Thursday, December 22, 2016

स्थित्यंतर

अखंड भारत, राष्ट्रीय पुनर्निर्माण, समग्र हिंदुराष्ट्राची व्यापक संकल्पना, राष्ट्रीय एकात्मता या सर्व गोष्टी शके १९३८ (भारतात राहणाऱ्या अभारतीय निवासींसाठी - २०१५) मध्येच संपूर्णपणे साकार झाल्यामुळे एक प्रकारचे शैथिल्य आले होते. मी आणि मोरूने शाखेत रोज जाणेही थांबवले होते. पूर्वीही आम्ही जात होतो त्याचे कारण उपर्निर्दिष्ट ध्येयांनी भारलेले काही स्वयंसेवक आम्हाला पुढे घालून हाकलत संघस्थानावर नेत असत. गोट्या, विटीदांडू, क्रिकेट किंवा ऋतूनुसार ठरलेले काही मान्यता पावलेले खेळ ऐन रंगात आलेले असताना हे स्वयंसेवक अल्लाउद्दीन खिलजी प्रमाणे घुसत, आमची रसद (घरून आणलेले भाजलेले शेंगदाणे, चुरमुरे इत्यादि) फस्त करत, पाहऱ्यावर ठेवलेले बुणगे हुसकावून लावत आणि आम्हाला जणू कैद करून शाखेवर नेत. याला घरच्या मंडळींची फूस लाभे आणि तेही,"बरं केलंस! नेच त्याला. दिवसभर उनाडक्या करण्यापलीकडे काही करत नाही. जरा शिस्त लागेल." मग हे देशभक्तीने भारलेले स्वयंसेवक आम्हाला हाकत संघस्थानाकडे नेत असत. मग शिशू आणि तरुण अशी वर्गवारी होऊन वयोमानास उचित असे खेळ निवडले जात. खेळ छान असत. खो खो, कबड्डी असे मर्दानी खेळ खेळताना मजा येई. मग कधी कधी वेतचर्म, खड़ग, दंड (याला तलवार, काठी अथवा लाठी म्हणणे हा दखलपात्र गुन्हा होता) यांचेही कधी तरी हात होत. आमचे वय शिशू नाही पण तरुणही नाही असे असल्याने तरुण ही शस्त्रे घेऊन मोहरे घेत तेव्हा आम्ही केवळ पाहत असू. शत्रूला कसे नामोहरम करून सोडायचे याचे शिक्षण समोर चाललेले असायचे. शत्रू कोण हे काही कळायचे नाही. त्या वयात आमची शत्रूमंडळी फक्त शाळेत आढळायची. आणि ती खडू, डस्टर, पट्टी अशा शस्त्रांचा वापर करणारी असायची. पण ही तरुण स्वयंसेवक मंडळी भयानक आवेशात दंड, खड़ग फिरवत असायची. त्यांचीही मास्तर मंडळी खडूस असावीत. मला वाटायचे आता उद्या कॉलेजमध्ये गेल्यावर मास्तरांचं काही खरं नाही. पण "संघ विकीर" झाल्यावर तीस सेकंदात संघस्थान रिकामे झालेले असे. काही क्षणांपूर्वी खड्गावर हात मारणारी जनता घरी पाटावर बसून खोबरे घालून केलेली चिंचगुळाची आमटी, पोह्याचा पापड, गुरगुट्या भात, त्यावर मऊसूत वरण, साजूक तूप यावर आडवा हात मारत बसलेली दिसायची. भोजन कसे चुकवायचे महाराजा? अन्न हें पूर्ण ब्रम्ह असे म्हटलेच आहे.

