Thursday, October 9, 2014

फशिवसेनेचा भगवावाद

फशिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं जरा कठीण झालं आहे. कमळाबाईनं ऐन वखताला त्यांना "friend-zoned" करून टाकलं आहे. लाडात येऊन डोळे बंद मुका घ्यायला पुढं जावं तर कमळाबाई ही बाई नसून चांगला धट्टाकट्टा बाप्या आहे, त्यानं शाखेची कडक खळ लावून इस्त्री केलेली चड्डी परिधान केली आहे, हातात दंडुका आहे, त्याला मिशा आहेत असं दिसावं आणि त्याच्या त्या भरघोस मर्दानी मिशा नाकात जाऊन शृंगार रसातून खडबडून बाहेर यावं असं त्यांचं झालं आहे. बाकी हे शिवसेनेचे अन्या-बाळ्या-पक्या-दिल्या(hereinafter referred as ABPD), मुलीला चांगलं प्रपोज करण्यापेक्षा "नडणारेच" जास्त. त्यांचे दोस्त लोक पण "लड बाप्पू, तू नड डायरेक, आपन हायेना फुल सपोर्टला." या टायपातले. कमळाबाई आणि फशिवसेना एकाच शाळेतले, पण हिंदुत्व या विषयावर अभ्यास करणे या एकाच समान हेतूने वह्यांची देवाणघेवाण करणे होत असे. सेनाबहाद्दर मुले  हिंदुत्वाच्या पेपरात सगळ्या प्रश्नांना "शिवाजी महाराज की जय!" एवढेच उत्तर देत असत. निदान महाराष्ट्रात तरी या उत्तराला शून्य मार्क द्यायची हिंमत कुठल्याच मास्तरात नाही हे त्यांना ठाऊक होते. वास्तविक, त्यांनी बाबासाहेब पुरंदऱ्यांच्या "राजा शिवछत्रपति" पुस्तकातील "होता जिवा म्हणून वाचला शिवा" आणि "लाल महाल आणि शाहिस्तेखानाची बोटे" अशी दोनच प्रकरणे वाचली होती. त्या पुण्याईवर हिंदुत्वात पस्तीस मार्क मिळायला काहीच हरकत नव्हती. महाराज गोब्राम्हण प्रतिपालक क्षत्रियकुलावतंस होते हे वाचल्यावर इतिहासात संस्कृत फार असते असे अनुमान त्यांनी काढले होते. पुरंदरे होते म्हणून महाराजांविषयी माहिती तरी कळली. चित्रे मात्र छान होती त्या पुस्तकात. बाकी सर्व विषयांत आनंदीआनंद होता. नाही म्हणायला पीटीचा तास आणि दरवर्षीचं शाळेचं स्नेहसंमेलन उर्फ "राडा" महोत्सव या दोन कार्यक्रमांत ही मंडळी अत्यंत उत्साहात वावरत. या महोत्सवात स्वयंसेवक मुलं "रणी फडकती लाखो झेंडे, अरुणाचा अवतार महा" असली स्फूर्तीदायक गीते सादर करीत असत तेव्हा ही राडामहोत्सवी बालके फ्या फ्या करून हसत असत. ही कोण अरुणा आणि तिचा कसला अवतार असे ते विचारीत. त्यावर "मराठीच्या तासाला कधीतरी बसत चला, कळेल" असे उत्तर स्वयंसेवक देत असत. त्यावर एखादा पक्या "मायला, निदान या अरुणाला बघायला तरी वर्गात जायला पायजे भौ." असे म्हणत असे. शिवाय, असल्या गीतवादी स्फूर्तीवर त्यांचा विश्वास नसे. प्रत्येकाने आपापली स्फूर्ती आपल्या खिशात बाळगली पाहिजे यावर हे राडावादी ठाम असत. किमान दोन क्वार्टर्स (नीट) स्फूर्ती खिशात असली पाहिजे असा त्यांचा आग्रह असे. दोन क्वार्टर्सवर चढलेला हिंदुत्ववाद सहजासहजी मोडून काढता येत नाही असा आमचा अनुभव आहे.

