माझा स्वभाव मुळातूनच भाविक, श्रद्धाळू. स्वरूपानंद जे सांगतील ते करायचे, साक्षीमहाराज जी आज्ञा देतील ती पाळायची, आसारामबापू जी मुळी देतील ती खायची. पण पूर्वी हे ठीक होतं, हे लोक आपापल्या मठात स्वत:ची कुंडलिनी जागृत करण्यात गुंतलेले असायचे. हिंदुत्वाचा प्रसार करण्याची, रक्षण वगैरे करण्याची गरज भासत नव्हती. मी दर्शनाला जात होतो, थाळीत पाच रुपये टाकत होतो, प्रसाद हाणत होतो. हो, मोरू आणि मी ज्या पद्धतीने प्रसाद ग्रहण करतो त्याला हाणणे हाच शब्द योग्य असे आमच्या सोसायटीतील बऱ्याच जणांचे म्हणणे आहे. आता मला प्रसादाचा शिरा आवडतो. काय करणार? पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. शुद्ध तुपातील प्रसाद टिकावा म्हणून का होईना हिंदुधर्म टिकावा असे मला वाटते. असे मी एकदा आमच्या सोसायटीच्या मीटिंगमध्ये शून्य प्रहरात (म्हणजे कोरम भरण्याची वाट पाहण्यासाठी ठेवलेला काळ) म्हटले. तेव्हापासून सोसायटीच्या गणपतीत मला कधीही फूड कमिटीत प्रवेश मिळाला नाही. आमच्या सोसायटीची कमिटी इन मीन पंधरा जणांची. त्यातील बारा जण फूड कमिटीवर. एक अध्यक्ष, म्हणजे स्टेजवर मधल्या खुर्चीवर बसणारा. मला आणि मोरूला तेवढे प्रॉपर्टी म्यानेजमेंटवर टाकतात लेकाचे नेहमी. प्रसाद न बोलता गट्टम करावा हेच खरे. धर्माच्या गोष्टी करू नयेत. पण हे हल्ली काय झाले आहे आहे समजत नाही. बरं एक महाराज जे म्हणतात ते करायला गेलो की तोवर दुसरे त्याच्या विरुद्ध आज्ञा देतात. मोदींनी मेक इन इंडियाची हाक दिली. त्याला प्रतिसाद देत साक्षीमहाराजांनी किमान चार पुत्र (प्रति कुटुंब, प्रति पत्नी नव्हे) प्रसवण्याची आज्ञा दिली. ती आम्ही शिरसावंद्य मानून रीतसर मधुचंद्राची योजना आखत होतो. सगळं बुकिंग झालं होतं. छान केदारनाथची सहल करायची म्हणत होतो. तेवढ्यात स्वरूपानंदमहाराज म्हणाले, मधुचंद्र पाप! त्यानेच निसर्गाचा कोप होतो आहे. हे सगळं पूर येणं, मुसळधार पाऊस कोसळणं हे सगळं या तुमच्या मधुचंद्राच्या पापामुळेच. तुला जायचंच असेल तर या मोरूला घेऊन जा, केदारनाथाचं दर्शन घे. मोरू निर्लज्जपणे हो म्हणाला. फुकटात असेल तर तो कुठेही यायला तयार असतो. त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी स्वरूपानंदांना नम्रपणे विचारले,"स्वामीजी, महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे, पाऊस नाही, त्याचे कारणही हेच असेल काय? कारण आताशा उन्हाळ्यात पूर्वी होत तितकी लग्ने होत नाहीत. तेवढे मधुचंद्रही कमी झाले असावेत." स्वामींनी माझ्याकडे रोखून पाहिले. कपाळावर सहा आठ्या होत्या त्या दोनने वाढल्या. बाजूला उभ्या असलेल्या शिष्याला त्यांनी खूण केली. त्याने पानाचा डबा उघडून पुढे करावा तसा एक डबा उघडून पुढे केला. स्वामींनी त्यातली बचकभर हळद घेतली आणि आपल्या कपाळावर थापली. दोनतीन मिनिटे दीर्घश्वसन करून ते म्हणाले,"तू नास्तिक आहेस. तुझ्यासारख्या लोकांमुळे जगात पाप वाढत आहे. तुझ्यासारख्या लोकांनी आजन्म ब्रम्हचर्य पाळलं पाहिजे. मी तर म्हणतो, सर्वांनीच कडक ब्रम्हचर्य पाळलं पाहिजे. आपल्या पुढील पिढीलाही ते संस्कार दिले पाहिजेत. मुलांना लहानपणापासून आजन्म ब्रह्मचर्याचे शिक्षण दिले पाहिजे. तरच राष्ट्राला काही भविष्य आहे. वैभवशाली भारतासाठी हे आवश्यक आहे."
