Friday, January 13, 2023

धर्माचे प्रयोजन तरी काय

 मनुष्य हा जाणिवेच्या पातळीवर आणि तिच्याहून खालच्या अशा दोन पातळ्यांवर काम करू शकतो. नेणिवेच्या पातळीवर ज्या प्रेरणा उद्भवतात त्यांना आपण सहजप्रवृत्ती म्हणतो तर जाणिवेच्या पातळीवरून ज्या प्रेरणा येतात त्यांना तर्कबुद्धि म्हणतो. परंतु यापेक्षाही उच्च अशी एक पातळी आहे. ती अतींद्रिय ज्ञानाची पातळी होय. वरवर पाहता ते नेणिवेसारखी वाटते कारण ती जाणिवेच्या पलीकडील आहे. पण ही जाणिवेच्या वरची पातळी आहे. खालची नव्हे. ही सहजप्रवृत्ती नसून, दिव्यस्फूर्ति आहे. जे महान द्रष्टे, संत, विभूती होऊन गेले, त्यांच्या सर्वसामान्य लोकांसारख्या आषुष्यात काही क्षण वा प्रसंग असे येऊन गेलेले दिसतात जेथे त्यांना बाह्य जगाची जाणीव नसल्याचे दिसते पण जेव्हा ते त्या स्थितीतून बाहेर आले तेव्हा त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झालेले होते. सॉक्रेटिसबद्दल असं सांगतात की सैन्याबरोबर चालत असताना एके ठिकाणी त्याला सूर्योदयाचे सुंदर दृश्य पहायला मिळाले आणि तात्काळ त्याच्या मनात एक विचारप्रवाह सुरू झाला, त्याचे देहभान हरपले. तो सतत दोन दिवस तेथेच उभा होता. जेव्हा त्या स्थितीतून बाहेर आला तेव्हा त्याला ज्ञान प्राप्त झालेले होते. असेच प्रसंग ख्रिस्त, गौतमबुद्ध, ज्ञानेश्वर अशा महात्म्यांच्या आयुष्यात आले. जणूकाही जाणिवेच्या पातळीवरून ते बाहेर पडले आणि जेव्हा जाणिवेत ते परतले तेव्हा आत्मज्ञानाने ते उजळून गेलेले होते. आता ही जी अवस्था होती ती दिव्यस्फूर्ती. ती कधी कशाने आणि कुणाला प्राप्त होईल ते माहीत नाही पण ती झाली तर अंतिम ज्ञान प्राप्त होते हे या थोरांच्या उदाहरणावरून दिसले आहे. आपण सर्वसामान्य माणसे सहजप्रवृत्तित जगत असतो. दिव्यस्फूर्तीच्या असण्याचे ज्ञानही आपल्याला नसते. हीच ती दिव्यस्फूर्ती जे धर्माचे एकमेव उगमस्थान आहे. परंतु दुर्दैवाने याला मनुष्याच्या स्वार्थी वृत्तीचा स्पर्श झाला आणि त्यातून “ईश्वराने आम्हाला संदेश दिला आहे आणि आम्हीच त्याचे संदेशवाहक आहोत, इतर कोणासही हा संदेश प्राप्त करण्याचा अधिकार नाही” अशी लुच्चेगिरी पुढे आली. कुठलेही उदात्त तत्त्व, अंतिम ज्ञान “आम्ही सांगतो तेच सत्य, आमचे सत्य न मानणाऱ्यांना तुम्ही ठार मारा” असे असण्याची सुतराम शक्यता नाही. कारण अंतिम सत्यात केवळ सच्चिदानंद आहे, तो मानवी जाणिवेच्या वरच्या स्तरावरचा आहे. त्यात जाणिवेच्या पातळीवरील तर्कशास्त्र लावून निरर्थक शिक्षा वा नियम लावण्याची गरजच नाही. आम्हीच काय ते ईश्वराचे एजंट हे म्हणणे तर्कदुष्ट आहे. कारण, या विश्वात एकही हालचाल अशी नाही जी विश्वव्यापी नाही. संपूर्ण विश्व हे नियमांनी नियंत्रित आहे. ते पूर्णपणे सुव्यवस्थित आणि सुसंवादी आहे. केप्लरचे ग्रहभ्रमणासंबंधीचे नियम हे संपूर्ण विश्वात लागू होतात. हेच इतर सर्व बाबींत आहे. याचाच अर्थ, जे सामान्यपणे विश्वात घडते ते सर्वांना समान अनुभवता येते. हीच बाब अंतिमज्ञानाबाबतही लागू होते. तेव्हा अंतिमज्ञान जर काही असेल तर ते दिव्यस्फूर्तीमार्गे सर्वांना समान दिसले पाहिजे. मग ही दिव्यस्फूर्ती तरी काही लोकांनाच झाली हे कसे काय? तर मला वाटतं दिव्यस्फूर्ती स्वीकारण्यासाठी जी क्षमता लागते ती सर्वांच्या ठायी नसावी. उदाहरणार्थ, ४०,००० व्होल्ट दाब असलेला विद्युतप्रवाह साध्या घरातल्या फ्यूजच्या तारेला सहन होणार नाही. त्यासाठी उच्चदाबाच्याच तारा हव्यात. तसे काहीसे हे असावे. आपण सर्वसामान्य माणसे दिव्यस्फूर्तिचा दाब सहन होणारे नसू. आपण आपला साधा २१० व्होल्टचा सामान्य करंट वाहून आपले जीवन जगू. आपल्याला ४०,०००० व्होल्टची अनुभूती येणं शक्यच नाही. पण त्या दिशेने आपण पाऊल तरी टाकू शकतो. साधी फ्यूजची तार ते उच्चदाब सहन करणारी तार ही साधना करण्याचे साधन म्हणजे धर्म होय. देवळात, चर्चमध्ये वा मशिदीत जाणे म्हणजे धर्म ही भरकटलेली आणि भरकटवलेली व्याख्या आहे. धर्माचे लक्ष्य हे अंतिम ज्ञान हेच आहे.