ऐन परीक्षेच्या टायमाला कमळाबाईनं तू तुझा तू अभ्यास कर असे सांगितल्यामुळे लैच प्रॉब्लेम झाला आहे. वर्षभरात पुस्तकं कुठं टाकली आहेत तेही लक्षात नव्हतं. आता खरंच अभ्यास करावा लागणार याचं टेन्शन तर होतंच. पण त्याहीपेक्षा, मिळालेल्या नकाराचं दु:ख जास्त होतं. ABPD लोकांचा चित्रपटांचा अभ्यास दांडगा असतो. मग प्रथम "ओय सेठ, अपुन तुम्हारे छोकरी का हाथ मांगा, कोई भीख नही, क्या?" असा मिथुन इष्टाईल थयथयाट करून झाल्यावर बच्चनसारखं लाल डोळे करून, एक डोळा चकणा करून "आज तक तुमने मेरी दोस्ती देखी है, अब दुश्मनी देखना."असा ड्वायलॉक टाकला गेला. आयला आपल्याला पटत न्हाई म्हंजे काय? दावतोच आता. आसल्या धा पोरी न्हाई पटवल्या तर नावाचा सैनिक नाही. मग चौकात जाऊन "जय भवानी, जय शिवाजी" अशा खच्चून घोष्णा दिल्या. पोरी तर पटल्या नाहीतच. उलट सगळे लोक घाईघाईने निघून गेले आणि दुकानांची शटरं खाली आली. "आरे या बंदच्या घोष्णा नाहीत. हा आमचा जाज्वल्य हिंदुत्ववाद आहे. त्या चड्डीवाल्यांसारखा फक्त दसऱ्याच्या संचलनाला दिसणारा नाही." असं समजावून सांगितलं तरी कुणी ऐकलं नाही.  मग कट्ट्यावर जमून ष्ट्रॅटेजी ठरवायचं ठरलं. अन्या हा त्यातल्या त्यात हुशार मानला जायचा कारण तो चष्मा लावायचा, जोडाक्षरं असलेले शब्द न अडखळता म्हणायचा. संध्याकाळी कट्ट्यावर बाकीचे सौंदर्यनिरीक्षणात मग्न असताना हा करारी चेहरा करून बसायचा. मनात आणलं तर लाथ मारीन तिथं पाणी काढीन असा त्याला आत्मविश्वास होता. पाण्याचं ठीक आहे, पण मुलींचं कठीण आहे हे त्याला मनातून माहीत होतं. मग हळूच चष्म्यातून चोरून बघायचा. पण आता ते करायला वेळ नव्हता. चड्डीवाल्यांपेक्षा आपण जास्त भगवे कसे दिसू याची चिंता लागून राहिली. राडा करणे, बंद घडवून आणणे, गणपतीच्या टायमाला न विचारता पावती फाडणे, त्यावर एखाद्याने तक्रार केलीच तर त्याचे कपडे फाडणे, प्रश्नावर लोकशाही पद्धतीने चर्चा करण्यापेक्षा आमच्या "सेना" ष्टाईलने उत्तर दिले जाईल असे म्हणणे हे सर्व हिंदुत्वात कसं बसवायचं? शिवाय शिवाजीमहाराजांच्या चरित्रात त्यांनी असं काही केलं आहे का याचा शोध घ्यावा का? असे प्रश्न उभे राहिले. शिवाजीमहाराजांचं चरित्र मुळात वाचून काढणे या कल्पनेला तत्काळ विरोध झाला. पक्या म्हणाला, अरे परवा काश्मीरमध्ये पुराने धुमशान घातले तेव्हा हे चड्डीवाले लेकाचे हिंदुत्व विसरून त्या गद्दारांना मदत करायला गेले. आपण आपल्या हिंदुत्वावर ठाम राहिलो, अजिबात गेलो नाही. तरीही लोक चड्डीवाल्यांचा एवढा आदर का करत आहेत?

