सूत्रधार : पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर नवीन अंकुर येतात, कोंब येतात, पालवी फुटते, हिरवंगार होतं सगळीकडे.सगळे हिरवे हिरवे गार गालिचे पसरलेले दिसतात सगळीकडे. सुखद असं दृश्य दिसत असतं. पावसाळा जसं नवीन जीवन घेऊन येतो तसंच प्रत्येक ऋतू काही बरं तर काही वाईट घेऊन येत असतो.
(गातो) - दिसलीस तू, फुटले ऋतू
(विंगेतून प्राॅप्टरची खणखणीत कुजबूज)- फुलले! फुलले ऋतू असं आहे ते!
सूत्रधार - हो हो! (परत गातो) फुललीस तू, सरले ऋतू.. प्राॅम्पटर ही नाटकातली किती सोय आहे नाही?
राजा - पाऊस म्हटलं ना की मला आपल्या बैठका आठवतात. परवाच छान दोन बैठका झाल्या. बाहेर पाऊस पडतोय, गडगडतंय, आम्ही बसलोय. म्हटलं... आम्ही ब स लो य.
सूत्रधार - हो हो! वा! आपलं बसणं म्हणजे काय! प्रश्नच नाही!
राजा - पावसाचा अंदाज हवामानखात्यानं दिला रे दिला की आम्ही सगळी तयारी करूनच ठेवतो. मग कुठे पाऊस पडणार आहे, त्या भागात आपले कुणी हितचिंतक आहेत का, किंवा मग आपलं एखादं फार्महाऊस आहे का असं सगळं बघावं लागतं. पाऊस आनंद घेऊन येतो, नवजीवन घेऊन येतो, तशा या काळज्याही घेऊन येतो.
परवाचा पाऊस डोंबलवाडीत पडणार आहे असं हवामानखात्याने कळवलं, मग प्रोग्राम कॅन्सल करावा लागला. तिथे डेंग्यूचे डास आहेत. आम्हीच पाळले होते, पण सुटले मच्छरदाणीतून. काय करणार?
सूत्रधार - खरंच, काय करणार? अलिकडे मच्छरदाण्यांचीही क्वालिटी खालावलीय.
राजा - पाऊस पडला की आम्ही गाव सोडून पळतोच कुठेतरी. पळावंच लागतं. अहो, लोक कविता घेऊन येतात. किती वेळा सांगितलं तरी ऐकत नाहीत. मुसक्या बांधून मास्क आवळला तरी कविता करतात. आमच्या पहारेकऱ्यांनी पोटऱ्या शेकाटून काढल्या तरी वाचून दाखवतात. काय करणार?
सूत्रधार - खरंच, काय करणार?
राजा - प्रत्येकाची संवेदनशीलता...
सूत्रधार - (मध्येच तोडत) खरंच, संवेदना नाही, शील तर नाहीच नाही..
राजा - आम्ही म्हणत होतो प्रत्येकाच्या संवेदनेची वेदना आम्ही का सहन करायची? बरं यांची संवेदना गुलाबजांबू पासून रानीवनी शीळ घालणाऱ्या बांबूपर्यंत पसरलेली असते.
गवळण १ येते (पैंजणाचे आवाज) -
साद घालतो हा वारा
घुमते शीळ हिरवे बांबू
गोडवा पसरे मनी माझ्या
जसा जिभेवर गुलाबजांबू॥
सूत्रधार - महाराज, त्याच बांबूने या कवीला वाजवू का? हुकूम द्या नुसता.
राजा - सूत्रधार, तुम्ही असं कॅरॅक्टरचं बेअरिंग सोडू नका. आमचीच प्रजा ती. कवितेने पछाडलं, बांबूने बडवलं आणि राजाने हाकललं तर कसं व्हायचं? सहन करू आपण काय करणार?
सूत्रधार - खरंच, काय करणार? अलिकडे बांबूही पूर्वीसारखे दणकट राहिले नाहीत.
राजा - अलिकडे काही वर्षांत चारोळ्या नावाचा नवीन जिवाणू आला आहे. सर्व ऋतूत असणारा पण पावसाळ्यात जास्त ॲक्टिव्ह होणारा. हा अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे मराठीत कसेबसे पस्तीस मार्कवाल्यांनाही सहज होतो. कुठल्याही उपायाला जुमानत नाही. आणि कुठेही असू शकतो. विषयाचं बंधनच नाही. कोकाकोलाच्या बाटलीचं बूच ते नारळाची, आपलं काय ते, कवटी.. हां, नारळाच्या कवटीपर्यंत कुठल्याही विषयावर चारोळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. काय करणार?
आता हीच पहा, आली बघा कशी बागडत.
गवळण २-
आला आला पावसाळा
सर सर मौक्तिकमाळा
मनी आठवणींना उजाळा
हाती ओपनरचा चाळा...
आता याला काय करणार?
पण हा रोग जसा येतो तसा आपोआप जातो. त्रास द्यायचा नुसता चंगो बांधलाय यानं. काय करणार? अरेच्या! माफ करा हं, चंग म्हणायचं होतं. हो. ते चारोळीवाले चंद्रशेखर गोखले उगाच भडकायचे आणि आणखी चारोळ्या करायचे.
सूत्रधार - खरंच, काय करणार? हल्ली चंगोही पूर्वीसारखे चारोळ्या करत नाहीत असं ऐकलं.
राजा - देवाला काळजी. चंगोंची नाही, आपली.
आला पावसाळा
पिण्याचे पाणी उकळा
चारोळ्या कविता गाळा
रोगराई नारू टाळा..
बरं, आज आमच्या मनोरंजनाची काय व्यवस्था आहे?
सूत्रधार (टाळी वाजवत) - अरे कोण आहे रे तिकडे?
(कुणीच येत नाही.)
अरे हो, महाराज, सांगायचं विसरलो. आपणच हुकूम काढून सगळ्या पहारेकऱ्यांना घरून काम करायचा आदेश दिला आहे ना? हवं असल्यास सांडणीस्वार पाठवून हशम बोलावून घेतो.
राजा - नको नको. हे हशम लोक आमची सुरक्षा फारच मनावर घेतात. परवा आम्ही महालातून धावत जात होतो तर आमच्या मागे धावत थेट पायखान्यात आले. आता आम्हाला अचानक अत्यंत निकडीने पायखान्यात जावे लागले तर तीही मुभा नाही का? बरं, एरवी पायखान्यात हे असे शेजारी उभे राहिले तर आम्हाला स्फूर्ती कशी येणार? बरं काढून टाकलं तर पायखान्यात निश्चिंत होऊन साधना करता येणार नाही. म्हणून मग आम्ही त्यांना काही दिवस घरून काम करण्याचा आदेश दिला आहे.
(दासी येऊन वर्दी देते)
- महाराजांचा निजय असो. सरकारांच्या सहाव्या राणीसाहेब, हर हायनेस सौभाग्यवती ताराबाईसाहेब येत आहेत.
सूत्रधार - मुजरा, श्रीमंत हर हायनेस सरकार.
ताराबाईसाहेब - महाराज, आज आम्ही मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो आहोत. का सांगा बरं?
राजेसाहेब (खाकरत) - प्रधानजी, तुम्हा या आता. इथून हे संभाषण कुठे जाईल हे सांगता येणार नाही.
ताराबाईसा - तुम्ही थांबा हो. आम्ही काही यांना झापण्यासाठी आलो नाही. महाराज, आज आम्ही काव्याचा एक नवीन प्रकार प्रसवला आहे.
राजेसाहेब (खालच्या आवाजात) - प्रधानजी, बघा. लग्न होऊन तीन वर्षं झाली, आमच्या आऊसाहेब नातू प्रसवण्याचा धोशा लावून आहेत आणि यांना इकडे काव्य प्रसवतंय.
(मोठ्याने) - वा वा! काव्य म्हणजे वा वा च! आम्हाला काव्यशास्त्रविनोद आवडतो. हल्ली काव्यात शास्त्र कुणी फारसं वापरत नसल्याने त्याचा काव्यविनोद झालाय तो भाग वेगळा. आम्ही तुमचं काव्य ऐकण्यास उत्सुक आहोत.
ताराबाईसा - हसायचं नाही हं. आम्ही पावसावर चारोळी केलीय.
सूत्रधार - हरे रामा! (गडबडून) म्हणजे मला म्हणायचं होतं, अरे वा!
ताराबाईसा - प्रधानजी, कळतात आम्हाला हे टोमणे. तरी तुम्हाला ऐकावंच लागेल.
[आला पाऊस सरा सरा
गळती मोतियांच्या धारा]२
मन चिंब ओले माझे
आणि तन मोरपिसारा..
राजा - वाहवा वाहवा वाहवा! क्या बात क्या बात क्या बात!
(थांबतो, हळूच म्हणतो) प्रधानजी, जरा जास्तच दाद गेली का?
सूत्रधार - मलाही स्फूर्ती येतेय महाराज!
महाराज - करा, तुम्हीही करा.
सूत्रधार -
[आला पाऊस सरा सरा
शोधा छत्री अन् डोक्यावर धरा]२
डोके राहिले स्वच्छ कोरडे
चिंब टिंबटिंब अन् चिखल धोतरा..
राजेसाहेब - वाहवा वाहवा! म्हणजे.. मला म्हणायच होतं, लाहोर विलायतकुवत! राणीसाहेबांच्या चारोळीचं विडंबन करताना तुम्हाला भीती नाही वाटली?!
सूत्रधार - महाराज, ते लाहोल विलाकुवत असं असतं.
राजेसाहेब - खामोष! वर आम्हाला अक्कल शिकवता?? याची सजा तुम्हाला मिळालीच पाहिजे! ऐका! यापुढे राणीसाहेब ज्या काही कविता करतील त्या सर्व त्या तुम्हाला ऐकवतील! ही सजा तुम्ही एक वर्ष भोगायची आहे.
सूत्रधार - माफी! माफी!
[आला पाऊस सरा सरा
धरती चिंब झुळझुळ वारा]२
रयत सुखी समृद्ध झाली
सरकारांचा त्यांना सहारा..
राजेसाहेब - वाहवा! वाहवा! वाचलात प्रधानजी! तुमच्या उस्फूर्त प्रतिभेकडे पाहून तुमचा प्रमाद आम्ही माफ करतो आहोत.
(दोघे हसतात आणि टाळी देतात)
ताराबाईसा - हं:! कळतात आम्हाला तुम्हा दोघांची बोलणी! आमच्या कविता म्हणजे सजा काय! येतो आम्ही!
महाराज - अहो राणीसाहेब, अशा नाराज होऊ नका. आम्हाला आवडली तुमची कविता. इतकी आवडली ती आता आम्हालाही कविता होतेय अशी भावना होऊ लागलीय.
[आला पाऊस सरा सरा
पाझरला कल्पनेचा झरा]२
राजा असो वा कोणी रंक
त्याला उदार मनाने माफ करा
(मोठ्याने हसतो)
सूत्रधार - वाह महाराज, वाह! महाराजांचा कल्पनासूर्य माध्यान्हीच्या सूर्याप्रमाणे तळपतो आहे. या सूर्याच्या दिव्य तेजापुढे भले भले कवी अगदी काजव्याप्रमाणे क्षीणतेज वाटतील. आपल्या प्रतिभेच्या उत्तुंग शिखरापुढे मेरूमांदार धाकुटे पडतील. तिच्या गतीसी कुठलीच तुळणा नसे. तिच्या आरक्त प्रभेने सूर्यमंडळ ग्रासून टाकले आहे.
महाराज - अहो! पुरे! स्तुती करताहात की भीमरूपी महारुद्रा म्हणताहात? आता चपळांग पाहता मोठे करा आणि विद्युल्लतेपरी जाऊन राज्याची काय व्यवस्था आहे ते पाहून या. थांबा, शेवटची चारोळी ऐका आणि जा
[पाऊस आला सरा सरा
इकडून तिकडे गेला वारा]२
जित्याची खोड काही सुटेना
र ला ट लावा, पण कविता करा
Hilarious
ReplyDelete