- मंदार वाडेकर

Thursday, January 5, 2023

श्रद्धा आणि विज्ञान

काही वेळा बुद्धिवंत लोकांमध्येही वादविवाद होत असतात. किंबहुना बुद्धिवंत लोकांमध्येच वाद होऊ शकतात. Idiocracy चित्रपटात आर्मी अधिकारी हीरोला विचारतो,”There are only three things people do. Lead, follow or get out of the way. What are you?” काही बुद्धिवंत लीड करणारे होतात, बाकीचे फॉलो आणि गेट आऊट ऑफ द वे टाईपच निघतात. मग हे जे लीड करणारे म्हणजे स्वतःची बुद्धि लावणारे असतात ते काही विशिष्ट विचारसरणी अनुसरतात. या विचारसरण्या वेगळ्या असू शकतात. आणि हेच मग वादाचं कारण होऊन बसतं. वाद जरूर व्हावेत. पण ते लॉजिकल असावेत, वैयक्तिक उणीदुणी काढणारे नसावेत. ते असो. आमचीच विचारसरणी बरोबर या दुराग्रहातून कुठेतरी आपलाच सत्यशोधनाचा मार्ग आपण मर्यादित करतो आहोत का असा विचार निश्चितच करावा. शास्त्रज्ञाची विचारसरणी ही चिकित्सक विचारसरणी असते. तो मूलभत संशोधन करतो, कार्यकारणभाव शोधतो. त्यानुसार हायपोथेसिस मांडतो. निरीक्षणं करतो, प्रयोग करतो. निरीक्षणं आणि प्रयोगांतून मिळालेला डेटा एक तर हायपोथेसिस सिद्ध करतो वा ते चूक आहे असं तरी सांगतो. खरा शास्त्रज्ञ मग हायपोथेसिस फेकून देऊन दुसरं हायपोथेसिस मांडतो आणि पुन्हा निरीक्षण, प्रयोगाच्या प्रोसेसमधून जातो. वर्षानुवर्षं जातात, शास्त्रज्ञ चिवटपणे चिकित्सा चालू ठेवतो. पण जोवर निरीक्षणांती वा प्रयोगांती सिद्ध होत नाही तोवर एखादी गोष्ट ही नैसर्गिक नियम म्हणून तो स्वीकारत नाही. असाच एक वाद पाहिला आणि कार्ल सागानने लिहिलेली कादंबरी आठवली. द कॉंटॅक्ट.