"महाराष्ट्रात दुष्काळ आहे त्याचं कारण तुम्हीच लोक आहात. हिंदू धर्म भ्रष्ट झाला आहे. पूर्वीचे वैभव राहिले नाही. ते कडक सोवळे, कठोर नियमधर्म, क्लिष्ट कर्मकांडे होती म्हणून धर्म टिकला होता. आता काय, बायकाही शनिमहाराजांची पूजा करू लागल्या! केवळ विरोधाला विरोध म्हणून! कसा पडणार पाऊस!" हे मात्र खरं हो. आमची हीही गेली होती त्या चौथऱ्यावर तेल घालायला. एरवी कधीही देवळात जाऊ म्हटलं की तिची "अडचण" असते. उलट मी रोज शनिवारी पत्र्या मारुतीला जाऊन नारळ फोडतो याला ती विरोध करते. "नारळ काय स्वस्त नाहीत म्हटलं. मारुतीला काय दडपे पोहे करून खायचेत की काय, लागतो कशाला नारळ त्याला?" असले तिचे विचार आहेत. "हिंदू धर्म म्हणजे काय चेष्टा आहे?" इकडे स्वामी पेटले होते. "अशानं शनिदेव भडकणार आहेत हे मी आताच सांगून ठेवतो! आणि ते भडकले तर मग स्त्रियांनी सांभाळूनच राहावं. बलात्कार वाढणार, अत्याचार वाढणार." चला, थोडक्यात म्हणजे मधुचंद्र क्यान्सल. मग स्वामींना मी कसल्या धर्मसंकटात पडलो आहे ते सांगितले. तिकडे साक्षीमहाराजांना किमान चारचं वचन देऊन बसलो आहे, आणि आता तुम्हाला ब्रह्मचर्याचं. त्यांचं वचन पाळायचं तर पूर येणार, तुम्हाला दिलेलं पाळायचं तर दुष्काळ पडणार. स्वामी म्हणाले त्याची चिंता तू करू नकोस. या भारतवर्षातील ऋषीवृंद समर्थ आहे. आमचे बापू केवळ इच्छाशक्तिच्या जोरावर गर्भाधान घडवून आणतात. आता कारावासात त्यांची इच्छाशक्ती जरा क्षीण झाली आहे एवढंच. आणि आमचे दुसरे एक बापू केवळ नजरेने वाईट वृत्तीच्या मनुष्यास क्षणार्धात क्लीब करून सोडतात. आम्ही मग उठून स्वामींचा निश्चिंत मनाने निरोप घेतला. स्वरूपानंदांनी एक गोष्ट मात्र सोळा आणे सत्य सांगितली. शनीची शांती करावी लागते, पूजा नाही. हे सांगताना ते स्वत:च एखाद्या पूजेच्या नर्मदा गोट्याप्रमाणे दिसत होते. म्हणून त्या ज्या शनिदर्शनासाठी आसुसलेल्या अग्निशिखा कंपनीच्या बायका आहेत त्यांना आमचे एक सांगणे आहे. त्यांनी आमच्या या शनिच्या गोट्याचे दर्शन घेऊन त्यावर तेल ओतावे आणि शांती करावी. पण त्या बायकांचा तो उद्देश नाही. त्यामुळे, त्या तृप्तीची देसाई सांडो, तयां कच्छपि शनि लागो, एवढंच म्हणतो.
No comments:
Post a Comment