Monday, September 5, 2016

काळ - एक मोनो-लॉग

काळ म्हणजे काय? कधी एकटं असताना, कसलंही व्यवधान नसताना, कसलेही विचार नसताना स्वत:ला हा प्रश्न विचारून पहावा. खरंच, काळ म्हणजे नेमके काय प्रकरण आहे? आपण आपल्या वयाच्या गणनेशी काळाचा संबंध जोडतो. एखादी वस्तू एवढी एवढी जुनी आहे म्हणतो. म्हणजे नेमके काय? एखादी वस्तू २००० वर्षे जुनी आहे आहे असे म्हणणे म्हणजे खरोखर अनंत कालगणनेतील एक कालखंडात ती अस्तित्वात आहे असे म्हणणे.  काल ही संकल्पना आहे. ती संलग्न आहे का, ती सलग आहे का, ती मुळात आहे का हे सगळे प्रश्न तात्विक आणि म्हणून अनुत्तरित राहतात. कसलीच संकल्पना अस्तित्वात नसणे ही संकल्पना समजून घेणे जरा कठीणच. कृष्णविवरात काळ थांबला म्हणजे अस्तित्वात नसतो असे म्हणता येईल. पण बाहेर काळ वाहत असेल तरच सापेक्षतेने कृष्णविवरात काळ नाही असे म्हणावे लागेल. म्हणजे काळ सर्वत्र आहे, काही ठिकाणी तो थांबला आहे, मंदावला आहे तर अन्यत्र तो आपल्याला आकलन होईल अशा गतीने चालू आहे. पण "चालू" आहे असे म्हणणे हे तरी बरोबर आहे का? "चालू आहे" हा शब्दप्रयोग स-दिश (व्हेक्टर) प्रकृती दर्शवतो. स-दिश म्हटले की कशाच्या तरी संदर्भात दिशा दर्शवणे  आले. हा संदर्भ कशाचा देणार? मग काळ अ-दिश मानावा का?

सर्वसामान्यपणे आपण काळ आपल्या आयुष्याच्या तुलनेत मोजतो. ज्या वस्तू अस्तित्वात आहेत त्यांचा सतत क्षय होत असतो. क्षय याचा अर्थ बदल असाही घ्यायचा. परंतु आपण ही संकल्पना नाश पावणाऱ्या वस्तूंच्या संदर्भात आणून ठेवली आहे. बदल अथवा क्षय हा केवळ पूर्वस्मृती असेल तरच समजू शकतो. म्हणजे एखाद्या वस्तूत घडलेला बदल हा त्या वस्तूची आधीची स्थिती ज्ञात असेल तरच कळणे शक्य आहे. तर्कबुद्धी ही अज्ञाताविषयी चिंतन करण्यात वापरता येते असे म्हटले तर तर्क करण्यासाठी मूल माहिती वापरून तिच्या आधारे व्याप्ती वाढवता येते. याचा अर्थ काल ही संकल्पना आपल्याला तर्कबुद्धी, पूर्वमाहितीचा वापर, पूर्वमाहिती तर्कबुद्धीबरोबर वापरून संशोधनक्षमता या गोष्टींमुळे अस्तित्वात आली असावी असे वाटते. मानवाखेरीज इतर प्राण्यांना ही क्षमता असते पण बरीच कमी असते. पूर्वमाहिती आणि अनुभव, तर बरेच वेळा अपघाताने असे प्राणी शिकले, उत्क्रांत पावले. पण तर्कबुद्धी वापरून अमूर्त संकल्पना समजण्याइतकी झेप फक्त मानवानेच घेतली. अर्थात ते मोठ्या मेंदूमुळे शक्य झाले हा भाग वेगळा. प्रस्तुत मुद्दा तो नाही. जे उमजतच नाही ते त्या प्राण्याच्या संदर्भात अस्तित्वातच नाही असे धरायचे का? ते बरोबर वाटत नाही. न्यूटनने शोध लावला नव्हता तरी गुरुत्वाकर्षण अस्तित्वात होतेच.