या कादंबरीत कार्लने अतिशय सुंदर चर्चा केली आहे. धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक मार्ग यांतील. श्रद्धा आणि मार्ग असे शब्द मी मुद्दाम वापरतो आहे. श्रद्धा म्हणजे कार्यकारणभाव न पाहता ठेवलेला गाढ विश्वास, तर मार्ग म्हणजे सत्य शोधण्याची एक शिस्तबद्ध पद्धत. पृथ्वीवरील सर्व रेडिओ दुर्बिणींनी एका विशिष्ट पॅटर्नचा संदेश डिटेक्ट केला आहे. तो एका ठराविक कालावधीने रीपीट होतो आहे. हा संदेश अवकाशातील एका विशिष्ट तारकासमूहाच्या दिशेने येतो आहे. अर्थातच ही घटना मानवजातीच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना आहे. प्रथमच कुठेतरी विश्वात इंटेलिजंट जीवसृष्टी असल्याचा पुरावा म्हणून या संदेशाकडे पाहिलं जात आहे. आणि इथे वेगळ्या विचारसरणींचा संघर्ष सुरू होतो. ख्रिश्चन धार्मिक विचारवंतांचं म्हणणं असतं हा देव असल्याचा पुरावा आहे. तर शास्त्रज्ञ हा नक्कीच एका प्रगत बुद्धिमान संस्कृतीकडून प्रक्षेपित झालेला संदेश आहे. मग श्रद्धा आणि शास्त्रीय विचारसरणी यांच्यातील वादविवाद सुरू होतो. धर्मगुरुंच्या मते,”तुम्ही शास्त्रज्ञ फारच कीस पाडता. तुम्ही कशावरही विश्वास ठेवत नाही. फार चिकित्सा करता. तुम्हाला सत्यासत्यता लगेच पडताळून पहायची असते. आणि तीसुद्धा तोकड्या ज्ञानाच्या चौकटीत राहून. तुमच्या सत्यासत्यतेचे निकषही काय तर, निरीक्षणातून जमवलेला इंपिरिकल डेटा. तुमच्या मते सत्य तेच, जे पंचेंद्रियांमार्फत अनुभवता येतं. अंतर्भूत प्रेरणेला कुठेही जागा नसते, साक्षात्काराला कुठेही स्थान नसते. धार्मिकतेला तुम्ही अगदी सुरुवातीलाच कंडम करून टाकता. काही गोष्टी या विश्वास ठेवून करायच्या असतात, अंतर्मनाच्या अनुभूतीवर विश्वास ठेवून करायच्या असतात. ज्या गोष्टी पारंपारिकरीत्या छान चालल्या आहेत त्यांना धक्का द्यायचाच कशाला? Haven’t you heard, if it ain’t broken, don’t fix it? बरं, एकदा एक गोष्ट सिद्ध झाली तरी तुम्ही गप्प बसत नाही. त्यातही परत परत संशोधन करत राहता. आणि नवं काही तरी आढळलं की आधीचा सिद्धांत टाकून देता. यासाठीच मलाही शास्त्रज्ञांवर अजिबात विश्वास ठेवावासा वाटत नाही कारण त्यांचा कशावरही विश्वास नाही.”
यावर एली, जी कादंबरीत एक शास्त्रज्ञ आहे, ती प्रतिवाद करते,”शास्त्रज्ञाला कुठलीही संकल्पना त्याज्य नाही. अगदी तुमची विनाधार श्रद्धादेखील तुम्हाला मान्य आहे ही गोष्ट शास्त्रज्ञ स्वीकारतो. त्या श्रद्धेचं शास्त्रीय प्रयोगासारखं डेमॉन्स्ट्रेशन करता येत नसूनही ती एक विचारधारा आहे हे मान्य आहे. शास्त्रोक्त चिकित्सेला सामोरे जायला तुम्ही कचरता. चिकित्सेची पद्धत काही अचानक निर्माण झालेली नाही. हे विश्व साधे सोपे सरळ नाही. ते अगदी साधे सरळ आणि तरीही क्लिष्ट आहे. क्लिष्ट गोष्टींमागील तत्व समजून घेण्याचा मार्गही सरळ साधा सरधोपट नसतो. सुरुवात साध्या तर्काने होते. त्या आधारावर एक थिअरी मांडली जाते. ती सिद्ध करायला निरीक्षणं केली जातात. पहिल्याच फटक्यात कधीच थिअरी सिद्ध होत नाही. पण मग स्वतःला फसवणं हे येतं. सद्यकालात चुकीचे आहेत असे माहीत असलेले सिद्धांत एके काळी सर्वांनीच उचलून धरले होते. शास्त्रज्ञांनीही. धर्मगुरूंनी आणि राजकीय शक्तींनीही! गुलामी, नात्झी वंशवाद, पृथ्वीभोवती सूर्य फिरतो ही काही उदाहरणं. पण चूक कोण करत नाही? To err, is human असं म्हटलंच आहे. पण अशा चुका टाळण्याचा किंवा कमी करण्याचा मार्ग म्हणजे चिकित्सा करणे, कुठलाही सिद्धांत अंतिम हे न मानणे. आणि तो