Thursday, December 29, 2016

दंगल इफेक्ट

नमो - मित्रोंsssss! क्या कुछ नही हो सकता इस देस में! बाप अगर चाहें, अगर बाप में हिम्मत हों तो पूरा परिवार देस के प्रगती में योगदान दे सकता है। कठिनाई होगी! जरूर होगी। बाल कटेंगे! लेकिन दोस्तोंsss! ये कटे हुए बालssssss! तिरुपती जायेंगे, भगवान के चरणोंमें अर्पित होंगे! क्या एक नागरिक का ये कर्तव्य नही?? मैं पूरे देस में एक क्रांति देखना चाहता हूं। आज पूरे देस में एक अलगाव सा माहौल है। कुछ लोग काले बाल जमा कर के बैठे है। देस के ९५ प्रतिशत जनता के बाल बचभी नही सकते तो ५ प्रतिशत लोग सिर्फ काले बाल ले के बैठे है। लोकतंत्र और समाजवाद हमें इसकी इजाजत नही देता। तो मित्रों!!! आज रात बारा बजे के बाद आधा इंच से जादा काले बाल अवैध माने जायेंगे। तिरुपती, हेअर कटिंग सलून में आप बिना सवाल बाल जमा करा सकते है। ३१ दिसंबर के बाद पूरा देस केशलेस हो जाएगा।

मोमोता - उडी बाबा! गोरीब के सर पे जो बाॅल बचा है उस को भी खोतोम करना चाहते हो क्या? हम ओमारा एक भी बाॅल नही देंगे!

लालू - इ बाल तुम्हारे बाप के है का? हमारे कान पर भी बाल है हम वो भी उखाडे का? 

मौनमोहन - ये लोकतंत्र के विरोधी है, ये कानूनी डकैती है, संघटित लूटमार है। काॅंग्रेस को गंजा बनाने की ये कूटनीती है। काले बाल खतम नही होंगे, सर पर से ले लो, लोग कही और बढा देंगे। लेकिन दस सालमें पहली बार मुँह खोल के बहुत अच्छा लग रहा है।

दिग्गी - ये कानून किसी विशिष्ट समाज के दाढीको टार्गेट करने के लिए किया जा रहा है। 

जाणता राजा - या ठिकाणी हा जो काही निर्णय घेण्यात आला आहे तो नियोजनपूर्वक घेतलेला दिसत नाही. वैयक्तिकरीत्या आम्हाला या निर्णयाचा काही त्रास नाही. आमच्या डोक्यावरचे केस आम्ही केव्हाच देशाला अर्पण केले आहेत.

केजरू - कितना गिरोगे मोदीजी? पहले अपने दाढ़ीके बाल का हिसाब दे दे। बिहारमें बीजेपीने इतने सारे हेअर कटिंग सलून क्यूं खरीदे इसका जवाब दे दे। हम लोकबाल बिल लायेंगे। हर एक को एक एक बाल का हिसाब देना होगा।

हजामतीचा त्रास झुलपं राखलेल्यांना होणारच. बापाच्या शिस्तीला मान द्या, मग मेडल आपलंच. नाही तर ३१ नंतर आहेत ढुंगणावर फटके! उतरायची गोष्ट लांबच, चढायचीही नाही थट्टी फस्सला.

Thursday, December 22, 2016

स्थित्यंतर

अखंड भारत, राष्ट्रीय पुनर्निर्माण, समग्र हिंदुराष्ट्राची व्यापक संकल्पना, राष्ट्रीय एकात्मता या सर्व गोष्टी शके १९३८ (भारतात राहणाऱ्या अभारतीय निवासींसाठी - २०१५) मध्येच संपूर्णपणे साकार झाल्यामुळे एक प्रकारचे शैथिल्य आले होते. मी आणि मोरूने शाखेत रोज जाणेही थांबवले होते. पूर्वीही आम्ही जात होतो त्याचे कारण उपर्निर्दिष्ट ध्येयांनी भारलेले काही स्वयंसेवक आम्हाला पुढे घालून हाकलत संघस्थानावर नेत असत. गोट्या, विटीदांडू, क्रिकेट किंवा ऋतूनुसार ठरलेले काही मान्यता पावलेले खेळ ऐन रंगात आलेले असताना हे स्वयंसेवक अल्लाउद्दीन खिलजी प्रमाणे घुसत, आमची रसद (घरून आणलेले भाजलेले शेंगदाणे, चुरमुरे इत्यादि) फस्त करत, पाहऱ्यावर ठेवलेले बुणगे हुसकावून लावत आणि आम्हाला जणू कैद करून शाखेवर नेत. याला घरच्या मंडळींची फूस लाभे आणि तेही,"बरं केलंस! नेच त्याला. दिवसभर उनाडक्या करण्यापलीकडे काही करत नाही. जरा शिस्त लागेल." मग हे देशभक्तीने भारलेले स्वयंसेवक आम्हाला हाकत संघस्थानाकडे नेत असत. मग शिशू आणि तरुण अशी वर्गवारी होऊन वयोमानास उचित असे खेळ निवडले जात. खेळ छान असत. खो खो, कबड्डी असे मर्दानी खेळ खेळताना मजा येई. मग कधी कधी वेतचर्म, खड़ग, दंड (याला तलवार, काठी अथवा लाठी म्हणणे हा दखलपात्र गुन्हा होता) यांचेही कधी तरी हात होत. आमचे वय शिशू नाही पण तरुणही नाही असे असल्याने तरुण ही शस्त्रे घेऊन मोहरे घेत तेव्हा आम्ही केवळ पाहत असू. शत्रूला कसे नामोहरम करून सोडायचे याचे शिक्षण समोर चाललेले असायचे. शत्रू कोण हे काही कळायचे नाही. त्या वयात आमची शत्रूमंडळी फक्त शाळेत आढळायची. आणि ती खडू, डस्टर, पट्टी अशा शस्त्रांचा वापर करणारी असायची. पण ही तरुण स्वयंसेवक मंडळी भयानक आवेशात दंड, खड़ग फिरवत असायची. त्यांचीही मास्तर मंडळी खडूस असावीत. मला वाटायचे आता उद्या कॉलेजमध्ये गेल्यावर मास्तरांचं काही खरं नाही. पण "संघ विकीर" झाल्यावर तीस सेकंदात संघस्थान रिकामे झालेले असे. काही क्षणांपूर्वी खड्गावर हात मारणारी जनता घरी पाटावर बसून खोबरे घालून केलेली चिंचगुळाची आमटी, पोह्याचा पापड, गुरगुट्या भात, त्यावर मऊसूत वरण, साजूक तूप यावर आडवा हात मारत बसलेली दिसायची. भोजन कसे चुकवायचे महाराजा? अन्न हें पूर्ण ब्रम्ह असे म्हटलेच आहे.

