Thursday, January 14, 2016

संक्रांतीचं पसायदान

गुलाबी थंडी म्हणजे काय ते न कळणारं वय होतं ते. कोकणातली थंडी ही तशी नरम मुलायमच म्हणायची. काटा येतोय असं म्हणायचं पण तो हवीहवीशी शिरशिरी आणणारा काटा. बराचसा तिळगुळावर आलेल्या काट्यासारखा. मऊशार रजईतून बाहेर न येता तसंच त्या उबेत राहून कानोसा घेत रहायचं. खिडकीतून अगदी अंधुकसा उजेड आत झिरपत असे. फुलाच्या पाकळीवर कळत न कळत नाजूक दंव जमल्यासारखा तो उजेड अर्धमिटल्या पापण्यातून जाणवत राही. अजून पांखरांचीही चाहूल नसायची. तीही पिसांत माना खुपसून बसलेली असायची. डोंगरात धुकं संथपणे तरंगत असायचं. डोळे मिटलेले असले तरी ते धुकं मनात उतरायचं, दिसायचं. असं ते धुकं उतरलं की रजईत आणखी मुरून आत आत शिरायला व्हायचं. डोळे मिटून घेतले तरी आपण त्या निळ्याशार डोंगरात धुक्याच्या वर तरंगतो आहोत असा भास व्हायचा. अगदी माथ्यावर. खाली ढग. नाही, ढग नाही, धुकंच ते. म्हटलं तर तिथं आहे, या क्षणी आहे, पापणी लवते न लवते तो विरघळून वाफेसारखा दिसेनासं होतं आहे. स्वप्नासारखं. स्वप्नात आठवायचं स्वत:ला बजावूनही जाग आल्यावर काहीच आठवू नये तसा. डोळे मिटून स्वत:शी म्हणायचं, बघ, हे असं धुक्यासारखं आयुष्य हवं. हवंहवंसं वाटेपर्यंत विरघळून जाणारं. सुख, आनंद धुक्यासारखाच असतो नाही का? असं काहीबाही विचार करत पडून असावं. 

हळुवारपणे आईनं हलवून जागं करावं. "ऊठ, आज संक्रांत आहे." हूं म्हणून पाय पोटाशी घेऊन मग रजई डोक्यावरून. पण मग उठावं, पांघरूण बाजूला केल्यावर थंडी थाडदिशी अंगावर आदळायची. हाताची घट्ट घडी घालून थेट मागील दारी अंगणात यायचं. बंब पेटलेला असे त्याच्याभवताली डेरा टाकायचा. आईला बजावायचं, शाळेत तिळगूळ घेऊन जायचाय हं. त्या माऊलीनं आधीच तिळगुळाचे डबे तयार करून ठेवलेले असायचे. एक माझ्यासाठी, एक भावासाठी. मग डबे उघडून कुठल्या कुठल्या रंगाचे आहेत ते पहायचं. पांढरे, गुलाबी, पिवळे, कधी निळेसुद्धा. त्या रंगांनी हरखून जायला व्हायचं. रंग मला नेहमीच वेडावत आलेत. हे तर गोड रंग. रंगीबेरंगी तिळगुळासारखी मोहक वस्तू नसेल. त्यावेळी मी माझ्या आवडत्या रंगाचे तिळगूळ मी वेगळे ठेवत असे. ते फक्त माझ्या आवडत्या व्यक्तींसाठी असायचे. न कळत्या वयात हे असलं आवडतं नावडतं बरंच असायचं. पण ज्यांच्याशी फार काही बरं नसायचं त्यांनाही खूप आनंदात तिळगूळ दिला जायचा. याएका दिवशी सगळे हेवेदावे, मत्सर, चीड काही काही नसायचं. रंगाला गोडपणा देत देत एकमेकांत गोडवा आणणारा हा सण. ऋतू संक्रमण हे निमित्त,एकमेकांना परिपक्वतेकडे नेणारं संक्रमण हे. सूर्याचं दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होणार, दिवस जास्त वेळ प्रकाशमान होणार, आपणा सर्वांचं आयुष्यही असंच प्रकाशमान होवो, अंतरी तो ज्ञानदीप उजळो हेच मागणं.

No comments:

Post a Comment