Tuesday, June 16, 2015

सच्चा इमानी

मी एक सच्चा मुस्लिम आहे हे वचन साक्षी महाराजांच्या मुखातून आले आणि प्रवचनाला जमलेल्या सर्व भक्त मंडळींच्या मुखातून "साधु! साधु!" असे उद्गार बाहेर पडले. काही मंडळींनी तिथेच फात्या पढायला सुरुवात केली. आणि अहो आश्चर्यम, जरी ते फात्या पढत होते तरी आमच्या कानी मात्र "जय जय राम क्रिष्ण हारी" असेच शब्द येत होते. रंध्रारंध्रात सर्वधर्मसमभाव भिनलेला असणे म्हणतात ते हेच काय? या असल्या गोष्टी भिनण्यासाठी बरोबर रंध्रं कशी शोधतात कुणास ठाऊक. महाराजांचा मी काही मर्जीतला भक्त नव्हे, परंतु आमचा परममित्र मोरू उर्फ मोरेश्वर मात्र आहे.  गेली अनेक वर्षे तो महाराजांच्या मठात नियमित जात असतो. मंगळवारी प्रसादाला मिळणारा शेंगदाण्याचा लाडू, बुधवारी छान केळी घालून केलेला शिरा, गुरुवारी साबुदाण्याची खिचडी, शुक्रवारी मुगाची खिचडी, शनिवारची सात्विक लापशी, रविवारी महाप्रसादाचा शुद्ध तुपातील मोतीचुराचा लाडू अशा आध्यात्मिक अनुभवांना मोरू अजिबात सोडत नाही. नाही म्हणायला दर सोमवारी आत्मशुद्धी म्हणून मठात शिवांबूप्राशन असते तो दिवस मात्र कटाक्षाने टाळतो. महाराजांच्या तीक्ष्ण नजरेतून ही बाब सुटलेली नाही. मोरोबा, आपली आत्मशुद्धी अशी साचवून ठेवतो आहेस हे चांगले नाही अशा शब्दांत त्यांनी त्याची कानउघाडणीही केली आहे. आजही गुरुवार म्हणून तो माझ्याबरोबर आला होता. सर्वधर्मसमभावाचा प्राथमिक उन्माद (नॉन इंडियन रेसिडंटस साठी मराठीत भाषांतर - "रश") ओसरल्यावर मंडळी डोळे उघडून विचार करू लागली. "आधी कसं काही जाणवलं नाही?" असेही एक जण म्हणाला. इतके दिवस आपण नमाज पढत होतो की प्रणाम करीत होतो? वदनी कवळ घेत होतो की बिस्मिल्ला करत होतो? मीरा, माखन आणि कन्हैयामध्ये असे एकदम चांद, इश्क आणि शराब कसे आले? आपण सर्वधर्मसमभावी वगैरे आहोत आणि इतके दिवस आपल्याला त्याची अजिबात जाणीव नव्हती की काय अशी शंका येऊन काही जण अस्वस्थही झाले. मीही अस्वस्थ झालो. रोज आंघोळ कर असं आई कानीकपाळी ओरडून सांगत असे तरी आठवड्यातून कधीतरी आंघोळ करणे हेही त्याचाच एक भाग आहे की काय? अर्थात आंघोळ करून काही दिव्य प्रभावळ वगैरे प्राप्त होत नव्हतीच. "गळ्यात आंघोळ केली आहे अशी पाटी लावत जा" असंही आई म्हणायची. पण "जनहितार्थ जारी" म्हणून आंघोळ करणं भाग होतं. महाराजांच्या त्या सगुण मूर्तीकडे नेहमीच पाहिले जायचे पण कीर्तन चालू असताना देवळात वर तुळईला टांगलेल्या रंगीत हंडीवर जशी शून्यात नजर लावून बसणे होते तसेच पाहिले जायचे. पण आज महाराजांच्या त्या घोषणेनंतर त्यांना निरखून पाहिले. आंघोळीच्या बाबतीत आम्ही महाराजांचे पाईक नसून महाराजच आमचे अनुयायी आहेत असे वाटू लागले.