फार मोठा खेळ आहे राजा! चाणक्यनीती काय अशीच कळते काय कुणाला? खुद्द चाणक्यालाही ती कळायला काही वर्षे जावी लागली. थांब पन्नासएक वर्षं, हे हिंदुराष्ट्र भरभराटीला येतं की नाही पहाच. अशी वाक्यं कानावर पडायची. काही कळायचं वय नव्हतं. कुणाशी लढाई आहे आणि कोण कुणावर मुत्सद्देगिरी करतो आहे कुणास ठाऊक. पण हिंदुराष्ट्र, उन्नती, भरभराट असे शब्द ऐकले की बरं वाटायचं. स्वातंत्र्य मिळून दोन तपं लोटली होती. क्रांतिकारक वगैरे जमात काळाआड जाऊन काही वर्षं लोटली होती. नाही म्हणायला अंतुलेंनी सिमेंटची टंचाई असूनही स्मारकं वगैरे उभारली होती. बहुधा सागोळ वापरलं असावं. स्मारकं सागोळएवढीच टिकाऊ निघाली. एवढं उपेक्षेत गेलेलं स्मारक दुसरं नाही. उदघाटनानंतर गावातील एकही नेता तिथं पुन्हा फिरकलेला दिसला नाही. "सरकारी" हा शब्द इतका हीन दर्जाचा झाला की "हीन दर्जा" हाच शब्दप्रयोग नाहीसा होऊन त्याची जागा सरकारी या शब्दाने घेतली. पण राष्ट्रीय पुनर्निर्माणात पार झोकून दिलेल्या स्वयंसेवकांना सरकारी या शब्दाचे वावडे होते. आपण सत्तेत न राहता काम करू. "आपण" हा एक फार मोठा शब्द होता. एकचालकानुवर्तित्व अंगी बाणलेल्या यंत्रणेत आपण हा साम्यवादी शब्द मला पुढे जरा विनोदीच वाटायचा. "आदेश आला आहे, आपण सर्व जण झडझडून कामाला लागणार आहोत." अशी वाक्ये मला पुढे ऍस्टरिक्स कार्टूनमध्ये सापडली. त्यात रोमन सैनिकांच्या एका टोळीला दरोडेखोरांनी बुजबुजलेल्या जंगलातून जायची पाळी आली आहे. प्लॅटून लीडर विचारतो आहे,"पुढे जाऊन टेहळणी करायला कोण तयार आहे?" काही सैनिक आकाशात नजर लावून आहेत , काही पायाची बोटे न्याहाळत आहेत अशी परिस्थिती. शेवटी लीडर एका सैनिकाकडे बोट दाखवून म्हणतो,"यू! आय ऑर्डर यू टू व्हॉलंटियर!" हिंदू समाजाची अवस्था काहीअधिक प्रमाणात या सैनिकांसारखीच. मग लीडरला कुणालातरी स्वयंसेवक करावंच लागतं. सगळेच काही लीडर होऊ शकत नाहीत. सगळेच लीडर झाले तर काम कोण करणार? पण स्वयंसेवक होण्याचीही झिंग असते. आपण समाजकार्य करून राहिलो आहोत, निस्वार्थीपण अंगात भिनलं आहे, हीनदीन मला दुवा देताहेत, मला कुठल्याही पुरस्काराची गरज वाटत नाही असं सगळं पहिला पेग, दुसरा पेग मग तिसरा अशा थाटात चढत राहतं. एकदा होलियर दॅन दाऊ वाटायला लागलं की वेगळा विचार ऐकायची, मग तो चुकीचा का असेना निदान ऐकावा असं वाटायचीही गरज वाटेनाशी होते. राजकारणात आम्हाला शिरायची गरज वाटत नाही. त्या बजबजपुरीत शिरण्यापेक्षा आम्ही आमचं कार्य करत राहू हा विचार चांगला दिसत असला तरी त्याने नुकसानच जास्त झालं. पण होलियर दॅन दाऊ असले तरी स्वयंसेवक स्वच्छ होते, स्वार्थी नव्हते. म्हणजे ज्या लोकांनी राजकारणात खरं तर जायला हवं ते संचलनं करत राहिले, दुर्घटना घडली की सरकारी यंत्रणेच्या आधी तोंडाला फडकी बांधून पोचू लागले. जणू समांतर सरकारच स्थापन झाल्यासारखं झालं. पण जनाधार होता. ठराविक आर्थिक स्तरांतील लोकांचा. म्हणजे मध्यमवर्गाचा. त्या आधारामागे मोठा हातभार होता तो पूर्णवेळ कार्यकर्ते या खरोखरच निरलसपणे काम करणाऱ्या लोकांचा. होलियर दॅन दाउ लोक ते हे नव्हेत. यांच्या कामाच्या जोरावर व्यासपीठावर मागे लोडाला टेकून बसत ते होलियर दॅन दाउ असायचे. तेही तसे भ्रष्ट नसायचे, पण त्यांना खरोखरच आपण संघटन करून राहिलो आहोत असंच वाटायचं. राष्ट्रप्रेमाचा खरा अर्थ आपल्याला उमजून राहिला आहे असं त्यांना खरंच वाटायचं आणि त्यांची छाती अभिमानाने भरून यायची. त्यांनी शहाणे करून सोडावे सकळ जन असा निर्धार केलेला असायचा. पण या भारतवर्षात प्रत्येक जण स्वयंभू आणि शहाणा. त्यामुळे प्रत्येकालाच असं वाटायचं की दुसऱ्याला शहाणं करून सोडावं. त्यातून काँग्रेसच्या लोकांची गोष्टच वेगळी. काँग्रेसचे लोक कामात अतिशय व्यग्र असणारे होते. त्यांची एक सिस्टीम लागलेली होती. एकदा रुमाल बांधून नेहरू घराण्याची सरदारकी पत्करली की एक बरं असायचं, देशासाठी अथवा समाजासाठी डोकं वापरून विचार करायची गरज राहायची नाही. मग ते डोकं साठेबाजी, स्मगलिंग असले मान्यताप्राप्त अवैध धंदे किंवा मग गाव स्तरावर कृषी उत्पन्न बाजार समिती, झेडपी, सहकार क्षेत्र असल्या मान्यताप्राप्त वैध धंद्यात लागायचं. राष्ट्रप्रेम वगैरे शब्द कुणी उच्चारले की ही मंडळी "तर तर! राष्ट्रप्रेम पायजेलच की." असं म्हणून मिशीत हसायची. ही जानवी काय झेडपी ला हुबी ऱ्हात न्हाईत, कृषी उत्पन्नच्या वाऱ्याला हुबी ऱ्हात न्हाईत, मग कशाला विरोध करायचा? लावा तुमच्या शाखा आणि तासाभरानं विकीर करून घरला संध्येच्या टायमाला पोचा. शाखेत फक्त जानवी येत नाहीत, तिथे जात पात मानली जात नाही हे खाजगीत कबूल करणारे हे लोक निवडणुका आल्या की मात्र संघाचा जातीयवादी वापर करत असत.

