निवृत्त न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी नुकतेच एक विधान केले - कतरिना कैफ हिला राष्ट्रपती करावे. ते ऐकून आम्हांस अगदी भरते आले. जिवाशिवाची भेट झाल्यासारखे वाटले. इतके दिवस आम्ही म्हणतच होतो राष्ट्रपती हे पद नाही तरी तसे काय कामाचे? बिन अधिकारी, फुल पगारी, घर सरकारी, कधीकधी परदेशवारी, क्वचित उद्घाटन करी, एरवी माश्या मारी असे त्या पदाचे एकूण स्वरूप. नाही म्हणायला २६ जानेवारीला गार्ड ऑफ ऑनरच्या वेळी तेवढा हात उचलायला परवानगी. टेबलावर फुलदाणी जर ठेवायचीच असेल तर मग त्यात जरा चांगली फुले ठेवणे काय वाईट? तसे काटजू हे पराकोटीचे दयाळू सरकारमान्य (लायसन क्र. २३४५, चू.भू.दे.घे.) महात्मे आहेत. तेवढेच सरकारमान्य थोर देशभक्त संजय दत्त (कैदी नं. ४२०, उमर पंचावन, धंदा पिच्चरमदी हिरोगिरी भायेर भाईगिरी, राहणार वांद्रे पश्चिम, सध्या मुक्काम येरवडा जेल) यांच्यावर शिक्षेच्या बाबतीत जो घोर अन्याय झाला त्याला वाचा फोडून धीर देणारे हेच ते. काटजू यांना असे विधान करावेसे का वाटले असावे? परदेशात छान छान माणसे (बायका असं म्हटलं तर फेमिनिस्ट लोक हाणतील, अग्निशिखा वाल्या बायका मोर्चा काढतील) अध्यक्ष वगैरे होतात हे पाहून काटजू व्यथित झाले तर नवल नाही.
निवृत्त न्यायाधीश काटजू (निवृत्त हा शब्द वापरताना खूप बरे वाटते आहे. पण सोयीसाठी पुढे त्यांना आम्ही निन्या म्हणणार आहोत) हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. सरकारी नोकरीत आयुष्य गेल्यामुळे ते अत्यंत काटेकोर आहेत. कोणते व्यक्तिमत्व कधी बाहेर काढायचे याच्या वेळा त्यांनी ठरवून घेतल्या आहेत. त्यानुसार ते चालतात. सकाळी आन्हिके उरकल्यानंतर सात ते नऊ ते समीक्षक असतात. निन्या असले तरी अजूनही त्यांच्या घरी फुकट वृत्तपत्रांचा रतीब आहे. साधारण सात ते नऊ या वेळेत वर्तमानपत्रे चाळून झाल्यावर ते महत्वाच्या बातम्यांवर आपली परखड मते व्यक्त करतात. ते न्या चे निन्या होण्यापूर्वी ती मते ऐकण्यासाठी त्यांचा कोर्टातील पट्टेवाला जातीने हजर असे. ती परखड मते ऐकून ऐकून त्याला सायबांचा स्वभाव अंतर्बाह्य माहीत झाला होता. इतका की कधी कधी खुद्द बाईसाहेब सायबांपुढे काहीतरी मागणी करण्यास जाण्याआधी त्याचा सल्ला घेत असत अशी वदंता आहे. परखडपणात निन्यांचा हात धरणारा कोणी नाही. निन्यांनी खुद्द सलमान रश्दी यांना भिकार लिखाणाबद्दल धारेवर धरले होते. मिडनाईट चिल्ड्रन ही एक अत्यंत सुमार दर्जाची कादंबरी लिहिण्याऐवजी त्याच मिडनाईटचा सदुपयोग केला असतात तर प्रत्यक्षात पाच धा चिल्ड्रन पोटी जन्माला आली असती, त्यांचे डायपर बदलण्यात असले टुकार उद्योग करायला वेळ मिळाला नसता असे त्यांचे मत होते. या बाबतीत मात्र आमचे एकमत आहे. पुरस्कार वगैरे मिळालेले साहित्य भिकार असते असे आमचेही ठाम मत आहे. पुरस्कार मिळवण्यासाठी कुठे वशिला लावावा लागतो हे निन्यांप्रमाणेच आम्हालाही अद्याप माहीत झालेले नाही. सकाळी सकाळी असे परखडपणाचे बोलून झाले की मग पुढे संध्याकाळपर्यंत परखडपणा शक्यतो बंद असा त्यांचा नियम आहे. मग आंघोळ वगैरे करून दुपारच्या जेवणाची वेळ होईपर्यंत मिष्किलपणा करण्याचा नियम ते पाळतात.
