Monday, August 3, 2020

काळवीट पार्टी

इनेगिने मराठी दोस्त असतात. कुटुंबवत्सल असतात धर्मपरायण असतात. पहाटे लवकर उठतात. चहा केलेला नसेल तर, तो नसतोच, स्वत: करतात. बेडरूम मध्ये आपल्या चाफेकळी नाकातून (सन्माननीय अपवाद लागू) मधुर स्वरात घोरत पडलेल्या सुबक ठेंगणी(पुन्हा तोच अपवाद लागू)साठीही करतात. काही गूड (गूढ नव्हे, गूडच) कॅटेगरीतले नवरे ट्रेमध्ये तो चहा घेऊन बेडरूममध्ये नेऊनही देतात असं ऐकून आहे. ट्रेमध्ये नुसता चहाच नाही तर शेजारी एक फुलदाणी आणि त्यात ताजी फुलं वगैरे! हे म्हणजे जरा अतीच. चहात फुलं बुडवून कोण खातं? बटर बिस्किटं किंवा गेला बाजार शिळी पोळी तरी न्यावी. पण अशा घरांमध्ये मुळात पोळीच होत नसते तर ती शिळी तरी कशी होणार? मग हे मुलांना शाळेसाठी तयार करतात. बेडरूममधून आता द्रुतलयीत दरबारी कानडा ऐकू येत असतो. भैरवीने “काळझोप महोत्सव” कार्यक्रमाची सांगता व्हायला अर्धा पाऊण तास तरी बाकी असतो. कुटुंबवत्सल लोक्स अशा वेळी बेडरूमचा दरवाजा हळू ओढून घेतात. आत तंबोऱ्याची तार आपल्या आवाजाने तुटू नये म्हणून. मग मुलं म्हणजे फुलं असं स्वत:ला बजावत ती फुलं गाडीत कोंबून शाळा नावाच्या सुपीक खड्ड्यात नेऊन रोपतात. तिथे हातात झारी, खताची पोती वगैरे घेऊन माळी लोक सज्ज असतात. ते लगेच गप्प बसा, चुपचाप वर्गात जा वगैरे संस्कार सुरू करतात. मग हे दोस्त समाधानाने घरी येतात. एव्हाना गायन आता संपलेलं असतं. गायक हातात चहाचा कप घेऊन शून्य नजरेने भिंतीकडे पहात घुटके घेत असतात. दोस्त लोक त्या निर्विकार चेहऱ्याकडे पाहून आता फसत नसतात. त्या मोनोक्रोम स्क्रीनच्या मागे वाॅटसन संगणकाला लाजवेल इतकी गणितं एकाच वेळी करणारा सीपीयू कार्यरत आहे हे आता इतक्या वर्षांच्या सहवासानंतर ठाऊक असतं. “चहात साखर कमी पडलीय, २०१० साली या माणसाला मला कुठला रंग आवडतो हे विचारलं तर बेरंग असं उत्तर दिलं होतंन, मी विसरलेली नाहीये, तांदूळ संपलेयत आणायला हवेत, परवाच्या त्या निळ्या ड्रेसवर मॅचिंग सॅंडलही आणायला हवेत, त्या मेल्या अर्चनाला तर शून्य ड्रेसिंग सेन्स आहे, बघ म्हणावं कसं ड्रेस करावं ते, आज पन्नास मीटींगा आहेत तयारी नाहीय, वऱ्हाडी वांग्याचं भरीत यूट्यूब व्हिडिओ बघून करायला हवं एकदा”- असे सगळे विचार एकसमयावच्छेदेकरून करण्याची क्षमता फक्त स्त्रीला मिळालेली आहे हे दोस्त लोक जाणतात. त्या तुलनेत आपला मेंदू मगरीच्या मेंदूपेक्षा जरासाच सुधारला आहे हेही ते जाणून असतात. त्यामुळे ते निमूटपणे ऑफिसला जायच्या तयारीला लागतात. तसे जातातही. पाच सहा पर्यंत, जेवढा पगार मिळतो तेवढ्याचं काम करून परत येतात. कधी जेवण तयार असतं तर कधी नसतं. दोस्त समजुतदार असतात, समानतेचे पाईक असतात. जेवण तयार नसेल तर आपल्याला येणारा एकमेव कांदा-बटाट्याचा रस्सा करतात, भात कुकरला लावतात. मुलं एवीतेवी “इंडियन स्पायसी” फूड खात नसल्यामुळे त्यांच्यासमोर मॅकरोनी चीज ठेवतात. मग सुपर काॅम्प्यूटरही घरी येतो. तिथली कम्प्यूटेशन्स जराही कमी झालेली नसतात. तर इकडे दोस्त लोकांच्या मेंदूत गेटवरून उड्या मारणारी मेंढरं तेवढी दिसत असतात. दिवस मावळतो. लाईट बंद झाल्यासारखा भैरू झोपी जातो, सकाळी परत औत खांद्यावर घेऊन शेतावर जाण्यासाठी.