फास्ट फॉरवर्ड तीस वर्षे. त्यावेळचे तरुण वर्गातील स्वयंसेवक आता प्रौढ वर्गात जाऊ लागले. हिंदुराष्ट्रवादी भूमिका पूर्वी तशीच होती. फक्त आता त्यात कालानुरूप बदल घडले. पूर्वी स्वयंसेवक "पूर्णवेळ" झाला नाही तर तो टेल्को अथवा गोदरेज किंवा तत्सम कंपनीत चिकटायचा, अथवा स्टेट बँक, किमान पक्षी गावच्या शाळा कॉलेजमध्ये नोकरीला लागायचा. आता त्यात संगणक व्यावसायिक मिळाले. म्हणजे पाच दिवस वरण भात तूप पण वीकएंडला पिझ्झा वाले. गूगलच्या आशीर्वादाने बसल्या बसल्या "आपले पूर्वज, आपली संस्कृती कस्सले पुढारलेले  होते नै मित्रांनो?" करणारे. महत्वाचा बदल म्हणजे सत्तेत न राहता समाजकार्य करत रहायचं हा दृष्टिकोन बदलला. पूर्वी सत्ता नसल्यामुळे सत्तेचा मोह काय असतो हे माहीत नव्हतं. त्याचा एक वेगळाच अभिमानवजा गर्व असायचा. "आम्ही बिघडलो तुम्ही बी घडा ना" अशी पद्ये म्हणायला बरं वाटायचं. सत्ता हातात घेऊन त्याचा मोह न बाळगता लोकोपयोगी कामांसाठी उपयोग करण्याचा अनुभव कुणालाच नव्हता. थोडक्यात दरिद्री माणसाने उगाचच "सोने माणिक आम्हां मृत्तिकेसमान" म्हटल्याप्रमाणे होतं. तुकाराम वगैरे प्रभृतींचं ठीक होतं, त्यांना गाथा, अभंग वगैरे लिहून अनुभव होता. एवढं भरघोस लिखाण करून कुणी त्याची दाद घेत नव्हतं, उलट ते लिखाण इंद्रायणीच्या डोहात बुडवायला वगैरे सांगितल्यावर वैराग्य यायचंच. इथे गावात शिबिर भरतं आहे, त्यासाठी घरून पोळ्या पाठवल्या आहेत, इतक्या भरघोस त्यागाच्या जोरावर "आम्ही बिघडलो" हे पद्य म्हटलं जायचं. पण निर्णय झाला. आता सत्तेत येऊन समाज बदलायचा. राष्ट्रप्रेम कसं ओसंडून वाहिलं पाहिजे सगळ्यांतून. तळागाळात काम होतंच. पण काँग्रेसनं लोकांची नस बरोबर ओळखली होती. मध्यमवर्गाची त्यांना फिकीर नव्हतीच. गुंड, दरोडेखोर, सट्टेबाज,साठेबाज,दलाल यांना त्यांचे धंदे करायला दिलं की तेच लोक आपले धंदे सुखरूप ठेवण्यासाठी काँग्रेसला सत्तेत ठेवायला धडपडणार हे काँग्रेसचं गणित गेली कित्येक वर्षं चाललं होतं. मग काँग्रेसचा पाडाव करायला काँग्रेससारखीच समीकरणं मांडली. ती यशस्वीही झाली. पण सत्तेत आल्यानंतर खरी मज्जा कळली. काँग्रेसवाले उगाच समाजोपयोगी कामं वगैरेच्या भिकार भानगडीत न पडता सत्तेचा अनुनय का करत राहिले होते ते समजू लागलं. एक प्रकारचा युरेका क्षण सापडला. उड्डाणपूल, महामार्ग, जलसिंचन योजना इत्यादि कुणाच्या उद्धारासाठी आणि प्रगतीसाठी आहेत याचा उलगडा झाला. शिवाय सत्तेत राहूनच पुढील सत्तेची जुळणी करता येते हे लक्षात आलं. काहींना हे पचलं नाही. त्यांना लगेच सुधारणा करायच्या होत्या. पण विचार असा होता, की प्रथम पक्ष बलवान झाला पाहिजे. बलवान झाल्यानंतर राष्ट्रउभारणी आहेच.यश मिळालं पण मध्यमवर्गाची आता पंचाईत झाली. वर्षानुवर्षं माध्यम वर्ग संघाला पाठिंबा देत आला. पण संघाच्या विचारसरणीला कुठं तरी भाजपने फारकत दिली आणि काँग्रेसच्या भ्रष्ट गेंड्यांना पक्षात प्रवेश दिला. त्यामुळे आता हे जे कुणी सत्तेत बसले आहेत त्यांच्यात व काँग्रेसच्या निबर कातडीच्या गबर, मुजोर लोकांच्यात काही फरक कळेनासा झाला.

