सगळं
कसं छान चाललं होतं. केंद्रात मोदी आणि दिल्लीत आम्ही. भल्या पहाटे नऊ
वाजता उठावं, नाकधौती करावी, खाकरून खोकून घशाचा तंतू न तंतू जागा करावा,
मग आसनं करावीत. पश्चिमोत्तानासन, श्वानासन, व्याघ्रासन. श्वानासन करताना
अचानक पोट मोकळं झाल्याचं समाधान मिळावं आणि मुखावर ते दैवी सुख विलसावं.
त्या आनंदात निर्विकल्प समाधी लागावी ते थेट एकदम स्वत:च्याच घोरण्याच्या
आवाजाने जाग येईपर्यंत. मग उठावं, छानपैकी आळस द्यावा. कधी कधी वाटतं हे
आळस देणं म्हणजे निसर्गानं माणसाला दिलेलं वरदानच. तासभर आसनं करून जो आराम
मिळत नाही तो तीस सेकंदांच्या आळोख्यापिळोख्यांनी मिळतो हे एक उघडे सत्य
आहे. असो. यानंतर मोजून तीन बदाम, पाच मनुका आणि १०० मिली गाईचे दूध असा
अल्प आहार घ्यावा. बंगळुरास निसर्गोपचार घेताना तुम्हाला एवढाच पचेल असे
वैद्यांनी सांगितलेले. व्यक्ती तशी प्रकृती. असा अल्पोपाहार झाल्यानंतर
ॐकार करावा. ठणाणा करण्यासाठी छाती आणि फुफ्फुसे उत्तम हवीत. ॐकाराने खूप
फरक पडला आहे. पूर्वी आवाज चिरकत असे. आता सायंकाळपर्यंत टिकतो. हे म्हणजे
आयफोनच्या ब्याटरीपेक्षा भारी झाले. मी बस्ती घेत असताना एका वात्रट
कार्यकर्त्याने माझा फोटो घेतला होता. त्यात मीच चार्जिंगला लावलेल्या
आयफोनसारखा दिसत होतो. त्या बस्तीनंतर मी फुल चार्ज होऊन जोमाने कामाला
लागलो होतो. दोन दिवस मोदींची आठवणही झाली नव्हती. मग यथावकाश जुन्या
खाण्यापिण्याच्या सवयी, त्यातून अपचन, वायुगोळा, आम्लपित्त हे सगळे परत आले
ते सोडा. पंजाबच्या निवडणुका आल्या. परमेश्वर कृपेने दिल्लीच्या रूपात
घबाड हाती लागले होते. निवडणुकीची सोय झाली होती. काही तत्वनिष्ठ
कार्यकर्त्यांनी पैसे वाटून निवडणुका लढण्याला विरोध केला होता. येडझवे
तेच्या मायला. मी म्हणालो, पाणी घातलं नाही तर झाडही वाढत नाही. हे पाणी
घालणं आहे असं समजा. तर जाऊन भाजपला मिळाले. मरो! ट्वीट करून टाकलं,
मोदींनी आमच्या पक्षात घरभेदी घुसवले होते. तर एकूण जय्यत तयारी होती.
निवडणुका काय नुसत्या तत्वावर थोड्याच जिंकता येतात? गड्ड्या लागतातच.
त्यांची तजवीज दिल्लीकरांनीच करून ठेवली होती. आता उडता पंजाब लवकरच उघडा
पंजाब वाघडा पंजाब होणार होता. तेवढ्यात माशी शिंकली.
कालच
त्या गड्डीतून पाचशेच्या दोन नोटा आणि हजारच्या दोन अशा हळूच काढून
घेतल्या होत्या. सोपं काम नव्हतं. मनीष लेकाचा खजिन्यावरच्या नागोबासारखा
त्यावर बसून असतो. बरं काढून तर घेतल्या, आणि म्हटलं जरा आज जरा इडली डोसा
पाणीपुरी वगैरे आम चैन करावी. मग निवांतपणे मोदीनामस्मरणाची वही बाहेर
काढली. प्रतिदिनी किमान दश सहस्त्र वेळा नाम लिहिले किंवा उच्चारले पाहिजे
हा आमचा शिरस्ता. तो बंगळुरात बस्ती घेत असतानाही चुकवला नाही आम्ही. एका
बाजूने सर्व मळमळ तर दुसऱ्या बाजूने सर्वतोपरी जळजळ असा विलक्षण अनुभव होता
तो. बस्ती देणाऱ्या कर्मचाऱ्याने स्तिमित होऊन "पुढील वेळेस बस्ती दोन्ही
बाजूंनी देणे" असा शेरा आमच्या केसपेपरवर लिहिला. आमचा चिंताग्रस्त चेहरा
पाहून त्याने "काळजी नसावी, वेगळे पाईप वापरू" असा दिलासा दिला. त्या
निसर्गोपचारानंतर खूप उल्हसित आणि हलके वाटले होते. असो. तर आज नामस्मरणाची
वही काढली. मागील पानावरून पुढे जाण्यासाठी बोटाला थुंकी लावून पान पलटणार
तोच चिरंजीव आत आले. "डेड! डेड! बाहर आईये!" आयला याला हिंदी शाळेत घालून
पस्तावलो आहे. "ॲ" या उच्चारलिखाणाचं काय वावडं आहे या हिंदीला कुणास ठाऊक.