कतरिना कैफ बाबतचे ते विधान अशाच काहीशा वेळेत झाले. म्याडमशी काही तरी लाडात बोलायला गेले आणि स्वत:च घाबरून ओरडले. म्याडम फेसप्याक लावून डोळ्यांवर काकडीच्या चकत्या लावून बसल्या होत्या म्हणे. ते पाहून निन्यांचेच डोळे निवले. मग त्यावर विनोदाने काहीतरी सौंदर्यवाचक विधान करायला गेले आणि मामला आणखी बिघडला. म्याडमनी तिथून हाकलून लावले. मग निन्या खिन्न होऊन टीव्हीसमोर बसले. तर तिथे क्रोएशिया या माहीतसुद्धा नसलेल्या देशात नुकत्याच निवडून आलेल्या अध्यक्षांबद्दल काही तरी बातमी चालू होती. निन्या आ वासून पाहतच राहिले. क्रोएशिया या देशाबद्दल त्यांना अचानक कुतूहल प्राप्त झाले. कारणच तसे होते. क्रोएशियातील लोकांनी सौंदर्यवाचक विधान करून सौंदर्यवाचक अध्यक्ष निवडून दिला होता. लोकशाही किती सुंदर असू शकते! तेवढ्यात म्याडमनी येऊन ते पाहिले आणि बरसल्या,"झालं! तरी म्हटलं तोंड उघडं ठेऊन एवढं काय पाहता आहात!" असं म्हणून त्यांनी च्यानेलच बदललं. आणि लावावं तरी कुठलं तर डीडी. हल्ली डीडी बघतो तरी कोण? काही तरी कार्यक्रम चालू होता आणि क्लोजअप गेला प्रणव मुखर्जींच्या चेहऱ्यावर. दूरदर्शन अस्तित्वात आल्यापासून नोकरीत असलेली ती प्रसिद्ध माशीही तिथेच घोंघावत होती. एवढी सिनीयॉरीटी पदरी असून असून तिचेही त्या चेहऱ्यावर बसण्याचे धाडस होत नव्हते. चेहऱ्याजवळ येऊन ती परत लांब जात होती. च्यानेल बदलल्यामुळे खिन्न झालेले निन्या प्रणव मुखर्जींचा शोकमग्न चेहरा पाहून आणखीच खिन्न झाले. केवढी दरी ही क्रोएशियासारख्या टीचभर आणि भारतासारख्या खंडप्राय देशात! क्रोएशियाला ती कोलिंदा नावाची गोड शिरापुरी आणि आमच्या नशिबी तेवढी शिळी बंगाली माछेर करी? तेवढ्यात कार्यक्रमाला कुठेही आणि केव्हाही कंट्रोलब्रेक करायचे या सरकारी नियमानुसार एकदम जाहिराती सुरू झाल्या. पहिलीच जाहिरात लक्स फ्रेश स्प्लॅशची. निन्या एकदम धडपडत उठून सावरून बसले. कतरिना कैफ निळ्या सॅटिनचा जब्बरी गाऊन घालून अंघोळमहोत्सव साजरा करायला निघाली होती. जनता तो अद्भुत स्नानसोहळा पाहण्यास तिच्या मागे उत्सुक अशी नाचत होती, आ वासून पाहत होती. मध्येच कतरिनाने हळुवार फुंकर घालून ते साबणमिश्रित पाणी जनतेच्या दिशेने फवारले. मागे उभे असलेल्या एका इसमाने गलीमध्ये फिल्डिंग करणाऱ्या जॉन्टी ऱ्होडसच्या चपळाईने ते झेलले. वाह ! निन्या टाळ्या वाजवत उभे राहिले. व्हॉट अ ब्रिलीयंट शॉट आणि इक्वली वेल फिल्डेड अशी कॉमेंटरी त्यांच्या तोंडून निघून गेली. इंदिराबाईंच्या नंतर (सोनियाबाईंचा माफक अपवाद वगळता) जनतेला अशी आपल्या तालावर नाचवणारी स्त्री त्यांनी पाहिली नव्हती. आम्हीही असा फवारायुक्त स्नानसोहळा पाहिला नव्हता. म्हणजे तसा, आमच्या गावात पटवर्धन सरकारांनी सुंदर नावाचा हत्ती पाळला होता, त्याची आंघोळ साधारण अशीच असायची. तोही असाच छान फवारे उडवायचा. पण ती अंघोळ पाहायला आमच्याप्रमाणे इतर दहाबारा उनाड मुले वगळली तर जनतेचे एवढे ब्याकिंग कधीच मिळाले नाही. निन्या खूप प्रभावित झाले. ठरले. कतरिना कैफला निदान, किमान, राष्ट्रपती व्हायलाच हवे. गार्ड ऑफ ऑनर देताना फक्त स्क्वॉड्रन लीडरच काय, सगळी बटालियन उजवीकडे मान वळवून सल्युट द्यायला उत्सुक झाली पाहिजे.
