Saturday, January 19, 2019

मांजरेकर - एक बोका की मनी

आम्ही आजवर खूप नाटकं केली. स्टेज मिळो वा न मिळो, आम्ही थांबलो नाही. प्रेक्षक मिळो अथवा न मिळो, आम्ही कोकलत राहिलो. या बाबतीत आम्ही डोंबाऱ्याचा आदर्श ठेवला आहे. एक-दोन माकडे, हातात डमरू किंवा काहीही आवाज करणारे पात्र, आणि तोंडातून अखंड बडबड असल्यास निरुद्द्योगी भारतीयांची कमतरता नाही हे सत्य आम्हांस केव्हाच उमगले होते. शिवाय नाटकं करायला लागतंच काय? नेपथ्य, प्रॉपर्टी म्यानेजर, दिग्दर्शक, मिळाल्यास कथा, सहज परिसरात सापडले तर एक दोन नट-बोलट. इतकीच माफक अपेक्षा. चुलीवरचा झुणका करायलाही यापेक्षा जास्त सामग्री लागते. मग आम्हाला कुणी तरी सांगितले (बहुधा पुण्यात), तुमची नाटकं सुमार असतात, कथा त्याच त्या धोपटू असतात, तुमचे दिग्दर्शकाचे बेअरिंग म्हणजे सायकलच्या चाकातून निसटून घरंगळलेले बॉलबेअरिंग असते.  पूर्ण नाटकभर तुमचे दिग्दर्शन बोक्यासारखे फिरते आहे असे जाणवत राहते. बोका हा मनीला पोटुशी ठेवणे हे आपले जीवनातले एकमेव कार्य करत राहून, पिल्लं झाली की त्यांना खाण्यासाठी दबा धरून असतो तसे तुमचे नाटकातील अस्तित्व जाणवत राहते. त्यात मध्येच तुम्ही स्वतःची एंट्री करून खरोखरच एखादे पिल्लू मटकावल्यासारखे सीनच्या चिंध्या करून जाता. आम्ही थक्क होऊन ऐकत होतो. मराठी बिगबॉसमध्येही इतके डायलॉग आमच्या नशिबी आले नव्हते. इथे हा पुणेकर मध्यंतरात बटाटेवडा खात, मध्येच तोंडात आलेली कोथिंबिरीची काडी लीलया वातावरणात भिरकावत आमच्या आजवरच्या जीवनाचे वडे तेलात तळून काढत होता. आम्ही अंतर्मुख झालो. थोडेसे खिन्नही झालो. खूप वर्षांनी अंतर्मुख झाल्यामुळे अंतर्मन ओळखीचे वाटले नाही. खूप वर्षांनी गावात आल्यावर कोपऱ्यावरची नेहमीची मुतारी जाऊन तिथे सुलभ शौचालय आले आहे असे दिसल्यावर जसे वाटावे तसे वाटले. पुणेकरांसाठी काय काय नाही केलं? नाट्यसम्राट काढला. नुसता काढला नाही तर पाटेकरांना घेऊन काढला. त्यावरही पुणेकर नाखूष. पाटेकरांना घेऊन काढला नाही म्हणे, नुसतंच "घेऊन" काढला आहे म्हणाले. असं वाटलं, डेढ फुट्यासारखी  "एssss" अशी गर्जना करून दगड उचलावा. 
पण तितक्यात महाराज घोड्यावरून आले, म्हणाले, "माझ्या मोकाट मांजरा, माझ्या लाडक्या बोक्या, आम्ही स्वराज्य मिळवलं ते हे पाहण्यासाठी?" 
आम्ही दगड खाली टाकला. "बघा ना महाराज, आम्ही मन लावून काही करत आहोत तर त्यात काही तरी न्यून काढून सांगत बसतात." 
महाराज उग्र मुद्रेने म्हणाले,"आम्हीही तेच म्हणतो आहोत, आम्ही स्वराज्य मिळवलं, ते तू हे असले सिनेमे काढावेस म्हणून? आता असं काय केलंस म्हणून लोकांनी काठ्या उचलल्या आहेत?" 
आम्ही स्तब्ध झालो. महाराजांनी आत्ताचा आमचा नवा उद्योग पाहिला तर नसेल? 