मग हे सगळे दोस्त कुठे तरी अतिकौटुंबिक सोहळ्यात भेटतात आणि त्यातला एखादा असह्य होऊन “ये जीना भी कोई जीना है लल्लू?” असं म्हणतो. मग मात्र त्यावर सगळे लल्लू पेटून उठतात, म्हणतात ,”नाही नाही त्रिवार नाही!” मग ठरतं. आपण काळवीट पार्टी करायची. अशी पार्टी की जिथे आपण वाघ असू, आणि काळवीटपण असू. जिथे काळविटासारखी शिंगं फुटतील आणि वाघासारख्या निर्भय डरकाळ्या फोडता येतील. जिथे पार्श्वभाग वर करून थेट नदीला तोंड लावून पाणी पिता येईल, आपण किती पितोय हे फक्त डोळे पाण्याच्या वर ठेवून पाहणारी मगर मात्र नसेल. काही काळ मग सगळे दोस्त स्वप्नरंजनात गुंग होतात. तितक्यात एखादा दीनदयाळू मित्र त्याची बायको भारतात जाणार असल्याचे शुभ वर्तमान देतो. मग हे शुभवर्तमान आणणाऱ्या त्या मित्राचे चौफेर कौतुक सुरू होते. “मातेव बारा धर्मदुतांमदलो एकलो, आनी ह्यां शुभवर्तमानाचो बरौवपी” असे स्थान तो मिळवतो. (गरजूंनी कोंकणीतील ख्रिस्तपुराण वाचावे). मग काळवीट पार्टी तर आता होणारच असं ठरतं. याचा गंध घटनास्थळापासून पंचवीस कदमांवर चरत (ही अतिशयोक्ती नाही) असलेल्या हरिणीला लगेच येतो. काळवीट पार्टीच्या चर्चेत गढलेल्या बैलांना आपल्या मागे उपर्निर्दिष्ट हरिणी कधी येऊन उभी राहिली याचा पत्ताही नसतो. तशी हरिणीलाही खात्री असते आपलं पात्र अभयारण्य सोडून कुठे जाणार नाही, पण सर्व हरिणींचा हा मूळ गुणधर्म असतो. वारा योग्य दिशेने वाहत असला तर हरिणीची चाहूल बरोबर तिच्या सहचराला लागते. त्याच्या बेंबीत फुटू लागलेली कस्तुरी क्षणार्धात नाहीशी होते. कुणीही काहीही विचारलेलं नसताना हा काळवीट कसंनुसं हसतो आणि “काय नाय असंच..” असं पुटपुटतो. खुराने कार्पेट खरडत राहतो. हरिणी निघून जाते. बाकीचे काळवीट तुझं तू निस्तर रे बाबा अशा नजरेने पाहत राहतात. काही जण आपल्या हरिणीपाशी जाऊन उगाच तिची चौकशी करून काही ऐकलं वगैरे नाही ना याची चाचपणी करून येतात. पण तरीही पार्टी तो होके रहेगी असा निर्णय होतो. दिवसही ठरतो.
