Thursday, October 29, 2015

फि.टे. इन्स्टिट्यूटचे चाळे

फिटेइइं असलं काही तरी नाव असलेली संस्था म्हणजेच फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट इंडिया आणि ती खुद्द आमच्याच थेट बुडाखालीच वसलेली आहे याचा आम्हाला पत्ताच नव्हता. अर्थात आमचे बूड पूर्ण डेक्कन जिमखाना व्यापेल एवढे मोठे नाही आणि फिटेइइंसुद्धा एवढी छोटी संस्था नाही हे आम्ही खात्रीलायकरीत्या सांगू शकतो. "साहेब, जरा मोठ्या पन्ह्याचे कापड पहा" ही आमचे टेलर निळूभाऊ (प्रोप्रा. डीलक्स टेलर्स, आम्ही चक्क शिवाशिव पाळतो) यांची नम्र सूचना हे आमच्या प्रशस्त बुडाचे द्योतक नसून, निळूभौंच्या दूरगामी दृष्टीचे उदाहरण आहे. वर्षाकाठी आमचा घेरा एक इंच वाढतो असे त्यांचे म्हणणे आहे. हे असेच चालू राहिले तर वयाच्या पन्नाशीपर्यंत घेर मोजण्यासाठी इंच संपून फूट चालू होतील असा प्रेमळ इशाराही अधूनमधून ते देत असतात. असो. आम्ही हनुमान टेकडीवर अनेक वेळा फिरायला जात असतो. टेकडीवरून फिटेइइंचा बोर्ड पण कदाचित पाहिला असेल, पण तिथे फिल्म वगैरे बनवण्याचे शिक्षण मिळत असते असे काही कानावर आले नव्हते. नाही म्हणायला अधून मधून काही दाढी वाढवलेली, कळकट कपडे परिधान केलेली तरुण पोरे दिसायची. ती एक तर सिगारेटी फुंकत असायची किंवा रात्रीची उतरण्याची वाट पाहत शून्यात नजर लावून बसलेली असायची. अचानक एक दिवस ही मंडळी आंदोलन वगैरे करताहेत वगैरे कानावर येऊ लागले. आम्ही कॉलेजात असताना एक दोन दिवसांच्या कॉमन ऑफच्या पलीकडे आमचे आंदोलन जात नसे. ही मंडळी तर नेहमीच कॉलेजच्या बाहेर असायची, मग आंदोलन कशासाठी? तर म्हणे संस्थेचे चेअरमन म्हणून गजेंद्रसिंह हे नको होते. गजेंद्र सिंह! हाच तो इसम ज्याने यक्षाच्या "पृथ्वीपेक्षा जड काय आहे?" या प्रश्नाला "माता" असे उत्तर दिले होते. त्यानंतर त्याची खरी आई "मेल्या! माझे वजन काढतोस?" असे म्हणून लाटणे घेऊन त्याच्या मागे लागली होती असे ऐकले होते. बाकीच्या आयांनीही मोर्चे बिर्चे काढले असतील तर माहीत नाही. थोडक्यात खरे बोलण्याच्या हव्यासामुळेच हा इसम वादग्रस्त ठरला आहे. खरे बोलण्यामुळे कुणाचे भले झाले आहे? आताही असंच काही तरी केलं असणार आणि ही फिटेइइंची पोरे खवळली असणार. विद्यार्थ्यांना कॉलेजबद्दल एवढी आपुलकी काय अशीच निर्माण होते? मास्तर म्हणतील त्याच्या विरुद्ध करायचे हे नैसर्गिकच आहे. तास चुकवू नका , वेळच्या वेळी अभ्यास करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोरानंहो ही फिल्म इन्स्टिट्यूट आहे काही तरी ओरिजिनल करा जीटी मारू नका, असं काही तरी हे युधिष्ठिरमहाराज म्हणाले असणार. तिथंच ही कौरवांची सेना घायाळ झाली असणार. भ्राता युधिष्ठिर, हवं तर हवं तर आपण भिकार सावकार खेळू पण नियम बियम नका हो पाळायला लावू.

इथे विद्यार्थ्यांचे खरे दु:ख काय होते?  संस्थेच्या अध्यक्षांची निवड हा एवढा संवेदनशील मुद्दा का झाला असेल? आणि तो आताच का? ही स्वत:ला सर्जनशील वगैरे समजणारी मुले (मुले कसली तीस तीस वर्षांचे बाप्येही आहेत त्यांत) कुठले तरी अगम्य विदेशी समांतर चित्रपट पाहण्याचे होमवर्क सोडून घरचा ड्रामा करण्यात का रंगली असतील बरे? गजेंद्रसिंह यांचे कर्तृत्व युधिष्ठिराची ती भूमिका यापलीकडे नाही म्हणून? कॉलेजच्या चेअरमनच्या बौद्धिक कर्तृत्वावर विद्यार्थ्यांचे कर्तृत्व आणि बुद्धिमत्ता तयार होत असतील तर अनेक शिक्षणसम्राटांच्या पावसाळी अळंबीसारख्या निघालेल्या कॉलेजमधून केवळ दरोडेखोर, चोर, पाकीटमार, चारित्र्यहीन असेच विद्यार्थी बाहेर पडायला हवेत. आम्हाला तर कॉलेजचे पहिले वर्ष संपेपर्यंत प्रिन्सिपॉल कोण आहेत तेच कळले नव्हते. बरेच दिवस एक इसम कॉरिडॉर मधून रोज सकाळी राउंड मारत असल्याच्या थाटात जाताना आम्ही पाहत असू. त्याच्या रुबाबावरून हेच ते प्रिन्सिपॉल असे आम्ही ठरवले होते. मग त्यांना आम्ही अदबीने "गुड मॉर्निंग सर" घालत असू. तेही न हसता "गुड मॉर्निंग" म्हणून पुढे जात. एकदा तर आमचा फ्लुईड मेक्यानिक्सच्या तासाला ते मागे येऊन बसले. सरांनीही मान तुकवून त्यांची दखल घेतली. पूर्ण वर्गात शांतता. ती पंचेचाळीस मिनिटे जणू पंचेचाळीस तास वाटले होते. पुढे मग प्रत्येक फ्लुईड मेक्यानिक्सच्या तासाला ते येऊन बसू लागले. मग मात्र त्यांची अडचण होऊ लागली. प्रेझेंटी देऊन मागच्या दाराने सटकणारे आम्ही. नेमके मागच्या दारापाशीच हे बसू लागले होते. मग आम्ही झक मारत पूर्ण तास बसू लागलो होतो. आमच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर असा थेट हल्ला झाल्याने आमची गोची झाली होती. मग आम्ही आंदोलन करण्याचे ठरवले. आंदोलनाचे स्वरूप काय असावे यावर चर्चा झाली. कुठल्याच तासाला न बसण्याचा ठराव मी मांडला आणि तो तात्काळ पारित झाला. प्रचंड उत्साहाने आम्ही आंदोलनाला सुरुवात केली. आसपासच्या गावातून शिकायला आलेले, होस्टेलवर राहणारे लगेच आपापल्या गावाला पळाले. आम्ही स्थानिक विद्यार्थी रोज घरी बोंब नको म्हणून कॉलेजला येत असू पण समोर विलिंग्डन कॉलेजच्या परिसरात आमच्या कॉलेजात नावालाही न आढळणारी हिरवळ पाहत हिंडत असू. आम्ही कुणीच वर्गात हजर राहत नाही हे पाहून प्रिन्सिपॉल अस्वस्थ झाले असतील याची आम्हाला खात्री होती. असेच तीनचार दिवस झाल्यावर काय परिस्थिती आहे ते पाहायला आम्ही काही जण कॉलेजात गेलो. मुळीच कुणी अस्वस्थ वगैरे नव्हते. सर्वत्र इतर तास नीट चालू होते. आमच्या वर्गाकडे जाऊन पाहिले तर आमच्या वर्गात तास सुरू होता आणि प्रिन्सिपॉल तसेच मागच्या बाकावर बसले होते. मग मात्र आम्ही सरांनाच थेट गाठले. आणि त्यांना स्वच्छ सांगितले. "सर, तुमच्या कदाचित लक्षात आलं नसेल, गेली चार दिवस आमचा संप चालू आहे." सर म्हणाले," हो का? अरे वा! आधी तरी सांगायचं मीही तास घ्यायला आलो नसतो. सकाळी या तासानंतर एकदम दुपारी दोन वाजता तास असतो मला. बरं, ठीक चाललाय ना तुमचा संप?" असं म्हणून ते चालू लागले. आम्ही गडबडून त्यांच्या मागे धावलो,"सर! अहो थांबा! आमच्या मागण्या काय आहेत हे कुणीच विचारलं नाही!" त्यावर ते म्हणाले,"अरे संप करताहात हे कुणाला माहीत असलं तर विचारणार ना? बरं काय मागण्या आहेत? प्रेझेंटी ऑप्शनल होणार नाही. तुमच्या आधीच्या कित्येक ब्याचेसनी ती मागणी करून झालेली आहे." आम्ही व्यथित झालो. मुळात तेच दु:ख होते. पण ते दु:ख तसेच दाबून सरांना म्हणालो," सर, ते ठीक आहे. पण हे प्रिन्सिपॉलसर नेहमी तासाला येऊन बसू लागले आहेत. आमची वैयक्तिक गळचेपी होते आहे. वर्गात आम्हाला आमच्या भावना मुक्तपणे व्यक्त करता येत नाहीत. हे कधी थांबणार?" सर थोडेसे चमकले. म्हणाले,"प्रिन्सिपॉल आणि वर्गात? कधी आले होते? आणि मला कसे दिसले नाहीत?" "सर, बास का? आमचीच चेष्टा करता? सगळ्यात मागच्या बाकावर दाराजवळ बसतात ते कोण मग?" सर खो खो हसू लागले. आम्ही जरा संतापलोच. एकतर गळचेपी, त्यावर हास्य? हा लोकशाहीचा अपमान आहे. वगैरे वगैरे विचार मनात येऊ लागले. तेवढ्यात सर म्हणाले,"वत्सांनो, ते प्रिन्सिपॉल नव्हेत. ते आहेत आपल्या कॉलेजचे सीनीयरमोस्ट विद्यार्थी, ऑनरेबल श्रीयुत बाळासाहेब कोरे उर्फ बाळ्या. गेली सात वर्षे फी भरताहेत. फ्लुईड मेक्यानिक्सवर त्यांचा जीव आहे म्हणून तो विषय त्यांना सोडवत नाही. एटीकेटीवर जगताहेत." असं म्हणून तो हसून हसून डोळ्यांत आलेलं पाणी पुसत निघून गेले.  आमचं आंदोलन तिथेच विसर्जित झालं. पुढे बुडलेले तास घेण्यासाठी प्रिन्सिपॉलसाहेबांच्या केबिनबाहेर आठवडाभर धरणे धरून बसलो होतो.

