Wednesday, October 7, 2015

ते उनाड वाचनाचे दिवस

पुस्तकांचं वेड म्हणा व्यसन म्हणा लहानपणी ज्याला लागलं ते आयुष्यभर राहिलं. जे समोर आलं ते कसलाही विचार न करता वाचून काढलं. विचार करण्याचं वय तरी कुठं होतं म्हणा. अक्षरश: "डोळ्यांचे रोग" ते सावरकरांची "सोनेरी पाने" अशी सगळी पुस्तकं समोर होती. ती एकाच निर्विकारतेने वाचली. निर्विकारतेने अशा अर्थाने की पाटी कोरी होती. कुठल्याही पुस्तकाने अजून संस्कार वा कुसंस्कार दिलेले नव्हते. कुठलेही विकार न जडता केली कृती म्हणजे निर्विकारपणे म्हणायला हवी. घरी भरपूर पुस्तके, गावातील श्रीराम वाचनमंदिरातून घरी आलेली पुस्तके असं सगळं वातावरण होतं. टीव्ही ही संकल्पनाच माहीत नसल्यामुळे अज्ञानात सुख होतं. टीव्हीचा शोध जगात लागला असला तरी आमच्या गावात यायला अजून बक्कळ वर्षं होती. साधा महाराष्ट्र टाईम्स दोन दिवस उशिरा येई तिथे तंत्रज्ञान वगैरे लांबचीच गोष्ट. रामायण चित्रपटही आमच्या गावात लागेपर्यंत सीताहरण, रावणदहन होऊन लवकुश चांगले गायला वगैरे लागले होते. रेडिओ फक्त सकाळी सातच्या बातम्या ऐकण्यापुरता. रोज सकाळी "संप्रति वार्ता: श्रुयन्ताम, प्रवाचक: बलदेवानंद सागर:" झाल्यानंतर तो बलदेवानंद दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत बातम्यांचे खिळे जुळवत "राम रामौ रामा:" करत बसतो असं मला वाटायचं. इंटरनेट नव्हतं, स्मार्ट फोन्स नव्हते. दिवसभर उनाडून केवळ नाईलाजाने घरी आल्यावर मग जेवायचं आणि तडक झोपायचं अशी साधी सरळ दिनचर्या असे. पुस्तक वाचायला कधी सुरुवात झाली ते आठवत नाही. पण जेवतानाही पुस्तक शेजारी यायला लागलं. आई वैतागून म्हणायची,"ठेव ते बाजूला! जेवताना घास नाकात गेला तरी कळायचं नाही!" तरीही मी हट्टानं पुस्तक घेऊनच बसायचो. त्यावेळेला वाटायचं, आयला या देवांचं बरं आहे चारचार आठआठ हात, पुस्तक एका हातात धरायचं, दुसऱ्या हातानं पानं उलटायची, तिसऱ्या हातानं जेवायचं, चौथ्यानं पाण्याचं भांडं तोंडाशी लावायचं. रावणबिवण  तर त्या काळात मल्टीप्रोसेसर, मल्टी थ्रेडिंग, पॅरलल प्रोसेसिंग असलेला. एकाच वेळेला धा पुस्तकं वाचू शकला असता. असो. मुद्दा असा की पुस्तकं वाचायची गोडी लागली.

सगळ्यात प्रथम जर काही चांगलं, अर्थात त्या वयानुसार चांगलं, वाचलेलं आठवतं ते किशोर मासिक. अत्यंत सहज, सरळ कथा, त्याला जोड अप्रतिम चित्रांची. गोष्टी तर सुंदर असतच, पण कविताही अप्रतिम असत. एक कविता अजूनही आठवते. कवितेचं नाव "समंध"! संपूर्ण कविता आठवत नाही पण पहिल्या ओळी पक्क्या डोक्यात बसल्या आहेत. "कोण आले कोण आले, दार आपोआप हाले." शेजारी नागोबाचा टाय गळ्यात असलेल्या समंधाचं विनोदी चित्र होतं. किशोरच्या जोडीला नाव घेतलंच पाहिजे ते चांदोबाचं. चांदोबाच्या आठवणी मात्र आहेत त्या उन्हाळ्याच्या सुट्टीच्या. उन्हाळ्याची सुट्टी लागली की सांगलीच्या घराचे वेध लागायचे. आज्जी आजोबा तर असायचेच. त्याहीपेक्षा ओढ असायची ती आत्तेभावंडांची. एकत्र कुटुंब ते. आत्याचेही बिऱ्हाड आमच्याच वाड्यात होते. आत्त्याचे यजमान, दादा, हे कडक शिस्तीचे होते. सर्व कुटुंब त्यांच्या दराऱ्यात वावरायचे. सकाळी दहा वाजता जेवण करून साडेदहा वाजता ऑफिसला जाण्यासाठी ते बाहेर पडायचे. ते बाहेर पडले रे पडले की जणू कर्फ्यू उठायचा. आत्त्या मोकळेपणे बोलायची, तिची मुले दंगा करू लागायची. थोडक्यात आम्हाला रान मोकळे मिळायचे. या कडक दादांचे काही पैलू मात्र काहीसे स्वभावाला साजेसे नव्हते. एक म्हणजे त्यांना पत्ते खेळायला आवडत, तेही आम्हां मुलांबरोबर. दुसरा पैलू म्हणजे त्यांना "चांदोबा" चे व्यसन होते. होय व्यसनच. त्यामुळे चांदोबाचा रतीब घरात होता. पण एक आम्हा मुलांना काही चांदोबा लगेच मिळत नसे. कारण जसे दादांना चांदोबाचे व्यसन होते तसेच माझ्या आजोबांनाही होते. त्यामुळे नवीन अंक आला की मानाच्या गणपतीप्रमाणे पहिला मान आमच्या आजोबांचा.ते दोन तीन दिवस लावत. मग तो जायचा दादांच्या ताब्यात. ते चांगले तीनचार दिवस आमचा अंत पाहत. मग तो अंक ते आमच्या आत्त्याकडे "रीलीज" करत. मग काय, आम्ही सगळी भावंडे तुटून पडत असू. सगळ्यांनाच तो हवा असे. मग त्यातल्या त्यात दोन ग्रुप होत. पहिला ग्रुप सामूहिक वाचन करे. मग दुसरा ग्रुप वाचे. दुसरा ग्रुप अर्थातच प्रत्येकाच्या त्याच्याहून लहान भाऊ बहिणींचा असे. मग पुढे मी एक माझ्यापुरता तोडगा काढला होता. मी नवीन अंकाच्या मागे लागतच नसे. जुन्या अंकांची पेटी काढून त्यातील जुने अंक वाचत बसे. नवा अंक सगळ्यांनी वाचून झाला की तो अक्षरश: कुठे तरी बेवारशासारखा मिळे. मग तो मी सावकाश वाचत बसे.

