Tuesday, March 29, 2016

आमचीही निष्काम साहित्यसेवा

(म्हाळसाकांत पोंबुर्पेकराची क्षमा मागून)

तीन वाजायला आले होते. परेशभाईंनी (विश्वस्त, डॅलस फोर्टवर्थ हिंदू टेपल) आपल्या हातातील दानशूर टिकमसेठ दारूवाला यांनी दान केलेल्या कीचेनमधील पाच नंबरची किल्ली लावली आणि संस्कारभवन, हिंदू टेंपलचे पश्चिमेकडील सहा बाय दहा फुटाचे प्रशस्त दार उघडले. ओंकार पोटे आणि आदित्य जोशी या अर्लिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये तृतीय वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी देवळाने देऊ केलेली तीन बाय आठ फुटांची दणकट टेबले (नेट वजन पंधरा किलो चारशे ग्रॅम प्रत्येकी) आत आणली. तेवढ्यात मंदार वाडेकरांनी दरडोई $१० अशा माफक दराने मिळवून आणलेले फेटे घेऊन विशाल खापरे कमिटीच्या मस्तकावर बांधायला सज्ज झाले. त्यांच्या हातात रात्री उशिरा बसून लिहिलेली सूत्रसंचालन संहिता झळकत होती. खास कार्यक्रमासाठी मागवलेला $२०० चा रेबॅन त्यांचं व्यक्तिमत्व भारदस्त करीत होता. तेवढ्यात मंडळाचे अध्यक्ष अतुल चौधरी आपल्या पिवळ्याजर्द व्हेलोस्टर स्पोर्टस कारमधून आले. गाडीतून बाहेर पडताना त्यांनी सवयीने आपल्या मनगटावरील ६४ गिगाबाईट क्षमतेच्या सॅमसंग कंपनीच्या शहाण्या (पक्षी स्मार्ट) घड्याळाकडे ओझरती नजर टाकली. त्यांच्या चेहऱ्यावर ओल्ड स्पाईस चोपडलेले आहे हे खजिनदार सुजित साठे यांनी आपला पाय मुरगळलेल्या स्थितीत असतानाही ताडले. त्याही परिस्थितीत त्यांनी चौधरींकडे मागील हिशोबाची मागणी केली. चौधरी रात्री उशिरापर्यंत अध्यक्षीय लिहीत बसल्यामुळे थकलेले वाटत होते. "अध्यक्षीय" मधील क्षी ऱ्हस्व की दीर्घ यावर त्यांनी पूर्ण एक तास खर्च केला होता. शेवटी त्यांनी प्रेसिडेंशिअल असा पूर्ण मराठी शब्द वापरायचे ठरवले होते. त्यांना पाहून अजित जगताप आपल्या धी न्यू टेक्सास ड्रायक्लीनर्स कडून कडक ड्रायक्लीन करून आणलेल्या सुरवारीत टुणकन उडी मारून उभे राहिले. आणि वाटेत सुशिल द्रवेकर यांनी भातुकलीतील बुडकुल्यांप्रमाणे ओळीने मांडून ठेवलेले चार शुरे एसएम ५८ आणि दोन सेनहाइजर ई८३५ असे सहा माईक्रोफोन स्टॅंड आणि त्याच्या एक्सएलआर केबल्स शिताफीने ओलांडत फेटा मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असलेल्या प्रसाद चंद्रात्रे यांच्यापाशी पोचले. वेळ खूप कमी असल्याने चौधरींना आवरण्यासाठी काय योजना आहे अशी त्यांनी विचारणा केली. उत्तरादाखल चंद्रात्रेंनी घरून आणलेले चहाचे स्टीलचे पिंप जगतापांकडे सोपवले. चौधरींचे बोलणे थांबवायचा एकच उपाय आहे असे ते म्हणाले. एका हातात नाबरांनी यशस्वीरीत्या स्वस्तात मिळवलेली मिसळीची प्लेट, दुसऱ्या हातात त्याच दरात बसवलेला चहाचा ग्लास आणि आश्चर्यकारकरीत्या पुन्हा त्याच किंमतीत बसवलेला बटाटेवडा तोंडात दिल्यास चौधरींना साधारणपणे पंधरा मिनिटे थोपवून धरता येईल असे ते म्हणाले.  हे असे होत असताना पूर्णिमा नाबर यांनी प्रचंड वैयक्तिक वेळ खर्च करून घासाघीस करून माणशी फक्त $क्ष (किंमत जाहीर करू नका अशी धमकीवजा सूचना आम्हांस मिळाली असल्याने हा अत्यंत धक्कादायक दर आम्हांस उघड करता येत नाही त्याबद्दल क्षमस्व) अशा अत्यंत वाजवी दरात मिळवलेला तो अल्पोपाहार तिथे घेऊन आले खुद्द सह-खजिनदार अमित अर्काटकर. केटररने अर्काटकरांचे भारदस्त मर्दानी व्यक्तिमत्व पाहून सगळ्या पदार्थांसोबत आपणहून शिराही दिला होता हे पाहून खजिनदार साठे आपण जायबंदी आहोत हे विसरून बाहू पसरून पुढे धावले. ते पाहून अर्काटकरांनाही भरते येऊन त्यांनीही आलिंगनासाठी हात पसरले. परंतु साठे थेट शिऱ्याच्या ट्रेपाशी पोचले आणि त्या पूर्ण ट्रेलाच त्यांनी आलिंगन दिले. ती भरतभेट पाहून मंडळाच्या उपस्थित असलेल्या सर्व म्हणजे वट्ट १२ कमिटी मेंबरांच्या डोळ्यांत पाणी आले. वेळप्रसंगी आपला हा खजिनदार कामासाठी एका पायावर उभा राहू शकतो हे पाहून मावळ्यांची स्वराज्यासाठी दिलेले सर्वस्व पाहून महाराजांना कसे कृतकृत्य वाटत असेल त्याची छोटीशी का होईना अनुभूती प्रत्येकाला आली.