सिद्धांत काटेकोर कठोर निकषांच्या आधारावर तपासून पाहणे. साक्षात्कार, म्हणजे कुणीतरी ज्ञान हे अंतिम ज्ञान म्हणून हातावर ठेवणे हे मी मानत नाही. कुणावर तरी विश्वास हा सिद्धांत सिद्ध होण्यासाठी निकष असणं हे पटण्याच्या पलीकडे आहे. परंतु वेगवेगळे विचार असणाऱ्यांनी एकत्र येऊन आपापल्या पद्धतीने विचारविमर्श केला, आपल्या पद्धतीने प्रयोग वा परीक्षा केल्या तर या सर्व विचारमंथनातून सत्य दिसण्याची शक्यता वाढते. वैज्ञानिक संशोधनाचा इतिहास हेच सिद्ध करतो. चिकित्सेचा मार्ग काही शंभर टक्के सत्य समोर आणेल असे नाही पण या मार्गात अपयश स्वीकारण्याची आणि वेगळ्या विचाराने पुन्हा प्रयत्न करण्याची ताकद आहे. आणि त्यामुळे हीच पद्धत हळूहळू का होईना आपल्याला सत्याकडे नेऊ शकणारी आहे. देवाने काही धर्मातील लोकांना सांगितले की विश्वाचे वय ६००० वर्षं आहे. पण त्याच देवाने हिंदूंना सांगितले की विश्व अनंत वर्षांचे आहे. दोन्ही गोष्टी एकाच वेळी सत्य असू शकत नाहीत. दोघांनीही आपला विश्वास चूक असू शकतो असे गृहीत धरून संशोधन करायला हवे. दोन्ही बाजूंनी जर असे म्हटले,”आमच्या ग्रंथांत तसे म्हटले आहे आणि आम्ही तेच खरे मानू” तर हा परस्परविरोध तसाच राहून सत्य काय ते कळणार नाही. मग पुढे काय? तर दोन्ही वेगळ्या मतांच्या समूहांनी चिकित्सा करावी. निरीक्षणं करावीत, डेटा गोळा करावा. त्यातून एक काही तरी सिद्ध होईल. किंवा दोन्ही चुकीचे असून सत्य काहीतरी वेगळेच आहे असं तरी दिसेल. पण तो पुढे जाण्याचा मार्ग असेल. प्रगतीचा मार्ग असेल.”
शास्त्रोक्त चिकित्सा आणि त्यावर आधारित असा सिद्धांत वा नियम हे मानायला कुठल्याही बाजूचा विरोध का असावा? खरा शास्त्रज्ञ तयार असेल. पण श्रद्धा, विश्वास, साक्षात्कार वाल्यांनाही हे मान्य असायला प्रत्यवाय नसावा.
स्वतःची श्रद्धा ही अंतिम असं वाटणाऱ्यांना तशीच श्रद्धा असणाऱ्यांची झुंड का हवी असते हे मला कळू शकत नाही. आपल्या मताप्रमाणे दुसऱ्याचं मत परिवर्तन करायची गरजच काय? दुसऱ्याला सत्याची आस असेल तर तो स्वतःहून तुमची श्रद्धा मान्य करेल अथवा करणार नाही. हिंदू धर्मात हे एक अतिशय चांगलं आहे. हिंदू धर्म प्रसार आणि प्रचारक ही संकल्पना अस्तित्वातच नाही. तसंच शास्त्रज्ञांचंही असतं. माना अथवा मानू नका, संशोधन चालू राहील. पण श्रद्धा आणि विश्वासवाल्यांचं असं नसतं. भावनाशील होऊन ते हिरीरीने पटवायला जातात, अनुयायी बनवायला जातात. धर्मप्रसारासारखंच ते वाटतं. सत्यशोधनात भावनेला थारा नाही.
-मंदार वाडेकर

नानबाची उपवास कथा

आज नानू परत आमच्या घरी आला. तशीच ती शबनम खांद्याला अडकवलेली. नेहरू शर्टाच्या खिशाला पेन खोचलेलं. पण आज ते पेन गळलं होतं. त्याचा रुपायाएवढा डाग खिशाच्या खाली दिसत होता. दाढीचे खुंट नुकतीच लावणी केलेल्या भाताच्या शेताप्रमाणे दिसत होते. गेल्या काही वर्षांत नानूच्या डोक्यावरील केसांनी स्वयंघोषित तह डिक्लेअर करून सैन्य चांगले दोनतीन मैल मागे नेले होते. क्षितिजावर काही केस उभे होते तेही आज जरा हतबुद्ध झाल्यासारखे वाकले होते.

“ये ये नानू! अगदी नववर्षाच्या पूर्वसंध्येला आलास. आता नवीन वर्षसोहळा साजरा करूनच जा हो! हिने छान मुगाची खिचडी आणि कढी असा बेत केलाय! सोबत पोह्याचा पापडही! तुला आवडतो ना, मला माहीत आहे.” मी म्हणालो.
“हं…” प्रदीर्घ निःश्वास टाकून नानू तसाच उभा राहिला.
त्या प्रदीर्घ हं ने मी ओळखलं, नानूचा पापड मोडलाय. एरवी पोह्याच्या पापडाचं नाव काढलं की तो खुलत असे. आज तसं काही झालं नाही.