काळ हा एकदिश वाटला तरी तो नसावा. तसेच तो सर्वत्र एकाच "वेळी" एकाच मात्रेत नसावा. अनेक ओढ्यानाल्यांचे जाळे असावे, काही प्रवाह सलग संथ, काही खळाळते, काही ठिकाणी भोवरे निर्माण होऊन एकाच ठिकाणी फिरत असावे, तर काही ठिकाणी डोह निर्माण होऊन पाणी एकदम स्तब्ध असावे. एका प्रवाहाकडून दुसऱ्या प्रवाहाकडे जाण्यासाठी छोटे मार्ग असावेत. असं काहीसं काळाचं स्वरूप असावं असं वाटतं. पण स्वरूप म्हणजे व्याख्या नव्हे. व्याख्येकडे जाण्यासाठी स्वरूप लक्षात यावं लागतं. विश्व अचल नाही. ग्रह त्यांच्या ताऱ्यांभेवती भ्रमणकक्षेत फिरतात. तारे त्यांच्या आकाशगंगांच्या केंद्रबिंदूशी असलेल्या कृष्णविवराभोवती फिरतात. आकाशगंगाही गतिमान आहेत. महास्फोटातून निर्माण झाल्यानंतर महास्फोटाच्या बिंदूपासून त्या लांब चालल्या आहेत. एकूण, स्थिर असे काहीच नाही. विश्वउत्पत्तीच्या मूलभूत संशोधनातून अशीही एक थियरी पुढे आली आहे की विश्वनिर्मिती आणि त्याचा नाश हे काही एकदा घडणाऱ्या गोष्टी नाहीत. विश्व प्रसारणालाही अंत आहे. प्रसारणानंतर आकुंचन पावणेही आले. अर्थात हे आकुंचन प्रसारणापेक्षा जलद असावे. आकुंचन पूर्ण झाले की ती पूर्वीची "काहीही नसण्याची" स्थिती प्राप्त होते. त्यावेळी मग त्रिमितीच काय, काळही अस्तित्वात नसेल. मग अचानक पुन्हा महास्फोट होऊन पुन्हा विश्व अस्तित्वात येईल. पण काही नसण्याच्या अवस्थेतून बाहेर आल्यावर पुन्हा काही नसण्याच्या अवस्थेत जाईपर्यंत "काळ" (याला काळ म्हणतो कारण आपल्यापाशी नसण्याच्या संकल्पनेला नाव नाही) अस्तित्वात असायला हवा. तो आदि संदर्भ बिंदू, शून्य काळ बिंदू म्हणजे महास्फोट. कालप्रवाह तिथे सुरू झाला. त्या संदर्भबिंदूच्या तुलनेत सगळे मोजले जाणे हा काळ. नश्वर अशा सर्व वस्तू त्या आदि कालबिंदूपासून काही अंतरावर अस्तित्वात येतात आणि काही अंतरावर विसर्जित होतात. बदल असेल तर काळ आहे. बदल नसेल तर काळ नाही. काहीच अस्तित्वात नसेल तेव्हा काळही नसेल. पण हे विचार अस्तित्वाच्या "आतून" झाले आहेत. आकुंचन-प्रसरणाची थिअरी मानली तर काहीच अस्तित्वात नसण्याच्या स्थितीपासून पुढचा महास्फोट होऊन पुन्हा अस्तित्वाची स्थिती येईपर्यंतच्या "शून्य प्रहरा"ला काय म्हणायचं? मग ही शून्य स्थिती किती काळ राहते असाच प्रश्न मनात येतो. याचा अर्थ मग कालगणना आणि स्वत: काल ही संकल्पना या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या. आपल्याला काळाचे आकलन गणनेतूनच होत असल्यामुळे गणनेशिवाय काळ कसा समजायचा? ते तर्काला धरूनही होत नाही. मग आकुंचन पावून शून्यावस्थेत गेलेले विश्व आणि पुन्हा महाविस्फोट होऊन अस्तित्वात आलेले विश्व यामध्ये अजिबात "काळ" नसावा. शून्यावस्थेत जाणे आणि पुन्हा अस्तित्वात येणे यात काहीच काळ नसेल तर ते नष्ट होते हे म्हणणेही तर्काला धरून होणार नाही. कारण नष्ट होणे आणि पुन: निर्माण होणे हा बदल आहे. बदल म्हणजे कालगणनेने  तो मोजणे आले. यातून असा निष्कर्ष काढता येईल तो म्हणजे काल ही विश्वापासून एक वेगळी संकल्पना असून विश्व त्यात अंतर्भूत आहे. विश्व अस्तित्वात असो वा नसो, काल अस्तित्वात असेलच. प्रथम काल, मग त्याच्या चौकटीमध्ये विश्व - म्हणजे मूलभूत भौतिक पदार्थ, मूलभूत नियम इत्यादि तयार होत असावेत. काळाचे प्रयोजन तरी काय असावे? एखादी वस्तू असते म्हणजे ती "कशात" तरी अंतर्भूत असते. तिला कंटेनर असावा लागतो. अमर्याद विश्वासाठी त्याचे अमर्यादित्व धारण करू शकणारी, त्याला अंतर्भूत करू शकणारी संकल्पना हवी. ती विश्वाच्या प्रसारणापेक्षा जराशीच जास्त आणि वाढू शकणारी हवी. तिला मूर्त स्वरूपाचे बंधन नको कारण मूर्त स्वरूपाला मर्यादा आली. अमूर्त स्वरूपात परंतु अत्यंत मूलभूत अशा नियमाने ती व्याख्यित असायला हवी.