कार्यक्रमाची सुरुवात अतुलानंद चौधरी यांच्या दोन शब्दांनी झाली. चंद्रात्रेंनी दिलेल्या सूचना तंतोतंत पाळत राजश्री वाराणशीवार आणि शामली असनारे यांनी स्ट्रॅटेजिक लोकेशनवर अल्पोपाहाराचे पदार्थ मांडले. त्याकडे अधूनमधून नजर टाकत चौधरींनी बरोबर दोन मिनिटे आणि बारा सेकंदात भाषण संपवले. हे त्यांचे आजवरचे सर्वात कमी वेळेचे भाषण होते असे मंडळाचे ज्येष्ठ सदस्य मिलिंदकाका पंडित यांनी विस्फारलेल्या डोळ्यांनी सांगितले. मिलिंदकाका हे गेली तीस वर्षे मंडळाशी संबंधित असून अनेकांची भाषणे पचवून आजही ताठ उभे आहेत. अतुलानंद चौधरींच्या सहधर्मचारिणी वैदेही चौधरी आणि वैदेही यांची सखी राजश्री वाराणशीवार या दोघांनी त्याला दुजोरा दिला. त्या दोघींनी चौधरींचे भाषणच नव्हे तर त्यांचे गाणेही सहन केले आहे. आजही तशी कठीण वेळ आली की वाराणशीवार,  वैदेही चौधरी यांच्या सांत्वनास जातात आणि त्यांना धीर देतात. वाराणशीवारांना त्यांचे पती कोठे आहेत असे आम्ही विचारले. तर ते देवळात आले आहेत, आणि सवयीमुळे थेट देवळाच्या स्वयंपाकघरात गेले आहेत असे त्यांनी सांगितले. प्रसादाचा स्वयंपाक वगैरे करावयाचा नसला तरी ते तेथे जाऊन उगाच पळी पातेल्यांना हात लावून येतात असे कळले.  आपल्या यजमानांनाही गाण्याबजावण्याचा नाद असल्याचे वाराणशीवारांनी हळूच कबूल केले. ते गातात, मी नको म्हणून बजावते. म्हणून तर ते गाणंबजावणं. "पण काय करणार? आपलं माणूस जसं जसं असतं तसं तसं बदलावं लागतं." असेही त्या म्हणाल्या. शामली असनारे शून्यात नजर लावून अतिशय वाजवी दरात मिळवलेल्या त्या मिसळीचा रस्सा ढवळत होत्या. नाबरांनी ते पातेले उचलून दुसऱ्या टेबलावर ठेवले तरी त्याचे त्यांना भान नव्हते. त्या टेबलावरच डाव फिरवत राहिल्या. न राहवून आम्ही विचारले, "आज शिवबांची आठवण येते आहे ना?" त्यावर त्या म्हणाल्या,"होय हो. आमचे शिवबा लास व्हेगासला मोहिमेवर गेले आहेत. तो प्रांत दुर्गम, बेलाग अशा गडांनी भरलेला आहे. उगाच कुठे एखादा सर करायला जाऊ नका असे बजावले आहे. पण तिकडून आलबेलच्या तोफा झाल्याशिवाय चैन नाही हो पडायची." असे म्हणून त्यांनी किफायतशीर दरात मिळवलेल्या बटाटेवड्याच्या ट्रेमधील एका जास्त तळल्या गेलेल्या बटाटेवड्यावर मायेने हात फिरवला.

अचानक "परतापगडच्या पायथ्याशी खानsssss!" अशी आरोळी कानी पडली. दचकून पाहिले तर अमित अर्काटकरांनी टिपेचा सूर लावला होता. आपल्या गाडीतून अल्पोपाहार कार्यक्रमस्थळी आणताना गाडीत चहा सांडला होता, त्यामुळे त्यांची जी चरफड झाली होती, तिचा त्वेष त्या आवाजात भरला होता. पुढील रांगेत बसलेले काही जण बेसावध होते. ते प्रतिक्षिप्त क्रियेने बसल्याबसल्या फूटभर मागे सरले. नेहमी मेरूपर्वताप्रमाणे खंबीर आणि धीरगंभीर दिसणारे विनायक आगाशेसुद्धा थोडेसे दचकले. पण थोडेसेच. त्यांनी भुवया थोड्या उंचावल्या इतकेच. पोवाड्याच्या सुरुवातीला बिचकलेले लोक हळूहळू सावरले. अफझलखान शामियान्यात येईपर्यंत काहीजण स्फूर्तीने उभेही राहिले होते. जेव्हा वाघनखे खानाच्या पोटात शिरली तेव्हा तर एकदोघेजण खुर्चीवर उभे राहिले आणि घोषणा देऊ लागले होते. जेव्हा ते भानावर आले तेव्हा पोवाडा संपला होता आणि त्यांच्या धर्मपत्न्या त्यांच्याकडे रोखून पाहत होत्या. त्यांच्या नजरेत "हाच आवेश घरची कामे करतानाही दाखवा!" असा भाव होता असे आम्हांस तरी वाटले.

