Friday, November 27, 2015

भजीपाव-चटणी

लीलाबाईंनी हाती घेतलेला नवीन प्रोजेक्ट - भजीपाव-चटणी. यात लसूण चटणी आणि खोबऱ्याची चटणी यांच्यात द्वंद्वगीत रंगवले असून शेवटी दोन्ही चटण्या हातमिळवणी करून पावाचे भजे करतात असे दाखवले आहे. मराठी अस्मिता म्हटले की ओघाने द्वंद्व आलेच. लीलाताईंनी आधीच्या प्रोजेक्टमधून मिळालेल्या धड्याला स्मरून यावेळी मात्र "बटाटा आणि कांदा भजी" याविषयात अधिकारी असणारे "महाराष्ट्र भजी केंद्र" (बाजीराव रस्ता, नाना फडणीस वाड्यासमोर. पूर्वेला. पश्चिमेला नव्हे, तिथे मयताचे पास मिळतात) यांचे मार्गदर्शन घेतले आहे. त्याचे प्रत्यंतर सिनेमात वारंवार येते. भजीपावाचे पात्र भावे यांनी रंगवले आहे. त्यांच्या केसातून गळत असलेले मुबलक तेल पाहून हे भजे अस्सल मराठीच यात शंका राहत नाही आणि येथेच लीलाबाईंच्या दिग्दर्शनाला दाद दिल्याशिवाय राहवत नाही. लसणाच्या चटणीचे पात्र बर्वीण बाईंनी (हो तीच ती, येरे घना येरे घना असं म्हणून आपण मात्र भाव खा रे माझ्या मना म्हणणारी) छान रंगवले आहे. हातवारेफेम सचिन यांनी शेवटी सगळ्याचे (इथेही) खोबरे केले आहे. चांगल्या अर्थाने. नारळ चांगला वाजला तर खोबरे चांगले, बद्द वाजला तर खऊट. सिनेमाचे तसेच असते. कट्यार काळजातून केव्हाच बाहेर आली पण खांसाहेबांचे हातवारे अद्याप आतच अडकले आहेत. कट्यार पाहताना हातवारे पाहावे की खांसाहेबांच्या आठ्या पहाव्यात अशा गोड संभ्रमात प्रेक्षक पडला होता. दिग्दर्शक भावेंनी ते हातवारे इतके जिवंत केले होते की थेटरमधील पहिल्या दोन रांगा रिकाम्या राहू लागल्या होत्या. न जाणो हात आणखी पुढे आला तर कानफटीत बसायची. भजीपाव-चटणीतही तेच हातवारे सचिनने आणले आणि चटणीचे खोबरे केले.

या चित्रपटनिर्मितीमागे प्रचंड अभ्यास केला गेलेला दिसला. महाराष्ट्रात भज्यांचे महत्व प्राचीन कालापासून चालत आलेले आहे. प्राकृतात "बट्टभज्ज कृती" दिलेले किती तरी शिलालेख आज महाराष्ट्रात जागोजागी आढळतात असा शासनाच्या पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे प्रमुख एस एस दांगट यांचा दावा आहे. विक्रमोर्वशीयात एके ठिकाणी "ही ही भो णिमन्तणोवाअणेण बह्मणो विअ राअरहस्सेण फ़ुट्टमाणो ण सक्कुणोमि आइण्णे अत्तणो जीहं रख्खिदुं । ता जाव तत्तभवं वअस्सो बट्टभज्जासणादो ।" असा उल्लेखही आहे. यावरून अगदी पुरातन काळापासून गृहिणी भज्यांच्या पाककृतीत प्रवीण होत्या आणि ते एक सणावाराचे पारंपारिक पक्वान्न होते हे सिद्ध होते. नेमके हेच सूत्र लीलाबाईंना भावले. ओढा ओलांडताना धोतराचा सोगा उचलून जसा घट्ट धरून ठेवतात तसे त्यांनी ते सूत्र पूर्ण चित्रपटभर धरून ठेवले आहे. न जाणो सोगा सुटला तर काय घ्या. मराठी अस्मिता तलवार घेऊन मागे लागायची. त्यामुळे संवादासंवादात प्राचीन दाखले दिले गेले आहेत. बटाट्याचे भजी करण्यासाठी काप करत असतानाचे दृश्य हे प्रातिनिधिक आहे. बटाट्यावर क्यामेरा झूम होतो, मग धूसर होतो आणि मग जेव्हा पडदा स्पष्ट होतो तेव्हा दिसतो एक शिलालेख. खास अमिताभ बच्चन यांच्या धीरगंभीर आवाजात "महाराष्ट्र की परंपरा बहुत पुरानी है. आज से पाचहजार साल पहले, मुघलोंके घुडसवार धरतीका बलात्कार करने अभी आये नही थे, ये धरती सुजलाम सुफलाम थी, तब यहां की संस्कृती सोनेसेभी कीमती मानी जाती थी. अभ्यागत का स्वागत बडेही प्रेमभावसे किया जाता था. बटाटा या कांदा भजी ये उस संस्कृती का अविभाज्य घटक माना जाता था. यही लिखा है इस शिलालेख में… " असे शब्द ऐकू येतात. नंतर प्राकृत, अर्धमागधीवर गेली तीस वर्षे अभ्यास करणारे प्रा. घनघोर यांच्याशी थोडी चर्चा. एक पाच-दहा मिनिटे प्रेक्षकाला असं इतिहासात सचैल बुचकळून काढलं की पुन्हा फेडअवे आणि मूळ दृश्यात परत. एका दृश्यात तर सलग पाच मिनिटे (आंद्रे तारकोव्स्की, घे लेका सलग शॉटचा नमुना!) पंगतीचे दृश्य दाखवले आहे. पुरुष शुचिर्भूत होऊन पंगतीत बसले आहेत. समोर रांगोळी काढलेली, चौरंग, चांदीची तांब्या भांडी, बोटे बुडवण्यासाठी केशराच्या पाण्याची वाटी, बटाट्यात लावलेल्या उदबत्त्या असा थाट. सोवळ्यातील आचारी, वाढपी. आणि शिगोशीग भरलेली भजांची ताटे. वा! असे ब्राम्हण जेवूनी तृप्त झाले! लीलाबाईंनी यावेळी मात्र इतिहासाला सोडले नाही हं असे उद्गार काढतच प्रेक्षक सिनेमागृहातून बाहेर पडणार हे नक्की.