असं असलं तरी, कितीही हिताची बाब असली तरी केवळ मोदी म्हणतायत म्हणून त्याला विरोध हा काय प्रकार आहे हेच कळत नाही. नियम वर्षानुवर्षं अस्तित्वात असलेले असताना अचानक त्याचा जाच होतो म्हणून बोंब ठोकायची आणि अच्छे दिन हेच का म्हणून विचारायचं. निश्चलनीकरण तर यशस्वी होऊच द्यायचं नाही असा काँग्रेसचा उघड उघड डाव आहे. मग त्यासाठी शेतकऱ्यांना वेठीला धरलं. काँग्रेसचेच गबर दलाल, कृषी उत्पन्न बाजार समित्या यांच्याच ताब्यात. कॅशलेस व्यवहार करणं त्यांना अवघड नव्हतं. आयओयू लिहून देता आले असते. पण मग मोदी यशस्वी झाले असते. मग शेतकऱ्यांचा माल विकतच घ्यायचा नाही, रक्कम हातात नाही म्हणून व्यवहार नाही असं सांगणं सुरू झालं. आणि मग शेतकऱ्यांबद्दल उमाळे फुटले, त्यांच्या "वास्तव" कथा सर्वत्र फिरू लागल्या. सडलेले टोमॅटो, बटाटे कांदे यांचे फोटो मीडियावर फिरू लागले. काही वर्षांपूर्वी कृषी उत्पन्न समितीने वेळेत विकत घेतला नाही म्हणून टनावारी कांदा सडल्याचे फोटो आले होते. त्यावेळी हे उमाळावाले कुठे लुप्त झाले होते कुणास ठाऊक. आपल्याकडे बँकेने कर्ज दिलं नाही किंवा दिलं, पाऊस पडला नाही किंवा खूप पडला, खूप उत्पन्न झालं किंवा दुष्काळाने काहीच झालं नाही तर शेतकरी थेट देशोधडीलाच लागतो. अधेमधे कुठे थांबत नाही. एकदा उमाळे सुरू झाले की मग कुणी लॉजिकल काही सुचवलं तर त्याला लगेच "तुम्हाला शेतकऱ्यांचं दु:ख काय कळणार?" असे प्रश्न सुरू होतात. हातावरचं पोट असणाऱ्यांचे मात्र हाल झाले हे कबूल करावं लागेल. मग हिंदुराष्ट्राची उभारणी करता करता लोकशाहीची मूल्ये जपली पाहिजेत याचा थोडासा विसर पडला असं वाटू लागलं. सर्वात महत्व कशाला? राष्ट्र आधी हे तर खरंच. पण मी म्हणेन तोच राष्ट्रवाद हा हट्ट लोकशाहीशी जुळणारा नाही. सर्वांना मत आहे, अगदी मूर्खपणाचं वाटलं तरी ते आहे. हे लोकशाहीचं मूलतत्व आहे. सध्या भाजप किंवा संघ विचारसरणीला जो विरोध होतो आहे तो यासाठी. म्हणून एकावन्न टक्के लोकांनी देश खड्ड्यात घालण्यासाठी आंदोलन केलं तर लोकशाहीच्या तत्वाला मान देऊन मोठ्या इतमामाने देश खड्ड्यात जाऊ द्यावा. काँग्रेसवाले, बजाव ताली!

Wednesday, December 14, 2016

काही बोलायाचे आहे पण....