पोवाडा संपतो न संपतो तोच बाहेर ढोलताशाचा कडकडाट झाला. पाहतो तर अमित जोशी आणि हरीश नेहाते हे भारतातून स्वखर्चाने घेऊन आलेले ढोल आणि ताशे घेऊन उभे होते. ढोल अगदी नवे कोरे होते. त्याच्या वादीवर रु. २५०००/- चे लेबल दिमाखात झळकत होते. दोघांनी मिळून स्टिक (रु.१०००/- मात्र प्रत्येकी) ढोलावर हाणून वातावरण दणाणून सोडले. मिरवणुकीसाठी (पुन्हा) पूर्णिमा नाबर यांनी आपल्या घरातून अत्यंत अशी तेजस्वी मुद्रा असलेला २ फूट बाय अडीच फूट अशा साईजचा शिवरायांचा भव्य फोटो आणला होता. त्या फोटोला मुजरा करून देवळाच्या आग्नेय दिशेच्या कोपऱ्यातून मिरवणूक सुरू झाली ती दक्षिणेला साधारण ३०० फुटावर जाऊन पश्चिमेला वळली. तिथून साधारण ५०० फुटापर्यंत जाण्याचे ध्येय गाठायचेच असे मनात बाळगून जोषात मिरवणूक पुढे जाऊ लागली. देवळाच्या साधारण वायव्येला, ध्येयापासून केवळ २० फूट अंतरावर असताना काही तरी फाटल्याचा भीषण आवाज झाला. बहुतेक मावळे सुरवार परिधान करून असल्यामुळे साहजिकच घबराट पसरली. लांब अंगरखा असल्याने अनेकांनी नि:श्वास सोडून इथे तिथे चाचपून खात्री करून घेतली. सुरवारीत काही दगाफटका झाला नसल्याचे बहुतेकांच्या निदर्शनास आले. अधिक तपासाअंती अमित जोशी यांच्या ढोलातून हा आवाज आल्याचे कळले. पाहतो तर ढोलाचे कातडे फाटले होते. काही म्हणा, ढोल फाटला की वाजवणाऱ्याची हवा जाते. ढोल फाटला! ढोल फाटला! असा आरडाओरडा झाला! मावळ्यांची पांगापांग होऊ लागली. जरी तानाजी धारातीर्थी पडला तरी शेलारमामा धावून आला. तसेच झाले, इथे हरीश नेहाते धावून आले आणि म्हणाले,"थांबा! जाता कुठे! माझा हा ढोल अजून शाबूत आहे! फिरा मागे!" आणि जल्लोष झाला. गाड्यांपर्यंत पोचलेले मावळे माघारी आले. मिरवणूक ध्येयाप्रति पोचली. मग निखिल पोटभरे यांनी आपल्या आयफोन सिक्सच्या आलिशान भव्य पडद्यावर पाहून महाराजांचा विजयघोष गूगलला. व्हरायझनचे नेटवर्क असल्यामुळे त्यांना तो लगेच मिळाला. "गणपती… भूपती…. प्रजापती…. सुवर्णरत्न श्रीपती…. अष्टावधान जागृत…." अशी त्यांनी सुरुवात केली. दोन मिनिटे झाली तरी लोकांना "विजय असो!" ची आरोळी मारायची संधी दिसेना. अस्वस्थ होऊन कुणीतरी म्हणाले,"देऊळ बंद होईल हां सात वाजता." पण मग तोवर पोटभरे "श्री छत्रपति शिवाजी महाराजांचाssssss" वर आलेच होते. मग नोंदणीकृत अशा साधारण १३० प्रौढ (अधिकृत आकडा, चू. भू. दे. घे.)  आणि ८० बालकांनी "विजय असोsssss!" ची गगनभेदी आरोळी दिली आणि शिवजयंती संपन्न झाली.