तेव्हा कॉलेजचे चेअरमन कोण, प्रिन्सिपॉल कोण, शिपाई कोण यावर शिक्षण ठरत नाही. घोड्याला पाण्यापाशी नेणे हे कॉलेजचे काम. ते पाणी पिणे हे घोड्याचे काम. उगाच नाही आई आमची "एवढा मोठा घोडा झालायस" अशा शब्दांत संभावना करीत असे. विद्यार्थी ज्या शिक्षकांच्या थेट संपर्कात असतात त्या शिक्षकांचा प्रभाव विद्यार्थ्याच्या जडणघडणीवर नक्की पडतो. अशा शिक्षकांचा आग्रह धरला असता तरी ते एक वेळ समजू शकले असते. पण तेही तसे फारसे बरोबर झाले नसते. कारण इथे गजेंद्रसिंहांच्या कर्तृत्वाचा मुद्दा करत आंदोलन केले गेले. पूर्वीच्या दिग्गजांची नावे घेऊन त्यांच्या तुलनेत गजेंद्रसिंह म्हणजे कोणीच नाहीत असे दाखवले गेले. अनुपम खेर सारख्या नटाने भर टीव्हीवर त्यांचा अपमान केला. अनुपम खेर यांनी तो अपमान करावा याचे हसू आले. हा नट सुरुवातीला "सारांश" सारख्या चित्रपटात गंभीर व्यक्तिरेखा करून पुढे बहुतेक सगळ्या चित्रपटांत अक्षरश: मर्कटलीला करीत जगला. "लम्हें" या चित्रपटात या इसमाने जे काही चाळे केले आहेत ते अभिनय या सदरात मोडत असतील, तसला अभिनय शिकवू नये म्हणून आंदोलन करायला हवे. तेव्हा, अभिनयाविषयी प्रेम बाळगून जर पोटतिडिकेने जर हा इसम या वादात पडला असेल तर त्याने आधी आपण पोट भरण्यासाठी किती तडजोडी केल्या हे पाहावे आणि जरा थंड घ्यावे. आधीच्या चेअरमनमध्ये  श्याम बेनेगल, सईद अख्तर मिर्झा वगैरे लोकांची नावे घेतली जातात, गजेंद्रसिंहांची त्यांच्याशी तुलना केली जाते. आता बेनेगल मोठे नाव आहे, पण व्यावसायिकदृष्ट्या कितपत मोठे झाले ते? अनुपम खेरनेही  त्यांच्या सिनेमापेक्षा इतर व्यावसायिक सिनेमे जास्त केले की नाही? चेअरमनचे काम आहे प्रशासनाचे. केंद्र सरकारच्या अनुदानाने ही संस्था चालते. त्यांची नेमणूक मान्य व्हायला हवी. श्याम बेनेगल चेअरमन होते म्हणून त्यावेळी विद्यार्थ्यांतून बेनेगल निर्माण झाले नाहीत किंवा यू. आर. अनंतमूर्ती होते म्हणून विद्यार्थ्यांची गुणवत्ता ढासळली नाही.

हे आंदोलन असो, किंवा सध्या चाललेला पुरस्कार-परत करण्याचा फार्स असो, यात एक प्रकारची एकसूत्रता जाणवते. अशी आंदोलने आधी झाली नाहीत. मुद्दे तसेच होते, पण लेखकांना पुरस्कार परत करावेसे वाटले नाहीत. त्यावेळी त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर कुणी घाले घालत नव्हते. शिखांचे शिरकाण झाले तेव्हा त्यांची संवेदनशीलता बधीर  होती, पण व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित असल्यामुळे पुरस्कार कपाटात चमकत होते आणि पुरस्काराची रक्कम ब्यांकेत व्याज मिळवत होती. तेवढ्यात मोदी सरकार आले आणि या व्यंकटांची खळी सांडली. आता सर्वत्र व्यक्तिस्वातंत्र्याची मुस्कटदाबी दिसू लागली, सरकार उद्दाम वाटू लागले, मनमानी करणारे वाटू लागले, लोकशाही तिरडीवर बांधली गेली. थोडक्यात कॉंग्रेस लोकांना जे लोकशाहीचे फसवे वातावरण देऊन त्या पांघरुणाखाली जे काही "सरकाय लो खटिया जाडा लगे" करत होती ते या लोकांना बरे वाटत होते. आता स्वच्छ प्रशासन, शिस्त, गंभीरपणा, आचरटपणा करण्याला प्रोत्साहन नाही या गोष्टी मग लोकशाहीवर घाला वाटू लागल्या आहेत. कॉलेजमध्ये ड्रग्ज नको, सिगारेटी नकोत, दारू नको या गोष्टी आल्या की व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी वाटू लागली. सर्व स्तरावर, सर्व आघाड्यांवर मोदीविरोध हेच सूत्र यातून दिसून येते, मग यांच्या मागचा बोलविता धनी कोण आहे हे ओळखायला वेळ लागत नाही. जेव्हा विद्यार्थी आम्हाला चांगले प्रिन्सिपॉल पाहिजेत म्हणून आंदोलन करताना दिसतात तेव्हा ते खरे विद्यार्थी नाहीत हे कुणीही खरा विद्यार्थी (आजी किंवा माजी) ओळखेल.

खरं तर या विद्यार्थ्यांना फिल्म बनवण्याचा अप्रतिम धडा मिळाला. उगाच कुठला तरी "खंडहर" टाईप चित्रपट काढून निर्मात्याचे दिवाळे वाजवण्यापेक्षा, एकता कपूरसारखं कच्या बाराखडीचे कौटुंबिक ड्रामे करून टीआरपी वाढवणे खिशाला बरे पडते. फिटेइईंच्या विद्यार्थ्यांच्या या चाळ्याला ड्रामा एवढेच नाव देता येईल. मोदींनी या ड्राम्याला भीक घातली नाही हेच बरे झाले. ते घालणार नव्हतेच. लोकशाहीचा दुरुपयोग करणाऱ्या लोकांना हेच उत्तर बरे. 

