काही वेळा बुद्धिवंत लोकांमध्येही वादविवाद होत असतात. किंबहुना बुद्धिवंत लोकांमध्येच वाद होऊ शकतात. Idiocracy चित्रपटात आर्मी अधिकारी हीरोला विचारतो,”There are only three things people do. Lead, follow or get out of the way. What are you?” काही बुद्धिवंत लीड करणारे होतात, बाकीचे फॉलो आणि गेट आऊट ऑफ द वे टाईपच निघतात. मग हे जे लीड करणारे म्हणजे स्वतःची बुद्धि लावणारे असतात ते काही विशिष्ट विचारसरणी अनुसरतात. या विचारसरण्या वेगळ्या असू शकतात. आणि हेच मग वादाचं कारण होऊन बसतं. वाद जरूर व्हावेत. पण ते लॉजिकल असावेत, वैयक्तिक उणीदुणी काढणारे नसावेत. ते असो. आमचीच विचारसरणी बरोबर या दुराग्रहातून कुठेतरी आपलाच सत्यशोधनाचा मार्ग आपण मर्यादित करतो आहोत का असा विचार निश्चितच करावा. शास्त्रज्ञाची विचारसरणी ही चिकित्सक विचारसरणी असते. तो मूलभत संशोधन करतो, कार्यकारणभाव शोधतो. त्यानुसार हायपोथेसिस मांडतो. निरीक्षणं करतो, प्रयोग करतो. निरीक्षणं आणि प्रयोगांतून मिळालेला डेटा एक तर हायपोथेसिस सिद्ध करतो वा ते चूक आहे असं तरी सांगतो. खरा शास्त्रज्ञ मग हायपोथेसिस फेकून देऊन दुसरं हायपोथेसिस मांडतो आणि पुन्हा निरीक्षण, प्रयोगाच्या प्रोसेसमधून जातो. वर्षानुवर्षं जातात, शास्त्रज्ञ चिवटपणे चिकित्सा चालू ठेवतो. पण जोवर निरीक्षणांती वा प्रयोगांती सिद्ध होत नाही तोवर एखादी गोष्ट ही नैसर्गिक नियम म्हणून तो स्वीकारत नाही. असाच एक वाद पाहिला आणि कार्ल सागानने लिहिलेली कादंबरी आठवली. द कॉंटॅक्ट.
राजहंसाचे चालणे मोठे ऐटीचे, म्हणोन काय कवणे चालोचि नये? या भूमंडळी होणाऱ्या सर्व घडामोडींची आमच्या परीने दखल घेणे हा या लेखनाचा प्रपंच.
Thursday, January 5, 2023
श्रद्धा आणि विज्ञान
या कादंबरीत कार्लने अतिशय सुंदर चर्चा केली आहे. धार्मिक श्रद्धा आणि वैज्ञानिक मार्ग यांतील. श्रद्धा आणि मार्ग असे शब्द मी मुद्दाम वापरतो आहे. श्रद्धा म्हणजे कार्यकारणभाव न पाहता ठेवलेला गाढ विश्वास, तर मार्ग म्हणजे सत्य शोधण्याची एक शिस्तबद्ध पद्धत. पृथ्वीवरील सर्व रेडिओ दुर्बिणींनी एका विशिष्ट पॅटर्नचा संदेश डिटेक्ट केला आहे. तो एका ठराविक कालावधीने रीपीट होतो आहे. हा संदेश अवकाशातील एका विशिष्ट तारकासमूहाच्या दिशेने येतो आहे. अर्थातच ही घटना मानवजातीच्या इतिहासातील महत्वपूर्ण घटना आहे. प्रथमच कुठेतरी विश्वात इंटेलिजंट जीवसृष्टी असल्याचा पुरावा म्हणून या संदेशाकडे पाहिलं जात आहे. आणि इथे वेगळ्या विचारसरणींचा संघर्ष सुरू होतो. ख्रिश्चन धार्मिक विचारवंतांचं म्हणणं असतं हा देव