Tuesday, October 20, 2015

क्रांतीचे ओघळ

आयली रे आयली! राजापुरात गंगा आयली. आणि देशात समाजवादी क्रांतीची. इकडे आमच्या वाडीत जास्त नाय पण तीन ओघळ तरी आयले. वाडीत प्रगती आसा बाकी. नाय तर पिक्चर सगळ्या जगान पाव्हन दोन तीन वर्षां झाली की मगे आमच्या गोविंद चित्रमंदिरात येतलो. तसां आता तरी काय होवक नाय. क्रांतीची पैली नसली तरी दुसरी बोंब तरी वाडीतसून पडली ह्यां काय कमी नाय. अाणि एक नाय, तीन तीन बोंबा. फोन आयलो रे आयलो की इकडे पत्रक तयार, परत दिऊचो चेक तयार! (अरे तो चेक भरूच्या आधी माका सांगात रे! बाऊन्स झाल्यार बोंबटी मारत माझ्या खळ्यात नका उभे ऱ्हांव. ज्या बॅंकेचो आसा ती बॅंक तरी आसा की नाय ते त्या रवळनाथाकच म्हायत.) त्या निमित्तान पेपरात वाडीचा नाव तरी येयत. नाय तर वाडी म्हटल्यार लोक म्हणतंत ती लाकडी खेळणी मिळतंत तीच मां? काय काय असतंत तेंका वाडीचे बटर म्हायती. अगदीच कोणी येवन् गेलेलो असलो तर मोती तलावाचां नाव काढतलो. बाकी काय वाडीचां? आता काय तसां नाय. आता देशात म्हायती पडलां की हंयसर पुरोगामी समाजवादी लेखक रंवतत म्हणान. आमच्या खेळण्यांपेक्षा गुळगुळीत आणि तेच्यापेक्षा रंगीत! काय समाजल्यात! वाडी आमची तशी एकदम देखणी. सुंदरवाडी नाव काय असांच पडाक नाय. पण गावाक एक पनवती लागलेली. ती म्हणजे आर एस एस वाल्यांची. रें, आयले खंयसून हे? शाखा भरंवतंत, दसऱ्याक संचलन का काय तां करतंत, होयां कशांक तां संचलन? आमचां धुळवडीचां रोंबाट काय कमी पडलां? रोंबाटाक जावक काय सक्काळी उठूक लागना नाय, खळ घालून चड्डी धुवूक लागना नाय. रोंबाट असतां एक तर संध्याकाळी, तां पण नवटांक नवटांक मारून इल्यावर. तेका गणवेष खंयचो, कपडे पण आॅप्शनल! समाजाच्या इतकी जवळची मिरवणूक खंय आणि खंय तां संचलन. मगे वाडीत समाजवादाची गरज भासूक लागली. माज करून वाद घालूक येतां तो समाजवाद असली सोपी व्याख्या बघितल्यार कोणी पण सामील होतलो. मगे आमका आमचो सूर्य गावलो. कोकणातलो नाय, डायरेक्ट भायरसून हाडलेलो. आमच्या वाडीत सगळीकडे सूर्य गांवतले. माठेवाड्यात एक, सालईवाड्यात एक, राजवाड्याकडे जांवन पाह्यल्यात तर किमान तीनचार सूर्य राजवाड्याच्या कमानीपाशीच गांवतले. सगळे स्वत:च्या प्रकाशात स्वत:चेच डोळे झापडवणारे. पण आमका गावंलो एक सूर्य. सूर्य पण असो की डोक्यार चंद्र असलेलो. कोणी आंबो म्हटल्यान तर हो चिंच म्हणा. कोणी सोयरा केल्यान की हेच्या घरी हो म्हाळ घालतलो. कोणी आरएसएस वाल्यान संचलन काढल्यान की हो सोरो घेवन त्यात धुमशान घालतलो. आमका असोच सूर्य होयो होतो. या सूर्यान आमका दोन शब्द शिकवल्यान - अभिव्यक्ति स्वातंत्र्य. पहिल्यान आमका उच्चार करूक कठीण जाय. मगे आम्ही गुरुजींच्या घरी जावन बसू. माका गुरुजी,"काय रे सांगवीकर, कशाक आयलंय?" असा प्रेमान विचारी. मी आपलो तेंच्या प्रकाशात दिपून जाय. गुर्जीसारख्या मिशा आपल्याकडे कोकणात गावूच्या नायत. तसो चश्मो पण नाय. खास पुण्याक बनवून घेतलंय म्हणान सांगा होते. मी तशे मिशा ठेवचो प्रयत्न केलंय पण बांधावरच्या वाली येयत तशा येवक लागल्यार नाद सोडून दिलंय. 