आता माणसाची विचारशृंखला कुठून कशी कुठे वाहवत जाईल यावर त्याचा स्वत:चा काही ताबा नसतो. लोकांनी निन्यांना फारच धारेवर धरलं. माफी मागायला लावलं. अशानं खोक्याच्या बाहेर (पक्षी:आऊट ऑफ द बॉक्स हो. बिल्डर, राजकारणी आणि खंडणीबहाद्दर विचार करतात ते हे खोके नव्हे) विचार करणारी माणसंच राहणार नाहीत. आम्हीही असेच आऊट ऑफ द बॉक्स वाले आहोत अशी आमची प्रामाणिक समजूत आहे. लहानपणी आम्ही असंच आऊट ऑफ बॉक्सवालं वागत असू. त्यावेळी आम्हाला पाठिंबा असायचा फक्त आमच्या मातोश्रींचा. तोही अगदी पाठ लाल होईतोवर. एकदा नात्यातल्या कुणाकडे तरी "विशेष" आहे असं मातोश्री वडिलांना सांगत होत्या. साहजिकच आनंद होऊन मी निरागसपणे (आईच्या मते आगाऊपणे. आमचे मतभेद होते हे उघड आहे. त्या वयात मला "विशेष" या शब्दाचा विशेष अर्थ माहीत होता ही बाबही चिंत्य आहे) विचारलं,"मग, आपल्याला आता खरवस खायला मिळणार?" आता यात टेक्निकली काय चूक आहे? आमच्या गवळ्यानं त्याची एखादी म्हैस गाभण आहे असं सांगितलं की आई लगेच चिकाचं बुकिंग करायची. तर "मेल्या, म्हशीत आणि बायकांत काहीच फरक वाटत नाही का तुला? तोंडाला काही हाड?" असं म्हणून माझ्या पाठीवर सणसणीत पाठिंबा व्यक्त झाला. फरक नक्कीच आहे हे मला त्याकाळीही कळत होतं. पुढे वयानुरूप आणि अनुभवानुरूप शंका उत्पन्न होऊ लागल्या तो भाग वेगळा. पण त्याबद्दल कधीतरी स्वतंत्र लिहीन. तूर्तास मुद्दा खोक्याबाहेर विचार करण्याचा आहे. त्यामुळे आमच्यासारख्याच बॉक्सवाल्यांना पाठिंबा देणं हे आमचं कर्तव्यच आहे असं आम्ही समजतो. निन्यांची विचार करण्याची पद्धत आमच्यासारखीच आहे. मुद्देसूद विचार करून तर्कशुद्ध निष्कर्षापर्यंत काय कुणीही येरू येईल. पण असंबद्धतेतून मोठे अर्थ लागतात, अपघातानं शोध लागतात हा जगाचा इतिहास आहे. झाडाखाली झोपा काढत बसलेल्या न्यूटनची सफरचंद टकलावर पडल्यामुळे झोपमोड झाली आणि गुरुत्वाकर्षणाबद्दल जगाला कळलं. हा शोध लागण्याआधी कुणी मोरू जिन्यावरून पाय घसरून पडला तर काळ्या मांजराला दोष दिला जायचा. काळी मांजरं तरी सुटली. आईनं पावसात जाऊ नकोस असं बाळ बेंजामिनला बजावलं असतानाही उनाडपणे पतंग उडवायला गेल्यामुळे विजेचा शोध लागला. या शोधामुळं रात्री काय करायचं हा प्रश्न सुटला आणि अकारण लोकसंख्या वाढू लागली होती ती कमी झाली. राजकारणात पडू नका असा सल्ला अण्णांनी दिला असला तरी पडल्यामुळे भारताला केजरीमल छाप डांग्या खोकला मिळाला. "हसत खेळत चिडत रुसत खोकत शिंकत भ्रष्टाचार विरोध" हे नवीन तंत्र लोकशाहीला मिळाले. असे हे सगळे खोक्याबाहेरचे लोक. त्यांना मुक्तपणे खोक्याबाहेर बागडू द्या. त्यांच्या मुक्त चिंतनाने राष्ट्राचे कल्याण जरी नाही झाले तरी धारावी तरी नक्की होणार नाही. तरीच आमच्या मातोश्री आम्हाला "डोकं आहे का खोकं तुझं" असं विचारायच्या.