Tuesday, October 20, 2015

क्रांतीचे ओघळ

आयली रे आयली! राजापुरात गंगा आयली. आणि देशात समाजवादी क्रांतीची. इकडे आमच्या वाडीत जास्त नाय पण तीन ओघळ तरी आयले. वाडीत प्रगती आसा बाकी. नाय तर पिक्चर सगळ्या जगान पाव्हन दोन तीन वर्षां झाली की मगे आमच्या गोविंद चित्रमंदिरात येतलो. तसां आता तरी काय होवक नाय. क्रांतीची पैली नसली तरी दुसरी बोंब तरी वाडीतसून पडली ह्यां काय कमी नाय. अाणि एक नाय, तीन तीन बोंबा. फोन आयलो रे आयलो की इकडे पत्रक तयार, परत दिऊचो चेक तयार! (अरे तो चेक भरूच्या आधी माका सांगात रे! बाऊन्स झाल्यार बोंबटी मारत माझ्या खळ्यात नका उभे ऱ्हांव. ज्या बॅंकेचो आसा ती बॅंक तरी आसा की नाय ते त्या रवळनाथाकच म्हायत.) त्या निमित्तान पेपरात वाडीचा नाव तरी येयत. नाय तर वाडी म्हटल्यार लोक म्हणतंत ती लाकडी खेळणी मिळतंत तीच मां? काय काय असतंत तेंका वाडीचे बटर म्हायती. अगदीच कोणी येवन् गेलेलो असलो तर मोती तलावाचां नाव काढतलो. बाकी काय वाडीचां? आता काय तसां नाय. आता देशात म्हायती पडलां की हंयसर पुरोगामी समाजवादी लेखक रंवतत म्हणान. आमच्या खेळण्यांपेक्षा गुळगुळीत आणि तेच्यापेक्षा रंगीत! काय समाजल्यात! वाडी आमची तशी एकदम देखणी. सुंदरवाडी नाव काय असांच पडाक नाय. पण गावाक एक पनवती लागलेली. ती म्हणजे आर एस एस वाल्यांची. रें, आयले खंयसून हे? शाखा भरंवतंत, दसऱ्याक संचलन का काय तां करतंत, होयां कशांक तां संचलन? आमचां धुळवडीचां रोंबाट काय कमी पडलां? रोंबाटाक जावक काय सक्काळी उठूक लागना नाय, खळ घालून चड्डी धुवूक लागना नाय. रोंबाट असतां एक तर संध्याकाळी, तां पण नवटांक नवटांक मारून इल्यावर. तेका गणवेष खंयचो, कपडे पण आॅप्शनल! समाजाच्या इतकी जवळची मिरवणूक खंय आणि खंय तां संचलन. मगे वाडीत समाजवादाची गरज भासूक लागली. माज करून वाद घालूक येतां तो समाजवाद असली सोपी व्याख्या बघितल्यार कोणी पण सामील होतलो. मगे आमका आमचो सूर्य गावलो. कोकणातलो नाय, डायरेक्ट भायरसून हाडलेलो. आमच्या वाडीत सगळीकडे सूर्य गांवतले. माठेवाड्यात एक, सालईवाड्यात एक, राजवाड्याकडे जांवन पाह्यल्यात तर किमान तीनचार सूर्य राजवाड्याच्या कमानीपाशीच गांवतले. सगळे स्वत:च्या प्रकाशात स्वत:चेच डोळे झापडवणारे. पण आमका गावंलो एक सूर्य. सूर्य पण असो की डोक्यार चंद्र असलेलो. कोणी आंबो म्हटल्यान तर हो चिंच म्हणा. कोणी सोयरा केल्यान की हेच्या घरी हो म्हाळ घालतलो. कोणी आरएसएस वाल्यान संचलन काढल्यान की हो सोरो घेवन त्यात धुमशान घालतलो. आमका असोच सूर्य होयो होतो. या सूर्यान आमका दोन शब्द शिकवल्यान - अभिव्यक्ति स्वातंत्र्य. पहिल्यान आमका उच्चार करूक कठीण जाय. मगे आम्ही गुरुजींच्या घरी जावन बसू. माका गुरुजी,"काय रे सांगवीकर, कशाक आयलंय?" असा प्रेमान विचारी. मी आपलो तेंच्या प्रकाशात दिपून जाय. गुर्जीसारख्या मिशा आपल्याकडे कोकणात गावूच्या नायत. तसो चश्मो पण नाय. खास पुण्याक बनवून घेतलंय म्हणान सांगा होते. मी तशे मिशा ठेवचो प्रयत्न केलंय पण बांधावरच्या वाली येयत तशा येवक लागल्यार नाद सोडून दिलंय. 

मगे गुर्जीनी समाजवाद म्हंजे काय ता आमका उलगडून सांगीतल्यानी. आपल्या लेखनाचा, वाचनाचा आणि भाषणाचा स्वातंत्र्य म्हत्वाचा. समाजवाद हो असो वाद आसा की जो संपणारो नाय. समाजार सतत अन्याय होत असता. तो अन्याय करणारे असतंत हे हिंदुत्ववादी. म्हंजे तसा काय ते करीत नायत पण आपण म्हणूचा तसां. नाय तर वाद कसो घालूक मिळतलो? आरएसएस म्हणजे हिंदुत्ववाद, हिंदुत्ववाद म्हणजे आरएसएस. आमी म्हटलां, ओ आमी तर हिंदूच मां? तर बोलले, हां! आता कसो बोललंय? हिंदू असून हिंदुत्वाक विरोध ह्यां समाजवादी माणसाचां काम. मगे सांगूक गांवता, तुमी माझ्या हेतूविषयी संशय घेताच कसो? मी धर्माच्या पलीकडे पोचलंय. माका माणूस हो धर्म म्हत्वाचो वाटतां. म्हणान तर हिंदू असानसुद्धा मी हिंदू विचारांक विरोध करतंय. लक्षात ठेय, तुका लेखक होवचा आसा तर मानवधर्म, मनुवाद, आरएसएसचो डाव, अल्पसंख्यांकांची गळचेपी, अभिव्यक्ति स्वातंत्र्य हे असले शब्द बोलूक आणि लिहूक येवक होये. तुमचा लेखन काय तां करा, पण समाजवादी नसल्यात तर तुमचा लेखन सकस नाय. तुम्ही संवेदनशील लेखक नाय. तेका पुरस्कार काय भेटूचो नाय. तां ऐकून आमची ट्यूब काय ती पेटली. सगळा बिढार कांय तां एकदम समाजला.

मगे एक आमका संधी गावली. आमच्या गावात आरएसएसचो प्रादुर्भाव जोरात होतो. गावात आमच्या लेखक खूप. आमच्यासारखे सकस नाय, दिवसां कॉलेजात दोन तास शिकवूचां आणि मगे अक्खो दिवस उरलेलो तेंका. लेखक होवक लागतां काय? भरपूर फुकटचो वेळ, नाय? "आरती" मासिकात लिहिणारे असे रिकामे लेखक खूप. मी बरेच दिवस म्हणा होतंय या आरतीची एकदा आरती काढूक होयी. मी जे जे म्हणान पाठंयतंय सगळा साभार परत करतंत. सामाजिक आशयाचा तुमकां काय्येक नको आणि हिंदुत्ववादी लेखन मात्र पहिल्या पानार? मी एकदा सावतांक बोललंय तर माका म्हणतां,"तू काय लिहितंय ता तुका तरी समाजतां काय रें?" मी बोललंय तेका, रें सावतां, मराठीचो शिक्षक झालंय म्हणान तू लगेच समीक्षक झालंय काय रें? माझा लेखन तुका समाजना नाय कारण ता पुरोगामी आसा. प्रस्थापित समाजाविरोधी लेखन म्हणजे पुरोगामी. तर जळ्ळो माका म्हणता, "प्रस्थापित समाजविरोधी नको, नको असलेल्या प्रस्थापित रूढीविरोधी लिहा. समाज एकजिनसी कसा होईल त्यावर लिहा. नुसता हिंदूविरोध म्हणजे पुरोगामी नव्हे." आवशीक खांव! हेका काय कळता? हो सातवीच्या मुलांक मराठी शिकवतां. मी धावीच्या मुलांका शिकयतंय. हो माका शिकवतलो? गुर्जींक फोन लावलंय. गुर्जी बोलले,"बरां केलंय. असोच पुरोगामी रंव. हिंदुत्ववाल्यांका विरोध करूकच होयो. कशाक म्हणून कोणी इचारलां तर त्याका माझ्याकडे धाडून दे. बगतंय त्याका मी. नुकतांच लिहिलेलां पुस्तक आसां, बरां पाच किलोचा झालाहा, मारतंय डोक्यात तेच्या!" मी म्हटलां, "गुर्जी, खंयचां हो नवीन पुस्तक ह्यां?" माका बोलले,"या हिंदुत्वाची अडगळ खूप झालीहा. म्हणान लिहून टाकलंय. काय पुरस्कार बिरस्कार दिल्यानी तर दिल्यानी, पण चांगला जड झालाहा बाकी. प्रकाशकाक नाय अक्कल. इतके प्रती काढतात? सह्या करून देऊन थकलंय. उरलेल्या प्रती अडगळीत पडल्या मरे. त्याच हेंच्या डोक्यात मारूक उपयोगी पडतले." गुर्जींनीच प्रोत्साहन दिल्यार बरां वाटलां. मगे पांदीत दडून रंवलंय. कोण तरी येतलो हिंदुत्व डोक्यावर घेवंन, मगे बगतंय. 