पुढे यथावकाश ती हरिणी भारतात जातेसुद्धा. तिचा धीट काळवीट मुलांना गाडीत कोंबून या क्लासला ने, त्या प्रॅक्टिसला ने, त्यांचा ब्रेकफास्ट, लंच, स्नॅक्स, डिनर बनव यात बुडून जातो. हरिणीने तसं टाईमटेबलच लावून दिलेलं असतं. सकाळी संध्याकाळी स्काईपवर रीतसर रिपोर्ट द्यावा लागतो. हा काळवीट आतुरतेने त्या दिवसाची वाट पहात बसतो. आणि तो दिवसही येतो. मग सगळी तयारी करून तो बसतो. मुलांना स्लीपओव्हरला सोडायचं असतं. निघणार एवढ्यात ज्याच्याकडे सोडायचं असतं तो मित्रच त्याच्या मुलांना घेऊन दारात उभा असतो. पाच मिनिटांत बाकीच्या काळविटांच्याही गाड्या येऊन लागतात. त्यांच्याही गाड्यांतून चिल्लीपिल्ली उतरतात. पुढील पाच मिनिटांत घरात दहा बारा पोरं रणकंदन सुरू करतात. या काळविटाला काय झालं तेही कळत नाही. मग हळूहळू इतर काळविटांबरोबर त्याला कळतं की सर्व हरिणींनी मिळून काळवीट पार्टीला चार चांद लावले आहेत. सर्व हरिणी मस्तपैकी लेडीज् नाईटआऊटला गेल्या आहेत, पोरांची जबाबदारी आपल्यावर आहे. काळवीट सगळ्या बाटल्या लपवतो आणि फ्रीजमधून ज्यूसचे कॅन बाहेर काढतो. काही कार्ट्यांचा कार्टूनशिवाय जीव चाललेला असतो. काळवीट निमूटपणे फुटबाॅलचा गेम बंद करून कार्टून चॅनेल लावतो. काही कार्टी दुसऱ्या टीव्हीवर ऑनलाईन काॅल ऑफ ड्यूटी चालू करतात. आता काळविटांच्या लेकुरवाळ्या गाई झालेल्या असतात. गप्पांचे विषय स्कूल रेटिंग, स्कूल टॅक्स, एसएटी स्कोअर्स पासून लेटेस्ट डाएट फॅड इतक्या रेंजमध्ये फिरत असतात. काळवीट पिझ्झा मागवतो. हा पार्टीचा हाय पाॅईंट असतो. पोरं पिझ्झ्यावर झडप घालतात आणि पाच मिनिटांत बाॅक्सेसमध्ये कडा तेवढ्या सोडून आपली काॅल ऑफ ड्यूटी निभावण्यासाठी निघून जातात. त्यानंतर सुरू होतात प्रत्येक पोराच्या मातेचे फोन आपापल्या काळविटाला. तिकडे मार्गारिटाचे सिप घेत घेत “इज ही डुईंग ओके?” असे काळजीयुक्त प्रश्न झडतात. या काळविटाचं कलत्रही तिकडे जेटलॅगमुळे पहाटे तीन वाजताच जागं झालेलं असतं. तेही फोन करतं. पोरांपासून, फ्रिजमधलं अन्न, डिशवाॅशरमधली भांडी इथपर्यंत स्थावर आणि जंगम मालमत्तेची चौकशी होते. रात्री अकरा वाजेपर्यंत सगळे काळवीट जागा मिळेल तिथे पसरून घोरत असतात. पोरं त्यांच्या कर्तव्यापासून जराही न ढळता कार्यमग्न असतात. कधीतरी एक दीड वाजता सगळे काळवीट लळतलोंबत गाड्यांत बसतात. सकाळी पोरांना न्यायला येतो असं म्हणून अदृश्य होतात. आपला काळवीट नशिबी आलेलं खिल्लार राखत बसतो. पोरं सहा वाजताच उठवून सीरीयल्स, पॅनकेक, एग्ज, चाॅकलेट मिल्क वगैरे सुरू करतात. काळवीट सगळं करतो. खिल्लार आपापल्या गोठ्यात परत जाईपर्यंत दुपारचे बारा वाजतात. काळवीट तडक झोपतो ते संध्याकाळी सहा वाजता उठतो. तेही भारतात रिपोर्ट द्यायची वेळ होते म्हणून. आता उद्या परत ऑफिस. म्हणजे भैरू उठणार, औत खांद्यावर घेऊन शेताला जाणार. समोर स्काईपवर हरिणी विचारत असते,”काय, काल कशी काय झाली काळवीट पार्टी?” काळवीट निस्तेज आवाजात इट वाॅज फन असं सांगतो. ते सांगताना त्याच्या बेंबीतील कस्तुरीचा कोळसा झालेला असतो.