सायबांच्या केबिनचं दार उघडलं आणि फणकाऱ्याने मिस रोज बाहेर आली आणि पाय आपटत आपल्या टेबलकडे गेली. तिने हातातली फाईल टेबलावर फेकली आणि धाड्कन खुर्चीवर देह झोकून दिला. आणि म्हणाली,""आमी नाई जा! आमाला किनई कुणी बोलूच देत नाई!" मिस रोज आमच्या हाफिसाची जणू मधुबालाच. म्हणजे तशी काही कमनीय वगैरे म्हणता आलं नसतं तिला. म्हणजे नसतंच खरं तर. ५६x५६x५६ म्हणजे फायर हायड्रंट सारखी बांधणी. चूक तिची नाय हो. कुणी रोज फाफडा, ढोकळा, उंधियु  खाऊन ३६x२४x३६ राहून दाखवावं. चॅलेंज आहे आपलं. पण बाई मधुबाला नसली तरी मधुबोला तरी होतीच. सर्वांशी गोड बोलून काम करून घ्यायची. त्यातून कामाला वाघ. सकाळी सात वाजता यायची ते रात्री दहाला जायची. दिवसातून बाथरूमलाही एकदा म्हणजे एकदाच. अगदी लिपस्टिकसुद्धा लावायला सुद्धा जायची नाही. नाही तर आमचा पेंडशा! दिवसातून दहा वेळा कानाला जानवं लावतो. वेंकी तर उघड उघड जरा व्हॉट्सऍपला जाऊन येतो म्हणतो. मिस रोज दोन वर्षांपूर्वीच आली पण कानामागून आली आणि तिखट झाली असा प्रकार. वेंकी, गडकरी वगैरे इतक्या वर्षांपासूनचे.  मिस्टर लालवाणी तर रिटायरमेंटला आलेले. त्यांची सिनिऑरिटी खरं तर. या सगळ्यांना डावलून सायबांनी मिस रोजला सगळे अधिकार दिलेले. लालवाणी लालबुंद होऊन गरजले होते,"या बाईला ठेवाल तर आम्हाला मुकाल." आता लालवाणींचा मुका कोण घेणार? तरीही सायबांनी बाईंना ठेवलं. वास्तविक बारकाईनं पाहिलं तर मिस रोजना बारीक दाढीमिशा पण होत्या. पण लालवाणींच्या मिशांपेक्षा त्या कमी टोचतील असा विचार सायबांनी केला असावा. पण लालवाणींनी काही धमकीप्रमाणे मुकाबिका घेतला नव्हता. मिस रोजनीही आल्या आल्या चांगला पदर बिदर ओढून डोळ्यात पाणी आणून लालवाणींना नमस्कार केला होता. लालवाणींनी गहिवरून अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिला होता. मिस रोज चक्क लाजून जांभळ्या झाल्या होत्या. त्यांनी "इश्श, आत्ता कुठं आम्हाला साठावं लागतंय. आमचं लग्न सुद्धा नाही झालं अजून" असा साभिनय डायलॉग मारला होता. त्यावर लालवाणींनी,"वाह! आमचीही तीच अवस्था आहे. आत्ता कुठं सत्तरी ओलांडलीय. आमचं प्रोफाईल पहा बरं का. लोकाग्रहास्तव रजिस्टर करून टाकलं झालं. रिअल हनुमान मॅट्रिमोनी डॉट कॉम. लगेच कित्येक फोन आले. पण दुर्दैवाने फोन करणारेही पवनसुत हनुमान निघाले. सध्या  रिटायर्ड सिंगल्स डॉट कॉम वर पडीक आहे." मिस रोजने एक सहानुभूतीचा कटाक्ष टाकून त्यांची ट्रान्सफर स्वागत खात्यात करून टाकली होती. त्यानंतर मिस रोजने क्रांतिकारी निर्णय घ्यायला सुरवात केली होती. सर्वात प्रथम बाथरूम टाईमवर नियम काढले. तीन मिनिटाच्या वर जर कुणी "आत" राहिले तर आपोपाप फ्लश होऊन टॉयलेट पेपर भिंतीत गुप्त होत असे आणि त्या सिंहासनावर हताशपणे विराजमान झाल्याचा फोटोही निघत असे. शिवाय टॉयलेटमध्ये वायफायच काय फोन नेटवर्कही ब्लॉक करून टाकले. अपलोड वगैरे लाड विसरा, जे काय असेल ते झटपट डाऊनलोड करा आणि परत कामाला लागा असाच त्यातून संदेश दिला होता. प्रथम रांगा लागल्या, पण तीन मिनिटांत आवरतं घ्यायला लागत असल्याने लोकांना फार वेळ थांबायला लागत नव्हतं. मग पुढे पुढे लोकांनाही सवय झाली. भारताच्या इतिहासात असा कठोर संदेश पूर्वी फक्त इंदिरा गांधींनी "एकच जादू, झपाटून काम" या घोषणेतून दिला होता. त्याचा परिणाम म्हणून भारताची लोकसंख्या पाच महिन्यांत दहा टक्क्यांनी वाढली होती. लोकांनी सरकारला साथ द्यायचं ठरवलं तर काय अशक्य आहे?