तेव्हा अगदी आवर्जून पहा. जेव्हा येईल तेव्हा. आम्ही लीलाबाईंच्या जवळचे असल्यामुळे हा प्रकल्प आकारास येत असताना पाहायला मिळाला. मागील वाईट अनुभवामुळे चित्रपटाच्या सुरुवातीलाच "या चित्रपटातील सर्व पदार्थ काल्पनिक असून, कोणत्याही कुटुंबावर अथवा कादंबरीवर बेतलेले नाहीत. बटाटे, कांदे, चटणी, खोबरे,  मोहन, तेलकट,झारे, उलथने या नावाशी कोणतेही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. इतिहासाशी प्रामाणिक राहण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे, तरी काही चूक राहून गेली असल्यास आमच्याकडे थेट तक्रार करावी. सोशल मिडियावर आमचे वाभाडे काढू नयेत." अशी पाटी दाखवण्यात येणार असल्याचे लीलाबाई म्हणाल्या. "अइअ अइ आअअं ओ!" आम्हाला काही कळेना. प्राकृताचा अभ्यास करत करत आता प्राकृतमध्येच बोलतात की काय अशी शंका आली. "काय म्हणालात ?" आम्ही विचारलं. त्यांनी हातानेच जरा थांबा अशी खूण केली आणि त्यांनी वळून खुर्चीच्या मागेच कोपऱ्यात एक भारदस्त पिंक टाकली. आणि मग मोकळ्या तोंडाने म्हणाल्या,"म्हटलं, पब्लिक लई मारतं हो!" बाईंचा चित्रपट चांगला की सफाईने मारलेली ती पिंक चांगली याचा विचार करत आम्ही त्यांच्या कार्यालयातून बाहेर पडलो. 

Thursday, November 26, 2015

सहिष्णुता म्हणजे काय रे भाऊ?

पुलंनी वाऱ्यावरची वरातमध्ये लिहिलेला हा प्रवेश , दारूबद्दल असूनही संबद्ध असलेलं हे लिखाण. आजही त्याची संबद्धता टिकून आहे. तसाच हा मनोरंजक आणि बोधप्रद संवाद. ज्यांना बोध होणार नाही त्यांनी मनोरंजन म्हणून वाचावा ही नम्र विनंती. ज्यांचे मनोरंजन होणार नाही त्यांनी बोध घ्यावा ही कळकळीची विनंती.

छोटे बंधुराज : सहिष्णुता म्हणजे काय रे भाऊ?

मोठे बंधुराज : अरे, सहिष्णुता हे एक प्रकारचे पीक असते. जे घेतले असता, बरे का, जे घेतले असता मनुष्य वाट्टेलते, म्हणजे वाट्टेल ते सहन करू शकतो.

छोटे बंधुराज : हं हं! म्हणजे आपले बाबा का रे भाऊ? हफिसात आणि घरी कित्ती शिव्या खात असतात!