काही तरी वेगळं

सध्या पाककलेबाबत लोक जास्तीत जास्त किती सहिष्णु असू शकतात याबद्दल चाचणी म्हणून अनेक पदार्थ शोधले जात आहेत. डोशाला फूलच काय बनव (मराठी फूल), आणि डोक्यातच काय घाल (खाणाऱ्याला ते बघूनच आपोआप डोक्यात जातं), कुठे टुमदार हिरवेगार कोकणात बालपण काढलेल्या हापूस आंब्याला कुठं तरी मसण्या गावातलं फुगलेलं स्थळ शोधून मनाविरुद्ध लग्न करून पाठव असले प्रकार सुरू आहेत. परवा आधीच नशिबाला विरजण लागलेल्या दह्याला जेव्हा कुकरमध्ये दोन शिट्ट्यांचा घाम फोडून नंतर चीज या दुग्ध समाजातील समाजकंटक घटकाबरोबर जबरदस्तीने नांदवण्यात आलेलं पाहिलं आणि प्रयत्न करून विस्मरणात घालवलेली लहानपणची एक गोष्ट पुन्हा वर आली. लहानपणच्या चुकांमुळे पुढे आयुष्यात नैराश्य येणं म्हणजे हेच का असं वाटून गेलं.
मन थेट बालपणात गेलं. फेड आऊट. फ्लॅशबॅक. मी मऊमऊ अशा दुपट्यावर पहुडलो आहे.. आणि पायाचा अंगठा चोखतो आहे.. दुपटे छान कोरडे आहे. आई स्वयंपाकघरात आहे. स्निग्ध मधुर असा वास सुटला आहे. ते काय असेल माहीत नाही, मला माझं नावही माहीत नाही तर स्वयंपाकघरात काय शिजतंय त्याचं नाव कसं कळणार? मी तेव्हा सहा महिन्याचा होतो हेही मला आज कळतंय. तर तो स्निग्ध मधुर सुवास.. तो मला हवाय. अंगठा चोखून चोखून कंटाळलो होतो. मग दुपट्याचा कोपरा तोंडात घालून पाहिला. बरा लागला. मग तो चोखू लागलो. बाकी हा दुपटं प्रकारच भारी आहे. तोंडालाही मस्त लागतो आणि बिंडालाही मऊमऊ लागतो. छान रवंथ करत होतो. दुपट्याचं काॅटन आणि तोंडातली लाळ यांचं अद्वैत होऊन ब्रह्मानंदी टाळी लागली होती. तेवढ्यात कुणीतरी खसकन् ते तोंडातून ओढून घेतलं. “मेल्या, दुपटं कसलं रे चोखतोयस?? गिळायला चांगलं दूधतूप मिळतंय ते पुरत नाही का??” असे कठोर शब्द कानावर आदळले. मी प्रतिक्षिप्त क्रियेने खालचा ओठ काढला, डोळे मिटले आणि रडण्याची पोझ घेतली. पण तो आताचा काळ नव्हता. आताच्या आया “दुपटं इतकं आवडतं का माझ्या शोन्याला?? आं? बलं बलं. अगदी बाबांच्या वळणावर गेलाय हं माझा शोन्या..” पण त्या काळच्या आया म्हणजे कंप्लीऽऽट नो नाॅनसेन्स होत्या. बाळाला नुसतं झोपवायचं जरी असेल तर मांडीवर घेऊन दणादणा थोपटून बेशुद्ध पाडत. तर मी रडण्याच्या पोझमधे असतानाच माझे तोंड उघडे असल्याचा फायदा घेत स्निग्धआंबटकटुचिकट असला कसला तरी द्रव माझ्या तोंडात ओतला गेला. त्या कधीच न अनुभवलेल्या भीषण चवीमुळे माझ्या आतड्याने तात्काळ बंड केले आणि तो द्रव तितक्याच वेगाने बाहेर फेकला. तो माझ्या झबल्यावर आणि माझ्या प्रिय अशा दुपट्यावर पडला. ते दृश्य माझ्या मेंदूवर कोरले गेले. आज त्याची आठवण आली. तो पदार्थ म्हणजे काॅटेज चीज, दही आणि मध यांचे एक संपृक्त द्रावण होते असे नंतर मोठेपणी मला सांगण्यात आले. माझी दुपटे चोखायची सवय घालवण्यासाठी आमच्या शेजारच्या घरातील एका टणक आजीबाईच्या बटव्यातून हे औषध आले होते म्हणे.