काळ जर सर्वसमावेशक असेल तर आपण काही संज्ञा फारच फुटकळपणे वापरत आहोत. त्यातील एक म्हणजे त्रिकालाबाधित हा शब्दप्रयोग. काळ हा एक असल्यामुळे त्रिकाल हे काय आहे हे समजत नाही. तसाच त्रिकालाबाधित सत्य हा शब्दप्रयोग. त्रिकालाबाधित केवळ काळच असू शकतो. इतर सर्व वस्तू, चल अचल संकल्पना या सगळ्या काळात समाविष्ट होत असल्यामुळे त्या त्रिकालाबाधित असू शकत नाहीत. अनंत काळ ही एक संकल्पना थोडी बरोबर वाटते. अनंत विश्व सामावून घेण्यासाठी अनंत काळ आवश्यकच असला पाहिजे. विश्वाच्या व्याप्तीप्रमाणे कालाचीही व्याप्ती बदलत असली पाहिजे. म्हणजेच विश्व अनंतपटींनी विस्तार पावल्यास काळ तेवढाच विस्तारला पाहिजे, तसेच विश्व अनंतपटींनी आकुंचन पावल्यास कालही तितक्याच मात्रेने आकुंचन पावत असला पाहिजे. काहीही अस्तित्वात नसलेली अवस्थाही धारण करण्यासाठी आणि त्याच शून्याचा महास्फोट होऊन पुन्हा विश्वनिर्मिती होण्यासाठी काळ आवश्यक असावा. मातेच्या उदरासारखा. जन्म घेण्यासाठी मातेचे उदर हवेच. काळाला आदिमाता म्हणण्यास काही हरकत नसावी.

Sunday, September 4, 2016

गूर आणि गुरू

गुरुजी हा शब्दच मुळी गुरू या धातूपासून झाला आहे असे आमचे नम्र संशोधन आहे. संशोधन नम्र आहे असे नमूद केले म्हणजे त्याचा पुरावा द्यावा लागत नाही. प्राचीन काळी ही गुरे आणि गुरुजी या दोन्ही प्रजाती अस्तित्वात नव्हत्या. गुरू प्रकारचा एक प्राणी पृथ्वीवर अस्तित्वात होता, पुढे यथावकाश जनुकातील बदलामुळे केवळ योगायोगाने एक नवीन प्रजाती तयार झाली. मूळ गुरू प्राणि हंबरत असे, दुगाण्या झाडत असे, ढुशा देऊन प्रतिस्पर्ध्याला लोळवत असे. नवीन प्रजातिमध्ये दुगाण्या देणे, ढुशा देणे हे गुण तर संक्रमित झालेच, परंतु हंबरणे लुप्त पावून त्याची जागा खेकसण्याने घेतली. ही नवीन प्रजाति लवकरच मान्यताप्राप्त झाली. ही प्रजाति स्वाभिमानी होती. शाळेने दिलेल्या पगाराशिवाय कोणत्याही प्रकारे द्रव्यसंचय त्यांस मान्य नसायचा. स्वत:च्या घरी मुलांस बोलावून ज्ञानदान करीत. तसेच गायीगुरेही दूध देत, त्याचे द्रव्य करणे त्यांस मानवत नसे. कालानुरूप गुरुजी या प्रजातीत लक्षणीय बदल घडून आले. हे प्राणि शाळा सोडून सर्वत्र संचार करू लागले. गावातील समवयीन गाढवे उकिरडा फुंकत असत त्यावरून प्रेरणा घेऊन गुर्जी संघटना अस्तित्वात आल्या. त्यांच्या निवडणुकांच्या निमित्ताने लाथाळ्याचा सराव करण्यासाठी पूर्ण दिवस व्यतीत होऊ लागला. त्यातून वेळ मिळाला तर शिकवणे वगैरे छंद जोपासले जाऊ लागले. गुरुजी शाळा सोडून कुठेही आढळून येऊ लागले. असं असलं तरी चुकला गुरुजी संध्याकाळी सात नंतर गावातील एका ठराविक ठिकाणी न चुकता सापडू लागला. प्राणी साहचर्याने आपला जीवनक्रम बदलतात. तसेच गुरांचे झाले. या गुरुजींची अपूर्व दिनचर्या पाहून त्यांनीही त्यांचे अनुकरण करणे सुरू केले आहे. त्यामुळे हल्ली गुरे कुठेही चरतात. कोणताही पाला खातात. रस्त्यात काहीही कारण नसताना मठ्ठ चेहरा करून उभी राहतात. कुणीही हैक करा हलत नाहीत. खूपच त्रास दिला तर शिंगे उगारून अंगावर चालून येतात. अलीकडे तर कसाईखान्यापासून अभय मिळाल्यापासून खाटीक दिसल्यावर बिनदिक्कत शेपूट वर करून गोमूत्रदान करतात. त्यांच्या हम्माsss तून नमोssss असा नाद उत्पन्न झाल्यासारखे वाटते. या सर्वांतून मी खूप काही शिकलो आहे. गुरे हे माझे शिक्षक आहेत. हल्लीचे शिक्षक पाहिले की मला गावाकडील गुरे आठवतात. गावाकडे गेल्यावर माळावर निवांत रवंथ करणारी गुरे पाहिली की खुर्चीवर बसून तंगड्या टेबलावर ठेवून गालात माणिकचंद धरून डोळे बंद करून कान कोरत बसलेले मास्तर आठवतात. दोन्ही प्रजातितील फरक कमी कमी होत चालला असून काही काळातच मूळ गुरु प्राणी दिसू लागेल अशी चिन्हे आहेत. अशा अदभुत प्राण्याच्या सन्मानार्थ शिक्षक दिन साजरा केला जातो. तस्मै श्री गुरवे नम: ||