असल्याचा पुरावा आहे. तर शास्त्रज्ञ हा नक्कीच एका प्रगत बुद्धिमान संस्कृतीकडून प्रक्षेपित झालेला संदेश आहे. मग श्रद्धा आणि शास्त्रीय विचारसरणी यांच्यातील वादविवाद सुरू होतो. धर्मगुरुंच्या मते,”तुम्ही शास्त्रज्ञ फारच कीस पाडता. तुम्ही कशावरही विश्वास ठेवत नाही. फार चिकित्सा करता. तुम्हाला सत्यासत्यता लगेच पडताळून पहायची असते. आणि तीसुद्धा तोकड्या ज्ञानाच्या चौकटीत राहून. तुमच्या सत्यासत्यतेचे निकषही काय तर, निरीक्षणातून जमवलेला इंपिरिकल डेटा. तुमच्या मते सत्य तेच, जे पंचेंद्रियांमार्फत अनुभवता येतं. अंतर्भूत प्रेरणेला कुठेही जागा नसते, साक्षात्काराला कुठेही स्थान नसते. धार्मिकतेला तुम्ही अगदी सुरुवातीलाच कंडम करून टाकता. काही गोष्टी या विश्वास ठेवून करायच्या असतात, अंतर्मनाच्या अनुभूतीवर विश्वास ठेवून करायच्या असतात. ज्या गोष्टी पारंपारिकरीत्या छान चालल्या आहेत त्यांना धक्का द्यायचाच कशाला? Haven’t you heard, if it ain’t broken, don’t fix it? बरं, एकदा एक गोष्ट सिद्ध झाली तरी तुम्ही गप्प बसत नाही. त्यातही परत परत संशोधन करत राहता. आणि नवं काही तरी आढळलं की आधीचा सिद्धांत टाकून देता. यासाठीच मलाही शास्त्रज्ञांवर अजिबात विश्वास ठेवावासा वाटत नाही कारण त्यांचा कशावरही विश्वास नाही.”
यावर एली, जी कादंबरीत एक शास्त्रज्ञ आहे, ती प्रतिवाद करते,”शास्त्रज्ञाला कुठलीही संकल्पना त्याज्य नाही. अगदी तुमची विनाधार श्रद्धादेखील तुम्हाला मान्य आहे ही गोष्ट शास्त्रज्ञ स्वीकारतो. त्या श्रद्धेचं शास्त्रीय प्रयोगासारखं डेमॉन्स्ट्रेशन करता येत नसूनही ती एक विचारधारा आहे हे मान्य आहे. शास्त्रोक्त चिकित्सेला सामोरे जायला तुम्ही कचरता. चिकित्सेची पद्धत काही अचानक निर्माण झालेली नाही. हे विश्व साधे सोपे सरळ नाही. ते अगदी साधे सरळ आणि तरीही क्लिष्ट आहे. क्लिष्ट गोष्टींमागील तत्व समजून घेण्याचा मार्गही सरळ साधा सरधोपट नसतो. सुरुवात साध्या तर्काने होते. त्या आधारावर एक थिअरी मांडली जाते. ती सिद्ध करायला निरीक्षणं केली जातात. पहिल्याच फटक्यात कधीच थिअरी सिद्ध होत नाही. पण मग स्वतःला फसवणं हे येतं. सद्यकालात चुकीचे आहेत असे माहीत असलेले सिद्धांत एके काळी सर्वांनीच उचलून धरले होते. शास्त्रज्ञांनीही. धर्मगुरूंनी आणि राजकीय शक्तींनीही! गुलामी, नात्झी वंशवाद, पृथ्वीभोवती सूर्य फिरतो ही काही उदाहरणं. पण चूक कोण करत नाही? To err, is human असं म्हटलंच आहे. पण अशा चुका टाळण्याचा किंवा कमी करण्याचा मार्ग म्हणजे चिकित्सा करणे, कुठलाही सिद्धांत अंतिम हे न