निवृत्त न्यायाधीश काटजू (निवृत्त हा शब्द वापरताना खूप बरे वाटते आहे. पण सोयीसाठी पुढे त्यांना आम्ही निन्या म्हणणार आहोत) हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. सरकारी नोकरीत आयुष्य गेल्यामुळे ते अत्यंत काटेकोर आहेत. कोणते व्यक्तिमत्व कधी बाहेर काढायचे याच्या वेळा त्यांनी ठरवून घेतल्या आहेत. त्यानुसार ते चालतात. सकाळी आन्हिके उरकल्यानंतर सात ते नऊ ते समीक्षक असतात. निन्या असले तरी अजूनही त्यांच्या घरी फुकट वृत्तपत्रांचा रतीब आहे. साधारण सात ते नऊ या वेळेत वर्तमानपत्रे चाळून झाल्यावर ते महत्वाच्या बातम्यांवर आपली परखड मते व्यक्त करतात. ते न्या चे निन्या होण्यापूर्वी ती मते ऐकण्यासाठी त्यांचा कोर्टातील पट्टेवाला जातीने हजर असे. ती परखड मते ऐकून ऐकून त्याला सायबांचा स्वभाव अंतर्बाह्य माहीत झाला होता. इतका की कधी कधी खुद्द बाईसाहेब सायबांपुढे काहीतरी मागणी करण्यास जाण्याआधी त्याचा सल्ला घेत असत अशी वदंता आहे. परखडपणात निन्यांचा हात धरणारा कोणी नाही. निन्यांनी खुद्द सलमान रश्दी यांना भिकार लिखाणाबद्दल धारेवर धरले होते. मिडनाईट चिल्ड्रन ही एक अत्यंत सुमार दर्जाची कादंबरी लिहिण्याऐवजी त्याच मिडनाईटचा सदुपयोग केला असतात तर प्रत्यक्षात पाच धा चिल्ड्रन पोटी जन्माला आली असती, त्यांचे डायपर बदलण्यात असले टुकार उद्योग करायला वेळ मिळाला नसता असे त्यांचे मत होते. या बाबतीत मात्र आमचे एकमत आहे. पुरस्कार वगैरे मिळालेले साहित्य भिकार असते असे आमचेही ठाम मत आहे. पुरस्कार मिळवण्यासाठी कुठे वशिला लावावा लागतो हे निन्यांप्रमाणेच आम्हालाही अद्याप माहीत झालेले नाही. सकाळी सकाळी असे परखडपणाचे बोलून झाले की मग पुढे संध्याकाळपर्यंत परखडपणा शक्यतो बंद असा त्यांचा नियम आहे. मग आंघोळ वगैरे करून दुपारच्या जेवणाची वेळ होईपर्यंत मिष्किलपणा करण्याचा नियम ते पाळतात.