त्या काळात काय अशक्य साहित्य वाचलं गेलं, आज आठवलं की हसायला येतं. अर्थात, हसणं साहित्याला नाही, पण माझ्या रुचिला किंवा त्याकाळी कसलीच रुचि नसण्याला. आई वाचनालयातून कुमुदिनी रांगणेकर, बाबा कदम यांच्यासारख्या लेखकांच्या कादंबऱ्या आणायची. बाबा कदमांच्या कादंबऱ्या म्हणजे कमीत कमी तीनशे पानाचा ठोकळा असे. त्यात संग्राम, दीनानाथ असल्या भरभक्कम नावाची मंडळी असत. बारा बोअरची बंदूक तर हवीच. सुरुवातीला मी उत्साहाने त्यांच्या कादंबऱ्या वाचत असे. नंतर असे लक्षात आहे की पहिली दोन पाने, नंतर साधारण शंभर ते एकशेदहा पाने आणि शेवटची दोन तीन पाने वाचली तरी चालतात. त्या साक्षात्कारानंतर कदमांची पुस्तके मी केवळ मटणाचा रस्सा, पांढरा रस्सा, कोल्हापुरी बाज यांच्यासाठी वाचली. तिकडे कुमुदिनी रांगणेकरांची एक खास शैली होती. एखादी कॉलेजमध्ये जाणारी अल्लड, अवखळ, जराशी फाजील लाडिक मुलगी जसा संवाद साधेल तशा त्या वाचकांशी संवाद साधत. इतक्या बायकी शैलीचं लिखाण मी पुन्हा पाहिलं नाही. सगळ्या कादंबऱ्या नायिकाप्रधान पण नायकाभोवती फिरणाऱ्या. नायकाच्या उगाच फुरंगटून बोलण्याला उद्देशून "तो वतवतला", "तो फुतफुतला" वगैरे शब्द वाचले की मी हसून गडबडा लोळायचो. आईला "आई कस्सली अशक्य पुस्तकं वाचतेस तू!" असं म्हणून चिडवायचो. या बाईंनी "स्कार्लेट पिम्पर्नेल" नावाची एक इंग्लिश कथेची अनुवाद असणारी कादंबरी लिहिली आहे. आमच्या मातोश्री एकदा ते अदभुत रसायन वाचनालयातून घेऊन आल्या. म्हटलं अनुवाद आहे, फार काही लाजायला मुरकायला फुतफुतायला वाव मिळणार नाही. म्हणून हातात घेतलं. पण नाही! राजा विक्रमादित्यानं जसा आपला हट्ट सोडला नाही तसा कुमुदिनी बाईंनीही सोडला नव्हता. त्यांनी सर पर्सी या शूर नायकाचा उल्लेख लडिवाळपणे  "असा कसा बाई अचपळ मेला, प्रिय माझा स्कार्लेट पिम्पर्नेल्या" असल्या देहांतशासनाच्या लायकीच्या काव्यओळीने केला आणि मी ते पुस्तक मिटले. झोरो, बॅटमॅन यांच्या पंक्तीत बसू शकणारा तो मर्दानी पुरुष, त्याचा "स्कार्लेट पिम्पर्नेल्या" अशा  सलगीच्या उल्लेखाने कुमुदिनी बाईंनी त्याचा एका क्षणात "टेकाडे भाऊजी" (होय तेच ते, मीनावहिनींच्या "प्रपंचा"त लुडबूड करणारे ते आगाऊ भाऊजी)  करून टाकला होता. पुढे हा स्कार्लेट पिम्पर्नेल्या नायिकेला वाचवण्याऐवजी राजवाड्यात प्रवेश करून,"वैनी, चहा टाका बुवा पहिला!" असं म्हणत असेल असं उगाच वाटत राहिलं.

पुढे वय वाढलं मग वाचनात बाबूराव अर्नाळकर, गुरुनाथ नाईक, नारायण धारप आले. झुंजार कथा, गरुड कथा आल्या. त्या कथांचे प्लॉटस अत्यंत सुमार असत. पण त्यावेळी वाटायचं आयला ह्या झुंजार आणि तो बाकदार नाकवाला गरुड यांना अशक्य असं काहीच नाही. हळूहळू वाचनाचे विषय बदलले. वडिलांनी बाबासाहेब पुरंदऱ्यांचं राजा शिवछत्रपति आणून दिलं. आज कुणी काही म्हणो, शिवाजी महाराज हे शब्द ऐकल्यावर छाती दोन इंच फुगते, आपल्या कणखर राकट दगडांच्या देशाचा अभिमान वाटतो, त्याची छोटीशी ठिणगी या पुस्तकाने पाडली. मग पुढे मुंजीत प्रथेप्रमाणे "श्यामची आई" मिळालं. हे पुस्तक मला तेव्हाही भावलं नाही आजही भावत नाही. मुळूमुळू रडणारा श्याम मात्र आठवतो. पुढे सिनेमातला श्याम पाहिल्यावर तर शंकाच राहिली नाही. नाही, लहान मुलांना हे साहित्य देऊ नये. आईवडिलांवर प्रेम करा, खोटे बोलू नका हे शिकवायला आणखी अनेक उपाय आहेत. पुढे दर्जेदार साहित्य खूप वाचलं. पण ते दर्जेदार आहे कळण्यासाठी जी काही पहिली जडणघडण किंवा मोडतोड म्हणा, व्हायला आधीच्या या उनाड वाचनाचा हातभार आहे असं म्हणावं लागेल. साहित्य हे साहित्य असतं, बरं किंवा वाईट हे वाचणाऱ्यावर असतं. पुस्तकं ही वेगवेगळ्या लोकांच्या नजरेतून जग, समाज कसा दिसतो हे दाखवतात. बरेच लोक अमुक एखादं पुस्तक आपला दीपस्तंभ आहे वगैरे म्हणतात त्याचं मला आश्चर्य वाटतं. एखाद्याचं स्वत:चे अनुभव, स्वत:चं तत्वज्ञान हे त्याच्यापुरतं मर्यादित असतं. त्या दृष्टिकोनाचा आपल्याला उपयोग "असाही दृष्टीकोन असतो" असं ज्ञान होण्यापुरताच. आपण आपली स्वत:ची वाट चोखाळावी. भलेही मग ती न पडलेली पायवाट असो. ज्ञान हे आतूनच व्हावं लागतं. पुस्तकं आपल्याला शहरच्या वेशीपर्यंतच नेऊन पोचवतील. पुढील जंगलातील वाटचाल आपण एकट्यानेच चालायची आहे. टागोर उगाच नाही म्हणाले, एकला चालो रे!