महाराज पुढे बोलू लागले,"हिंदू धर्मात काहीही करण्याची मुभा आहे. हिंदू लोक अल्लाचे नाव घेऊ शकतात, पण मुसलमान रामाचे नाव घेतील काय?" पाइण्ट बिनतोड होता. आमच्या गावात अनेक मुसलमान गणपतीच्या देवळात जातात, काहींनी आपल्या मुलाचे नावही गणेश वगैरे ठेवले आहे, पण एकही लेकाचा रामाच्या देवळात जाताना दिसत नाही. "इमान!" महाराज गरजले. आता हे काय मध्येच असा विचार आमच्या मनात येतो आहे तोच ते पुन्हा गरजले. "इमान! म्हणजे सच्चेपणा, सचोटी! ज्याच्या कडे इमान तो खरा मुसलमान!" आणि विजयी मुद्रेने आमच्याकडे पाहू लागले. तो आनंद घोषणेचा होता की यमक जुळून आले त्याचा होता हे कळत नव्हते. तेवढ्यात मोरू ओरडला,"जय जवान!" त्यासरशी काही त्याच्यासारख्याच गाफील लोकांनी "जय किसान!" अशी साथ दिली. महाराज दचकले आणि मग चिडून मोरूकडे पाहू लागले. मीही आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. तर खांदे उडवून थंडपणे मला म्हणतो,"काय? यमक जुळलं म्हणून म्हटलं. घोषणाच करायची होती ना?" मग मी त्याला "कळत नाही तर चूप बस" असे झापले. मोरू निर्विकार होता. "ते इमान माझ्यात आहे. इमानात मी आहे. मी म्हणजे इमान, इमान म्हणजे मी. असे आमचे अद्वैत आहे. म्हणूनच सच्चा मुसलमान मीच. तुम्ही मला नमाज पढायला काय सांगता? मी तो घालीनच. पण तुम्ही सूर्यनमस्कार घालाल काय?" मला काही कळेना, आज महाराज असे का बडबडत आहेत. आमच्यापैकी तरी कुणी नमाजबिमाज पढून दाखवा असे काही त्यांना सांगितले नव्हते. त्यांनी सूर्यनमस्कार हा शब्द उच्चारलेला ऐकला आणि मी सावध झालो. मोरूला हळूच म्हणालो,"मोऱ्या, आज चिन्हं वेगळी दिसताहेत रे बाबा. सूर्यनमस्कार घालायला लावणार बहुधा आज. चल, सटकूया." तशी मला म्हणतो,"खुळा की काय? आज गुरुवार आहे. त्रास सोस जरा." तिकडे महाराज सुरू होते. "सच्चा हिंदू हा मनाने सहिष्णु असतो. त्याला नमाज घालायला सांगितला तर तो नमाज घालील. गुरुद्वारात प्रवेश करताना शीख बांधवांच्या नियमानुसार मस्तक आच्छादित ठेवील. चर्चमध्ये गेला तर वेदीवर गुढघे टेकून प्रभू येशूच्या मूर्तीसमोर नतमस्तक होईल. हे तुम्हीसुद्धा करता. हो की नाही?" त्यांनी प्रश्न विचारला आणि माझ्याकडे पाहून उत्तराची वाट पाहू लागले. आम्ही भक्त एकमेकांकडे पाहू लागलो. मी म्हणालो,"महाराज, चर्च, मशीद आतून कसे दिसतात हे मी अमर अकबर अॅंथनी पिक्चरमध्ये पाहिले होते." मोरू म्हणाला,"मीही सुवर्णमंदिरात एकदा गेलो होतो. काश्मीरला जाताना अमृतसरवरूनच जावे लागते. तिथल्यासारखा प्रसादाचा शिरा कुठेच खाल्ला नाहीय मी. हातात वाढला तर बोटांमधून तूप अक्षरश: ओघळत होते." मोऱ्या अगदी यूसलेस आहे. महाराज स्तब्ध झाले,"मोरोबा, किती शरीराचे चोचले पुरवशील? अरे सुवर्णमंदिरात तुला सहिष्णुतेने गहिवरून आले नाही? पिक्चरमध्ये पाहून का होईना मशिदीतील ते धीर गंभीर वातावरण पाहून तुम्हाला सर्वधर्मसमभावाचे रोमांच फुटत नाहीत? जर सच्चे इमानी असाल तर हे सर्व एकसमयावच्छेदेकरून व्हायला हवे."

आज गुरुवार, छान साबुदाण्याची खिचडी मिळणार अशा स्वप्नात मोरू बसला होता तोच महाराजांनी घोषणा केली,"भक्तजनहो, कोणत्याही गोष्टीची शरीराला सवय होणे वाईटच. आत्मपीडन हा आत्ममुक्तीचा मार्ग आहे. शरीराला सुखाची सवय करणे म्हणजे या आत्म्याला या शरीररूपी पिंजऱ्याची चटक लावणे. म्हणजेच या मायेच्या कर्दमात त्याला लोळत ठेवणे. शरीराला सुखाने बसू देऊ नका. सवयीचा गुलाम बनवून ठेवू नका. मी तर म्हणतो आजपासूनच त्याची सुरुवात करा. आज तुमचे शरीर तुमच्याकडे काय मागते आहे? मोरोबा? असे तंद्रीत आहात म्हणून तुम्हांसच विचारतो." मोरू गडबडून उत्तरला,"साबुदाण्याची खिचडी!" महाराजांनी त्याकडे रोखून पाहिले आणि म्हणाले,"अस्सं. दोष तुझा नाही मोरोबा. आजवरच्या सवयीचा आहे. ठीक आहे. आज सोमवार आहे असे समज आणि आत्मशुद्धी कर." असे म्हणून त्यांनी तिथे उभ्या असलेल्या एका आश्रमसेवकास "मोरोबांसाठी शिवांबूची व्यवस्था करा" असे सांगितले. त्या नतद्रष्टानेही जाताना मोरोबाकडे पाहून डोळे मिचकावत,"काळजी करू नका, पहिल्या धारेची आणतो" असे सांगितले. महानालायक इसम.

No comments:

Post a Comment