“नानबा, आणि हे रे काय? खिशाखाली डाग पडलाय शाईचा. पेन गळतंय की काय? जरा कविता कमी कर थोडे दिवस. पेनालाही विश्रांती लागते बरं.” मी जरा वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला.
“हं!” पुन्हा एकदा दीर्घ निःश्वास!
“धोंडोपंत, इथे हृदयच गळतंय भळाभळा. त्यातून येणाऱ्या रुधिराने अंतःकरणाला मोठ्ठा डाग पडलाय आणि तो कुणालाही दिसत नाहीय.” नानू शून्यात बघत म्हणाला. रुधिर वगैरे म्हणजे प्रकरण गंभीर दिसत होते.
“काय रे, ती तुझी परांजपीण परत आलीय का गावात?” मी जरासं मिष्किलपणे म्हणालो.
“धोंडोपंत, परांजपीण कशाला येतेय आता? तिच्यावर वट्ट बारा कविता झाल्या. आठवड्याला एक या हिशेबाने. इराण्याच्या हॉटेलात फॅमिलीरूममध्ये चहा आणि ब्रूनमस्का एवढीच प्रगती झाली आमची. नाही. आता तिचा त्रास होत नाही मला. चिनी मातीच्या बरणीत तिच्या आठवणी घालून वरून फडकं घट्ट बांधून टाकलंय. परवा कुडाळकरने माहिती काढून आणली. तिचं खरं नाव बापट आहे म्हणे. माझ्या प्रेमाशी ती कधीच एकनिष्ठ नव्हती धोंडोपंत. मरूदे. मी बरणीवर बापटीण असं लिहून टाकलंय आता.” नानूने खांदे पाडले आणि डोळे मिटले.
“अरे नानू, जाऊ दे रे. ही परांजपीण गेली तर दुसरी येईलच की. परांजपे वंश काही संपला नाहीये.” मी म्हणालो.
“नाही धोंडोपंत, परांजपे-सरंजामे युती आता होणे नाही. त्या युतीमधून केवळ चौतीस रुपये बारा आण्यांची बिलं प्रसवली आहेत. ते असो. पण आज आकाश कुंद झालंय. हृदयात खिन्नतेच्या लाटांचा पूर उसळला आहे. माझं आयुष्य हे काही एव्हरेस्टइतकं उच्च नाही पण ते पर्वतीसुद्धा नसावी असं लोकांना वाटतं?” नानू उद्गारला.
“अरे पण एवढं आकाश कुंद व्हायला काय झालं? सकाळीच हवामानखात्याच्या अंदाजात लख्ख उजेड आणि छत्तीस डिग्री तापमान राहील असं सांगत होते. टोपीच्या आत कांदा ठेवा, ताक किंवा पाणी सतत प्या असाही सल्ला देत होते.” मी म्हणालो.
परत एक दीर्घ निःश्वास.
“जाऊ दे धोंडोपंत. नाही कळायचं तुम्हाला. सर्जनशील मनाची घुसमट काय असते हे दुसऱ्या सर्जनशील मनालाच कळतं. चाळीतल्या नळाला काय कळणार धरणाच्या काळजातलं ओझं?” नानू विद्ध झाला होता.
“मी म्हणजे चाळीतला नळ काय रे? मलाही कळतं हं ते तुझं सर्जनशील का काय ते. हिचा एक लांबचा भाऊ चांगला सर्जन झालाय. इथेच केईएमला असतो. उत्तम शील आहे त्याचं. तिथल्या नर्सेस सांगतात. आणि काय रे, झालंय काय एवढं तुला घुसमटायला? चांगला रोज चौपाटीवर जातोस, भेळ चापतोस, तो ओझोन की काय ते पितोस.” मी म्हणालो.
“धोंडोपंत, माझी कला मी कधीच स्वार्थासाठी वापरली नाही. कला आपल्यात असली तरी तिच्यावर मानवतेचा अधिकार आहे असंच मी मानतो.” नानू.
मला कळेना, हा दृष्टद्युम्न असा बाण न लागताच रथात आडवा का पडतोय?
“म्हणजे रे काय? आणि कसली कला? तू मागे शंकऱ्याला ती जादू दाखवली होतीस ती? तुझ्या कवितेच्या कागदाची सुरळी तोंडातून घालून विजारीच्या मागच्या खिशातून काढून दाखवली होतीस ती? शंकऱ्या जाम इम्प्रेस झाला होता. फादर फादर, मी मोठा होऊन कवी होणार म्हणत होता.” मी म्हणालो.
