्रश्न पडणे हेच तर मानवाचे सर्वात मोठे बळ आहे. लाखो वर्षांपूर्वी,  हाती लागलेले हाड दुसऱ्या वस्तूवर जोरात आपटल्यावर काय होते हा प्रश्न आदिमानवाला पडला आणि पहिल्या शस्त्राचा शोध लागला. खरं तर ही पहिली ज्ञानाची ठिणगी. मग पुढे कुतूहल म्हणून गारगोट्या एकमेकांवर आपटून पाहिल्या आणि आगीचा शोध लागला.  प्रश्न आहे तो प्रश्न कसला पडतो त्याचा. तो कुवतीचा भाग झाला. कुणाची कुवत किती असावी यावर काही सरकारी नियम नाही, सामाजिक बंधन नाही अथवा धार्मिक अट्टाहास नाही. लाखो वर्षांपूर्वीच्या मेंदूची कुवत जशी होती तिच्याप्रमाणे प्रश्नही तसेच पडले होते. पुढे मेंदूची कुवत वाढली, प्रश्नांची क्लिष्टता वाढली. क्लिष्टता जशी वाढेल तसा मेंदूही उत्क्रांत पावत गेला. ज्या प्राथमिक मेंदूला केवळ पुढील अन्न कसे मिळेल हा प्रश्न पडत होता, तो मेंदू आता प्राथमिक राहिला नाही. त्याला पुढचे अस्तित्वाविषयी प्रश्न पडू लागले. हे सर्व का, कशासाठी निर्माण झाले आहे हा प्रश्न जेव्हा पडला तेव्हा त्या प्राथमिक मेंदूपासून आपण खूप पुढे आलो होतो. या विश्वाच्या पसाऱ्यात आपण एकटे आहोत ही भावना अतिशय प्रबळ आणि प्रभावशाली आहे. तशीच त्या प्रश्नाचे उत्तर न मिळणेही अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. विज्ञानाचा अभाव असण्याच्या त्या काळात मग तत्वज्ञान हा एक मार्ग मिळाला. तत्वज्ञान हे तर्कावर आधारित होते. तर्कज्ञान मानवी मनाच्या कुवतीवर अवलंबून होते. मुख्य प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी सिद्ध केलेली तत्वज्ञानावर आधारित प्रणाली म्हणजे धर्म असे मला वाटते. प्रणाली म्हणजे काही सत्य नव्हे. अंतिम सत्यापर्यंत पोचण्यासाठी तयार केलेले ते एक वाहन. आणि तेही असे की ते वाहन सत्यापर्यंत घेऊन जाईलच असे नाही. शेवटी सत्य म्हणजे काय? ते  कुणीच अनुभवले नसल्याने, पाहिलेले नसल्याने ते वाहन जिथे घेऊन जाईल तेच अंतिम सत्य असेल याची हमी काय? काहीच नाही. पण शोध थांबवणे हे मानवी मनास मान्य नाही. एखादी गोष्ट समजत नाही हे आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. आणि हेच तर आपल्याला जगण्यासाठी भाग पाडते. ज्याला कसलाच प्रश्न पडत नाही, कुतूहल वाटत नाही त्याला स्थितप्रज्ञ असे नाव आहे. त्या अवस्थेला पोचलेले लोक ज्ञानी मानले जातात. कारण त्यांना अंतिम सत्य समजलेले असते. त्यांचे सोडा. बाकीचे आपण तसे नाही. म्हणूनच ज्या धर्मात आधीच सत्य सांगितले आहे, तर मग त्याचे अनुयायी हे सर्वज्ञानी असायला हवेत. त्यांना अंतिम ज्ञान झालेले असले पाहिजे. मग असे अंतिम ज्ञान जर झाले असेल तर कुणी चार्ली हेब्दो असो किंवा आणि कुणी, त्याने काढलेल्या चित्राबद्दल काही वाटता कामा नये. कारण अंतिम ज्ञान झालेल्याला असल्या ऐहिक, नश्वर, किरकोळ  गोष्टींनी कसलाच फरक पडणार नाही. शिवाय कुणी काय म्हणते यावर अंतिम ज्ञान थोडेच अवलंबून असणार?  ते व्यंगचित्रांनी बदलणार नाही किंवा लेखांनी. आणि जसे ते व्यंगचित्रांनी बदलणार नाही तसेच ते हत्या करून, बंदुकांनी गोळ्या झाडूनही बदलणार नाही. आपला धर्म कशासाठी आहे, त्याचे ध्येय काय आहे याचा विचार व्हावा. पूर्वी धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हणत, आता ते बदलून बंदुकीची गोळीने तिची जागा घेतली आहे असं दिसू लागलं आहे. अंतिम सत्याजवळ जाण्याच्या आपल्या प्रवासात ही प्रगती आहे की अधोगती हे प्रत्येकानं स्वत:चं स्वत: ठरवावं. इत्यलम. 

No comments:

Post a Comment