Tuesday, March 29, 2016

आमचीही निष्काम साहित्यसेवा

(म्हाळसाकांत पोंबुर्पेकराची क्षमा मागून)

तीन वाजायला आले होते. परेशभाईंनी (विश्वस्त, डॅलस फोर्टवर्थ हिंदू टेपल) आपल्या हातातील दानशूर टिकमसेठ दारूवाला यांनी दान केलेल्या कीचेनमधील पाच नंबरची किल्ली लावली आणि संस्कारभवन, हिंदू टेंपलचे पश्चिमेकडील सहा बाय दहा फुटाचे प्रशस्त दार उघडले. ओंकार पोटे आणि आदित्य जोशी या अर्लिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी देवळाने देऊ केलेली तीन बाय आठ फुटांची दणकट टेबले (नेट वजन पंधरा किलो चारशे ग्रॅम प्रत्येकी) आत आणली. तेवढ्यात मंदार वाडेकरांनी दरडोई $१० अशा माफक दराने मिळवून आणलेले फेटे घेऊन विशाल खापरे कमिटीच्या मस्तकावर बांधायला सज्ज झाले. त्यांच्या हातात रात्री उशिरा बसून लिहिलेली सूत्रसंचालन संहिता झळकत होती. खास कार्यक्रमासाठी मागवलेला $२०० चा रेबॅन त्यांचं व्यक्तिमत्व भारदस्त करीत होता. तेवढ्यात मंडळाचे अध्यक्ष अतुल चौधरी आपल्या पिवळ्याजर्द व्हेलोस्टर स्पोर्टस कारमधून आले. गाडीतून बाहेर पडताना त्यांनी सवयीने आपल्या मनगटावरील ६४ गिगाबाईट क्षमतेच्या सॅमसंग कंपनीच्या शहाण्या (पक्षी स्मार्ट) घड्याळाकडे ओझरती नजर टाकली. त्यांच्या चेहऱ्यावर ओल्ड स्पाईस चोपडलेले आहे हे खजिनदार सुजित साठे यांनी आपला पाय मुरगळलेल्या स्थितीत असतानाही ताडले. त्याही परिस्थितीत त्यांनी चौधरींकडे मागील हिशोबाची मागणी केली. चौधरी रात्री उशिरापर्यंत अध्यक्षीय लिहीत बसल्यामुळे थकलेले वाटत होते. "अध्यक्षीय" मधील क्षी ऱ्हस्व की दीर्घ यावर त्यांनी पूर्ण एक तास खर्च केला होता. शेवटी त्यांनी प्रेसिडेंशिअल असा पूर्ण मराठी शब्द वापरायचे ठरवले होते. त्यांना पाहून अजित जगताप आपल्या धी न्यू टेक्सास ड्रायक्लीनर्स कडून कडक ड्रायक्लीन करून आणलेल्या सुरवारीत टुणकन उडी मारून उभे राहिले. आणि वाटेत सुशिल द्रवेकर यांनी भातुकलीतील बुडकुल्यांप्रमाणे ओळीने मांडून ठेवलेले चार शुरे एसएम ५८ आणि दोन सेनहाइजर ई८३५ असे सहा माईक्रोफोन स्टॅंड आणि त्याच्या एक्सएलआर केबल्स शिताफीने ओलांडत फेटा मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या प्रसाद चंद्रात्रे यांच्यापाशी पोचले. वेळ खूप कमी असल्याने चौधरींना आवरण्यासाठी काय योजना आहे अशी त्यांनी विचारणा केली. उत्तरादाखल चंद्रात्रेंनी घरून आणलेले चहाचे स्टीलचे पिंप जगतापांकडे सोपवले. चौधरींचे बोलणे थांबवायचा एकच उपाय आहे असे ते म्हणाले. एका हातात नाबरांनी यशस्वीरीत्या स्वस्तात मिळवलेली मिसळीची प्लेट, दुसऱ्या हातात त्याच दरात बसवलेला चहाचा ग्लास आणि आश्चर्यकारकरीत्या पुन्हा त्याच किंमतीत बसवलेला बटाटेवडा तोंडात दिल्यास चौधरींना साधारणपणे पंधरा मिनिटे थोपवून धरता येईल असे ते म्हणाले.  हे असे होत असताना पूर्णिमा नाबर यांनी प्रचंड वैयक्तिक वेळ खर्च करून घासाघीस करून माणशी फक्त $क्ष (किंमत जाहीर करू नका अशी धमकीवजा सूचना आम्हांस मिळाली असल्याने हा अत्यंत धक्कादायक दर आम्हांस उघड करता येत नाही त्याबद्दल क्षमस्व) अशा अत्यंत वाजवी दरात मिळवलेला तो अल्पोपाहार तिथे घेऊन आले खुद्द सह-खजिनदार अमित अर्काटकर. केटररने अर्काटकरांचे भारदस्त मर्दानी व्यक्तिमत्व पाहून सगळ्या पदार्थांसोबत आपणहून शिराही दिला होता हे पाहून खजिनदार साठे आपण जायबंदी आहोत हे विसरून बाहू पसरून पुढे धावले. ते पाहून अर्काटकरांनाही भरते येऊन त्यांनीही आलिंगनासाठी हात पसरले. परंतु साठे थेट शिऱ्याच्या ट्रेपाशी पोचले आणि त्या पूर्ण ट्रेलाच त्यांनी आलिंगन दिले. ती भरतभेट पाहून मंडळाच्या उपस्थित असलेल्या सर्व म्हणजे वट्ट १२ कमिटी मेंबरांच्या डोळ्यांत पाणी आले. वेळप्रसंगी आपला हा खजिनदार कामासाठी एका पायावर उभा राहू शकतो हे पाहून मावळ्यांची स्वराज्यासाठी दिलेले सर्वस्व पाहून महाराजांना कसे कृतकृत्य वाटत असेल त्याची छोटीशी का होईना अनुभूती प्रत्येकाला आली.

