मोबाईलच काय कुठलेच बिल भरायला आम्हाला आवडत नाही. हॉटेलचे (आमचे नेहमीचे हॉटेल सन्मान, प्रोप्रा. नार्वेकर, जेवणाची नाष्ट्याची उत्तम सोय) बिलही तिथे भांडी घासायला लागू नयेत म्हणून नाईलाजाने द्यावे लागते. आमचा आख्खा जल्म रानडे रोड, मुंबई २८ परिसरात गेला, पण आमचा अभ्यास साऱ्या विश्वाचा. (महाराष्ट्र हेच आमचे विश्व. हो, त्यात विदर्भ सुद्धा आला. विश्वापासून वेगळ्या विदर्भाची मागणी आज होत आहे त्याला आमचा कडाडून विरोध राहील. ) आमचे वाचन थोर, लेखन घनघोर हे ध्यानात घ्या. लेखकाला कुणालाही सल्ला, इशारा देता येतो. अन्यायाला वाचा फोडणे हे आमचे कर्तव्य आहे असे आम्ही मानतो. कोणत्याही प्रक्रियेत पारदर्शकता हवी असा आग्रह आम्ही बालपणापासूनच धरत आलो आहोत. शाळेत असताना अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक हस्तलिखित आम्ही सुरू केले होते. त्याला "निवळशंख" असे नाव दिले होते. स्वच्छ पाण्याची प्रतिमा आणि ठणाणा करणारा शंख एकत्र आले तर क्रांती होईल असे आमचे त्याकाळी मत होते. आजही आहे. पण हल्ली आमच्याकडे पाणी सकाळी पाच वाजता येते आणि सात वाजता जाते. त्यामुळे ते सकाळचे दोन तास निवळ आणि उरलेले बावीस तास शंख अशी वाटणी झाली आहे. "निवळशंख"चा कारभार स्वीकारल्यानंतर पहिला प्रश्न हाती आला तो प्रश्नपत्रिकेचा. इयत्ता पाचवीपासून नववीपर्यंत आम्ही या प्रश्नाला बळी पडत आलो होतो. अनेक विद्यार्थ्यांशी बोलल्यावर मास्तरांच्या मर्जीतील चारपाच आगाऊ मंडळी सोडली तर बहुतांशी आपल्याप्रमाणेच या प्रश्नाचे बळी ठरताहेत हे ध्यानात आले. मग या प्रश्नाचा आम्ही सखोल अभ्यास केला. प्रश्नपत्रिका गुप्त ठेवण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे हे तर उघड झालेच पण उत्तरपत्रिकेच्या तपासणीतही अजिबात पारदर्शकता नाही हेही विदारक सत्य बाहेर आले. "निवळशंख" च्या पहिल्या अंकात आम्ही या व्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवला. "मुख्याध्यापकांचे डोके ठिकाणावर आहे काय?" या आमच्या अग्रलेखाने खळबळ माजवली. तो वाचून क्षणभर मुख्याध्यापकांनीही टोपी नीट करण्याच्या बहाण्याने आपले डोके चाचपून पाहिल्याचे आमच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नव्हते. वास्तविक त्यांनी कपाळाला हात लावला होता हे आमच्या समीक्षाकारांचे म्हणणे आम्हांस मान्य नाही. अग्रलेखात आम्ही परीक्षा ही एकूणच कशी मुस्कटदाबी करणारी व्यवस्था आहे याचे विवेचन करून त्यात आमूलाग्र बदल सुचवले होते. "माहितीचा अधिकार" ही संकल्पना त्याकाळी प्रथम आम्ही