तसो एक चान्स आयलोच. आरती मासिकानच चान्स दिल्यान. पु.भा. भावेवर लेख! म्हटलां बरो गांवलो हो लेखक. चौकशी केलंय तर समाजला लेखक संघाचो. मगे तर फुलटॉसच घावलो. फोन केलंय आरतीच्या संपादकाक. माझो फोन म्हटल्यार पहिलो म्हणता कसो,"काय हो आमचा टपाल मिळूक नाय की काय? रजिस्टर्ड पोष्टान पाठंयलेला आसा." असो राग आयलो. मी म्हटलंय,"शिरां पडली तुमच्या मासिकार ती. होया कोणाक तां? मी फोन केलंय तो तुमका इशारो देण्यासाठी!" माका म्हणता,"आता या वयात तुम्ही माका कसले इशारे करतात?" मी सरळ सांगितलंय,"तुम्ही ज्यां काय छापून हाडतासात मां, ता पुरोगामी चळवळीक काय पसंत नाय. काय समाजल्यात? हो जो कोण संघाचो लेखक तुम्ही हाडल्यात, आणि तो जो काय हिंदुत्ववादी लिवता, तां बंद होऊक होया. नाय तर परिणाम बरो होवचो नाय." तर माका म्हणता,"पुरोगामी चळवळवाले तुमी, तुमी लेखन स्वातंत्र्य, वाचन स्वातंत्र्य यासाठी लढता ना? मग हेका विरोध कशाक? त्यांचोपण हक्क नाय लिवायचो?" मी म्हटलंय,"तां माका काय सांगू नुकात. एक सांगतंय, ह्यां लेखन बंद झाला नाय, तर आमी पुरोगामी तुमच्या अंकाची होळी करतलो. मगे माका सांगू नकात." तर नालायक माका म्हणतां कसो,"ज्यां काय करायचा तां अंक इकत घेवन करां म्हणजे झालां. आत्ताच वर्षाची वर्गणी विकत घेवन ठेयल्यात तर सस्त्यात पडतलां." मी भडकान म्हटलंय,"पर्वा नाय हो, माझो सगळो पगार घालीन. अशी किती असतली तुमची वर्गणी?" बोलतां,"एक अंक पंधरा रुपये, वार्षिक वर्गणी दीडशे रुपये. आता तुमी होळीच करण्याचा मनावर घेतलां तर, जरा बरीशी होळी करा. दहा अंक तरी पायजेत नाय? वाचन मंदिरासमोर होळी केल्यात तर निदान कॉलेजच्या किनाऱ्यावरून तरी लोकांक दिसाक होयी नाय?" मी फोन खाली ठेवन दिलंय. गुर्जींचां बरां आसा. त्यांच्या खिशातून काय जाणां नाय. पंधरा रुपयांत कोळंबीचो चांगलो एवढो वाटो येतां. विचार करत होतंय. एक गोष्ट गुरुजींक विचारूक होयी. आपणाक जसा लिहिण्याचा स्वातंत्र्य होया, तसांच हिंदुत्ववाद्यांनी म्हटलां तर? दुसऱ्या दिवशी फोन करून विचारलंय तसां. तर माका बोलले,"प्रश्न बरो आसा. अरे हां, तुका एक सांगूचा रंवला. तुझ्या पुस्तकाक पुरस्काराची शिफारस केलंय. मुंबयक गेल्लंय काल. फिल्डिंग लावून इलंय. फुडल्या म्हैन्यात डिक्लेअर करतले. " मी तर भारावंन गेलंय. काय बोलूक सुचाक नाय. "गुर्जी! तुमची कृपा!" इतक्याच बोललंय. मगे माका म्हणाले,"तुझ्या प्रश्नाचा उत्तर गांवलां मां?" मी म्हटलंय,"खंयचो प्रश्न हो?"

Thursday, October 15, 2015

कथा एका विद्रोहाची

समाजातील बदलाची चाहूल प्रथम साहित्यिकांना लागते असे ऐकले होते. कुठे खुट्ट झाले तरी एक तरी लेखन कामाठी येरू त्यावर हजार शब्द खरडतो. आता सोशल मीडियाने तर माकडाच्या हाती कोलीत दिल्याप्रमाणे जो तो लेखक बनला आहे तो भाग वेगळा. आम्ही कॉपी पेस्ट वाल्यांना लेखकांच्या गणतीत धरत नाही. लेखक म्हणजे "दिसामाजि काही तरी खरडावे, ओरडावे अन्यथा रडावे, पण ते स्वत:चे असावे" या समर्थांच्या आदेशाचे (मूळ आदेशात थोडासा कालानुरूप बदल आम्ही आमच्या अखत्यारीत केला आहे) पालन करणारे. विद्रोही साहित्यिकांना हे लागू नाही. ते त्यांच्या कंपूप्रमुखाकडून जसे आदेश येईल त्याप्रमाणे लेखन करतात. तिथे द्रोह चालत नाही. केला तर पुरस्काराला, सत्काराला मुकावे लागते. पुन्हा विद्रोही म्हणवून घ्यायला भटाब्राम्हणांविरोधी किमान तीन हजार शब्दांचा लेख अथवा तीस ओळींची कविता यापैकी एक लिहून भालचंद्रचरणी अर्पण करावे लागते आणि नंदीप्रमाणे खूर दुमडून त्या शंकरापुढे बसावे लागते. तिथे विद्रोह चालत नाही.

असेच आमचे एक मित्र विद्रोही साहित्यिक आहेत. कोकणातले आहेत. त्यामुळे मुंबईला जाऊन चाकरमानीपणा करत विद्रोहीपणाचीही धुरा सांभाळत आहेत. एकदा असेच ते त्यांची विद्रोही कविता वाचून दाखवत असताना त्यांच्या शरीरातील विद्रोही रक्त तापले होते आणि त्यामुळे आवाज उंचावत चिरकत होता. तो चिरकलेला आवाज शिगेला पोचला असताना त्यांच्या ऑफिसातून साहेबाचा फोन आला होता. साहित्यिकांनी खर्डेघाशी करताना कुठल्या तरी ब्यालंस शीट मध्ये बराच विद्रोह दाखवला होता म्हणून साहेबांनी त्यांच्या पगारात क्रांती होण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे त्यांनी तत्काळ "हो साहेब, लगेच येतो" असे अ-विद्रोही विधान करीत कवितेचे भेंडोळे गुंडाळले होते. ते अधूनमधून आम्हाला अशा विद्रोही कविता वाचायला देत असतात. परवाच घेऊन आले होते संध्याकाळी संध्याकाळी. म्हणजे, त्यांची कविता. मी आणि मोरू सुखदु:खाच्या गोष्टी करत बसलो होतो. दिवाळीच्या बोनसची चर्चा करीत होतो. बोनस मिळाला की अष्टविनायक यात्रा करण्याचे योजत होतो. त्यात हे आले. आमची चर्चा ऐकून त्यांनी "हं:! अष्टविनायक!" असा उद्गार काढला. "अहो, जग कुठं चाललं आहे, आणि तुम्ही कुठं!" इति विद्रोही. मी आणि मोरूने एकमेकाकडे पाहिले. आता जग आम्हाला सोडून आणि आम्हाला नकळत कुठे चालले होते बरे? नाही म्हणायला पहिल्या मजल्यावरच्या जोगांचे वडील मागच्या महिन्यात जग सोडून गेले होते, पण ते एकटेच गेले होते, जग आहे तसेच राहिले होते. मी तसे म्हणाल्यावर विद्रोही उखडले,"करा, नेहमी चेष्टा करा. एकदा क्रांती सुरू झाली म्हणजे मग कुठं जाल?" आम्हाला काही कळेना. मग मीच म्हटलं, "नवी कविता केली आहे वाटतं?" तसे ते खूष झाले. पण आनंद दाखवणे हे विद्रोहात बसत नसल्यामुळे मख्ख चेहऱ्याने ते म्हणाले,"कविता केली जात नाही. ती होत असते. वेदना ती प्रसवते. निर्मितीची आदिवेदना काय आहे हे तुला कळणार नाही. प्रथम सूक्ष्म जाणीव, मग अस्वस्थपणा, मग तो विस्फोटक कोंडमारा, ते अभिव्यक्तिचे स्वातंत्र्य नसल्याने वेदना तशीच सहन करणे, आणि मग शेवटी असह्य होऊन कुणाची पर्वा न करता शब्द भळभळा वाहत बाहेर येणे…" इथे विद्रोहींची नजर शून्यात लागली. मोरू म्हणाला,"हे मला नेहमी सकाळी होते. आमच्या मजल्यावर पाच बिऱ्हाडांत मिळून एक शौचकूप आहे. या सगळ्या अवस्थांतून मी रोज जातो." विद्रोही खिन्नपणे म्हणाले,"जाऊद्या मोरोपंत, पांढरपेशी समाजात वावरणारे तुम्ही. तुम्ही बसा पाडगावकरांच्या कविता वाचत." मग भानावर येऊन म्हणाले,"बरं, ऐका माझी नवीन कविता. लंच टाईममध्ये झाली. कवितेचे नाव आहे मढे!"