Sunday, March 27, 2016

कान्होबा आणि नाटक मंडळी

आटपाट नगर होतं म्हणणार होतो. पण राज्य बिहारचं आणि धाक सीपीआयचा असल्यामुळे अटना सटना नगर होतं म्हणणं ठीक होईल. गावकरी आनंदी वृत्तीचे. सीपीआयच्या कृपेनं कसलाही उद्योगधंदा नसल्यामुळे मंडळी सुखात होती. सक्काळी उठावं, दारातल्या लिंबाच्या किंवा बाभळीच्या झाडांच्या तळाशी काटक्या पडलेल्या असत. कुठलीही एक उचलावी, आणि ती दातांत धरून, डोळ्यातील चिपाडं काढत शून्यात नजर लावून अनिवर्चनीय अशा आनंदात बसून राहावं, गाई गुरांनी भंवताल हंबरून, डुरकून सोडलेला असावा, एखाददुसऱ्या गुरानं आपल्या अंतरंगातील रंग भुईवर टाकले असावेत. ती रंगपंचमी चुकवत, त्यातून वाट काढत शेताकडे जावं, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकत शेताच्या बांधावर बसावं, उघड्या पार्श्वभागाला पहाटवारा लागून अंगावर शिरशिरी यावी, त्याबद्दल मनोमन शिवी हाणत कार्य नेटाने सिद्धीस न्यावं असं निरागस आयुष्य होतं ते. कान्ह्याचं आयुष्यही असंच होतं. असाच तो आज घरातून बाहेर आला. डोळे अर्धवट उघडे ठेवून चालताना तो कशाला तरी अडखळून धडपडला. "च्यायला! म्हातारं काल परत पिऊन आलं वाटतं…" असं पुटपुटत त्यानं लाथेनं पायात आलेली बाटली दूर ढकलली. मग काहीसा विचार मनात येऊन तो त्या बाटलीपाशी गेला. ती उचलून ती उलटी करून तोंडावर धरली. एखादा उरला सुरला थेंब मिळाला तर बरंच असा विचार त्याच्या डोक्यात आला असावा. पण कान्ह्याचा बाप एक थेंबसुद्धा सोडण्याची शक्यता नव्हती हे कान्ह्याला माहीत होते.  बाटलीच्याजवळ उभे असताना एक जबरदस्त दर्प त्याच्या नाकात घुसला आणि तळमळून तो तेथून दूर झाला. "शुद्ध थर्र्यापोटी धार फेसाळ मोठी" असे एक संतवचन त्याने तिथल्यातिथे प्रसवले. कान्होबाच्या या असल्या सृजनशीलतेचा त्याला पुढे मोठेपणी जहरलाल पेरू युनिव्हर्सिटीत गेल्यावर खूप उपयोग होणार होता. अर्थात आत्ता वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षी त्याला त्याची जाणीव नव्हती. पण बापाने आपल्यासाठी एकही थेंब ठेवू नये याचे त्याला वैषम्य वाटले. मागे एकदा त्याने बापाची नजर चुकवून बाटली तोंडाला लावल्यावर बापाने ती हिसकावून घेऊन दोन कानफटीत दिल्या होत्या. त्यावर कान्ह्याने एक दिवसाचे तात्कालिक उपोषण करून निषेध व्यक्त करायचा प्रयत्नही केला होता. परंतु उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी कुणीच फिरकले नव्हते. मग कान्ह्याने पिणे हा माझा व्यक्त होण्याचा मार्ग आहे आणि त्यावर चालण्याचे किंवा अडखळण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला हवे असे बापाला सांगितले. त्यावर बापाने अजून दोन लगावून दुसरा कानही बधीर केला होता. मग शेतीत आपलेही श्रम आहेत त्याचा मोबदला म्हणून तरी द्या असा त्याने युक्तिवाद केला होता. वास्तविक कान्ह्याचे शेतीतील योगदान हे जे सकाळचे जे त्याचे बांधावरचे आन्हिक होते तेवढ्यापुरतेच होते. तसे त्याच्या बापाने त्याला ठणकावले होते. बाप वसुदेवच असा कंस निघेल असे वाटले नव्हते. सीपीएमवाले कंठरवाने सांगत गांवभर फिरतात ती पिळवणूक हीच असावी. कान्होबाच्या मनात अन्यायाविरुद्ध ठिणगी इथेच पडली. आपण एवढं कुंथून कुंथून शेताला सोनखत द्यायचं आणि त्याचं कुणाला काहीच कवतिक असू नये? विषण्ण मनाने कान्ह्याने बाटलीकडे पाहिले. तेवढ्यात बापाला धडा शिकवायचा एक नामी विचार त्याच्या डोक्यात आला. त्या चपट्या बाटलीत शिवांबू भरून हळूच बापाच्या सदऱ्याच्या खिशात ठेवून द्यावी. पण त्याचे संभाव्य परिणाम पाहता हा छोटासा बदला बराच महागात पडला असता असा विचार करून तो गप्प बसून राहिला. "ससुरा बहुतही ड्रामेबाझ है" हे त्याच्या बापाचे त्याच्याबद्दलचे मत चिंत्य होते.