"म म महाराज, कुठे काय, हे ते आपलं असंच." आम्ही चाचरत म्हणालो. 
"मांजऱ्या!" महाराज कडाडले!
आम्हाला आमच्या सुरवारीच्या मागे अचानक तीव्र अशी जाणीव झाली. 
"महाराज, माफी ! माफी! कुणी चांडाळाने मला आहे मनोहर तरी हे पुस्तक वाचायला दिलं. ते वाचून.. ते वाचून..." भीतीने आमच्या तोंडातून शब्द फुटेना. 
"बोल! आता थांबू नकोस"
"ते वाचून महाराज.... मला स्फूर्ती आली. स्फूर्ती आली. महाराज येक डाव माफी, माफी!" आम्ही महाराजांच्या घोडयाच्या पायावर पडलो. 
"अरे बोक्या, जे जे सुंदर, जे जे उत्कट त्यावर जाऊन तंगडं वर करायची अवदसा मुळात होतेच कशी तुला?" महाराज व्यथित झालेले दिसले. 
आम्हाला जरा धीर आला. बहिर्जीला आम्हाला उचलायची आज्ञा झाली नाही हे बहुधा आमच्या "मी शिवाजीराजे बोलतोय" चं पुण्यच असावं असा विचार मनात आला. "
"होय! ते तुझं पुण्यच आहे! म्हणून वाचलास यायची जाणीव ठेव. नाही तर इथून नागनाथ पार दूर नाही. तिथे पुन्हा हत्तीच्या पायाखाली देण्याचा प्रसंग आम्ही घडवून आणला असता." महाराज जरासे शांत झालेले दिसले. 
तो मोका साधून आम्ही चाचरलो," महाराज, आपल्या जीवनावरही बायोपिक काढायचा विचार आत्ताच माझ्या मनात आला. आशीर्वाद असेल का?" 
महाराजांनी दचकून आमच्याकडे पाहिले. प्रथम त्यांच्या चेहऱ्यावर दुःख दिसले मग क्षणात त्याची जागा क्रोधाने घेतली. 
"खामोश! इतके दिवस तू बैलासारखा नासधूस करत फिरतो आहेस, आम्ही दुर्लक्ष केले. वाटलं, या स्वराज्यात एखाद्या बैलालाही कलेचं स्वातंत्र्य असावं, त्याने मुक्तपणे फिरावं, डुरकावं, खुरांनी मनसोक्त माती उकरावी, एखादी तरणी गाय दिसल्यास तिच्याभवती गाणी गात पिंगा घालावा. आम्हाला वाटायचं बैल आहे, उधळणारच. पण इथे तू आमच्याच इभ्रतीला हात घालायला निघालास! खबर्दार बायोपिक काढलास तर!" महाराजांच्या त्या कडाडण्याने आम्ही थरथरलो. 
महाराजांना काय वाटलं कुणास ठाऊक, मग समजावणीच्या सुरात आम्हाला म्हणाले,"म्हणजे असं बघ, माझ्या गटाण्या बोक्या, रांझ्याच्या पाटलाची सजा लक्षात ठेव. त्याला नुसतेच हातपाय होते. तुला तर शेपूट पण आहे."
हे ऐकून मग आम्ही शेपूट किंचित खाली केली. 
भानावर आलो तेव्हा महाराज कुठेच नव्हते. तो पुणेकर रसिक आता चहा पीत ,"ह्यॅ:! आत्ताच्या सवाईमध्ये पोरंटोरं गातात रे. मी जातो अजून. सूर चुकवलान की बसलो तिथूनच ओरडून सांगतो. ह्यॅ! कोमल निषाद! तो कोमल निषाद नीट लावा जरा!" असं कुणाला तरी सांगत होता. 
आमच्या हातातला बटाटावडा आता गार झाला होता. चहावर गलिच्छ काळपट साय आली होती. आम्ही म्हणालो,"बघा, तुमच्या नादात आमचा प्राणप्रिय असा वडा वाया गेला!". तशी तो म्हणाला,"तुमच्या भाई शिणमानं आमचं असंच केलं." 