Tuesday, October 6, 2015

काव्यदिंडी ते काव्यतिरडी - एक प्रवास

पहुडलो होतो माझ्याच मनाच्या पलंगावर
बंद डोळे मंद श्वास शांती अलवार
येईल केव्हाही स्फूर्ती, होतो तयार
होते पेन उशाशी त्यावर मस्तकभार
पसरली होती यमके सभोवार
जुळवून ठेवलेली स्वहस्ते हळुवार 

अप्रिय न कोणताही मज विषय
कापूस भुईमुग अभंग ते प्रेमभंग
शब्द ते केवळ जणू यमकाची सोय
कठीण वृत्त मात्रा आर्या अन विक्रीडित
सोपा मुक्तछंद तेवढा आपला होय 

अव्यक्ताचे व्यक्त यासाठी बनली भाषा
व्यक्ताचे अव्यक्त ही कविची अभिलाषा
मला दिसे कसे सगळे संदिग्ध अन धूसर
न दिसे रवि ते दिसे मज हा दंभ मनावर
पण हाय ती भार्या! आणी क्षणात भूतलावर
म्हणे लावा तो चष्मा जो चमके टकलावर

खिन्नवदनी नि:श्वास निपचीत प्रतिभा
कशाची स्फूर्ती अन काय नुसतीच शोभा
तरल अंतरंग माझे कसे कळावे माझ्या प्रियेला
अंतरंगीचा फाटका बनियन तेवढा तीक्ष्ण नजरेला
न आवडे तरी ती आवडी नशिबी तुकारामाला
कळला न सॉक्रेटिस कुणा, देत हाती विषप्याला

गळली स्फूर्ती झाली उपरती
कशाची पालखी अन कशाची दिंडी
पसरली यमके तडकला अनुप्रास
तरल संवेदनांची लक्तरे कडीपाटास
मोजून चार रसिक जमले वेदना ऐकावया 
ऐकण्या कसले आले खांदा द्यावया 

Thursday, October 1, 2015

इंडियाविरोधाचे छुपे प्रोफाईल

सध्या काही बुद्धिवंत मंडळी डिजिटल इंडिया बद्दल प्रश्न विचारू लागली आहेत. इतके दिवस ही मंडळी निवांत स्वत:च्या कुरणात चरत होती, स्वत:शी हळूच हंबरत, कुणी बघत नसल्याची चाहूल घेऊन शेपटीने आपल्याच पार्श्वभागावरील माश्या हाकलीत होती. आत्ममग्न होती. भारतामध्ये बदल घडत आहेत याची क्वचित दखल घेत होती, बरेचसे दुर्लक्ष करीत होती. अचानक या मंडळींच्या शेपटाला कुणी तरी फटाक्यांची माळ लावून पेटवल्याप्रमाणे झाले आहे. दुगाण्या झाडत ही मंडळी आता शिवारात धावत आहेत. दिसेल त्याला पुढे असेल तर शिंगावर घेत आहेत, मागे असेल तर लाथा झाडत आहेत. त्यांचा प्रश्न एकच - अरे माठ्यांनो, डिजिटल इंडिया म्हणजे काय हे माहीत नसताना उगाच प्रोफाईल पिक्चर बदलून काय होणार? सगळी मेंढरे लेकाची. एकाने बदलले, झाले, लागले सगळे बदलायला. असो. काही असतीलही मेंढरे. पण जनजागरण झालेच की नाही? झोपी गेलेले हे बुद्धिवंत लोक जागे झाले. "डिजिटल इंडिया" असे गूगल करू लागले की नाही? ई-गव्हर्नन्स म्हणजे काय, मोदींनी त्यावर भर का दिला आहे हे तरी त्यांना कळले असेल की नाही? सरकारी सोयी जर ऑनलाईन उपलब्ध झाल्या तर भ्रष्ट बाबूंना जरा आळा बसेल. रोगाच्या निर्मूलनाबरोबर तो मुळातच होणार नाही याची सोय केली तर ते जास्त परिणामकारक नव्हे काय? आणि ही फक्त एक बाजू. इतरही फायदे आहेत.