प्रयोग होणारच. माझ्यासारखे लोक त्यात बळी जाणारच. पण मानवजातीच्या एकूण हिताचा विचार करावा. खाणारा मरतो, आणि करणारा सोकावतो, निर्ढावतो. वाहवा करणाऱ्यांनो, लक्षात ठेवा, हे लोण कधी तरी तुमच्या उंबरठ्यावर येऊन उभे ठाकणार आहे. तुम्ही दमूनभागून घरी आल्यावर वरणाचं पाणी वापरून केलेला क्रांतिकारी चहा तुमच्या समोर येणार आहे. त्यात दूध असेल पण वर मेल्टेड चीजने काढलेली लाडिक बदामाकृती तरंगत असेल. त्याबरोबर अधिक लाडिकपणे “ही बिस्किटं खाऊन बघा नं. पहिल्यांदाच केलीयत. काही तरी वेगळं म्हणून. हेल्दीही आहेत. भाज्यांची, कांद्याची सालं, कोथिंबिरीचे देठ काढले होते. कंपोस्टच्या डब्यात टाकणारच होते तेवढ्यात म्हटलं अय्या! टाकून का द्यायची? चाॅकलेट कुकी डो उरलाच होता. म्हटलं बिस्किटं करावीत. थोडं भाजाणीचं पीठ होतं. सासूबाईंनी पाठवलेलं. म्हटलं एवीतेवी त्याला चव नसतेच, यात वापरू. ते टाकलं, ब्राऊन शुगर टाकली. मळून घेतलं. आणि ओव्हनमध्ये ३६० डिग्री फॅरनला वीस मिनिटं ठेवलं. छान दिसतायत. टाॅम्यानं ते काही खाल्लं नाहीन्. माजलाय लेकाचा. पण तुम्ही खा चहाबरोबर.” ही वाक्यं येतायत. तुम्ही वरणपाण्याचा चहा आणि ही कंपोस्टखत कम बिस्किटं चेहरा हसरा ठेवून गिळताय. तुमच्या डोक्यात “आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिलीया..” हा अभंग सतत सुरू झाला आहे. नेत्र पैलतीरी लागले आहेत. माझं आजवरचं लेखन पाहता माझं तरी नरकात जाणं निश्चित आहे पण तुम्ही तुमच्या एकूण कर्तृत्वानुसार स्वर्ग किंवा नरक यापैकी एकाचं दार पाहता आहात.. पांडुरंग हरी.. संपला अवतार. हे दृश्य नजरेसमोर आणा आणि ठरवा काय करायचं ते. काही तरी वेगळंच्या नादात काहीच्या काही वेगळं होऊन बसू नये. सध्या इतकंच.

Monday, July 27, 2020

शूर्पणखेचे रहस्य

इतके दिवस आम्ही जे कोकलून कोकलून सांगत होतो ते आता एका गोखले नावाच्या नवइतिहास नवसंशोधिकेने गोखलून गोखलून सांगितल्यावर लोकांचे तिकडे लक्ष गेले आहेआमचा एवढा तीन तपांचा गाढा अभ्यास, पण आजवर कुणी त्याची साधी दखलही घेतली नाही. असो

बारावीला नव्वद टक्क्यांचे उत्तुंग शिखर गाठण्याचे उद्दिष्ट बाळगल्यानंतर आम्ही अकरावीला साठ टक्क्यांवर बेस कॅंप टाकला. बेस कॅंपपर्यंत पोचेपर्यंतच ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे हे आमच्या आईवडिलांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांनी तेव्हाच, बघू कसे काय जमते ते असे नातेवाईकांना सांगायला सुरूवात केली होती. आणि इकडे आम्हाला मात्रआता बीएला जाऊन म्हशी राखअसे सांगण्यास सुरुवात केली. आम्ही प्रयत्न तर खूप केला. बेसकँपपासून दहाबारा टक्के वर पोचलोही. पण ऑक्सिजनचे सोंग आणता येत नाही. उगाच तिथून आमचा देह खाली आणायचे कष्ट इतरांना का द्या? या निस्पृह विचारसरणीतून आम्ही सत्तर टक्क्यांवरच फोटो काढून घेतले आणि वडिलधाऱ्यांच्या उपरनिर्दिष्ट इच्छेला मान देऊन रीतसर बीएच्या म्हशी घरी आणल्या. तिथेही मानसशास्त्र, मराठी, वगैरे रटाळ शिखरे होतीच. पण पर्यटनाला प्रोत्साहन म्हणून पस्तीस टक्क्याला पोचले की तडक पास झाल्याचे