सरणावर ते जळते
मढे प्रथा परंपरांचे
इथे उभा मी निस्संग
मनात लाडू दहाव्याचे

वाटते आता मोडावेच
हे बंध पावित्र्याचे
फेकावे दूर साखळदंड
पायातील नात्यागोत्यांचे

धुमसत्या या राखेतून
फुटतील कोवळे कोंब
विद्रोहाचे खत त्याला
अन पाणी असंतोषाचे

आणि ते अपेक्षेने आमच्याकडे पाहू लागले. तशी मोरू म्हणाला,"अरे तुला लाडूच पाहिजेत तर दहाव्याच्या लाडवाची अभद्र आशा कशाला? वहिनी चांगले तुपावर परतलेल्या रव्याचे करून नाही का देणार?" त्यावर विद्रोही भडकून म्हणाले,"हेच! हेच ते साखळदंड! हेच ते पांढरपेशी मुळमुळीत जगणे. कसली मूल्ये आणि कसली नीती? कसल्या भद्राभद्रतेच्या तुमच्या भटी संकल्पना! सगळं मोडून तोडून टाकलं पाहिजे. सध्याच्या श्रद्धा मोडीत काढल्या पाहिजेत, आदर वगैरे वाटत असलेल्या गोष्टी फेकून दिल्या पाहिजेत!" त्यावर मोरूने निरागसतेने विचारले,"आणि त्यानंतर?" मग विद्रोही आणखी भडकून म्हणाले,"त्यानंतर? म्हणजे काय? हे काय विचारणं झालं? त्यानंतर नवीन व्यवस्था, नवीन आदराची स्थाने! अभिव्यक्ती स्वातंत्र्य! माणूस माणसाला माणूस म्हणून भेटणार! त्यासाठी सर्व प्रस्थापित मूल्ये फेकून देणे आवश्यक आहे!" पूर्वीच्याच त्या निरागसतेने मोरू म्हणाला,"सगळी म्हणजे सगळी मूल्ये?" चेव चढून विद्रोही गरजले,"होय! सग्ग्ळी! संपूर्ण क्रांतीच आता मानवतेला तारू शकेल. इन्किलाब झिंदाबाद!" तेवढ्यात आमच्या हिने चहा आणला. चहा पाहून विद्रोहींनी इन्किलाब स्थगित केला आणि "वा! अगदी वेळेवर चहा!" असं म्हणत डोळे बंद करून चहाचे फुरके मारू लागले. मोरूने विचारले,"काय रे बुवा, या तुझ्या विद्रोही कल्पना वहिनींना ठाऊक आहेत काय?" त्यावर सटपटून विद्रोही कवी म्हणाले,"बाबा रे मला अजून जगायचंय. माणसानं घरात प्रवेश करताना आपल्या जाहीर भूमिका भिजलेली छत्री दाराबाहेर बादलीत उलटी करून ठेवतो तशा बाहेर ठेवाव्यात. बरं केलंस आठवण केलीस. तुझ्या वहिनीनं ऑफिसातून येताना नारळ आणायला सांगितले होते. नवरात्र बसतंय उद्या. बराय, चलतो. वहिनी, ही विचारत होती हळदीकुंकवाचा कार्यक्रम कधी ठेवता आहात?" असे म्हणून ती विद्रोही चळवळ स्वत:च्या घरी गेली. दोन मिनिटांत ते परत येताना दिसले. म्हटलं पुन्हा कवितेची "कळ" आलेली दिसते. घरी पोहोचेपर्यंत दम धरवला नसता म्हणून माझ्याकडे कागद मागायला आले असावेत. लहानपणापासून कागदावर "करायची" त्यांची सवय गेलेली नव्हती. असा विचार करतो तो ते जवळ आले. मुद्रेवर खुदाई खिन्नता होती. ते मोरोबांना म्हणाले,"मोऱ्या, आम्ही विद्रोही तर आहोतच, पण पुरोगामी जास्त आहोत. तेव्हा आमच्या कलत्रासमोर आमचा उल्लेख पुरोगामी साहित्यिक असा केलास तर बरे होईल. विद्रोह वगैरे शब्द तिला कळत नाहीत. उगाच मी तिच्याशी द्रोह वगैरे करतो आहे अशी कल्पना होईल तिची. बराय चलतो. आठच्या आत घरी पोचलं नाही तर कारणे दाखवा नोटीस मिळते."

तस्मात त्या चाहुलीबिहुलीचे म्हणाल तर आम्हाला त्याचे फारसे कवतिक नाही. गाढवदेखील पाऊस पडायचा असला की आडोसा शोधून उभे राहते. पण पावसामुळे आपले जगणे अशक्य झाले आहे, जीव खुरात धरून जगतो आहोत अशा खिंकाळ्या ते मारीत नाही. थोडक्यात पुरोगामी साहित्यिकांमुळे आमचा गाढवाप्रति असलेला आदर दुणावला आहे. वाईटातून चांगले निघते ते असे.

Monday, October 12, 2015

बेगडी धर्मनिरपेक्षता

हल्ली घडणाऱ्या सगळ्या वाईट गोष्टींना मोदी जबाबदार आहेत असे मानून "हेच का ते अच्छे दिन?" असे उपहासाने विचारले जात आहे. त्या लोकांनी एवढे तरी मान्य करावे की असे विचारण्यासाठी अडुसष्ट  वर्षांत वाजपेयींचा अपवाद वगळता एकही पंतप्रधान तुम्हाला मिळाला नव्हता. कॉंग्रेसच्या राजवटीत आला दिन गेला एवढेच समाधान होते. भविष्याची चिंता करायचा प्रश्नच नव्हता. काही बदलेल असं वाटण्याची परिस्थितीच नव्हती. मोदी प्रत्येकाची मानसिकता बदलू शकणार नाहीत. ते तुम्हाला संधी देऊ शकतात आणि देतही आहेत. तरीही हिंदूंच्या सहिष्णुतेमुळे माजलेले काही तथाकथित बुद्धिवंत राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन मोदींवर चिखलफेक करीत आहेत. 

बटाट्याची भाजी खाऊन तुंदिलतनूवर हात फिरवत सोफ्यावर पहुडलेल्या तथाकथित बुद्धिवंतांनो, तुम्हाला सर्वधर्मसमावेशकता या शब्दाचा अर्थ तरी कळतो आहे का? समावेश कशात करून घ्यायचा? राष्ट्रीय प्रवाहात? राष्ट्रीय प्रवाह तरी काय आहे तुमचा? भारताच्या घटनेत सामावून घेणे, त्यांना मतदानाचा अधिकार असणे, सरकारी संस्थांवर खटला दाखल करण्याचा अधिकार असणे, हवा तो कायदेशीर व्यवसाय करणे, स्वत:ला पटेल त्या धर्माचे पालन करणे, अभिव्यक्ति स्वातंत्र्य असणे हेच ना? यातले कुणाला काय मिळाले नाही आहे? तुम्ही मारे त्यांना हे सगळे द्याल. पण ते तुमचा राष्ट्रवाद मानत आहेत काय? धर्माने सांगितले तसे लग्न, धर्माने सांगितले तसा एकतर्फी घटस्फोट आणि धर्माने सांगितले तसा "काफिर" लोकांचा वध हेच शेवटी त्यांना जास्त प्रिय आहे ना? समान नागरी कायदा आणि धर्मनिरपेक्षता त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करा. तुमच्या धर्मनिरपेक्षतेच्या कल्पनेला त्यांनी तुमच्या योग्य त्या ठिकाणी घातले आहे. एक दोन फुटकळ उदाहरणे देऊन आमच्या तोंडाला पाने पुसू नका. काही राजकारणीच तसे करीत आहेत वगैरे मूर्ख विधानेही करू नका. ठीक आहे एक वेळा मानू की काही राजकारणीच फक्त तसे करीत आहेत. पण मग त्यांना खड्यासारखे बाजूला करण्याची क्षमताही त्यांच्या मागे उभे असलेल्या निष्कलंक, पापभीरु, गरीब अशा त्या लोकांमध्ये आहे. त्यांनी केले आहे का तसे? बरं, त्यांनी न करो, धर्मनिरपेक्षतेचा झेंडा तुम्ही घेतला आहे, मग तुमची तरी थोबाडे त्यांच्या विरोधात उचकटत आहेत का?  तो अधमोत्तम ओवेसी आणि आझम खान जी काही वक्तव्ये करताहेत ती देशद्रोहापेक्षा काही कमी नाहीत. त्यांना जोवर तुम्ही विरोध करीत नाही तोवर तुमच्या सर्वधर्मसमभावाची किंमत शून्य आहे. तुम्हाला राष्ट्र प्रथम वाटत नाही तर धर्म वाटतो आहे. असे जर असेल तर हे सूर्याजी पिसाळाच्या अवलादीचे सर्वधर्मसमभावीसुद्धा देशद्रोही ठरतात. सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता ही मंदिरांत, हिंदू लोकांच्या घरात जाऊन त्यांना शिकवण्याची गरज नाही. ती तिथे गेली हजारो वर्षे आहे. किंबहुना ती अस्तित्वात आहे म्हणून तर अस्तनीतले निखारे, पायातले साप, दुतोंडी किरडू आणि या सर्वांवर कडी करणारे हे खोटे धर्मनिरपेक्षतावादी सुखाने जगत आहेत. माझे या बेगडी बुद्धिवंतांना आव्हान आहे, एकदा हा तुमचा सर्वधर्मसमभाव महंमद अली रोडवर जाऊन शिकवा. तुमच्या भेजाचा फ्राय त्याच दिवशी तिथल्या हॉटेलात विकायला ठेवलेला असेल याची खात्री आहे.