कार्यक्रमाची सुरुवात अतुलानंद चौधरी यांच्या दोन शब्दांनी झाली. चंद्रात्रेंनी दिलेल्या सूचना तंतोतंत पाळत राजश्री वाराणशीवार आणि शामली असनारे यांनी स्ट्रॅटेजिक लोकेशनवर अल्पोपाहाराचे पदार्थ मांडले. त्याकडे अधूनमधून नजर टाकत चौधरींनी बरोबर दोन मिनिटे आणि बारा सेकंदात भाषण संपवले. हे त्यांचे आजवरचे सर्वात कमी वेळेचे भाषण होते असे मंडळाचे ज्येष्ठ सदस्य मिलिंदकाका पंडित यांनी विस्फारलेल्या डोळ्यांनी सांगितले. मिलिंदकाका हे गेली तीस वर्षे मंडळाशी संबंधित असून अनेकांची भाषणे पचवून आजही ताठ उभे आहेत. अतुलानंद चौधरींच्या सहधर्मचारिणी वैदेही चौधरी आणि वैदेही यांची सखी राजश्री वाराणशीवार या दोघांनी त्याला दुजोरा दिला. त्या दोघींनी चौधरींचे भाषणच नव्हे तर त्यांचे गाणेही सहन केले आहे. आजही तशी कठीण वेळ आली की वाराणशीवार,  वैदेही चौधरी यांच्या सांत्वनास जातात आणि त्यांना धीर देतात. वाराणशीवारांना त्यांचे पती कोठे आहेत असे आम्ही विचारले. तर ते देवळात आले आहेत, आणि सवयीमुळे थेट देवळाच्या स्वयंपाकघरात गेले आहेत असे त्यांनी सांगितले. प्रसादाचा स्वयंपाक वगैरे करावयाचा नसला तरी ते तेथे जाऊन उगाच पळी पातेल्यांना हात लावून येतात असे कळले.  आपल्या यजमानांनाही गाण्याबजावण्याचा नाद असल्याचे वाराणशीवारांनी हळूच कबूल केले. ते गातात, मी नको म्हणून बजावते. म्हणून तर ते गाणंबजावणं. "पण काय करणार? आपलं माणूस जसं जसं असतं तसं तसं बदलावं लागतं." असेही त्या म्हणाल्या. शामली असनारे शून्यात नजर लावून अतिशय वाजवी दरात मिळवलेल्या त्या मिसळीचा रस्सा ढवळत होत्या. नाबरांनी ते पातेले उचलून दुसऱ्या टेबलावर ठेवले तरी त्याचे त्यांना भान नव्हते. त्या टेबलावरच डाव फिरवत राहिल्या. न राहवून आम्ही विचारले, "आज शिवबांची आठवण येते आहे ना?" त्यावर त्या म्हणाल्या,"होय हो. आमचे शिवबा लास व्हेगासला मोहिमेवर गेले आहेत. तो प्रांत दुर्गम, बेलाग अशा गडांनी भरलेला आहे. उगाच कुठे एखादा सर करायला जाऊ नका असे बजावले आहे. पण तिकडून आलबेलच्या तोफा झाल्याशिवाय चैन नाही हो पडायची." असे म्हणून त्यांनी किफायतशीर दरात मिळवलेल्या बटाटेवड्याच्या ट्रेमधील एका जास्त तळल्या गेलेल्या बटाटेवड्यावर मायेने हात फिरवला.