“धोंडोपंत! आजही तुम्ही माझ्या कवितेला कला मानत नाही ठाऊक आहे मला. पण तुम्हाला सांगतो मला वाचकवर्ग आहे. त्याला ती आवडते. हा वाचकवर्ग म्हणजे दिवसभर पोराबाळांची, नवऱ्याची उस्तवार करून दमलेला, कपाळावरच्या कुंकवाचा फराटा झालाय हे माहीत असूनही मरू दे मेलं, इथं कुणाला दाखवायचंय असं म्हणणारा, ओटा पुसून, उष्टं केराच्या डब्यात टाकून मगच घटकाभर आडवं होणाऱ्या गृहिणी! माझी कविता हीच काय ती त्यांची स्वातंत्र्याची पहाट असते. कित्येकजणी “नानू नानू, नवीन कविता म्हणा की!” असं लडिवाळपणे म्हणत येतात तेव्हा माझ्या दाढीच्या खुंटांत कसंसंच होतं. तुम्हाला ते फीलींग कधीच नाही कळणार. या सगळ्या सोज्वळ, साध्यासुध्या बायका रे. नवऱ्याने वाढदिवसाला कुकर किंवा केरसुणी दिली तरी बेहोष होणाऱ्या. कविता साबुदाण्यावर केली काय, ताजमहालावर केली काय.. साबुदाणा भिजवला या आनंदातच यांचा स्वर्ग. त्या आनंदालाही दृष्ट लागली. माझी साबुदाणा कविता हरली. सत्वाचा पराभव झाला. शेंगदाणा जिंकला.” नानूचं काही खरं नव्हतं.
“अरे पण काय झालंय काय? आणि कुठली ही कविता म्हणायची?” मी.
नानूचा चेहरा जरा उजळला. आणि मला माझी चूक उमगली. पण वेळ निघून गेली होती. नानूने झोळीतून कागद बाहेर काढला होता. चष्मा चढवला होता.
“पंत! ऐका!”
कवितेचं नाव आहे “आर्द्र”.
शुभ्र वाळूत ती आली
श्वेत वस्त्रं लेऊन आली
ठळक गोलाई घेऊन आली
अंगांग भिजवून आली
सावकाश आली थबकली
नजरेत वारुणी हरवली
ठिपके ठिपकेवाली
सोनेरी कंचुकी चमचमली
काय वाटते तुला म्हणाली
आठवते ती रात्र मखमली
धुंद झालास तू मी गंधाळलेली
तू भुकेला मी उपासलेली
युरेका! वीज चमचमली
आठवले भूक होती लागली
साबुदाणा खिचडीसम ती भासली
भिजवला का?
पोस्ट लगेच टाकली..
नानू, अभिप्रायाच्या अपेक्षेत माझ्याकडे पाहू लागला.
“संपली?” मी विचारले.
“छान आहे की. पण मला वरून ओलं खोबरं कोथिंबीर पखरलेलं आवडतं.” मी म्हणालो.
नानू म्हणाला,”होय ना? अरे या बायकांसाठी हाच उच्चबिंदू असतो रे. छोट्या छोट्या गोष्टींतून आनंद शोधत असतात. कुणी नुसता साबुदाणा म्हटलं तरी सात्विक आनंदात स्वतःच निथळून निघतात त्या. तर कुणा नतद्रष्टाला ते पाहवलं नाही. या कवितेत काही तरी सूचक आहे का तुम्हीच सांगा! मला परस्त्री ही साबुदाण्याच्या खिचडीप्रमाणे पवित्र वाटते. मासिक बोंबच्या या अंकात पहा काय म्हटलंय माझ्या कवितेविषयी..” नानूने अंक माझ्यासमोर आपटला.
“सरंजामेंची कविता ही युगायुगांच्या दमनातून आल्यासारखी वाटते. कवीने प्रथमच साबुदाणा पाहिला आहे. त्याची गोलाई त्याला कसलीतरी आठवण करून देते आहे. तो भिजला आहे या कल्पनेनेच कवीचे मन गळले आहे. भिजलेला साबुदाणा चिकट झाला आहे. क्लांत झाला आहे. कवीसुद्धा श्रांत झाला आहे. ही कविता म्हटलं तर खिचडी, म्हटलं तर वजडी आहे. भिजवला का? या दोन शब्दांत मानवतेचे उद्धरण आणि प्रजनन दोन्ही सामावले आहे.”
“नानू, अरे छान आहे की रसग्रहण! यात रागावण्यासारखं किंवा हिरमुसण्यासारखं काय आहे?” मी म्हणालो.
“धोंडोपंत, नाही कळणार तुम्हाला. तुम्हाला काय माहीत स्त्रीचं मन काय असतं ते. त्यांना नानूचं रुसणंही आवडतं. त्यांचे नवरे स्वतः रुसणं तर सोडा, या रुसल्या तरी दुर्लक्ष करणारे असतात. इथे त्यांचा हा कृष्णमुरारी, कन्हैया, त्यांच्या साबुदाण्याशी खेळतो, प्रसंगी ते चोरतो, कधी ते मिळाले नाहीत तर रुसतो, ही रासलीला फार गोड असते. या रासलीलेला जर एक नतद्रष्ट रीसलीला म्हणत असेल तर मी ती बंदच केलेली बरी.” नानू एवढं बोलून गप्प झाला.