आता अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणून कित्येक वर्षे उपभोगलेले पुरस्कार परत करणे असेल, तर खुशाल करा. त्या परत करण्याला काहीही अर्थ नाही. शिखांच्या कतली झाल्या, काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या त्यांना देशोधडीला लावले, केरळमध्ये संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, तेव्हा हेच लोक बाप मेल्याप्रमाणे निपचीत पडले होते. जणू त्या हत्या म्हणजे धर्मनिरपेक्षतेने दिलेल्या स्वातंत्र्याच्या अखत्यारीत झाल्या होत्या.  स्वच्छ जिहाद पुकारून दहशतवादी हल्ले झाले की म्हणायचं दहशतवादाला धर्म नसतो. अरे मग दीड दमडीच्या लेखनकामाठ्यांनो, खोट्या आरोपाखाली हिंदूना अडकवून त्याला मात्र भगवा दहशतवाद म्हणायचं? असली बेगडी धर्मनिरपेक्षता काय कामाची? सत्तर टक्के जनतेच्या भावनांची किंमत जर होत नसेल तर ती लोकशाही नाही हे या टिनपाट साहित्यिकांनी ध्यानात घ्यावे. आजवर लोकशाहीचा अर्थ वाटेल ते भकणे, तोंडाला येतील ते आरोप करणे, अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणून काही वाट्टेल ते लिहिणे अथवा चितारणे असा लावला गेला आहे. असल्या अमर्याद स्वातंत्र्याचा फायदा कुणी करून घेतला? युरोपमध्ये आज आपण त्याची फळे पाहत आहोत. असल्याच सर्वधर्मसमभावाची आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्याची किंमत चार्ली हेब्दोवरील हल्ल्याच्या रूपात द्यावी लागली. काही वाट चुकलेल्या लोकांच्या कर्माची फळे त्यांच्या समधर्मीयांनी का भोगायची असा विचार सर्वांनी केला. पण हे लक्षात घ्या की काही मोजक्या समधर्मीयांनी त्या घटनेचा निषेध केला. मग ज्यांनी निषेध केला नाही त्यांचा हल्ल्याला छुपा पाठिंबाच होता असे म्हणायचे का? जिथे जिथे हे अतिसहिष्णू वातावरण आहे तिथे आज ही समस्या आहे. भारत तर त्याचे नंदनवन आहे. शेजारी केवळ आपल्या द्वेषावर निर्मिती झालेला देश आहे, तो सतत दहशतवादी हल्ले घडवून आणतो आहे, तरीही आपण निर्लज्जपणे दहशतवादाला धर्म नसतो म्हणतो, त्या देशाच्या कलाकारांना आलिंगन देतो. कलेला सीमारेषा नसतात अशी षंढ विधाने करून त्याचे समर्थन करतो. त्याचेही राजकारण करतो. ती फशिवसेना तर अगदी आव आणून त्याला विरोध करते आणि मागील गल्लीतून हळूच जाऊन तो राहत फतेह अली खान की आणि कुणी मसण्याच्या मैफिलीला जाऊन बसते. फशिवसेनेला केवळ विरोधाला विरोध म्हणून भाजप त्या कसुरीच्या पुस्तकाचे उद्घाटन घडवून आणते. सगळेच नालायक.

तेव्हा खुशाल परत करा तुमचे पुरस्कार. पुरस्कार तुमच्या लिखाणाला होता. लेखनाचा आणि वैयक्तिक शुचितेचा फारसा संबंध नसतो हेच यावरून सिद्ध होते. आपण खूप बुद्धिवादी आहोत, बुद्धिजीवी आहोत, अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणजे आपला श्वास आहे, मी हिंदू असलो वा नसलो तरी मला सर्व धर्म सारखे, हे असं वाटण्याचीही एक झिंग असते. ती नशा दारू, गांजा, अफू यांच्यापेक्षा प्रभावी असते. त्या नशेत केलेले हे कृत्य आहे असे मी समजतो. पण मी म्हणतो नुसता पुरस्कारच परत करून का थांबता? भावना जर एवढ्याच तीव्र असतील तर प्राणत्याग वगैरेही करायला काय हरकत आहे? सर्वधर्मसमभाव दाखवण्याची ती एक संधी किंवा अंतिम किंमत असे समजा हवं तर. एरवी नारळ नासका निघाला म्हणून दुकानदाराला परत करतो एवढेच त्याचे स्वरूप.

Wednesday, October 7, 2015

ते उनाड वाचनाचे दिवस

पुस्तकांचं वेड म्हणा व्यसन म्हणा लहानपणी ज्याला लागलं ते आयुष्यभर राहिलं. जे समोर आलं ते कसलाही विचार न करता वाचून काढलं. विचार करण्याचं वय तरी कुठं होतं म्हणा. अक्षरश: "डोळ्यांचे रोग" ते सावरकरांची "सोनेरी पाने" अशी सगळी पुस्तकं समोर होती. ती एकाच निर्विकारतेने वाचली. निर्विकारतेने अशा अर्थाने की पाटी कोरी होती. कुठल्याही पुस्तकाने अजून संस्कार वा कुसंस्कार दिलेले नव्हते. कुठलेही विकार न जडता केली कृती म्हणजे निर्विकारपणे म्हणायला हवी. घरी भरपूर पुस्तके, गावातील श्रीराम वाचनमंदिरातून घरी आलेली पुस्तके असं सगळं वातावरण होतं. टीव्ही ही संकल्पनाच माहीत नसल्यामुळे अज्ञानात सुख होतं. टीव्हीचा शोध जगात लागला असला तरी आमच्या गावात यायला अजून बक्कळ वर्षं होती. साधा महाराष्ट्र टाईम्स दोन दिवस उशिरा येई तिथे तंत्रज्ञान वगैरे लांबचीच गोष्ट. रामायण चित्रपटही आमच्या गावात लागेपर्यंत सीताहरण, रावणदहन होऊन लवकुश चांगले गायला वगैरे लागले होते. रेडिओ फक्त सकाळी सातच्या बातम्या ऐकण्यापुरता. रोज सकाळी "संप्रति वार्ता: श्रुयन्ताम, प्रवाचक: बलदेवानंद सागर:" झाल्यानंतर तो बलदेवानंद दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत बातम्यांचे खिळे जुळवत "राम रामौ रामा:" करत बसतो असं मला वाटायचं. इंटरनेट नव्हतं, स्मार्ट फोन्स नव्हते. दिवसभर उनाडून केवळ नाईलाजाने घरी आल्यावर मग जेवायचं आणि तडक झोपायचं अशी साधी सरळ दिनचर्या असे. पुस्तक वाचायला कधी सुरुवात झाली ते आठवत नाही. पण जेवतानाही पुस्तक शेजारी यायला लागलं. आई वैतागून म्हणायची,"ठेव ते बाजूला! जेवताना घास नाकात गेला तरी कळायचं नाही!" तरीही मी हट्टानं पुस्तक घेऊनच बसायचो. त्यावेळेला वाटायचं, आयला या देवांचं बरं आहे चारचार आठआठ हात, पुस्तक एका हातात धरायचं, दुसऱ्या हातानं पानं उलटायची, तिसऱ्या हातानं जेवायचं, चौथ्यानं पाण्याचं भांडं तोंडाशी लावायचं. रावणबिवण  तर त्या काळात मल्टीप्रोसेसर, मल्टी थ्रेडिंग, पॅरलल प्रोसेसिंग असलेला. एकाच वेळेला धा पुस्तकं वाचू शकला असता. असो. मुद्दा असा की पुस्तकं वाचायची गोडी लागली.