चुलीवरील झुणका करणेही याहून कठीण असते असे आता वाटू लागले आहे. पण बोका हा बोका असतो. कार्यभाग साधून झाल्यावर मनीवरच गुरगुरतो, शेपूट वर करून आपली इवलीशी लिंबे दाखवत मस्त उनाडत राहतो. आणि आम्ही बोका आहोत. 

पाडगावकरांचं सुख

नमस्कार, हे आकाशवाणी जळगांव स्टेशन आहे. "गंध मराठी कवितेचा" या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. या कार्यक्रमांतर्गत आपण आपल्याला भावलेल्या, मनात रुंजी घालणाऱ्या कवितेचं रसग्रहण करतो, वाचन करतो. आजची कविता आहे मंगेश पाडगांवकर यांची. 

कवितेचं नाव आहे - *सुख माझ्या नजरेतून*


सुख सुख म्हणजे  नेमकं काय असतं ? 
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..

भर पहाटे धुक्याची रेषा डोळ्याला दिसणं,
सोनचाफ्याची फुले वेचताना हातांचं सुगंधी होणं,
नंदादिपातल्या ज्योतीकडे एक क्षण बघणं,
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..

साधीशी कढी सुद्धा मनाजोगी जमणं,
हातावर थापलेली भाकरी टम्म फुगणं,
डब्यातला गुळाचा खडा हळूच जीभेवर ठेवणं,
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..

एखाद्या आजीचा हात धरून रस्ता पार करणं,
वाटेत पडलेलं केळीच साल आपणच उचलणं,
टपरी वरच्या चहाचा बिनदिक्कत आस्वाद घेणं,
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं....

एखाद्या चिमणीला जवळून बघणं,
हवेत उडणाऱ्या म्हातारीचा पाठलाग करणं,
एक डाव लगोरीचा खेळायला मिळणं
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं....

खिडकीतून अचानक चंद्रकोर दिसणं,
रातराणीचा सुगंध उरात साठवणं,
पलंगावर पाठ टेकली की क्षणात डोळा लागणं,
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं....🌸

पाडगांवकरांची ही कविता सुख म्हणजे काय ते नेमकं सांगते. नित्याच्या गोष्टी करत असताना आपण त्यातल्या आनंदाकडे दुर्लक्ष करत असतो, आणि एक उरकायचं काम किंवा कर्तव्य म्हणून ती कामं करत असतो. पाडगावकरांच्या या कवितेनं "अरेच्या, आपण आनंदाच्या खजिन्यावर बसलो आहोत आणि आपल्याला त्याचा पत्ताच नाही" असंच वाटतं. साध्या गोष्टींतून किती आनंद भरला आहे, चराचरात तो भरला आहे, आपण असे करंटे आहोत की आपण त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. पुलं म्हणतात तसं आपण फणस सोलून गरे फेकून देऊन साली चावत बसलो आहोत. समाधान सुद्धा अनुभवायला शिकायला लागतं. ही कविता आपल्यालानेमकं तेच शिकवते. कविता वाचून तृप्त झालेलं मन समाधानी होतं. अशाच समाधानी अवस्थेत  या कवितेला थोडंसं माझंही ठिगळ जोडावंसं वाटतं. पाडगांवकर आज नाहीत, त्यामुळे हे धारिष्ट्य करावंसं वाटतं. पण मला वाटतं या माझ्या ठिगळातही त्यांनी आनंदच शोधला असता. 

तळहातीचा फोड हळुवार कुरवाळणं
जखमेवर हलकीशी फुंकर घालणं
दु:खाशिवाय सुख नाही हे कळणं
सुख सुख म्हणजे नेमकं काय असतं?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं..

मंगेश पाडगांवकर यांना हे कडवं अर्पण करतो आणि आजचा आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद!

Thursday, January 3, 2019

रेडिओ जळगांव प्रसारण ३ जानेवारी २०१९

(निवेदक
नमस्कार, हे आकाशवाणीचं जळगांव स्टेशन आहे. उसंतवाणी सादर करीत आहोत. सादर करताहेत आपल्या जगण्यातून उसंत मिळाल्यावर इतरांना विश्वाचे रहस्य रसाळ ओव्यांतून उलगडून सांगणारे १००८ श्री श्री ओवीशंकर. गेली वर्षभर आम्ही श्री श्री ओवीशंकर यांना रेडिओ जळगांव स्टेशनवर कार्यक्रम करण्यासाठी गळ घालत होतो, पण त्यांना उसंत मिळत नव्हती. तो योग अखेर जुळून आला आहे.

———(ओवीशंकर)———
श्रोते म्हणती कोण संत
काय म्हणोनी नाचतो येथ
केलियाने याची साथ
काय प्राप्त होतसे ॥

निरूपण - आपल्याला प्रश्न पडला असेल हा कोण संत? इथे काय म्हणून नाचतो आहे? याच्याबरोबर आपणही नाचल्याने आम्हांस काय बरे मिळणार आहे? प्रश्न नैसर्गिक आहे, साहजिक आहे. येथे शून्याची साधना होत आहे, शून्याचे निरूपण केले जाणार आहे. 

जयांचे अंगी भलते तर्कट
वर लीळा अपार मर्कट
नसत्या शंका काथ्याकूट
तयांसि शांती मिळतसे ॥

निरूपण  - या जगात अपानी कीटक प्राप्त झालेले जिवाणू बरेच आहेत. ते तर्कट लढवण्यात मग्न असतात. शंकाकुशंका काढून मनात संदेह उत्पन्न करून पळून जातात. त्यांची शांती, पर्यायाने आपली शांती करण्याचे प्रयोजन आहे. 

हे विश्व कसे नि आले कोठून
त्यांत कशास आमचे प्रतिष्ठान
जन्मजात आम्हा चौकश्या महान
मनी दुष्ट शंका येतसे ॥

निरूपण - हे सर्व काय आहे? येथे आमचे काय काम आहे? असल्या चांभारचौकशा करण्याचे भाग्य आम्हांस जन्मजात लाभले आहे. मनात येणाऱ्या शंका दुष्टच असतात, कारण त्या अस्वस्थ करून सोडतात. 

जगात सर्वत्र असे शून्य
बाहेर शून्य आतही शून्य
शून्य कर्माचे फळही शून्य
शून्यात ब्रह्मांड होतसे ॥

निरूपण  - शून्यच सर्वव्यापी आहे, निर्विवाद सत्य आहे. अंतर्बाह्य शून्यच आहे. शून्य कर्म करावे, त्याचे फळ शून्यच घ्यावे. शून्य म्हणजेच ब्रह्माण्ड आहे, ब्रह्माण्ड हेच शून्य आहे. 

जगीं न अभ्यास न अज्ञान
न तेथ पांडित्य नचही ज्ञान
न प्राविण्य न कसलीही जाण
अंध:कार प्रकाश एक जाणिजे ॥

निरूपण - येथे अभ्यासही नाही, अज्ञानही नाही. पांडित्याने कसलेही ज्ञान मिळत नाही. शिक्षणाने कसलीहीजाण येत नाही. अंधार ही प्रकाशाचीच दुसरी बाजू आहे. सर्व गोष्टींचा अभाव म्हणजेच शून्य, आणि म्हणून हे भौतिक जगही अस्तित्वविहीन आहे. 

मूळ व्याधि असे आपले मन
फुकाचे मनन आणि चिंतन
तत्वज्ञान जसे जणू विचारधन
बंदिस्त मक्षिका श्लेष्मग्रासे ॥

निरूपण  - सगळ्या शंका कुशंकांचं मूळ म्हणजे आपले मन. फुकट कामधंदा सोडून मनन, चिंतन करणारे, भलतीकडे पळणारे हे मन. त्याला तत्वज्ञान म्हणजे जणू काही धनच वाटते. शेम्बडात अडकलेल्या माशीप्रमाणे मन त्याच त्याच तत्वज्ञानात फिरत असते म्हणून त्याला उत्तरं मिळत नाहीत. 

ओवी म्हणे जो मनी मुक्त
तयां न प्रश्न वा होई शंकांकित
राही उदासीन शुंभ अव्यक्त
अंतरी त्याचे सत्य वसे॥

निरूपण - जो मनापासून मुक्त पावला त्याला कसलीही शंका येत नाही. शुंभाप्रमाणे उदासीन राहणे, कशावरही मत व्यक्त न करणे हे त्याचे व्यवच्छेदक लक्षण असते. सत्य त्याला उमगलेले असते. 

श्रोता म्हणे हा साक्षात्कार
स्वामीकृपे दिसला चमत्कार
शून्य अभ्यासे मार्क गोलाकार
गुह्य शाळेचे लख्ख उलगडे ॥

निरूपण - आता तुम्हाला लक्षात आले असेलच, शाळेत परीक्षेत  मिळणारा भोपळा बक्षीसाप्रमाणे घेतला असता तर अंतिम सत्यापर्यंत जाण्याचा मार्ग नक्कीच सुकर झाला असता. 

मंडळी, विचार न करण्याची सवय लावून घ्या. अविचारी व्हा. तेच सत्य आहे, तेच असत्य आहे. सत्याला जाणून घ्यायचा जितका प्रयत्न कराल तितके ते तुमच्यापासून दूर पळेल. अविचाराने त्यावर मात करा. तुम्हाला गुरूची गरज नाही. ज्ञानाची गरज नाही. तुम्ही अस्तित्वातच नाही तर गरज कशी काय असू शकेल? जळगांव रेडिओ स्टेशन मला पूर्वी बोलावत होते पण मी आलो नव्हतो कारण ते मानधनाविषयी काहीच बोलत नसत. मी केवळ मानधनाविषयी विचार करत असल्याने माझे मन गढूळ झाले होते. पण मी विचार करणे सोडल्यावर मला माझी चूक जाणवली. या विचारसरणीचा प्रभाव पहा. आज मी काही विचार न करता वाट्टेल ते बोलू शकतो. मानधनाची मला गरजच वाटत नाही. श्रोतेहो, तुम्हाला अविचारी कसे व्हायचे ते जाणून घ्यायचे असेल तर कृपया थेट माझाशी संपर्क करा. 

आता आपण मूर्खांचे प्रकार पाहू. 

जगीं म्हणे मीच तो ज्ञानी
बोल इतरांचे ठेवी अपानीं
दाखवी टिऱ्या... 

(निवेदक)
माफ करा, प्रक्षेपणात काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे १००८ श्री श्री ओवीशंकर यांचे भाषण मध्येच थांबवत आहोत. हे सदर आपल्यास आवडले असल्यास आम्हाला जरूर कळवा, आम्ही हे दर गुरुवारी प्रक्षेपित करू.  शिवाय, काही श्लोक अर्धवट राहिले याबद्दल क्षमस्व. गरजूंनी आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही ते समग्र श्लोक विनामूल्य पाठवून देऊ. धन्यवाद!