दुसरा एक समज असा की डिजिटल इंडिया म्हणजे फास्ट इंटरनेट, सॉफ्टवेअर कंपन्यांची चंगळ, इकडे बळिराजाची हेळसांड, गरिबाच्या तोंडची भाकरी गायब. हा गैरसमज आहे. जलयुक्त शिवार योजना दिसली नाही, प्रत्येक नागरिकासाठी उघडलेले बचत खाते दिसत नाही, पण मोदींनी गुंतवणूक आणण्याची गोष्ट केली की लगेच बळिराजा मृत्यूपंथाला लागतो, गरिबाची लक्तरे दिसू लागतात. डिजिटलायझेशन कशाला हवं? त्याने नोकऱ्या जातात. बदल अटळ असतो. काही पिढ्यांपूर्वी आपण धान्य दळायला घरी जाते वापरत होतो. चटणी वाटायला पाटा वरवंटा वापरत होतो. जाते, पाटे वरवंटे बनवणारी वेगळी जमात होती. बेलदार म्हणायचे त्यांना. पुढे पिठे तयार मिळू लागली, मिक्सर आले. हे बेलदार लोक कुठे गेले कळले पण नाही. त्यांच्या नावाने कुणी रडले नाही, मिक्सर का आणले म्हणून कॉंग्रेसच्या नावाने कुणी खडे फोडले नाहीत, आंदोलने झाली नाहीत. त्यांच्या पुनर्वसनाबद्दल कुणी मोर्चे काढले नाहीत. स्वत: बेलदार लोक सुद्धा प्रथम बेरोजगार झाले, गरिबीची झळ लागून कदाचित हलाखीत मरणही पावले असतील. पण लवचिकता हा मनुष्याचा स्वभावधर्म आहे. पुढली पिढी शहाणी झाली, इतर उद्योगधंद्यांकडे वळली. थोडक्यात मिक्सर आले म्हणून जगणं थांबलं नाही किंवा मिक्सर वापरू नका असा प्रचार झाला नाही. सध्या तशीच परिस्थिती आहे. संपूर्ण जग डिजिटल होत आहे. ते कुठं चाललं आहे हे ओळखून आपण बदललो नाही तर नुकसान आपलंच आहे. अमेरिका एके काळी शेतीप्रधानच देश होता. कापूस, गहू, मका, तंबाखू यावर दक्षिणेतील आणि उत्तरेतील राज्ये अवलंबून होती. पुढे अमेरिका प्रगतशील झाली, यंत्रयुग आले, त्यानंतर संगणकयुग आले. त्यानुसार शेतकरी बदलला. रडत बसण्यापेक्षा नवीन तंत्रांचा वापर करून घेऊन जास्त पीक मिळवायला शिकला. सुदैवाने नागरिकही भारतातील नागरिकांप्रमाणे वैचारिक मैथुनवाले नसल्यामुळे त्यांनी गळे वगैरे न काढता प्रगतीस वाव दिला. हे भारतात का होऊ शकत नाही? प्रत्यके चांगल्या गोष्टीला "हा हिंदुत्ववाद्यांचा कावा आहे", "हा समाजवाद्यांचा डाव आहे" असलं बोललंच पाहिजे का? बरं हे बोलणं नुसतंच बरं. प्रत्यक्ष काही करण्याची वेळ आली की "अरे नाही रे, एकही सिक लीव्ह शिल्लक नाहीये" ही कारणं देणारे हे महात्मे.

काही काही वेळा असं वाटतं की याच लोकांना भारताची प्रगती नको आहे की काय? गरिबी राहिली नाही तर गळे काढून कशावर लिहायचे आणि सरकारला धारेवर धरण्यासाठी कुठले मुद्दे आणायचे? एकीकडे एक तो संत टोपीवाल आहे जो सत्तेवर बसून घंटा हलवतो आहे, दुसरीकडे हे मोदीविरोधक आहेत हे घंटा हलवत केवळ ठणाणा करीत आहेत. नकर्त्याचे कर्तृत्व हे. त्याला उत्तर देण्याचीही गरज नाही, पण दिले पाहिजे. कारण चूक असेल तर चूक म्हटले नाही तर ती मोठी चूक. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावतो.

थोडक्यात, आमचे प्रोफाईल बदलून काय होणार असा प्रश्न ज्या थोर बुद्धिवंतांनी केला आहे, त्यांच्या प्रश्नातच त्याचे उत्तर आहे. झोपी गेलेला जागा झाला आहे. आता फक्त तो फक्त दुगाण्या झाडून पुन्हा झोपी जातो की काही दिवस शेताला निदान खत तरी पुरवतो ते पहायचे. असो. बाकी ही मंडळी आमच्या प्रोफाईलकडे अशा बारीक नजरेने पाहत असतात ही जाणीव सुखद की काळजी वाढवणारी हा विचार सध्या आम्ही करत आहोत.

Tuesday, September 29, 2015

न जाईल ते बलिदान वृथा

मरावे परि फेसबूकरूपी उरावे
भिकार पोस्ट तरी लाईक मारावे
आपणही उलट टुकार पोस्ट करावे
घटिका पळे दिन मास झणी सरावे
सदोदित वॉलवर पडीक राहावे
जीना यहां मरना यहां घोकत असावे ।।

व्याकरणाची चिंता करणे सोडोन द्यावे
शुद्धलेखनाला तुज्या आयचो घो म्हणावे 
"खुप छान, खुप छान" कॉमेंट वाचून रडावे
मनी "खू दीर्घ रे सोट्या!' असे ओरडावे
चडफडून ओठांवर दात रुतवावे
खुनातला खू र्हस्व की दीर्घ ते आठवावे।।

वाया गेलास तू असे थोरांनी ऐकवावे
बाबा तू यूसलेस असे पोरांनी म्हणावे
फोन अथवा मी असे बायकोने चॅलेंजावे
इथले वायफाय प्रिय असे बॉसने हिणवावे
हाच तो सर्वसंगपरित्याग असे स्वत:स समजवावे
साधूस जशी चिलीम तसे हे फेसबूक बरवे।।

परि वृथा न हा त्याग असे ऐकण्यात यावे
थेट यूएस मधून सनई चौघडे वाजावे
वाजावे कसले खरे तर कानी बोंबलावे
पाहून ती भरतभेट आनंदाश्रू ओघळावे
मारा पासे सवा कोट यूजर छे नमोंनी वदावे
चोक्कस असे फेसबूकस्वामींनी चीत्कारावे
अन सवासो कोट डोलर नमोचरणी अर्पावे।।

