कोणे एके काळी पत्र येणे म्हणजे आनंदोत्सव असे. दारी पोस्टमन येणे म्हणजे दिवाळीदसराच. बहुतांशी पत्रे बाबांसाठी असत. त्यांचं जग हे विचारवंत, लेखक, नाटककार, संघ स्वयंसेवक, समाजसेवक अशा लोकांनी भरलेलं असायचं. बाबा कॉलेजमधून घरी आले की आईला पहिला प्रश्न असायचा, आज काही टपाल आलंय का? जर असेल आलेलं तर ते व्यवस्थित टेबलावर दिसेल अशा पद्धतीनं ठेवलेलं असायचं, पण ते विचारणं काही सुटलं नाही. मग बाबा तो गठ्ठा पुढ्यात घेऊन बसायचे. मग तोंडानं रनिंग कॉमेंटरी करत एकेक पत्र चाळलं जायचं. चाळलं अशा अर्थानं की प्रथम पत्रं कुणाकुणाची आहेत आणि साधारण कशा संदर्भात आहेत हे पाहण्याचा तो कार्यक्रम असे. पोस्टकार्डे, निळी अंतर्देशीय, लाखेने सीलबंद केलेले लिफाफे, रंगीत लिफाफे असा सगळा तो गठ्ठा असे. निळी अंतर्देशीय पत्रे ही बहुतांशी जवळच्या नातेवाईकांची, पोस्टकार्डे साहित्यिक वर्तुळातील लोकांची, सीलबंद लिफाफे शैक्षणिक कामासंबंधीचे तर रंगीत लिफाफे हे दिवाळी, दसरा, संक्रांत शुभचिंतनाची कार्डे असलेली अशी सरळ वर्गवारी होती. ते संक्रांत अभीष्टचिंतनाचे लिफाफे तेवढे आम्ही मुलं ताब्यात घ्यायला अधीर असू. कारण त्यात कार्डाबरोबर चक्क रंगीबेरंगी तिळगूळ असे. काही काही वेळा आतील कार्डालाच एक छोटासा लिफाफा चिकटवलेला असे. त्यात तिळगूळ असत. खूप गंमत वाटे.
पोस्टऑफिस हे एक महाकळकट पण गूढरम्य प्रकरण होते. आमच्या शाळेच्या रस्त्यावरच ते होते. तंत्रज्ञानाचा स्पर्श झालेली काही निवडक ठिकाणे गावात होती त्यातले हे एक तीर्थस्थान. या एकाच ठिकाणी निळसरपांढरी खळ, तिने छानपैकी बरबटलेली त्यातील लाकडी कांडी, काही वर्षांपूर्वीच शाई संपलेले पेन (काही वेळा बोरूही असायचा) ताडपत्रीच्या गोण्यातील टपाल, तिथले कर्मचारी किंवा ग्राहक यांना अजिबात प्रसन्न वाटू नये याची संपूर्ण काळजी घेऊन लावलेला तो भयाण काळपट हिरवा रंग, तुरुंगाचा आभास देणाऱ्या त्या जाळ्या आणि त्यामागचे ते कर्मचारी तर दुसऱ्या एका खोलीत ते कट्ट कडकट्ट करणारे तारयंत्र, अदभुत जादूचा वाटणारा तो काळा फोन असे सगळे नांदत असे. आशा, निराशा, आनंद, दु:ख, संस्थांचे "टू हूमसोएव्हर इट मे कन्सर्न" छापाचे रुक्ष अहवाल, बिलं, पावत्या, प्रेमपत्र, प्रेमळपत्र, मळमळपत्र, तळमळपत्र अशा सगळ्या भावना, अ-भावना त्या ताडपत्रीच्या गोणीत एकत्र पडलेल्या असत. खाकी कपडे घातलेले पोस्टमन ते सॉर्ट करताना आम्ही पाहत उभे असू. मग तो सॉर्ट केलेली ती शारदा खाकी रंगाच्याच ताडपत्रीच्या पिशवीत जायची. एरवी फोटोत शारदेला छान तंबोरा घेऊन, श्वेतवर्णी साडी परिधान केलेली पाहत असू पण इथे पोष्टात दयामाया नव्हती, मळखाऊ खाकी हाच एकमेव रंग. पोस्टमन लोकांना सायकली वगैरे चैन नव्हती. सगळा कारभार पायीच असे. गाव छोटे असल्यामुळे पोस्टमन लोकांना गावकऱ्यांचे चेहरेच काय चेहऱ्यामागील इतिहासही ठाऊक असायचा. कधी शाळेतून परत जात असताना पोस्टमन दिसला की "आमचं आहे का हो पत्र?" अशी चौकशी करायची. तोही बापडा असेल पत्र तर तंगडतोड वाचवायला आमच्याकडे पत्रं द्यायचा. आम्ही मुलं आमचीच काय एरियातल्या सगळ्यांचीच पत्रे मग ताब्यात घ्यायचो. आणि मग पोस्टमनच्या रुबाबात घराघरात पोचवायचो. एकूणच उत्कंठा, उत्सुकता, काहीशी भीती असं सगळं एकाच वेळी वाटायला लावणारी अशी ही पत्रपरंपरा.