त्याच्या कानावर जहरलाल पेरू युनिव्हर्सिटीचे नाव कधीच पडले नव्हते. पण दहावीला इतिहासाच्या पेपरात त्याने इतिहास घडवला आणि जहरलालचे मास्तरच त्याला शोधत आले. भारत हा कधीच माझा देश नव्हता, त्याच्या इतिहासाच्या पेपरला मी का बसावे असे क्रांतिकारी उत्तर त्याने उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावर लिहून बाकीच्या पानांवर सीताराम येचुरी, लालूप्रसाद यादव, मुल्ला मुलायमसिंग, केजरीखान इत्यादि लोकांची रेखाचित्रे काढली होती. शाळेत असताना नाटक या विषयावर मात्र त्याचे विशेष प्रेम होते. आपल्या तीव्र स्मरणशक्तीच्या जोरावर तो पानेच्या पाने उतारे मुखोद्गत करीत असे. कृष्णाची भूमिका तो जबरदस्त ताकदीने करीत असे.   मग पुढे तो पीपल्स थीएटर असोसिएशन चा सदस्य झाला. या असोसिएशनमध्ये सर्व रंजलेली गांजलेली मंडळी येत. प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवणे हे आपले कर्तव्य आहे आणि नाट्यप्रकारातून आपण ते साध्य करणार आहोत असे ते मानत. कान्ह्याच्या मनात आपल्या बापाने केलेल्या शोषणामुळे तीव्र असंतोष निर्माण झाला होता. काही तरी केले पाहिजे असे त्याला सारखे वाटत राही. पण बापाने आपल्यावर नेमका कसला अन्याय केला आहे याबद्दल त्याच्या मनात गोंधळ होता. कधीतरी एकटे असताना त्याला अपराधी वाटे. बाप भल्या सकाळी उठून शेतावर जातो, राबतो हे दिसत असे. पण आपल्यावर अन्याय होऊन राहिला आहे असे वाटणे गोड वाटे, सेल्फ-पिटी सारखे मादक द्रव्य नाही. सगळ्यात सोयीचे म्हणजे हे करताना स्वत: काहीच करावे लागत नव्हते. पण अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा हे बिरुद आपोआप मिळून जात होते. असोसिएशनवाले सगळेच असे होते. यांच्या नाटकात एक तरी पात्र कार्ल मार्क्ससारखे दाढी वाढवून दिसे. अगदी द्रौपदीवस्त्रहरणा सारख्या नाटकातूनसुद्धा साम्यवादाचा डोस मिळे. द्रौपदी आणि तिचे पाच नवरे हे साम्यवादाचे उत्तम उदाहरण आहे असे या मंडळींचे मत होते. या नाटकात कृष्ण कार्ल मार्क्ससारखी दाढी लावून येई आणि द्रौपदी नावाच्या कर्मचारी वर्गाचे  दु:शासनादि प्रस्थापित वृत्तीच्या प्रभृतींनी चालवलेले शोषण थांबवे. द्रौपदीला पाच नवरेरूपी जनतेच्या मालकीचे करताना कृष्ण अभिमानाने दाढी कुरवाळत "साम्यवादाची एकच व्याख्या, लक्षात घ्या. मालमत्ता ही सर्वांची, आनंदे वाटून घ्या!" हे वाक्य जेव्हा टाके तेव्हा कडाडून टाळी पडे.  या नाटकांना प्रामुख्याने पुरुषवर्गच हजर असे. नाटकानंतर द्रौपदीशी हस्तांदोलन करण्यासाठी मेकअप रूममध्ये झुंबड उडे.

कान्ह्याच्या नाटकाला प्रॉम्प्टरची गरज कधीच भासत नसे. स्टेजवरच तो इतर नटांना त्यांचा संवाद आला की "टचिंग" देत असे. पण पुढे पुढे त्याची ही खोड इतर नटांना त्रासाची होऊ लागली. कारण प्रेक्षकांना त्याचे "टचिंग"च जास्त ऐकू येऊ लागले होते. इतर नट हा आमची वाक्ये खातो अशी तक्रार करू लागले. मग एकदा "कृष्णलीला" नाटकाच्या प्रयोगाला ऐन वेळी राधा आणि तिच्या सख्यांनी असहकार पुकारला आणि आम्ही काम करणार नाही असे सांगितले. त्यावर कान्ह्याने शांतपणे सर्वांची कामे स्वत:च केली, स्वत:च सर्वांचे डायलॉग म्हटले. "गवळणींचे कपडे लांबवणे" प्रवेशात तर केवळ चड्डी बनियनवर त्या अदृश्य डोहाच्या पाण्यात आपली लज्जा रक्षणाचा प्रयत्न करतानाचा त्याचा अभिनय केवळ लाजवाब होता. एक हात छातीवर आडवा धरून दुसरा हात उंचावत "कन्हैयाssss! दे दो हमरी चुनरी हमे वापस! तुम्हे तुम्हारे राधा की कसम!" असं म्हणत जेव्हा या माफक मिशीवाल्या गवळणीने टाहो फोडला तेव्हा प्रेक्षकांत हुंदका फुटला. जहरलाल पेरूचे काही प्राध्यापक आणि प्राध्यापिका या प्रवेशाला हजर होते. हुंदके देणाऱ्यात या प्राध्यापिकाही होत्या. त्या एवढ्या प्रभावित झाल्या की काहींनी तिथल्या तिथे आपल्या ओढण्या कान्ह्याला देऊ केल्या असे ऐकिवात आहे. काहींच्या मते हे खरे नाही. ओढण्याच काय इतरही काही वस्त्रविशेष दान करण्याची त्यांची तयारी होती असेही बाजूच्याच खुर्च्यांवर बसलेल्या काहींनी ऐकले. खरे खोटे देव जाणे. श्रीकृष्णाने स्वत:च्या प्रतिमेने आणि प्रतिभेने स्त्रीवर्गास आपल्या प्रेमात पाडले होते, इथे तर या आमच्या कान्ह्याने स्वत:च्याच रूपात काय मिशीवाल्या गवळणीच्या रूपातही ते काम करून दाखवले. इथेच पेरू युनिव्हर्सिटीने कान्ह्याला केवळ प्रवेशच दिला नाही तर दत्तकसुद्धा घेतले. या होतकरू गुणी बाळाला जवळ घेऊन कुरवाळत अनेक प्राध्यापिकांनी "हा बालक पुढे उत्तम नट होईल. अगदी केजरीवालही याच्यापुढे पार ओम प्रकाश भासेल." असे भाकित वर्तवले. त्यांच्या मते राधेचं काम करणाऱ्या त्या प्रत्यक्ष नटीपेक्षा कान्ह्याची ही मिसरुड फुटलेली राधा भाव खाऊन गेली. कान्हा मग पुढे पुढे तो एकपात्री प्रयोगच करू लागला. त्याच्या प्रत्येक प्रयोगाला तुफान गर्दी होत असे. मध्यंतरात हजारो बटाटेवडे, चारचारशे लिटर चहा विकला जाऊ लागला. मध्यंतरात किती बटाटेवडे खपतात त्यावर नाटकाच्या यशाची मोजणी करण्याचे तंत्र तसे जुने आहे. इंद्रायणी, प्रगती, डेक्कन आणि पुण्याचे जोशी वडेवाले यांच्याकडे एकत्र मिळून जेवढे बटाटेवडे एका आठवड्यात खपत तेवढे कान्ह्याच्या एका शोला खपू लागले. यशाचे याहून अधिक उंच शिखर आम्हांस तरी माहीत नाही.