मोठे बंधुराज :अरे नव्हे! सहिष्णुता म्हणजे, अता कसे सांगावे बरे.. अरे सहिष्णुता म्हणजे एकरी शंभर टन घेतलेल्या उसासारखे पीक आहे. जे घेतले असतां, बरे का, आधीच उचल मागता येते.

छोटे बंधुराज :हं हं हं! म्हणजे एटीकेटी का रे भाऊ? नापास व्हायची लायकी असूनही दयाळूपणे वरच्या वर्गात ढकलणारी?

मोठे बंधुराज :अरे नव्हे! श्या:! आता कसे बरे तुला सांगावे बुवा? अरे सहिष्णुता म्हणजे कॅश क्राॅप आहे. जे घेतले असताना, बरे का, जे घेतले असताना आपले क्राॅप जाते पण दुसऱ्याला कॅश मिळते.

छोटे बंधुराज :हं हं हं! म्हणजे आपल्या देवळातल्या दानपेट्या का रे भाऊ? आपल्या बाबांनी परवा पाचशे रुपये पेटीत टाकले होते ते घेऊन इद्रुसमियां हाजच्या यात्रेला गेले आहेत.

मोठे बंधुराज :अरे नव्हे! छ्या! मी तर आता तुझ्यापुढे हतच टेकले बुवा! अरे सहिष्णुता म्हणजे एक प्रकारची सुबत्ता आहे, जी आली म्हणजे सगळ्यांची पोटे भरतात.

छोटे बंधुराज :हंहंहं म्हणजे आपली धान्याची गोदामे का रे भाऊ? आपल्याकडून पैसे घेऊन धान्य देतात पण उंदीर मात्र फुकट खाऊन गलेलठ्ठ होतात ती?

मोठे बंधुराज :अरे नव्हे! तू कॉंग्रेसच्या आॅफिसात खूप वेळ बसत जाऊ नकोस बरे. तिथे गलेलठ्ठ उंदीर खूप झाले आहेत. अरे सहिष्णुता म्हणजे ज्वारीच्या शेताच्या बांधावर लावलेला भाजीपाला. जो लावला असताना, बरे का, जो लावला असताना भाकरीबरोबर तोंडी लावायला विविधता मिळते.

छोटे बंधुराज :हंहंहं म्हणजे आपल्या शाळेतील आहार योजना का रे भाऊ? खिचडीतून कधी झुरळ तर कधी माशी येते तशी? काल मला लॉटरीच लागली होती. मी झुरळ घेऊन हेडमास्तरांकडे गेलो तर मला म्हणाले, थोडी सहिष्णुता अंगी बाण, खिचडीवर तुझ्याइतकाच त्या झुरळाचाही अधिकार आहे. पण मग त्यांनी माझ्याकडून शंभर रुपयांची गप्प राहण्याची सहिष्णुता विकतही घेतली. मास्तरांकडे आता खूप सहिष्णुता साठली असेल ना? दिवसांतून किमान दहावीस मुलांना खिचडीत झुरळं येतातच.

मोठे बंधुराज : अरे नव्हे! अता काय बुवा करावे? अरे, सहिष्णुता हे असं पीक आहे की एकदा घेतले की वर्षानुवर्षं येत राहते.

छोटे बंधुराज :हंहंहं , म्हणजे ते बांधावरचं कॉंग्रेस गवत का रे? ज्याच्या संपर्कात आले असतां अंगाला खाज सुटते, शिंका येऊ लागतात. आणि एका ठिकाणी उपटून जरी टाकले तरी लगेच दुसरीकडे उगवते ते?

मोठे बंधुराज :अरे नव्हे! अरे सहिष्णुता म्हणजे गुण्यगोविंदाने एकत्र डोलणारे शेत. ऊस, ज्वारी, बटाटा, टोमॅटो, दुधी भोपळा, मुळा, शेपू सगळं एकत्र वाढते आहे. जरी उंदीर लागला, कीड पडली, अळ्या कुरतडत असल्या तरी त्यांना उदार मनाने खाऊ द्यावे. कृष्णार्पणमस्तु म्हणावे. त्यांनी खाऊन जे उरेल ते आपण भक्तिभावाने ग्रहण करावे, ते दिल्याबद्दल उंदीर, कीड,अळ्या यांचे आभार मानावेत, त्यांचाही शेतावर तेवढाच अधिकार आहे हा दिलासा अधूनमधून देत रहावा. नाही तर ते आपले शेत सोडून दुसऱ्या शेतात जातील. तसे होऊ न देणे.

छोटे बंधुराज (खवळून) :येssss भावड्या! खड्ड्यात घाल तुझी ती सहिष्णुता! उंदीर, अळ्या सगळं शेत फस्त करायला लागल्यावर मी तर औषधाचा फवारा मारणारच! तू बस वैष्णव जन ते जपत!