तीच मिस रोज "आमी नाई जा! आमाला किनई कुणी बोलूच देत नाई. " असं फणकाऱ्याने जेव्हा म्हणू लागली आणि ऑफिसातील यच्चयावत क्रिया तत्क्षणी थांबल्या. पेंडशा एक्सेल शीटशी लढाई करत होता, सेल्सचा प्रधान नवी आरएफपी आली होती तिची चिंता करत बसला होता, गडकरी म्याडमचा नुकताच पहिला चहा झाला होता आणि त्या आत्ता कुठे फेसबुकवर आपलाच फोटो पाहून स्वतःशी खुद्कन हसत होत्या, दत्तू त्यांच्या मागे उभा राहून तो फोटो पाहून दात काढत उभा होता. नव्यानेच भरती झालेला खुजटमल गडकरी म्याडमवर खार खाऊन असायचा. कामाच्या दुसऱ्याच दिवशी बाई आठ तासातले सहा तास व्हाट्सऍप, फेसबुकवर पडीक असतात तरी त्यांना पगार मिळतो अशी त्याने एचआर कडे तक्रार केली होती. खुद्द एचआरचे हेडच गडकरी म्याडमचे मिष्टर निघाल्यावर तो फारच व्यथित झाला होता. त्यात मिस रोजनी पुरावे मागितल्यावर गळपटला. मग तो रोज काम करता करता नाकातून फूत्कार टाकत तो म्याडमकडे चष्म्याच्या वरून रोखून पाहू लागला होता. शेवटी गडकरी म्याडमनी रीतसर हॅरॅसमेंटची तक्रार केल्यावर त्याने रोखून बघणे थांबवले पण टोमणे सुरूच ठेवले. इथे मिस रोज आता लाडिकपणे पण पेटली होती,"आता आमाला बोलायला द्यायचंच नाई म्हंजे काय म्हणावं आता? चांगलं कंपनीच्या भल्यासाठी काही करायला जावं तर मेली आमालाच बोलणी. म्हणे तुमी आता बोलूच नका. बरं नाई तर नाई. आमी सरळ स्टाफशी बोलू." आम्ही म्हटलं , म्याडम तुम्ही आमच्या सगळ्यांच्या बॉस. त्यातून कडक! तुम्ही चार्ज घेतल्यापासून ऑफिसमध्ये चहासुद्धा स्वतःच्या पैशाने प्यायला लागतो आहे. तुमची कोल्हापुरी चप्पल बाहेर कॉरिडॉरमध्ये करकरली की हा खुजटमलही सावरून बसतो. इथे खुजटमल मध्येच चिरक्या आवाजात म्हणाला,"काही नाही हं, घाबरत वगैरे काही नाही आपण. एकदा कधी तरी पाठ अवघडली म्हणून सरळ बसत होतो तर तेवढ्यात या आल्या." बूट, पैशाचं पाकीट,चड्डी बनियन शर्ट प्यांट इत्यादि ऐवज धरून पन्नास किलोसुद्धा वजन होणार नाही या खुजटमलचं, पण ऐट पैलवानाची करतो. चालणंही उगाच हात पैलवानासारखे ठेवून कंसात चालल्यासारखं. मिस रोजवर उगाच चिडून असतो. सगळ्या स्टाफला तिच्याबद्दल कायबाय सांगून भडकवत असतो. परंतु आम्हाला दाट संशय आहे मिस रोज या खुजटमलची गुप्त क्रश आहे. कधी तरी याच्या टेबलाची झडती घ्यायला हवी.

एरवी मिस रोज आम्हाला दिसतसुद्धा नाहीत. त्या केबिनमध्ये तर आम्ही आपले बाहेर एका हॉलमध्ये बसणारे. आज चक्क बाई आमच्यात बसून मनीची व्यथा सांगतात याचंच कवतिक घेऊन आमचं काळीज सुपाएवढं झालं. एरवी त्यांच्या मनीची बात आम्हाला जी आर मधूनच कळायची. मग आम्ही मिस रोजना विचारलं, पण तुम्हाला एवढं रुसायला झालं तरी काय? कोण तुम्हाला बोलू देत नाही? या ऑफिसात तुमची शिस्त आणि नियम चालतो. तुम्हाला कोण अडवणार? यावर मिस रोज स्तब्ध झाल्या. त्यांचे डोळे शून्यात लागले आणि त्या म्हणाल्या "आम्हाला ऑफिसात बोलायची परवानगी नाही." हे म्हणजे अतिच झाले. बाई जवळ जवळ मालकच होत्या. मालकही बाईंच्या जवळ जवळ होते. मग कोण कुणाला परवानगी देणार आणि नाकारणार? पेंडशानं धीर करून विचारलं,"का?" पेंडशानं हा "का" इतक्या तालात विचारला की इथे मला उगाचच "एक लाजरा न साजरा मुखडा" मधल्या अरुण सरनाईकच्या त्या "का?" ची आठवण झाली. मिस रोज आता लाजून "बगत्यात!" म्हणतात की काय असं एकदा वाटून गेलं. "मित्र हो!" बाई म्हणाल्या. इथे आम्ही सावध झालो. हे शब्द हल्ली कानावर पडले की त्या पाठोपाठ काही तरी मागणी येत असते हे अनुभवानं आम्ही शिकलो आहोत. पण तसं काही झालं नाही. मिस रोज पुढे म्हणाल्या "मित्र हो! आम्ही नियम करतो ते आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी, आपल्या कंपनीच्याच फायद्यासाठी. पण कुणी तरी आमच्याविरुद्ध तक्रार केली आहे. त्यातल्या त्यात आमच्या "मर्यादित लघु-दीर्घशंका" नियमाविरुद्ध. मी सरळ कार्यक्षमतेत झालेल्या वाढीचे आकडे समोर ठेवले. साहेब अतिशय खूष झाले. आणि ज्याने तक्रार केली होती त्याच्यावरच ऍक्शन घ्या असा मला सल्ला दिला." बाई थांबल्या. आम्हाला काही कळले नाही. साहेब जर खूष झाले आहेत तर बाई फुरंगटून का बसल्या आहेत? पेंडशा बसल्या जागी चुळबूळ करीत म्हणाला,"असं? क क क्का म्हणे असं? म्हणजे मला म्हणायचं होतं, वा! वा! बरोबरच आहे. कैच्या कैच तक्रार आहे ही." बाई पुढे म्हणाल्या,"दुर्दैवी घटना पुढे घडली. तासाभराने मला साहेबांचाच फोन आला. मी उचलल्या उचलल्या पहिला शब्द आला,"च्या मायला!" "कसले नियम करता हो? तीन मिनिटं फक्त? न सांगता असे कसे निर्णय घेता तुम्ही?" मी शांतपणे विचारलं,"साहेब कुठं आहात तुम्ही?" त्यावर तर तिकडे स्फोटच झाला,"कुठं? तुमच्याच निर्णयाचा लाभ घेत बसलोय! म्हणजे कुठे असणार सांगा पाहू? या पुढे कुठलाही नियम करणार असाल तर प्रथम आम्हाला सांगा! बास! आम्ही यावर काही ऐकणार नाही तुमचं! आणि त्या दत्त्याला पाठवून द्या इकडे, तुम्ही जप्त केलेली रसद घेऊन ये म्हणावं! काय थंडी आहे इथे! ऑफिसापेक्षा इथे एसी जास्त! त्यात फोटोही निघालाय आमचा! तुमचे नियम होतात आणि आमचा पार्श्वभाग गोठतो. काय अवदसा आठवली आणि तुम्हाला एम.डी. केलं देव जाणे! ठेवा फोन आता!" "आता सांगा!" बाई आमच्याकडे पाहू लागल्या. खरं तर आम्हाला सायबांचा निघालेला तो सिंहासनावर अवघडासन करत बसलेला फोटू पाहायची दुर्दम्य इच्छा होत होती. तो त्यांच्या आधार कार्डावरील फोटोपेक्षा जास्त करमणूक करेल यात शंका नव्हती. "हा नियम का केला याचं कारण सांगायलाही आमाला बोलू दिलं नाई. सायबांकडे तक्रार कुणी केली असेल बरं?" असं म्हणून बाई आमच्याकडे पाहू लागल्या. आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो. का कुणास ठाऊक, पेंडशा कधी गुप्त झाला ते कळलंच नाही.