अचानक "परतापगडच्या पायथ्याशी खानsssss!" अशी आरोळी कानी पडली. दचकून पाहिले तर अमित अर्काटकरांनी टिपेचा सूर लावला होता. आपल्या गाडीतून अल्पोपाहार कार्यक्रमस्थळी आणताना गाडीत चहा सांडला होता, त्यामुळे त्यांची जी चरफड झाली होती, तिचा त्वेष त्या आवाजात भरला होता. पुढील रांगेत बसलेले काही जण बेसावध होते. ते प्रतिक्षिप्त क्रियेने बसल्याबसल्या फूटभर मागे सरले. नेहमी मेरूपर्वताप्रमाणे खंबीर आणि धीरगंभीर दिसणारे विनायक आगाशेसुद्धा थोडेसे दचकले. पण थोडेसेच. त्यांनी भुवया थोड्या उंचावल्या इतकेच. पोवाड्याच्या सुरुवातीला बिचकलेले लोक हळूहळू सावरले. अफझलखान शामियान्यात येईपर्यंत काहीजण स्फूर्तीने उभेही राहिले होते. जेव्हा वाघनखे खानाच्या पोटात शिरली तेव्हा तर एकदोघेजण खुर्चीवर उभे राहिले आणि घोषणा देऊ लागले होते. जेव्हा ते भानावर आले तेव्हा पोवाडा संपला होता आणि त्यांच्या धर्मपत्न्या त्यांच्याकडे रोखून पाहत होत्या. त्यांच्या नजरेत "हाच आवेश घरची कामे करतानाही दाखवा!" असा भाव होता असे आम्हांस तरी वाटले.

पोवाडा संपतो न संपतो तोच बाहेर ढोलताशाचा कडकडाट झाला. पाहतो तर अमित जोशी आणि हरीश नेहाते हे भारतातून स्वखर्चाने घेऊन आलेले ढोल आणि ताशे घेऊन उभे होते. ढोल अगदी नवे कोरे होते. त्याच्या वादीवर रु. २५०००/- चे लेबल दिमाखात झळकत होते. दोघांनी मिळून स्टिक (रु.१०००/- मात्र प्रत्येकी) ढोलावर हाणून वातावरण दणाणून सोडले. मिरवणुकीसाठी (पुन्हा) पूर्णिमा नाबर यांनी आपल्या घरातून अत्यंत अशी तेजस्वी मुद्रा असलेला २ फूट बाय अडीच फूट अशा साईजचा शिवरायांचा भव्य फोटो आणला होता. त्या फोटोला मुजरा करून देवळाच्या आग्नेय दिशेच्या कोपऱ्यातून मिरवणूक सुरू झाली ती दक्षिणेला साधारण ३०० फुटावर जाऊन पश्चिमेला वळली. तिथून साधारण ५०० फुटापर्यंत जाण्याचे ध्येय गाठायचेच असे मनात बाळगून जोषात मिरवणूक पुढे जाऊ लागली. देवळाच्या साधारण वायव्येला, ध्येयापासून केवळ २० फूट अंतरावर असताना काही तरी फाटल्याचा भीषण आवाज झाला. बहुतेक मावळे सुरवार परिधान करून असल्यामुळे साहजिकच घबराट पसरली. लांब अंगरखा असल्याने अनेकांनी नि:श्वास सोडून इथे तिथे चाचपून खात्री करून घेतली. सुरवारीत काही दगाफटका झाला नसल्याचे बहुतेकांच्या निदर्शनास आले. अधिक तपासाअंती अमित जोशी यांच्या ढोलातून हा आवाज आल्याचे कळले. पाहतो तर ढोलाचे कातडे फाटले होते. काही म्हणा, ढोल फाटला की वाजवणाऱ्याची हवा जाते. ढोल फाटला! ढोल फाटला! असा आरडाओरडा झाला! मावळ्यांची पांगापांग होऊ लागली. जरी तानाजी धारातीर्थी पडला तरी शेलारमामा धावून आला. तसेच झाले, इथे हरीश नेहाते धावून आले आणि म्हणाले,"थांबा! जाता कुठे! माझा हा ढोल अजून शाबूत आहे! फिरा मागे!" आणि जल्लोष झाला. गाड्यांपर्यंत पोचलेले मावळे माघारी आले. मिरवणूक ध्येयाप्रति पोचली. मग निखिल पोटभरे यांनी आपल्या आयफोन सिक्सच्या आलिशान भव्य पडद्यावर पाहून महाराजांचा विजयघोष गूगलला. व्हरायझनचे नेटवर्क असल्यामुळे त्यांना तो लगेच मिळाला. "गणपती… भूपती…. प्रजापती…. सुवर्णरत्न श्रीपती…. अष्टावधान जागृत…." अशी त्यांनी सुरुवात केली. दोन मिनिटे झाली तरी लोकांना "विजय असो!" ची आरोळी मारायची संधी दिसेना. अस्वस्थ होऊन कुणीतरी म्हणाले,"देऊळ बंद होईल हां सात वाजता." पण मग तोवर पोटभरे "श्री छत्रपति शिवाजी महाराजांचाssssss" वर आलेच होते. मग नोंदणीकृत अशा साधारण १३० प्रौढ (अधिकृत आकडा, चू. भू. दे. घे.)  आणि ८० बालकांनी "विजय असोsssss!" ची गगनभेदी आरोळी दिली आणि शिवजयंती संपन्न झाली.

No comments:

Post a Comment