मोठे बंधुराज (चेहऱ्यावर युधिष्ठिराचे भाव) :अरेरे! सावधान! तुझ्यातील असहिष्णुता वाढत चालली आहे बरे! तूच काही दिवस हे शेत सोडून जा बरे!

(दोघे जातात. त्यांच्या मागून उंदीर, झुरळं नाचत जातात)

Tuesday, November 24, 2015

राव गेले रंक राहिले

हात्त्याच्या, इतके दिवस किरण राव हा कुणी बाप्या माणूस आहे अशीच माझी समजूत होती. अमीर खाननं एका बाप्याशी लग्न केलं याचं आश्चर्य वाटलं होतं. पण म्हटलं होतं जाऊद्या, ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न. नट हा नेहमी प्रयोगशील असावा असं आमचे स्थानिक नटसम्राट शंकरअण्णा (प्रोप्रा - धी न्यू बाॅम्बे हेअर कटिंग सलून) नेहमी म्हणत असत. त्याप्रमाणे त्यांनी स्वत:चेही शील सतत प्रयोगात ठेवले होते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. गावातील बऱ्याच आळ्या त्यांना वर्ज्य झाल्या तरी त्यांची प्रयोगशीलता थांबली नव्हती. अमीर खान आमच्या शंकरअण्णांसारखाच पर्रर्रफेक्शनिस्ट असल्यामुळे त्याने प्रयोगासाठी हे लग्न केले असावे अशा समजुतीत आम्ही होतो. "तसले"ही काही लोक असतात असे आम्ही ऐकले होते. त्यांच्या सुरस आणि रम्य कथाही आमच्या कंपूत कधीतरी कुणी सांगत असे. आम्ही ऐकावं ते नवलच असा चेहरा करून सर्व ते ऐकत असू. किती झालं तरी तीही माणसंच हो हेही मत व्यक्त होत असे. पण अशा लोकांना लाजिरवाणे होऊन, लपून छपून वावरावे लागते याचे वाईट वाटत असे. म्हणून मग अमीरने या लोकांना पाठिंबा म्हणून केले असेल लग्न असेच आम्हाला वाटले होते. एरवी सिनेमातील कुणाचे लग्न झाले की त्या जोडप्याचे फोटो आम्ही चवीने पाहतो पण अमीर खानच्या बाबतीत हा प्रश्नच उद्भवला नव्हता. दोन मिशीवाले बाप्ये एकाच कोकाकोलाच्या बाटलीत दोन स्ट्राॅ सोडून एकमेकांची नाके भिडवून ते चोखत असतील (पक्षी स्ट्राॅ, गैरसमज नसावा) हे दृश्य आमचा अपुरोगामी मेंदू ढवळून काढत असल्याने आम्ही "हा राव दिसतो कसा आननी" हे जाणून घेण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो. पण त्याला विरोध करण्याइतकेही आम्ही असहिष्णु नव्हतो. पुढे यथावकाश संसाराच्या वेलीवर एक फूल उमलंलं. (खरंच यथावकाश, खरं तर लग्नानंतर सहा वर्षांनी म्हणजे व्यथावकाशच म्हणायचं. पण म्हटलं बाईस नऊ महिने तर बाप्यास लागत असतील थोडे जास्त असे त्रैराशिक मांडले. प्रयत्नांती परमेश्वर हो. पावायचा राहणार नाही.) म्हटलं रावसाहेब मुलाच्या संगोपनात गुंतले आता. अमीरही आपल्या इतर प्रयोगांत गुंतला. कुठे इडियट बनून तीन तासांत तीस कोटी लोकांना स्फूर्ती देण्याचा प्रयोग असो, कुठे दत्त दिगंबर दैवत माझे म्हणत दिगंबरावस्थेत गावभर हिंडण्याचा प्रयोग असो त्यात तो रमून गेला. आम्हीही आमच्या कर्मभूमीत कार्यरत होऊन गेलो. (बायको त्याला बॅंकेत पाट्या टाकणं म्हणते याबद्दल आमच्या भावना अंमळ तीव्र आहेत. एरवी जरी त्या भावनांना आवर घालत असलो तरी शनिवारी बायको रमीच्या क्लबला गेली की त्या आम्ही मुक्तपणे व्यक्त करतो. सोड्याच्या बाटलीपेक्षा त्या फेसाळून वर येतात आणि स्काॅचची धुंदी अधिक गडद होते असा आमचा अनुभव आहे.) आमची कार्यभूमी गेली वीस वर्षं तीच राहिली तरी अमीर अनेक प्रयोग करत राहिला. मध्येच त्यानं सत्यमेव जयते काढलं. आम्ही कौतुकानं ते पाहत असू. एपिसोडनिशी लाखो रूपये घेऊन ते देणाऱ्या समाजाला सज्जड दम कसा भरायचा हे मनोरंजन मनोहारी होतं. आमचे फॅमिली डाॅक्टर दाते रग्गड फी घ्यायचे आणि मागे रेलून बसत डोळे मिटून सिगारेटचा दमदार झुरका मारत "तुम्ही स्मोकिंग सोडा, फुफ्फुसाची पार मच्छरदाणी झालीय" असं आम्हाला सांगायचे. आम्ही खाली मान घालून ते ऐकायचो.

