आपण रोज उठून इवळत असतो - पुराणकाळी मपला देश लैच प्रगत हुता भौ.
येक म्हणून
टेक्नाॅलाॅजी आपुन सोडल्याली न्हवती. उड्ढाण घ्या, अग्निबाण घ्या,
पर्जन्यबाण घ्या, बूड
आजाबात न हालवता जाग्यावर विश्वरूपदर्शन (प्रोप्रा. श्रीकृष्ण यादव) घ्या,
अंतर्ज्ञान घ्या, सग्गळीकडे
निसतं ज्ञानच ज्ञान. न्हान पोरगं बी बोलाया लागलं तर "मित्रजन हो, तात
आत्ताच सूक्ष्मदेह धारण करून पृथ्वीवरून बाहेर पडले आहेत. गुरूपर्यंत चक्कर
मारून येतो असं मातोश्रींना ते सांगत असताना आम्ही ऐकले आहे. तस्मात, दोन
तीन घटिका कल्लोळ करावयास काहीच हरकत नाही." आसं कायबाय बोलत असावं.
दुर्दैवानं पिताश्रींनी ते अंतर्ज्ञानानं ताडावं आणि अंतरिक्षातूनच फोकयान
(हे यान उत्तम अशा चिंचेच्या फोकापासून बनवलेलं असायचं) सिद्ध करून
चिरंजीवांना फोकडान्स करायला लावावा. हेला म्हणतात तंत्रज्ञान.
या घरगुती तंत्रज्ञानाचं काय नाय हो,
पण ते शाप देण्याचं तंत्रज्ञान मात्र लै भारी व्हतं बर का. मायला, कुनीबी
चिढला तर डायरेक शापच देयाचा. दगडच काय व्हशील, फुडल्या जल्मी गाडावच काय
व्हशील. आन ते तंत्रज्ञानबी आसं भारी की मानूस व्हायाचा बी दगड आन गाडाव.
मग मांडवली झाल्यावर रीतसर उ:शापबी देयाचा. पण ऋषीबिशी होते तेनला आनखी
भारी शाप अव्हेलेबल व्हते. जटादाढीवालं ऋषी चिडलं तर आत्ताच्या आत्ता ईज
पडून मरशील आसला काय तरी शाप देयाचं. हे कुटंबी जाऊन बसायचं ध्यान लावायला.
गुमान आपल्या आश्रमात किंवा जी काय
कुटीबिटी आसंला तिथं बसावं क न्हाय, ते ऱ्हायलं. आन मग कुनी गायगुरू चाराया
आलं तर झालं, हेंचा तपोभंगच! जसा काय इतक्या येळ देवाचा फोन आऊट ऑफ रीच
व्हता, निक्ता लागला व्हता आन हेच्यामुळं कॉल ड्रॉप झाला. इतर शापान्ला
उ:शाप तरी व्हते हो, पन ईजच पाडल्यावर कसला उ:शाप आन काय. भौतेक ऋषी शाप
देऊन झाल्यावर जीभ चावायचे. कारन टक्कुरं शांत झाल्यावर लक्षात यायचं मायला
उगाच शाप देऊन बसलो राव. मग गुपचूप ध्यानाची जागाच बदलायचे. लोकान्ला
वाटायचं काय म्हाराज हैत, सर्वसंगपरित्याग म्हंजे आसा आसावा, एका ठिकाणी
माया लावून घेयाची न्हाई. आन काय चालतेत झपाझपा या वयात! म्हाराज फुडल्या
गावाला गेल्यावर लोकान्ला ईज का पडली आणि गुरं राखायला गेलेला शिरपा का
मिसिंग हाये ते कळायचं. तंवर म्हाराज ज्युरिसडिक्शनच्या भाईर गेलेले असत.
No comments:
Post a Comment