मांडली होती. आज त्याचे श्रेय काही सातवी पास मंडळी उकळताहेत, पण आम्ही श्रेयाच्या मागे कधीच नव्हतो. (या श्रेयाचा आमच्या वर्गातील श्रेया परांजपेशी काही संबंध नाही. आम्ही तिच्याही मागे नव्हतो. कधीच. तिने मागे वळून चप्पल दाखवली तेव्हाही.) आम्ही "निवळशंख" मध्ये सुचवलेल्या बदलात विद्यार्थ्यांना माहितीच्या अधिकाराखाली परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत हे जाणून घेता येणार होते. माहिती नाकारल्यास विद्यार्थ्यांस फी भरण्यास आणि परीक्षेस बसण्यास नकार देण्याचा हक्क होता. पाल्यास आपले पालक म्हणून स्वत:च सही करता यावी याचीही मागणी केली होती. वह्यापुस्तके आणणे सक्तीचे नसावे, शाळेच्या वेळा या विद्यार्थ्यांस सोयीच्या असाव्यात, अशा काही उपसुधारणाही त्यात होत्या. याचा परिणाम म्हणून मुख्याध्यापकांनी छडीची मागणी केली आणि आमच्या पृष्ठभागावर अनेक सुधारणा घडवून आणल्या. भगतसिंगांचे नाव घेऊन आम्ही त्या सुधारणा ब्रही न काढता सहन केल्या. पुढच्या पिढीचे जीवन सुसह्य व्हायचे असेल तर आधीच्या पिढीत हुतात्मा जन्मास यावेच लागतात. (या वाक्यात काहीतरी चुकले आहे असे वाटते, प्रूफ रीडिंगच्या वेळेस पुन्हा पाहू.) मुख्याध्यापकांनी आमच्या "निवळशंखा"चा बोळा करून केराच्या टोपलीत टाकला. अशी मुस्कटदाबी करून हे क्रांतिकारी विचार दबले जाणार नाहीत, एक अंक नष्ट केलात पण त्याच्या इतर कॉपींचे काय कराल? पण लक्षात आले आमच्या हस्तलिखिताची ती एकमेव कॉपी होती. सर तासावर गेले की तो बोळा हस्तगत करायचा असे ठरवले.
आजही आम्ही आमचा स्वाभिमान, सन्मान इत्यादी टिकवून आहोत. "निवळशंख"ची परंपरा आम्ही चालू ठेवली आहे. विश्वातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत हा एक ज्वलंत प्रश्न आहे. त्याचा आम्ही सखोल अभ्यास केला. सावकारी, ब्यान्कांची कर्जं, वेळेला न पडणारा पाऊस, गारपीट, कीड (रेग्युलर कीड, बारामती कीड नव्हे) इत्यादी नेहमीची कारणं तर आहेतच, पण आमच्या असेही लक्षात आले की विजेचा धक्का बसूनही शेतकरी मरण पावताहेत. पाण्यासाठी मोटर बसवायची. विजेचं कनेक्शन देणारा इलेक्ट्रिशियन गावातलाच. त्याचं क्वालिफिकेशन म्हणजे "गेली धा वर्षं हे करतोय, येक पन मोटर उडालेली न्हाई" हे. मग हे कनेक्शन कधीतरी "शॉर्ट" व्हायचं आणि मोटर सुरू करायला गेलेल्या म्हादबाचं आयुष्य शॉर्ट व्हायचं. मोटर तेवढी शाबूत. असे धक्कादायक मृत्यू वाढायला लागले. मग त्याची चौकशी करायला समिती आली. त्या समितीनं वीज हेच मृत्यूचं कारण असा अहवाल दिला आणि वीज तोडा, आपोआप मृत्यूचं