Friday, January 13, 2023

धर्माचे प्रयोजन तरी काय

 मनुष्य हा जाणिवेच्या पातळीवर आणि तिच्याहून खालच्या अशा दोन पातळ्यांवर काम करू शकतो. नेणिवेच्या पातळीवर ज्या प्रेरणा उद्भवतात त्यांना आपण सहजप्रवृत्ती म्हणतो तर जाणिवेच्या पातळीवरून ज्या प्रेरणा येतात त्यांना तर्कबुद्धि म्हणतो. परंतु यापेक्षाही उच्च अशी एक पातळी आहे. ती अतींद्रिय ज्ञानाची पातळी होय. वरवर पाहता ते नेणिवेसारखी वाटते कारण ती जाणिवेच्या पलीकडील आहे. पण ही जाणिवेच्या वरची पातळी आहे. खालची नव्हे. ही सहजप्रवृत्ती नसून, दिव्यस्फूर्ति आहे. जे महान द्रष्टे, संत, विभूती होऊन गेले, त्यांच्या सर्वसामान्य लोकांसारख्या आषुष्यात काही क्षण वा प्रसंग असे येऊन गेलेले दिसतात जेथे त्यांना बाह्य जगाची जाणीव नसल्याचे दिसते पण जेव्हा ते त्या स्थितीतून बाहेर आले तेव्हा त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झालेले होते. सॉक्रेटिसबद्दल असं सांगतात की सैन्याबरोबर चालत असताना एके ठिकाणी त्याला सूर्योदयाचे सुंदर दृश्य पहायला मिळाले आणि तात्काळ त्याच्या मनात एक विचारप्रवाह सुरू झाला, त्याचे देहभान हरपले. तो सतत दोन दिवस तेथेच उभा होता. जेव्हा त्या स्थितीतून बाहेर आला तेव्हा त्याला ज्ञान प्राप्त झालेले होते. असेच प्रसंग ख्रिस्त, गौतमबुद्ध, ज्ञानेश्वर अशा महात्म्यांच्या आयुष्यात आले. जणूकाही जाणिवेच्या पातळीवरून ते बाहेर पडले आणि जेव्हा जाणिवेत ते परतले तेव्हा आत्मज्ञानाने ते उजळून गेलेले होते. आता ही जी अवस्था होती ती दिव्यस्फूर्ती. ती कधी कशाने आणि कुणाला प्राप्त होईल ते माहीत नाही पण ती झाली तर अंतिम ज्ञान प्राप्त होते हे या थोरांच्या उदाहरणावरून दिसले आहे. आपण सर्वसामान्य माणसे सहजप्रवृत्तित जगत असतो. दिव्यस्फूर्तीच्या असण्याचे ज्ञानही आपल्याला नसते. हीच ती दिव्यस्फूर्ती जे धर्माचे एकमेव उगमस्थान आहे. परंतु दुर्दैवाने याला मनुष्याच्या स्वार्थी वृत्तीचा स्पर्श झाला आणि त्यातून “ईश्वराने आम्हाला संदेश दिला आहे आणि आम्हीच त्याचे संदेशवाहक आहोत, इतर कोणासही हा संदेश प्राप्त करण्याचा अधिकार नाही” अशी लुच्चेगिरी पुढे आली. कुठलेही उदात्त तत्त्व, अंतिम ज्ञान “आम्ही सांगतो तेच सत्य, आमचे सत्य न मानणाऱ्यांना तुम्ही ठार मारा” असे असण्याची सुतराम शक्यता नाही. कारण अंतिम सत्यात केवळ सच्चिदानंद आहे, तो मानवी जाणिवेच्या वरच्या स्तरावरचा आहे. त्यात जाणिवेच्या पातळीवरील तर्कशास्त्र लावून निरर्थक शिक्षा वा नियम लावण्याची गरजच नाही. आम्हीच काय ते ईश्वराचे एजंट हे म्हणणे तर्कदुष्ट आहे. कारण, या विश्वात एकही हालचाल अशी नाही जी विश्वव्यापी नाही. संपूर्ण विश्व हे नियमांनी नियंत्रित आहे. ते पूर्णपणे सुव्यवस्थित आणि सुसंवादी आहे. केप्लरचे ग्रहभ्रमणासंबंधीचे नियम हे संपूर्ण विश्वात लागू होतात. हेच इतर सर्व बाबींत आहे. याचाच अर्थ, जे सामान्यपणे विश्वात घडते ते सर्वांना समान अनुभवता येते. हीच बाब अंतिमज्ञानाबाबतही लागू होते. तेव्हा अंतिमज्ञान जर काही असेल तर ते दिव्यस्फूर्तीमार्गे सर्वांना समान दिसले पाहिजे. मग ही दिव्यस्फूर्ती तरी काही लोकांनाच झाली हे कसे काय? तर मला वाटतं दिव्यस्फूर्ती स्वीकारण्यासाठी जी क्षमता लागते ती सर्वांच्या ठायी नसावी. उदाहरणार्थ, ४०,००० व्होल्ट दाब असलेला विद्युतप्रवाह साध्या घरातल्या फ्यूजच्या तारेला सहन होणार नाही. त्यासाठी उच्चदाबाच्याच तारा हव्यात. तसे काहीसे हे असावे. आपण सर्वसामान्य माणसे दिव्यस्फूर्तिचा दाब सहन होणारे नसू. आपण आपला साधा २१० व्होल्टचा सामान्य करंट वाहून आपले जीवन जगू. आपल्याला ४०,०००० व्होल्टची अनुभूती येणं शक्यच नाही. पण त्या दिशेने आपण पाऊल तरी टाकू शकतो. साधी फ्यूजची तार ते उच्चदाब सहन करणारी तार ही साधना करण्याचे साधन म्हणजे धर्म होय. देवळात, चर्चमध्ये वा मशिदीत जाणे म्हणजे धर्म ही भरकटलेली आणि भरकटवलेली व्याख्या आहे. धर्माचे लक्ष्य हे अंतिम ज्ञान हेच आहे.

- मंदार वाडेकर

No comments:

Post a Comment