हार गळ्यात पडत असे. मग आम्ही इतरत्र उंडारायला मोकळे होत असू. समुद्रसपाटीपासून दोनतीन मीटर उंचावर लायब्ररी नावाचे स्थान होते. प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन या कॅटेगरीमधे येत असलेले हे स्थान माझ्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले. या लायब्ररीत पुरातत्व विभाग नावाचा एक सगळ्यात अंधारलेल्या कोपऱ्यातील एक सेक्शन होता. पोथ्या, बासने, बाडे, रुमाल यांच्या जोडीला धूळ, कोळिष्टके, प्रसंगोपात्त उंदीर यांचा सहवास मिळत असे. त्यामुळे एकांताची चांगली सोय होती. परंतु बीएच्या मुली बीएच्या मुलांकडे पाहून झुरळ पाहिल्यासारखे करत. त्यामुळे हा सेक्शन अजूनच एकाकी पडून होता. हा सेक्शन पत्ते वगैरे खेळायला बरा पडत असे. असेच एकदा तीन पत्तीचा डाव रंगात आला असताना अचानक वरच्या रॅकमधून एक बाड माझ्या अंगावर पडले. खूप जीर्ण अशा कागदांची चळत त्यात बांधलेली होती. “शूर्पणखेचें रहस्यअसे पहिल्या पानावर लिहिले होते. त्यावेळी बाबूराव अर्नाळकर जोरात होते. त्यांच्या झुंजार कथा वाचून अंगात स्फुरण येत असे. झुंजारप्रमाणे आपल्यालाही एखादी विजया मिळेल का असे वाटत असे. पण बीए च्या त्या आमच्या वर्गात परकरझंपर पासिंगच्याच गाड्या जास्त असल्यामुळे त्यांच्यात विजया कमी आणि सत्यभामा जास्त होत्या. काॅलेजातून परत जाताना वाटेत भेळ खाणे हा त्यांच्या आयुष्यातील रोमहर्षक आणि थरारक प्रसंग असे. अर्नाळकरांनीशूर्पणखेचें रहस्यकधी लिहिले बुवा? त्यांच्या जवळपास सगळ्या रहस्यकथा मी वाचून काढल्या होत्या. बीएला अर्नाळकर लावले असते तर माझे पस्तीस टक्क्यांचे सत्तर टक्के झाले असते यात मला मुळीच शंका वाटत नाही. अशा विचारात मी ते पहिले पान बाजूला करून पुढचे पान पाहिले. तर ती एक बखर निघाली. बखर म्हटली की कुणा ग्रांट डफ असल्या नावाच्या इंग्रजाने लिहिलेलं काही तरी असेल असं वाटलं होतं. पण ही बखर खूपच प्राचीन निघाली. एका रामायणकालीन प्रकर्णाचा तो एक रुमाल होता. सुरुवातीची एक दोन पाने वाचूनच हे काहीतरी क्रांतिकारी सत्य आपल्या हाती पडले आहे याची आम्हाला खात्री पटली

दंडकारण्य नावाच्या अरण्यात ही कथा घडते. राक्षस नावाच्या एका अतिशय प्रगत अशा जमातीने आपले अस्तित्व टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला तोही शक्यतो प्रथम अहिंसक मार्गांचा अवलंब करून, शेवटी नाईलाजाने ठकासी व्हावे ठक या मार्गाने त्यांना जावे लागले. दंडकारण्य नावाचे एक अरण्य रावणाने आपल्या प्रिय अशा बहिणीच्या नावे रीतसर करून दिले होते. तिचे नाव शूर्पणखा होते. ती अत्यंत विद्वान होती. राक्षसांच्या मते. आणि सौंदर्यवतीही. हेही राक्षसांचे मत असे बखरकार लिहितो. त्या काळात वडिलोपार्जित मिळकतीवर बहिणींचा हक्क नसे. अशा काळात शूर्पणखेच्या नावे दंडकारण्याचा सातबाराचा उतारा असणे हे क्रांतिकारी होते. रावण हा अतिशय न्यायदक्ष, नीतीमान आणि पुरोगामी असा राजा होता याचा हा एक पुरावा मानला जाऊ शकतो. तो दिवसातील बहुतांश काळ शंकराचे ध्यान करीत असे आणि फावल्या वेळात राज्य वगैरे करीत असेशंकराची पूजा करत असताना