मानणे. आणि तो सिद्धांत काटेकोर कठोर निकषांच्या आधारावर तपासून पाहणे. साक्षात्कार, म्हणजे कुणीतरी ज्ञान हे अंतिम ज्ञान म्हणून हातावर ठेवणे हे मी मानत नाही. कुणावर तरी विश्वास हा सिद्धांत सिद्ध होण्यासाठी निकष असणं हे पटण्याच्या पलीकडे आहे. परंतु वेगवेगळे विचार असणाऱ्यांनी एकत्र येऊन आपापल्या पद्धतीने विचारविमर्श केला, आपल्या पद्धतीने प्रयोग वा परीक्षा केल्या तर या सर्व विचारमंथनातून सत्य दिसण्याची शक्यता वाढते. वैज्ञानिक संशोधनाचा इतिहास हेच सिद्ध करतो. चिकित्सेचा मार्ग काही शंभर टक्के सत्य समोर आणेल असे नाही पण या मार्गात अपयश स्वीकारण्याची आणि वेगळ्या विचाराने पुन्हा प्रयत्न करण्याची ताकद आहे. आणि त्यामुळे हीच पद्धत हळूहळू का होईना आपल्याला सत्याकडे नेऊ शकणारी आहे. देवाने काही धर्मातील लोकांना सांगितले की विश्वाचे वय ६००० वर्षं आहे. पण त्याच देवाने हिंदूंना सांगितले की विश्व अनंत वर्षांचे आहे. दोन्ही गोष्टी एकाच वेळी सत्य असू शकत नाहीत. दोघांनीही आपला विश्वास चूक असू शकतो असे गृहीत धरून संशोधन करायला हवे. दोन्ही बाजूंनी जर असे म्हटले,”आमच्या ग्रंथांत तसे म्हटले आहे आणि आम्ही तेच खरे मानू” तर हा परस्परविरोध तसाच राहून सत्य काय ते कळणार नाही. मग पुढे काय? तर दोन्ही वेगळ्या मतांच्या समूहांनी चिकित्सा करावी. निरीक्षणं करावीत, डेटा गोळा करावा. त्यातून एक काही तरी सिद्ध होईल. किंवा दोन्ही चुकीचे असून सत्य काहीतरी वेगळेच आहे असं तरी दिसेल. पण तो पुढे जाण्याचा मार्ग असेल. प्रगतीचा मार्ग असेल.”
शास्त्रोक्त चिकित्सा आणि त्यावर आधारित असा सिद्धांत वा नियम हे मानायला कुठल्याही बाजूचा विरोध का असावा? खरा शास्त्रज्ञ तयार असेल. पण श्रद्धा, विश्वास, साक्षात्कार वाल्यांनाही हे मान्य असायला प्रत्यवाय नसावा.
स्वतःची श्रद्धा ही अंतिम असं वाटणाऱ्यांना तशीच श्रद्धा असणाऱ्यांची झुंड का हवी असते हे मला कळू शकत नाही. आपल्या मताप्रमाणे दुसऱ्याचं मत परिवर्तन करायची गरजच काय? दुसऱ्याला सत्याची आस असेल तर तो स्वतःहून तुमची श्रद्धा मान्य करेल अथवा करणार नाही. हिंदू धर्मात हे एक अतिशय चांगलं आहे. हिंदू धर्म प्रसार आणि प्रचारक ही संकल्पना अस्तित्वातच नाही. तसंच शास्त्रज्ञांचंही असतं. माना अथवा मानू नका, संशोधन चालू राहील. पण श्रद्धा आणि विश्वासवाल्यांचं असं नसतं. भावनाशील होऊन ते हिरीरीने पटवायला जातात, अनुयायी बनवायला जातात. धर्मप्रसारासारखंच ते वाटतं. सत्यशोधनात भावनेला थारा नाही.
-मंदार वाडेकर
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment