Monday, August 25, 2014

म्हाराष्ट्राचा आर्किटेक्ट


छोटू सदरेत आला तेव्हा सदरेत सामसूम होती. एकदोन पाणके कंटाळलेल्या चेहऱ्याने पाणी भरायच्या पाट्या टाकत होते. "दोन दोन दिवस अंघुळसुद्धा करत नाहीत, कशाला पाणी भरायला सांगतात कुणास ठाऊक. पाणी भरून झाले तरी भरलेल्या घड्यावर ओतण्याची आज्ञा झाली आहे. पालथ्या काय किंवा भरल्या काय यांच्या सगळ्याच घड्यांवरचे पाणी वाया जाते. " असे पुटपुटणे छोटूच्या कानावर पडले. छोटू सदरेतच घुटमळला. सदरेत सिंहासनाच्यावरती अश्वारूढ इंद्रवदन सरकारांचे राजा रविवर्मा स्टाईलचे तैलचित्र लावले होते. उजव्या हातात हातात तलवार, डाव्या हातात यष्टीची काच सहज फोडेल अशा मापाचा दगड, पाठीवर बांधलेल्या ढालीचे पट्टे त्या रुंद छातीवरून घेतलेले, कमरेला त्यांची आवडती दुर्बीण लटकवलेली, पाठीला भाता अन त्यात एक निळ्या रंगाचे भेंडोळे, अशी दिलखेचक पोझ दिलेली ती मूर्ती पाहून कुणाचाही ऊर भरून येत असे. वास्तविक घोड्याने पुढचे दोन्ही पाय उंचावून तो झेप घेतो आहे असे चित्र त्यांना हवे होते. पण ते घोड्यास मान्य झाले नाही, शिवाय घोड्याने एकदा पाय वर केल्यावर सरकार स्वत: दाणकन जमिनीवर आदळले होते. मग मोतद्दार घोड्याचा लगाम धरून उभा आहे आणि आपण छान पोझ देऊन वर बसलो आहोत असेच चित्र बनवावे असे सरकारांचे मत पडले. त्यावेळी घोड्यालाही वारंवार तोबरा देऊन मनवावे लागले होते. सर्वांनी कुतूहलाने सरकारांना भात्यातील भेंडोळीबद्दल विचारले होते. त्यावर ती ब्ल्यू प्रिंट आहे असे काहीसे गूढ उत्तर त्यांनी दिले होते. छोटूला जरासा धक्काच बसला होता. सिनेमाची प्रिंट बाजारात येते हे त्याला माहीत होते. डोक्यात "सिनेमाची प्रिंट","ब्ल्यू" असे शब्द एकत्र आले आणि छोटू चपापला. चाळीशीनंतर आयडेण्टिटी क्रायसिस होतो हे खरे पण सरकारांनी हा कसला भलताच नाद लावून घेतला असे त्याला वाटले. त्याने अदबीने,"सरकार, हा नाद वाईट. सोडा तो. म्हाराष्ट्राला आपली लै गरज आहे. आपण सत्तेत या, असल्या पन्नास प्रिण्टा आणून आपल्या पायाशी टाकतो. आणि आपल्यासारख्यांनी ट्रेलर कशाला पहायचा हो? थेट त्यातल्या हिरवीणीच आणून दावतो." ते ऐकून इंद्रवदन सरकार प्रथम थोडे सर्द झाले, मग त्यातील गोड शक्यता जाणवून त्यांचे डोळे स्वप्नाळू होऊन थोडेसे तूर्यावस्थेतही गेले, मग पुढच्याच क्षणी भानावर येऊन ते छोटूला म्हणाले होते,"छोटू, तू नक्कीच आणशील यात तिळमात्र शंका नाही. पण माझ्या हनुमंता, मी बेशुद्ध पडल्याशिवाय द्रोणागिरी आणायला जाऊ नकोस. लोकहो, हे निळे भेंडोळे साधेसुधे नाही. यात तुमचे, माझेच काय आपल्या पुढल्या दहा पिढ्यांचे भवितव्य रेखाटले आहे. सर्वांचे कुतूहल आणखी वाढले. महाराज त्यात काय चितारले आहे ते दाखवा तरी, असे काही जणांनी म्हटले. तेव्हा सरकार थोडेसे वरमले. ते म्हणाले,"आत्ता हे भेंडोळे फक्त चित्रापुरते आणले आहे. खरी ब्ल्यू प्रिंट काही नाही ही. ती आमच्या डोक्यात पक्की आहे. रेखाटन चालू आहे. आत्ता आयत्यावेळी पोझ देण्यापुरते काही तरी द्या असे राणी सरकारांना म्हणालो, तर त्यांनी गेल्या वर्षीच्या "कालनिर्णया"ची सुरळी करून हातात ठेवली. तीच या भात्यात ठेवली आहे. एवढे चित्र तरी होऊद्या, माझ्या डोक्यात अशा काही कल्पना आहेत की बासच. मला फक्त राज्याभिषेक करा आणि या कल्पना प्रत्यक्षात येताना पहा."  

सरकारांच्या डोक्यात भव्य कल्पना होत्या. म्हाराष्ट्र सध्या एक बिगरशेती परवाना नसलेला तुकडा आहे. पयले छूट तो एनए करून घ्यावा मागाहून ब्ल्यू प्रिंटबरहुकूम बांधकाम प्रत्यक्षात आणताना कटकट नको. त्यानंतर छोटू आणि सरकार यांच्यात अनेक खलबतेही झाली. जागेचा तुकडा आणि त्याचा विकास म्हणजे अन्य बिल्डरांची ब्याद आलीच. त्यातल्या त्यात शंभूराजांचा ताप डोक्याला नेहमी असायचा. कायम स्पर्धा. इंद्रवदन सरकारांनी वाड्याची शाकारणी केली की शंभूराजे आपल्या वाड्याची साधी कौले काढून त्यावर मंगळुरी कौले चढवणार. यांनी बाथरूममध्ये विलायती कमोड बसवले की शंभूराजे बाथटब बसवून घेणार. यांनी कोबा करून घेतला की ते संगमरवरी फरशी बसवणार. हे असं सगळं असल्यामुळे म्हाराष्ट्राच्या विकासाचा नकाशा गुप्त राहायला हवा होता. म्हणूनच सरकारांनी त्याला खुणेचे गुप्त नाव ठेवले होते, ब्ल्यू प्रिंट. त्यात काय चित्र असणार आहे याची कल्पना फक्त सरकारांनाच होती. छोटूने एकदा त्यांना हळूच विचारले होते, "सरकार, मला तरी एकदा दाखवा की तुमचा नकाशा. मी पण विचार करतो आहे, गावकडलं घर दुरुस्तीला काढावं. आमचा म्हातारा लई दिवस मागं लागलाय, पोरा, घर जुनं झालं आपलं. डागडुजी कराया हवी. त्यापरीस पाडून नवं का बांधीनास? सरकार येवढा म्हाराष्ट्र बांधायला निघालेत, आपल्या घरासाठीबी कायतरी नकाशा काढून देतील की. नुसतं दाखवा तरी काय काढलंय तुम्ही आतापर्यंत."  त्यावर सरकार म्हणाले होते,"तूर्तास थांब. सध्या नुसता आराखडा आहे. योग्य वेळ आल्यावर तुलाच प्रथम दाखवीन." त्यानंतर राणीसाहेबांनी हाक मारली म्हणून सरकार आत गेले. निळे भेंडोळे टेबलावर पडले होते. त्यावर "अत्यंत गोपनीय" असे शब्द होते. इकडे तिकडे पाहत छोटूने हळूच ते उघडले. पेन्सिलीने महाराष्ट्राचा नकाशा रफ रेषांमध्ये जेमतेम काढला होता. संदर्भ ठाऊक नसणाऱ्याने पाहिला तर उंटाचे तोंड म्हणून तो सहज खपला असता. त्यावर कमीअधिक जाडीचे बिंदू काढून त्यांशेजारी शहरांची नावे लिहिली होती. सगळ्यात जाड बिंदू नाशिकचा होता. त्याखालोखाल मुंबई. त्यानंतरचा नंबर पुण्याचा. सातारा, सांगली, कोल्हापूर ही शहरे जेमतेम अर्ध्यामुर्ध्या बिंदूवर उभी होती. मुंबईच्या बिंदूशेजारी ध्वजाचे चिन्ह होते, त्याखाली "वांद्रे" असे लिहिले होते. नागपूर शहर तर मुंबईशेजारी काढले होते. खानदेश आणि विदर्भ हे भाग सहारा वाळवंट असल्यासारखे संपूर्ण मोकळे होते. तिथे "शहरांची नावे? आणि येथे काय पिकते? गडकऱ्यांस विचारले पाहिजे. त्याची स्थूलमानाने (खी:खी:खी:)बहुधा वडाभाताची शेती असावी. " असा शेरा होता. कोकणपट्टीवर "व्हरांडा (टेन्टेटिव्ह)", घाटमाथ्यावर "परंपरागत ऊस लागवड, इथे कापूस लावावा काय? क्रांतिकारी विचार!" बारामतीच्या वाटेला पोकळ वर्तुळ असलेला बिंदू आला होता. तो कशासाठी हे छोटूला प्रथम समजले नाही. मग त्याचे लक्ष खाली उजवीकडील कोपऱ्यात गेले. तेथे "लीजेंड" होती. ठळक बिंदू - वसवणे, पोकळ बिंदू - बसवणे. हे असं करून झाल्यावर बहुधा सरकार कंटाळले असावेत. कारण वर कोपऱ्यात श्रीमंत बाबासाहेब सातारकर, बारामतीकर सरदार, शंभूराजे यांची व्यंगचित्रे काढली होती. त्यात बाबामहाराज खुर्चीवर बसण्यासाठी अर्धे खाली झाले आहेत, मागून बारामतीकर सरदार त्यांची खुर्ची ओढत आहेत आणि ते पाहून स्वत: नुसत्या तिकाटण्यावर बसलेले शंभूराजे दात काढून हसत आहेत असे दृश्य होते. छोटू गुंग होऊन ते पाहत राहिला. तेवढ्यात सरकारांची चाहूल लागली त्यासरशी त्याने ते भेंडोळे गुंडाळून जसे होते तसे ठेवून दिले होते.

आज छोटू सरकारांची भेट घेण्यासाठी मुद्दाम आला होता. पुण्यातील सेनेसमोरील आक्रमक आणि स्फूर्तीदायक भाषण करून सैन्यात उत्साह आणण्याचा त्यांचा प्रयत्न केविलवाणा ठरल्यानंतर सरकारांनी स्वत:ला वाड्यात कोंडून घेतले होते. त्यात त्यांच्या ब्ल्यू प्रिंटची खबर शंभूराजांपर्यंत पोचली आणि त्यांनी घाईघाईने स्वत:ची अतिनील अशी प्रिंट तयार करून घेतली आणि लोकांना दाखवलीसुद्धा. शंभूराजे स्वत: काही आर्किटेक्ट नव्हते पण, त्यांचा विश्वासू सेवक धनाजी याने पूर्वी पीडब्ल्यूडी मध्ये ज्युनिअर क्लार्कची नोकरी केली होती, तेवढे पुरे होते. छोटूने धनाजीला विश्वासात घेऊन विचारले. साधारण तीन ग्लासात धनाजी विश्वासात येत असे. धनाजीने "जीटी मारणे" या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून हे रेखाटन केल्याचे कबूल केले. अर्थात या तंत्रज्ञानात त्रुटीही आहेत हेही त्याने सांगितले. त्यामुळे पहिली प्रिंट जेव्हा तयार झाली आणि ती शंभूराजांकडे नजरेखालून घालण्यासाठी आली तेव्हा त्यांनी,"अरे? याच्यावर खाली सही त्या उंदीरवदनाची कशी काय आली?" असे उद्गार काढले. अर्थात धनाजीने ती चूक दुरुस्त करून खाली शंभूराजांचे नाव रीतसर टाकले. सहीखेरीज शंभूराजांना काही दिसत नसतेच असेही तो म्हणाला. तर ही सर्व माहिती मिळाल्यानंतर इंद्रवदन सरकार कुणाला दिसले नव्हते. म्हणूनच त्यांस पहावयास छोटू आला होता. राणी सरकारांनी, सरकार वर त्यांच्या खोलीत आहेत असे सांगितले. आणि वर जातोच आहेस तर "त्यांना म्हणावं आज तरी आंघोळ करा, किती दिवस पारोसे बसणार आहात?" असा निरोपही द्यायला सांगितला. राणी सरकारांना अदबीने मुजरा करून छोटू माडीवर गेला. सरकार त्यांच्या आवडत्या खुर्चीत बसले होते. दाढीचे खुंट वाढलेले, झोप न झाल्यासारखे तारवटलेले डोळे असा अवतार पाहून छोटूला वाईट वाटले. सरकार म्हणाले,"छोटू आलास? मला वाटलं आमच्या सैन्याप्रमाणे तूही घोड्यासकट परागंदा झालास. आता नालही नाही आणि घोडाही नाही म्हणा. म्हाराष्ट्रभूमीची आमची एवढी नाडीओळख, दिवसरात्र एक करून मी माझ्या मातृभूमीच्या विकासाचा नकाशा तयार केला होता. पुण्याच्या सभेच्या वेळेस स्वखर्चाने त्याचे हजारभर अमोनिया प्रिंटही काढून घेतले. एकाही महाभागानं त्याबद्दल विचारलं नाही रे. अरे अगदी फुकट देतो म्हणत होतो तरीही, राहूदे सरकार, नंतर नेतो म्हणाले लेकाचे सगळे. मग वाटलं अरे कशासाठी मी मरायचं एवढं? म्हणून ठरवलं आहे. मी स्वत:हून आता कुठल्याच मोहिमेवर जाणार नाही. बस, आता मी आणि माझी ही अभ्यासिका. मला काण्ट वाचायचा आहे, अॅरिस्टाॅटल, प्लेटो वाचायचे आहेत. आता ते मी करणार." असं म्हणून ते खिन्नपणे गवाक्षाबाहेर पाहत राहिले. थोड्या वेळाने छोटू उठला आणि मुजरा करून "येतो सरकार" म्हणाला. त्याच्याकडे न पाहताच त्यांनी हाताने त्याला निरोप दिला. छोटू जिन्यापर्यंत पोचला आणि खाली जाणार तेवढ्यात सरकार म्हणाले,"छोट्या, जर माझा राज्याभिषेक झालाच तर सांगायला ये, मी केव्हाही सैन्याचं नेतृत्व करायला तयार असेन." छोटू जिना उतरून दिसेनासा होईपर्यंत सरकार त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिले.

Friday, August 22, 2014

स्त्रीशक्तीची त्सुनामी

हे पत्रकार म्हणजे नुसती गिधाडं आहेत. जरा कुठं टंग ऑफ स्लिप, आपलं, स्लिप ऑफ टंग झाली माझ्याकडून की झालं. मागे संसदेत जरा कुठं डुलकी काढली तर पुढले पंधरा दिवस माझी झोप उडवली. स्त्रीशक्ती म्हणजे काय चीज आहे ते लोकांना माहीत नाही. मी लहानपणापासून पाहतोय. आज्जी तर कसली भारी होती. भल्या भल्यांना नाकीनऊ आणायची. आजोबापण बहुधा फार हुषार असावेत. आज्जीनं घरात आणीबाणी लागू केल्यावर पळूनच गेले म्हणे. आज्जीलासुद्धा सापडले नाहीत. पुढं तिनं अख्ख्या देशात आणीबाणी आणल्यावर चड्डीवाल्यांचीसुद्धा पळापळ झाली होती म्हणे. मी लहान होतो तेव्हा. दीदीही लहानच होती. पण जेव्हा मी ममा, ममा एवढंच बोलायला शिकलो होतो तेव्हाच ती "मेरी रायबरेली मैं नही दूंगी" असं म्हणायला शिकली होती. आज्जीचं ऐकून ऐकून. पुढं आज्जीच रायबरेलीतून हरली तेव्हा मग ही नुसतंच ,"मेरी राय नही दूंगी" म्हणायला लागली होती. तेही आज्जीचंच ऐकून. माझी सगळी टॉईज तिच्या ताब्यात असायची. खेळायचं असेल तर तिला विनवणी करायची, मग ती कुलुप लावलेल्या कपाटातून माझी खेळणी काढून देणार. त्यावेळी ममाची शक्तीही काही कमी नव्हती. मी हट्ट केला की ढुंगणावर असा काही रट्टा ठेवून द्यायची की यंव रे यंव. नेहमी मला आमच्या घराण्याची थोरवी सांगायची. आपलं घराणं किती थोर, नाव किती उच्च, ते मी कसं राखलं पाहिजे वगैरे वगैरे. मला कंटाळा यायचा. नावात काय आहे असं शेक्सपियर उगाच म्हणालाय का? एकदा शाळेत मी नाव लिहिताना बेफिकिरीनं गांधीत एच घालायचा विसरलो. आता यात चिडण्यासारखं काय आहे? पण ममानं "गधड्या, तू काय लिहिलंस, त्याचा अर्थ काय झाला हे तरी कळलं का तुला?" असं म्हणून अर्थ समजावून देण्यासाठी जे काही फटके दिले, ते आजही सही करताना आठवतात. शाळेतला अनुभवही काही फारसा वेगळा नसायचा. माझे गाल सफरचंदी म्हणून मुलं चिडवायची, तर मुली गालाचे चिमटे काढायच्या. दिसायला नाजूक पण चिमटे कसले अशक्य काढायच्या. टीचर तर अशा सगळ्या एकापेक्षा एक खडूस बाया होत्या. वर्गात एवढी मुलं, पण प्रश्नाचं उत्तर मीच द्यायला हवं का? पाचवीतील मुलास शंभरपर्यंत आकडे आलेच पाहिजेत हा हट्ट का? इतिहासाच्या म्याडम तर अतीच. भारताचे पहिले पंतप्रधान कोण म्हणे. आता मला काय ठाऊक? मी त्यावेळेला जन्मालासुद्धा आलो नव्हतो. तसं म्हणालो तर बाईंनी थेट माझे पणजोबाच काढले. मी तडकून म्हणालो, तुम्ही मला काय शिक्षा करायची ती करा, माझ्या पणजोबांना मध्ये का आणता? घरी आज्जी, ममा आणि दीदी तर शाळेत या सर्व साळकाया माळकाया. माझं बालपण असं सगळं स्त्रीशक्तीचा अनुभव घेण्यात गेलं.

आता मी मोठ्ठा झालो आहे असं म्हटलं तर ममा आणि दीदी दोघी खूप हसतात. मी चिडलो की मग म्हणतात,"होय रे बाबा, तू मोठ्ठा झाला आहेस. झालं?" असं म्हणून एकमेकींना टाळी देतात. बरं घरात असं, बाहेर तरी मला शांती मिळावी? तेही नाही. पर्वा संसदेत डुलकी काढली म्हणून मीरा कुमारांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलावून घेऊन झापलं. ममताआंटीशी मी कधीच पंगा घेत नाही. प्रथम प्रथम मी त्यांना "नोमोश्कार, की खोबोर? हाऊ इज त्रीणमूल?" घालायचो. तर "की???" असं म्हणून माझ्याकडे रोखून बघत राहायच्या. नंतर लालूअंकलकडून कळलं, की त्रीणमूल म्हणजे काही त्यांच्या मुलाचं नाव नाही. मुळात ते त्रीणमूलही नाही तर तृणमूल आहे म्हणे. लालूअंकल जेव्हा तृणमूल म्हणतात तेव्हा त्यांच्या तोंडातून छान थुंकी उडते आणि कानावरचे केस रोमांच आल्याप्रमाणे उभे राहतात. त्यानंतर संपूर्ण सेशनमध्ये ममताआंटी मला डेथ स्टेअर देत होत्या. त्यादिवशी घरी जाताना "टाटा" म्हणालो तर फुटाण्यासारख्या फुटल्या. "आप बोल दो टाटाबाबूसे, किसानोंकी जमीन उनकीही रहेगी. बडा आया टाटा का चेला!" मला काहीच कळलं नाही. टाटाही म्हणायचं नाही? ठीक आहे. आता त्या समोर आल्या की मी सोज्वळ घरंदाज मुलीसारखी दृष्टी खाली वळवतो. खरं तर समोरासमोर येणंच टाळतो आता. मी ममाला म्हणालो मला जायचंच नाही परत संसदेत. तर म्हणाली ते काही नाही, नुसता घरी बसून टीव्ही बघायचा त्यापेक्षा तिथं जा. दिग्गीअंकलना विचारलं स्त्री शक्तीचा सामना कसा करायचा हो? तर म्हणाले सामना करायचाच नाही. लव्हाळं व्हायचं. गवत व्हायचं. गवतावरून बुलडोझर गेला तर गवताला काही होतं का? नाही होत. उलट ताठ उभी राहणारी झाडं मात्र भुईसपाट होतात. हे मात्र खरं हं. ममाबरोबर तामिळनाडूच्या दौऱ्यावर गेलो होतो तेव्हा स्वत: पाहिलंय मी. तिथे सगळीकडे देवळंच देवळं. दिसलं देऊळ की घाल प्रदक्षिणा. मध्येच एक प्रशस्त देऊळ दिसलं म्हणून प्रदक्षिणा घालायला गेलो तर ममानं जोरात मागे खेचलं. म्हणाली, प्रदक्षिणा कसली घालतोस? हे काही देऊळ नव्हे. या अम्मा. इथल्या देवी. लोटांगण घाल साष्टांग. त्या आम्हाला भेटायला बंगल्यासमोरील हिरवळीवरून चालत आल्या होत्या. हिरवळीला काहीसुद्धा झालं नाही. ममानं ,"हे आमचे चिरंजीव. हल्लीच शाळा सोडून पणजोबा-आज्जी-वडिलोपार्जित धंदा बघायला लागला आहे. आशीर्वाद द्या." अशी माझी ओळख करून दिली. मला नीट न्याहाळून अम्मा म्हणाल्या,"अच्चा,  कुन्जुम हल्लू दिकता ऐ. कोई बात नै." असं म्हणून अम्मानी मला कापूर घातलेला पेढा खायला दिला होता. कुन्जुम हल्लू म्हणजे काय? आणि मिठाईत कापूर का घालतात हे लोक? सर्वत्र स्त्रीशक्तीचा प्रादुर्भाव दिसला. तिथून निसटून पलीकडे केरळमध्ये गेलो तर तिथं मातृसत्ताक व्यवस्था असल्याचं कळलं. फार बरं वाटलं. हाहाहा, लेको, मला हसता काय? के करुणाकरन, ए के अँटनी वगैरे लोक रोज आपापल्या मातोश्रींची आज्ञा घेऊनच सगळे कारभार करतात असं कळलं. अँटनी यांची आई कडक होती. लहानपणी त्यांच्या हातावर छदामपण ठेवत नसे. त्यातूनच मग "ओरू आणा समरम", अर्थात "एक तरी आणा द्या हो" चळवळ सुरू झाली असे ऐकण्यात आले. थोडक्यात इथेही स्त्रीशक्ती. वाटलं होतं इथे तरी ममाच्या तावडीतून सुटण्याच्या काही टिप्स मिळतील. कसचं काय. असो. मग आमचे माणकोजी म्हणाले तुम्ही आमच्या म्हाराष्ट्रात या. राकट, कणखर, मर्दांचा, दगडांचा देश तो. पण पूर्वी बाबांकडून लाटणेवाल्या बाईंच्या गोष्टी ऐकल्या होत्या. म्हणालो नको हो, उगाच लाटणं बसायचं पाठीत. तर म्हणाले नाही हो, गेल्या त्या देवाघरी. आता तसं कुणी राहिलं नाही. निश्चिंत मनाने या. झालं. गेलो मग मुंबईला. पहिलाच झटका सकाळी सकाळी मिळाला. माणकोजी म्हणाले चला जरा समुद्रकिनाऱ्यावर फिरून येऊ. वाटेत ताजी म्हावरं घेऊन कोळणी बसल्या होत्या. मी कुतूहलाने न्याहाळत उभा राहिलो तर एका कोळणीने,"मेल्या काय बगतोस रे डोळं फाडून? वाटा पायजे असेल तर बोल, नायतर फुट इथून." असा दम दिला. आधीच मुंबयच्या हवेनं घाम फुटलेला, त्यात तिच्या हातातली कोयती पाहून सगळीकडून धारा फुटल्या. माणकोजी दात काढून हसत होते. नंतर सहकुटुंब भेटायला आलेले यच्चयावत सगळे नेते आपापल्या बायकोची ओळख "हे आमचं गृहमंत्रालय" अशी करून देत होते. याचा अर्थ बाहेर "अण्णा, दादा आणि तात्या" असलेले हे नेते घरात आले की शेजारपाजारी गेलेल्या यांच्या बायका "घ्या, आलं आमचं पात्र घरी, जाते बाई घरी मी. मी नसले तर धड पायजमासुद्धा मिळत नाही यांना." अशा शब्दात त्यांची संभावना करत असणार. या सर्व बायकांनी कवतिकाने माझ्याकडे पाहून,"मग? यंदा कर्तव्य आहे की नाही? आम्हाला बोलवा हं लग्नाला!" अशा अर्थाचे उद्गार काढले. म्हणजे मी घरात आहे त्या स्त्रीशक्तीला तोंड देत कसाबसा टिकून आहे तर या बायका ममाला नव्या दमाचं सैन्य पुरवण्याच्या मागे. "अहो एवढ्यात काय घाई आहे? आत्ता कुठं चाळीशी ओलांडलीय." असं सलज्ज उत्तर मी दिलं. विधानसभेत, लोकसभेत गदारोळ करणारे आमचे हे लोक, या सगळ्या बायकांसमोर चूपचाप बसून होते. काही बायकांनी,"महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळायलाच हवं. आम्ही बायकांनी काय फक्त डीबीएमएस करून गप्प राहावं?" अशी मागणी केली. त्यावर सर्व पत्नीव्रतांनी माना खाली घातल्या. त्याने चिडून त्या आपापल्या नवऱ्यांना ढोसून म्हणाल्या,"काय हो? बरोबर आहे की नाही? तोंड उघडून बोला घडघडीत." तसं गडबडीनं  नवरे मंडळींनी एकसुरात उत्तर दिलं,"हो हो, म्हणजे काय. ३३ टक्केच का १३३ टक्के आरक्षण पाहिजे. " मी माणकोजींना विचारलं, "डीबीएमएस ही काय भानगड आहे? ही कुठली पदवी?" ते म्हणाले,"धुणी भांडी म्यानेजमेंट सायन्स. खोलात शिरू नका, बायका तापतील.".

एक नवी दिशा घेऊन मी मुंबईतून निघालो. स्त्रीशक्तीपासून लांब पळण्यात अर्थ नाही हे लक्षात आले आहे. सृजनाची ताकद असलेली स्त्री ही एखाद्याला घडवू शकते आणि बिघडवू शकते. सृजनासाठी संहाराचीही आवश्यकता असते. पक्ष चांगला घडायचा असेल तर आत्ता असलेली घाण संपली पाहिजे, तिचा संहार झाला पाहिजे. कॉंग्रेस वाचायची असेल तर ती आधी संपली पाहिजे. पुरुषांपेक्षा स्त्रीला नीतीमत्तेची चाड जास्त असते, भ्रष्टाचारची चीड असते, त्याचबरोबर नैसर्गिक ममताही असते. स्त्रिया राजकारणात आल्या, अधिकारावर आल्या तर त्यांचे निर्णय स्वार्थाऐवजी समाजाभिमुख जास्त असतील. याचाच अर्थ, स्त्रीशक्तीची त्सुनामीच देशाला वाचवेल. कॉंग्रेसपासून, भ्रष्टाचारापासून. ममा, दीदी काय वाट्टेल ते म्हणोत, मी अस्संच म्हणणार.

Thursday, August 14, 2014

डोंगराची भाकणूक

आमच्या लहानपणी कोकणाचा कॅलिफोर्निया कधी अन कसा होईल या विषयावर लिहून लिहून बोरूलेखण्या थकत नसत. निसर्गदत्त सौंदर्य असलेली ही भूमी. विकास भूमीचा करायचा की भूमीपुत्रांचा? कॅलिफोर्निया करायचा म्हणजे नेमके काय करायचे? त्यावर लिहिणारे आणि बोलणारे किती जण कॅलिफोर्नियात जाऊन तिथल्या विकासाची संकल्पना समजावून घेऊन आले होते हे माहीत नाही. मी स्वत:ही एका निबंधस्पर्धेत भाग घेऊन पारितोषिक मिळवल्याचं आठवतं. काय लिहिलं होतं देव जाणे. पण आज जर तोच निबंध लिहायचा झाला तर तो नक्की वेगळा लिहीन. निबंधस्पर्धा, वक्तृत्वस्पर्धा, परिसंवाद, तर काही नुसतेच वाद, या सर्वांतून कॅलिफोर्निया भरून वाहे आणि शेवटी अरबी समुद्रात विलीन होई. डोक्यावर इरली घेऊन भातलावणी करणाऱ्या बायका, ते खपणारे गडी तसेच कोरडे राहिले. कोकणातील शेती म्हणजे काही घाटावरल्या शेतीप्रमाणे नाही. एखादा छोटासा जमिनीचा तुकडा, त्यावर वाऱ्याने सळसळणारी भाते, शेजारीच छोटेसे घर. शेणाने सारवलेले स्वच्छ खळे, बाजूला गोठावजा शेड, त्यात एखादी एखाददुसरे जनावर. या सर्व सरंजामातून जेमतेम घरापुरते दूधदुभते, भात निघणार. त्यातीलच काही बियाणे म्हणून पुढच्या पावसाळ्यासाठी राखून ठेवायचे. घाटावर सहकाराचा जसा प्रभाव तसा कोकणात आला नाही. सहकारवाल्या टोपीवाल्यांनीही कोकणात फारसा रस दाखवला नाही. भात, नारळ म्हणजे काही ऊस नव्हे. आंबा, काजूला सध्या सोन्याचा भाव आहे, पण उत्पादन तसे मर्यादित आणि धनदांडग्या शेतकरी अथवा एजंटांच्या ताब्यात. सर्वसामान्य कोकणी माणूस हापूस आंबा खात नाही किंवा भातात काजूही पेरत नाही. सरंग्याची एखादी कुडकी, किंवा बोंबील असंच काहीतरी जेवणात असायचं. अगदीच भटवाडीतील असेल तर पातळ पेज, लोणचे आणि एखादा पापड. हे असं काही असलं तरी कोकणात काम करणाऱ्याला दोन वेळचं जेवण महाग नसायचं. आजही नाही. कुठं भिकारी फारसे दिसायचे नाहीत, अथवा घरदार नसलेले देशोधडीला लागलेले कुणी दिसायचे नाहीत. हवा शुद्ध होती, काळाकरडा धूर ओकणारी कारखान्यांची धुराडी दिसत नव्हती. गर्द हिरव्या झाडीत, डोलणाऱ्या माडांत, नागमोडी लाल मातीच्या रस्त्यांत गावं शांतपणे वसलेली होती. सकाळी देवळातून घंटांचा नाद ऐकू यायचा. विहिरीवरील रहाटाची कुरकुर ऐकू यायची. जाग आलेली असे पण अंथरुणात पडल्यापडल्या डोळे मिटून हे आवाज ऐकत राहायचं. कोकणातील सकाळ अशी अलगद उठवायची. पुढं घाटावर शहरात गेल्यावर त्याची प्रकर्षानं जाणीव झाली. शहरात जाग यायची ती म्हणजे कर्कश गाड्यांच्या आणि त्यांच्या हॉर्नच्या आवाजानं. निसर्ग आणि कोकणी माणसाचं जगणं हे एक अद्वैत होतं. परस्परपूरक होतं. निसर्गनाश करून माणसाचा विकास होत नाही हे पृथ्वीवर सर्वत्र दिसत आहे. तरीही आपण एक विचित्र अनैसर्गिक अशा विकासाच्या मागे लागलो आहोत. विकास म्हणजे जंगलतोड, धूर आणि रसायने ओकणारे कारखाने, खाणकामे करून ढळवलेला भौगोलिक समतोल, सायकली ते मोटरसायकल ते गाडी,  सारवलेले अंगण असलेले टुमदार घर ते अनेक मजली इमारतीत हरवून गेलेला एखादा कोपऱ्यातील स्वतंत्र गच्चीअसलेला फ्लॅट, जत्रेला जाणं ते बँकाॅक-पट्टायाच्या सहली, आवळीभोजन वनभोजन ते कॉण्टिनेन्टल रेस्तरॉमध्ये लंच अथवा डिनर, उडप्याच्या हॉटेलातील डोसा ते मॅकडोनाल्डचा बर्गर… असं काहीसं झालं आहे. लोकांकडे पूर्वी काय नव्हतं ते या विकासातून मिळणार आहे? काही लोक पर्यटनातून विकास करायचा म्हणताहेत. परंतु नीट ऐकलं तर ते पर्यटनासाठी मूलभूत सुविधा म्हणून केवळ इमारती, हॉटेले, क्लब्ज, बोलिंग अॅलीज, गोल्फ कोर्स हे असलंच काहीतरी काढून बसणार आहेत. मोठ्ठे मोठ्ठे प्रकल्प आणणार ते स्थानिक लोकांना रोजगार पुरवण्याच्या नावाखाली. म्हणजे आज जे मुंबईत जाऊन भांडी घासता ती घरी बसून घासा. पण आमचा कोकणचा तो थोर विकासपुरुष आपण किती समाजाभिमुख विचारसरणीतून हे थोर कार्य करतो आहे ते घशाच्या शिरा ताणून सांगत असतो. ऐकले नाहीत तर राजीनाम्याचे नारायणास्त्र वापरीन असे म्हणत असतो.

गाडगीळ अहवाल लागू झाला आणि कोकणातील गावे इको सेन्सिटिव्ह क्षेत्रात गेली तेव्हा हे थोर विकासपुरुषच नव्हे तर तात्त्विक बैठकीची फुशारकी मारणारा भाजपसारखा पक्षसुद्धा वेगळा नाही हे दिसले. एकाने आपल्या राडा स्टाईलच्या सवयीने विरोध केला, तर निवडणुकीपूर्वी उतणार नाही मातणार नाही अशी ग्वाही दिलेल्या भाजपने सत्तेत आल्याआल्या सत्यनारायण घातल्याप्रमाणे हा अहवाल धाब्यावर बसवून खाणमालकांचा, लवासावाल्यांचा आणि तत्सम धंदेवाल्यांचा मार्ग मोकळा केला. ही मंडळी एकमेकांची राजकीय विरोधक पण या बाबतीत एकदम एकमतवाली. शेवटी निवडणूक निधी देणारे दोन्ही घोड्यांवर पैसे लावणार. हा जिंकला तरी चालेल, तो जिंकला तरी चालेल. पैसेवाले नेहमीच जिंकतात. प्रत्येक वेळेला हरते ती सामान्य जनता. केजरीवाल आणि अण्णा हजारे यांनी मुद्दा योग्य मांडला, पण दोघांनाही या मुद्द्यावर यश मिळवता आले नाही. याचा अर्थ तो मुद्दा चुकीचा आहे असे अजिबात नाही. जो पक्ष धनदांडग्या लोकांसाठी आहे त्याला विरोध व्हायलाच हवा, त्यांच्यावर अंकुश आणायलाच हवा. भाजपला स्वतंत्र अशी संघाच्या विचारसरणीची बैठक आहे, तर संघाने या निर्णयाला विरोध का केला नाही? दुर्घटना घडली की संघाचे कार्यकर्ते मदतीला धावतात हे चांगलेच आहे. पण इथे भाजपच्याच निर्णयाचे दूरगामी परिणाम म्हणून पुढे ज्या दुर्घटना घडतील त्या टाळता का येऊ नयेत? बरं गाडगीळ अहवालसुद्धा काही अगदी पर्यावरण हिताचा आहे असं नाही. सरकारने स्वत: नेमलेल्या समितीचा अहवाल जसा असायचा तसाच तो आहे. सरकारला खूष करणारा आणि स्थानिक जनतेला तक्रार करायला वाव न देणारा. मग या सर्व टोपीकुमारांचा या अहवालाला विरोध का? उत्तर सोपे आहे. गाडगीळसाहेबांनी आपली तैलबुद्धी वापरून एक ग्यानबाची मेख मारून ठेवली आहे. अहवाल मुळीच म्हणत नाही की या गावात उद्योगधंदे आणू नका. तो एवढंच म्हणतो की स्थानिक स्वराज्यसंस्था, ग्रामपंचायतीने होकार दिला तर वाट्टेल तो गोंधळ घाला. थोडक्यात तुम्हाला तुमच्या पर्यावरणाची वाट लावायची इच्छा असेल तर खुशाल लावा. आणि इथेच गोंधळ झाला. आतापर्यंत राजकीय नेते बड्या कारखानदार, उद्योगपतींशी साटेलोटे करून या जमिनी आपल्या बापाच्या असल्यासारख्या त्यांना आंदण देत. आता पंचाईत झाली. स्थानिक लोक, ग्रामपंचायत हे निर्णयाचे अधिकारी असणार. अर्थात मोठे राजकीय नेते स्थानिकक्षेत्रात आपापले चमचे अधिकारावर असतील याची खात्री करून घेतातच, पण तो एक अटकाव निर्माण झाला. नाना प्रकारच्या शासकीय प्रक्रिया आल्या. शिवाय कोकणातील लोक हे तैलबुद्धीचे. नको तो प्रकल्प आणला तर जबर विरोध करतात, प्रसंगी मुलाबाळांसकट निवडणुकांतून उठवतात. मग हे सर्व पक्ष एकत्र झाले आणि त्यांनी ही संवेदनशील क्षेत्रातील गावे बाहेर काढली. पेनच्या एका फटकाऱ्यात कोकणातील पर्यावरणाची आईमाई उद्धरली. आज काही लोकांना आनंद होत असेल, रोजगार मिळणार, भरभराट होणार अशी स्वप्ने ते पाहत असतील. आज हे लोक आपल्या साध्या पण  स्वत:च्या टुमदार घरात राहत आहेत. स्वच्छ हवेचा श्वास घेत आहेत. काबाडकष्ट करत आहेत परंतु त्यांना उपासपोटी झोपायला लागत नाही. हेच लोक उद्या वन बीएचके, फार तर टू बीएचके खुराड्यात राहतील, आजूबाजूची झाडे नष्ट होताना पाहतील, डोंगर बोडके होताना पाहतील, लहानपणी कसे त्यात हुंदडत होतो हे आठवून नि:श्वास टाकतील, कुंद काळ्या आकाशात शिशाचे कण असलेल्या हवेचे श्वास घेतील आणि हल्ली कॅन्सरचे प्रमाण का वाढले आहे याची चर्चा करतील. पूर्वीसारखे पक्षांचे आवाज येत नाहीत हे पाहून चुटपुटतील. एखाद्या वर्षी अजिबात पाऊस नाही तर पुढच्या वर्षी ढगफुटीसारखा पाऊस का पडतो असा विचार करत बसतील. गावातील वाहळांचे पाणी कधी आतापर्यंत रस्त्यावर आले नाही ते आता आपल्या घरात का येते आहे यावर चर्चा करतील. लेकफ्रंट बंगल्यांच्या वसाहती झाल्या, त्यांच्या किमती आपल्यालाच परवडत नाहीत, उलट उन्हाळ्यात खन्ना, कपूर, मेहरा आपल्या मर्सिडीझ गाड्यांतून येऊन तिथे राहतात, आपण त्यांच्या घरकामाला जाऊन काय मिळवले याचा विचार करत बसतील. आपल्याला हवा तसा विकास झाला नाही याची खंत करीत दुसरा दिवस ढकलण्यासाठी ताकद मिळवण्यासाठी झोपतील. अशी ही गावे झोपेत असताना, शेजारचे डोंगर हळूहळू कणाकणाने खचत असतील आणि एक दिवशी या गावांचे 'माळीण' होईल. आणि त्याचे सर्व श्रेय आपल्याच या सर्व लोकांचे आणि त्यांनी निवडून दिलेल्या या नतद्रष्ट राजकारण्यांचे असेल. कोकणाचा कॅलिफोर्निया हे तीस चाळीस वर्षांपूर्वी स्वप्न होते, स्वप्नात निदान काही तरी चांगले घडायची शक्यता असते, आता तीही राहिली नाही. स्वप्नही राहिले नाही. 

Tuesday, August 12, 2014

गाझाचा राष्ट्रवाद


जितुद्दिन संभ्रमात पडला होता. साहेबांनी आज थेट इशारा दिला नव्हता. सांकेतिक इशारा जितुद्दिनला कधीच समजत नसे. साहेब त्याला "जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं" म्हणत तेव्हा तो बारीक डोळे करून विचार करी, साहेब चेष्टा करताहेत की कौतुक हे त्याला समजत नसे. वरिष्ठं वगैरे ठीक आहे पण आपल्याला बुद्धिमतां का म्हणताहेत हे त्याच्या बुद्धीच्या पलीकडचे असे. मागे साहेबांचे काका एकदा इस्त्रायलला जाऊन ठिबकसिंचन योजना पाहून आले होते. त्या भेटीचा दूरगामी परिणाम साहेबांच्या शेतकरी कुटुंबावर झाला. शेतातील लोटा परेड बंद होऊन छानपैकी कमोड परेड आली पण अजून त्या घरात ठिबक योजनाच राबवण्यात येते. येक येक थेंब मोलाचा. म्हंजे पाण्याचा. धरणांपासून धोरणांपर्यंत इथे थेंब तिथे ठिबक हा मंत्र राबवला जातो आहे. दिसली समस्या की तंगडी वर करून धीमे धीमे टिप टिप सुरू करा असा सल्ला साहेबांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. कळत नसेल तर मान्नीय दादासाहेबांचे अनुकरण करा असेही सांगितले गेल्याचे ऐकतो. जितुद्दिन हे आघाडीचे कार्यकर्ते. आघाडीचे म्हंजे येकदम फर्ष्ट लायनीतले. त्याचा आघाडी सरकारशी काही संबंध नाही. यांची नजर साहेबांच्या हातावर खिळलेली असते. एक बोट हलले की चारी पायांवर उभे राहायचे, ते बोट एखाद्या दिशेने वळले की त्या दिशेने भुंकत चौखूर उधळायचे, जो दिसेल त्याला चावायचे, दोन बोटे वर झाली की साहेबांना बहिर्दिशेला जायचे आहे हे ओळखून जागेवर बसून राहायचे, शेपूट हलवत त्यांच्या मागेमागे जायचे नाही, असे अनेक हस्तसंकेत त्यांना माहीत आहेत. साहेबही प्रेमाने त्यांना वेगवेगळ्या क्रीडा, क्लुप्त्या शिकवत असतात. बेरजेचं राजकारण हा साहेबांचा प्रेमाचा विषय. पण या बेरजा हातचा घेऊन नाही तर हातचे राखून कसे करायच्या हे कसब अजून साहेबांनी कुणाला शिकवलेलं नाही. दिल्लीत जाऊन जगदंबा दर्शन करत बेरीज करायची आणि गल्लीत परत येऊन त्यातला हातचा काढून घ्यायचा हे साहेबांचे तंत्र. आता विधानसभा निवडणुका समोर दिसत असल्याने वेगवेगळ्या बेरजा दिसू लागल्या आहेत. कुठली बेरीज केली म्हणजे चड्डीवाल्यांच्या संख्येपेक्षा जास्त येईल बरे? अशा वेळी मग ठेवणीतील हातचे दिसू लागतात. हिरवे प्रेम उफाळून येते. जितुद्दिन आतुरतेने साहेबांकडे पाहत होताच. या वेळी साहेबांनी बोटे अथवा हात हलवला नाही. उलट त्यांनी डोके जमिनीवर टेकून आपला विस्तीर्ण पार्श्वभाग ऊर्ध्वदिशेला केला. प्रथम वाटले साहेब बैठकीत बसल्याबसल्या पुढे कोलमडले. दादापण तिथेच होते. पण त्यांना कोणतीही ऐसपैस मोकळी जागा दिसली की त्यांच्या डोक्यात सातबाराचा उतारा, खरेदीपत्र, भूसंपादन, लवासा असलंच काही तरी चालू होतं. आत्तापण तसंच झालं. ते टक लावून साहेबांच्या पार्श्वभागाकडे पाहतच राहिले. जितुद्दिन मात्र भानावर येऊन लगबगीने पुढे झाले आणि त्यांनी अदबीने साहेबांच्या खांद्याला स्पर्श केला. "साहेब, काही होतंय का? महाराष्ट्र सदनातील उसळबिसळ खाल्लीत की काय? काल मीसुद्धा खाल्ली. लेकाचे नुसता सोडा घालतात भरमसाट. मग असंच पवनमुक्तासन केल्यावर बरं वाटलं होतं." हे शब्द ऐकल्यावर साहेबांच्या मागे बसलेले दादा विंचूदंश झाल्याप्रमाणे ताडदिशी उठले आणि बाजूला जाऊन बसले. "मायला, मागं एकदा अस्संच ग्गाफीलपणे सापडलो होतो. ऑक्सिजनवर ठ्ठेवायची पाळी आली होती." असं पुटपुटणं ऐकू आलं. जितुद्दिन मात्र अत्यंत इमानी आणि विश्वासू प्रकारचे सेवक असतात त्याप्रमाणे जिवावर उदार होऊन वाट पहात थांबून राहिले. पाच मिनिटांनी साहेबांनी आसन मोडलं. "लोकहो, इतकी वर्षं आमच्याबरोबर राहून तुम्ही फक्त वजाबाक्याच कशा शिकला? रोजे चालू आहेत. विधानसभा समोर दिसताहेत. वर्गसमीकरणात अ आणि ब वाट्टेल तेवढे बदलोत, कॉन्सटंट क आपल्या बाजूनं केला की काम झालं." साहेब वदले. "आयला न्हेमी अस्सलंच क्काहीतरी सांगायचं आणि मग क्कार्यकर्त्यांनी भलतंच काही केलं की कानपिचक्या द्यायच्या. स्सगळीकडं नुसती धोरणं यांची." दादा पुटपुटले. जितुद्दिन "काय भारी बोलत्यात, पन काय तरी समजेल आसं सांगा स्वामी" असे भाव चेहऱ्यावर घेऊन उभे होते. साहेबांनी एक खिन्न नि:श्वास सोडला आणि म्हणाले,"आपल्याला हे रोजेच निवडणुकीतून तारतील. तेव्हा काय पण करा, रोजे घाला, इफ्तार पार्ट्या करा, विणलेल्या टोप्या घाला, पण ही जित्रापं आपल्या गोठ्यात आणा रे बाबांनो. म्हटलंच आहे, ज्याच्या हाती काठी तो गुराखी. " जितुद्दिन नम्रपणे म्हणाला, "साहेब, आपली जित्रापं मी कधीच आणून गोठ्यात बांधली, वैरणपाणी बघूनच आलो आहे. साहेब, आपली आवडती म्हस, सनी, पोटुशी आहे बरं का! शेजारपाजारातून आत्त्तापासूनच खरवसाचं बुकिंग यायला लागलं आहे. मी सांगितलं आहे, पहिला चीक सायबांच्या पोटात जाणार, मग तुमच्या. साताऱ्यातून एक निनावी फोन आला होता खर्वसासाठी. मी ओळखलंच कुणाचा ते. बघू असं सांगितलं त्यांना. तर रेडा कुणाचा असं विचारत होते. भयंकर आगाऊ माणूस! हा काय प्रश्न झाला? खर्वस खायचा तर रेडा कशाला बघायला हवा?" साहेबांनी खिन्नपणे जितुद्दिनचे मस्तक थोपटले आणि दादांना म्हणाले, सांगा याला जरा समजावून. "पण जे काही करायचं ते लवकर करा, ते मेणबत्ती मोर्चावाले आपल्या पुढे गेले आहेत. अभिनयात ते आपल्या पुढे आहेतच. तो मेणबत्तीमोर्चा, ते डोळ्यातील पाणी पाहून असं वाटलं की यांची कुटुंबं गाझामध्ये आहेत आणि हे भारतात नोकऱ्या करतायत. मेण वितळायच्या आधी आम्हीच वितळलो क्षणभर."

जितुद्दिन बैठकीतून बाहेर आला तोच ज्याला त्याला मुजरा घालत. टोपी नव्हती म्हणून डोक्याला रुमाल गुंडाळला होता. सायबांनी गाझा वाचवायला सांगितलं आहे म्हणाला. कुणापासून असा प्रश्न कुणीतरी विचारल्यावर जितुद्दिन बावचळला. "कुणापासून म्हंजे? जातीयवादी शक्तींपासून! सायबांनी आधीच म्हटलं होतं हा देश चड्डीवाल्यांच्या ताब्यात जाता कामा नये. तरी तुम्ही चड्डीला धरून राहिलात. घ्या आता, भोगा कर्माची फळं. झाला ना गाझावर हल्ला? पण त्या गाझाबांधवांना सांगा, आम्ही आहोत म्हणावं अजून जिवंत. आम्ही तुमच्या बाजूनं आहोत. सर्वतोपरी सहाय्य करू आणि जातीय शक्तींना विरोध करू. " अवाक झालेल्यांपैकी एकानं विचारलं,"काय हो, आज सकाळी सकाळीच? बरं वाचवणार म्हणजे काय करणार?" त्यावर जितुद्दिन जोशात म्हणाला,"हा काय, शिंप्याकडेच निघालो आहे. सायबांनी 'गाझा वाचवा' असं लिहिलेले टीशर्ट बनवून घ्या असं सांगितलं आहे. मला स्वत:ला उभं राहून शिवून घे म्हणाले आहेत. आमचा शिंपी म्हणजे तद्दन मूर्ख मनुष्य आहे. मागे लोकसभेच्या वेळी फोनवरून ऑर्डर दिली होती. घोषणा होती "भगाव चड्डी, सेव्ह राष्ट्रवादी". आता ऑर्डर देणार आमचे आबा. त्यांचं बोलणं म्हणजे दिव्यच. तंबाखूची गोळी लावून बसले असणार. तोंडात गुळणा धरून यांनी काय सांगितलं देव जाणे, आमच्या शिंप्यानं "बचाव चड्डी, शेव्ह राष्ट्रवादी" असं छापून टीशर्ट केले. आता आम्ही काय ते घातले नाहीत, पण आमचं शेव्हिंग व्हायचं ते झालंच. म्हणून या वेळेला स्वत: उभं राहून स स सशातला, सेव्ह, असं म्हणून घेऊन त्याच्याकडून बनवून घेणार आहोत. दादांनी खास XXL साईझ सांगितला आहे. हल्ली म्हणे प्यांट घालायचा कंटाळा येतो त्यांना. नुसताच टीशर्ट घालणार आहेत. मी पण मोठा साईझचा ऑर्डर करणार आहे. जेवढा शर्ट मोठा तेवढी आमची कळकळ मोठी असं नाही का? आणि खरं तर ये मेरे पापी पेट का सवाल है. म्हंजे जरा जास्तच सुटलं आहे हो! घट्ट शर्ट घातला की श्वास घ्यायचे वांधे होतात. हे टीशर्ट घालून आम्ही सक्काळी पाच वाजता महंमदअली रोडवर भेजा फ्राय खायला जाणार आहोत. साहेब म्हणाले आहेत, आपला गाझा पाठिंबा महंमद अली रोडवर पोचला की गाझात पोचलाच म्हणून समजा. आम्ही तर सायबांच्या दोन पावलं पुढं जाऊन आमची सुंताच करून घेणार होतो. पक्षासाठी "ती" प्रसववेदनासुद्धा सहन करायला मी तयार आहे. पण आम्ही सुंता करून घेतली ते आमच्या बांधवांना दिसणार कसं हो? आणि कळलं नाही तर आमचा गाझा पाठिंबा त्यांना कसा कळणार? म्हटलं फुकटच आपला ओरिजिनल स्पेअरपार्ट कशाला रिपेअर करा? तेव्हा आपला टी शर्टच बरा.