Tuesday, September 29, 2015

न जाईल ते बलिदान वृथा

मरावे परि फेसबूकरूपी उरावे
भिकार पोस्ट तरी लाईक मारावे
आपणही उलट टुकार पोस्ट करावे
घटिका पळे दिन मास झणी सरावे
सदोदित वॉलवर पडीक राहावे
जीना यहां मरना यहां घोकत असावे ।।

व्याकरणाची चिंता करणे सोडोन द्यावे
शुद्धलेखनाला तुज्या आयचो घो म्हणावे 
"खुप छान, खुप छान" कॉमेंट वाचून रडावे
मनी "खू दीर्घ रे सोट्या!' असे ओरडावे
चडफडून ओठांवर दात रुतवावे
खुनातला खू र्हस्व की दीर्घ ते आठवावे।।

वाया गेलास तू असे थोरांनी ऐकवावे
बाबा तू यूसलेस असे पोरांनी म्हणावे
फोन अथवा मी असे बायकोने चॅलेंजावे
इथले वायफाय प्रिय असे बॉसने हिणवावे
हाच तो सर्वसंगपरित्याग असे स्वत:स समजवावे
साधूस जशी चिलीम तसे हे फेसबूक बरवे।।

परि वृथा न हा त्याग असे ऐकण्यात यावे
थेट यूएस मधून सनई चौघडे वाजावे
वाजावे कसले खरे तर कानी बोंबलावे
पाहून ती भरतभेट आनंदाश्रू ओघळावे
मारा पासे सवा कोट यूजर छे नमोंनी वदावे
चोक्कस असे फेसबूकस्वामींनी चीत्कारावे
अन सवासो कोट डोलर नमोचरणी अर्पावे।।

सवा कोटीतील म्यां एक म्हणोन हरखावे
भरास येऊन स्टेटस अपडेटावे
झालाच आता भारत महासत्ता म्हणावे
पाहोन ते ट्रेंडिंग ते दोन बनिये सुखवावे
बीजनेस आणि राजकारण भरून पावावे
आपण तेवढे आपले ब्रीद सांभाळावे
मरावे परि फेसबूकरूपे उरावे ।।

Monday, September 21, 2015

निर्गुणी संवाद

खूप वर्षांपूर्वी असंच एक वेड लागलं. ते वेड अद्याप तसंच आहे. त्यावर काही उपचार वगैरेही करावेसे वाटत नाहीत. ते वेड होतं निर्गुणी भजनांचं. मला वाटतं वडील कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनांची कॅसेट रेकॉर्ड करून घेऊन आले असावेत. त्यातील "सुनता है गुरु ग्यानी"ने झपाटला गेलो होतो. समाधिअवस्था कशी असते मला माहीत नाही आणि त्यावर बोलण्याची माझी योग्यताही नाही. पण समाधि कशी असेल यावर उगाच विचार मात्र करण्यात खूप वेळ घालवला आहे. कुमारांचं ते "ओहम सोहं बाजा बाजे" ऐकलं आणि तो बाजा आपल्यात सुरु झाला असं वाटलं होतं हे मात्र नक्की. अलंकारिक आणि शब्दबंबाळ लिहिण्याचा माझा पिंड नाही पण, हे वाक्य आतून आल्यामुळे जसं आलं तसं लिहिल्याशिवाय तरणोपाय नाही. ते भजनच बाजासारखं डोक्यात वाजत राहिलं. अनेक वर्षं. कधीही ते सुरू व्हायचं मग पुढे दोन दिवस अखंड चालू. या भजनांच्या निर्मितीची कथा कळली होती. कुठे वाचली स्मरत नाही. पण आजाराने अंथरुणाला खिळलेले कुमार गंधर्व, माळवा प्रांतातील ते एक छोटे गाव, डॉक्टरांनी गाण्याला केलेला मज्जाव, संध्याकाळी दुरून तरळत येणारे ते लोकगीतांचे, भजनांचे सूर असं सगळं कळलं. त्या सुरातील ते आर्त, थेट त्या परमात्म्याशी चाललेला तो संवाद कुमारांच्या प्रतिभेला न कळला तरच नवल. दैवी सूर असे असतात की डोळे आपोआप मिटतात. एक प्रतिभाशाली कलावंत आणि ते अंतराळातून तरंगत आलेले सूर यांतून निर्गुणी भजने घडली. सगुण अशा शब्दांच्या चौकटीत निर्गुण निराकाराचे दर्शन देणारे असे ते सूर कसे बसले असावेत? पण बसले आहेत खरे. अध्यात्म या शब्दाला धर्माशी निगडित करणारे करंटे आपण. या सुरांना भजन असं म्हणून टाकतो. ते भजन आहेच पण लौकिकार्थाने नाही. देवाची उगाच आळवणी नाही. नवस सायास नाहीत. "पोराला नोकरी लागूदे रे बाबा" छाप भक्ती नाही ही. त्या चिरंतन सत्याचा मागोवा घेणारे हे सूर आहेत. देव या संकल्पनेच्या पलीकडे जाऊन त्याचे अमूर्त असे स्वरूप पाहण्याचा तो प्रयत्न आहे. देवाची सगुण मूर्ती आपण तयार केली ती केवळ निर्गुणाचे ध्यान करता येत नाही, सगुण मूर्ती नसेल तर मन इकडे तिकडे धावते, त्याला एका ठिकाणी बसवून विचार करवून घेता येत नाही म्हणून. पण होतं असं की सगुण मूर्ती हे साधन आहे आहे हे विसरून आपण तिलाच साध्य ठरवून बसतो. एकदा त्या अंतिम सत्याला आपल्या मर्यादित आकलनशक्तीच्या सगुण चौकटीत बसवले की मग पुढे जायची शक्यता नाहीच. मला वाटतं सुरांचा प्रत्येक भक्त हा शेवटी साधक बनतो. तो या सगुण चौकटीतून बाहेर पाहत असतो. त्याला पलीकडले दिसत असते जाणवत असते. पण त्या सगुण चौकटीतून कसे सुटायचे हे कळत नसते. कुमार गंधर्वांसारखा एखादाच त्या शृंखलेतून मुक्त होतो आणि सुरातून त्या अंतिम सत्याशी तादात्म्य पावतो.