असो, तर या सगळ्या गडबडीत अमीर खानच्या जनानखान्यात उलथापालथ (शब्दाचा जास्त अर्थ काढायला जाऊ नका, ते अभिप्रेतही नाही) होतेय हे लक्षातच आलं नाही. बेगम रावसाहेब स्वकष्टाने प्रसवलेल्या बाळाच्या संगोपनात गुंतलेले आहेत, त्यांना दाढी करायलाही वेळ मिळत नसावा, एकच लेंगा चार चार दिवस घालायला लागत असावा अशाच समजुतीत होतो. अमीर बाहेर एवढे सर्जनशील प्रयोग करतो आहे, हिंदू धर्मातील विसंगतींची टिंगलटवाळी करत समाजप्रबोधन करतो आहे, या सेटवरून त्या सेटवर अशा हनुमान उड्या मारतो आहे पण त्याला समाजातील हळूहळू होणाऱ्या बदलाची चाहूल लागली नसावी. तिकडे रावसाहेबांना मात्र रोज समाजात वावरून ते जाणवत असेल. रेशनच्या रांगेत उभे असताना, पाण्याचा टॅंकर आला की त्या हाणामारीत आपली कळशी भरून घेताना, बसची गाडीची वाट पाहताना, वडापच्या रिक्षेत अंग चोरून बसताना, दळण आणायला गिरणीत जाताना अशा अनेक प्रसंगी समाजात वावरताना सूक्ष्म बदलांची जाणीव त्यांच्या अत्यंत तरल आणि मृदू मनाला होत असेल. अशा दैनंदिन रगाड्यात केवळ रावसाहेब रगडले गेले असतील, अमीरला पत्ताही नसेल.

आणि आता पाहतो तर किरण राव हा बाप्या नाही? वाईट आणि हायसं वाटणं दोन्ही एकदम झालं तर कसं वाटेल तसं वाटलं. वाईट अशासाठी की एका विशिष्ट समूहाला पाठिंबा म्हणून हे लग्न एका मैलाचा दगड वाटत होतं तो साधा दगड ठरला. आणि हायसं अशासाठी की  अमीरच्या मुलाला आई मिळाली. तीही त्याची काळजी करणारी. खूप काळजी करणारी. रोज घरातून बाहेर पडताना बाहेर ऊन, थंडी तर पहायचीच पण किती डिग्री असहिष्णुता आहे, भीतीची तीव्रता किती आहे हेही पहायचं हे सगळं करायला आईच हवी. या माऊलीला भोवतालचे बदल लक्षात आले. वर्षानुवर्षं मुकाट्यानं खाली मान घालून चालणारे हिंदू शेजारी आपल्या धर्माची चेष्टा पाहिल्यावर नाराजी व्यक्त करू लागले हे पाहिल्यावर त्या माऊलीच्या डोक्यात धोक्याची घंटा ठणाणा वाजू लागली असणार. नेहमी ईदला शीरखुर्मा हक्काने मागणारे पीके सिनेमा आल्यानंतर ईद होऊन गेला तरी मागेनात हे पाहिल्यावर त्या मातेच्या डोक्यात संशयाचे भूत उभे राहिले असेल. नक्कीच ते आपल्या खुनाचा घाट घालत असणार ही तिची शंका केवळ वाजवीच होती. कुठल्याही आईच्या हृदयात याच भावना येतील. याखेरीजही अनेक गोष्टी तिला भेव घालीत होत्या. संजय दत्तला तुरूंगवास, दस्तुरखुद्द सलमानभाईला शिक्षा! केवळ मुसलमान म्हणूनच त्या शिक्षा झाल्या हे नक्की. गुन्हा काय तर बेकायदेशीरपणे शस्त्रे घरात ठेवली, ती दुबईतील मित्रांना वापरायला दिली, तर दुसऱ्याने काय दोन पाच फुटपाथवरची माणसे उडवली. काय मोगलाई लागून गेली आहे काय? ही असहिष्णुता असह्य झालेल्या त्या मातेला आपल्या बाळाच्या भवितव्याविषयी चिंता वाटणे साहजिक आहे. तो उद्या मोठा होऊन काय करायचे? त्याने काय सतत कायद्याची भीती बाळगत जगायचे? छे! छे! ते काही नाही, येऊदेत हे आज घरी, आता इथे राहणे नाही. सीताहट्टापुढे जिथे रामाचेही काही चालले नाही तिथे अमीरचा काय पाड?