तार येणं मात्र अजिबात नको. तार आणि वाईट बातमी हे जवळजवळ ठरलेलं अद्वैत होतं. माझ्यापुरतं सांगायचं झालं तर मी साधारण अकरा बारा वर्षांचा असताना 'तारायण' घडलं. तेही अत्यंत महत्वाची आंतरगल्ली क्रिकेट मॅच चालू असताना. संकटं येतात तेव्हा एकटी येत नाहीत म्हणतात. माझी बॅटिंग आलेली. स्टंप माझे असल्याने मला दोन जीवदानं अलाउड होती. अजून एकही बाॅल खेळला नसल्याने दोन्ही जीवदानं शाबूत होती. अशात कधी नाही ती आमच्या आळीत रिक्षा आली. गावात रिक्षा दोन, त्यातील एक आमच्या आळीत पाहिल्यावर मनात पहिली पाल चुकचुकली. रिक्षेत आमच्या बाबांना पाहिल्यावर तर काहीतरी नक्की घडले आहे याची खात्री पटली. कारण बाबा आणि शारीरिक आरामाची कोणतीही साधने हे समीकरण जुळणारे नव्हते. रिक्षेत बसले तरी श्रीरामाच्या आदेशासरशी उड्डाणाच्या तयारीत बसलेल्या हनुमानासारखे बसत. सीटच्या अगदी टोकाशी. हातांनी पुढचे बार धरून. बाबांनी रिक्षेतूनच सांगितले, ताबडतोब घरी ये! बॅटिंग सोडून मी घरी आलो. बाबा आईला सांगत होते. तार आलीय, मामांची (आईचे वडील) तब्येत खराब आहे, आपल्याला जायला हवं. पण आईला कळून चुकलं होतं की तार आलीय म्हणजे काही खरं नाही. तार या प्रकाराची मी जरा धास्तीच घेतली होती. पण ती येण्याची धास्ती. तार करायची असेल तर मी उड्या मारत जात असे. कारण त्या त्यातला मजकूर माहीत असे. पुढे बाबा मला तार करायला पोस्टात पाठवत. त्या फक्त नंबरवाल्या तारा असत. २ नंबर, १० नंबर किंवा तत्सम. अभिनंदन, किंवा रीचड सेफली टायपातल्या.