प्रमाण कमी होईल अशी शिफारस केली. इथंच आमचा विरोध सुरू झाला. आम्ही स्वतंत्रपणे केलेल्या चौकशीत असं लक्षात आलं की जे विजेचा धक्का बसून मरत नव्हते ते विजेचं बिल पाहून प्राण सोडताहेत. वीज तोडल्यानं एका प्रकारचे मृत्यू कमी होतील पण बिलाचं काय? वीज तोडली तरी वीज मंडळ बिलं फाडतं आहेच. तेव्हा शेतकऱ्यांनो, अजिबात विजेचं बिल भरू नका असा इशारावजा सल्ला आम्ही आमच्या दैनिक "टोमणा"तून दिला. आमचा टोमणा खडसे मास्तरांना फार झोंबला. "मोबाईलचं बिल भरता, मग विजेचं भरायला काय धाड भरलीय?" असा उन्मत्त सवाल त्यांनी केला. ते ऐकून आम्ही क्षणभर ब्याटरी संपलेल्या मोबाईलप्रमाणे निपचीत पडलो. आमच्याशिवाय दुसऱ्या कुणी मस्तीची भाषा केलेली आम्हाला आवडत नाही. ते आमचे कुरण आहे. त्यात आम्ही चरणार. आमच्या "टोमण्या"ची सगळी सदरे त्यावर चालतात. आमच्या जाहिरातदारांनाही आम्ही "द्यायची असेल जाहिरात तर द्या नाहीतर फुटा इथून" असे जाम सडेतोड उत्तर देतो. पण खडसे मास्तरांनी सवालही असा केला होता की त्याचं खंडन करणं जरा कठीण होतं. खरंच, मोबाईलचं बिल आम्ही का भरतो? ते उत्तर मिळेपर्यंत आम्ही खडसे यांना खडसावलं,"ओ मास्तर, फार जोरात बोलू नका! तुमच्या आधीचे ते धरणवाले असंच काहीबाही बोलले होते. आता धरणातच काय, त्यांना रस्त्याच्या कडेला गाडी लावून गवतातसुद्धा निवांत धार मारता येत नाही. लांबचा प्रवास असेल तर हल्ली बिसलेरीच्या रिकाम्या बाटल्या गाडीत ठेवून फिरतात ते. तेव्हा, वीज बिल न भरणं आमचा हक्क आहे आणि आम्ही तो बजावणारच!" असे बजावून आम्ही खुशीत बसलो होतो. पण खडसे मास्तरांनी वडाची साल पिंपळाला लावलीच. म्हणे रानडे रोड, मुंबई २८ मध्ये बसून शेतकऱ्यांच्या समस्या तुम्हाला काय कळणार? भुईमूग कुठे उगवतो हे तरी ठाऊक आहे का तुम्हाला? कृषीमंत्री व्हायला शेतकरी असणे आवश्यक असेल तर, परिवहन मंत्री व्हायला किमान पाच वर्षांचा ट्रक (क्लास D) ड्रायवर असल्याचा किंवा सात वर्षांचा किन्नर (हा यक्ष किन्नर मधला किन्नर नव्हे)असल्याचा अनुभव आवश्यक असायला हवा. अवजड उद्योगमंत्रीपद स्वत: मुख्यमंत्र्यांनी किंवा गडकरींनी घ्यायला हवं. तेव्हा, हा प्रश्न कैच्या कैच. तसं आम्हाला भुईमूग कुठे उगवतं ते चांगलं माहीत आहे. लहानपणी डालड्याच्या डब्यात गाजर लावायचा प्रयोग आम्ही नेहमी करत असू. गाजर काय भुईमूग काय, डबा चांगला हवा, गळका नको. म्हणजे गळका असला तर गाजराला काही धोका नव्हता, पण पाणी गळलं की खालच्या मजल्यावरचे जोशी बोंब मारायचे. ग्यालरीत त्यांचा पायजमा वाळत टाकलेला असायचा.