पण भारतीयांनो, ही रत्ने देशातून बाहेर जाऊन देऊ नका. आधीच आपण आपला कोहिनूर गमावून बसलो आहोत. आता ही अल्लाघरची नूर बाहेर जाऊ देऊ नका. ही नुसती किरण नाही तर संपूर्ण देशाच्या सहिष्णुतेच्या आशेची किरण आहे. ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, माझ्या मनातला का, तेथे असेल रावा असे गाणे ही म्हणते आहे, तिच्या मनातला तो पोपट इथेच बांद्र्यात (पश्चिम बरं का, पूर्वेला घाटी राहतात) आहे हा दिलासा तिला द्या. या रावावाचून हा देश रंक आहे हे ध्यानात ठेवा.

Tuesday, November 17, 2015

पिंगा ग पोरी

अगो, थोरल्या बाजीरावांच्या धर्मपत्नी राजमान्य राजश्री सौभाग्यकांक्षिणी श्रीमंत काशीबाईसाहेब यांनी टाॅवेल-सावरूया-हम बिल दे चुके सनम-बेवडादास फेम भन्साळीच्या स्वप्नात येऊन घातलेला पिंगा पाहिला हो! पिंगा घातलंन तो सुद्धा कुणाशी बरं? स्वत:च्याच इकडून ठेवलेल्या नाटकशाळेशी हो! जळ्ळं मेल्याचं लक्षण ते! आता त्यावेळच्या घरंदाज बायका तोंडाला रंग फासून नाचायला बोर्डावर उभ्या राहत होत्या असं वाटलं की काय तुझ्या या लीलावतीला? बाईनं कसा घट्ट अंगभर पदर घ्यावा हो! या कवटाळणी बघत्ये तर कोपऱ्यावरच्या त्या मारवाड्याच्या दुकानासारख्या! नेहमी उघड्या! हा मेल्यांनो! तोंडाला काळं फासलनीत हो अगदी! त्यातून ती सटवी मस्तानी की फस्तानी! सवत ना गो ती काशीबाईची? पोटच्या मुलाला, लाखांच्या पोशिंद्याला कुठून ही अवदसा आठवली असं राधाबाईसाहेबांना, त्या माऊलीला वाटत असेल गो! सोन्यासारखी सून घरात आणली पण म्हणतात ना कर्म! त्यातलीच गत हो ही! मुलानं अटकेपार झेंडा नेलान पण हा कोथरूडपार लावलेला झेंडा रोज कित्ती सलत असेल सासूसुनेला. राऊ कोथरूडला आहेत म्हटलं की इकडे वाड्यावर गणपती पाण्यात. मेली ती हडळ! काय जादू केल्येन त्या गजाननासच ठाऊक. म्हणे सौंदर्यवती आहे. अस्सा राग येतो! पण आपलाच दाम खोटा हो! समोर आली ना तर झिंज्या उपटून हातात दीन. माझी काशी गरीब गायच म्हणून सगळं सहन करत्ये. असं सगळं कल्प कल्प त्या माऊलीच्या मनात येत असेल. आणि खात्रीन सांगत्ये काशीबाई घरंदाज म्हणून काही बोलायच्या नाहीत पण मुदपकात चाललेलं पाटा वरवंटा, मुसळ कांडणं पाहून ती मेली सवत त्या मुसळाखाली चेचली जात्ये असंच स्वप्न पहात असतील अगदी! पण बाईचा जल्मच सोसण्यासाठी हो! पण हे त्या जळ्ळ्या भन्साळ्याला कळलं तर ना? इतिहासात नापास झाला आणि सिन्मात घुसला. वर सरकारनं पद्मश्रीची भिक्षावळ घातल्ये हो झोळीत. उजेड फाकला आहे तिचा! मरा! मी तर म्हणत्ये जर या दोघीं समोरासमोर आल्या तर एकच गाणं होईल हो! पिंगा ग पोरी पिंगाच्या ऐवजी झिंज्या ग पोरी झिंज्या, उपटीन तुझ्या मी झिंज्या! पुढल्या सिनेमात रमाबाईसाहेब करवा चौथचं व्रत ठेवतायत आणि खुद्द श्रीमंत माधवराव पेशवे  सदरेवर मागे शेदोनशे हशमांची फौज घेऊन "लेने तुझे गोरी, आयेंगे तेरे सजना" असं म्हणत पंजाबी भांगडा घालतायत हे दृश्य बघण्याची तयारी ठेवल्ये. वाचव रे गजानना!