“नानूभावजी, हे हो काय? अहो तुमच्या साबुदाणा कवितेची मी कित्ती कित्ती वाट पाहत असते. तुम्ही या धोंडोपंतांकडे लक्ष नका देऊ, या समीक्षेकडे लक्ष नका देऊ. माझ्यासाठी.. माझ्यासाठी एवढं कराल ना? भिजवाल ना तुमचा.. साबुदाणा??” पिटपिट पापणी, ओष्ठलाली लावलेली एक चाळिशीतली यौवना नानूला पाहून थबकली होती आणि त्याला गळ घालत होती. नानू फुलला होता. त्याच्या खिशाखाली शाईचा डाग मोठा होऊ लागला होता.


छान छान डॉक्टर

 लोकांना काय छान छान डॉक्टर लोक भेटतात. ते शारीरिक इलाज तर करतातच, पण मित्रही बनतात, समुपदेशकही बनतात, क्वचित प्रसंगी तत्वज्ञानी बनून आदिभौतिक, पारलौकिक आणि पारमार्थिक मार्गदर्शनही करतात. परवा प्राजक्ताची पोस्ट वाचली आणि मला तिचा हेवाच वाटला. काय छान डॉक्टर आहेत तिचे! नऊ तास झोप काढा असं सांगणारा डॉक्टर मला मिळण्यासाठी मी नवसही बोलायला तयार आहे. आणि हे डॉक्टर तेवढ्यावर थांबले नाहीत. प्रिस्क्रिप्शनच्या कागदावर जिथे जेमतेम P काढून ते पॅरासिटॅमॉल आहे असं गृहीत धरलं जातं तिथे या डॉक्टरांनी सुवाच्य अक्षरात दोन सुविचारही लिहून दिले. ते सुविचार जीवनोन्नतीच्या सहा सोपानांपैकी पहिले दोन तरी नक्कीच होते. हे सगळं वाचून मला माझे काही डॉक्टर आठवले.

त्याचं झालं असं, टेबल टेनिस खेळताना माझ्या उजव्या खांद्याच्या स्नायूत जोरदार कळ आली. गेलो ऑर्थोपेडिककडे. त्यांनी हं हं हं करत ऐकून घेतलं आणि एक मस्तपैकी स्टीरॉईडचं इंजेक्शन ठोकलं खांद्यात. म्हणाले नाही बरं वाटलं तर परत या, सर्जरीच करावी लागेल. हे म्हणजे मडगार्ड चेपल्यावर मेकॅनिकदादा जसं “सायेब, इंजिन खोलावं लागेल” असं सांगतात तसंच. साला आमच्या चेहऱ्यावरच “मी भोट आहे” असं लिहून आलंय की काय. इंजेक्शनने शष्प फरक पडत नाही. मी मडगार्ड तसंच ठेवतो. उगाच इंजिन खोलायचं आणि मेकॅनिकदादा,”सायेब, तुमच्या कबाटाची बिजागरी गंजून खल्लास, बदलाय लागेल.” असं सांगायचे. नकोच ते. टेबलटेनिस बंद म्हणजे श्वासोच्छ्वास बंद अशीच परिस्थिती. फोरहॅंड बंदच झाला. पण देव एक दार बंद करतो पण दुसरं उघडतो तसं झालं. फोरहॅंड बंद झाल्यामुळे बॅंकहॅंड स्ट्रोक्स सुधारले. तर ते असो. मडगार्ड चेपलेलंच राहिलं.
मग भारतात येणं झालं. बोलताबोलता बाबांना खांद्याबद्दल सांगितलं. ते अस्वस्थ झाले. लगेच डॉक्टरांकडे जायचं फर्मान निघालं. त्यांची एक आवड होती. मुलं कितीही कमावती झाली तरी त्यांच्यासाठी कपडे करणे, चपला घेणे, अंगाला तेलाने मालिश करून आंघोळीला पाठवणे हे त्यांना अत्यंत आनंदाचं वाटे. आम्हीही ते आनंदाने करून देत असू कारण त्यात त्यांना “I am taking care of my children” याच्या पुनःप्रत्ययाचा आनंद मिळतो असं आम्हाला वाटे. ते आम्हा दोन भावांनाच असं नाही तर सगळ्या आमच्या चुलत, आत्तेभावंडांनासुद्धा पोटच्या मुलांप्रमाणेच हे करत. प्रेमळ आणि अतिभावुक वृत्तीचे होते ते. तर माझ्या खांद्यामुळे ते अस्वस्थ झाले. दुसऱ्याच दिवशी एका स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे मला ते घेऊन गेले. हे डॉक्टर स्वतः निरोगी होते. म्हणजे एकही रोगी वेटिंग रूममध्ये नव्हता. तरी आम्हाला त्यांनी पंधरा मिनिटे बसवून ठेवले आणि मगच आत बोलावले. नाव गाव, काम काय करता वगैरे प्राथमिक चौकशी झाल्यावर काय होतंय वगैरे विचारलं. मी सांगितलं. तशी म्हणाले,”फ्रोझन शोल्डर. हो हो. हे होणारच.”