पत्र स्वत:च्या पत्त्यावर स्वीकारणे वगैरे व्हायला कॉलेजचे दिवस उजाडायला लागले. कॉलेजजीवनातील पत्रे काही अभिमानाने सांगण्यासारखी नाहीत. कारण ती रोमॅंटिक वगैरे मुळीच नव्हती. बहुतेक पत्रे "आपल्या चिरंजीवांची प्रेझेंटी समाधानकारक नाही. आपण पाल्यास योग्य ती समज द्यावी. सुधारणा न झालेस कारवाई करणेत येईल." किंवा अप्पर सत्र न्यायालय "दिनांक १५ मार्च रोजी वाहतुकीचा नियम मोडल्याच्या आरोपाची सुनवाई आहे. तरी कोर्टात समक्ष हजर राहावे. अन्यथा आरोप मान्य आहे असे समजून खटला एकतर्फी निकालात काढला जाईल. " अशा आशयाची जास्त असत. का कुणास ठाऊक, त्या काळात वर्गात तासाला बसणे, लायसन काढणे, तांबडा दिवा लागला असल्यास वाहन थांबवावे लागणे या असल्या गोष्टी मला अंधश्रद्धा वाटत. या अंधश्रद्धांच्या विरोधाचे बिल या पत्रांच्या रूपात घरी येत असे. सुदैवाने आईबाबा कोकणात आणि आम्ही बंधुद्वय शिक्षणासाठी सांगलीस राहत होतो. कॉलेजमध्ये आणि इतर "संवेदनशील" संस्थांना मी सांगलीच्या घरचा पत्ता देत होतो. त्यामुळे अशा पत्रांची विल्हेवाट लावणे सोपे जात होते. यात आईवडिलांना त्रास होऊ नये हा एकमेव उदात्त हेतू मी बाळगला होता. पण पुढे हे उघडकीस आल्यावर माझा युक्तिवाद कोणीही मान्य केला नाही याबद्दल अजूनही खंत आहे. कोर्टाने मला तब्बल पंचेचाळीस रुपयांचा दंड केला होता. माझ्या महिना तीनशे रुपयांच्या बजेटला पंधरा टक्के नुकसान प्रचंड होते. हा दंड भरून काढण्यासाठी मी पुढील तीन महिने सायकल वापरत होतो. त्या दंडाच्या रकमेत माझा उदात्त हेतू केव्हाच दिसेनासा झाला होता.
याच काळात विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो, आणि पत्र लिहिणे सुरू झाले. साध्या भेटून बोलण्याला ज्या संघटनेत "बैठक घेऊ, बसून विषय करू" म्हटले जाते तिथे पत्र लिहिणे असं साधं कसं म्हटलं जाईल. तो पत्रव्यवहार होता! पण संपर्क कसा करावा, फापटपसारा न लावता, नेमक्या शब्दांत संवाद कसा साधावा याचं सहजसुंदर शिक्षण विद्यार्थी परिषदेत मिळालं. तेही अत्यंत सुबक सुवाच्य अक्षरात. आजवर परिषदेतील किंवा संघातील स्वयंसेवकाचं गिचमीड अक्षरातील पत्र मी पाहिलं नाहीय. या बाबतील मी प्रमोद कुलकर्णीला गुरू मानलं होतं. प्रमोद अत्यंत सुरेख हस्ताक्षरात, सरळ ओळीत एकटाक लिहीत असे. आजवर अनेक सुरेख अक्षरं पाहिली. काही तर अगदी छापल्यासारखीही पाहिली. पण प्रमोदचं अक्षर वेगळंच. त्यात छापीलपणा अजिबात नसे, उलट ते थेट हृदयातून आल्यासारखं वाटे. पंधरा पैशाच्या पोस्टकार्डावर तो दोन्ही बाजू पूर्ण वापरून लिही. प्रत्येक ओळीत ठराविक शब्द असत. "आदरणीय" ने सुरुवात करून शेवटी "कळावे, लोभ आहेच वृद्धी व्हावी" या वाक्यानं तो पत्र संपवत असे. दूरदूरवरून आलेले कार्यकर्ते त्याच्याशी तेवढ्याच लोभाने बोलत. आज इतक्या वर्षांनीसुद्धा मी जर पत्र लिहिलं तर आपोआप हाच मायना आणि शेवट लिहिला जातो. श्रेय प्रमोदला. लोक कृपाभिलाषी वगैरे लिहितात ते कसंसंच वाटतं. मला अभिलाषा हा शब्दच तसा लुब्रा, लोचट वाटत आला आहे.