Sunday, December 4, 2016

वासरी अरविंदाची - भाग (कुणी लेकाच्यानं मोजलेत?)

सगळं कसं छान चाललं होतं. केंद्रात मोदी आणि दिल्लीत आम्ही. भल्या पहाटे नऊ वाजता उठावं, नाकधौती करावी, खाकरून खोकून घशाचा तंतू न तंतू जागा करावा, मग आसनं करावीत. पश्चिमोत्तानासन, श्वानासन, व्याघ्रासन. श्वानासन करताना अचानक पोट मोकळं झाल्याचं समाधान मिळावं आणि मुखावर ते दैवी सुख विलसावं. त्या आनंदात निर्विकल्प समाधी लागावी ते थेट एकदम स्वत:च्याच घोरण्याच्या आवाजाने जाग येईपर्यंत. मग उठावं, छानपैकी आळस द्यावा. कधी कधी वाटतं हे आळस देणं म्हणजे निसर्गानं माणसाला दिलेलं वरदानच. तासभर आसनं करून जो आराम मिळत नाही तो तीस सेकंदांच्या आळोख्यापिळोख्यांनी मिळतो हे एक उघडे सत्य आहे. असो. यानंतर मोजून तीन बदाम, पाच मनुका आणि १०० मिली गाईचे दूध असा अल्प आहार घ्यावा. बंगळुरास निसर्गोपचार घेताना तुम्हाला एवढाच पचेल असे वैद्यांनी सांगितलेले. व्यक्ती तशी प्रकृती. असा अल्पोपाहार झाल्यानंतर ॐकार करावा. ठणाणा करण्यासाठी छाती आणि फुफ्फुसे उत्तम हवीत. ॐकाराने खूप फरक पडला आहे. पूर्वी आवाज चिरकत असे. आता सायंकाळपर्यंत टिकतो. हे म्हणजे आयफोनच्या ब्याटरीपेक्षा भारी झाले. मी बस्ती घेत असताना एका वात्रट कार्यकर्त्याने माझा फोटो घेतला होता. त्यात मीच चार्जिंगला लावलेल्या आयफोनसारखा दिसत होतो. त्या बस्तीनंतर मी फुल चार्ज होऊन जोमाने कामाला लागलो होतो. दोन दिवस मोदींची आठवणही झाली नव्हती. मग यथावकाश जुन्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्यातून अपचन, वायुगोळा, आम्लपित्त हे सगळे परत आले ते सोडा. पंजाबच्या निवडणुका आल्या. परमेश्वर कृपेने दिल्लीच्या रूपात घबाड हाती लागले होते. निवडणुकीची सोय झाली होती. काही तत्वनिष्ठ कार्यकर्त्यांनी पैसे वाटून निवडणुका लढण्याला विरोध केला होता. येडझवे तेच्या मायला. मी म्हणालो, पाणी घातलं नाही तर झाडही वाढत नाही. हे पाणी घालणं आहे असं समजा. तर जाऊन भाजपला मिळाले. मरो! ट्वीट करून टाकलं, मोदींनी आमच्या पक्षात घरभेदी घुसवले होते. तर एकूण जय्यत तयारी होती. निवडणुका काय नुसत्या तत्वावर थोड्याच जिंकता येतात? गड्ड्या लागतातच. त्यांची तजवीज दिल्लीकरांनीच करून ठेवली होती. आता उडता पंजाब लवकरच उघडा पंजाब वाघडा पंजाब होणार होता. तेवढ्यात माशी शिंकली. 