-अंबूवन्सं (मु.पो. पडघवली)

Sunday, November 8, 2015

गयी भैंस पानी में

गयी भैंस पानी में. इथे महाराष्ट्रात काही लोक "भ्रष्टाचारी लालू चालेल पण भाजप नको असा स्वच्छ निकाल आहे हा! कसे?" असं म्हणून अत्यानंदाचे चीत्कार काढीत आहेत. हे म्हणजे गोठ्यातील गाईला पाडा झाला म्हणून रेड्याने हंबरून आनंद व्यक्त करण्यासारखे आहे. वास्तविक या सर्व वसुबारस प्रकरणात या रेड्याचा "सहभाग" केवळ माफीचा साक्षीदार असण्यापुरताच.

भारतातील लोकशाही म्हणजे टीव्हीवरील रटाळ मालिकांसारखी होऊ लागली आहे. नवीन सून घरात आली की घरात बांडगुळांसारख्या मूळ धरून बसलेल्या साळकाया माळकाया तिला घराबाहेर काढण्यासाठी कारवाया सुरू करणार. ती एकदाची हाकलली गेली की तिच्या बदल्यात आणलेली साधारणपणे दोन तीन एपिसोड टिकते. मग तिला हाकलून पुन्हा जुनीच ब्याद बरी असं म्हणून परत आणण्याचं कारस्थान सुरू. कॉंग्रेस ही या घरातील बुआ. नव्वदीला पोचूनही ठणठणीत. सून कुठलीही येवो अथवा जावो, ही लाल आलवणातील बया घराच्या पाचवीला पुजलेली. हिला कुणाबद्दलही प्रेम अथवा माया नाही. हे सगळं करण्यात काय मिळतं या प्रश्नाला उत्तर फक्त एकच. ते नानाच्या "माफीचा साक्षीदार" मधल्या त्या उत्तरासारखं - "आनंद!". घरातले लोकही "बुआ, अगर आप न होती तो इस खानदान का पता नही क्या हो जाता. " असं म्हणून तिच्या पाया पडतात. त्यांना आशीर्वाद देताना या बुआच्या डोक्यात मात्र नवीन सुनेकडून "घरकी चाबियां" आपल्याकडे कशा येतील हा विचार. आणि हे सगळं चालवणारे आपण प्रेक्षक. शिव्या देतो, पण नकळत टीआरपी वाढवत बसतो.

एक नक्की आहे, समस्या राजकीय पक्ष नाही. जनता स्वत:च आहे. आपण सुधारायचं नाही, आपण भ्रष्टाचार सोडायचा नाही. स्थानिक पातळीवर जो कुणी तुमचं अवैध काम करायला आशीर्वाद देणार, रांगेत उभं न राहता आतल्या बाजूने काम करून देणार, गुन्हा केल्यावर फोन केल्यावर चौकीत येऊन इन्स्पेक्टरला दम देऊन तुम्हाला किंवा तुमच्या माजलेल्या पोराला सोडवणार त्याला तुम्ही मत देणार. कारण तुम्हाला स्वत:लाच शॉर्टकट मारायची सवय झाली आहे. माझं काम झालं की झालं, बाकीचे मरेनात का तिकडे ही पराकोटीची स्वार्थी वृत्ती आपल्यात आहे. मग असे हे लोक सत्तेत आले की तुमची ही कामं करत स्वत:च्या तुंबड्या भरणार. तो पैसा तुमच्याच खिशातून नकळत जाणार. कॉंग्रेसने आजवर हेच करत सत्ता टिकवली. लोकांना कॉंग्रेसबद्दल प्रेम त्यांनी लोकोपयोगी कामं केली म्हणून नाही तर ही वर सांगितलेली तुमची स्वत:ची कामं केली म्हणून आहे, हे सत्य आहे. कॉंग्रेसने खरोखर लोकोपयोगी कामे करून दाखवावीत, प्रथम गुंडांचा, हातभट्टीवाल्यांचा, सट्टेबाजांचा, गुन्हेगारांचा पाठिंबा, पर्यायाने पैसा निघून जाईल. जे लोक गुन्हेगार आहेत, केवळ तेच याला याला जबाबदार आहेत असं नाही. बाकीचे पांढरपेशे लोकही तितकेच जबाबदार आहेत. कारण हे लोक मसीहा शोधत बसतात. कुणी तरी कनवाळू येईल, आपली सगळी दु:खे (म्हणजे काय ते त्यांनाही माहीत नसते) दूर करील, भ्रष्टाचार नष्ट करील, झुमरी तलैय्याचं एकदम न्यूयॉर्क करून टाकेल, चकचकीत रस्ते, वातानुकूलित घरे कार्यालये, एकदम कसा भारताचा इंडिया करून टाकेल, सामाजिक समस्याच नव्हे तर आमच्या सर्व आर्थिक समस्यांची सर्व जबाबदारी सरकार घेईल या असल्या अवास्तव अवाजवी अपेक्षा घेऊन बसलेले असतात. यातूनच केजरीवालचा जन्म झाला. भाबड्या आशेतून असा कुणीतरी सत्तेत येतो. साहजिकच असा कुणी मसीहा नसतो. जो असतो तोही याच मातीत जन्माला आलेला असतो. मग सत्तेत आलेला काही वेगळे करत नाही हे लक्षात आले की मग सुरू, दुसरा आणण्याचे प्रयत्न. नवीन कुणी नसल्यामुळे मग ट्रंकेतून जुनाच एखादा टीशर्ट पुन्हा बाहेर निघतो. पुन्हा तेच चक्र. जोवर तळागाळापर्यंत शिस्त, आत्मसन्मान रुजत नाही तोवर हे चक्र असंच चालू राहणार. आज भाजप, उद्या कॉंग्रेस, परवा आप , पुन्हा कॉंग्रेस, पुन्हा भाजप. 