या धामधुमीत कान्हा जहरलाल पेरू युनिव्हर्सिटीत येऊन दाखल झाला. दिल्ली हे नाटकाचे केवढे मोठे व्यासपीठ आहे याचा त्याला पहिल्या काही दिवसांतच प्रत्यय आला. केजरूकुमार हा आघाडीचा नट सध्या ते व्यासपीठ गाजवत होता. त्याची ती काळजीपूर्वक जोपासलेली दीनदुबळी, सर्वसामान्य माणसाची इमेज, ते खोकत शिंकत आपल्याला शारीरिक त्रास होत असतानाही केवळ जनतेसाठी आपण झिजत आहोत असे दाखवत चिरकलेल्या आवाजात दिलेली ती भाषणं, कॅमेरा ऑन व्हायच्या आधीची मग्रूर छबी तो ऑन होताच क्षणार्धात हीनदीन करण्याचे ते कसब हे सगळं पाहून कान्हा पार भारावून गेला. पेरू युनिव्हर्सिटीत आल्यावर त्याच्यापुढे साम्यवादाचेच नव्हे तर सौम्यराष्ट्रवादाचेही दालन खुले झाले. भारतातील जनता फारच संकुचित जिणे जगत आहे याची त्याला जाणीव झाली. संसदेवर साधा हल्ला करण्याचेही व्यक्तिस्वातंत्र्य भारतात नाही हे पाहून त्याच्या आधीच असंतोषी असलेल्या मनाचा भडका उडाला. लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही तर त्याच लोकशाहीत लोकांनाच लोकांनी लोकांसाठी लोकांच्या पैशाने बांधलेली इमारत प्रतीकात्मक पद्धतीने उध्वस्त करता येऊ नये? अशा पद्धतीने व्यक्त होऊ पाहणाऱ्या लोकांना गुन्हेगार, दहशतवादी म्हणून जाहीर करायचं? आपला बापही याच व्यवस्थेचे प्रतीक आहे तर. या अवस्थेविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. हे विचार त्याने आपल्या प्राध्यापकापाशी मांडले आणि एक पथनाट्यनिर्मिती करून व्यक्त होण्याचा निर्धार व्यक्त केला. प्राध्यापकमहाशयांनीही "क्रांतिकारी! बहुत ही क्रांतिकारी!" असे म्हणून त्याची पाठ थोपटली. नंतर कान्ह्याने आपल्या भूमिकेचा बारकाईने अभ्यास केला. पूर्ण विचारांती या पथनाट्याचा हिरो कसा असावा हे ठरवले. शारीरिक बोली केजरीकुमार यांची असावी हे ओघानेच आले. ते त्याचे हिरो होतेच. त्याने अनेकवेळा आरशासमोर उभे राहून, डोक्याला मफलर गुंडाळून आपण कसे दिसतो ते पाहिलेही होते. बांधणी किरकोळ, चिरका आवाज, हट्टी रुसलेला चेहरा, येस्स! स्कोप नक्कीच होता. ड्राम्याची सोय झाली. आता बोलण्याची लकब. लहजा सुदैवाने मठ्ठ पण मुजोर बिहारी लालूसारखा होताच. तो प्रश्न मिटला. करमणूक म्हणून थोडा दिग्विजय सिंगांचा आचरटपणा पण घालावा काय यावर प्राध्यापकांचा सल्ला घेतला. गर्दी जमायला मदत होईल असा त्याचा होरा होता. त्यावर साम्यवादी विचारसरणीत हास्यप्रकार बसत नाही असे सांगून त्यात प्राध्यापकांनी मोडता घातला. केजरीकुमाराचे बेअरिंग आण, गर्दीचा प्रश्न मिटेल असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले, पण एक गोष्ट अगदी कसोशीने पाळ. कृपा करून बालगोपाळांच्या रंजनासाठी त्या छोटा भीमाला आणू नकोस बुवा! त्यासाठी कॉंग्रेस पुरेशी आहे. त्यांच्या कुरणात आपल्याला चरायचं नाही. 