मोबाईलचं बिल आम्ही का भरतो या प्रश्नानं आम्ही अस्वस्थ झालो होतो. त्या विचारातच आम्ही बाथरूममध्ये गेलो. आमच्या प्रतिभासाधन आणि विचारमंथनाची जागा ती. अनेक क्लिष्ट राजकीय सामाजिक प्रमेये आम्हाला इथेच सुटली आहेत. विचारात गर्क होतो. त्या विचारातच अंघोळीला सुरुवात केली. आपले शरीर ही विधानसभा आहे असे मानून खसाखसा साबण लावून नखशिखांत फेसात बुडलो होतो. तर अचानक शॉवरमधून पाणी यायचे बंद झाले. टाकीतले पाणी संपले वाटतं असे म्हणून चडफडत असताना बाथरूममधील लाईटही बंद झाला. "च्या मायला! विजेला काय झालं आता?" असं म्हणून आंधळी कोशिंबीर खेळत शॉवर मधून बाहेर आलो. टॉवेल, कपडे आणि माझ्यात वीजबिल वाट अडवून उभे आहे की काय? पर्यायाने खडसे मास्तरच माझ्यासमोर वीजबिल फडफडवत उभे राहिले आहेत असे वाटले. अरे खडश्या, माझ्या अब्रूवर असा घाला घालतोस काय? तेव्हा बेसिनच्या काऊंटरवर अचानक मोबाईल हाती लागला. युरेका! असे ओरडून मी त्यातली विजेरी लावली आणि सर्व सत्यावर झगझगीत प्रकाश पडला. मोबाईल नसता तर, वीज येईपर्यंत आत तपश्चर्या करत बसणे एवढेच हातात होते. दुसरे दिवशी मग "टोमण्या"त माझा प्रतिवाद छापायचं ठरवलं. शीर्षक दिलं,"मोबाईल विना…" खडसे साहेब, मोबाईल सर्वत्र चालतो. घरही नाही आणि दारही नाही अशा ठिकाणी, अत्यंत अवघड जागी, पार उघडे पडलेल्यालाही आधार मोबाईलचाच असतो. जिथे मदतीसाठी आरडाओरडा करता येत नाही आणि तरीही कुणी मदतीला आलेच तर मदत घेताही येत नाही अशा ठिकाणी आधार असतो तो मोबाईलचाच. एवढंच काय, भुईमूग कुठे उगवतात असं मी "सिरी"ला विचारलं तर तिनं भुईमुगाची माहिती तर दिलीच, वर त्यावर पडणाऱ्या रोगांचीही इत्तंभूत माहिती दिली. लगे हाथो "कमळाला होणारा भुंग्यांचा प्रादुर्भाव आणि त्याचे निवारण" यावरही माहिती घेतली. तेव्हा खडसे साहेब, भुईमूग कुठे उगवतात तर आम्हाला कळेलच, पण ते कुठे लपवतात याचीही माहिती हा मोबाईल देईल. भुईमुगात एक उपटसूळ नावाची जात असते, ती खाल्ली म्हणजे खूप पित्त होते. आपल्याला या जातीची माहिती आहे काय? असा सवाल करून आम्ही अग्रलेख संपवला. छापखान्यात पाठवून दिला.
सकाळी चहा घेताना, म्हटलं आमचा "टोमणा" प्रसिद्ध झालाय की नाही पाहावा. म्हणून दार उघडून पाहिलं तर अंक टाकला नव्हता. बाकीचे लेकाचे सगळे हजर होते. ठोकसत्ता, महाखाष्ट टाइम्स इत्यादि. आमचाच टोमणा लेकाचा गायब होता. छापखान्याला फोन लावला, तर आमचे दिव्य म्यानेजर सांगू लागले,"साहेब, काल रात्रीलाच वीज गेलीय. सगळी प्रुफं रेडी आहेत. कधीचा तुम्हाला फोन लावतोय तर "आऊट ऑफ नेटवर्क" असा संदेश ऐकू येतोय. वीज आली की छापतो साहेब. काही टाईम-सेन्सिटीव्ह बाईट छापायचा होता का?" खिन्न होऊन फोन ठेवला.