सगळ्यात प्रथम जर काही चांगलं, अर्थात त्या वयानुसार चांगलं, वाचलेलं आठवतं ते किशोर मासिक. अत्यंत सहज, सरळ कथा, त्याला जोड अप्रतिम चित्रांची. गोष्टी तर सुंदर असतच, पण कविताही अप्रतिम असत. एक कविता अजूनही आठवते. कवितेचं नाव "समंध"! संपूर्ण कविता आठवत नाही पण पहिल्या ओळी पक्क्या डोक्यात बसल्या आहेत. "कोण आले कोण आले, दार आपोआप हाले." शेजारी नागोबाचा टाय गळ्यात असलेल्या समंधाचं विनोदी चित्र होतं. किशोरच्या जोडीला नाव घेतलंच पाहिजे ते चांदोबाचं. चांदोबाच्या आठवणी मात्र आहेत त्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या. उन्हाळ्याची सुट्टी लागली की सांगलीच्या घराचे वेध लागायचे. आज्जी आजोबा तर असायचेच. त्याहीपेक्षा ओढ असायची ती आत्तेभावंडांची. एकत्र कुटुंब ते. आत्याचेही बिऱ्हाड आमच्याच वाड्यात होते. आत्त्याचे यजमान, दादा, हे कडक शिस्तीचे होते. सर्व कुटुंब त्यांच्या दराऱ्यात वावरायचे. सकाळी दहा वाजता जेवण करून साडेदहा वाजता ऑफिसला जाण्यासाठी ते बाहेर पडायचे. ते बाहेर पडले रे पडले की जणू कर्फ्यू उठायचा. आत्त्या मोकळेपणे बोलायची, तिची मुले दंगा करू लागायची. थोडक्यात आम्हाला रान मोकळे मिळायचे. या कडक दादांचे काही पैलू मात्र काहीसे स्वभावाला साजेसे नव्हते. एक म्हणजे त्यांना पत्ते खेळायला आवडत, तेही आम्हां मुलांबरोबर. दुसरा पैलू म्हणजे त्यांना "चांदोबा" चे व्यसन होते. होय व्यसनच. त्यामुळे चांदोबाचा रतीब घरात होता. पण एक आम्हा मुलांना काही चांदोबा लगेच मिळत नसे. कारण जसे दादांना चांदोबाचे व्यसन होते तसेच माझ्या आजोबांनाही होते. त्यामुळे नवीन अंक आला की मानाच्या गणपतीप्रमाणे पहिला मान आमच्या आजोबांचा.ते दोन तीन दिवस लावत. मग तो जायचा दादांच्या ताब्यात. ते चांगले तीनचार दिवस आमचा अंत पाहत. मग तो अंक ते आमच्या आत्त्याकडे "रीलीज" करत. मग काय, आम्ही सगळी भावंडे तुटून पडत असू. सगळ्यांनाच तो हवा असे. मग त्यातल्या त्यात दोन ग्रुप होत. पहिला ग्रुप सामूहिक वाचन करे. मग दुसरा ग्रुप वाचे. दुसरा ग्रुप अर्थातच प्रत्येकाच्या त्याच्याहून लहान भाऊ बहिणींचा असे. मग पुढे मी एक माझ्यापुरता तोडगा काढला होता. मी नवीन अंकाच्या मागे लागतच नसे. जुन्या अंकांची पेटी काढून त्यातील जुने अंक वाचत बसे. नवा अंक सगळ्यांनी वाचून झाला की तो अक्षरश: कुठे तरी बेवारशासारखा मिळे. मग तो मी सावकाश वाचत बसे.

त्या काळात काय अशक्य साहित्य वाचलं गेलं, आज आठवलं की हसायला येतं. अर्थात, हसणं साहित्याला नाही, पण माझ्या रुचिला किंवा त्याकाळी कसलीच रुचि नसण्याला. आई वाचनालयातून कुमुदिनी रांगणेकर, बाबा कदम यांच्यासारख्या लेखकांच्या कादंबऱ्या आणायची. बाबा कदमांच्या कादंबऱ्या म्हणजे कमीत कमी तीनशे पानाचा ठोकळा असे. त्यात संग्राम, दीनानाथ असल्या भरभक्कम नावाची मंडळी असत. बारा बोअरची बंदूक तर हवीच. सुरुवातीला मी उत्साहाने त्यांच्या कादंबऱ्या वाचत असे. नंतर असे लक्षात आहे की पहिली दोन पाने, नंतर साधारण शंभर ते एकशेदहा पाने आणि शेवटची दोन तीन पाने वाचली तरी चालतात. त्या साक्षात्कारानंतर कदमांची पुस्तके मी केवळ मटणाचा रस्सा, पांढरा रस्सा, कोल्हापुरी बाज यांच्यासाठी वाचली. तिकडे कुमुदिनी रांगणेकरांची एक खास शैली होती. एखादी कॉलेजमध्ये जाणारी अल्लड, अवखळ, जराशी फाजील लाडिक मुलगी जसा संवाद साधेल तशा त्या वाचकांशी संवाद साधत. इतक्या बायकी शैलीचं लिखाण मी पुन्हा पाहिलं नाही. सगळ्या कादंबऱ्या नायिकाप्रधान पण नायकाभोवती फिरणाऱ्या. नायकाच्या उगाच फुरंगटून बोलण्याला उद्देशून "तो वतवतला", "तो फुतफुतला" वगैरे शब्द वाचले की मी हसून गडबडा लोळायचो. आईला "आई कस्सली अशक्य पुस्तकं वाचतेस तू!" असं म्हणून चिडवायचो. या बाईंनी "स्कार्लेट पिम्पर्नेल" नावाची एक इंग्लिश कथेची अनुवाद असणारी कादंबरी लिहिली आहे. आमच्या मातोश्री एकदा ते अदभुत रसायन वाचनालयातून घेऊन आल्या. म्हटलं अनुवाद आहे, फार काही लाजायला मुरकायला फुतफुतायला वाव मिळणार नाही. म्हणून हातात घेतलं. पण नाही! राजा विक्रमादित्यानं जसा आपला हट्ट सोडला नाही तसा कुमुदिनी बाईंनीही सोडला नव्हता. त्यांनी सर पर्सी या शूर नायकाचा उल्लेख लडिवाळपणे  "असा कसा बाई अचपळ मेला, प्रिय माझा स्कार्लेट पिम्पर्नेल्या" असल्या देहांतशासनाच्या लायकीच्या काव्यओळीने केला आणि मी ते पुस्तक मिटले. झोरो, बॅटमॅन यांच्या पंक्तीत बसू शकणारा तो मर्दानी पुरुष, त्याचा "स्कार्लेट पिम्पर्नेल्या" अशा  सलगीच्या उल्लेखाने कुमुदिनी बाईंनी त्याचा एका क्षणात "टेकाडे भाऊजी" (होय तेच ते, मीनावहिनींच्या "प्रपंचा"त लुडबूड करणारे ते आगाऊ भाऊजी)  करून टाकला होता. पुढे हा स्कार्लेट पिम्पर्नेल्या नायिकेला वाचवण्याऐवजी राजवाड्यात प्रवेश करून,"वैनी, चहा टाका बुवा पहिला!" असं म्हणत असेल असं उगाच वाटत राहिलं.

पुढे वय वाढलं मग वाचनात बाबूराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक, नारायण धारप आले. झुंजार कथा, गरुड कथा आल्या. त्या कथांचे प्लॉटस अत्यंत सुमार असत. पण त्यावेळी वाटायचं आयला ह्या झुंजार आणि तो बाकदार नाकवाला गरुड यांना अशक्य असं काहीच नाही. हळूहळू वाचनाचे विषय बदलले. वडिलांनी बाबासाहेब पुरंदऱ्यांचं राजा शिवछत्रपति आणून दिलं. आज कुणी काही म्हणो, शिवाजी महाराज हे शब्द ऐकल्यावर छाती दोन इंच फुगते, आपल्या कणखर राकट दगडांच्या देशाचा अभिमान वाटतो, त्याची छोटीशी ठिणगी या पुस्तकाने पाडली. मग पुढे मुंजीत प्रथेप्रमाणे "श्यामची आई" मिळालं. हे पुस्तक मला तेव्हाही भावलं नाही आजही भावत नाही. मुळूमुळू रडणारा श्याम मात्र आठवतो. पुढे सिनेमातला श्याम पाहिल्यावर तर शंकाच राहिली नाही. नाही, लहान मुलांना हे साहित्य देऊ नये. आईवडिलांवर प्रेम करा, खोटे बोलू नका हे शिकवायला आणखी अनेक उपाय आहेत. पुढे दर्जेदार साहित्य खूप वाचलं. पण ते दर्जेदार आहे कळण्यासाठी जी काही पहिली जडणघडण किंवा मोडतोड म्हणा, व्हायला आधीच्या या उनाड वाचनाचा हातभार आहे असं म्हणावं लागेल. साहित्य हे साहित्य असतं, बरं किंवा वाईट हे वाचणाऱ्यावर असतं. पुस्तकं ही वेगवेगळ्या लोकांच्या नजरेतून जग, समाज कसा दिसतो हे दाखवतात. बरेच लोक अमुक एखादं पुस्तक आपला दीपस्तंभ आहे वगैरे म्हणतात त्याचं मला आश्चर्य वाटतं. एखाद्याचं स्वत:चे अनुभव, स्वत:चं तत्वज्ञान हे त्याच्यापुरतं मर्यादित असतं. त्या दृष्टिकोनाचा आपल्याला उपयोग "असाही दृष्टीकोन असतो" असं ज्ञान होण्यापुरताच. आपण आपली स्वत:ची वाट चोखाळावी. भलेही मग ती न पडलेली पायवाट असो. ज्ञान हे आतूनच व्हावं लागतं. पुस्तकं आपल्याला शहरच्या वेशीपर्यंतच नेऊन पोचवतील. पुढील जंगलातील वाटचाल आपण एकट्यानेच चालायची आहे. टागोर उगाच नाही म्हणाले, एकला चालो रे!