मगे गुर्जीनी समाजवाद म्हंजे काय ता आमका उलगडून सांगीतल्यानी. आपल्या लेखनाचा, वाचनाचा आणि भाषणाचा स्वातंत्र्य म्हत्वाचा. समाजवाद हो असो वाद आसा की जो संपणारो नाय. समाजार सतत अन्याय होत असता. तो अन्याय करणारे असतंत हे हिंदुत्ववादी. म्हंजे तसा काय ते करीत नायत पण आपण म्हणूचा तसां. नाय तर वाद कसो घालूक मिळतलो? आरएसएस म्हणजे हिंदुत्ववाद, हिंदुत्ववाद म्हणजे आरएसएस. आमी म्हटलां, ओ आमी तर हिंदूच मां? तर बोलले, हां! आता कसो बोललंय? हिंदू असून हिंदुत्वाक विरोध ह्यां समाजवादी माणसाचां काम. मगे सांगूक गांवता, तुमी माझ्या हेतूविषयी संशय घेताच कसो? मी धर्माच्या पलीकडे पोचलंय. माका माणूस हो धर्म म्हत्वाचो वाटतां. म्हणान तर हिंदू असानसुद्धा मी हिंदू विचारांक विरोध करतंय. लक्षात ठेय, तुका लेखक होवचा आसा तर मानवधर्म, मनुवाद, आरएसएसचो डाव, अल्पसंख्यांकांची गळचेपी, अभिव्यक्ति स्वातंत्र्य हे असले शब्द बोलूक आणि लिहूक येवक होये. तुमचा लेखन काय तां करा, पण समाजवादी नसल्यात तर तुमचा लेखन सकस नाय. तुम्ही संवेदनशील लेखक नाय. तेका पुरस्कार काय भेटूचो नाय. तां ऐकून आमची ट्यूब काय ती पेटली. सगळा बिढार कांय तां एकदम समाजला.

मगे एक आमका संधी गावली. आमच्या गावात आरएसएसचो प्रादुर्भाव जोरात होतो. गावात आमच्या लेखक खूप. आमच्यासारखे सकस नाय, दिवसां कॉलेजात दोन तास शिकवूचां आणि मगे अक्खो दिवस उरलेलो तेंका. लेखक होवक लागतां काय? भरपूर फुकटचो वेळ, नाय? "आरती" मासिकात लिहिणारे असे रिकामे लेखक खूप. मी बरेच दिवस म्हणा होतंय या आरतीची एकदा आरती काढूक होयी. मी जे जे म्हणान पाठंयतंय सगळा साभार परत करतंत. सामाजिक आशयाचा तुमकां काय्येक नको आणि हिंदुत्ववादी लेखन मात्र पहिल्या पानार? मी एकदा सावतांक बोललंय तर माका म्हणतां,"तू काय लिहितंय ता तुका तरी समाजतां काय रें?" मी बोललंय तेका, रें सावतां, मराठीचो शिक्षक झालंय म्हणान तू लगेच समीक्षक झालंय काय रें? माझा लेखन तुका समाजना नाय कारण ता पुरोगामी आसा. प्रस्थापित समाजाविरोधी लेखन म्हणजे पुरोगामी. तर जळ्ळो माका म्हणता, "प्रस्थापित समाजविरोधी नको, नको असलेल्या प्रस्थापित रूढीविरोधी लिहा. समाज एकजिनसी कसा होईल त्यावर लिहा. नुसता हिंदूविरोध म्हणजे पुरोगामी नव्हे." आवशीक खांव! हेका काय कळता? हो सातवीच्या मुलांक मराठी शिकवतां. मी धावीच्या मुलांका शिकयतंय. हो माका शिकवतलो? गुर्जींक फोन लावलंय. गुर्जी बोलले,"बरां केलंय. असोच पुरोगामी रंव. हिंदुत्ववाल्यांका विरोध करूकच होयो. कशाक म्हणून कोणी इचारलां तर त्याका माझ्याकडे धाडून दे. बगतंय त्याका मी. नुकतांच लिहिलेलां पुस्तक आसां, बरां पाच किलोचा झालाहा, मारतंय डोक्यात तेच्या!" मी म्हटलां, "गुर्जी, खंयचां हो नवीन पुस्तक ह्यां?" माका बोलले,"या हिंदुत्वाची अडगळ खूप झालीहा. म्हणान लिहून टाकलंय. काय पुरस्कार बिरस्कार दिल्यानी तर दिल्यानी, पण चांगला जड झालाहा बाकी. प्रकाशकाक नाय अक्कल. इतके प्रती काढतात? सह्या करून देऊन थकलंय. उरलेल्या प्रती अडगळीत पडल्या मरे. त्याच हेंच्या डोक्यात मारूक उपयोगी पडतले." गुर्जींनीच प्रोत्साहन दिल्यार बरां वाटलां. मगे पांदीत दडून रंवलंय. कोण तरी येतलो हिंदुत्व डोक्यावर घेवंन, मगे बगतंय. 