कान्ह्याने जान ओतून पथनाट्य सादर केले. त्याने पेरू युनिव्हर्सिटीच्या क्याम्पसपुरता का होईना इतिहास घडवला. त्याच्या अभिनयाने स्वत: केजरीकुमार प्रभावित होऊन त्यांनी आपल्या डोक्यावरचा मफलर काढून कान्ह्याच्या गळ्यात घातला. त्याची अलाबला घेत त्यांनी जवळजवळ त्याचा मुकाच घेतला. येचुरी तर बेभान होऊन नाचत होते. आपल्या धोतराचा कासोटा सुटल्याचेही भान त्यांना राहिले नव्हते. लालू आपल्या गोधनासमवेत अकरा मुले आणि एक बायको यांची तिकिटे काढून आले होते. राबडीदेवींनी वारंवार "इ का हो रहा है" असे विचारून त्यांना भंडावून सोडले होते. "ऐसन नौटंकी देखनेवास्ते हमका इहां इतनी दूर लाने की कौनव जरुरत नाही थी. इससेभी बढिया नौटंकी आप हर रोज करत हो." असे त्यांनी लालूंना स्पष्ट सांगितले. त्यावर लालूंनी त्यांना "इ लडका होनहार है. अपने गांव का है. इका प्रोत्साहन हम देंगे. हमका अकरा बच्चा तो है. उसमें तनिक ये बारहवां मिलाय लो." असे सांगितले. या सगळ्या गडबडीत एक भारदस्त देहबांधणीचा इसम खूप आनंदात नृत्य करताना दिसत होता. केजरीकुमारांना त्याचे कौतुक वाटून ते त्याच्यापाशी जाऊन "भाईसाहब, क्या बात है! हम भी नाचेंगे आपके साथ." असे म्हणून ते नाचू लागले. तेवढ्यात लालू त्यांना म्हणाले,"आप पहचाने नाही इन्हे? ये मायावतीजी है!" मग केजरीकुमार विंचू चावल्यासारखे तिथून दूर निघून गेले ते लालू मुका घेतील या भीतीने की मायावती कानफटीत देतील या भीतीने हे कळायला मार्ग नव्हता. पथनाट्यात काय नव्हते? सगळे होते. ज्या देशात राहतो त्या देशाचा विजय व्हावा असे वाटण्याचे बंधन नसावे, व्यक्तिस्वातंत्र्य एकतर्फी असावे. त्याला परिणामांची भीती नसावी. व्यक्तिस्वातंत्र्याच्या अभिव्यक्तिला कोणतीही चौकट नसावी. देशद्रोही हा शब्दच हास्यास्पद आहे, असे काही नसते. राष्ट्रवाद ही अंधश्रद्धा आहे, असे काही असणे हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या तत्वावर घाला घालण्यासारखे आहे. असे विचार कान्ह्याने पथनाट्यात मांडले. त्याचे असे हे कौतुक झालेले पाहून त्याला विजयनृत्य करावेसे वाटू लागले. त्याचे पेरूतले मित्र त्याच्याभोवती गोळा झाले. "पार्टी पायजे राव! फेमस झालास आता! आता काय, या च्यानेलवर, त्या च्यानेलवर. मुलाखती देत हिंडायचं. केजरी किंवा येचुरीकडे जॉब नक्की!" कान्ह्याने उत्साहाने सांगितले,"दोस्तहो, लगेच पार्टी! नुसती पार्टी नाही तर ओली पार्टी! चला लगेच!" सगळे उत्साहाने निघाले. तेवढ्यात कान्हा थबकला. म्हणाला,"आज तारीख किती?" एक जण म्हणाला,"काय फरक पडतो? पार्टीला काय तारीख लागते?" खिन्नपणे कान्हा म्हणाला,"अजून तरी लागते… सरकारी स्कॉलरशिपचे पैसे तीन तारखेशिवाय जमा होत नाहीत." कुणीतरी मग म्हणाले,"व्यक्तिस्वातंत्र्यात अजून तरी फुकट बिअर येत नाही. धिक्कार असो! निषेध असो!"

Saturday, March 5, 2016

भजनाची भैरवी

कोकणात भजनं ही गोष्ट अत्यावश्यक. सणासुदीला, कार्यक्रमांना, देवळातील उत्सवानिमित्त भजनं होत असतात. ती मनोभावे ऐकणारे लोकही असतात. पूर्वी सिनेमाच्या गाण्याची चाल देऊन भजनं म्हणणे वगैरे होत असे. त्यावर लोक हसतही असत. पण तरीही त्यात बीभत्स प्रकार नव्हते. वेडेवाकडे अंगविक्षेप, हिडीस गाण्यांची चाल हे प्रकार नव्हते. त्याच कोकणात आता हा नवा प्रकार बोकाळला आहे. आणि तो गंभीर आहे. शांताबाय, जपून दांडा धर या असल्या देहांतशासनाच्या लायकीच्या गाण्याच्या चालींवर भजनं? त्याबरोबर भजनीबुवा थेट रोंबाटात नाचल्यासारखे नाचतात काय, गॉगल लावून लुंगी नेसून सिनेमातील हिडीस नृत्ये काय करतात! सगळंच ओकारी आणणारं आहे.