महाराजांचं चरित्र मुळात वाचलं असतं तर पहिल्या काही पानांतच उत्तरे मिळाली असती. सर्वात प्रथम हे कळलं असतं की महाराज सर्वांना एकत्र जोडणारे व्यक्तिमत्व होते. स्वराज्य मिळवणारी दृष्टी त्यांची, मिळवणारे हात त्यांच्या सवंगड्यांचे होते. त्यांच्या जिवाला जीव देणारे सवंगडी त्यांनी जोडले होते. भवानी मातेनं तलवार मला  दिली आहे, तुम्हांला नाही, असे त्यांनी म्हटले नाही. संघशक्ति  आणि दंडशक्ति यांचा योग्य संगम झाला तर स्वराज्य तर मिळेलच पण ते सुराज्यही असेल. मुसलमानांना विरोध म्हणजे हिंदुत्व नाही. महाराजांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केला कारण त्यावेळी मुघल माजले होते. धर्माच्या नावाखाली अत्याचार करीत होते, कर बसवत होते, आयाबहिणींची अब्रू लुटत होते. असल्या अधर्माच्या प्रतिकारासाठी हिंदुत्व आवश्यकच होते. शिवसेनेची फशिवसेना होण्यापूर्वी पंचवीस वर्षे संघशक्ति आणि दंडशक्ति एकत्र आल्याचे स्वप्न टिकून होते. शिवाजीमहाराजांचे नाव घेता घेता आपणच शिवाजी झालो असा भ्रम सेनेला झाला आणि ते स्वप्न भंगले. नुसतं आपण शिवाजी असा भासच नव्हे तर इतकी वर्षे ज्याच्या खांद्याला खांदा लावून जुझं लढली, तो अचानक अफजलखान असल्याचा अजब साक्षात्कारसुद्धा झाला. पण त्या वाटण्याचं इतकं काही वाटून घ्यायला नको. महाराष्ट्र ही नाटक या कलेची मातृभूमी आहे. इथे भूमिकेशी समरस होऊन त्यात घुसणारे नट-बोलट आहेत. त्यातलाच हा प्रकार. अंक संपला, तोंडावरचा रंग पुसला गेला की महाराजांचा पुन्हा आपला नेहमीचा "अन्या" होऊन जाईल. लहानपणी एकदा मी वडिलांबरोबर दशावतार पाहायला गेलो होतो. त्यात कर्णाची भूमिका करणारा नट अत्यंत तेजस्वी, बाणेदार, करारी, शूर असा दिसत होता. त्याची वेषभूषा, अभिनय पाहून मला वाटले खराखुरा कर्ण असला तर तो असाच असला पाहिजे. कोकणातील ते गाव. जेमतेम उघडा रंगमंच होता. अचानक धो धो पाऊस आला. सगळ्यांची त्रेधा उडाली. सर्व धावत पळत शेजारच्या इमारतीत शिरले. माझ्या शेजारी "हे वृषाली! आम्ही रणांगणावर जाताना अश्रू गाळणे हे असे वीरपत्नीचे लक्षण नाही. अभिमानाने औक्षण करून आम्हांस निरोप द्यावा!" असे वीररसपूर्ण उद्गार काढणारा कर्ण उभा होता. हेल्मेट काढावे तसे मस्तकावरील मुकुट काढून त्याने तो हातात घेतला होता. "श्या! शिरां पडली या पावसार ती. काल बांद्यात प्रयोग होतो तो असोच कॅन्सल झालो!" असे त्याने उद्गार काढले. त्याला वृषालीनेही पदर पिळत पिळत "काय गे बाये, यंदा पावसांचा काय खरां नाय." असा दुजोरा दिला. 

No comments:

Post a Comment