आजही आम्ही आमचा स्वाभिमान, सन्मान इत्यादी टिकवून आहोत. "निवळशंख"ची परंपरा आम्ही चालू ठेवली आहे. विश्वातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत हा एक ज्वलंत प्रश्न आहे. त्याचा आम्ही सखोल अभ्यास केला. सावकारी, ब्यान्कांची कर्जं, वेळेला न पडणारा पाऊस, गारपीट, कीड (रेग्युलर कीड, बारामती कीड नव्हे) इत्यादी नेहमीची कारणं तर आहेतच, पण आमच्या असेही लक्षात आले की विजेचा धक्का बसूनही शेतकरी मरण पावताहेत. पाण्यासाठी मोटर बसवायची. विजेचं कनेक्शन देणारा इलेक्ट्रिशियन गावातलाच. त्याचं क्वालिफिकेशन म्हणजे "गेली धा वर्षं हे करतोय, येक पन मोटर उडालेली न्हाई" हे. मग हे कनेक्शन कधीतरी "शॉर्ट" व्हायचं आणि मोटर सुरू करायला गेलेल्या म्हादबाचं आयुष्य शॉर्ट व्हायचं. मोटर तेवढी शाबूत. असे धक्कादायक मृत्यू वाढायला लागले. मग त्याची चौकशी करायला समिती आली. त्या समितीनं वीज हेच मृत्यूचं कारण असा अहवाल दिला आणि वीज तोडा, आपोआप मृत्यूचं प्रमाण कमी होईल अशी शिफारस केली. इथंच आमचा विरोध सुरू झाला. आम्ही स्वतंत्रपणे केलेल्या चौकशीत असं लक्षात आलं की जे विजेचा धक्का बसून मरत नव्हते ते विजेचं बिल पाहून प्राण सोडताहेत. वीज तोडल्यानं एका प्रकारचे मृत्यू कमी होतील पण बिलाचं काय? वीज तोडली तरी वीज मंडळ बिलं फाडतं आहेच. तेव्हा शेतकऱ्यांनो, अजिबात विजेचं बिल भरू नका असा इशारावजा सल्ला आम्ही आमच्या दैनिक "टोमणा"तून दिला. आमचा टोमणा खडसे मास्तरांना फार झोंबला. "मोबाईलचं बिल भरता, मग विजेचं भरायला काय धाड भरलीय?" असा उन्मत्त सवाल त्यांनी केला. ते ऐकून आम्ही क्षणभर ब्याटरी संपलेल्या मोबाईलप्रमाणे निपचीत पडलो. आमच्याशिवाय दुसऱ्या कुणी मस्तीची भाषा केलेली आम्हाला आवडत नाही. ते आमचे कुरण आहे. त्यात आम्ही चरणार. आमच्या "टोमण्या"ची सगळी सदरे त्यावर चालतात. आमच्या जाहिरातदारांनाही आम्ही "द्यायची असेल जाहिरात तर द्या नाहीतर फुटा इथून" असे जाम सडेतोड उत्तर देतो. पण खडसे मास्तरांनी सवालही असा केला होता की त्याचं खंडन करणं जरा कठीण होतं. खरंच, मोबाईलचं बिल आम्ही का भरतो? ते उत्तर मिळेपर्यंत आम्ही खडसे यांना खडसावलं,"ओ मास्तर, फार जोरात बोलू नका! तुमच्या आधीचे ते धरणवाले असंच काहीबाही बोलले होते. आता धरणातच काय, त्यांना रस्त्याच्या कडेला गाडी लावून गवतातसुद्धा निवांत धार मारता येत नाही. लांबचा प्रवास असेल तर हल्ली बिसलेरीच्या रिकाम्या बाटल्या गाडीत ठेवून फिरतात ते. तेव्हा, वीज बिल न भरणं आमचा हक्क आहे आणि आम्ही तो बजावणारच!" असे बजावून आम्ही खुशीत बसलो होतो. पण खडसे मास्तरांनी वडाची साल पिंपळाला लावलीच. म्हणे रानडे रोड, मुंबई २८ मध्ये बसून शेतकऱ्यांच्या समस्या तुम्हाला काय कळणार? भुईमूग कुठे उगवतो हे तरी ठाऊक आहे का तुम्हाला? कृषीमंत्री व्हायला शेतकरी असणे आवश्यक असेल तर, परिवहन मंत्री व्हायला किमान पाच वर्षांचा ट्रक (क्लास D) ड्रायवर असल्याचा किंवा सात वर्षांचा किन्नर (हा यक्ष किन्नर मधला किन्नर नव्हे)असल्याचा अनुभव आवश्यक असायला हवा. अवजड उद्योगमंत्रीपद स्वत: मुख्यमंत्र्यांनी किंवा गडकरींनी घ्यायला हवं. तेव्हा, हा प्रश्न कैच्या कैच. तसं आम्हाला भुईमूग कुठे उगवतं ते चांगलं माहीत आहे. लहानपणी डालड्याच्या डब्यात गाजर लावायचा प्रयोग आम्ही नेहमी करत असू. गाजर काय भुईमूग काय, डबा चांगला हवा, गळका नको. म्हणजे गळका असला तर गाजराला काही धोका नव्हता, पण पाणी गळलं की खालच्या मजल्यावरचे जोशी बोंब मारायचे. ग्यालरीत त्यांचा पायजमा वाळत टाकलेला असायचा.