पुढे शिक्षण संपलं. संपवलंच. गाव सोडून कुठेही जाणार नाही! सरकारी नोकरी तर अजिबात करणार नाही अशा घनघोर प्रतिज्ञा करून झाल्या होत्या. यातली पहिली प्रतिज्ञा साधारणपणे दोन दिवस टिकली. मुंबईच्या आत्याचे यजमान, श्री. माधवराव वझे हे माझं आदराचं स्थान होतं. तेही माझ्याच कॉलेजचे विद्यार्थी होते. अत्यंत हुषार, न चिडता तर्कनिष्ठ विचारांनी आपली बाजू मांडणारे म्हणून ते प्रसिद्ध होते. लहानपणी आम्हां सगळ्या मुलांना ते गणिती, भौमितीय, पदार्थविज्ञानाची कोडी घालत आणि आमच्याबरोबर संवाद करत ते स्वत:ही सोडवत असत. म्हणजे कोडं घालून गंमत बघत बसणे असं ते करत नसत. त्यामुळे आम्हीही चेवाचेवाने ती कोडी सोडवण्याचा प्रयत्न करत असू. आजही काम करताना क्लिष्ट असा एखादा प्रॉब्लेम असेल तर मी अगदी उत्साहाने तो सोडवायला घेतो. त्याचं मूळ कदाचित या कोड्यांत असेल. असो. मी प्रतिज्ञा करून शक्तिमानसारखा कमरेवर हात ठेवून छाती पुढे करून दोन दिवस फिरत होतो. तिसऱ्या दिवशी माधवरावांचा फोन आला. तुला मुंबईला यायचं आहे, ब्याग भर एवढंच ते म्हणाले. शक्तिमानाने कमरेवर हात होते ते खाली सोडले आणि हळू आवाजात हो असं सांगितलं.
मुंबईला गेल्यावर आयुष्य पार पालटून गेलं. या नंबरची बस, त्या वेळेची गाडी यापलीकडे मुंबईत आयुष्य नाही असं वाटायचं. उगाचच घरौंदामधल्या त्या अमोल पालेकरसारखा चेहरा करून फिरायचो. मित्र, भरपूर आत्तेमामेभाऊ, बहिणी, आज्जी आजोबा, मामा, काका असल्या अस्सल देशस्थी गराड्यात राहिलेला मी, मुंबईत अस्वस्थ झालो. फक्त आत्तेभाऊ, बहीण होते तेवढाच आधार. या अवस्थेतून आईबाबांना उद्देशून पत्रं लिहायला सुरुवात झाली. मला आठवतं ती पत्रं मी फार भावूकपणे लिहिली होती. जे जे मनात असेल ते कागदावर उमटवायचं एवढंच ते होतं. पुढे मी सिंगापूरला गेलो. एकटाच गेलो होतो पुढे. पहिले सहा महिने मनाने भारतात शरीराने तिथे असे काढले. कधी कधी होमसिकनेस एवढा व्हायचा की मी चक्क पुण्याचा नकाशा हाताने रेखाटत बसत असे. प्रत्येक रस्ता, खूण, त्या नकाशावर येत असे. जणू मी प्रत्यक्ष त्या रस्त्यांवरून फिरत होतो. मग सुरू झाली पत्रं. तीन तीन चार चार फुलस्केप पानं पाठपोट भरतील एवढं एकेक पत्र असायचं. ही पत्रंही आईबाबांनाच. कधी घरी गेलो की बाबा ती जुनी पत्रं दाखवतात, हसू येतं पण डोळ्यात पाणीही येतं. बाबांनीही अशीच पत्रं मला धाडली होती. त्यात उभारी देणारे शब्द असत, आईने दिलेल्या सूचना असत. ती मी कित्येक वर्षं जपून ठेवली होती. पण आयुष्याच्या वणवणीत इतक्या ठिकाणी भरकटत गेलो की सगळं संचित थोडं थोडं सांडत गेलं. वाऱ्यावर वाळू भुरभुरत पसरून दृष्टीआड व्हावी तसे हे आठवणींचे कागदावर उमटलेले क्षण निसटून गेले. स्वहस्ताक्षरात मनीचे गूज लिहावे आणि सुहृदांस ते भावावे यासारखे सुख नाही.