फार मोठा खेळ आहे राजा! चाणक्यनीती काय अशीच कळते काय कुणाला? खुद्द चाणक्यालाही ती कळायला काही वर्षे जावी लागली. थांब पन्नासएक वर्षं, हे हिंदुराष्ट्र भरभराटीला येतं की नाही पहाच. अशी वाक्यं कानावर पडायची. काही कळायचं वय नव्हतं. कुणाशी लढाई आहे आणि कोण कुणावर मुत्सद्देगिरी करतो आहे कुणास ठाऊक. पण हिंदुराष्ट्र, उन्नती, भरभराट असे शब्द ऐकले की बरं वाटायचं. स्वातंत्र्य मिळून दोन तपं लोटली होती. क्रांतिकारक वगैरे जमात काळाआड जाऊन काही वर्षं लोटली होती. नाही म्हणायला अंतुलेंनी सिमेंटची टंचाई असूनही स्मारकं वगैरे उभारली होती. बहुधा सागोळ वापरलं असावं. स्मारकं सागोळएवढीच टिकाऊ निघाली. एवढं उपेक्षेत गेलेलं स्मारक दुसरं नाही. उदघाटनानंतर गावातील एकही नेता तिथं पुन्हा फिरकलेला दिसला नाही. "सरकारी" हा शब्द इतका हीन दर्जाचा झाला की "हीन दर्जा" हाच शब्दप्रयोग नाहीसा होऊन त्याची जागा सरकारी या शब्दाने घेतली. पण राष्ट्रीय पुनर्निर्माणात पार झोकून दिलेल्या स्वयंसेवकांना सरकारी या शब्दाचे वावडे होते. आपण सत्तेत न राहता काम करू. "आपण" हा एक फार मोठा शब्द होता. एकचालकानुवर्तित्व अंगी बाणलेल्या यंत्रणेत आपण हा साम्यवादी शब्द मला पुढे जरा विनोदीच वाटायचा. "आदेश आला आहे, आपण सर्व जण झडझडून कामाला लागणार आहोत." अशी वाक्ये मला पुढे ऍस्टरिक्स कार्टूनमध्ये सापडली. त्यात रोमन सैनिकांच्या एका टोळीला दरोडेखोरांनी बुजबुजलेल्या जंगलातून जायची पाळी आली आहे. प्लॅटून लीडर विचारतो आहे,"पुढे जाऊन टेहळणी करायला कोण तयार आहे?" काही सैनिक आकाशात नजर लावून आहेत , काही पायाची बोटे न्याहाळत आहेत अशी परिस्थिती. शेवटी लीडर एका सैनिकाकडे बोट दाखवून म्हणतो,"यू! आय ऑर्डर यू टू व्हॉलंटियर!" हिंदू समाजाची अवस्था काहीअधिक प्रमाणात या सैनिकांसारखीच. मग लीडरला कुणालातरी स्वयंसेवक करावंच लागतं. सगळेच काही लीडर होऊ शकत नाहीत. सगळेच लीडर झाले तर काम कोण करणार? पण स्वयंसेवक होण्याचीही झिंग असते. आपण समाजकार्य करून राहिलो आहोत, निस्वार्थीपण अंगात भिनलं आहे, हीनदीन मला दुवा देताहेत, मला कुठल्याही पुरस्काराची गरज वाटत नाही असं सगळं पहिला पेग, दुसरा पेग मग तिसरा अशा थाटात चढत राहतं. एकदा होलियर दॅन दाऊ वाटायला लागलं की वेगळा विचार ऐकायची, मग तो चुकीचा का असेना निदान ऐकावा असं वाटायचीही गरज वाटेनाशी होते. राजकारणात आम्हाला शिरायची गरज वाटत नाही. त्या बजबजपुरीत शिरण्यापेक्षा आम्ही आमचं कार्य करत राहू हा विचार चांगला दिसत असला तरी त्याने नुकसानच जास्त झालं. पण होलियर दॅन दाऊ असले तरी स्वयंसेवक स्वच्छ होते, स्वार्थी नव्हते. म्हणजे ज्या लोकांनी राजकारणात खरं तर जायला हवं ते संचलनं करत राहिले, दुर्घटना घडली की सरकारी यंत्रणेच्या आधी तोंडाला फडकी बांधून पोचू लागले. जणू समांतर सरकारच स्थापन झाल्यासारखं झालं. पण जनाधार होता. ठराविक आर्थिक स्तरांतील लोकांचा. म्हणजे मध्यमवर्गाचा. त्या आधारामागे मोठा हातभार होता तो पूर्णवेळ कार्यकर्ते या खरोखरच निरलसपणे काम करणाऱ्या लोकांचा. होलियर दॅन दाउ लोक ते हे नव्हेत. यांच्या कामाच्या जोरावर व्यासपीठावर मागे लोडाला टेकून बसत ते होलियर दॅन दाउ असायचे. तेही तसे भ्रष्ट नसायचे, पण त्यांना खरोखरच आपण संघटन करून राहिलो आहोत असंच वाटायचं. राष्ट्रप्रेमाचा खरा अर्थ आपल्याला उमजून राहिला आहे असं त्यांना खरंच वाटायचं आणि त्यांची छाती अभिमानाने भरून यायची. त्यांनी शहाणे करून सोडावे सकळ जन असा निर्धार केलेला असायचा. पण या भारतवर्षात प्रत्येक जण स्वयंभू आणि शहाणा. त्यामुळे प्रत्येकालाच असं वाटायचं की दुसऱ्याला शहाणं करून सोडावं. त्यातून काँग्रेसच्या लोकांची गोष्टच वेगळी. काँग्रेसचे लोक कामात अतिशय व्यग्र असणारे होते. त्यांची एक सिस्टीम लागलेली होती. एकदा रुमाल बांधून नेहरू घराण्याची सरदारकी पत्करली की एक बरं असायचं, देशासाठी अथवा समाजासाठी डोकं वापरून विचार करायची गरज राहायची नाही. मग ते डोकं साठेबाजी, स्मगलिंग असले मान्यताप्राप्त अवैध धंदे किंवा मग गाव स्तरावर कृषी उत्पन्न बाजार समिती, झेडपी, सहकार क्षेत्र असल्या मान्यताप्राप्त वैध धंद्यात लागायचं. राष्ट्रप्रेम वगैरे शब्द कुणी उच्चारले की ही मंडळी "तर तर! राष्ट्रप्रेम पायजेलच की." असं म्हणून मिशीत हसायची. ही जानवी काय झेडपी ला हुबी ऱ्हात न्हाईत, कृषी उत्पन्नच्या वाऱ्याला हुबी ऱ्हात न्हाईत, मग कशाला विरोध करायचा? लावा तुमच्या शाखा आणि तासाभरानं विकीर करून घरला संध्येच्या टायमाला पोचा. शाखेत फक्त जानवी येत नाहीत, तिथे जात पात मानली जात नाही हे खाजगीत कबूल करणारे हे लोक निवडणुका आल्या की मात्र संघाचा जातीयवादी वापर करत असत.