कतरिना कैफ बाबतचे ते विधान अशाच काहीशा वेळेत झाले. म्याडमशी काही तरी लाडात बोलायला गेले आणि स्वत:च घाबरून ओरडले. म्याडम फेसप्याक लावून डोळ्यांवर काकडीच्या चकत्या लावून बसल्या होत्या म्हणे. ते पाहून निन्यांचेच डोळे निवले. मग त्यावर विनोदाने काहीतरी सौंदर्यवाचक विधान करायला गेले आणि मामला आणखी बिघडला. म्याडमनी तिथून हाकलून लावले. मग निन्या खिन्न होऊन टीव्हीसमोर बसले. तर तिथे क्रोएशिया या माहीतसुद्धा नसलेल्या देशात नुकत्याच निवडून आलेल्या अध्यक्षांबद्दल काही तरी बातमी चालू होती. निन्या आ वासून पाहतच राहिले. क्रोएशिया या देशाबद्दल त्यांना अचानक कुतूहल प्राप्त झाले. कारणच तसे होते. क्रोएशियातील लोकांनी सौंदर्यवाचक विधान करून सौंदर्यवाचक अध्यक्ष निवडून दिला होता. लोकशाही किती सुंदर असू शकते! तेवढ्यात म्याडमनी येऊन ते पाहिले आणि बरसल्या,"झालं! तरी म्हटलं तोंड उघडं ठेऊन एवढं काय पाहता आहात!" असं म्हणून त्यांनी च्यानेलच बदललं. आणि लावावं तरी कुठलं तर डीडी. हल्ली डीडी बघतो तरी कोण? काही तरी कार्यक्रम चालू होता आणि क्लोजअप गेला प्रणव मुखर्जींच्या चेहऱ्यावर. दूरदर्शन अस्तित्वात आल्यापासून नोकरीत असलेली ती प्रसिद्ध माशीही तिथेच घोंघावत होती. एवढी सिनीयॉरीटी पदरी असून असून तिचेही त्या चेहऱ्यावर बसण्याचे धाडस होत नव्हते. चेहऱ्याजवळ येऊन ती परत लांब जात होती. च्यानेल बदलल्यामुळे खिन्न झालेले निन्या प्रणव मुखर्जींचा शोकमग्न चेहरा पाहून आणखीच खिन्न झाले. केवढी दरी ही क्रोएशियासारख्या टीचभर आणि भारतासारख्या खंडप्राय देशात! क्रोएशियाला ती कोलिंदा नावाची गोड शिरापुरी आणि आमच्या नशिबी तेवढी शिळी बंगाली माछेर करी? तेवढ्यात कार्यक्रमाला कुठेही आणि केव्हाही कंट्रोलब्रेक करायचे या सरकारी नियमानुसार एकदम जाहिराती सुरू झाल्या. पहिलीच जाहिरात लक्स फ्रेश स्प्लॅशची. निन्या एकदम धडपडत उठून सावरून बसले. कतरिना कैफ निळ्या सॅटिनचा जब्बरी गाऊन घालून अंघोळमहोत्सव साजरा करायला निघाली होती. जनता तो अद्भुत स्नानसोहळा पाहण्यास तिच्या मागे उत्सुक अशी नाचत होती, आ वासून पाहत होती. मध्येच कतरिनाने हळुवार फुंकर घालून ते साबणमिश्रित पाणी जनतेच्या दिशेने फवारले. मागे उभे असलेल्या एका इसमाने गलीमध्ये फिल्डिंग करणाऱ्या जॉन्टी ऱ्होडसच्या चपळाईने ते झेलले. वाह ! निन्या टाळ्या वाजवत उभे राहिले. व्हॉट अ ब्रिलीयंट शॉट आणि इक्वली वेल फिल्डेड अशी कॉमेंटरी त्यांच्या तोंडून निघून गेली. इंदिराबाईंच्या नंतर (सोनियाबाईंचा माफक अपवाद वगळता) जनतेला अशी आपल्या तालावर नाचवणारी स्त्री त्यांनी पाहिली नव्हती. आम्हीही असा फवारायुक्त स्नानसोहळा पाहिला नव्हता. म्हणजे तसा, आमच्या गावात पटवर्धन सरकारांनी सुंदर नावाचा हत्ती पाळला होता, त्याची आंघोळ साधारण अशीच असायची. तोही असाच छान फवारे उडवायचा. पण ती अंघोळ पाहायला आमच्याप्रमाणे इतर दहाबारा उनाड मुले वगळली तर जनतेचे एवढे ब्याकिंग कधीच मिळाले नाही. निन्या खूप प्रभावित झाले. ठरले. कतरिना कैफला निदान, किमान, राष्ट्रपती व्हायलाच हवे. गार्ड ऑफ ऑनर देताना फक्त स्क्वॉड्रन लीडरच काय, सगळी बटालियन उजवीकडे मान वळवून सल्युट द्यायला उत्सुक झाली पाहिजे.