पत्र लिहिणं कधी थांबलं कळलंच नाही. तंत्रज्ञान विकसित झालं ते प्रथम संपर्कक्षेत्रात. सॅम पित्रोदानं पहिली क्रांती आणली. एसटीडी पीसीओ सुरू झाले, मनात आणलं की बोलणं होऊ लागलं. माझ्या मते इथेच स्वहस्ताक्षरातील पत्रलेखनाला उतरती कळा लागली. पत्रातील आठवड्यापूर्वीची जुनी खुशाली कोण वाचणार? आजच तर सकाळी फोनवर बोललो. पुढे ईमेल्स सुरू झाल्या. मग तर पत्र लिहिणं पूर्ण थांबलंच. नात्यातल्या नात्यात ईमेल लिहिताना प्रियचं डियर झालं, आदरणीयचं रिस्पेक्टेड सर झालं, तीर्थरूप शि.सा.न.वि.वि. तर गायब झालेल्या जानव्यासारखे लुप्त झाले. "आपला" किंवा "तुमचा" ची जवळीक युअर्स फेथफुलीत नाही. तंत्रज्ञानानं फायदे खूप आणले. जग जवळ आणलं, वादच नाही. अनेक दिवसात संपर्क होऊ शकायचा नाही, त्यामुळे जी घालमेल, काळजी वाटायची ती आता जवळजवळ नाहीच. पण कधी तरी कुठं तरी जाणवत राहतं, पत्रांतला तो जिव्हाळा आठवत राहतो. काळाच्या पडद्याआड गेलेले जिव्हाळ्याचे लोक त्या पत्रांतून दिसत राहतात. विश्रब्ध शारदेचा तो तंबोरा मनात सूर धरून राहतो.
पत्र स्वत:च्या पत्त्यावर स्वीकारणे वगैरे व्हायला कॉलेजचे दिवस उजाडायला लागले. कॉलेजजीवनातील पत्रे काही अभिमानाने सांगण्यासारखी नाहीत. कारण ती रोमॅंटिक वगैरे मुळीच नव्हती. बहुतेक पत्रे "आपल्या चिरंजीवांची प्रेझेंटी समाधानकारक नाही. आपण पाल्यास योग्य ती समज द्यावी. सुधारणा न झालेस कारवाई करणेत येईल." किंवा अप्पर सत्र न्यायालय "दिनांक १५ मार्च रोजी वाहतुकीचा नियम मोडल्याच्या आरोपाची सुनवाई आहे. तरी कोर्टात समक्ष हजर राहावे. अन्यथा आरोप मान्य आहे असे समजून खटला एकतर्फी निकालात काढला जाईल. " अशा आशयाची जास्त असत. का कुणास ठाऊक, त्या काळात वर्गात तासाला बसणे, लायसन काढणे, तांबडा दिवा लागला असल्यास वाहन थांबवावे लागणे या असल्या गोष्टी मला अंधश्रद्धा वाटत. या अंधश्रद्धांच्या विरोधाचे बिल या पत्रांच्या रूपात घरी येत असे. सुदैवाने आईबाबा कोकणात आणि आम्ही बंधुद्वय शिक्षणासाठी सांगलीस राहत होतो. कॉलेजमध्ये आणि इतर "संवेदनशील" संस्थांना मी सांगलीच्या घरचा पत्ता देत होतो. त्यामुळे अशा पत्रांची विल्हेवाट लावणे सोपे जात होते. यात आईवडिलांना त्रास होऊ नये हा एकमेव उदात्त हेतू मी बाळगला होता. पण पुढे हे उघडकीस आल्यावर माझा युक्तिवाद कोणीही मान्य केला नाही याबद्दल अजूनही खंत आहे. कोर्टाने मला तब्बल पंचेचाळीस रुपयांचा दंड केला होता. माझ्या महिना तीनशे रुपयांच्या बजेटला पंधरा टक्के नुकसान प्रचंड होते. हा दंड भरून काढण्यासाठी मी पुढील तीन महिने सायकल वापरत होतो. त्या दंडाच्या रकमेत माझा उदात्त हेतू केव्हाच दिसेनासा झाला होता.