हे असं असताना सहा सात वर्षांपूर्वी वर्षांपूर्वी पुन्हा "सुनता है " कानावर पडलं. राहुल देशपांडे या नवोदित गायकानं गायलेलं. त्यापूर्वी मी कधी राहुलचं गाणं ऐकलं नव्हतं. आणि मला माहीतही नव्हतं. असाच कुठलासा कार्यक्रम असावा. त्याचं छायामुद्रण होतं. अंगावर रोमांच उभे राहिले. आवाजाचा पोत वेगळा, धीरगंभीर, खर्जातला. ऐकत राहिलो. निर्गुण निराकार असं अंगावर सायीसारखं पसरत गेलं. अनादि अशा त्या ओंकाराशी संवाद ऐकू येऊ लागला. संवाद माझा नव्हता. पण त्या गायकाचा होता. मी फक्त त्याला साक्ष होत होतो. पण अशी साक्ष अनुभवायला मिळणे आणि हे काही तरी दिव्य घडते आहे याचे भान राहणे हेच माझ्या दृष्टीने पुरेसे होते. राहुल देशपांडेंचं वेगळेपण जाणवलं होतं. नादब्रम्हाची उपासना दिसत होती, त्या उपासनेपलीकडे जाण्याची आस जाणवत होती. पुढे कित्येक दिवस मी त्या रेकॉर्डिंगची पारायणं केली. कुवतीनुसार ते सूर स्वत: अनुभवण्याचा प्रयत्न केला. स्वत: गातानाही त्या सुरांचं वजन, त्यातील आर्त जाणवायचं. कधी कधी डोळ्यात अश्रू यायचे. माझ्या येतात. एखादं भव्यदिव्य दृश्य, अप्रतिम लागलेला एखादा सूर, एखादं अत्यंत प्रेमानं किंवा नि:स्वार्थी बुद्धीनं केलेलं कृत्य (मीच असं नव्हे, दुसऱ्या कुणीही), या गोष्टींनी माझ्या डोळ्यात अश्रू येतात. पूर्वी मी ते लपवत असे. पण पुढे गोनीदांनी स्वत:च्या बद्दल असं होतं असं लिहिल्यानंतर मला संकोच वाटेनासा झाला. अश्रू हे दुबळेपणाचं लक्षण आहे अशा खोट्या भ्रामक कल्पनांतून आपण अत्यंत नैसर्गिक अशी ही भावना दडवत असतो. कुमार गंधर्वांच्या त्या "ओहम सोहं बाजा"ने तसे अश्रू माझ्या डोळ्यात आणले होते त्यानंतर राहुल देशपांडेंच्या त्याच भजनाने आणले हा योगायोग म्हणावा की या गायकांची ताकद, की त्या सुरांची आतवर पोचण्याची क्षमता? मला या प्रश्नाचं उत्तर महत्वाचं नाही, अथवा नकोच आहे. गाभाऱ्यात प्रवेश न करता बाहेर बसून आतील मूर्तीकडे डोळे लावून बसण्याची तपश्चर्या करायला मिळणं हेही तेवढंच भाग्याचं. त्यातूनही आत्मा तृप्त होतो.