सवा कोटीतील म्यां एक म्हणोन हरखावे
भरास येऊन स्टेटस अपडेटावे
झालाच आता भारत महासत्ता म्हणावे
पाहोन ते ट्रेंडिंग ते दोन बनिये सुखवावे
बीजनेस आणि राजकारण भरून पावावे
आपण तेवढे आपले ब्रीद सांभाळावे
मरावे परि फेसबूकरूपे उरावे ।।

Monday, September 21, 2015

निर्गुणी संवाद

खूप वर्षांपूर्वी असंच एक वेड लागलं. ते वेड अद्याप तसंच आहे. त्यावर काही उपचार वगैरेही करावेसे वाटत नाहीत. ते वेड होतं निर्गुणी भजनांचं. मला वाटतं वडील कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनांची कॅसेट रेकॉर्ड करून घेऊन आले असावेत. त्यातील "सुनता है गुरु ग्यानी"ने झपाटला गेलो होतो. समाधिअवस्था कशी असते मला माहीत नाही आणि त्यावर बोलण्याची माझी योग्यताही नाही. पण समाधि कशी असेल यावर उगाच विचार मात्र करण्यात खूप वेळ घालवला आहे. कुमारांचं ते "ओहम सोहं बाजा बाजे" ऐकलं आणि तो बाजा आपल्यात सुरु झाला असं वाटलं होतं हे मात्र नक्की. अलंकारिक आणि शब्दबंबाळ लिहिण्याचा माझा पिंड नाही पण, हे वाक्य आतून आल्यामुळे जसं आलं तसं लिहिल्याशिवाय तरणोपाय नाही. ते भजनच बाजासारखं डोक्यात वाजत राहिलं. अनेक वर्षं. कधीही ते सुरू व्हायचं मग पुढे दोन दिवस अखंड चालू. या भजनांच्या निर्मितीची कथा कळली होती. कुठे वाचली स्मरत नाही. पण आजाराने अंथरुणाला खिळलेले कुमार गंधर्व, माळवा प्रांतातील ते एक छोटे गाव, डॉक्टरांनी गाण्याला केलेला मज्जाव, संध्याकाळी दुरून तरळत येणारे ते लोकगीतांचे, भजनांचे सूर असं सगळं कळलं. त्या सुरातील ते आर्त, थेट त्या परमात्म्याशी चाललेला तो संवाद कुमारांच्या प्रतिभेला न कळला तरच नवल. दैवी सूर असे असतात की डोळे आपोआप मिटतात. एक प्रतिभाशाली कलावंत आणि ते अंतराळातून तरंगत आलेले सूर यांतून निर्गुणी भजने घडली. सगुण अशा शब्दांच्या चौकटीत निर्गुण निराकाराचे दर्शन देणारे असे ते सूर कसे बसले असावेत? पण बसले आहेत खरे. अध्यात्म या शब्दाला धर्माशी निगडित करणारे करंटे आपण. या सुरांना भजन असं म्हणून टाकतो. ते भजन आहेच पण लौकिकार्थाने नाही. देवाची उगाच आळवणी नाही. नवस सायास नाहीत. "पोराला नोकरी लागूदे रे बाबा" छाप भक्ती नाही ही. त्या चिरंतन सत्याचा मागोवा घेणारे हे सूर आहेत. देव या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन त्याचे अमूर्त असे स्वरूप पाहण्याचा तो प्रयत्न आहे. देवाची सगुण मूर्ती आपण तयार केली ती केवळ निर्गुणाचे ध्यान करता येत नाही, सगुण मूर्ती नसेल तर मन इकडे तिकडे धावते, त्याला एका ठिकाणी बसवून विचार करवून घेता येत नाही म्हणून. पण होतं असं की सगुण मूर्ती हे साधन आहे आहे हे विसरून आपण तिलाच साध्य ठरवून बसतो. एकदा त्या अंतिम सत्याला आपल्या मर्यादित आकलनशक्तीच्या सगुण चौकटीत बसवले की मग पुढे जायची शक्यता नाहीच. मला वाटतं सुरांचा प्रत्येक भक्त हा शेवटी साधक बनतो. तो या सगुण चौकटीतून बाहेर पाहत असतो. त्याला पलीकडले दिसत असते जाणवत असते. पण त्या सगुण चौकटीतून कसे सुटायचे हे कळत नसते. कुमार गंधर्वांसारखा एखादाच त्या शृंखलेतून मुक्त होतो आणि सुरातून त्या अंतिम सत्याशी तादात्म्य पावतो.

हे असं असताना सहा सात वर्षांपूर्वी वर्षांपूर्वी पुन्हा "सुनता है " कानावर पडलं. राहुल देशपांडे या नवोदित गायकानं गायलेलं. त्यापूर्वी मी कधी राहुलचं गाणं ऐकलं नव्हतं. आणि मला माहीतही नव्हतं. असाच कुठलासा कार्यक्रम असावा. त्याचं छायामुद्रण होतं. अंगावर रोमांच उभे राहिले. आवाजाचा पोत वेगळा, धीरगंभीर, खर्जातला. ऐकत राहिलो. निर्गुण निराकार असं अंगावर सायीसारखं पसरत गेलं. अनादि अशा त्या ओंकाराशी संवाद ऐकू येऊ लागला. संवाद माझा नव्हता. पण त्या गायकाचा होता. मी फक्त त्याला साक्ष होत होतो. पण अशी साक्ष अनुभवायला मिळणे आणि हे काही तरी दिव्य घडते आहे याचे भान राहणे हेच माझ्या दृष्टीने पुरेसे होते. राहुल देशपांडेंचं वेगळेपण जाणवलं होतं. नादब्रम्हाची उपासना दिसत होती, त्या उपासनेपलीकडे जाण्याची आस जाणवत होती. पुढे कित्येक दिवस मी त्या रेकॉर्डिंगची पारायणं केली. कुवतीनुसार ते सूर स्वत: अनुभवण्याचा प्रयत्न केला. स्वत: गातानाही त्या सुरांचं वजन, त्यातील आर्त जाणवायचं. कधी कधी डोळ्यात अश्रू यायचे. माझ्या येतात. एखादं भव्यदिव्य दृश्य, अप्रतिम लागलेला एखादा सूर, एखादं अत्यंत प्रेमानं किंवा नि:स्वार्थी बुद्धीनं केलेलं कृत्य (मीच असं नव्हे, दुसऱ्या कुणीही), या गोष्टींनी माझ्या डोळ्यात अश्रू येतात. पूर्वी मी ते लपवत असे. पण पुढे गोनीदांनी स्वत:च्या बद्दल असं होतं असं लिहिल्यानंतर मला संकोच वाटेनासा झाला. अश्रू हे दुबळेपणाचं लक्षण आहे अशा खोट्या भ्रामक कल्पनांतून आपण अत्यंत नैसर्गिक अशी ही भावना दडवत असतो. कुमार गंधर्वांच्या त्या "ओहम सोहं बाजा"ने तसे अश्रू माझ्या डोळ्यात आणले होते त्यानंतर राहुल देशपांडेंच्या त्याच भजनाने आणले हा योगायोग म्हणावा की या गायकांची ताकद, की त्या सुरांची आतवर पोचण्याची क्षमता? मला या प्रश्नाचं उत्तर महत्वाचं नाही, अथवा नकोच आहे. गाभाऱ्यात प्रवेश न करता बाहेर बसून आतील मूर्तीकडे डोळे लावून बसण्याची तपश्चर्या करायला मिळणं हेही तेवढंच भाग्याचं. त्यातूनही आत्मा तृप्त होतो.