शंकर त्याच्याकडे त्याचे मस्तक अर्पण करायला सांगत. ही कटकट परत नको या हेतूने. पण रावणाला ही हिंट समजत नसे. तो नेहमी एक मस्तक अर्पण करत असे. शेवटी कंटाळून शंकर प्रसन्न झाले असे म्हणतात. तर हे असे असताना मुद्दाम वेळ काढून तो दुसऱ्यांच्या बायकांचे अपहरण करणे वगैरे उद्योग करत असेल असे मानणे कठीण आहे. रावण हा निसर्गप्रेमीही होता. तोच काय, सगळे राक्षस निसर्गप्रेमी होते. जैविक विविधता असावी असा राक्षस जमातीचा ठाम विश्वास होता. याच हेतूने दंडकारण्य ही जागा निश्चित करून तेथे सर्व जिवांना अभय दिले गेले होते. काही चुकार राक्षस एखाददुसरे हरीण ससा वगैरे मारीत पण ते केवळ उपजीविकेचे साधन म्हणूनतेथे ऋषीमुनीही राहत. ते जपजाप्य करीत, कंदमुळे खाऊन उपजीविका करत. शूर्पणखेच्या नावाने या दंडकारण्याचा सातबारा असल्याने या ऋषिमुनिंना तिची रीतसर परवानगी घ्यावी लागे. ही परवानगी दर वर्षी रीन्यू करावी लागे. काही ऋषी ते करत नसत. विसरलो म्हणून सांगत. मग शूर्पणखा वसुलीसाठी आपले राक्षस त्यांच्याकडे पाठवी. ते राक्षस अशिक्षित असत. ऋषी डिप्लोमॅटिक या भाषेत बोलत. राक्षसांना डिप्लोमॅटिक भाषा अवगत नव्हती. त्यांची भाषा ही राक्षसी असे. उदाहरणार्थ - काठी हातात घेऊन काडकन् मोडून दाखवणे म्हणजेनमस्कार, कसे आहात तुम्ही?”.  गळा आवळणे म्हणजेतुम्हाला भेटून खूप आनंद झाला!” आणि मग पुढे जशाजशा भावना अस्खलित होत त्यानुसार या क्रिया अस्खलित होत. ते त्या भाषेत ऋषींना शूर्पणखेचा दृष्टीकोन समजावून देण्याचा प्रयत्न करीत. परंतु ऋषी लोकांचा ते हिंसक आहेत असा गैरसमज होत गेला. त्यांनीही मग राक्षसांसाठी खास शाप तयार केले. “भस्म होशील!” हा शाप तत्कालीन ऋषींमध्ये प्रिय होता. अधूनमधून काही ऋषीही या शापाच्या फ्रेंडली फायरमध्ये भस्म होत. त्यामुळे हा शाप काळजीपूर्वक आणि नेम धरून सोडावा लागे. असं सगळं शांततापूर्ण आयुष्य चाललं असताना काही गरज नसताना श्रीरामाने आपल्या सावत्र आईच्या इच्छेला स्वीकारले आणि वनवास स्वीकारला. बरं, भारतात इतकी अरण्ये होती, अगदी अयोध्येच्या उत्तरेलाच कितीतरी घनदाट अरण्ये होती. काश्मीरसारखे निसर्गसुंदर वन होते. तिथे अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान अजून अस्तित्वात नसल्यामुळे राक्षसांचा त्रास नव्हता. तिकडे गेले तरी चालणार होते. पण काही अज्ञात कारणाने त्यांनी दंडकारण्यच निवडले. आणि जागाबिगा निवडून प्रशस्त कुटीच बांधून टाकली. जागा एनए आहे वगैरे काहीच पाहिले नाही. वास्तविक, शूर्पणखेकडून ना हरकत प्रमाणपत्र आणणे हे आवश्यक होते. तेही केले नाही. या अनधिकृत बांधकामाची बातमी शूर्पणखेकडे गेली. बाईंनी शहानिशा करण्यासाठी दुरून कुटीची पाहणी केली. त्यात श्रीरामाची अत्यंत देखणी मुद्रा पाहताच बाई ना हरकत प्रमाणपत्र विसरल्या. राक्षस असल्याने त्यांना कुठलेही मायावी रूप धारण करता येत असे. निळू फुलेंचे रूप घेऊन रामाला वाड्यावर बोलवावे असाही एक विचार त्यांच्या मनात येऊन गेला. पण त्यांना श्रीराम खरोखरच आवडले होते. राक्षस जातीत जेवढा नट्टापट्टा अलाऊड होता तेवढा सगळा करून त्या