Thursday, October 1, 2015

इंडियाविरोधाचे छुपे प्रोफाईल

सध्या काही बुद्धिवंत मंडळी डिजिटल इंडिया बद्दल प्रश्न विचारू लागली आहेत. इतके दिवस ही मंडळी निवांत स्वत:च्या कुरणात चरत होती, स्वत:शी हळूच हंबरत, कुणी बघत नसल्याची चाहूल घेऊन शेपटीने आपल्याच पार्श्वभागावरील माश्या हाकलीत होती. आत्ममग्न होती. भारतामध्ये बदल घडत आहेत याची क्वचित दखल घेत होती, बरेचसे दुर्लक्ष करीत होती. अचानक या मंडळींच्या शेपटाला कुणी तरी फटाक्यांची माळ लावून पेटवल्याप्रमाणे झाले आहे. दुगाण्या झाडत ही मंडळी आता शिवारात धावत आहेत. दिसेल त्याला पुढे असेल तर शिंगावर घेत आहेत, मागे असेल तर लाथा झाडत आहेत. त्यांचा प्रश्न एकच - अरे माठ्यांनो, डिजिटल इंडिया म्हणजे काय हे माहीत नसताना उगाच प्रोफाईल पिक्चर बदलून काय होणार? सगळी मेंढरे लेकाची. एकाने बदलले, झाले, लागले सगळे बदलायला. असो. काही असतीलही मेंढरे. पण जनजागरण झालेच की नाही? झोपी गेलेले हे बुद्धिवंत लोक जागे झाले. "डिजिटल इंडिया" असे गूगल करू लागले की नाही? ई-गव्हर्नन्स म्हणजे काय, मोदींनी त्यावर भर का दिला आहे हे तरी त्यांना कळले असेल की नाही? सरकारी सोयी जर ऑनलाईन उपलब्ध झाल्या तर भ्रष्ट बाबूंना जरा आळा बसेल. रोगाच्या निर्मूलनाबरोबर तो मुळातच होणार नाही याची सोय केली तर ते जास्त परिणामकारक नव्हे काय? आणि ही फक्त एक बाजू. इतरही फायदे आहेत.

दुसरा एक समज असा की डिजिटल इंडिया म्हणजे फास्ट इंटरनेट, सॉफ्टवेअर कंपन्यांची चंगळ, इकडे बळिराजाची हेळसांड, गरिबाच्या तोंडची भाकरी गायब. हा गैरसमज आहे. जलयुक्त शिवार योजना दिसली नाही, प्रत्येक नागरिकासाठी उघडलेले बचत खाते दिसत नाही, पण मोदींनी गुंतवणूक आणण्याची गोष्ट केली की लगेच बळिराजा मृत्यूपंथाला लागतो, गरिबाची लक्तरे दिसू लागतात. डिजिटलायझेशन कशाला हवं? त्याने नोकऱ्या जातात. बदल अटळ असतो. काही पिढ्यांपूर्वी आपण धान्य दळायला घरी जाते वापरत होतो. चटणी वाटायला पाटा वरवंटा वापरत होतो. जाते, पाटे वरवंटे बनवणारी वेगळी जमात होती. बेलदार म्हणायचे त्यांना. पुढे पिठे तयार मिळू लागली, मिक्सर आले. हे बेलदार लोक कुठे गेले कळले पण नाही. त्यांच्या नावाने कुणी रडले नाही, मिक्सर का आणले म्हणून कॉंग्रेसच्या नावाने कुणी खडे फोडले नाहीत, आंदोलने झाली नाहीत. त्यांच्या पुनर्वसनाबद्दल कुणी मोर्चे काढले नाहीत. स्वत: बेलदार लोक सुद्धा प्रथम बेरोजगार झाले, गरिबीची झळ लागून कदाचित हलाखीत मरणही पावले असतील. पण लवचिकता हा मनुष्याचा स्वभावधर्म आहे. पुढली पिढी शहाणी झाली, इतर उद्योगधंद्यांकडे वळली. थोडक्यात मिक्सर आले म्हणून जगणं थांबलं नाही किंवा मिक्सर वापरू नका असा प्रचार झाला नाही. सध्या तशीच परिस्थिती आहे. संपूर्ण जग डिजिटल होत आहे. ते कुठं चाललं आहे हे ओळखून आपण बदललो नाही तर नुकसान आपलंच आहे. अमेरिका एके काळी शेतीप्रधानच देश होता. कापूस, गहू, मका, तंबाखू यावर दक्षिणेतील आणि उत्तरेतील राज्ये अवलंबून होती. पुढे अमेरिका प्रगतशील झाली, यंत्रयुग आले, त्यानंतर संगणकयुग आले. त्यानुसार शेतकरी बदलला. रडत बसण्यापेक्षा नवीन तंत्रांचा वापर करून घेऊन जास्त पीक मिळवायला शिकला. सुदैवाने नागरिकही भारतातील नागरिकांप्रमाणे वैचारिक मैथुनवाले नसल्यामुळे त्यांनी गळे वगैरे न काढता प्रगतीस वाव दिला. हे भारतात का होऊ शकत नाही? प्रत्यके चांगल्या गोष्टीला "हा हिंदुत्ववाद्यांचा कावा आहे", "हा समाजवाद्यांचा डाव आहे" असलं बोललंच पाहिजे का? बरं हे बोलणं नुसतंच बरं. प्रत्यक्ष काही करण्याची वेळ आली की "अरे नाही रे, एकही सिक लीव्ह शिल्लक नाहीये" ही कारणं देणारे हे महात्मे.

काही काही वेळा असं वाटतं की याच लोकांना भारताची प्रगती नको आहे की काय? गरिबी राहिली नाही तर गळे काढून कशावर लिहायचे आणि सरकारला धारेवर धरण्यासाठी कुठले मुद्दे आणायचे? एकीकडे एक तो संत टोपीवाल आहे जो सत्तेवर बसून घंटा हलवतो आहे, दुसरीकडे हे मोदीविरोधक आहेत हे घंटा हलवत केवळ ठणाणा करीत आहेत. नकर्त्याचे कर्तृत्व हे. त्याला उत्तर देण्याचीही गरज नाही, पण दिले पाहिजे. कारण चूक असेल तर चूक म्हटले नाही तर ती मोठी चूक. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो.

थोडक्यात, आमचे प्रोफाईल बदलून काय होणार असा प्रश्न ज्या थोर बुद्धिवंतांनी केला आहे, त्यांच्या प्रश्नातच त्याचे उत्तर आहे. झोपी गेलेला जागा झाला आहे. आता फक्त तो फक्त दुगाण्या झाडून पुन्हा झोपी जातो की काही दिवस शेताला निदान खत तरी पुरवतो ते पहायचे. असो. बाकी ही मंडळी आमच्या प्रोफाईलकडे अशा बारीक नजरेने पाहत असतात ही जाणीव सुखद की काळजी वाढवणारी हा विचार सध्या आम्ही करत आहोत.

No comments:

Post a Comment