काल पुन्हा तो पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला. जवळून, प्रत्यक्ष. नादब्रम्ह अवतरलं होतं. माझ्यासारख्या श्रोत्याला जर इतका अनुभव येत असेल तर प्रत्यक्ष गाणाऱ्याची अवस्था उन्मनी अशीच होत असेल असं मला नेहमी वाटायचं. आता मला संधी मिळाल्यावर हा प्रश्न राहुलना विचारलाही. त्यांनी त्याचं उत्तर त्यांच्या स्वत:च्या "विरहिणी बोले" कार्यक्रमाच्या अनुभवाबद्दल बोलून दिलं. संवाद घडतोच आणि तो असा निर्गुण असतो की त्याचं वर्णन शब्दांत करता येणार नाही. मला हे उत्तर आधीच कळलं होतं, त्यांच्या गाण्यातून. यालाच समाधि म्हणत असावेत. अध्यात्म जे काय असेल ते असो, समाधि काय असते त्याचं उत्तर मला मिळालंय. 

Friday, September 11, 2015

उ:शाप

आपण रोज उठून इवळत असतो - पुराणकाळी मपला देश लैच प्रगत हुता भौ. येक म्हणून टेक्नाॅलाॅजी आपुन सोडल्याली न्हवती. उड्ढाण घ्या, अग्निबाण घ्या, पर्जन्यबाण घ्या, बूड आजाबात न हालवता जाग्यावर विश्वरूपदर्शन (प्रोप्रा. श्रीकृष्ण यादव) घ्या, अंतर्ज्ञान घ्या, सग्गळीकडे निसतं ज्ञानच ज्ञान. न्हान पोरगं बी बोलाया लागलं तर "मित्रजन हो, तात आत्ताच सूक्ष्मदेह धारण करून पृथ्वीवरून बाहेर पडले आहेत. गुरूपर्यंत चक्कर मारून येतो असं मातोश्रींना ते सांगत असताना आम्ही ऐकले आहे. तस्मात, दोन तीन घटिका कल्लोळ करावयास काहीच हरकत नाही." आसं कायबाय बोलत असावं. दुर्दैवानं पिताश्रींनी ते अंतर्ज्ञानानं ताडावं आणि अंतरिक्षातूनच फोकयान (हे यान उत्तम अशा चिंचेच्या फोकापासून बनवलेलं असायचं) सिद्ध करून चिरंजीवांना फोकडान्स करायला लावावा. हेला म्हणतात तंत्रज्ञान. 
या घरगुती तंत्रज्ञानाचं काय नाय हो, पण ते शाप देण्याचं तंत्रज्ञान मात्र लै भारी व्हतं बर का. मायला, कुनीबी चिढला तर डायरेक शापच देयाचा. दगडच काय व्हशील, फुडल्या जल्मी गाडावच काय व्हशील. आन ते तंत्रज्ञानबी आसं भारी की मानूस व्हायाचा बी दगड आन गाडाव. मग मांडवली झाल्यावर रीतसर उ:शापबी देयाचा. पण ऋषीबिशी होते तेनला आनखी भारी शाप अव्हेलेबल व्हते. जटादाढीवालं ऋषी चिडलं तर आत्ताच्या आत्ता ईज पडून मरशील आसला काय तरी शाप देयाचं. हे कुटंबी जाऊन बसायचं ध्यान लावायला. गुमान आपल्या आश्रमात किंवा जी काय कुटीबिटी आसंला तिथं बसावं क न्हाय, ते ऱ्हायलं. आन मग कुनी गायगुरू चाराया आलं तर झालं, हेंचा तपोभंगच! जसा काय इतक्या येळ देवाचा फोन आऊट ऑफ रीच व्हता, निक्ता लागला व्हता आन हेच्यामुळं कॉल ड्रॉप झाला. इतर शापान्ला उ:शाप तरी व्हते हो, पन ईजच पाडल्यावर कसला उ:शाप आन काय. भौतेक ऋषी शाप देऊन झाल्यावर जीभ चावायचे. कारन टक्कुरं शांत झाल्यावर लक्षात यायचं मायला उगाच शाप देऊन बसलो राव. मग गुपचूप ध्यानाची जागाच बदलायचे. लोकान्ला वाटायचं काय म्हाराज हैत, सर्वसंगपरित्याग म्हंजे आसा आसावा, एका ठिकाणी माया लावून घेयाची न्हाई. आन काय चालतेत झपाझपा या वयात! म्हाराज फुडल्या गावाला गेल्यावर लोकान्ला ईज का पडली आणि गुरं राखायला गेलेला शिरपा का मिसिंग हाये ते कळायचं. तंवर म्हाराज ज्युरिसडिक्शनच्या भाईर गेलेले असत.

पण कायपन म्हना, आज ती टेक्नाॅलाॅजी ऱ्हायली न्हाई ते बरंच. ती ऱ्हायली आसती तर सगळ्यात जास्त वापरात आसलेलं तंत्रज्ञान आसतं ते शाप देण्याचं. कावळ्याच्या शापानं गाय मेली आसती. हुतं ते बऱ्यासाठीच. आपल्याला शापाच्या आदीच उ:शाप भेटला. उगाच पुराणकाळाच्या नावानं इवळू नगा.