आता माणसाची विचारशृंखला कुठून कशी कुठे वाहवत जाईल यावर त्याचा स्वत:चा काही ताबा नसतो. लोकांनी निन्यांना फारच धारेवर धरलं. माफी मागायला लावलं. अशानं खोक्याच्या बाहेर (पक्षी:आऊट ऑफ द बॉक्स हो. बिल्डर, राजकारणी आणि खंडणीबहाद्दर विचार करतात ते हे खोके नव्हे) विचार करणारी माणसंच राहणार नाहीत. आम्हीही असेच आऊट ऑफ द बॉक्स वाले आहोत अशी आमची प्रामाणिक समजूत आहे. लहानपणी आम्ही असंच आऊट ऑफ बॉक्सवालं वागत असू. त्यावेळी आम्हाला पाठिंबा असायचा फक्त आमच्या मातोश्रींचा. तोही अगदी पाठ लाल होईतोवर. एकदा नात्यातल्या कुणाकडे तरी "विशेष" आहे असं मातोश्री वडिलांना सांगत होत्या. साहजिकच आनंद होऊन मी निरागसपणे (आईच्या मते आगाऊपणे. आमचे मतभेद होते हे उघड आहे. त्या वयात मला "विशेष" या शब्दाचा विशेष अर्थ माहीत होता ही बाबही चिंत्य आहे) विचारलं,"मग, आपल्याला आता खरवस खायला मिळणार?" आता यात टेक्निकली काय चूक आहे? आमच्या गवळ्यानं त्याची एखादी म्हैस गाभण आहे असं सांगितलं की आई लगेच चिकाचं बुकिंग करायची. तर "मेल्या, म्हशीत आणि बायकांत काहीच फरक वाटत नाही का तुला? तोंडाला काही हाड?" असं म्हणून माझ्या पाठीवर सणसणीत पाठिंबा व्यक्त झाला. फरक नक्कीच आहे हे मला त्याकाळीही कळत होतं. पुढे वयानुरूप आणि अनुभवानुरूप शंका उत्पन्न होऊ लागल्या तो भाग वेगळा. पण त्याबद्दल कधीतरी स्वतंत्र लिहीन. तूर्तास मुद्दा खोक्याबाहेर विचार करण्याचा आहे. त्यामुळे आमच्यासारख्याच बॉक्सवाल्यांना पाठिंबा देणं हे आमचं कर्तव्यच आहे असं आम्ही समजतो. निन्यांची विचार करण्याची पद्धत आमच्यासारखीच आहे. मुद्देसूद विचार करून तर्कशुद्ध निष्कर्षापर्यंत काय कुणीही येरू येईल. पण असंबद्धतेतून मोठे अर्थ लागतात, अपघातानं शोध लागतात हा जगाचा इतिहास आहे. झाडाखाली झोपा काढत बसलेल्या न्यूटनची सफरचंद टकलावर पडल्यामुळे झोपमोड झाली आणि गुरुत्वाकर्षणाबद्दल जगाला कळलं. हा शोध लागण्याआधी कुणी मोरू जिन्यावरून पाय घसरून पडला तर काळ्या मांजराला दोष दिला जायचा. काळी मांजरं तरी सुटली. आईनं पावसात जाऊ नकोस असं बाळ बेंजामिनला बजावलं असतानाही उनाडपणे पतंग उडवायला गेल्यामुळे विजेचा शोध लागला. या शोधामुळं रात्री काय करायचं हा प्रश्न सुटला आणि अकारण लोकसंख्या वाढू लागली होती ती कमी झाली. राजकारणात पडू नका असा सल्ला अण्णांनी दिला असला तरी पडल्यामुळे भारताला केजरीमल छाप डांग्या खोकला मिळाला. "हसत खेळत चिडत रुसत खोकत शिंकत भ्रष्टाचार विरोध" हे नवीन तंत्र लोकशाहीला मिळाले. असे हे सगळे खोक्याबाहेरचे लोक. त्यांना मुक्तपणे खोक्याबाहेर बागडू द्या. त्यांच्या मुक्त चिंतनाने राष्ट्राचे कल्याण जरी नाही झाले तरी धारावी तरी नक्की होणार नाही. तरीच आमच्या मातोश्री आम्हाला "डोकं आहे का खोकं तुझं" असं विचारायच्या.