"अरे कधी तरी डॅड म्हण की रे सोट्या!" त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत
चिरंजीव उद्गारले,"डेड, जल्दी बाहर आईये! टीव्हीपर मोदीअंकल आये है!"
च्यायला ते अंकल, आणि मी मात्र डेड! नालायक कार्टं! बाहेर आलो आणि पाहतो तर
टीव्हीवर होतेच हे महाशय. तिळपापड झाला अंगाचा. त्यात आमचे कुटुंब अगदी
टीव्हीसमोर गवारीच्या शेंगा मोडत अगदी टक लावून पाहत होते. हातातील गवारीचे
पार दहा तुकडे झाले होते त्याचेही तिला भान नव्हते. जाम भडकलो. मफलर लावतो
म्हणून काय झालं, मीही तेवढाच मर्दानी दिसतो. "हे काय?!! आजही गवारीची
भाजी?" कैच्या कैच बोलून गेलो. बोलायचं दुसरंच होतं. आणि आवाज जरा
चिरकल्याने व्हावा तेवढा त्वेषही व्यक्त झाला नाही. परिणाम एवढाच झाला की
तिने चिलट वारावे तसा हात हलवला आणि रीमोट हातात घेऊन टीव्हीचा आवाज
वाढवला. नमो सांगत होते की आज रात्री बारापासून पाचशे आणि हजाराच्या नोटा
रद्द! आॅं!! धप्प करून खुर्चीवर बसलो आणि पुढच्याच क्षणी एक दीर्घ किंकाळी
माझ्या मुखातून बाहेर पडली आणि पुन्हा ताडदिशी उभा राहिलो. चिरंजीव घाबरून
घराबाहेर पळाले, हिच्या हातून गवारीच्या दोन तीन शेंगा हवेत उडाल्या,
मातोश्री कवळीचा डबा घेऊन येत होत्या त्यांच्या हातातून कवळीचा डबा खाली
पडून कवळ्या फरशीवर विखुरल्या, पिताश्रींना ऐकू येत नसल्याने त्यांनी फक्त
कान खाजवला आणि माझ्याकडे एक नापसंतीचा कटाक्ष टाकला. मातोश्री भडकून
म्हणाल्या,"मेल्या, एवढं जीव गेल्यासारखं कशाला ओरडतोएस? मोदीनं नोटा बंद केल्या
तर तुझं काय वाकडं झालं रे?" ही म्हणाली,"आचरटपणा काय करायचा तो तिकडे
आॅफिसात करा. मेला टीव्हीही धड नाही पाहू देत!" मी भडकून म्हणालो,"माझा
आचरटपणा? माझा? इथे खुर्चीवर तुझ्या विणकामाच्या सुया कोणी ठेवल्या?" "मोदी ग्ग!" मी कळवळून म्हणालो. हो, गेली काही वर्षे "आई ग्ग" च्या ऐवजी "मोदी ग्ग" असंच येतं तोंडात. ही माझ्याकडे डोळे बारीक करून पाहत होती. या वेदना नोटा रद्द झाल्याच्या की सुयांनी पार्श्वभागात सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या हे तिलाच काय मलाही समजलं नव्हतं.
त्या वेदना ओसरायच्या आत फोन वाजला. च्या आयला, असं स्वत:शी चडफडत उचलला आणि "कोणाय?" असं खेकसलो. मनीष होता. तोही वेदनेने कळवळत होता. "काय रे! तुझ्याही बायकोने सोफ्यावर विणकामाच्या सुया ठेवल्या काय होत्या कायरे?" असा त्याही स्थितीत मी काव्यशास्त्रविनोद करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्याने "#$&$@! मोदी के @$&%#$!" असे उत्तर दिले. मी चट्कन स्पीकर फोन बंद केला आणि फोन कानाला लावला. पण मातोश्रींनी भुवया उंचावल्या होत्याच. "सर जी हम वो हस हस के सह लेते, हमारा पिछवाडा लोहे का बनाया हुआ है. टीव्ही ऑन किजीये और सुनिये, कहां क्या घुसा है. सर जी, आज पंजाब गुजरातके लिये गाडियां निकलनेवाली थी. मोदीने रिझर्वेशनही कॅन्सल कर दिया. वेटिंग लिस्टपर भी नही रख्खा. चलो अब दिल्ली मेट्रोही सही. विदाऊट टिकट जाया करेंगे पहले जैसे. %*$#$ में @$#%#$ इस मोदी के!" भावना अस्खलित होत्या. मीही म्हणालो "हां हां, अब दिल्ली का विकास. मैं पहुँचही रहा हूँ ऑफिसमें।" फोन ठेवला आणि नामस्मरणाची वही, फोन आणि जपमाळ हातात घेतली. दीर्घ श्वास घेतला आणि सोडला. कपालभांति करत जपाला सुरुवात केली, मनात "मोदीच्या @#@$#% ला $$&%@!"म्हटले , वहीत नमो वशीकरण मंत्र लिहिला आणि ट्विटरवर ट्वीट केले "मोदीजी, कितनी हाय लोगे हम जैसे लोगोंकी? पचपन मौतें हुई है पचपन!". पुनः एकदा बंगळुरास जाऊन यावे अशी भावना होते आहे.
अफाट लिहलतं....खूप हसलो😊😊😊💐💐💐💐💐💐💐💐8
ReplyDeleteधन्यवाद!😁
ReplyDelete