मोबाईलचं बिल आम्ही का भरतो या प्रश्नानं आम्ही अस्वस्थ झालो होतो. त्या विचारातच आम्ही बाथरूममध्ये गेलो. आमच्या प्रतिभासाधन आणि विचारमंथनाची जागा ती. अनेक क्लिष्ट राजकीय सामाजिक प्रमेये आम्हाला इथेच सुटली आहेत. विचारात गर्क होतो. त्या विचारातच अंघोळीला सुरुवात केली. आपले शरीर ही विधानसभा आहे असे मानून खसाखसा साबण लावून नखशिखांत फेसात बुडलो होतो. तर अचानक शॉवरमधून पाणी यायचे बंद झाले. टाकीतले पाणी संपले वाटतं असे म्हणून चडफडत असताना बाथरूममधील लाईटही बंद झाला. "च्या मायला! विजेला काय झालं आता?" असं म्हणून आंधळी कोशिंबीर खेळत शॉवर मधून बाहेर आलो. टॉवेल, कपडे आणि माझ्यात वीजबिल वाट अडवून उभे आहे की काय? पर्यायाने खडसे मास्तरच माझ्यासमोर वीजबिल फडफडवत उभे राहिले आहेत असे वाटले. अरे खडश्या, माझ्या अब्रूवर असा घाला घालतोस काय? तेव्हा बेसिनच्या काऊंटरवर अचानक मोबाईल हाती लागला. युरेका! असे ओरडून मी त्यातली विजेरी लावली आणि सर्व सत्यावर झगझगीत प्रकाश पडला. मोबाईल नसता तर, वीज येईपर्यंत आत तपश्चर्या करत बसणे एवढेच हातात होते. दुसरे दिवशी मग "टोमण्या"त माझा प्रतिवाद छापायचं ठरवलं. शीर्षक दिलं,"मोबाईल विना…" खडसे साहेब, मोबाईल सर्वत्र चालतो. घरही नाही आणि दारही नाही अशा ठिकाणी, अत्यंत अवघड जागी, पार उघडे पडलेल्यालाही आधार मोबाईलचाच असतो. जिथे मदतीसाठी आरडाओरडा करता येत नाही आणि तरीही कुणी मदतीला आलेच तर मदत घेताही येत नाही अशा ठिकाणी आधार असतो तो मोबाईलचाच. एवढंच काय, भुईमूग कुठे उगवतात असं मी "सिरी"ला विचारलं तर तिनं भुईमुगाची माहिती तर दिलीच, वर त्यावर पडणाऱ्या रोगांचीही इत्तंभूत माहिती दिली. लगे हाथो "कमळाला होणारा भुंग्यांचा प्रादुर्भाव आणि त्याचे निवारण" यावरही माहिती घेतली. तेव्हा खडसे साहेब, भुईमूग कुठे उगवतात तर आम्हाला कळेलच, पण ते कुठे लपवतात याचीही माहिती हा मोबाईल देईल. भुईमुगात एक उपटसूळ नावाची जात असते, ती खाल्ली म्हणजे खूप पित्त होते. आपल्याला या जातीची माहिती आहे काय? असा सवाल करून आम्ही अग्रलेख संपवला. छापखान्यात पाठवून दिला.
सकाळी चहा घेताना, म्हटलं आमचा "टोमणा" प्रसिद्ध झालाय की नाही पाहावा. म्हणून दार उघडून पाहिलं तर अंक टाकला नव्हता. बाकीचे लेकाचे सगळे हजर होते. ठोकसत्ता, महाखाष्ट टाइम्स इत्यादि. आमचाच टोमणा लेकाचा गायब होता. छापखान्याला फोन लावला, तर आमचे दिव्य म्यानेजर सांगू लागले,"साहेब, काल रात्रीलाच वीज गेलीय. सगळी प्रुफं रेडी आहेत. कधीचा तुम्हाला फोन लावतोय तर "आऊट ऑफ नेटवर्क" असा संदेश ऐकू येतोय. वीज आली की छापतो साहेब. काही टाईम-सेन्सिटीव्ह बाईट छापायचा होता का?" खिन्न होऊन फोन ठेवला.