संस्कृती अचानक मरत नाही. ती अशी कणाकणानं, हालहाल होऊन निजधामाला जाते. संस्कृती म्हणजे जीवनपद्धती, रिवाज, सणवार असं वरकरणी असलं तरी तिचं खरं स्वरूप "जे जे उत्तम उदात्त, जे करी आत्मा उन्नत" असं असायला हवं. पण कुठून तरी आपल्याला सस्त्यात मजा पाहिजे ही जी एक संस्कृती वाढीला लागली आहे त्याचा हा परिपाक आहे. आयोजकही मग "पब्लिककी डिमांड है बाॅस!" असं म्हणत किराणा मालाचं दुकान उघडून बसतात. (हो, अस्सल मराठी माणसाची हिंदी ही बोलीभाषा आहे.) डिमांडप्रमाणे विक्री हवीच. गंदा है पर धंदा है बाॅस! यातूनच शांताबाय, गढुळाचं पाणी, पोरी जरा जपून, यासारखी केवळ हिडीस विद्रूप गाणी जन्माला येतात. पण जोवर ती गाणी 'क्वाटर' लावून बेधुंद नाचणारे राजकीय गुंडांना, साॅरी, कार्यकर्ते किंवा पावसाळ्यातल्या अळंबीप्रमाणे उगवणाऱ्या गणेश मंडळांच्या अतिभाविक कार्यकर्त्यांपर्यंत मर्यादित होती तोवर ठीक होतं. पुराचं पाणी गावात शिरलं नव्हतं. जी काही राड, गदळ होतं ते गावाबाहेर नदीत फिरायचं आणि पूर सरला की पाणी निवळायचं. पण गावानं दुर्लक्ष करून वाटेल तशी बांधकामं केल्यावर जे होतं तेच झालं. पुराचं पाणी गावात शिरून घरं उध्वस्त करत चाललं. आपली भजनसंस्कृती हा एक अमूल्य ठेवा आहे. अध्यात्म हा एक क्लिष्ट विषय. जीवनाचा अर्थ सोप्या भाषेत गृहस्थ धर्म निमूटपणाने जगणाऱ्या सामान्य माणसाला समजावून सांगत धीर देण्याचं काम करणारी कीर्तनं, रूक्ष शब्दांनी कंटाळून जाऊ नये म्हणून त्यांत पदं, भजनं यांची योजना असायची. तीही रागदारीवर आधारित असायची. माझी आजी शिकलेली नव्हती पण रागदारीची उत्तम जाणकार होती. एखादं भजन अथवा पद कुठल्या रागात बसवलं आहे हे ती क्षणात सांगायची. कीर्तनाला अथवा भजनाला जाणं म्हणजे केवळ गवारीच्या शेंगा मोडायला किंवा वाती वळायला काढलेला मोकळा वेळ एवढ्यापुरतं त्याचं स्वरूप नव्हतं. एवढी अध्यात्मगंगा डोक्यावरून पाणी घेऊन गेली तर डोकं थोडं तरी ओलं होईलच ना? बरं बुवा भजनातून करामती करायचे. श्लेष, उपमा, दृष्टांत यातून रसनिष्पत्ती करायचे. पण जे हृदयाला भिडायचं ते मात्र भजन असायचं. भक्तिमार्ग सोपा आहे असं सांगणारे ते सूर असायचे. हरिनामात तल्लीन व्हा, ते नाम जपणाऱ्या सुरांत चिंब व्हा, त्या परमेश्वराचं एक प्रेमळ रूप तुम्हाला अनुभवता येईल असा त्या भजनांचा हेतू असायचा. खरंतर सुरांना शब्दांची गरज नसते. पण त्यातून नामस्मरण व्हावं म्हणून शब्द यायचे. परवा असंच भीमसेन जोशींचं "भाग्यदा लक्ष्मी बरम्मा" ऐकत होतो. मला कानडी भाषा कळत नाही. कर्नाटकातील प्रत्येक घरात किमान एक तरी नानू नावाचा इसम असतो अशी माझी परवा परवापर्यंत समजूत होती. पण हे भजन ऐकताना समजण्यात काहीच अडचण आली नव्हती. डोळे मिटून डोलणे एवढेच करायचे होते. त्या भजनाने जे सांगायचे ते लीलया सांगितले. भजन संपल्यानंतर अभ्यंगस्नान केल्यासारखे शुचिर्भूत वाटले होते. परमेश्वराच्या असंख्य रूपांपैकी एकाचं पुसटसं का होईना तृप्त दर्शन तरी झाल्यासारखं वाटलं होतं. असाच अनुभव कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनांनी दिला होता.

इथून पुढे भजनाची काय वाटचाल आहे माहीत नाही पण हा असाच जर सूर राहिला तर वैकुंठापर्यंत साथ करणाऱ्या या भजनप्रकाराचीच वैकुंठगमनाची तयारी सुरू झाली असं समजायला हरकत नाही. आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा रामराम घ्यावा! जय जय रामकृष्ण हारी! यावे यो यो हनी सिंग, कीर्तनपीठ मोकळे आहे. समोर चार बोतल व्होडका घेऊन भक्त कीर्तनरंगी रंगण्या सज्ज आहेत.