श्रीरामांना भेटायला गेल्या. सीतामाईंना प्रथम वाटले कुणी तरी भीक मागायला आली आहे. त्यांनीअजून भांडी पडली नाहीत, नंतर येअसे सांगितले. शूर्पणखा म्याडम रागाने जांभळ्या पडल्या. त्यांनी अपमान गिळून श्रीराम कोठे आहेत, असे विचारले. ते मृगयेस गेले आहेत, येतीलच एव्हढ्यात असे सीतामाईंनी सांगितले आणि त्यांच्यासमोरदंडकारण्य वार्ताभूर्जपत्र टाकले. काही काळाने श्रीराम घरी आले तेव्हा शूर्पणखा म्याडम यांनी फालतू वेळ घालवता त्यांना रीतसर मागणी घातली. तेव्हा श्रीरामांनी आपल्या एकपत्नीव्रताची माहिती देऊन राक्षसांमध्ये या व्रताचा प्रसार करण्याचे सुचवले. तेव्हा चिडलेल्या म्याडमनी आपण रावणाची बहीण असल्याचे सांगत, ज्या जमिनीवर तुमची कुटी उभी आहे ती जमीन आपल्या  मालकीची असल्याचे सांगितले. शिवाय आपण कुटी उभारण्यासाठी कोणतीही रीतसर परवानगी घेतली नसल्याचे लक्षात आणून दिले. आपला प्रस्ताव स्वीकारल्यास आपण या अनियमततेकडे दुर्लक्ष करू असे त्या म्हणाल्या. श्रीरामांनी यापूर्वी अशा अनेक गुंठामंत्र्यांचा समाचार घेतलेला असल्याने त्यांनी विचलित होता आपण थेट कोर्टात भेटू असे सांगितले. त्यात भर म्हणून लक्ष्मणाने "मागणी घालायला यायचं होतं तर निदान थोडा तरी मेकअप करून यायचं होतं, असं पारोशाने येणं बरं नाही." असे उद्गार काढले. असेल नसेल तेवढं सगळं मेकअपचं सामान वापरूनही आपल्याला पारोसं म्हटले गेल्याने ताईंचा राग अनावर झाला आणि आता बघाच काय करते ते अशी धमकी देऊन त्या तिथून निघाल्या. मायावी विद्या अवगत असल्याने त्यांनी आपले नाक कापले गेल्याचे रूप घेतले आणि थेट आपल्या भावाकडे गेल्या. तिथे आपले नेहमीचे मस्तक वगैरे अर्पण करण्याचे नित्यकर्म उरकून रावण नवीन आलेले मस्तक चाचपून पाहत असतानाच ताई रडत रडत दादाकडे आल्या. आपला झालेला अपमान सांगून, त्याचा बदला न घेतल्यास व्यर्थ तुझे राक्षसजीवन वगैरे तत्कालीन मराठी सिनेमात  सर्रास वापरले जाणारे संवाद म्हटले. यानंतर जे काही रामायण घडले ते आपल्या सर्वांनाच माहीत आहे. 

बखर वाचून आम्ही स्तिमित झालो. या विषयावरच आपण पीएचडी करावी असे आमच्या मनाने घेतले. बीए नंतर एमए आणि मग पीएचडी यात साधारण सात वर्षे गेली. पण आम्ही जिद्दीने शूर्पणखेवर झालेल्या अन्यायावर सखोल अभ्यास करून प्रबंध प्रसिद्ध केला. दुर्दैवाने आमचा हा प्रबंधही आज लायब्ररीच्या त्याच अंधारलेल्या पुरातत्व विभाग या अंधारलेल्या सेक्शनमध्ये प्रकाशात येण्याची वाट पाहत पडून आहे. सत्याला कधी ना कधी वाचा फुटतेच या आशेवर आम्ही होतो. आणि आज गोखलेबाईंनी त्याचे सार्थक केले. त्यांनी अभ्यासपूर्वक हे केले असेल याची पूर्ण खात्री आहेच. या संशोधनाला व्हॉटसअप विश्वविद्यालयाकडून भरघोस मदत मिळाली असेल याचीही खात्री आहे. आमच्या काळी हे विश्वविद्यालय नव्हते याची खंत आज आम्हाला जाणवत आहे. ते तसे असते तर आम्ही श्रीराम आणि शूर्पणखा भेटीचा फोटोही पुरावा म्हणून नक्की सादर केला असता. असो. गोखलेबाईंच्या लेखमालेच्या निमित्ताने का होईना, आज सत्य सर्वांसमोर येत आहे याचाच आनंद वाटतो आहे. होते गोखले म्हणून सत्य ओळखले.