Tuesday, October 6, 2015

काव्यदिंडी ते काव्यतिरडी - एक प्रवास

पहुडलो होतो माझ्याच मनाच्या पलंगावर
बंद डोळे मंद श्वास शांती अलवार
येईल केव्हाही स्फूर्ती, होतो तयार
होते पेन उशाशी त्यावर मस्तकभार
पसरली होती यमके सभोवार
जुळवून ठेवलेली स्वहस्ते हळुवार 

अप्रिय न कोणताही मज विषय
कापूस भुईमुग अभंग ते प्रेमभंग
शब्द ते केवळ जणू यमकाची सोय
कठीण वृत्त मात्रा आर्या अन विक्रीडित
सोपा मुक्तछंद तेवढा आपला होय 

अव्यक्ताचे व्यक्त यासाठी बनली भाषा
व्यक्ताचे अव्यक्त ही कविची अभिलाषा
मला दिसे कसे सगळे संदिग्ध अन धूसर
न दिसे रवि ते दिसे मज हा दंभ मनावर
पण हाय ती भार्या! आणी क्षणात भूतलावर
म्हणे लावा तो चष्मा जो चमके टकलावर

खिन्नवदनी नि:श्वास निपचीत प्रतिभा
कशाची स्फूर्ती अन काय नुसतीच शोभा
तरल अंतरंग माझे कसे कळावे माझ्या प्रियेला
अंतरंगीचा फाटका बनियन तेवढा तीक्ष्ण नजरेला
न आवडे तरी ती आवडी नशिबी तुकारामाला
कळला न सॉक्रेटिस कुणा, देत हाती विषप्याला

गळली स्फूर्ती झाली उपरती
कशाची पालखी अन कशाची दिंडी
पसरली यमके तडकला अनुप्रास
तरल संवेदनांची लक्तरे कडीपाटास
मोजून चार रसिक जमले वेदना ऐकावया 
ऐकण्या कसले आले खांदा द्यावया 

Thursday, October 1, 2015

इंडियाविरोधाचे छुपे प्रोफाईल

सध्या काही बुद्धिवंत मंडळी डिजिटल इंडिया बद्दल प्रश्न विचारू लागली आहेत. इतके दिवस ही मंडळी निवांत स्वत:च्या कुरणात चरत होती, स्वत:शी हळूच हंबरत, कुणी बघत नसल्याची चाहूल घेऊन शेपटीने आपल्याच पार्श्वभागावरील माश्या हाकलीत होती. आत्ममग्न होती. भारतामध्ये बदल घडत आहेत याची क्वचित दखल घेत होती, बरेचसे दुर्लक्ष करीत होती. अचानक या मंडळींच्या शेपटाला कुणी तरी फटाक्यांची माळ लावून पेटवल्याप्रमाणे झाले आहे. दुगाण्या झाडत ही मंडळी आता शिवारात धावत आहेत. दिसेल त्याला पुढे असेल तर शिंगावर घेत आहेत, मागे असेल तर लाथा झाडत आहेत. त्यांचा प्रश्न एकच - अरे माठ्यांनो, डिजिटल इंडिया म्हणजे काय हे माहीत नसताना उगाच प्रोफाईल पिक्चर बदलून काय होणार? सगळी मेंढरे लेकाची. एकाने बदलले, झाले, लागले सगळे बदलायला. असो. काही असतीलही मेंढरे. पण जनजागरण झालेच की नाही? झोपी गेलेले हे बुद्धिवंत लोक जागे झाले. "डिजिटल इंडिया" असे गूगल करू लागले की नाही? ई-गव्हर्नन्स म्हणजे काय, मोदींनी त्यावर भर का दिला आहे हे तरी त्यांना कळले असेल की नाही? सरकारी सोयी जर ऑनलाईन उपलब्ध झाल्या तर भ्रष्ट बाबूंना जरा आळा बसेल. रोगाच्या निर्मूलनाबरोबर तो मुळातच होणार नाही याची सोय केली तर ते जास्त परिणामकारक नव्हे काय? आणि ही फक्त एक बाजू. इतरही फायदे आहेत.

दुसरा एक समज असा की डिजिटल इंडिया म्हणजे फास्ट इंटरनेट, सॉफ्टवेअर कंपन्यांची चंगळ, इकडे बळिराजाची हेळसांड, गरिबाच्या तोंडची भाकरी गायब. हा गैरसमज आहे. जलयुक्त शिवार योजना दिसली नाही, प्रत्येक नागरिकासाठी उघडलेले बचत खाते दिसत नाही, पण मोदींनी गुंतवणूक आणण्याची गोष्ट केली की लगेच बळिराजा मृत्यूपंथाला लागतो, गरिबाची लक्तरे दिसू लागतात. डिजिटलायझेशन कशाला हवं? त्याने नोकऱ्या जातात. बदल अटळ असतो. काही पिढ्यांपूर्वी आपण धान्य दळायला घरी जाते वापरत होतो. चटणी वाटायला पाटा वरवंटा वापरत होतो. जाते, पाटे वरवंटे बनवणारी वेगळी जमात होती. बेलदार म्हणायचे त्यांना. पुढे पिठे तयार मिळू लागली, मिक्सर आले. हे बेलदार लोक कुठे गेले कळले पण नाही. त्यांच्या नावाने कुणी रडले नाही, मिक्सर का आणले म्हणून कॉंग्रेसच्या नावाने कुणी खडे फोडले नाहीत, आंदोलने झाली नाहीत. त्यांच्या पुनर्वसनाबद्दल कुणी मोर्चे काढले नाहीत. स्वत: बेलदार लोक सुद्धा प्रथम बेरोजगार झाले, गरिबीची झळ लागून कदाचित हलाखीत मरणही पावले असतील. पण लवचिकता हा मनुष्याचा स्वभावधर्म आहे. पुढली पिढी शहाणी झाली, इतर उद्योगधंद्यांकडे वळली. थोडक्यात मिक्सर आले म्हणून जगणं थांबलं नाही किंवा मिक्सर वापरू नका असा प्रचार झाला नाही. सध्या तशीच परिस्थिती आहे. संपूर्ण जग डिजिटल होत आहे. ते कुठं चाललं आहे हे ओळखून आपण बदललो नाही तर नुकसान आपलंच आहे. अमेरिका एके काळी शेतीप्रधानच देश होता. कापूस, गहू, मका, तंबाखू यावर दक्षिणेतील आणि उत्तरेतील राज्ये अवलंबून होती. पुढे अमेरिका प्रगतशील झाली, यंत्रयुग आले, त्यानंतर संगणकयुग आले. त्यानुसार शेतकरी बदलला. रडत बसण्यापेक्षा नवीन तंत्रांचा वापर करून घेऊन जास्त पीक मिळवायला शिकला. सुदैवाने नागरिकही भारतातील नागरिकांप्रमाणे वैचारिक मैथुनवाले नसल्यामुळे त्यांनी गळे वगैरे न काढता प्रगतीस वाव दिला. हे भारतात का होऊ शकत नाही? प्रत्यके चांगल्या गोष्टीला "हा हिंदुत्ववाद्यांचा कावा आहे", "हा समाजवाद्यांचा डाव आहे" असलं बोललंच पाहिजे का? बरं हे बोलणं नुसतंच बरं. प्रत्यक्ष काही करण्याची वेळ आली की "अरे नाही रे, एकही सिक लीव्ह शिल्लक नाहीये" ही कारणं देणारे हे महात्मे.

काही काही वेळा असं वाटतं की याच लोकांना भारताची प्रगती नको आहे की काय? गरिबी राहिली नाही तर गळे काढून कशावर लिहायचे आणि सरकारला धारेवर धरण्यासाठी कुठले मुद्दे आणायचे? एकीकडे एक तो संत टोपीवाल आहे जो सत्तेवर बसून घंटा हलवतो आहे, दुसरीकडे हे मोदीविरोधक आहेत हे घंटा हलवत केवळ ठणाणा करीत आहेत. नकर्त्याचे कर्तृत्व हे. त्याला उत्तर देण्याचीही गरज नाही, पण दिले पाहिजे. कारण चूक असेल तर चूक म्हटले नाही तर ती मोठी चूक. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो.

थोडक्यात, आमचे प्रोफाईल बदलून काय होणार असा प्रश्न ज्या थोर बुद्धिवंतांनी केला आहे, त्यांच्या प्रश्नातच त्याचे उत्तर आहे. झोपी गेलेला जागा झाला आहे. आता फक्त तो फक्त दुगाण्या झाडून पुन्हा झोपी जातो की काही दिवस शेताला निदान खत तरी पुरवतो ते पहायचे. असो. बाकी ही मंडळी आमच्या प्रोफाईलकडे अशा बारीक नजरेने पाहत असतात ही जाणीव सुखद की काळजी वाढवणारी हा विचार सध्या आम्ही करत आहोत.