फास्ट फॉरवर्ड तीस वर्षे. त्यावेळचे तरुण वर्गातील स्वयंसेवक आता प्रौढ वर्गात जाऊ लागले. हिंदुराष्ट्रवादी भूमिका पूर्वी तशीच होती. फक्त आता त्यात कालानुरूप बदल घडले. पूर्वी स्वयंसेवक "पूर्णवेळ" झाला नाही तर तो टेल्को अथवा गोदरेज किंवा तत्सम कंपनीत चिकटायचा, अथवा स्टेट बँक, किमान पक्षी गावच्या शाळा कॉलेजमध्ये नोकरीला लागायचा. आता त्यात संगणक व्यावसायिक मिळाले. म्हणजे पाच दिवस वरण भात तूप पण वीकएंडला पिझ्झा वाले. गूगलच्या आशीर्वादाने बसल्या बसल्या "आपले पूर्वज, आपली संस्कृती कस्सले पुढारलेले  होते नै मित्रांनो?" करणारे. महत्वाचा बदल म्हणजे सत्तेत न राहता समाजकार्य करत रहायचं हा दृष्टिकोन बदलला. पूर्वी सत्ता नसल्यामुळे सत्तेचा मोह काय असतो हे माहीत नव्हतं. त्याचा एक वेगळाच अभिमानवजा गर्व असायचा. "आम्ही बिघडलो तुम्ही बी घडा ना" अशी पद्ये म्हणायला बरं वाटायचं. सत्ता हातात घेऊन त्याचा मोह न बाळगता लोकोपयोगी कामांसाठी उपयोग करण्याचा अनुभव कुणालाच नव्हता. थोडक्यात दरिद्री माणसाने उगाचच "सोने माणिक आम्हां मृत्तिकेसमान" म्हटल्याप्रमाणे होतं. तुकाराम वगैरे प्रभृतींचं ठीक होतं, त्यांना गाथा, अभंग वगैरे लिहून अनुभव होता. एवढं भरघोस लिखाण करून कुणी त्याची दाद घेत नव्हतं, उलट ते लिखाण इंद्रायणीच्या डोहात बुडवायला वगैरे सांगितल्यावर वैराग्य यायचंच. इथे गावात शिबिर भरतं आहे, त्यासाठी घरून पोळ्या पाठवल्या आहेत, इतक्या भरघोस त्यागाच्या जोरावर "आम्ही बिघडलो" हे पद्य म्हटलं जायचं. पण निर्णय झाला. आता सत्तेत येऊन समाज बदलायचा. राष्ट्रप्रेम कसं ओसंडून वाहिलं पाहिजे सगळ्यांतून. तळागाळात काम होतंच. पण काँग्रेसनं लोकांची नस बरोबर ओळखली होती. मध्यमवर्गाची त्यांना फिकीर नव्हतीच. गुंड, दरोडेखोर, सट्टेबाज,साठेबाज,दलाल यांना त्यांचे धंदे करायला दिलं की तेच लोक आपले धंदे सुखरूप ठेवण्यासाठी काँग्रेसला सत्तेत ठेवायला धडपडणार हे काँग्रेसचं गणित गेली कित्येक वर्षं चाललं होतं. मग काँग्रेसचा पाडाव करायला काँग्रेससारखीच समीकरणं मांडली. ती यशस्वीही झाली. पण सत्तेत आल्यानंतर खरी मज्जा कळली. काँग्रेसवाले उगाच समाजोपयोगी कामं वगैरेच्या भिकार भानगडीत न पडता सत्तेचा अनुनय का करत राहिले होते ते समजू लागलं. एक प्रकारचा युरेका क्षण सापडला. उड्डाणपूल, महामार्ग, जलसिंचन योजना इत्यादि कुणाच्या उद्धारासाठी आणि प्रगतीसाठी आहेत याचा उलगडा झाला. शिवाय सत्तेत राहूनच पुढील सत्तेची जुळणी करता येते हे लक्षात आलं. काहींना हे पचलं नाही. त्यांना लगेच सुधारणा करायच्या होत्या. पण विचार असा होता, की प्रथम पक्ष बलवान झाला पाहिजे. बलवान झाल्यानंतर राष्ट्रउभारणी आहेच.यश मिळालं पण मध्यमवर्गाची आता पंचाईत झाली. वर्षानुवर्षं माध्यम वर्ग संघाला पाठिंबा देत आला. पण संघाच्या विचारसरणीला कुठं तरी भाजपने फारकत दिली आणि काँग्रेसच्या भ्रष्ट गेंड्यांना पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे आता हे जे कुणी सत्तेत बसले आहेत त्यांच्यात व काँग्रेसच्या निबर कातडीच्या गबर, मुजोर लोकांच्यात काही फरक कळेनासा झाला.