कालच त्या गड्डीतून पाचशेच्या दोन नोटा आणि हजारच्या दोन अशा हळूच काढून घेतल्या होत्या. सोपं काम नव्हतं. मनीष लेकाचा खजिन्यावरच्या नागोबासारखा त्यावर बसून असतो. बरं काढून तर घेतल्या, आणि म्हटलं जरा आज जरा इडली डोसा पाणीपुरी वगैरे आम चैन करावी. मग निवांतपणे मोदीनामस्मरणाची वही बाहेर काढली. प्रतिदिनी किमान दश सहस्त्र वेळा नाम लिहिले किंवा उच्चारले पाहिजे हा आमचा शिरस्ता. तो बंगळुरात बस्ती घेत असतानाही चुकवला नाही आम्ही. एका बाजूने सर्व मळमळ तर दुसऱ्या बाजूने सर्वतोपरी जळजळ असा विलक्षण अनुभव होता तो. बस्ती देणाऱ्या कर्मचाऱ्याने स्तिमित होऊन "पुढील वेळेस बस्ती दोन्ही बाजूंनी देणे" असा शेरा आमच्या केसपेपरवर लिहिला. आमचा चिंताग्रस्त चेहरा पाहून त्याने "काळजी नसावी, वेगळे पाईप वापरू" असा दिलासा दिला. त्या निसर्गोपचारानंतर खूप उल्हसित आणि हलके वाटले होते. असो. तर आज नामस्मरणाची वही काढली. मागील पानावरून पुढे जाण्यासाठी बोटाला थुंकी लावून पान पलटणार तोच चिरंजीव आत आले. "डेड! डेड! बाहर आईये!" आयला याला हिंदी शाळेत घालून पस्तावलो आहे. "ॲ" या उच्चारलिखाणाचं काय वावडं आहे या हिंदीला कुणास ठाऊक. "अरे कधी तरी डॅड म्हण की रे सोट्या!" त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत चिरंजीव उद्गारले,"डेड, जल्दी बाहर आईये! टीव्हीपर मोदीअंकल आये है!" च्यायला ते अंकल, आणि मी मात्र डेड! नालायक कार्टं! बाहेर आलो आणि पाहतो तर टीव्हीवर होतेच हे महाशय. तिळपापड झाला अंगाचा. त्यात आमचे कुटुंब अगदी टीव्हीसमोर गवारीच्या शेंगा मोडत अगदी टक लावून पाहत होते. हातातील गवारीचे पार दहा तुकडे झाले होते त्याचेही तिला भान नव्हते. जाम भडकलो. मफलर लावतो म्हणून काय झालं, मीही तेवढाच मर्दानी दिसतो. "हे काय?!! आजही गवारीची भाजी?" कैच्या कैच बोलून गेलो. बोलायचं दुसरंच होतं. आणि आवाज जरा चिरकल्याने व्हावा तेवढा त्वेषही व्यक्त झाला नाही. परिणाम एवढाच झाला की तिने चिलट वारावे तसा हात हलवला आणि रीमोट हातात घेऊन टीव्हीचा आवाज वाढवला. नमो सांगत होते की आज रात्री बारापासून पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द! आॅं!! धप्प करून खुर्चीवर बसलो आणि पुढच्याच क्षणी एक दीर्घ किंकाळी माझ्या मुखातून बाहेर पडली आणि पुन्हा ताडदिशी उभा राहिलो. चिरंजीव घाबरून घराबाहेर पळाले, हिच्या हातून गवारीच्या दोन तीन शेंगा हवेत उडाल्या, मातोश्री कवळीचा डबा घेऊन येत होत्या त्यांच्या हातातून कवळीचा डबा खाली पडून कवळ्या फरशीवर विखुरल्या, पिताश्रींना ऐकू येत नसल्याने त्यांनी फक्त कान खाजवला आणि माझ्याकडे एक नापसंतीचा कटाक्ष टाकला. मातोश्री भडकून म्हणाल्या,"मेल्या, एवढं जीव गेल्यासारखं कशाला ओरडतोएस? मोदीनं नोटा बंद केल्या तर तुझं काय वाकडं झालं रे?" ही म्हणाली,"आचरटपणा काय करायचा तो तिकडे आॅफिसात करा. मेला टीव्हीही धड नाही पाहू देत!" मी भडकून म्हणालो,"माझा आचरटपणा? माझा? इथे खुर्चीवर तुझ्या विणकामाच्या सुया कोणी ठेवल्या?" "मोदी ग्ग!" मी कळवळून म्हणालो. हो, गेली काही वर्षे "आई ग्ग" च्या ऐवजी "मोदी ग्ग" असंच येतं तोंडात. ही माझ्याकडे डोळे बारीक करून पाहत होती. या वेदना नोटा रद्द झाल्याच्या की सुयांनी पार्श्वभागात सर्जिकल स्ट्राइक केल्याच्या हे तिलाच काय मलाही समजलं नव्हतं. 

त्या वेदना ओसरायच्या आत फोन वाजला. च्या आयला, असं स्वत:शी चडफडत उचलला आणि "कोणाय?" असं खेकसलो. मनीष होता. तोही वेदनेने कळवळत होता. "काय रे! तुझ्याही बायकोने सोफ्यावर विणकामाच्या सुया ठेवल्या काय होत्या कायरे?" असा त्याही स्थितीत मी काव्यशास्त्रविनोद करण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्याने "#$&$@! मोदी के @$&%#$!" असे उत्तर दिले. मी चट्कन स्पीकर फोन बंद केला आणि फोन कानाला लावला. पण मातोश्रींनी भुवया उंचावल्या होत्याच. "सर जी हम वो हस हस के सह लेते, हमारा पिछवाडा लोहे का बनाया हुआ है. टीव्ही  ऑन किजीये और सुनिये, कहां क्या घुसा है. सर जी, आज पंजाब गुजरातके लिये गाडियां निकलनेवाली थी. मोदीने रिझर्वेशनही कॅन्सल कर दिया. वेटिंग लिस्टपर भी नही रख्खा. चलो अब दिल्ली मेट्रोही सही. विदाऊट टिकट जाया करेंगे पहले जैसे. %*$#$ में @$#%#$ इस मोदी के!" भावना अस्खलित होत्या. मीही म्हणालो "हां हां, अब दिल्ली का विकास. मैं पहुँचही रहा हूँ ऑफिसमें।" फोन ठेवला आणि नामस्मरणाची वही, फोन आणि जपमाळ हातात घेतली. दीर्घ श्वास घेतला आणि सोडला. कपालभांति करत जपाला सुरुवात केली, मनात "मोदीच्या @#@$#% ला $$&%@!"म्हटले , वहीत नमो वशीकरण मंत्र लिहिला आणि ट्विटरवर ट्वीट केले "मोदीजी, कितनी हाय लोगे हम जैसे लोगोंकी? पचपन मौतें हुई है पचपन!". पुनः एकदा बंगळुरास जाऊन यावे अशी भावना होते आहे.