आं? होणारच म्हणजे? मी विचारलं.
“म्हणजे असं बघा, तुमचा बीएमआय असा आहे की तुमच्या खांद्याचीच काय, कशाचीच गॅरंटी देता येत नाही. तुम्ही डायबेटिक असणार. तेव्हा हे फ्रोझन शोल्डर वगैरे होणारच.”
बाबा प्रचंड भडकले, तरी संयम ठेवून म्हणाले,”अहो म्हणून तर तुमच्याकडे आलो ना? यावर इलाज करायला?”
त्यावर ते म्हणाले,”त्याला काही इलाज नाही. यांची काहीच गॅरंटी नाही. इथून बाहेर पडल्यावर कोपऱ्यापर्यंत जाईस्तोवर हे वर जाऊ शकतात.”
बाबा उठले नि म्हणाले,”नमस्कार!” आम्ही बाहेर पडलो. फी तर आगाऊ घेऊनच आत सोडलं होतं.
तणतणतच घरी आलो. आईही चिडली हे ऐकून. बाबा म्हणाले,”आता आपण उद्या दुसरीकडे जाऊ.” मी म्हणालो,”जाऊद्या बाबा, इतकं काही महत्वाचं नाहीय हे.” पण त्यांनी ऐकलं नाही. राजा विक्रमादित्याप्रमाणे त्यांनी माझा खांदा त्यांच्या खांद्यावर घेतला आणि आम्ही दुसऱ्या डॉक्टरांच्या दवाखान्याच्या दिशेने वाटचाल करू लागलो.
हे डॉक्टर मुळीच निरोगी नव्हते. बाहेर साधारण पन्नास ते साठ दुर्मुखलेले लोक बसलेले होते. म्हणजे हे डॉक्टर खरंच चांगले असणार. “कार्ड काडलंय का?” ही एक स्टॅंडर्ड चौकशी असते ती झाली. कार्ड काढलं. यथावकाश डॉक्टरांच्या समोर मी उभा होतो. हे डॉक्टर काही केबिनमध्ये वगैरे बसलेले डॉक्टर नव्हते. एका मोठ्या ऑपरेशन थिएटर कम गोठा वाटणाऱ्या प्रशस्त खोलीत मी उभा होतो. समोर बाह्या सरसावून उभे असलेले डॉक्टर होते. मला त्यांनी टेबलवर बसायला सांगितले. आणि हात वर करा म्हणाले. त्यांनी एक हात माझ्या काखोटीत धरला, दुसरा हाताने माझं मनगट धरलं. मला अचानक पशु वैद्यकीय दवाखान्यात लोखंडी पाईपच्या पिंजऱ्यात डांबलेल्या वळूचं फीलींग आलं. पण सुटका नव्हती. त्यांनी माझा हात हळूहळू मागे न्यायला सुरुवात केली. प्रचंड वेदना सुरू झाल्या. मला म्हणाले,”तुम्हाला बोंबलायचं वगैरे असेल तर खच्चून ओरडा बरं. काही हरकत नाही.” वेल, थॅंक्स अ लॉट डॉक्टर! पुढील एक मिनिट मी गुरासारखा ओरडत राहिलो. ते “हं हं!” करत राहिले. मला सडकून घाम फुटला. आता मी बेशुद्ध पडणार असं वाटत असताना त्यांनी माझा हात सोडला. पाच मिनिटं पडून रहा म्हणाले. नंतर काय आश्चर्य, माझा खांदा अगदी ३६० डिग्रीत फिरू लागला होता. ब्लड सर्क्युलेशन सुरू झालं. डॉक्टर मात्र पुढच्या वळूकडे वळले होते.
हे असे डॉक्टर कुठे आणि प्राजक्ताला भेटलेले,”तुम्ही इन ट्यून विथ द ट्यून वाचलंय का? जरुर वाचा. आपला सोल युनिव्हर्सशी हार्मनीमध्ये असला की सगळे अवयवही आपोआप हार्मनीत असतात साहेब.” असं सांगणारे डॉक्टर कुठे. नशीब एकेकाचं.