असं असलं तरी, कितीही हिताची बाब असली तरी केवळ मोदी म्हणतायत म्हणून त्याला विरोध हा काय प्रकार आहे हेच कळत नाही. नियम वर्षानुवर्षं अस्तित्वात असलेले असताना अचानक त्याचा जाच होतो म्हणून बोंब ठोकायची आणि अच्छे दिन हेच का म्हणून विचारायचं. निश्चलनीकरण तर यशस्वी होऊच द्यायचं नाही असा काँग्रेसचा उघड उघड डाव आहे. मग त्यासाठी शेतकऱ्यांना वेठीला धरलं. काँग्रेसचेच गबर दलाल, कृषी उत्पन्न बाजार समित्या यांच्याच ताब्यात. कॅशलेस व्यवहार करणं त्यांना अवघड नव्हतं. आयओयू लिहून देता आले असते. पण मग मोदी यशस्वी झाले असते. मग शेतकऱ्यांचा माल विकतच घ्यायचा नाही, रक्कम हातात नाही म्हणून व्यवहार नाही असं सांगणं सुरू झालं. आणि मग शेतकऱ्यांबद्दल उमाळे फुटले, त्यांच्या "वास्तव" कथा सर्वत्र फिरू लागल्या. सडलेले टोमॅटो, बटाटे कांदे यांचे फोटो मीडियावर फिरू लागले. काही वर्षांपूर्वी कृषी उत्पन्न समितीने वेळेत विकत घेतला नाही म्हणून टनावारी कांदा सडल्याचे फोटो आले होते. त्यावेळी हे उमाळावाले कुठे लुप्त झाले होते कुणास ठाऊक. आपल्याकडे बँकेने कर्ज दिलं नाही किंवा दिलं, पाऊस पडला नाही किंवा खूप पडला, खूप उत्पन्न झालं किंवा दुष्काळाने काहीच झालं नाही तर शेतकरी थेट देशोधडीलाच लागतो. अधेमधे कुठे थांबत नाही. एकदा उमाळे सुरू झाले की मग कुणी लॉजिकल काही सुचवलं तर त्याला लगेच "तुम्हाला शेतकऱ्यांचं दु:ख काय कळणार?" असे प्रश्न सुरू होतात. हातावरचं पोट असणाऱ्यांचे मात्र हाल झाले हे कबूल करावं लागेल. मग हिंदुराष्ट्राची उभारणी करता करता लोकशाहीची मूल्ये जपली पाहिजेत याचा थोडासा विसर पडला असं वाटू लागलं. सर्वात महत्व कशाला? राष्ट्र आधी हे तर खरंच. पण मी म्हणेन तोच राष्ट्रवाद हा हट्ट लोकशाहीशी जुळणारा नाही. सर्वांना मत आहे, अगदी मूर्खपणाचं वाटलं तरी ते आहे. हे लोकशाहीचं मूलतत्व आहे. सध्या भाजप किंवा संघ विचारसरणीला जो विरोध होतो आहे तो यासाठी. म्हणून एकावन्न टक्के लोकांनी देश खड्ड्यात घालण्यासाठी आंदोलन केलं तर लोकशाहीच्या तत्वाला मान देऊन मोठ्या इतमामाने देश खड्ड्यात जाऊ द्यावा. काँग्रेसवाले, बजाव ताली!

No comments:

Post a Comment