काल पुन्हा तो पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला. जवळून, प्रत्यक्ष. नादब्रम्ह अवतरलं होतं. माझ्यासारख्या श्रोत्याला जर इतका अनुभव येत असेल तर प्रत्यक्ष गाणाऱ्याची अवस्था उन्मनी अशीच होत असेल असं मला नेहमी वाटायचं. आता मला संधी मिळाल्यावर हा प्रश्न राहुलना विचारलाही. त्यांनी त्याचं उत्तर त्यांच्या स्वत:च्या "विरहिणी बोले" कार्यक्रमाच्या अनुभवाबद्दल बोलून दिलं. संवाद घडतोच आणि तो असा निर्गुण असतो की त्याचं वर्णन शब्दांत करता येणार नाही. मला हे उत्तर आधीच कळलं होतं, त्यांच्या गाण्यातून. यालाच समाधि म्हणत असावेत. अध्यात्म जे काय असेल ते असो, समाधि काय असते त्याचं उत्तर मला मिळालंय. 

Friday, September 11, 2015

उ:शाप

आपण रोज उठून इवळत असतो - पुराणकाळी मपला देश लैच प्रगत हुता भौ. येक म्हणून टेक्नाॅलाॅजी आपुन सोडल्याली न्हवती. उड्ढाण घ्या, अग्निबाण घ्या, पर्जन्यबाण घ्या, बूड आजाबात न हालवता जाग्यावर विश्वरूपदर्शन (प्रोप्रा. श्रीकृष्ण यादव) घ्या, अंतर्ज्ञान घ्या, सग्गळीकडे निसतं ज्ञानच ज्ञान. न्हान पोरगं बी बोलाया लागलं तर "मित्रजन हो, तात आत्ताच सूक्ष्मदेह धारण करून पृथ्वीवरून बाहेर पडले आहेत. गुरूपर्यंत चक्कर मारून येतो असं मातोश्रींना ते सांगत असताना आम्ही ऐकले आहे. तस्मात, दोन तीन घटिका कल्लोळ करावयास काहीच हरकत नाही." आसं कायबाय बोलत असावं. दुर्दैवानं पिताश्रींनी ते अंतर्ज्ञानानं ताडावं आणि अंतरिक्षातूनच फोकयान (हे यान उत्तम अशा चिंचेच्या फोकापासून बनवलेलं असायचं) सिद्ध करून चिरंजीवांना फोकडान्स करायला लावावा. हेला म्हणतात तंत्रज्ञान. 
या घरगुती तंत्रज्ञानाचं काय नाय हो, पण ते शाप देण्याचं तंत्रज्ञान मात्र लै भारी व्हतं बर का. मायला, कुनीबी चिढला तर डायरेक शापच देयाचा. दगडच काय व्हशील, फुडल्या जल्मी गाडावच काय व्हशील. आन ते तंत्रज्ञानबी आसं भारी की मानूस व्हायाचा बी दगड आन गाडाव. मग मांडवली झाल्यावर रीतसर उ:शापबी देयाचा. पण ऋषीबिशी होते तेनला आनखी भारी शाप अव्हेलेबल व्हते. जटादाढीवालं ऋषी चिडलं तर आत्ताच्या आत्ता ईज पडून मरशील आसला काय तरी शाप देयाचं. हे कुटंबी जाऊन बसायचं ध्यान लावायला. गुमान आपल्या आश्रमात किंवा जी काय कुटीबिटी आसंला तिथं बसावं क न्हाय, ते ऱ्हायलं. आन मग कुनी गायगुरू चाराया आलं तर झालं, हेंचा तपोभंगच! जसा काय इतक्या येळ देवाचा फोन आऊट ऑफ रीच व्हता, निक्ता लागला व्हता आन हेच्यामुळं कॉल ड्रॉप झाला. इतर शापान्ला उ:शाप तरी व्हते हो, पन ईजच पाडल्यावर कसला उ:शाप आन काय. भौतेक ऋषी शाप देऊन झाल्यावर जीभ चावायचे. कारन टक्कुरं शांत झाल्यावर लक्षात यायचं मायला उगाच शाप देऊन बसलो राव. मग गुपचूप ध्यानाची जागाच बदलायचे. लोकान्ला वाटायचं काय म्हाराज हैत, सर्वसंगपरित्याग म्हंजे आसा आसावा, एका ठिकाणी माया लावून घेयाची न्हाई. आन काय चालतेत झपाझपा या वयात! म्हाराज फुडल्या गावाला गेल्यावर लोकान्ला ईज का पडली आणि गुरं राखायला गेलेला शिरपा का मिसिंग हाये ते कळायचं. तंवर म्हाराज ज्युरिसडिक्शनच्या भाईर गेलेले असत.