तसो एक चान्स आयलोच. आरती मासिकानच चान्स दिल्यान. पु.भा. भावेवर लेख! म्हटलां बरो गांवलो हो लेखक. चौकशी केलंय तर समाजला लेखक संघाचो. मगे तर फुलटॉसच घावलो. फोन केलंय आरतीच्या संपादकाक. माझो फोन म्हटल्यार पहिलो म्हणता कसो,"काय हो आमचा टपाल मिळूक नाय की काय? रजिस्टर्ड पोष्टान पाठंयलेला आसा." असो राग आयलो. मी म्हटलंय,"शिरां पडली तुमच्या मासिकार ती. होया कोणाक तां? मी फोन केलंय तो तुमका इशारो देण्यासाठी!" माका म्हणता,"आता या वयात तुम्ही माका कसले इशारे करतात?" मी सरळ सांगितलंय,"तुम्ही ज्यां काय छापून हाडतासात मां, ता पुरोगामी चळवळीक काय पसंत नाय. काय समाजल्यात? हो जो कोण संघाचो लेखक तुम्ही हाडल्यात, आणि तो जो काय हिंदुत्ववादी लिवता, तां बंद होऊक होया. नाय तर परिणाम बरो होवचो नाय." तर माका म्हणता,"पुरोगामी चळवळवाले तुमी, तुमी लेखन स्वातंत्र्य, वाचन स्वातंत्र्य यासाठी लढता ना? मग हेका विरोध कशाक? त्यांचोपण हक्क नाय लिवायचो?" मी म्हटलंय,"तां माका काय सांगू नुकात. एक सांगतंय, ह्यां लेखन बंद झाला नाय, तर आमी पुरोगामी तुमच्या अंकाची होळी करतलो. मगे माका सांगू नकात." तर नालायक माका म्हणतां कसो,"ज्यां काय करायचा तां अंक इकत घेवन करां म्हणजे झालां. आत्ताच वर्षाची वर्गणी विकत घेवन ठेयल्यात तर सस्त्यात पडतलां." मी भडकान म्हटलंय,"पर्वा नाय हो, माझो सगळो पगार घालीन. अशी किती असतली तुमची वर्गणी?" बोलतां,"एक अंक पंधरा रुपये, वार्षिक वर्गणी दीडशे रुपये. आता तुमी होळीच करण्याचा मनावर घेतलां तर, जरा बरीशी होळी करा. दहा अंक तरी पायजेत नाय? वाचन मंदिरासमोर होळी केल्यात तर निदान कॉलेजच्या किनाऱ्यावरून तरी लोकांक दिसाक होयी नाय?" मी फोन खाली ठेवन दिलंय. गुर्जींचां बरां आसा. त्यांच्या खिशातून काय जाणां नाय. पंधरा रुपयांत कोळंबीचो चांगलो एवढो वाटो येतां. विचार करत होतंय. एक गोष्ट गुरुजींक विचारूक होयी. आपणाक जसा लिहिण्याचा स्वातंत्र्य होया, तसांच हिंदुत्ववाद्यांनी म्हटलां तर? दुसऱ्या दिवशी फोन करून विचारलंय तसां. तर माका बोलले,"प्रश्न बरो आसा. अरे हां, तुका एक सांगूचा रंवला. तुझ्या पुस्तकाक पुरस्काराची शिफारस केलंय. मुंबयक गेल्लंय काल. फिल्डिंग लावून इलंय. फुडल्या म्हैन्यात डिक्लेअर करतले. " मी तर भारावंन गेलंय. काय बोलूक सुचाक नाय. "गुर्जी! तुमची कृपा!" इतक्याच बोललंय. मगे माका म्हणाले,"तुझ्या प्रश्नाचा उत्तर गांवलां मां?" मी म्हटलंय,"खंयचो प्रश्न हो?"

No comments:

Post a Comment