कारभारी - आता गतसाली येक कारटं जालं हुतं. दोन वर्साखाली येक आनखी पोरगं जाल्यालं हुतं. औंदा काय ऐकण्यात न्हवतं!
म्हाराज - आरं तुज्या! आरं तसं न्हवं! म्हंजे तेला रोग काय जाला हुता म्हंतो मी!
बाबांना सिनेमाला जाण्याचा
नाद नव्हता, किंबहुना तो आवडतच नसावा असं वाटे. सिनेमाला चला असं कधी
त्यांच्याकडून म्हटलं गेल्याचं मला आठवत नाही. पण नाटक पाहायला जायला ते
नाही म्हणायचे नाहीत. गोविंद चित्रमंदिर हे "सीझनल" नाट्यगृह. स्टेज नावाचा
चौथरा, त्याभोवती झावळ्या लावून केलेलं प्रशस्त प्रेक्षागार. कोकणातील
पाऊस असा की या झावळ्या कुजून जात आणि दरवर्षी मग सीझन आला की नवीन झावळ्या
लावायला लागायच्या. नाटकाच्या आधीचं ते उत्साहाने भरलेलं वातावरण मला अजून
आठवतं. बाहेर झावळ्या लावून, बाकडी ठेवून केलेलं जुजबी दुकान असे. तिथं
सोडावॉटरच्या बाटल्या ठेवलेल्या असत. काचेच्या त्या बाटल्या, त्यांच्या
गळ्यात असलेली ती निळी गोटी. उघडून देताना कुकरच्या शिट्टीसारखा आवाज होई
आणि तो फसफसणारा सोडा पाहूनच तहान भागल्यासारखी वाटे. त्या सोड्याचेही दोन
प्रकार. एक साधा, दुसरा लेमन. मी कधी प्यायल्याचं आठवत नाही. मागितला तर
बाबा देणार नाहीत हेही माहीत होतं. बाहेरचं काही खाऊपिऊ नये, हे संस्कार
असण्याचा काळ होता तो. त्या फसफसणाऱ्या सोड्यासारखीच माणसांची लगबग चालू
असे. आत फोल्डिंगच्या लाकडी खुर्च्या असायच्या. धूप फिरवलेला असायचा त्याचा
वास दरवळत असे. आपल्या खुर्चीवर बसलं की मग पहिल्या घंटेची प्रतीक्षा सुरू
व्हायची. पण आधी सुरू व्हायच्या कलाकार, दिग्दर्शक, लेखक यांच्या नावाच्या
अनाउन्समेंटस. मग एकदा ती पहिली घंटा डावीकडून उजवीकडे, आणि उजवीकडून परत
डावीकडे असं कुणीतरी वाजवत जायचं. मला आत जी गडबड चाललेली असायची त्याचं
भयंकर उत्सुकतावजा आकर्षण होतं. घंटा वाजवून नाटक चालू करायला परवानगी
देणारा इसम तर मला अत्यंत पॉवरफुल वाटायचा. पुढे कधीतरी आपणही हे काम
करायचं असं मी मनाशी ठरवून ठेवलं होतं. मग पुढे एकदोन तास कसे जायचे कळायचं
नाही. बाबांमुळेच दशावतार ही एक कोकणातील खास लोककला पाहायची संधी
अनेकवेळा मिळायची. गणेशस्तवन, वेद पळवून नेणारा शंकासुर आणि मग विष्णूचे
त्याचे ते युद्ध, मग विष्णूचे अवतार असा तो ठरलेला बंध. वालावलकर,
मोचेमाडकर अशी गाजलेली दशावतार मंडळी गावात येत असत.तासनतास ते प्रयोग चालत.
एकूण नाटक हा जिव्हाळ्याचा विषय होता. पण मला
वाटतं एखाद्याला डीफाईन करणारी व्यक्तिरेखा म्हणतात ती बाबांच्या बाबतीतली
व्यक्तिरेखा म्हणजे "भाऊबंदकी" नाटकातील रामशास्त्री प्रभुण्यांची.
बाबांच्या बाबतीत ती व्यक्तिरेखा केवळ त्या नाटकापुरती राहिली नाही,
किंबहुना ती तेवढ्यापुरती सीमित कधी नसावीच. त्यांचा मूळ स्वभावही त्याला
साजेसाच होता. खोटं न बोलणं ही गोष्ट बरेचजण प्रयत्नपूर्वक साधू शकतात. पण
त्याही पुढे जाऊन असत्याला आणि अन्यायाला विरोध करणारी मंडळी फार कमी
असतात. वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम होईल याची पर्वा न करता अन्यायाला
विरोध करणे काय असते हे मी पाहिले आहे. माझ्या विद्यार्थी दशेत तशी फक्त
दोन माणसे त्यावेळी माझ्यासमोर होती. ती म्हणजे प्राध्यापक रमेश चिटणीस आणि
दुसरे बाबा. आणिबाणीच्या काळात, काही अप्रिय स्थानिक संघर्षात या दोघांनीही दाखवलेला कणखरपणा, मोडेन पण वाकणार नाही ही वृत्ती सहजासहजी येणारी नाही. सारासार विचार करता येणारी, विद्वान म्हणता येईल एवढ्या बुद्धिमत्तेची भलीभली माणसे जेव्हा सत्तेपुढे शरण जात होती तेव्हा केवळ या दोन व्यक्ती एखाद्या पहाडाप्रमाणे उभ्या होत्या. भाऊबंदकी नाटकातील ते रामशास्त्री प्रभुण्यांचं पात्र असो किंवा साक्षीदार नाटकातील तडफदार सरकारी वकिलाचं पात्र असो, ते नाटकापुरतं नव्हतं. प्रत्यक्ष जगण्यातही तेच पात्र वठलं गेलं. नाटक हे एकदोन घटकांचं, पण रामशास्त्री बाणा कायमचा.