पण कायपन म्हना, आज ती टेक्नाॅलाॅजी ऱ्हायली न्हाई ते बरंच. ती ऱ्हायली आसती तर सगळ्यात जास्त वापरात आसलेलं तंत्रज्ञान आसतं ते शाप देण्याचं. कावळ्याच्या शापानं गाय मेली आसती. हुतं ते बऱ्यासाठीच. आपल्याला शापाच्या आदीच उ:शाप भेटला. उगाच पुराणकाळाच्या नावानं इवळू नगा.

Monday, August 17, 2015

स्वातंत्र्याची ऐशीतैशी

स्वातंत्र्यदिन होऊन गेला. लेखनकामाठ्यांनी बरंच त्यावर लिहिलं. ती आपली पद्धतच झाली आहे. बरंचसं लिखाण उपरोधी, लोकांच्या "हॅपी इन्डिपेंडन्स डे" टाईप शुभेच्छांची टर उडवणारं, तर काही नेहेमीप्रमाणे इतकी वर्षं झाली पण आपल्यात काय पण फरक नाय पडला ब्वॉ, सगळे राजकारणी चोर, सरकार झोपलं आहे, नोकरशाही खाबू आहे, शेतकरी आत्महत्या करताहेत, सामान्य जनता तेवढी अश्राप, कष्टकरी आहे, यात बळी जाणारी आहे असं काही तरी व्यक्त करणारं. स्वातंत्र्य म्हणजे सरकारने सगळ्या जबाबदाऱ्या घ्याव्यात, कुठून तरी पैसे आणावेत (म्हणजे कृपया माझ्याकडे कर मागू नका), रस्ते चकाचक करावेत, पेट्रोल फुकट करावे, कुठेही लाच द्यायला लागू नये इत्यादि गोड आशा. सरकारच्या जबाबदाऱ्या इथवर संपत नाहीत. आम्ही कर्जे घेऊ, ती माफ व्हायला हवीत, नाही तर आम्ही आत्महत्या करणार, आमची बायका पोरं रस्त्यावर आणणार, मग काही थोर समाजसेवक त्यांना बारा पंधरा हजार वाटणार, आम्ही फेसबुकवर, ट्वीटरवर या समाजसेवकांचे गोडवे गाणार आणि सरकार कसं हरामी आहे त्यावर लिहिणार. आणि हो, हे सगळं करायला फुकट वायफायचीही मागणी करणार. पण हे सगळं असं लिहिलं म्हणजे मी सर्वांपेक्षा वेगळा, संवेदनशील, विचारवंत. असं सगळं अस्वस्थ करणारं, भयंकर क्रांतिकारी लिहिल्यानंतर समाधानानं माझ्या एसी लावलेल्या घरात मी झोपणार, झोपता झोपता दुसऱ्या दिवशी लिखाणाच्या काय पाट्या टाकायच्या याचा विचार करणार. समस्या वगैरे मरूद्यात, मला विषय हवा. अरेच्या! समस्या मरूद्यात कसं? समस्या हव्यातच! नाही तर मी लिहिणार कशावर नी बोंब कशावर मारणार? स्वातंत्र्य या शब्दाचा स्वत:ला हवा तसा अर्थ कसा लावायचा हे भारतीयांकडून शिकावे. त्यातल्या त्यात मरहट्ट देशाचे सर्वात पुढे. इथे सगळेच चाणक्य, सगळेच ॲरिस्टाॅटल आणि सगळेच कान्ट. स्वत:च्या तंत्राप्रमाणे चालता आले तर ते स्वातंत्र्य नाही तर ते पारतंत्र्य. सामर्थ्य आहे गर्दीचे, स्वामी आणि त्यांच्या पिलावळीचे असे काहीसे भारतीय लोकशाहीचे स्वरूप झाले आहे. भाषणस्वातंत्र्य, व्यक्तिस्वातंत्र्य हे सर्व स्वत:चे तंत्र नीट लावल्याशिवाय काही अर्थाचे नसते हे सोयीस्करपणे विसरले गेले आहे. गेल्या अडुसष्ट वर्षांत, बोंबलणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी बजावणारच असे बाणेदारपणे लिहिणारे (केवळ लिहिणारेच) लोकलमान्य तेवढे गल्लोगल्ली झाले आहेत. दिसामाजि काही तरी लिहावे असं समर्थ सांगून गेले खरे, लोकांनी स्वत:ला पाहिजे तो अर्थ लावून दिसामाजि कायच्या काही तरी लिहावे असा सपाटा लावला. त्याला हातभार प्रात:स्मरणीय झुकेरबर्ग यांनी लावला. प्रात:स्मरणीय हा शब्द खऱ्या अर्थाने घ्यायचा. पूर्वी भल्या सकाळी लोटा पाहणारे आता प्रथम फेसबुक पाहतात.  लोकांकडे प्रचंड रिकामा वेळ आहे असं वाटायला लावणारं हे सगळं आहे.