याच काळात विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो, आणि पत्र लिहिणे सुरू झाले. साध्या भेटून बोलण्याला ज्या संघटनेत "बैठक घेऊ, बसून विषय करू" म्हटले जाते तिथे पत्र लिहिणे असं साधं कसं म्हटलं जाईल. तो पत्रव्यवहार होता! पण संपर्क कसा करावा, फापटपसारा न लावता, नेमक्या शब्दांत संवाद कसा साधावा याचं सहजसुंदर शिक्षण विद्यार्थी परिषदेत मिळालं. तेही अत्यंत सुबक सुवाच्य अक्षरात. आजवर परिषदेतील किंवा संघातील स्वयंसेवकाचं गिचमीड अक्षरातील पत्र मी पाहिलं नाहीय. या बाबतील मी प्रमोद कुलकर्णीला गुरू मानलं होतं. प्रमोद अत्यंत सुरेख हस्ताक्षरात, सरळ ओळीत एकटाक लिहीत असे. आजवर अनेक सुरेख अक्षरं पाहिली. काही तर अगदी छापल्यासारखीही पाहिली. पण प्रमोदचं अक्षर वेगळंच. त्यात छापीलपणा अजिबात नसे, उलट ते थेट हृदयातून आल्यासारखं वाटे. पंधरा पैशाच्या पोस्टकार्डावर तो दोन्ही बाजू पूर्ण वापरून लिही. प्रत्येक ओळीत ठराविक शब्द असत. "आदरणीय" ने सुरुवात करून शेवटी "कळावे, लोभ आहेच वृद्धी व्हावी" या वाक्यानं तो पत्र संपवत असे. दूरदूरवरून आलेले कार्यकर्ते त्याच्याशी तेवढ्याच लोभाने बोलत. आज इतक्या वर्षांनीसुद्धा मी जर पत्र लिहिलं तर आपोआप हाच मायना आणि शेवट लिहिला जातो. श्रेय प्रमोदला. लोक कृपाभिलाषी वगैरे लिहितात ते कसंसंच वाटतं. मला अभिलाषा हा शब्दच तसा लुब्रा, लोचट वाटत आला आहे.
पुढे शिक्षण संपलं. संपवलंच. गाव सोडून कुठेही जाणार नाही! सरकारी नोकरी तर अजिबात करणार नाही अशा घनघोर प्रतिज्ञा करून झाल्या होत्या. यातली पहिली प्रतिज्ञा साधारणपणे दोन दिवस टिकली. मुंबईच्या आत्याचे यजमान, श्री. माधवराव वझे हे माझं आदराचं स्थान होतं. तेही माझ्याच कॉलेजचे विद्यार्थी होते. अत्यंत हुषार, न चिडता तर्कनिष्ठ विचारांनी आपली बाजू मांडणारे म्हणून ते प्रसिद्ध होते. लहानपणी आम्हां सगळ्या मुलांना ते गणिती, भौमितीय, पदार्थविज्ञानाची कोडी घालत आणि आमच्याबरोबर संवाद करत ते स्वत:ही सोडवत असत. म्हणजे कोडं घालून गंमत बघत बसणे असं ते करत नसत. त्यामुळे आम्हीही चेवाचेवाने ती कोडी सोडवण्याचा प्रयत्न करत असू. आजही काम करताना क्लिष्ट असा एखादा प्रॉब्लेम असेल तर मी अगदी उत्साहाने तो सोडवायला घेतो. त्याचं मूळ कदाचित या कोड्यांत असेल. असो. मी प्रतिज्ञा करून शक्तिमानसारखा कमरेवर हात ठेवून छाती पुढे करून दोन दिवस फिरत होतो. तिसऱ्या दिवशी माधवरावांचा फोन आला. तुला मुंबईला यायचं आहे, ब्याग भर एवढंच ते म्हणाले. शक्तिमानाने कमरेवर हात होते ते खाली सोडले आणि हळू आवाजात हो असं सांगितलं.