त्यामुळे आज भाजपला बिहारने नाकारले याचा अर्थ कुणी नवीन मसीहा आला आहे आणि तो सगळं काही आलबेल करणार आहे असं नव्हे. भाजप आले असते तरी तेच. कॉंग्रेसने हुरळून जायचेही कारण नाही. एक वर्षापूर्वीच फाटली म्हणून फेकून दिलेली ती चड्डी आहे. भाजपचा घट्ट लंगोट सहन झाला नाही म्हणून ही न धुतलेली दळभद्री चड्डी कदाचित परत येईलही, पण त्यात लोकांची असहायता आहे हे कॉंग्रेसच्या बेभान झालेल्या कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे. लोकांनीही ही आपली असहायता आहे असं म्हणून आनंद मानण्याचे कारण नाही. हा तुमच्याच विवेकबुद्धीचा तुमच्या स्वत:च्याच आळशी आणि ऐतखाऊपणामुळे झालेला पराभव आहे. हे बदलण्यासाठी तुम्हाला प्रथम स्वत:मध्ये आत्मसन्मान आणावा लागेल, स्वच्छ व्हावे लागेल. पक्षांनीही जातीपातीचे राजकारण न करता केवळ अजेंडा दाखवून त्यावर मते मागावीत. असे करणारा पक्ष जरी कॉंग्रेस असला तरी माझा त्याला पाठिंबा राहील. सध्या तरी तशी शक्यता दिसत नाही. निवडणूक जिंकणे म्हणजे गुलाल उधळून वातावरण लाल करण्याची वृत्ती जोवर आहे तोवर लोकोपयोगी काम करणारे सरकार येण्याची शक्यता नाही. जेव्हा जेव्हा हा गुलाल उधळतांना दिसतो तेव्हा ते उधळणारे लोक हे नेमके कोण असतात? कसले कार्यकर्ते असतात? त्यांना नेमका कसला आनंद झालेला असतो? त्यांना काय मिळणार असते? निवडणूक जिंकल्यानंतर हा असला जल्लोष बंद झालेला जेव्हा दिसेल तेव्हा आपण लोकशाही म्हणून परिपक्व झालो आहोत असे मी म्हणेन. तोवर, प्रत्येक निवडणुकीनंतर गयी भैंस पानी में एवढंच म्हणत बसू.

Thursday, November 5, 2015

गज़ल पेताडांची

(गुलजार साहेबांची मनोमन क्षमा मागून)

सुबह सुबह याद आया 
उस दिन हम दोस्त पीने बैठे थे
आंखोसे मानूस सारे चेहरे थे सुनेसुनाये
हर एक के बीवीने थे प्यारके शब्द जो सुनवाये
सोडा लाये, डीएसपी मंगवाये
और चार बूँद दोस्तों के नाम छिडकवाये
जो नही धीरज जुटा पाये
तंगडी कबाब, चिकन लॉलिपॉप के ऑर्डर दिये
पोटलीमें मेरे मैंने चणे और खारे शेंगदाणे लाये थे

आँख खुली तो बारमें कोई नही था
हाथ लगाकर देखा सर बहुत दर्द कर रहा था
करवट बदलके देखा, गल्ले पे शेट्टी फूट फूटके रो रहा था
और होठोंपर वो डीएसपी का ज़ायक़ा ज़ोरोंसे बास मार रहा था

दोस्त सब भाग गये शायद, बिना बिल भरे ही भागे शायद..

सुना है कल रात आयी थी पुलिस की टोली
सुना है कल रात किसीने बहोत राडा किया है