भारतीय लोकशाही ही अशी सर्वस्वी सरकारवर अवलंबून राहणारी का झाली असावी? लोकांनी लोकांसाठी चालवलेली व्यवस्था अशी व्याख्या केल्यावर "सरकार" म्हणजे कुणी तरी अगम्य निराकार संस्था आहे, आणि तिच्याकडून सगळा न्याय अपेक्षित आहे, त्या संस्थेने जीडीपीची चिंता करायची, पाश्चिमात्य अर्थव्यवस्थेला तोडीस तोड अशी आपली अर्थव्यवस्था बनवायची, या शिवाय सामाजिक आरोग्याचीही जबाबदारी घ्यायची. आपण मात्र संध्याकाळी कट्ट्यावर बसून "ये सिस्टमही खराब है, मेरा बस चलता तो मैं ये पूरे सिस्टमको उखाड फेक देता" वगैरे जग्गूदादा (तोच तो अंगारमधला जग्गू, दातावर मारायला पैसा नाही, पण मोटरसायकलची ऐपत असणारा) स्टाईल डायलॉग्ज मारायचे. हा जग्गू शर्ट टाय लावून क्लार्कच्या पदासाठी मुलाखतीला जातो आणि तिथे आपले क्रांतिकारी विचार मांडतो. समोर त्याच्यासारखाच शर्ट टाय लावून बसलेला क्रांति बिंती करणं हे आपलं काम नाही, असं सांगून त्याला नारळ देतो. मग जग्गू पुन्हा शर्ट काढून बनियनवर मोटरसायकल उडवायला मोकळा.  तसाच पुढे जाऊन तो बँड स्टँडच्या त्या स्पेशल खडकांत बसून ही 'सिस्टम' कशी आपल्याला अँग्री यंग मॅन बनवते आहे याबद्दल त्वेषाने भाषण करतो. त्याची त्यावेळची एखादी प्रेयसी ते भाषण डोळ्यांत साहिल, किनारा, तूफां यांपैकी एक काही तरी आणून ऐकते. मग हा आणखीच शेफारतो. श्रीमंत मनुष्य हा भांडवलशाही विचारसरणीचा असतो, मध्यमवर्गीय समाजवादी असतो तर कफल्लक मनुष्य हा कम्युनिस्ट असतो. जग्गू कफल्लक असल्याने साहजिकच त्याची क्रांतिच्या कल्पना आहे त्याच चाळीत राहणे, फक्त समोर एक हॉस्पिटल, एक सातवीपर्यंतची शाळा आणि सातवी संपल्यानंतर पुढे करायला काहीच नसल्यामुळे व्हॉलीबॉल खेळण्यापुरते एक मैदान यापलीकडे जात नाही. आपण अँग्री आहोत, आपल्यावर कसलातरी सतत अन्याय होऊन राहिला आहे या धुंदीत राहायला जग्गूला आवडतं. मग जग्गू स्वत:च्या नकळत ती परिस्थिती आवडून घेऊ लागतो, नव्हे, ती तशीच राहील याची काळजी घेतो. टोकाची कृती केल्याशिवाय परिस्थिती बदलणार नाही असं तो स्वत:ला समजावतो आणि इतरांना बजावतो. क्रांति म्हणजे नक्की काय असा विचार कधी तरी त्याच्या मनात येत असेलही. पण अन्याय सहन करून राहिलो आहोत, संधी मिळाली असती तर कुठल्या कुठे गेलो असतो वगैरेची धुंदी एवढी जबर असते की खरा बदल जर झाला तर काय घ्या असा विचार करून गप्प बसायला होत असेल. या जग्गूला त्याचे क्रांतिकारक विचार ऐकून घेऊनही खरोखरच ती क्लार्कची नोकरी मिळायला हवी होती. कुठलेही काम हे कमीपणाचे नसते ही पहिली खरीखुरी वैचारिक क्रांती त्याला करता आली असती. सामाजिक क्रांती घडवून आणायला आधी त्या समाजाचा अधिकृत असा भाग तरी बनता आले असते.

स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली, आपण काय मिळवले असा प्रश्न केला जातो. पर्यायाने प्रगती किती झाली असा तो रोख असतो. गुळगुळीत सहा पदरी रस्ते, चकचकीत इमारती, इम्पोर्टेड गाड्या विकत घेण्याची ऐपत ही प्रगतीची व्याख्या असायला हरकत नाही, पण त्याचबरोबर त्या रस्त्यांवरून नियम पाळून त्या इम्पोर्टेड गाड्या चालवणे, शहराच्या पुढील पंचवीस वर्षांच्या गरजांचा आढावा घेऊन इमारती बांधणे, मुजोरपणे बांधकाम करून नंतर लाच देऊन ते नियमित करून न घेणे हे सुद्धा प्रगती या सदराखाली बसते हे लक्षात यायला हवे. शासनाने माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालू नये, पण मी सोशल मीडियावर कसलाही पुरावा नसताना वाटेल ते आरोप करून इतर लोकांचे चारित्र्यहनन करेन हे प्रगतीच्या सदरात मोडेल असं वाटत नाही. शासनाने आपल्याला सर्व सोयी उपलब्ध करून द्याव्यात, पण माझ्याकडे कर मागू नये. सामाजिक समरसता निर्माण करण्याची जबाबदारी घ्यायला हवी पण मी माझ्या जातीचा जाज्वल्य अभिमान बाळगेन. संभाजी ब्रिगेडसारखी निखालस द्वेषाचे राजकारण करणारी जातीयवादी टोळी या देशात निर्माण होणे हे आपलेच अपयश आहे. पर्यायाने लोकशाहीचे अपयश आहे. अर्थात लोकशाहीचे स्वातंत्र्य काही चांगल्या माणसांपुरते नसते, ते असल्या नतद्रष्ट मंडळींनाही मिळते. तेव्हा इतक्या वर्षांत आपण काय मिळवले याचा विचार करताना हे अपयशसुद्धा लक्षात घ्यावे. आपण काय मिळवले याचा शोध स्वत:मध्ये प्रथम करावा लागेल. कॉंग्रेसने देशाला बुडवले अथवा नाडले नाही. ठपका ठेवून नामानिराळे होणे केव्हाही सोपे. लोकांनी लोकांसाठी निर्माण केलेल्या या व्यवस्थेने लोकांनीच घालून दिलेल्या भ्रष्ट व्यवस्थेचे पालन केले तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण काय? लोकशाहीत शासन हा लोकांचा आरसा असतो. तुम्ही सुंदर व्हा, आरशात चित्र सुंदरच दिसेल. नाही तर ऑस्कर वाईल्डने "पिक्चर ऑफ डोरायन ग्रे" मध्ये दाखवले आहे तसेच व्हायचे. वरून सुंदर, तरुण दिसणारी व्यक्ती प्रत्यक्षात आतून कशी आहे ते पहायचे असेल तर तिचा आत्मा पाहावा. भारतीय लोकशाहीचा डोरायन ग्रे होऊ नये ही सदिच्छा!