मुंबईला गेल्यावर आयुष्य पार पालटून गेलं. या नंबरची बस, त्या वेळेची गाडी यापलीकडे मुंबईत आयुष्य नाही असं वाटायचं. उगाचच घरौंदामधल्या त्या अमोल पालेकरसारखा चेहरा करून फिरायचो. मित्र, भरपूर आत्तेमामेभाऊ, बहिणी, आज्जी आजोबा, मामा, काका असल्या अस्सल देशस्थी गराड्यात राहिलेला मी, मुंबईत अस्वस्थ झालो. फक्त आत्तेभाऊ, बहीण होते तेवढाच आधार. या अवस्थेतून आईबाबांना उद्देशून पत्रं लिहायला सुरुवात झाली. मला आठवतं ती पत्रं मी फार भावूकपणे लिहिली होती. जे जे मनात असेल ते कागदावर उमटवायचं एवढंच ते होतं. पुढे मी सिंगापूरला गेलो. एकटाच गेलो होतो पुढे. पहिले सहा महिने मनाने भारतात शरीराने तिथे असे काढले. कधी कधी होमसिकनेस एवढा व्हायचा की मी चक्क पुण्याचा नकाशा हाताने रेखाटत बसत असे. प्रत्येक रस्ता, खूण, त्या नकाशावर येत असे. जणू मी प्रत्यक्ष त्या रस्त्यांवरून फिरत होतो. मग सुरू झाली पत्रं. तीन तीन चार चार फुलस्केप पानं पाठपोट भरतील एवढं एकेक पत्र असायचं. ही पत्रंही आईबाबांनाच. कधी घरी गेलो की बाबा ती जुनी पत्रं दाखवतात, हसू येतं पण डोळ्यात पाणीही येतं. बाबांनीही अशीच पत्रं मला धाडली होती. त्यात उभारी देणारे शब्द असत, आईने दिलेल्या सूचना असत. ती मी कित्येक वर्षं जपून ठेवली होती. पण आयुष्याच्या वणवणीत इतक्या ठिकाणी भरकटत गेलो की सगळं संचित थोडं थोडं सांडत गेलं. वाऱ्यावर वाळू भुरभुरत पसरून दृष्टीआड व्हावी तसे हे आठवणींचे कागदावर उमटलेले क्षण निसटून गेले. स्वहस्ताक्षरात मनीचे गूज लिहावे आणि सुहृदांस ते भावावे यासारखे सुख नाही.
पत्र लिहिणं कधी थांबलं कळलंच नाही. तंत्रज्ञान विकसित झालं ते प्रथम संपर्कक्षेत्रात. सॅम पित्रोदानं पहिली क्रांती आणली. एसटीडी पीसीओ सुरू झाले, मनात आणलं की बोलणं होऊ लागलं. माझ्या मते इथेच स्वहस्ताक्षरातील पत्रलेखनाला उतरती कळा लागली. पत्रातील आठवड्यापूर्वीची जुनी खुशाली कोण वाचणार? आजच तर सकाळी फोनवर बोललो. पुढे ईमेल्स सुरू झाल्या. मग तर पत्र लिहिणं पूर्ण थांबलंच. नात्यातल्या नात्यात ईमेल लिहिताना प्रियचं डियर झालं, आदरणीयचं रिस्पेक्टेड सर झालं, तीर्थरूप शि.सा.न.वि.वि. तर गायब झालेल्या जानव्यासारखे लुप्त झाले. "आपला" किंवा "तुमचा" ची जवळीक युअर्स फेथफुलीत नाही. तंत्रज्ञानानं फायदे खूप आणले. जग जवळ आणलं, वादच नाही. अनेक दिवसात संपर्क होऊ शकायचा नाही, त्यामुळे जी घालमेल, काळजी वाटायची ती आता जवळजवळ नाहीच. पण कधी तरी कुठं तरी जाणवत राहतं, पत्रांतला तो जिव्हाळा आठवत राहतो. काळाच्या पडद्याआड गेलेले जिव्हाळ्याचे लोक त्या पत्रांतून दिसत राहतात. विश्रब्ध शारदेचा तो तंबोरा मनात सूर धरून राहतो.